बुधवार, १६ ऑगस्ट, २०२३

महाकवी कालिदास संस्कृत साधना' पुरस्कार ‘संस्कृतदिनी’च द्यावा

 'महाकवी कालिदास संस्कृत साधना'

 पुरस्कार ‘संस्कृतदिनी’च द्यावा

- सुराज्य अभियाना’ची मागणी

महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्कारांचे वितरण संस्कृतदिनी अर्थातच ३० ऑगस्ट या दिवशी करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’ कडून करण्यात आली आहे. या संदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. 

राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या ( २७ जुलै २०१२) शासन निर्णयानुसार ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ संस्कृतदिनाच्या दिवशी देण्यात यावा, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे; मात्र २०१२ पासून आजपर्यंत हा पुरस्कार संस्कृतदिनी देण्यात आलेला नाही. पुरस्कार वर्षअखेरीस डिसेंबर महिन्यात दिले जातात. तसेच दरवर्षी पुरस्कार प्रदान न करता दोन/तीन वर्षांचे पुरस्कार एकत्रितपणे दिले जातात, असे सुराज्य अभियानाचे म्हणणे आहे.

प्राचीन संस्कृत पंडित, वेदमूर्ती, संस्कृत शिक्षक, संस्कृत प्राध्यापक, संस्कृत कार्यकर्ते या पात्रतेतील आठ जणांना हा पुरस्कार दिला जातो. ‘संस्कृतदिन’ आता काही दिवसांवर आला आहे. या दृष्टीने आवश्यक ते नियोजन करण्यास पुरेसा अवधी मिळावा, असे ‘सुराज्य अभियाना’चे समन्वयक अभिषेक मुरुकटे यांनी या निवेदनात म्हटले आहे. 

२०२१ ते २०२३ या वर्षांतील पुरस्कार अद्याप घोषित करण्यात आलेले नाहीत. हा पुरस्कार सुरू केल्यापासून गेल्या दहा वर्षांत पुरस्काराच्या रकमेत एक रुपयाचीही वाढ करण्यात आलेली नाही. ही रक्कम वाढविण्याविषयी मंत्रिमहोदयांची भेट घेतली असता, त्यांनी खात्याचे प्रधान सचिव यांना अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. त्यालाही आता पाच महिने झाले, याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

शनिवार, ५ ऑगस्ट, २०२३

कर्करोगावर मात केलेल्या लढवय्यांचा आनंद मेळावा!

माजी नाट्य व्यवस्थापक आणि ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून साकारलेला एक आगळा कार्यक्रम नुकताच दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात आयोजित करण्यात आला होता. कर्करोगावर मात करुन आनंदाने आयुष्य जगणाऱ्या लढवय्यांच्या आनंद मेळाव्याचे.

कर्करोगावर मात केलेले ४० जण आपल्या कुटुंबियांसह कार्यक्रमाला उपस्थित होते. कर्करोगावर मात करणारे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कर्करोगमुक्त पत्रकार नेहा पुरव यांचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला.

राजश्री बोरकर, तृप्ती तोडणकर आणि पत्रकार नेहा पुरव यांनी यावेळी आजाराशी दोन हात करण्याचे अनुभव सांगितले आणि कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा कानमंत्र दिला. कर्करोगमुक्त प्रदीप पाटोळे यांनी गाणी म्हटली. 

केतकी भावे- जोशी, जयंत पिंगुळकर यांच्या गाण्यांचा कार्यक्रम यावेळी सादर झाला.



विस्मरणातील कल्याणकर- तत्वनिष्ठ सेवाव्रती


विस्मरणातील कल्याणकर या लेखमालिकेतील पुढील लेख
तत्वनिष्ठ सेवाव्रती- श्रीवल्लभ बापट
महाराष्ट्र टाइम्स- ठाणे प्लस/ ५ ऑगस्ट २०२३


शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३

अवयवदान जनजागृती उद्यान



अवयव दान ही काळाची गरज असून याविषयी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण झाली तर अनेक जीव वाचविण्यास मदत होणार आहे. अवयवदानाबाबत जनजागृतीसाठी  राज्यातील पहिले ‘अवयवदान जनजागृती उद्यानʼ ठाण्यात उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच भविष्यात अशा स्वरूपाचे उद्यान राज्यातील इतर शहरात महापालिका आणि नगरपरिषदेतर्फे सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

हे उद्यान कम्युनिटी पार्क, पोखरण रोड नं २, येथील सहा हजार चौरस मीटर जागेवर उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी अवयवदान संदर्भातील माहिती पुस्तिका उपलब्‍ध करून देण्यात येणार असून  प्रस्तावित उद्यानात मूत्रपिंड (किडनी), यकृत ( लिव्हर), हृदय, फुफ्फुस, स्वादुपिंड, छोटे आतडे, डोळे, त्वचा, हाडे, हात या अवयवाच्या आणि पेशींच्या प्रतिकृती उभारण्यात येणार आहेत. तसेच या अवयवांसंदर्भातील माहिती त्याठिकणी मोठ्या फलकावर लावण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. 

अवयवदानासंदर्भातील शास्त्रीय स्वरूपाची माहिती या ठिकाणी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या उद्यानात अवयव दान करण्याचा प्रतिज्ञा अर्ज नागरिकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. ज्या नागरिकांना हा अर्ज भरायचा आहे त्यांच्याकडून तेथेच भरून घेण्यात येऊन तो अर्ज नोंदणीकरिता राज्य अवयव आणि उतीपेशी प्रत्यारोपण संस्थेच्या  कार्यालयात सुपूर्द करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.‌

एक मेंदूमृत व्यक्ती अवयवदान करून ८ व्यक्तींना जीवनदान देऊ शकते. गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच वैद्यकीय विश्वातील प्रगतीमुळे अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे. त्यामुळे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण पुढे येत आहे. मात्र मेंदूमृत व्यक्तीकडून अवयवदान होण्याची संख्या आणि अवयवाची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे. ती दूर करण्यासाठी मेंदूमृत अवयवदान मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. 

सध्या राज्यात अवयव प्रत्यारोपणासाठी मोठ्या प्रमाणावर रुग्ण प्रतिक्षेत आहेत. ही आकडेवारी पुढीलप्रमाणे 

मुत्रपिंड प्रत्यारोपण - ५,८३२,  यकृत प्रत्यारोपण- १,२८४, 

हृदय प्रत्यारोपण– १०८, फुफ्फुस प्रत्यारोपण – ४८,  स्वादुपिंड प्रत्यारोपण – ३५, छोटे आतडे प्रत्यारोपण – ३