बुधवार, १८ जून, २०२५
'देफ' ना दुसरे शरद पवार होण्याची हौस ती किती?
शुक्रवार, १३ जून, २०२५
भारतीय रेल्वे: सरकारमान्य मृत्यूचा सापळा! ज्येष्ठ पत्रकार अजित गोगटे यांचा लेख
सोमवार, २८ एप्रिल, २०२५
नतद्रष्ट 'नट'रंगवाला
सोमवार, १४ एप्रिल, २०२५
सहा डझनांहून अधिक छायाचित्रांचा चेहरे फलक!
मंगळवार, २५ मार्च, २०२५
दोन डझनहून अधिक छायाचित्रांचा चेहरे फलक
![]() |
तब्बल दोन डझनहून अधिक नेत्यांची छायाचित्रे असलेला हाच तो चेहरे फलक |
दोन डझनहून अधिक छायाचित्रांचा 'चेहरे फलक' लावून
भारतीय जनता पक्ष डोंबिवलीतर्फे गुढीपाडवा शुभेच्छा
नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता, विष्णुनगर डोंबिवली पश्चिम, पंजाब नॅशनल बँक चौक येथे कमान उभारून त्यावर सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा (डोंबिवली) गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणारा फलक लागला आहे. सत्ताधारी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तब्बल दोन डझनहून अधिक नेत्यांच्या छायाचित्रांची हा फलक पूर्ण भरलेला आहे.
![]() |
छायाचित्रात नेताजी सुभाषचंद्र बोस नामफलक दिसत आहे. तर चेहरे फलकाने महर्षी कर्वे रस्ता नामफलक झाकला गेला आहे |
![]() |
कमानीवरील चेहरे फलक लावण्याआधी नेताजी सुभाषचंद्र बोस व महर्षी कर्वे रस्ता नामफलक असे स्पष्ट व ठळकपणे दिसत होते. |
कमानीवरील भरगच्च चेहरे फलकामुळे सुदैवाने चौकातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा नामफलक वाचला आहे. मात्र ते भाग्य महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या वाट्याला आले नाही. या चेहरे फलकाने महर्षी कर्वे नामफलक पुन्हा एकदा झाकला गेला आहे.
![]() |
भाजपचे आमदार व प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण व अन्य दोन डझनहून अधिक नेत्यांची छायाचित्रे असलेला हाच तो चेहरे फलक |
फलकावर भाजपचे आमदार व भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मोठे छायाचित्र असून फलकावर डाव्या बाजूला चव्हाण यांच्यासह आठ जणांची (यात अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, मोदी, शहा, नड्डा आणि फडणवीस) छायाचित्रे आहेत. तर उजवीकडे वाजपेयी, ठाकरे, दिघे यांची छायाचित्रे कायम ठेवून त्याखाली एकनाथ शिंदे, अजित पवार, श्रीकांत शिंदे, राजेश मोरे यांची छायाचित्रे आहेत. इकडेही रवींद्र चव्हाण यांचे छायाचित्र आहेच. या फलकाच्या अगदी वरच्या बाजूला छोट्या छोट्या गोलात बसवलेली तब्बल दोन डझनहून अधिक नेत्यांची (एकूण ३१) छायाचित्रे आहेत.
शेखर जोशी
२५ मार्च २०२५
सोमवार, २४ मार्च, २०२५
सुभाषचंद्र बोस, महर्षी कर्वे नामफलक पुन्हा एकदा झाकला जाणार
![]() |
नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता, विष्णुनगर डोंबिवली पश्चिम पंजाब नॅशनल बँक चौक येथील नामफलक |
सुभाषचंद्र बोस, महर्षी कर्वे नामफलक
पुन्हा एकदा झाकला जाणार
शेखर जोशी
नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता, विष्णुनगर डोंबिवली पश्चिम पंजाब नॅशनल बँक चौक येथील नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता व महर्षी कर्वे रस्ता नामफलक पुन्हा एकदा झाकला जाणार आहे. दोन दिवसांपूर्वी येथे बांबूची कमान बांधण्यात आली असून बहुदा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणारा फलक तिथे लावण्यात येणार असावा. कमानी उभारण्यात आल्या असत्या तरी अद्याप फलक लावले गेले नसल्याने कोणत्या बड्या असामीचा चेहरे फलक या कमानीवर लावला जाणार आहे? हे गुलदस्त्यात आहे.
![]() |
नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता विष्णुनगर डोंबिवली पश्चिम पंजाब नॅशनल बँक चौक येथे उभारण्यात आलेली कमान |
कमान मोठी असल्याने ज्यांचा फलक लावण्यात येईल ती मंडळीही 'मोठी' असामी असण्याची शक्यता आहे. या मोठ्या असामी म्हणजे सत्ताधारी पक्षाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे असतील की शआमदार रवींद्र चव्हाण असतील याची उत्सुकता आहे. असामी कोणीही असोत पण या चेहरे/शुभेच्छा फलकबाजीमुळे आता पुन्हा एकदा सुभाषचंद्र बोस व महर्षी कर्वे नामफलक झाकला जाणार हे नक्की.
डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागात रस्ते, चौक येथे अनेक ठिकाणी अशा कमानी उभारण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी या कमानी वाहतुकीसाठी अडथळा ठरतात. पण सर्वपक्षीय राजकारण्यांना त्याचे काहीच सोयरसुतक नाही. गणपती, नवरात्र, दहीहंडीच्या निमित्ताने कमानी उभारण्याचा अक्षरशः उत आलेला असतो. गणपतीसाठी उभारण्यात आलेल्या या कमानी पुढे नवरात्रापर्यंत कायम असतात.
![]() |
या कमानीमुळे आता पुन्हा एकदा नेताजी सुभाषचंद्र बोस व महर्षी कर्वे रस्ता नामफलक झाकला जाणार आहे |
राजकीय फलकबाजी, चेहरे फलक लावून तुमचे नामफलक झाकणा-या या सर्वपक्षीय कोडग्या राजकारण्यांना नेताजी सुभाषचंद्र बोस, महर्षी धोंडो केशव कर्वे तुम्ही क्षमा करा. आपले चेहरे फलक लावल्याशिवाय गुढीपाडवा साजराच होणार नाही, असे या महान मंडळींना वाटत असावे आणि त्यासाठीच ही कमान उभारली असावी. असो.
शेखर जोशी
२४ मार्च २०२५
शनिवार, २२ मार्च, २०२५
राजकीय फलकबाजीविना गुढीपाडवा साजरा व्हावा
राजकीय फलकबाजीविना गुढीपाडवा साजरा व्हावा;
डॉ. श्रीकांत शिंदे, रवींद्र चव्हाण यांना आवाहन
- शहर विद्रूपीकरण न करण्याची गुढी उभारा
शेखर जोशी
यंदाच्या वर्षी गुढीपाडवा शुभेच्छा फलकबाजीने डोंबिवली शहराचे विद्रुपीकरण होणार नाही, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा आणि शुभेच्छांच्या राजकीय फलकबाजीविना गुढीपाडवा साजरा व्हावा.
नववर्ष स्वागत यात्रेची सुरुवात डोंबिवलीतून झाली आणि पुढे संपूर्ण महाराष्ट्राने त्याचे अनुकरण केले. त्याप्रमाणे यंदाच्या गुढीपाडव्यापासून शुभेच्छा फलकबाजी विरहित गुढीपाडवा साजरा करण्याचा नवा आदर्श या दोघांनी घालून द्यावा.
शुभेच्छा द्यायच्याच असतील तर या दोघांनी पुढाकार घेऊन डोंबिवली शहरातील सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करावी. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्यावतीने शुभेच्छा देणारा फक्त एक मोठा फलक डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागात रेल्वेस्थानक परिसरात लावावा.
या फलकावर डोंबिवलीतील सर्वपक्षीय नेत्यांची नावे ठेवावी. या मुख्य व प्रातिनिधिक फलकाखेरीज शहराच्या कोणत्याही भागात, रस्ते, चौकात शुभेच्छांची राजकीय फलकबाजी होणार नाही, यासाठी शिंदे व चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा. असे जर खरोखरच झाले तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी ती एक नवी सुरुवात ठरेल.
नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता व महर्षी कर्वे रस्ता
नामफलक पुन्हा एकदा झाकला जाणार
गेल्या दोन/चार दिवसांपासून मोकळा श्वास घेत असलेले नेताजी सुभाषचंद्र बोस व महर्षी कर्वे रस्ता नामफलक गुढीपाडवा शुभेच्छांनी पुन्हा एकदा झाकले जाणार आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता, विष्णुनगर, पंजाब नॅशनल बँक चौक, डोंबिवली पश्चिम येथील हे दोन्ही नामफलक राजकीय फलकबाजीने झाकले जात होते. मात्र समाज माध्यमातून आणि लोकसत्ता ऑनलाईनने यावर लिहिल्यावर ते फलक हटविण्यात आले होते. शुक्रवारी फलकासाठी बांबूची कमान बांधण्यात आली. कमान बांधतांना एक कामगारा तर चक्क या दोन्ही नामफलकाच्या पाटीवर पाय ठेवून काम करतांना दिसून आला.
किती सर्वपक्षीय राजकारणी, नेते, पदाधिकारी अशा कमानी उभारून फलक लावण्यासाठी महापालिकेची परवानगी घेतात? परवानगी न घेता किती राजकीय पक्ष, नेते, पदाधिकारी, संस्था, संघटना अशा अनधिकृत फलकबाजी करतात? आत्तापर्यंत अनधिकृत फलकबाजी करणा-यांच्या विरोधात किती गुन्हे महापालिकेने दाखल केले? किती दंड वसूल केला त्याचीही माहिती महापालिका प्रशासनाने जाहीर करावी.
शेखर जोशी
२२ मार्च २०२५
शुक्रवार, २१ मार्च, २०२५
भाजप महाराष्ट्र आणि देवेंद्र फडणवीस हिंमत दाखवणार का?
मंगळवार, ९ एप्रिल, २०२४
आधी ठरले होतेच आता 'राज'मुद्रा - ही तर सुरुवात, खरे लक्ष्य विधानसभा, महापालिका
आधी ठरले होतेच आता 'राज'मुद्रा -
ही तर सुरुवात, खरे लक्ष्य विधानसभा, महापालिका
शेखर जोशी
राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार की नाही? याविषयी सुरू असलेल्या चर्चा, अंदाज यांना आज पूर्णविराम मिळाला. छत्रपती शिवाजी उद्यान येथे झालेल्या गुढीपाडवा सभेत आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहेत, अशी घोषणा केली. राज ठाकरे यांनी जाहीर घोषणा केल्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत मनसेला किती जागा मिळतात, ते पाहायचे. याचवेळी राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे सांगून तेव्हा आपल्याला नक्कीच काही जागा मिळतील, असेही सुचित केले.
२०१४ ला नरेंद्र मोदी यांना पाठिंबा, कौतुक तर २०१९ मध्ये त्यांच्यावर केलेली टीका याबतही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. नोटाबंदी आणि इतर काही निर्णय पटले नाहीत म्हणून २०१९ मध्ये आपण टीका केली. ३७० कलम रद्द करणे, सीएए या सारखे चांगले निर्णय मोदींनी घेतले. देशाला आज खंबीर नेतृत्वाची गरज आहे. आणि त्यामुळेच मोदींसाठीच आपण भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीत सहभागी होत आहोत. चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणणे हा माझा स्वभाव आहे. त्यामुळे पुढेही काही पटले नाही तर माझे तोंड आहेच, असेही त्यांनी सांगून टाकले. मी मोदींवर वैयक्तिक किंवा उद्धव ठाकरे, संजय राऊत करतात तशी टीका कधीही केली नाही, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.
राज ठाकरे यांच्या मनसेने कमळ किंवा धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवावी, असे त्यांना सांगितले गेले असल्याची चर्चा होती. मात्र आपले इंजिन हे चिन्ह मनसैनिकांची मेहनत आहे. त्यामुळे चिन्हाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आणि सुरू असलेल्या चर्चेवर पडदा टाकला. आपण बिनशर्त पाठिंबा देत आहोत, असे राज ठाकरे यांनी सांगितले असले तरी एक/ दोन जागा मिळाल्याच पाहिजेत, अशी खात्री त्यांनी अमित शहा यांच्याकडून नक्कीच मिळवली असणार. आता थोडे नमते घेऊन विधानसभा तसेच महापालिका निवडणुकीत जेवढ्या जागा मिळवता येतील, असा ते प्रयत्न करणार यात शंका नाही. २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोदी विरोधात प्रचार करण्यासाठी कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांनीही पुरेपूर वापर करून घेतला. त्या बदल्यात आघाडीत स्थान मिळावे, काही जागा मिळाव्यात अशी राज ठाकरे यांची अपेक्षा होती. पण ती पूर्ण झाली नाही. १८ वर्षात कधी यांच्या बरोबर तर कधी त्यांच्याबरोबर जाऊन काहीच फायदा झाला नाही. आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून महायुतीत सहभागी होण्याचे, काही जागाही देण्यात येतील, असे ठोस आश्वासन दिले गेले असेल तर ते फायदेशीरच आहे, असा शहाणपणाचा विचार करून चला आता हे करून पाहू या, असे त्यांनी ठरवले असेल तर ते चुकीचे नाही.
मुसलमान मतपेढीला महत्त्व न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष हिंदू मतपेढी तयार केली आहे. ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय, राममंदिर उभारणी यामुळे मोदींनी हिंदू मतपेढी आपल्या बाजूने वळवून घेतली आहे. दोन्ही काँग्रेस बरोबर गेल्याने उबाठा गट हिंदुत्वापासून दूर गेला आहे ही वस्तुस्थिती आहे आणि उबाठा गटाचे जे कोणी मतदार असतील त्यांना आपल्याकडे वळवून घेण्यासाठी, ती पोकळी भरून काढण्यासाठी उघड हिंदुत्व स्विकारणे फायदेशीरच आहे, हे त्यांनी ओळखले. अर्थात नुसते हिंदुत्व, राममंदिर असे भावनिक मुद्दे घेऊन चालणार नाही, हे ठाम माहिती असल्यानेच त्यांनी आजच्या सभेत बेरोजगारी, नोक-या, अस्वस्थ तरुण यांनाही साद घातली. पंतप्रधान मोदींनी तरुणांकडे लक्ष द्यावे. नोकरी, व्यवसाय उपलब्ध झाले नाहीत तर अराजक माजेल, असेही त्यांनी स्पष्ट करून तरुण, बेरोजगार यांचीही सहानुभूती मिळवली.
राज ठाकरे यांना समाजाची नेमकी नस माहिती आहे. कुठे, कधी, कोणत्या वेळी काय भूमिका घ्यायची, वेळ साधून काय बोलायचे, हे राज ठाकरे चांगले ओळखतात. मराठी पाट्या, मशिदींवरील भोंगे आणि अजान, पथकर, नोकरभरतीत मराठी तरुणांना प्राधान्य हे मुद्दे त्यांनी अचूक उचलले. मराठी अस्मिता जपण्याबरोबरच राष्ट्रवाद, हिंदुत्व याचे महत्त्वही त्यांना कळले. मनसे आता अठरा वर्षांची म्हणजे सज्ञान झाली आहे. त्यामुळे आता यापुढे तरी धरसोड वृत्ती सोडून घेतलेल्या भूमिकेशी तडजोड न करता प्रामाणिक राहावे. हे त्यांनी 'मनसे' केले तर येणारा काळ राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षासाठी नक्कीच आशादायक, सत्तासोपानाकडे घेऊन जाणारा असेल.
जाता जाता - राज ठाकरे यांनी उघडपणे भाजपसमवेत जाण्याची घोषणा केल्यामुळे आता पुरोगामी, डावे, कॉग्रेसी, समाजवादी त्यांना शिव्या घालतील. पण हेच राज ठाकरे २०१९ मध्ये भाजप आणि मोदी यांच्यावर टीका करत होते तेव्हा ते या सर्व मंडळींच्या गळ्यातील ताईत होते, हे विसरून चालणार नाही. म्हणजे मोदींना जाऊन मिळाले तर तो माणूस वाईट आणि सोनिया गांधी, शरद पवार, राहुल गांधी यांच्या बाजूने असला तर तो माणूस चांगला अशी भूमिका घेणे हा दुटप्पीपणा आणि ढोंगीपणा झाला. असो.
- शेखर जोशी
९ एप्रिल २०२४
सोमवार, ३ जुलै, २०२३
या लोकांना सोबत घेणे चुकीचेच
अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप, चौकशी बासनात गुंडाळणार
- या लोकांना सोबत घेणे चुकीचेच, समर्थन होऊच शकत नाही
शेखर जोशी
या सर्व लोकांच्या विरोधात तेव्हाचे मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या इतरही नेत्यांनी जोरदार रान उठविले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या तर या लोकांच्या मागे हात धुवून लागले होते. अनेक कागदपत्रे त्यांनी जमा केली होती. ते सर्व पुरावे संबंधित यंत्रणांना दिले होते. ते सगळे आता चुलीत घालावे लागतील.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसने ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा जाहीर आरोप केला होता. दोन दिवसांत अशी काय जादू झाली की आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली की या लोकांना थेट मंत्रिमंडळात घेतले? हा निर्णय नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी घेतला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गळी उतरवला की देवेंद्र फडणवीस यांनी मोदी, शहांच्या गळी उतरवला?
अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून देण्यात आलेल्या कर्जामध्ये अनियमितता झाल्याचा आरोप आहे. आर्थिक गुन्हे शाखा जनहित याचिकेच्या आधारे चौकशी करत आहे. या प्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हाही दाखल केला आहे. सप्टेंबर २०२० मध्ये, आर्थिक गुन्हे शाखेने विशेष न्यायालयाला सांगितले, अजित पवार यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत आणि या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला. मात्र याला ईडीने विरोध केला, पण न्यायालयाने हा आक्षेप फेटाळून लावला. सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, आर्थिक गुन्हे शाखेने हे प्रकरण बंद केले असेल तर ईडी देखील अधिक तपास करू शकत नाही.
अजित पवार हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये जलसंपदा मंत्री आणि विदर्भ पाटबंधारे महामंडळाचे अध्यक्ष असताना सिंचन प्रकल्पांमध्ये घोटाळ्याचे आरोप झाले होते. जनहित याचिकांच्या आधारे, महाराष्ट्र एसीबीने या प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास सुरू केला. २०१९ मध्ये, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तीन दिवसांचे सरकार स्थापन केल्याच्या एका दिवसानंतर, एसीबीने त्यांना क्लीन चिट देत मुंबई उच्च न्यायालयात अहवाल सादर केला. मात्र न्यायालयाने हा अहवाल अद्याप स्वीकारलेला नाही.
२००६ मध्ये तीन प्रकल्पांसाठी १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कंत्राटांमधील कथित अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छगन भुजबळ यांच्यासह १६ जणांविरुद्ध २०१५ मध्ये गुन्हा दाखल केला. तेव्हा भुजबळ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते.
दिल्लीतील महाराष्ट्र सदन, अंधेरीतील नवीन आरटीओ कार्यालय आणि मलबार हिल येथे गेस्ट हाऊस बांधण्यासाठी चमणकर डेव्हलपर्सला कंत्राटे देण्यात आली होती. ईडीने मनी लाँड्रिंगचा आरोप करत वेगळा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी भुजबळ यांना अटक झाली. दोन वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर २०१७ मध्ये त्यांना जामीन मिळाला. महाविकास आघाडी सत्तेवर असताना सप्टेंबर २०२१ मध्ये विशेष न्यायालयाने भुजबळ आणि इतरांना दोषमुक्त केले. मात्र न्यायालयाच्या या आदेशाविरोधात जानेवारी २०२३ मध्ये एका कार्यकर्त्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल दाखल केली, ती अद्याप प्रलंबित आहे.
प्रफुल पटेल हे ही ईडी चौकशीच्या फेऱ्यात आहेत. पटेल यांनी अंमली पदार्थाचा तस्कर इकबाल मिर्चीकडून जमीन हस्तांतरण आणि आर्थिक व्यवहार केल्या प्रकरणी ईडी चौकशी करत आहे. सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी लिमिटेड आणि त्याच्या कुटुंबाशी संबंधित कंपन्यांच्या कामकाजात कथित अनियमितता प्रकरणी मुंबईत ईडीकडून हसनची चौकशी सुरू आहे. मुंबईतील विशेष न्यायालयात आणि मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या युक्तिवादात मुश्रीफ यांनी आपल्यावरील खटला हा कट असल्याचे म्हटले होते. मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायालयाने एप्रिलमध्ये फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांना अंतरिम दिलासा दिला. गेल्या आठवड्यात ती ११जुलैपर्यंत वाढवण्यात आली. या प्रकरणी त्यांच्या तीन मुलांविरुद्धही ईडी चौकशी करत आहे. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायालयात प्रलंबित आहेत.
बीडमधील १७ एकराचा वादग्रस्त भूखंड अवैधपणे खरेदी केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ईडीनं केस दाखल केली आहे.
संकलन- शेखर जोशी
(राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरील आरोपाचे संकलन माहितीच्या महाजालावरून केले आहे)
शुक्रवार, २३ जून, २०२३
भूमिकांची उलटापालट आणि दुतोंडीपणा उघड
'आदिपुरुष'च्या निमित्ताने...
भूमिकांची उलटापालट आणि दुतोंडीपणा उघड
शेखर जोशी
ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' या वादग्रस्त, बिभत्स चित्रपटाच्या निमित्ताने तथाकथित ढोंगी पुरोगामी आणि प्रतिगामी यांच्या भूमिकांची उलटापालट झाली असल्याचे दिसून येत आहे. आणि या दोन्ही बाजूंचा दुतोंडीपणाही उघड झाला आहे.
सहा महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टिझर/ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्याचवेळी दिग्दर्शक ओम राऊत आणि चित्रपटाच्या सादरीकरणावर प्रचंड टीका झाली. खरे तर त्या टिझरवरूनच चित्रपट टुकार, बीभत्स आणि तमाम भारतीयांच्या मनातील रामायणाचे प्रतिमाभंजन करणारा आहे हे लक्षात आले होते. त्यावेळी भाजपचे आमदार राम कदम यांनी चित्रपटाला विरोध केला तर मनसेचे अमेय खोपकर यांनी राऊत यांना समर्थन दिले. चित्रपट पूर्ण पाहा आणि मग ठरवा, ओम राऊत हे हिंदुत्ववादी आहेत, अशी भलामण त्यांनी केली. चित्रपट प्रदर्शित झाला. आणि आता भाजपचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे सर्व नेते, लोकप्रतिनिधी यांची आणि मनसेची, राज ठाकरे यांचीही अळी मिळी गुप चिळी आहे.
आधुनिक काळातील क्रूरकर्मा मुस्लिम दहशतवादी किंवा इतिहासातील क्रूरकर्मा अफझलखानासारख्या दिसणा-या विध्वंसक मुसलमानाच्या वेषातील रावण, त्याच्याच जवळ जाणारा हनुमान, बीभत्स आणि वटवाघूळ सदृश्य पुष्पक विमान, काळोखी लंका, टॅट्यू काढलेला इंद्रजित, हनुमानाच्या तोंडी दिलेले 'जली' असले टपोरी प्रकारचे संवाद आणि बरेच काही. हे सर्वच न पटणारे आहे. काहीतरी नवीन, वेगळे करण्याच्या नावाखाली, दिग्दर्शकीय स्वातंत्र्याच्या नावाखाली ओम राऊत यांनी ज्या विकृत, बीभत्स पद्धतीने आदिपुरुष सादर केला आहे, ते पाहता कोणाही सुजाण, भारतीय संस्कृती, आपले वेद, पुराणे, पौराणिक देव देवता याविषयी आस्था, प्रेम, आदर असणा-यांना चीडच येईल. झापडे लावून याचे समर्थन करणेच चुकीचे आहे.
हिंदुत्व, भारतीय संस्कृती, परंपरा याचा अभिमान, गर्व असणारी लोकं उजवी म्हणून ओळखली जातात, त्यांना कुचेष्टेने प्रतिगामी म्हटले जाते. तर बहुसंख्यांकांची आस्था, त्यांची दैवते, हिंदुत्व, हिदू संस्कृतीची टिंगल टवाळी करणे, अल्पसंख्याकांचे विशेषतः मुस्लिमांचे लांगुलचालन करणे म्हणजे पुरोगामी असल्याचे समजले जाते. काश्मीर फाईल्स, केरळ स्टोरी या चित्रपटांना याच ढोंगी पुरोगामी मंडळींनी विरोध केला. खरे तर भारतात काश्मीर प्रश्नांबाबत जे काही घडले त्याचे आणि लव्ह जिहादच्या भयाणतेचे वास्तव चित्रण अनुक्रमे या दोन्ही चित्रपटातून सादर करण्यात आले. ते कटू असले तरी सत्य होते. इतर वेळी भावना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणा-या ढोंगी पुरोगामी मंडळींनी दोन्ही चित्रपटाला विरोध केला. यात सर्व कॉंग्रेसी,डावे, समाजवादी, निधर्मवादी, सर्वधर्मसमभाववादी या पुरोगाम्यांचा समावेश होता. दोन्ही चित्रपटांवर बंदी घालण्यात यावी अशी मागणीही यांनी केली होती. तर हिंदुत्ववादी म्हणवून घेणारा भाजप, कट्टर हिंदुत्ववादी संघटना असलेल्या विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि इतर काही हिंदुत्ववादी संघटना, नेते यांनी या चित्रपटांचे समर्थन केले.
आता आदिपुरुष बाबतीत याच भूमिकांची उलटापालट झाली आहे. आदिपुरुष म्हणजे रामायणाचे आणि त्यातील व्यक्तिरेखांचे उघडपणे केलेले प्रतिमाभंजनच आहे हे दिसताय. पण तरीही महाराष्ट्रातील किंवा देशातील एकाही भाजप नेत्यांने, लोकप्रतिनिधीने, पदाधिकाऱ्यांने चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केलेली नाही. सादरीकरणावरून दिग्दर्शक ओम राऊत, संवाद लेखक मनोज मुंतशीर यांचा विरोध/ निषेध केलेला नाही. 'पठाण' चित्रपटात भगवी बिकिनी घातली म्हणून तो चित्रपट बंद पाडण्याची भाषा करणारे हिंदुत्ववादी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदिपुरुषबाबत मूग गिळून गप्प आहेत. आणि याच्या उलट डावे, कॉंग्रेसी, समाजवादी असे तथाकथित पुरोगामी चित्रपटाच्या विरोधात बोलत आहेत. बंदी घालण्याची मागणी करत आहेत. राज ठाकरे, मनसेही गप्प आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही भाजपसोबत आलो असे सांगणा-या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही चित्रपटाचा निषेध किंवा विरोध केलेला नाही. आता शिंदे गटातील खासदार श्रीरंग बारणे यांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
मुळात हा चित्रपट केंद्रीय सेन्सॉर बोर्डाने मंजूर कसा केला हे कोडे आहे. याच केंद्रीय सेन्सॉर बोर्डावर प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे, हिंदुत्ववादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक रमेश पतंगे सदस्य आहेत. चित्रपटासाठी तज्ज्ञ अभ्यासक म्हणून व्याख्याते, प्रवचनकार सच्चिदानंद शेवडे यांनी काम केले आहे. ज्या देवदत्त नागे यांनी 'खंडोबा' ची भूमिका केली ते या चित्रपटात हनुमानाच्या भुमिकेत आहेत. याशिवाय अजय अतुल, प्रसाद सुतार, तेजस्विनी पंडित, सोनाली खरे ही मंडळीही चित्रपटाशी संबंधित आहेत. या सर्वांनी झापडे लावून, डोळ्यांवर पट्टी बांधून काम केले का? चित्रपटाचा टिझर आणि आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, सर्व स्तरातून प्रचंड टीका होत असताना, समाज माध्यमांतूनही अत्यंत प्रक्षुब्ध भावना व्यक्त होत असताना ही सर्व मंडळी गप्प आहेत. ओम राऊत, मनोज मुंतशीर यांच्याकडून किंवा वरील अन्य काही जणांकडून केलेल्या कृतीचे समर्थन करण्यात येत आहे ते अजिबात न पटणारे व चीड आणणारे आहे. तुम्ही चुकलात, माती खाल्ली हे मान्य करायला, कबुली द्यायला हिंमत लागते, ती तुम्ही दाखवावी.
तुमच्याविषयी सर्वसामान्य मराठी माणसांच्या मनात जी प्रतिमा आहे, त्याला तुम्ही स्वतःच तडा देण्याचे कृती केली आहे. 'काम केले/झाले, सर्व काही मिळाले' आता होऊ दे काहीही. समाज माध्यमातून लोक चार दिवस बोलतील आणि विसरून जातील., अशी तुमची भूमिका आहे आणि असणार. म्हणूनच तुम्ही सर्व गप्प आहात. तुमचेही बरोबरच आहे म्हणा. खरेच आहे, लोकं चार, आठ दिवसांत सर्व काही विसरून जातात. अशा लिहिण्याने काही फरक पडणार नाही, हे माहीत असूनही मनातील खदखद व्यक्त केली आहे. मला वाटले ते लिहिले.
शेखर जोशी
२३ जून २०२३
मंगळवार, २० जून, २०२३
राष्ट्रवादीच्या उलट्या बोंबा!
राष्ट्रवादीच्या उलट्या बोंबा!
याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. तुमच्या पिताश्रींनी काही वर्षांपूर्वी आत्ताची उबाठा सेना फोडली होती. छगन भुजबळ यांच्यासह शिवसेनेचे अनेक आमदार (अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या घाऊक प्रमाणात फोडले/ आपल्या बाजूने वळविले त्या तुलनेत तुमचे पिताश्री कमीच पडले) फोडून कॉंग्रेस आय पक्षात आणले होते. तेव्हा तुमचे पिताश्री या पक्षात होते.त्यावेळी कुठे गेला होता तुमचा धर्म...
तेव्हाची शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी भुजबळ यांच्यासह फुटलेले सर्व आमदार गद्दारच होते. पण तेव्हा पवार साहेबांनी शिवसेना फोडली म्हणून ते किती ग्रेट आहेत, कसे चतुर, चाणाक्ष, मुत्सद्दी आहेत म्हणून त्यांची आरती ओवाळली होती. वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून काही आमदार फोडून तुमच्या पिताश्रींनी ते सरकारही पाडले होते. म्हणजे खरे तर या गद्दारीची सुरुवात तुमच्या पिताश्रींनी केली आहे.
उबाठा गटाचे प्रवक्ते, खासदार जे 'उत' आल्यासारखे नेहमीच बोलत असतात त्यांनी तर षटकार ठोकला. संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र लिहून २० जून हा दिवस जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करावा, अशी मागणी केली. उबाठा गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही याची री ओढली. ( हा 'उत' आलेला माणूस वेळोवेळी उबाठा यांना आणि गटालाही अडचणीत आणतोय हे उबाठा यांना कधी कळणार? शिल्लक सेना पूर्णपणे संपेल बहुदा तेव्हा यांचे डोळे उघडतील)
'उत 'आलेले प्रवक्ते, खासदार आणि माननीय उबाठाजी अहो या गद्दारीचे जनक,मूळपुरुष तुमचेच बॉस आहेत याचा सोयिस्कर विसर पडला का?
ज्या शिंदे यांना मिंधे मिंधे म्हणून शिव्या घालता त्या शिंदे यांच्या आधी मिंधेपण तुमच्याच साहेबांनी शरद पवार यांनी केले. एक वेळ मी अंगाला राख फासून हिमालयात जाईन पण पुन्हा कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार नाही, अशी गर्जना करणा-या तुमच्याच साहेबांनी तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. ते मिंधेपण नाही तर काय होते?
सोनिया गांधींच्या विदेशीपणाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करणा-या तुमच्या याच साहेबांनी नंतर सत्तेसाठी सोनिया गांधी आणि काँग्रेस आय पक्षाशी सूत जुळवून केंद्रात मंत्रीपद भुषवले. महाराष्ट्रात सत्ता उपभोगली. ते मिंधेपण नाहीतर काय होते?
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे छगन भुजबळ यांचा उल्लेख कायम 'लखोबा लोखंडे' असाच करत असत. तेव्हाच्या शिवसेनेसाठी छगन भुजबळ हे गद्दारच होते. आणि याच गद्दार छगन भुजबळ यांना (सुप्रियाताई तुमच्या पिताश्रींनी, 'उत' आलेले खासदारजी, महाविकास आघाडीचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमच्या बॉसनी) अर्थात शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष केले, उपमुख्यमंत्री केले. उद्धवराव याच गद्दार छगन भुजबळ यांच्याबरोबर तुम्हाला महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर काम केले. मांडीला मांडी लावून बसावे लागले होते. सुप्रियाताई, 'उत' आलेले खासदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ही तुम्ही विसरलात का?
त्यामुळे तुम्ही सर्वजण आता काहीही बोललात, म्हणालात तरी गद्दारीचे खरे जनक शरद पवार हेच आहेत.
शेखर जोशी
२० जून २०२३
शनिवार, १० जून, २०२३
हे कसले राष्ट्रवादी हे तर राष्ट्रघातकी
गुरुवार, ११ मे, २०२३
राजीनामा देऊन उद्धव ठाकरे तोंडावर आपटले
राजीनामा देऊन उद्धव ठाकरे तोंडावर आपटले
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांची ही चूक त्यांच्यासाठी आणि महाविकास आघाडीसाठीही महागात पडली आहे. उद्धव ठाकरे यांनी तेव्हा राजीनामा दिला नसता तर आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कदाचित वेगळे चित्र पाहायला मिळाले असते.
सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनीही उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर भाष्य केले होते. जर तुम्ही विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेला असता (ज्यात खुल्या पद्धतीने मतदान होते) आणि जर हरला असतात तर त्या आमदारांमुळे नेमका काय परिणाम झाला ते स्पष्ट झाले असते. कारण त्या आमदारांमुळे तुम्ही विश्वासदर्शक ठराव हरला असतात तर ते अपात्र ठरल्यानंतर तुम्ही तो ठराव जिंकला असता, असे सरन्यायाधीश म्हणाले होते.
तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोणत्याही ठोस पुराव्यांशिवायच उद्धव ठाकरे सरकार अल्पमतात आल्याचा आंदाज बांधून त्यांना बहुमत चाचणी घेण्यास सांगितले. कोश्यारी यांचा हा निर्णय अवैध होता, असेही न्यायालायने आज नमूद केले.
उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता, तर आत्ता कदाचित निकाल वेगळा लागला असता, असे आता काही राजकीय विश्लेषक आणि कायद्याचे अभ्यासक म्हणू लागले आहेत. महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा दस्तुरखुद्द शरद पवार यांनीही काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांना विश्वासात न घेता उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता, असे सांगितले होते. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकातही विवेचन केले आहे
उद्धव ठाकरेंनी जर बहुमत चाचणीआधी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता, तर पुन्हा पूर्वस्थिती कायम करता आली असती. पण त्यांनी राजीनामा दिल्यामुळे आता त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसवता येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
२१ जून २०२२ रोजी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बंडखोर गटाने वेगळा मार्ग स्वीकारल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला. शिंदेंसमवेत बंड केलेल्या आमदारांनी भाजपाच्या आमदारांसह राज्यपालांना सरकारच्या भूमिकांशी सहमत नसल्याचे सांगितले आणि उद्धव ठाकरे सरकारकडे बहुमत नसल्याचाही दावा केला.
त्यावर राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणीला सामोरे जाण्याचे आदेश दिले. या आदेशांना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. २९ जूनला दुपारी न्यायालयाचा निकाल आल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयानंतर माझ्यावर माझ्या घराण्याचे संस्कार आणि शिकवण आहे. म्हणूनच मी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला, असे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सत्तेत बसलात तेव्हा ही नैतिकता कुठल्या डब्यात बंद करून ठेवली होती? असा टोला उद्धव ठाकरे यांना हाणला.
उद्धव ठाकरे यांच्या बदसल्लागारांनी त्यांना राजीनामा द्या, असा दिलेला सल्ला किती महागात पडला? याचा पश्चात्ताप उद्धव ठाकरे यांना आता होत असला तरी आता वेळ निघून गेली आहे.
गुरुवार, २३ मार्च, २०२३
ठाकरे, फडणवीस यांची 'दिल दोस्ती' आणि बासनात गुंडाळलेली प्रकरणे
ठाकरे, फडणवीस यांची 'दिल दोस्ती'
आणि बासनात गुंडाळलेली प्रकरणे
'निनावी' पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना थेट वरुन अभय मिळाले? आणि म्हणून त्यांनी आपले कट्टर राजकीय हाडवैरी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी हसतखेळत गप्पा मारल्या?
आधी अडीच वर्षे याच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर किती गरळ ओकली होती?
आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहखाते आहे. सुशांतसिंह, दिशा सालियन संशयास्पद मृत्यू प्रकरण, पालघर साधू हत्याकांड, पत्राचाळ प्रकरण, करमुसे मारहाण, रश्मी उद्धव ठाकरे यांचे कथित बंगले, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि कुटुंबीय यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी, 'मातोश्री'च्या गळ्याशी आलेला 'पाटणकर' काढा ही सगळी प्रकरणे देवेंद्र फडणवीस यांनी बासनात गुंडाळून ठेवली का? की गुंडाळून ठेवा म्हणून वरुन आदेश आले?
सर्वसामान्य नागरिकांच्या मनात या घडलेल्या सर्व घटनांबाबत संशयाचे वातावरण आहे. त्या त्या वेळी भाजपने, भाजपच्या सर्व नेत्यांनी आणि दस्तुरखुद्द फडणवीस यांनीही त्यावेळी अगदी घसा खरवडून आवाज उठवला होता. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सत्ता स्थापन करून झाले की बरेच महिने. फडणवीस यांच्याकडेच गृहखाते आहे. काढा की सगळे पहिल्यापासून खणून. यावर, याची चौकशी केंद्रीय तपास संस्थांकडून सुरू आहे, असे तकलादू कारण पुढे केले जाईल. पण महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून जे तुमच्या हातात आणि अधिकारात आहे, ते तरी करा.
महाराष्ट्रात राजकीय शत्रुत्व नाही, आपली राजकीय संस्कृती, परंपरा वेगळी आहे, ही वाक्ये टाळ्या घेण्यासाठी ठिक आहेत. सत्ताधारी आणि विरोधक मग ते कोणत्याही राजकीय पक्षांचे असोत आतून सर्व एकमेकांशी मिळालेलेच असतात, एका मर्यादेपर्यंत एकमेकांच्या भानगडी, घोटाळे राजकीय सोयीसाठी बाहेर काढले जातात आणि नंतर बासनात गुंडाळूनही ठेवले जातात.
विद्यमान सत्ताधारी विरोधक आणि विद्यमान विरोधक सत्ताधारी झाले की लुटुपुटूची लढाई सुरू होते. कोणी किती ताणायचे हे आधीच ठरलेले असते. त्या त्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, समर्थक मात्र एकमेकांचे गळे धरतात आणि सर्वपक्षीय राजकीय नेते पडद्याआड गळ्यात गळे घालून याची मजा लुटतात, हेच कटू आणि संतापजनक सत्य आहे.
आम्ही योगायोगाने समोरासमोर आलो आणि म्हणून काही वेळ हसत खेळत गप्पा मारल्या, त्यातून कोणताही राजकीय अर्थ काढू नये किंवा भाकित करू नये अशी ठोकळेबाज मखलाशी उद्या ठाकरे आणि फडणवीस करतीलही, पण त्याला काहीही अर्थ नाही. कोणी शेंबडे पोरही त्यावर विश्वास ठेवणार नाही.
शेखर जोशी
२३ मार्च २०२३
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...