कविता किंवा गाणे कसे सुचते/स्फुरते, असा प्रश्न कवी किंवा गीतकाराला विचारला तर तो त्याच्यापरिने त्याचे उत्तर देतो.त्या कशा सुचतात याबाबतचे प्रत्येकाचे उत्तर वेगवेगळे असू शकते.आपल्यापैकीही अनेकांनी विशिष्ट वयात किंवा विशिष्ट वेळी/प्रसंगात कविता केल्याही असतील. कविता किंवा आपल्याला जे व्यक्त करायचे आहे ते शब्दात मांडणे महत्वाचे.
साधे-सोपे शब्द वाचकांच्या मनाचा ठाव घेतात, त्यांना ती कविता भावते.त्यांच्या कविता दीर्घकाळ स्मरणात राहतात. त्या अमाप लोकप्रिय होतात, इतकेच नव्हे तर त्या कवीसारख्या कविता लिहिणारे अनेक नवीन कवी तयार होतात. तो काव्यप्रकार मराठी साहित्यात रुजतो. हे भाग्य २५/३० वर्षांपूर्वी चंद्रशेखर गोखले या कवीला लाभले. त्यांनी सादर केलेला 'चारोळी' हा काव्यप्रकार नवीन होता. गोखले यांनी फक्त चार ओळींमध्ये आपल्या मनातील भावना ताकदीने व्यक्त करण्याचे आव्हान आणि कसब 'मी माझा'च्या निमित्ताने पेलून दाखवले आणि संपूर्ण महाराष्टात 'मी माझा' हा काव्यसंग्रह आणि चारोळी हा काव्यपप्रकार लोकप्रिय झाला.
'मी माझा' नंतर गोखले यांचे 'पुन्हा मी माझा', 'मी नवा', 'माझे शब्द', 'माझ्या परीने मी' हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. आता गोखले यांचा 'मंचविशी प' हा नवा काव्य/चारोळी संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. 'मी माझा'हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित करण्याबाबत गोखले यांनी काही प्रकाशकांशी संपर्क साधला होता. पण त्यांनी 'मी माझा' नाकारला आणि शेवटी गोखले यांनी 'मी माझा' स्वत;च प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला, त्यांनी तो प्रकाशितही केला व 'मी माझा'ने इतिहास घडविला.
हिंदी, गुजराथी व इंग्रजी भाषेतही त्याचा अनुवाद झाला असून 'ब्रेल लिपी'तही 'मी माझा' प्रकाशित झाले आहे. खरे तर 'मी माझा'च्या ही अगोदर रॉय किणीकर यांचा 'उत्तररात्र'हा चार ओळींची कविता असलेला काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता. पण दुर्देवाने तो लोकांपर्यंत पोहोचलाच नाही. पण आपल्याही अगोदर चारोळी हा काव्यप्रकार किणीकर यांनी सादर केला होता, असे गोखले आवर्जून सांगतात.
गोखले यांच्या नव्या काव्यसंग्रहाचे शीर्षकच ते कोणत्या वयोगटातील व्यक्तींसाठी आहे, हे सांगते. त्यांनी काव्यसंग्रहाच्या अर्पण पत्रिकेतही 'जे जे आपल्या मंचविशीपमध्ये मनापासून रमलेत त्यांच्यासाठी' असे लिहिले आहे. पण असे असले तरी जे मनाने तरुण आहेत त्या सगळ्यांसाठी हा नवा काव्यसंग्रह आहे.
'मंचविशी प'ची सुरुवात
कितीदा तो तिच्या
आधी येऊन बसायचा
आणि कितीदा ती गेल्यावर
तो तिथेच बसलेला दिसायचा
या चारोळी ने केली आहे.
चारोळ्या वाचतांना पुढे
त्या दोघांतला संवाद
असाच असायचा
जरा वेळाने वाळूत
चार रेघोट्या दिसायच्या
मनात एक असतं आणि
ओठावरती भलतंच
नंतर कितीही म्हटलं जाऊ दे
तरी मनातलं मनात सलतंच
असं पाहू नकोस
सगळं माहित असल्यासारखं
तुला हवं असलेले उत्तर
माझ्या डोळ्यांत दिसत असल्यासाऱखं
तुला काय शब्द
ओठांत धरता येतात
आणि कधी काजळासारखे
डोळयांत भरता येतात
या आणि इतर चारोळ्या वाचकांसमोर येतात.
काव्यसंग्रहाच्या शेवटी
रंगाचा इवलासा टिळा
तू लावून गेलास बंद दारावर
आणि त्याचा नाजुकसा ठसा
उमटला माझ्या उरावर
ही चारोळी आहे.
अवघ्या ३२ पानांच्या या छोटेखानी (पॉकेट साईज आकारातील) पुस्तकात २९ चारोळ्या आहेत. एक चारोळी पुस्तकाच्या मलपृष्ठावर दिली आहे. या सर्व चारोळ्या मनाचा ठाव घेणाऱया आहेत. चारोळ्या वाचतांना प्रत्येकालाच ती चारोळी म्हणजे आपला स्वतचा अनुभव वाटेल. मलपृष्ठावर दिलेल्या चारोळीत
डोळे भरुन आले की
तुझं रुप कसं दिसायला लागतं
छे, ते दिसण्यासाठी डोळ्यातलं पाणी
हलक्या हातानी कुणी पुसावं लागतं
असे गोखले सहजपणे सांगून जातात आणि ते आपल्यालाही पटते.
@शेखर जोशी
--------------------------------------
चंद्रशेखर गोखले यांचा ई-मेल आयडी
chandrashekhargokhale18@gmail.com