गुरुवार, १० एप्रिल, २०२५

कालबद्ध आणि ठोस 'अभिनव'कृती आराखड्याची गरज

कालबद्ध आणि ठोस 'अभिनव'कृती आराखड्याची गरज प्रती अभिनव गोएल कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त नमस्कार कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त म्हणून भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी अभिनव गोएल यांनी सुत्रे स्विकारली आहेत. गोएल यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. सर्वपक्षीय राजकारण्यांनी एकत्र येऊन कल्याण आणि डोंबिवलीची अक्षरशः वाट लावली आहे. यात आमुलाग्र सुधारणा करायची असेल तर कठोर राहून आणि कोणाचाही मुलाहिजा न बाळगता या शहरांच्या विकासासाठी 'अभिनव' कृती आराखडा कालबद्ध कार्यक्रम राबवून अंमलात आणावा लागेल आणि हेच तुमच्या समोरचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची स्थापना झाल्यानंतर पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर टी. चंद्रशेखर यांच्यासारखे अधिकारी आयुक्त म्हणून महापालिकेला लाभले. पण निवडून आलेल्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी काही महिन्यांतच त्यांची बदली केली. कदाचित चंद्रशेखर किमान तीन वर्षे तरी कडोंमपात आयुक्त म्हणून राहिले असते तर त्यांनी ठाणे शहराचा चेहरामोहरा जसा बदलला तसा तो कल्याण व डोंबिवली या शहरांचा बदलला गेला असता. यु.पी. एस. मदान यांच्यासारख्या कठोर अधिका-यानेही इथे आयुक्त म्हणून काम केले आणि आपल्या कामाचा ठसा उमटवला.‌ डोंबिवलीत आज जे सावळाराम महाराज क्रीडा संकुल दिसते आहे त्याचे सर्व श्रेय मदान यांचे आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात या जागेला बंदिस्त कुंपण घालून ही जागा अतिक्रमण किंवा बेकायदा झोपडपट्टी उभी राहण्यापासून वाचविली होती. महापालिका क्षेत्रात जितक्या म्हणून आरक्षित जागा आहेत त्या जागेवर बंदिस्त कुंपण/ भिंत बांधून त्या जागी अतिक्रमण, बेकायदा इमारती, झोपडपट्टी, टप-या उभ्या राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
कल्याण डोंबिवली महापालिकेत पहिल्यापासून एकसंध असलेली शिवसेना व भाजप यांनी दीर्घकाळ सत्ता उपभोगली. नंतर काही वर्षे दोन्ही कॉग्रेस सत्तेवर होती. २००९ मध्ये झालेल्या कडोंमपा निवडणुकीत शिवसेना व भाजपला कंटाळलेल्या मतदारांनी मनसेचे २०हून अधिक नगरसेवक निवडून दिले. भाजपचे बालेकिल्ले समजल्या जाणाऱ्या प्रभागातही भाजपच्या उमेदवार पराभूत झाले होते. पण नागरिक/ मतदार ज्या अपेक्षेने मनसेकडे पाहात होते त्या अपेक्षा मनसेने पूर्ण केल्या नाहीत आणि नंतरच्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत मनसेला चांगलाच फटका बसला. पुन्हा भाजप- शिवसेना सत्तेवर आली. असो. 'रेरा'ची बनावट कागदपत्रे तयार करून महापालिका क्षेत्रात ज्या ६५ बेकायदा इमारती उभ्या राहिल्या त्या पाडण्याचे खरे आव्हान आपल्यासमोर आहे. मावळत्या आयुक्त इंदुराणी जाखड यांनी या प्रकरणी कठोर पावले उचलत कारवाईला सुरुवात केली होती. महापालिका प्रशासनातील अधिकारी, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पोलीस, अन्य शासकीय यंत्रणा आणि बांधकाम व्यावसायिक यांच्या अभद्र युतीमुळेच या इमारती व अनधिकृत बांधकामे उभी राहिली, हे वास्तव आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार या इमारती पाडण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनावर आहे. अनधिकृत फेरीवाले यांचेही मोठे आव्हान आपल्याला पेलायचे आहे. रेल्वे स्थानक परिसरला पडलेला फेरिवाल्यांचा विळखा आजवर कोणत्याही महापालिका आयुक्तांना सोडवता आलेला नाही. नवीन महापालिका आयुक्त पदाची सूत्रे स्विकारल्यानंतर अचानक कल्याण किंवा डोंबिवलीतील रेल्वे स्थानक परिसराला भेट देण्याचा उपचार पार पाडतात. तुम्हालाही तो पार पाडावा लागेल. पण तो उपचार राहू नये आणि फेरिवाल्यांचा कायमचा बंदोबस्त करावा ही अपेक्षा. फेरिवाले हटविण्याची व रेल्वे स्थानक परिसरात बसणार नाहीत याची जबाबदारी ज्यांच्यावर दिली असेल त्यांनी ती प्रामाणिकपणे पार पाडली नाही, तर त्यांच्यावर जरब बसेल अशी कठोरात कठोर कारवाई करावी. ते अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन रोखावे, दरमहा वेतनातून काही रक्कम कापावी, पदोपदी रोखावी. या उपायांनी तरी ही मंडळी चांगले काम करतात का? हे पाहता येईल.‌
फेरीवाल्यांप्रमाणेच काही मुठभर, बेशिस्त आणि मुजोर रिक्षाचालकांचा रेल्वे स्थानकाला पडलेला विळखा सोडविण्यासाठीही आपण पुढाकार घ्यावा. रिक्षा चालक मालक संघटना, त्यांचे पदाधिकारी, वाहतूक पोलीस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांची तातडीने बैठक घ्यावी आणि रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा उभ्या राहणार नाहीत, इकडेही लक्ष द्यावे. डोंबिवली आणि कल्याण शहरात रिक्षांसाठीची शेअर भाडे पद्धत कायम ठेवून मीटरसक्तीसाठीही संबंधितांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा. रेल्वे स्थानक परिसरातच दहा/ वीस पावलांवर वेगवेगळ्या रिक्षा चालक मालक संघटनांना देण्यात आलेले रिक्षा थांबे तत्काळ हटवावेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन सेवा अधिकाधिक सक्षम कशी होईल ते पाहावे. रेल्वे स्थानकापासून दूरवर उभ्या राहिलेल्या निवासी संकुलासाठी कडोंमपाची परिवहन सेवा तातडीने सुरू करावी.
या खेरीज डोंबिवलीतील ठाकुर्ली उड्डाणपुलाचा कल्याण दिशेकडे जाणारा जो मार्ग आहे, तो तातडीने सुरू होण्यासाठी पावले उचलावीत, शहरातील रस्ते व चौकांचे नामफलक झाकून त्यावर चेहरे फलक लावणा-या सर्वपक्षीय राजकारण्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारावा. शहर विद्रूप करणा-या या निर्लज्ज लोकांकडून कोणताही मुलाहिजा न बाळगता दंड वसूल करावा, गुन्हे दाखल करावेत. अनधिकृतपणे पाणी जोडणी घेणा-यांच्या विरोधात धडक मोहीम सुरू करून पाणी चोरीला आळा घालावा, पदभार स्वीकारल्यानंतर आपण तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करू असे सांगितले होते. महिन्यातून किमान एकदातरी समाज माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधावा, कडोंमपाच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात आठवड्यातून एकदा नागरिकांना भेटावे, महापालिकेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी वेळेपूर्वी कार्यालयात व आपल्या जागेवर हजर असतील, असे पाहावे. महत्त्वाचे रस्ते, चौक येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यातही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी रस्ते, चौक अडवले जात आहेत. कोणतीही व कितीही मोठी संस्था वा राजकीय पक्ष असो आता यापुढे रस्ता/ चौक अडवून, वाहतूक अन्यत्र वळवून ते आयोजित करत असलेल्या कार्यक्रमांना सरसकट बंदी घालण्याचा कठोर व धाडसी निर्णय आपण घ्यावा, अशी आग्रही मागणी आहे. तसेच आगामी दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रौत्सव हे रस्ता व चौक अडवून, मंडप उभारून साजरे होणार नाहीत हे ही पाहावे. गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे. कडोंमपा क्षेत्रात याचीही काटेकोर अंमलबजावणी करावी.
आपण कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त म्हणून किती दिवस, महिने, वर्षे इथे राहाल याची आम्हाला कल्पना नाही. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्याही राज्य पातळीवरील नेत्यांच्या मनात आहे तोपर्यंत तुम्ही इथे असाल, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. तुम्ही कल्याण डोंबिवली महापालिकेत जितका काळ राहाल त्या काळात धडाकेबाज कामगिरी करून दाखवा, कठोर निर्णय घ्या. सहकारी अधिकारी, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांचे ऐकून घ्या पण प्रत्यक्षात कृती मात्र तुमच्या मनाला पटेल व योग्य असेल तीच करा. नाव चांगल्या प्रकारे कमवा. असो. अजूनही खूप काही बोलायचे आहे पण तुर्तास इथेच थांबतो. आपल्या पुढच्या कार्यकाळासाठी खूप खूप शुभेच्छा. कळावे, आपला शेखर जोशी १० एप्रिल २०२५

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

तुम्ही नमुद केलेल्या बाबीवर मनपा आयुक्त गंभीरतेने विचार करतील तर नक्कीच फरक पडेल.
मनपा आयुक्त टी.चंद्रशेखर यांनी त्यांचा तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण केल्यानंतर त्यांची बदली झाली.कल्याण डोंबिवली मनपाचा अनुभव त्यांना ठाण्याचा चेहरा बदलताना नक्कीच झाला.इथली परिवहन सेवा तेव्हाचसुधारेल जेव्हा लोकप्रतिनिधींना ते आवश्यक वाटेल तेव्हाच सुधारेल.रिक्क्षाचा प्रश्न सुटणे कठिण आहे.तो RTOच्या अखत्यारीतील विषय आहे आणि तेच उदास आहेत.शक्य झाल्यास मनपा आयुक्तांची प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेट घेउन हे प्रश्न आणि त्यावरचे उपाय सांगावे.