बुधवार, १६ एप्रिल, २०२५

शिधापत्रिका तपासणी मोहिम सुरू

शिधापत्रिका तपासणी मोहिम सुरू ठाणे, १६ एप्रिल ठाणे जिल्ह्यातील अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी (केशरी) आणि शुभ्र शिधापत्रिकांची तपासणी करण्यात येत असून ही शोधमोहीम येत्या ३१ मेपर्यंत सुरू राहणार आहे.‌ अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सूचनेनुसार ही मोहिम राबविण्यात येत आहे. शोधमोहिमेत अपात्रठरलेल्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांना शासनाने विहित केलेल्या अर्जाचा नमुना देण्यात येणार आहे. शिधापत्रिकाधारक कुटुंबांनी हा अर्ज परिपूर्ण माहिती आणि आवश्यक त्या कागदपत्रांसह शिधावाटप दुकानात (रास्त भाव दुकान) सादर करावयाचा आहे. अर्ज तहसिलदार कार्यालयाकडे प्राप्त झाल्यानंतर त्याची छाननी करण्यात येणार असून आवश्यक कागदपत्रांची पुर्तता न करणाऱ्या कुटुंबांच्या शिधापत्रिका अपात्र ठरविण्यात येणार आहेत. पडताळणीअंती शासकीय/निमशासकीय कार्यालयातील/खाजगी कंपन्यातील कर्मचारी/कामगार यांचे ज्ञात वार्षिक उत्पन्न एक लाखांहून जास्त असेल अशा कर्मचाऱ्यांकडे पिवळी/केशरी शिधापत्रिका असेल तर ती शिधापत्रिका तात्काळ अपात्र ठरवून रद्द केली जाणार आहे. शोध मोहिमेदरम्यान मयत, स्थलांतरीत, दुबार नोंद झालेल्या लाभार्थ्यांना वगळण्यात येईल, तसेच चुकीची अथवा खोटी माहिती व कागदपत्रे दिल्यास संबंधित शिधापत्रिका धारकांविरुध्द योग्य ती कारवाई केली जाणार आहे. शिधापत्रिकाधारक कुटुंबांनी विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण कागदपत्रांसह रास्त भाव दुकानदाराकडे जमा करावा, असे अवाहन ठाणे जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: