सोमवार, १७ जुलै, २०१७

महाराष्ट्राची 'राज'धारा


http://epaper.loksatta.com/c/20620076 महाराष्ट्राची 'राज'धारा लोकसत्ता-मुख्य अंक ३० एप्रिल २०१७

लावणी सम्राज्ञी


पुनर्भेट

सुलोचना चव्हाण

संगीतकार वसंत पवार एक दिवस अचानक त्यांच्या घरी आले आणि चित्रपटासाठीची एक लावणी मला तुमच्याकडूनच गाऊन घ्यायची आहे, असे त्यांनी सांगितले. लावणी आणि तीही आपण गायची या कल्पनेने त्या क्षणभर गांगरल्या. लावणी गाऊ शकणार नाही, असे त्यांनी सांगितले. पण वसंत पवार यांनी आपला हट्ट सोडला नाही. अखेर त्या ती लावणी गायला तयार झाल्या. ती लावणी होती ‘नाव गाव कशाला पुसता मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हनत्यात लवंगी मिरची’. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली ती लावणी ‘रंगल्या रात्री अशा’ चित्रपटातील होती. या लावणीने ज्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले आणि आचार्य अत्रे यांनी ज्यांना ‘लावणीसम्राज्ञी’ हा किताब दिला त्या ज्येष्ठ पाश्र्वगायिका सुलोचना चव्हाण आजच्या ‘पुनर्भेट’च्या मानकरी आहेत. ‘सेलिब्रेटी’पणाचा कोणताही तोरा नसलेल्या सुलोचानाबाई यांना घरात आणि परिचितांमध्ये ‘माई’ या नावाने संबोधले जाते. त्यांच्याकडे पाहिले तर या व्यक्तिमत्त्वाने लावणीचा तो ठसका, खटय़ाळपणा, शृंगार गाण्यातून पुरेपूर पोहोचवला यावर विश्वासच बसत नाही. प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर असतानाही त्या जशा साध्या होत्या तशा त्या आजही आहेत. कपाळावर मोठे कुंकू आणि अंगभर लपेटून घेतलेला पदर हे त्यांचे रूप आजही तसेच आहे.

‘नाव गाव कशाला पुसता..’ या लावणीचा किस्सा अधिक विस्ताराने सांगताना त्या म्हणाल्या, माझे पती शामराव चव्हाण हे मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक-कॅमेरामन म्हणून काम करत होते. त्यांचा आणि वसंत पवार यांचा परिचय होता. मी पाश्र्वगायन करते हे पवार यांना ठाऊक होतेच. पण तेव्हा मी हिंदीत जास्त गात होते. मराठीत नुकतीच सुरुवात केली होती. पवार घरी आले आणि चव्हाणांना (मी आशा भोसले यांच्या सांगण्यावरून शामरावांना ‘अहो’च्या ऐवजी चव्हाण अशी हाक मारू लागले.) म्हणाले, ‘नाव गाव कशाला पुसता’ ही लावणी मला सुलोचनाबाईंकडूनच गाऊन घ्यायची आहे. चव्हाणांना मी खुणेने नाही नाही असे म्हणत होते. चव्हाण यांनी मला थांब अशी खूण केली. पवार यांनी ही लावणी गाऊन घेणार तर तुमच्याकडूनच असा प्रेमळ हट्ट धरला. चव्हाण यांनीही तू लावणी गाऊ शकशील असे प्रोत्साहन दिले.

पवार यांनी खिशातून लावणी लिहिलेला कागद काढला आणि त्यांनी केलेल्या संवादिनीच्या साथीवर लावणी गायले. त्यांना ती आवडली. पुढे लावणीचे ध्वनिमुद्रण झाले आणि त्या एका लावणीने माझे आयुष्य बदलून गेले. पुढे लावणी गायिका म्हणून प्रसिद्ध झाले, त्याचा पाया ‘नाव गाव कशाला’ने घातला होता. आठवणींचा पट उलगडताना त्यांनी सांगितले, मी मूळची गिरगावचीच. माहेरची सुलोचना कदम. गिरगावातील फणसवाडी येथील चाळीतच लहानाची मोठी झाले. माझा मोठा भाऊ दीनानाथ कदम याने मेळा काढला होता. त्या मेळ्यात अभिनेत्री संध्या, त्यांची बहीण वत्सला देशमुख काम करायच्या. माझी मोठी बहीण शकुंतलाही त्यात असायची. घरचाच मेळा असल्याने मीही त्यात लहानसहान कामं करायची. आमच्या घरचे वातावरण बाळबोध. एकदा भावाने वत्सलाबाई कुमठेकर यांनी गायलेल्या ‘सांभाळ गं दौलत लाखाची तुझ्या ज्वानीची..’ ही ध्वनिमुद्रिका घरी आणली. ग्रामोफोनवर ती लावली. मला ते गाणे आवडले. ते मी सतत म्हणू लागले. आमच्या आईला काही ते आवडले नाही. लावणी किंवा असली गाणी घरात आणि तीही मुलीने म्हणायची, असा तो काळ नव्हता. ही अशी गाणी घरात लावतात का, म्हणून ती ओरडायची. प्रसंगी मला तिच्या हातचा मारही खावा लागला. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. कारण पुढे लावणी गायिका म्हणूनच मी प्रसिद्ध झाले.

मेळ्यात काम करत असताना काही भजने व गाणी गायचे. आमच्या मेळ्यातील रंगभूषाकार दांडेकर एके दिवशी मला संगीत दिग्दर्शक श्यामबाबू पाठक यांच्याकडे घेऊन गेले. माझा आवाज त्यांनी ऐकला आणि ‘कृष्ण सुदामा’ या हिंदी चित्रपटातील गाणे गायची संधी मला मिळाली. पाश्र्वगायन केलेले ते माझे पहिले गाणे. गाण्याचे ध्वनिमुद्रण फ्रॉकमध्ये केले होते. तेव्हा मी जेमतेम आठ ते दहा वर्षांची होते. पुढे काही वर्षांनी मा. भगवान यांच्या चित्रपटांसाठी मी पाश्र्वगायन केले. सी. रामचंद्र, मन्ना डे, मोहंमद रफी, मुकेश, जोहराबाई, आमीरबाई, शमशाद बेगम आणि त्या काळातील सर्व मान्यवर गायक-गायिकांबरोबर द्वंद्वगीते, तसेच माझी स्वत:ची वैयक्तिक गाणीही त्या वेळी ध्वनिमुद्रित झाली. ‘चोरी चोरी’, ‘जो बिगड गयी वो किस्मत हू’, ‘नजर से नजर लड गई’, ‘जिगर में छुरी गड गई’ ‘हाए राम’या , ‘आँखो से मिली आँखे’, ‘आरमानोंकी दुनिया मे एक’, ‘रात अंधेरी मत कर देरी तु मेरा मै तेरी’, ‘अब तू ही बता तेरा दिल किसको पुकारे’, ही आणि अशी अनेक हिंदी गाणी मी गायले असून त्यांची संख्या सुमारे अडीचशे इतकी आहे. ही सर्व गाणी त्या काळात खूप लोकप्रिय झाली. मी गायलेली ही हिंदी गाणी माझ्या वाढदिवसाच्या (१३ मार्च) दिवशी ‘रेडिओ सिलोन’वरून दरवर्षी सकाळी दीड ते दोन तास वाजवली जातात. ती ऐकून रसिक श्रोते व चाहत्यांकडून आजही प्रतिसाद मिळतो, आपल्यासाठी ती आनंदाची गोष्ट असल्याचेही सुलोचनाबाई यांनी सांगितले. लावणी गायनाने मला प्रसिद्धी व यश मिळवून दिले. मला मोठे केले. लावणी गायनाला मी प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून दिली. स्वत:चा आब, मर्यादा राखूनच मी लावणी गायनाचे अक्षरश: हजारो कार्यक्रम केले. महाराष्ट्रातील असे कोणतेही छोटे-मोठे शहर, गाव, तालुका किंवा खेडे नसेल की जेथे मी कार्यक्रम केला नाही. आणि खरे सांगू का, कोणत्याही प्रकारचे संगीत असो ते कधीही कमी दर्जाचे नसते. प्रत्येक संगीत प्रकाराची स्वत:ची स्वतंत्र ओळख आणि वैशिष्टय़ आहे, हे विसरता कामा नये. हल्लीचे लावणी सादरीकरण, गायन याविषयी आपले मत स्पष्टपणे मांडताना त्या म्हणाल्या, आज लावणी सादर करण्यापेक्षा त्याचे प्रदर्शन अधिक प्रमाणात केले जाते. श्रोते किंवा प्रेक्षकांपर्यंत लावणी पोहोचवण्यासाठी तोकडे कपडे, अश्लील हावभाव, भडक रंगभूषा, अंगप्रदर्शन याची काहीही गरज नसते. ‘शिवाजी मंदिर नाटय़गृहा’चे उद्घाटन माझ्या लावणी गायन कार्यक्रमाने झाले. तसेच ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनप्रसंगीही माझ्या गाण्याचा कार्यक्रम झाला असल्याची आठवण त्यांनी सांगितली.

गायन क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना विविध सन्मान पुरस्कार मिळाले. राज्य शासनाच्या लता मंगेशकर पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले. पण केंद्र शासनाच्या पद्मश्री, पद्म पुरस्कारासाठी अद्याप त्यांची दखल घेण्यात आलेली नाही. या दिग्गज पाश्र्वगायिकेला स्वत:चे हक्काचे घर नाही. आजही त्या गिरगावात एका चाळीत छोटय़ा घरात भाडय़ाच्या जागेत राहात आहेत. मोठी सून प्रफुल्ल, (मोठा मुलगा जय आता या जगात नाही) व त्यांची मुलगी आरती, धाकटा मुलगा विजय, त्यांची पत्नी कविता आणि त्यांचा मुलगा अजय असा त्यांचा परिवार. विजय हे प्रसिद्ध ढोलकी वादक असून अन्यही लोकतालवाद्ये ते वाजवितात. मराठी, हिंदूीसह काही भारतीय प्रादेशिक भाषांमधील मान्यवर संगीतकारांकडे ते संगीतसाथ करतात. लौकिक अर्थाने केवळ चौथीपर्यंत शिक्षण झालेल्या आणि गाण्यातील कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण न घेतलेल्या सुलोचनाबाई यांनी अथक परिश्रम, सतत शिकण्याची वृत्ती यामुळे गाण्याच्या क्षेत्रात विशेषत: लावणी गायनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे.

आचार्य अत्रे यांच्या ‘हीच माझी लक्ष्मी’ चित्रपटात संगीतकार वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली ‘मुंबईच्या कॉलेजात गेले पती, आले होऊनशान बी.ए. बी.टी.’ ही लावणी त्यांनी गायली. पुढे ‘कलगीतुरा’ चित्रपटासाठी काही लावण्या त्या गायल्या. लावणी गायनाने त्यांना प्रसिद्धी मिळाल्यानंतर पुढे अनेक तमाशाप्रधान चित्रपटांतील लावण्या त्यांनी आपल्या दमदार आणि खडय़ा आवाजाने लोकप्रिय केल्या. लावणी आणि सुलोचना चव्हाण असे एक अतूट नाते तयार झाले. ‘औंदा लगीन करायचं’, ‘कसं काय पाटील बरं हाय का’, ‘कळीदार कपुरी पान’, ‘खेळतांना रंग बाई होळीचा’, ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’, ‘पाडाला पिकलाय आंबा’, ‘फड सांभाळ गं तुऱ्याला आला’, ‘मी बया पडले भिडची, ग बाई भिडची’, ‘सोळावं वरिस धोक्याचं’ या आणि इतरही अनेक लावण्या आजही लोकप्रिय आहेत. त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. विविध पुरस्कार वितरण सोहळ्यांत या लावण्यांवर नृत्य सादरीकरण केले जाते ते मूळ गाणे सुलोचना यांच्याच आवाजातील असते.

शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता-रविवार वृत्तान्त, ३० एप्रिल २०१७

जीएसटी कारणे संभ्रमाचा अंक


जीएसटीकारणे संभ्रमाचा अंक..

शेखर जोशी

जीएसटी’ लागू झाला असल्याने २५० रुपयांवरील तिकीटांसाठी निर्मात्यांना १८ टक्के कर भरावा लागणार आहे. वस्तू-सेवा कराला अर्थात ‘जीएसटी’ला नाटय़वर्तुळातून विरोध झाला. त्यापुढे नाटकांच्या तिकिटांवर २५० रुपयांची असलेली मर्यादा ५०० रुपयांपर्यंत वाढवावी, अशी मागणी नाटय़ निर्मात्यांनी नुकतीच राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली. ही मागणी मान्य होईल तेव्हा होईल, पण तोपर्यंत ‘जीएसटी’ भरावा लागू नये म्हणून नाटय़व्यावसायिकांनी काही नवनव्या शक्कल लढवायला सुरुवात केली आहे. अर्थात, या युक्त्या व्यवहार्य किती हा भाग वेगळा, पण या ‘जीएसटी’ कारभारामुळे नाटय़निर्मात्यांमध्ये आपापसातही सावळ्यागोंधळाचा अंक सुरू झाला आहे.

जीएसटी' कारणे संभ्रमाचा अंक... लोकसत्ता-रविवार वृत्तान्त १६ जुलै २०१७ http://epaper.loksatta.com/c/20591400 पान-१ http://epaper.loksatta.com/c/20591443 पान-६

अगदी आत्ता-आत्तापर्यंत नाटकाचे दर सरसकट ३०० ते ३५० रुपयांपासून सुरू व्हायचे. मात्र, आता ‘जीएसटी’ लागू झाला असल्याने २५० रुपयांवरील तिकीटांसाठी निर्मात्यांना १८ टक्के कर भरावा लागणार आहे. त्यामुळे हा कर भरावा लागू नये यासाठी आता बहुतांश नाटय़निर्मात्यांनी नाटकांच्या तिकिटांचे दर २५० रुपयांपासून सुरू केले आहेत. नाटकांच्या तिकिटांचे दर आम्ही कमी केले आहेत असे ते सांगत असले तरी ‘जीएसटी’तून वाचण्यासाठीच त्यांनी ही पळवाट काढली हे वास्तव आहे. तर काही जण तीनशे ते पाचशे रुपये तिकीट दर लावून नाटकाचे प्रयोग करत आहेत. मात्र ही सगळीच मंडळी ‘जीएसटी’चे सर्व कायदे, नियम पाळत आहेत का?, याबद्दलबही शंका घ्यावी अशी परिस्थिती आहे. पाऊस आणि अन्य कारणांमुळे आधीच नाटय़ व्यवसायाची गाडी खडखड करत चालली आहे. त्यात १८ टक्केजीएसटी लागू झाल्याने नाटय़निर्मात्यांचे कंबरडेच मोडले आहे. त्यामुळे एकीकडे नाईलाज म्हणून अडीचशे रुपये तिकीटविक्री करणारे नाटय़निर्माते तर दुसरीकडे हा व्यवसाय असल्याने त्यातील बदलत जाणारी आर्थिक गणिते सांभाळायलाच लागणार असे म्हणत तीनशे-पाचशे रुपये तिकीट लावणारे नाटय़निर्माते असे दोन गट नाटय़निर्मात्यांमध्ये तयार झाले आहेत.

मुळात काही नाटकांचे अपवाद वगळता मराठी नाटकांचे ‘हाऊसफुल्ल’ बुकिंग होत नाही. नाटकाचे ३०० ते ३५० रुपयांपासून सुरू होणारे तिकीटही सर्वसामान्य मराठी प्रेक्षकांना महाग वाटते. त्यामुळे पाचशे रुपये तिकीट झाले तर जो आहे तो प्रेक्षकवर्ग नाटकांकडे पाठ फिरविण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘जीएसटी’नंतर नाटय़व्यावसायिक आणि निर्मात्यांमध्ये एकूण संभ्रमाचे व गोंधळाचे वातावरण आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने काही ना काही शक्कल लढवीत आहेत.

वस्तू आणि सेवा कर ‘मनोरंजन’ क्षेत्राला लागू होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर या क्षेत्रातही खळबळ उडाली. मराठी नाटय़ निर्मात्यांनी या कराला विरोध केला. २५० रुपयांपर्यंतच्या तिकिटांना ‘जीएसटी’ लागू नाही. मात्र २५० रुपयांमध्ये नाटक चालविणे शक्य नाही, अशी भूमिका घेत नाटय़निर्माते-व्यावसायिकांनी ही मर्यादा ५०० रुपयांपर्यंत वाढविण्याची मागणी केली आहे. अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी ही मागणी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यापर्यंत पोहोचवू असे आश्वासन मराठी नाटय़निर्मात्यांना दिले आहे. ती मागणी पूर्ण होईल की नाही ते आत्ताच सांगता येणार नाही. पण समजा नाटय़निर्मात्यांची ही मागणी मान्य झाली तर ५०० रुपयांचे तिकीट काढून प्रेक्षक नाटकाकडे येईल का? की आहे त्या प्रेक्षकांमध्येही घट होईल?, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

नाटय़निर्माते शेखर ताम्हाणे म्हणाले, हल्ली बहुतांश नाटके दोन अंकी असतात. पहिल्या आणि दुसऱ्या अंकाला प्रत्येकी २५० रुपये असा दर लावून तिकिटांची विक्री करायची. आमचे नवे नाटक लवकरच रंगभूमीवर येणार असून त्या नाटकासाठी हा प्रयोग करण्याचा विचार आहे. ज्या प्रेक्षकांना संपूर्ण नाटक पाहायचे आहे ते प्रेक्षक दोन्ही अंकांची तिकिटे किंवा ज्यांना फक्त एकच अंक पाहायचा आहे ते प्रेक्षक त्यांना जो अंक पाहायचा आहे, त्या अंकाची तिकिटे घेतील. यासाठी नाटकाच्या तिकिटावर भाग १ व भाग २ असे लिहून तिकिटांची विक्री करण्याचा विचार असून या विषयातील तज्ज्ञ आणि कायदेशीर सल्ला घेऊनच हा नवा प्रयोग करणार आहोत. हिंदी किंवा गुजराथी नाटकांपेक्षा आपल्या मराठी नाटकांचे तिकिट दर कमीच आहेत. दोन अंकांना अशी वेगवेगळी तिकिटे करण्याच्या प्रयोगाला प्रेक्षकांकडून कसा आणि किती प्रतिसाद मिळेल, हा प्रयोग यशस्वी होईल की नाही, त्याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही. कारण शेवटी तो ‘प्रयोग’ आहे.

व्यावसायिक नाटय़ निर्माता संघाचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांना याविषयी विचारले असता त्यांनी दोन अंकांसाठी स्वतंत्र तिकिटे विकण्याचा प्रकारच मुळात अव्यहार्य असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘जीएसटी’ लागू झाल्यानंतर मुळातच बहुतांश नाटय़ निर्मात्यांनी नाटकाचा तिकीट दर २५० रुपये व त्याखाली असा केला आहे. त्यामुळे सध्या जो काही तोटा होत आहे तो निर्माते सहन करत आहेत. २५० रुपये असलेली मर्यादा ५०० रुपयांपर्यंत करावी ही आमची मागणी मान्य झाली तर त्यात सर्वाचेच हित आहे. त्याचा निर्णय येत्या २ ते ३ महिन्यांत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडी वाट पाहावी. ज्या कोणाला २५० रुपयांच्या वरती तिकीट दर ठेवायचे असतील त्यांनी ते खुशाल ठेवावेत. मात्र त्यासाठी ‘जीएसटी’चे जे काही नियम आणि कायदे आहेत त्याचे त्यांनी पालन करावे. नाटय़गृहातही पहिला आणि दुसरा अंक असे सत्र नसते. असे दोन-दोन तासांचे सत्र कोणतेही नाटय़गृह देत नाही ते सलग चार तासांचे दिले जाते. त्यामुळे मला तरी ते व्यवहार्य वाटत नाही, असे त्यांनी सांगितले.

‘३०० रुपयांपर्यंतच्या तिकिटावर ‘जीएसटी’ लावू नये. त्याच्यावर जो कोणी तिकीट दर लावेल त्यावर ‘जीएसटी’ लावायचा की नाही त्यावर सरकारने विचार करावा. ३०० रुपयांपर्यंत ‘जीएसटी’ लावला नाही तर सध्या जो काही बरा-वाईट नाटय़ व्यवसाय सुरू आहे तो किमान स्थिर राहील’, असे मत माजी ज्येष्ठ नाटय़ व्यवस्थापक आणि नाटय़कर्मी अशोक मुळ्ये यांनी व्यक्त केले. दोन अंकांसाठी स्वतंत्र तिकिटांची विक्री करण्याला काहीही अर्थ नाही. नाटकाला येणारे प्रेक्षकही त्याला तयार होतील का? हा प्रश्न आहे. त्यामुळे असे करणे म्हटले तर मोठ्ठा विनोद आणि म्हटले तर स्तुत्य, असे सांगत ३०० रुपयांपर्यंतच्या तिकिटावर जीएसटी नको यावर त्यांनी जोर दिला. एकंदरीत ‘जीएसटी’वरून हा गोंधळ आणि संभ्रम आणखीही काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. सध्या मराठी रंगभूमीवर काही नाटकांचा अपवाद वगळता अन्य नाटकांना ‘बुकिंग’ मिळत नाही. आणि जे चांगले नाटक आहे ते चालते असे चित्र आहे. त्यामुळे हा गोंधळ निस्तरेपर्यंत एकतर आहे त्या तिकीटदरांमध्ये नाटक चालवावी लागतील किंवा वाढीव दरांमध्ये तिकीट विकत घेऊन नाटक पाहणे प्रेक्षक आणि निर्माते दोघांच्याही अंगवळणी पडेल.

एक अंकाचे तिकीट..

‘जीएसटी’च्या जाचातून सुटका करून घेण्यासाठी काही तिसरा मार्ग निघतोय का याचाही आपापल्या परीने शोध घेणारे निर्माते आहेत. ज्यांच्यात नाटय़निर्माते शेखर ताम्हाणे यांचे नाव घ्यावे लागेल. शेखर ताम्हाणे यांनी नुकतीच ‘सामाजिक माध्यमा’वर एक पोस्ट टाकली. नाटकाला २५० रुपयांपर्यंतच्या तिकिटाला ‘जीएसटी’ लागणार नाही. त्यातून मी मार्ग काढला आहे. पहिल्या अंकाला २५० रुपये आणि दुसऱ्या अंकाला २५० रुपये अशी दोन वेगवेगळी तिकिटे विकायची. दुसऱ्या अंकाचे तिकीट पहिल्या अंकाच्या सुरुवातीला आगाऊ देण्यात येईल’, असे ताम्हाणे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. म्हणजे ज्यांना फक्त एकच अंक पहायचा आहे किंवा २५० रुपयांपर्यंतचेच तिकीट घ्यायचे आहे त्यांना पहिला किंवा दुसरा अंक पाहता येईल, अशी सोय उपलब्ध करण्याचा त्यांचा विचार आहे. प्रत्यक्षात हे व्यवहार्य आहे का हा प्रश्न आहे? २५० रुपये मोजून फक्त एक अंक बघण्यासाठी प्रेक्षक का तयार होईल?, असे प्रश्न या पर्यायासमोर उभे असल्याने त्यात तथ्य नाही हाच निष्कर्ष काढला जातो आहे.

शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता-रविवार वृत्तान्त/१६ जुलै २०१७)

शनिवार, २४ जून, २०१७

'वार'करी पवार


'वार'करी पवार

(शेखर जोशी)

राज्यात आणि केंद्रात नसलेली सत्ता, 'मराठा कार्ड'चे कमी झालेले महत्व, आधी पंतप्रधान व आता राष्ट्रपतीपद मिळवायची हुकलेली संधी, स्वतच्या राष्ट्रवादी पक्षाची (जी काही शिल्लक होती ती) घसरत आणि संपत चाललेली विश्वासार्हता, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत कमी संख्येत निवडून आलेले पक्षाचे उमेदवार, मराठा मोर्चा, शेतकरी संपातील संपलेली हवा, त्याचा पक्षाला न झालेला फायदा, आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पक्ष अस्तित्वात तरी राहील की नाही याची भेडसाविणारी चिंता या सगळ्यामुळे शरद पवार अस्वस्थ झाले आहेत. त्यातून शरद पवार असे 'वार' अधूनमधून करत असतात. अफजल खान, गो ब्राह्मण प्रतिपालक या विषयांवर त्यांनी नुकतेच केलेले विधान त्याचेच द्योतक आहे.

शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या नावाचा जप ते सतत करत असतात. सामाजिक समता व बंधुभावाचा आव आणून बहुजन व दलित समाजासाठी आपण काहीतरी करतोय असे ढोलही पवार आणि त्यांचे समर्थक नेहमी बडवतात. पण तो केवळ मुखवटा आहे. कारण पवार यांनी आजपर्यंत केवळ मराठा राजकारण व सत्ताकारणच केले आहे. राज्यात मुख्यमंत्रीपद, केंद्रात कृषीमंत्रीपद आणि केंद्रात व राज्यात सत्तेवर असताना यांना ना शेतकऱयांचे प्रश्न सोडविता आले ना त्यांच्या आत्महत्या थांबविता आल्या. आणि तरी हे म्हणे शेतकऱयांचे कैवारी.

इशरत जहाँ सारखी निष्पाप बिचारी मुलगी अतिरेकी झाली, मालेगाव स्फोटाप्रकरणी तीन वर्ष तुरूंगात खितपत पडणाऱ्यांना मुलांना हा देश आपला का वाटावा?,'या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी कोणी इतर कृत्य केलं तर त्याला दोषी का ठरवावं?, अल्पसंख्याक समाजाचा व्यक्ती ‘जुम्मा’च्या दिवशी मशिदीत कधी हल्ला करेल, हे शक्य नाही. मी अजूनपर्यंत हे पाहिले नाही, अशी वादग्रस्ते विधानेही पवार यांचीच.

निवडणुकीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशाचा उल्लेख करत भटा-ब्राह्मणांच्या हाती सत्ता देणार का, अशी विचारणा शरद पवार यांनी केली होती, संभाजीराजे छत्रपती यांची राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभेवर निवड करण्यात आल्यानंतर पवार यांनी, छत्रपतींनी पेशव्यांची नियुक्‍ती केली हा इतिहास सर्वज्ञात आहे. पेशवाईत फडणवीसांनी छत्रपतींची नियुक्‍ती कधीच केली नव्हती; मात्र संभाजीराजे छत्रपती यांच्या रुपाने प्रथमच पेशव्यांनी छत्रपतींची नियुक्‍ती केल्याची घटना घडली आहे, अशा शब्दांत टीका केली होती. ब्राह्मण द्वेष करत असताना शिवाजी महाराज यांना फितुर असलेल्या, स्वराज्याशी बेईमानी करणारया मराठा सरदारांबद्दल ते एक अवाक्षर काढत नाहीत. त्याबाबत मात्र अळी मिळी गुप चिळी!

समाजात जाणीवपूर्वक कलागती लावण्याच्या उद्देशातून ते नेहमीच वादग्रस्त विधाने आणि असे 'वार' करत असतात.

हे 'वार'करी

कसले राष्ट्रवादी

हे तर राष्ट्रघातकी!

-शेखर जोशी

रविवार, २ एप्रिल, २०१७

मत्स्यगंधा


मत्स्यगंधा

मुंबई मराठी साहित्य संघाच्या ‘भाऊबंदकी’ या नाटकात त्यांना ‘आनंदीबाई’ साकारायची संधी मिळाली. हे नाटक नव्याने पुन्हा एकदा रंगभूमीवर सादर होणार होते. अभिनेत्री दुर्गाबाई खोटे यांनी साकारलेली ‘आनंदीबाई’ करायची संधी त्यांना मिळाली. मा. दत्ताराम, मामा पेंडसे, दाजी भाटवडेकर अशी दिग्गज मंडळी नाटकात होती. साहित्य संघातील तो प्रयोग पार पडला. नटश्रेष्ठ नानासाहेब फाटक त्या प्रयोगाला आले होते. प्रयोगानंतर ते आत कलाकारांना भेटायला आले. ‘आनंदीबाई’चे काम करणाऱ्या त्या अभिनेत्रीच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देताना ते म्हणाले, ‘‘आजच्या प्रयोगात मी ‘राघोबादादा’ नाही याचे मला वाईट वाटते..’’

नानासाहेब फाटक यांच्याकडून कौतुकाची व शाबासकीची थाप मिळविणाऱ्या त्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर आजच्या ‘पुनर्भेट’च्या मानकरी आहेत. ‘पुनर्भेट’ सदर सुरू झाले तेव्हापासून आजवर पडद्याआड असलेल्या २४ दिग्गजांना ‘रविवार वृत्तांत’ने बोलतं केलं. आजचा सदराचा पंचविसावा खास भाग हा आशालता यांच्याशी मारलेल्या गप्पांनी रंगला आहे.

खरे तर ही भूमिका याआधी दुर्गाबाई खोटे यांनी साकारली होती. पण त्यांच्या भूमिकेची कोणतीही छाप न ठेवता किंवा अनुकरण न करता आशालता यांनी आपल्या खास शैलीत ही ‘आनंदीबाई’ साकारली. आशालता यांच्या बाबतीत असा योग (म्हणजे अगोदर अन्य अभिनेत्रींनी केलेली भूमिका काही प्रयोगांनंतर त्यांच्या वाटय़ाला आल्याची उदाहरणे) बरेचदा आला. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकात सुधा करमरकर यांनी साकारलेली ‘येसुबाई’, ‘गारंबीचा बापू’मधील उषा किरण यांनी साकारलेली ‘राधा’, ‘गुंतता हृदय हे’मधील पद्मा चव्हाण यांनी साकारलेली ‘कल्याणी’ अशा भूमिका आशालता यांनी साकारल्या. त्याबाबत आशालता म्हणाल्या, ‘‘एखाद्या अभिनेत्रीने साकारलेली भूमिका नंतर पुन्हा त्याच नाटकात साकारणे हे एक आव्हान असते. कारण प्रेक्षकांच्या मनात त्या कलाकाराने केलेली भूमिका ठसलेली असते. तो प्रभाव पुसून टाकून आपली स्वतंत्र प्रतिमा नव्याने भूमिका करणाऱ्या कलाकाराला निर्माण करावी लागते. मी त्याबाबतीत नक्कीच सुदैवी आहे. कारण माझी तुलना कोणाबरोबरही झाली नाही आणि मी केलेल्या भूमिकांचे कौतुकच झाले. अर्थात याचे श्रेय त्या त्या नाटकाच्या दिग्दर्शकांनाही आहेच. त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून केलेली माझी निवड व त्यांचे मार्गदर्शन यामुळे ते आव्हान मला पार पाडता आले.’’

आशालता यांचा जन्म मुंबईचाच. मुंबईतच त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले. गिरगावातील ‘सेंट कोलंबो हायस्कूल’ ही त्यांची शाळा. तेव्हाच्या अकरावी मॅट्रिकनंतर त्यांनी काही काळ मंत्रालयात नोकरीही केली. त्याच वेळी नोकरी सांभाळून कला शाखेतून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. ‘नाथीबाई दामोदर ठाकरसी’ महिला विद्यापीठातून त्यांनी ‘मानसशास्त्र’ विषयात ‘एमए’ केले आहे. पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे गाण्याचे प्राथमिक शिक्षण घेत असताना आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर त्यांनी काही कोंकणी गाणीही गायली. त्या आठवणींच्या स्मरणरंजनाचा गोफ उलगडताना त्यांनी सांगितले, आमच्या घरी नाटय़, संगीत कला असे कोणतेही वातावरण नव्हते. शिक्षण महत्त्वाचे, ते आधी पूर्ण कर आणि मग तुला नाटक-गाणे वगैरे काय करायचे ते कर अशी आई-वडिलांची भूमिका होती. त्यामुळे सुरुवातीला नाटकातून काम वगैरे काहीही केलेले नव्हते. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी करत असतानाच ती संधी मिळाली. ‘धी गोवा हिंदू असोसिएशन’ने राज्य नाटय़ स्पर्धेसाठी ‘संगीत संशयकल्लोळ’ हे नाटक बसवले होते. पं. अभिषेकी यांनी माझे नाव सुचवले. गोपीनाथ सावकार यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. त्या नाटकातील ‘रेवती’च्या भूमिकेसाठी माझी निवड झाली. स्पर्धेत नाटकाला सवरेत्कृष्ट नाटक आणि मला उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. पुढे ‘धी गोवा’चीच ‘संगीत शारदा’ आणि ‘संगीत मृच्छकटीक’ ही दोन नाटके राज्य नाटय़ स्पर्धेसाठी केली. याही दोन्ही नाटकांत मला अभिनयासाठीचे पारितोषिक मिळाले. हे सगळे करत असतानाही पूर्णवेळ नाटक, अभिनय करायचे असे काहीही ठरविलेले नव्हते. पण नाटकाचे वाचन, त्यातील बारकावे, आपल्यासह अन्य कलाकारांच्या भूमिका किंवा ती पात्रे जिवंत होताना पाहणे यात काहीतरी वेगळेपण आहे, असे मला जाणवत गेले. ती प्रक्रिया मला आवडली आणि मी नाटकाकडे ओढले गेले.

आशालता वाबगावकर यांच्या आजवरच्या अभिनय कारकीर्दीतील त्यांचे ‘मत्स्यगंधा’ हे नाटक मैलाचा दगड ठरले. इतक्या वर्षांनंतरही त्यांनी साकारलेली ‘मत्स्यगंधा’ आजही रसिकांच्या स्मरणात आहे. नाटकातील त्यांनी गायलेली ‘गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी’, ‘अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा’ ही नाटय़पदे गाजली. ही नाटय़पदे आजही लोकप्रिय व रसिकांच्या ओठावर आहेत. ‘मत्स्यगंधा’चा आठवणींना उजाळा देताना त्या म्हणाल्या, वसंत कानेटकर लिखित आणि मा. दत्ताराम दिग्दर्शित या नाटकाचे संगीत पं. जितेंद्र अभिषेकी यांचे होते. नाटकातील संगीताने पं. अभिषेकी यांनी नाटय़संगीताचा बाज बदलला, त्याला नवे रूप दिले. नाटकातील ‘सत्यवती’ (मत्स्यगंधा)च्या भूमिकेसाठी माझी निवड झाली. अठरा वर्षांची अल्लड तरुणी, पराशराकडून फसविली गेलेली आणि सूड घेण्याची प्रतिज्ञा करणारी राजकन्या आणि आयुष्यात पूर्णपणे हरलेली राजमाता अशा १८ ते ७० वर्षे वयोगटातील विविध भावना/ छटा मला यातून सादर करायच्या होत्या. माझ्यासाठी ते एक आव्हान होते. दिग्दर्शक मा. दत्ताराम आणि नाटकातील अन्य सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने मी ते पेलले आणि ही भूमिका साकारली. १ मे १९६४ रोजी बिर्ला मातोश्री सभागृहात नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला. सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालेले नाटक दुपारी अडीचच्या सुमारास संपले. संगीत आणि नाटय़पदे हा या नाटकाचा मूळ आत्मा. पुढे काही प्रयोगांनंतर ते नाटक अधिक आटोपशीर व कमी करण्यात आले. या नाटकाने मला खूप नावलौकिक आणि प्रसिद्धी मिळवून दिली. माझी स्वतंत्र ओळख निर्माण झाली. माझ्या आजवरच्या अभिनय प्रवासात हे नाटक महत्त्वाचे आहे.

‘मत्स्यगंधा’नंतर आशालता यांनी मागे वळून पाहिलेच नाही. नाटक पूर्णवेळ करायचे असे ठरवून त्यांनी नोकरी सोडली. ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’, ‘चंद्रलेखा’, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’, ‘माऊली प्रॉडक्शन’, ‘कलामंदिर’, ‘आयएनटी’ आदी नाटय़संस्थांमधून त्यांनी आजवर पन्नासहून अधिक नाटके केली आहेत. या सर्व नाटकांचे मिळून पाच हजारांहून अधिक प्रयोग त्यांनी केले आहेत. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘मदनाची मंजिरी’, ‘गारंबीचा बापू’, ‘गुडबाय डॉक्टर’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘स्वामी’, ‘गरुडझेप’, ‘तुज आहे तुजपाशी’, ‘हे बंध रेशमाचे’, ‘विदूषक’, ‘ही गोष्ट जन्मांतरीची’, ‘भावबंधन’, ‘गुंतता हृदय हे’, ‘छिन्न’, ‘देखणी बायको दुसऱ्याची’ ही त्यांची काही गाजलेली नाटके. पु. ल. देशपांडे यांनी दूरदर्शनसाठी केलेल्या ‘वाऱ्यावरची वरात’मध्येही त्या होत्या. ‘सावित्री’, ‘उंबरठा’, ‘पुढचं पाऊल’, ‘माहेरची साडी’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘एकापेक्षा एक’, ‘आत्मविश्वास’ आणि अन्य शंभर मराठी चित्रपटही त्यांच्या नावावर आहेत.

मराठी नाटक आणि चित्रपटांबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटाचा पडदाही गाजविला. दोनशेहून अधिक हिंदी चित्रपटांत त्यांनी ‘चरित्र अभिनेत्री’ म्हणून काम केले आहे. बासू चॅटर्जी यांचा ‘अपने पराये’ हा त्यांचा पहिला चित्रपट. तो कसा मिळाला, याविषयी त्यांनी सांगितले, मुंबई दूरदर्शनवरील एका कोंकणी नाटकात मी काम केले होते. ते नाटक बासुदांच्या पाहण्यात आले. त्यानंतर त्यांनी माझे ‘गुंतता हृदय हे’ नाटकही पाहिले. आणि माझी ‘अपने पराये’साठी निवड केली. रंगभूमीवर काम केलेले असले तरी चित्रपटाची भाषा आणि तंत्र माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी होते. शबाना आझमी यांच्याबरोबर माझे पहिले दृश्य होते. या चित्रपटाच्या निमित्ताने बासुदांच्या मार्गदर्शनाखाली खूप काही शिकायला मिळाले. ‘नमक हलाल’ चित्रपटाच्या चित्रीकरण प्रसंगाची एक आठवण सांगताना त्या म्हणाल्या, यात मी आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी व्यक्तिरेखा रंगविली होती. परवीन बाबीच्या आईची भूमिका मी करत होते. आधुनिक (ज्याला मॉडर्न म्हणता येईल अशी माझी भूमिका होती) चित्रीकरणाच्या वेळी समोरून अमिताभ बच्चन आले, नमस्कार करून म्हणाले मी अमिताभ बच्चन. पाठोपाठ शशी कपूर यांनी ओळख करून दिली. अमिताभ म्हणाले, मराठी थिएटर मे आप तो ‘दादा’ है, आपकी बहोत तारीफ सुनी है’..

‘अपने पराये’नंतर आशालता यांचा हिंदीतील प्रवास सुरू झाला. ‘अंकुश’, अग्निसाक्षी’, ‘नमकहलाल’, ‘शराबी’, ‘कुली’, ‘निकाह’, ‘सद्मा’, ‘चलते चलते’, ‘जंजीर’, ‘आज की आवाज’, ‘वो सात दिन’, ‘पसंद अपनी अपनी’, ‘मंगल पांडे’, ‘ये तो कमाल हो गया’, ‘तेरी मॉंग सितारोंसे भर दू’, ‘मरते दम तक’, ‘घायल’ ‘शौकिन’ आदी सुमारे २०० हून अधिक हिंदी चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. तीन कोंकणी आणि एका इंग्रजी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. मुंबई दूरदर्शनवरील ‘महाश्वेता’, ‘पाषाणपती’ तसेच ‘जावई विकत घेणे’, ‘कुलवधु’ या त्यांच्या काही गाजलेल्या मालिका. आशालता यांच्या बाबतीत आणखी एक माहिती नसलेली गोष्ट म्हणजे कल्याणजी-आनंदजी यांच्या वाद्यवृंदातून त्यांनी काही काळ गाणी गायली आहेत. वाद्यवृंदातील त्या मुख्य गायिका होत्या. मुकेश, हेमंतकुमार आदींबरोबर त्यांनी गाणी गायली. अभिनेत्री सुधा करमकर यांच्या ‘लिटिल थिएटर’च्या ‘गणपती बाप्पा मोरया’ या बाल नाटय़ातील त्यांनी गायलेली ‘तू सुखकर्ता तू दु:खहर्ता विघ्नविनाशक मोरया संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया’ ही आरती आजही लोकप्रिय आहे. गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात दरवर्षी ही आरती वाजविली जाते. ‘एचएमव्ही’ कंपनीने त्याची ध्वनिमुद्रिकाही काढली. सुधा करमरकर यांच्यामुळे ती आरती गायची संधी त्यांना मिळाली. ‘चांद भरली रात आहे’, ‘चांदण्यांची रोषणाई मी कधी ना पाहते’, ‘राजस राजकुमारा’(नाटक-विदूषक, तीनही गाण्यांचे संगीतकार श्रीनिवास खळे), ‘जन्म दिला मज त्यांनी’, ‘तव भास अंतरा झाला मन रमता मोहना’ (मत्स्यगंधा), ‘रवी किरणांची झारी घेऊनी’ (भावगीत) ही त्यांनी गायलेली अन्य काही गाणी.

‘अंकुश’ चित्रपटात त्यांच्यावर चित्रित झालेले आणि पाश्र्वगायिका पुष्पा पागधरे यांनी गायलेले ‘इतनी शक्ती हमे दे न दाता’ हे गाणेही लोकप्रिय आहे. त्याची आठवण सांगताना त्या म्हणाल्या, मी जम्मू-काश्मीरला फिरायला गेले होते. बाजारात फिरताना एका दुकानात खरेदी करताना त्या दुकानदाराने मला ओळखले. तुम्ही उद्या अर्धा तास देऊ शकाल का?, म्हणून विचारणा केली. दुसऱ्या दिवशी तो मला एका शाळेत घेऊन गेला. मी शाळेत पाऊल टाकत नाही तोच ‘इतनी शक्ती हमे दे न दाता’ हे गाणे तिथे सुरू झाले. त्या शाळेत ते गाणे दररोज प्रार्थना म्हणून वाजविले जात होते. शाळेत सगळ्या मुलांसमोर हे गाणे ज्यांच्यावर चित्रित झाले त्या या आहेत, अशी माझी ओळख करून दिली आणि त्या गाण्याच्या काही ओळी मी तिथल्या मुलांसमोर सादर केल्या. हा अनुभव अविस्मरणीय होता.

वयाच्या ७७ व्या वर्षांत असलेल्या आशालता यांना आजही मालिका किंवा चित्रपटात आव्हानात्मक भूमिका मिळाली तरच करायची इच्छा आहे. सध्याची चांगली मराठी नाटके, चित्रपट त्या आवर्जून पाहतात. वाचन हा त्यांचा छंद आहे. या वयातही त्या संगणक शिकल्या असून संगणकाचा तसेच ‘फेसबुक’, ‘व्हॉट्स अ‍ॅप’ या सध्याच्या सामाजिक माध्यमांचाही त्या वापर करतात. सतत नवीन

काहीतरी शिकण्याची त्यांची वृत्ती आहे. त्यामुळे आजच्या पिढीबरोबरही त्या सहज जुळवून घेतात.पुढे काय होणार याचा विचार मी कधीही केला नाही आणि करतही नाही. जे व्हायचे असेल ते त्याच वेळेत होते आणि होणार नसेल तर कितीही व काहीही केले तरी होत नाही. त्यामुळे आलेला प्रत्येक क्षण आनंदाने जगायचा. आपण स्वत: आनंद घ्यायचा आणि इतरांनाही तो वाटायचा. जे समोर येते, मिळते ते स्वीकारायचे आणि पुढे जायचे हे माझ्या जीवनाचे सूत्र असल्याचे सांगत त्यांनी गप्पांचा समारोप केला..

(हा मजकूर २ एप्रिल २०१७ च्या लोकसत्ता-रविवार वृत्तान्तमध्ये प्रसिद्ध झाला आहे)

शनिवार, १ एप्रिल, २०१७

जागर मराठीचा- रविवार, २ एप्रिल रोजी डोंबिवलीत बैठक


जागर मराठीचा! रविवार, २ एप्रिल रोजी डोंबिवलीत बैठक

मराठी भाषा संरक्षण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. शांताराम दातार व व्हाॅट्स अॅपवरील 'मराठीचे मार्गदर्शक' हा समूह यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २ एप्रिल रोजी डोंबिवलीत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

भाषावार प्रांतरचनेच्या सूत्रानुसार १ मे १९६० ला अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीस या वर्षी ५७ वर्ष पूर्ण होतील. भाषावार प्रांतरचनेचा उद्देश शासनाचे, विधिमंडळाचे कामकाज व न्यायदान राजभाषेतून व्हावे; शिक्षणाचे माध्यम केवळ इंग्रजी न ठेवता राज्यभाषेतून सुद्धा महाविद्यालयीन व उच्च शिक्षण मिळवण्याची सोय आणि भाषेचा समग्र विकास असा आहे.

आज १० कोटी पेक्षा जास्त जनतेची मातृभाषा असलेल्या मराठी भाषेची स्थिती गंभीर आजाराने ग्रस्थ असलेल्या व्यक्तिसारखी आहे. भाषा व संस्कृतीचा अन्योन्य संबंध लक्षात घेता हे चित्र बदलले पाहिजे.यावर विचार करण्यासाठी आणि मराठी भाषेच्या जागरण-जागृतीसाठी १ मे २०१७ ला काय कार्यक्रम करता येईल याचा विचार व चर्चा या बैठकीत करण्यात येणार आहे.

कधी- रविवार, २ एप्रिल २०१७

कुठे--उन्मेष इनामदार कला अकादमी,पांडुरंगवाडी, श्रीराम वसंत इमारत,पांडुरंग वाडी,मानपाडा रोड,गांवदेवी मंदिरासमोर डोंबिवली-पूर्व.

केव्हा- संध्याकाळी ५ वाजता

अधिक माहितीसाठी संपर्क मृणाल पाटोळे-७५०६९१९८१६,

किरण दामले-९९२०६५७५६०

प्रियांका कुंटे-९८२०९४१९०३

(मराठीचे मार्गदर्शक समूह)

रविवार, १९ मार्च, २०१७

विनोदवीर- किशोर नांदलस्कर


विनोदवीर

‘नवरे सगळे गाढव’ चित्रपटात त्यांच्या वाटय़ाला अगदी छोटा प्रसंग आला होता. पण तो प्रसंगही त्यांनी आपल्या अभिनयाने व खास शैलीत असा काही रंगवला की विनोदसम्राट साक्षात शरद तळवलकरही त्यांच्याकडे एक क्षण पाहात राहिले आणि त्यांनी शाबासकीची थाप त्या अभिनेत्याच्या पाठीवर मारली. तळवलकर यांच्याकडून कौतुकाची थाप मिळविलेले ते ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर आजच्या ‘पुनर्भेट’चे मानकरी आहेत.

‘पुनर्भेट’च्या निमित्ताने गप्पांच्या ओघात नांदलस्कर यांनी वरील किस्सा सांगितला. त्या आठवणीत रमताना ते म्हणाले, ‘नवरे सगळे गाढव’ हा चित्रपट जवळपास पूर्ण झाला होता. शरद तळवलकर, पद्मा चव्हाण अशी मोठी कलाकार मंडळी त्यात होती. त्या चित्रपटात मला अगदी छोटीशी म्हटली तर नगण्य भूमिका मिळाली. त्यात एक प्रसंग असा होता. तळवलकर यांचे मयताच्या सामान विक्रीचे दुकान असते. मी त्या दुकानात जातो. तळवलकर ‘हं, मयताचे आडनाव काय?’ असा प्रश्न मला करतात. मी त्यांना ‘खरे’ असे उत्तर देतो. त्या वेळी मी ‘पण खऱ्याला तर मरण नसतं ना’ असं एक पदरचं वाक्य टाकलं आणि एक क्षणभर तळवलकर माझ्याकडे पाहात राहिले. त्यांनी त्यांच्या शैलीत मला उत्तर दिले आणि तो प्रसंग तिथेच संपला. माझ्या त्या पदरच्या वाक्याने शरद तळवलकर खूश झाले आणि त्यांनी मला शाबासकी दिली. माझ्या अभिनय प्रवासातील तो पहिला चित्रपट होता. तळवलकर यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याकडून माझे झालेले कौतुक मी अद्यापही विसरलेलो नाही, माझ्यासाठी तो आशीर्वाद आहे...

किशोर नांदलस्कर यांचे मूळ गाव खारेपाटण तालुक्यातील शेजवली. त्यांचा जन्म मुंबईचाच. मुंबईत लॅमिंग्टन रस्ता, नागपाडा, घाटकोपर आणि अन्य काही भागात त्यांचे लहानपण गेले. ‘न्यू इरा हायस्कूल’ आणि ‘युनियन हायस्कूल’ येथे त्यांचं शालेय शिक्षण झालं. किशोर नांदलस्कर यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून मिळाला होता. त्या काळात त्यांनी नाटकांमधून स्त्री भूमिका केल्या होत्या. केशवराव दाते यांच्या नाटक कंपनीत तसेच अन्य काही नाटकांमधून त्यांनी काम केले होते. पुढे अभिनयाला रामराम करून खंडेराव यांनी काही काळ ‘ज्युपीटर’ गिरणीत नोकरी केली. गिरणीत काम करत असतानाच ते आंतरगिरणी तसेच कामगार नाटय़स्पर्धेतही नाटकं बसवायचे. त्या वातावरणातच नांदलस्कर लहानाचे मोठे झाले. त्यामुळे अभिनयाचं वेड त्यांना लागलेलं होतंच.

एक दिवस त्यांनी वडिलांना मलाही नाटकात काम करायचे आहे, असं सांगितलं. वडिलांनीही होकार दिला आणि १९६०-६१ च्या सुमारास रंगभूमीवर सादर झालेल्या ‘आमराई’ नाटकात त्यांना काम करण्याची संधी मिळाली. ती आठवण सांगताना ते म्हणाले, माझी अगदीच नगण्य भूमिका होती. माझ्या वाटय़ाला जो प्रसंग आला होता त्यात मला फक्त ‘बाप्पा’ अशी हाक मारायची होती. घाटकोपर येथे एका वाडीत ते नाटक झाले. मी रंगमंचावर प्रवेश केला आणि मला दरदरून घाम फुटला. ‘बाप्पा’ हा एक शब्दही माझ्या तोंडून निघाला नाही. सहकलाकार अरे बोल, बोल असं सांगत होते. प्रेक्षकांमधूनही हुर्यो उडवली गेली. तो माझ्यासाठी एक ‘धडा’ ठरला. अभिनय हा वाटतो तितको सोपा नाही हे मला कळलं. मी त्या वेळी जरी नापास झालो असलो तरी पुढे काम करत करत, अनुभवातून शिकत गेलो. ‘मुंबई मराठी साहित्य संघा’त सादर होणारी अनेक नाटकं, त्यातील कलाकारांचा अभिनय पाहिला. त्यातून जे मिळत गेलं ते टिपलं आणि माझ्यातील अभिनेता घडवत गेलो. त्याच काळात ‘कलाकिरण’ ही संस्था काढली. वसंत जाधव यांनी लिहिलेली छोटी छोटी नाटकं केली. घाटकोपर येथील ‘सवरेदय रुग्णालया’च्या आवारात रुग्णांसाठी श्रीराम इंदूलकर यांच्या सहकार्याने काही नाटकंकेली. त्याच काळात एका कंपनीत काही वर्षे नोकरीही केली. नोकरी सांभाळून नाटक सुरूच ठेवलं होतं. लोकनाटय़ लेखक शरद निफाडकर यांच्या ‘विठ्ठल फरारी’, ‘नथीतून मारला तीर’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ आदी नाटकं केली. त्याच सुमारास म्हणजे १९८० मध्ये दूरदर्शनच्या ‘गजरा’, ‘नाटक’ आणि अन्य कार्यक्रमांतून सहभागी झालो होतो. यातून हळूहळू माझं नाव झालं, लोक ओळखायला लागले.

नांदलस्कर यांनी आत्तापर्यंत सुमारे ४० नाटके, २५ हून अधिक मराठी व हिंदूी चित्रपट आणि २० हून अधिक मालिकांमधून काम केले आहे. ‘नाना करते प्यार’ हे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर काम केलेले शेवटचे नाटक. ‘सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’ आणि इतर काही चित्रपट त्यांच्या नावावर जमा आहेत. ‘विच्छा माझी पुरी करा’ हे नाटक नव्याने पुन्हा रंगभूमीवर सादर झालं. त्याचं दिग्दर्शन पुरुषोत्तम बेर्डे यांचं होतं. या नाटकातील ‘राजा’ची भूमिका तसेच दिलीप प्रभावळकर यांनी लोकप्रिय केलेले ‘वासूची सासू’ हे नाटकही नव्याने रंगभूमीवर सादर झालं. यात प्रभावळकर यांची भूमिका नांदलस्कर यांना साकारायची संधी मिळाली. दोन्ही भूमिका नांदलस्कर यांनी खास त्यांच्या शैलीत सादर केल्या. व्यावसायिक रंगभूमीवर नांदलस्कर यांनी ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन’ आदी नाटकांमधून प्रेक्षकांना पोट धरून हसवलं.

महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून नांदलस्कर यांचा बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर प्रवेश झाला. ‘जिस देश में गंगा रहता है’ (गोविंदा), ‘तेरा मेरा साथ है’ (अजय देवगण), ‘खाकी’ (अमिताभ बच्चन) यांच्याबरोबर काम करायची संधी त्यांना मिळाली. ‘चाल जाए पर वचन न जाए’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटांतही त्यांची भूमिका होती. इतकी वर्षे काम करूनही छोटय़ा छोटय़ा भूमिकाच मिळत गेल्या. लक्षात राहील अशी मोठी आणि विशेष भूमिका साकारायची संधी मिळाली नाही, याची कधी खंत वाटते का?, या प्रश्नाला उत्तर देताना नांदलस्कर यांनी सांगितलं, माझ्या बरोबर काम कोण करतंय, माझी भूमिका किती आहे याचा विचार मी कधीही केला नाही. कोणतीही भूूमिका ही लहान नसते. ‘वन रूम किचन’मधील ‘पितळे मामा’, ‘पाहुणा’मधील ‘नेने’, ‘विच्छा माझी पुरी करा’मधील ‘राजा’असो किंवा आणखीही अन्य भूमिका असोत. माझ्या वाटय़ाला आलेली प्रत्येक भूमिका मी जीव ओतून केली. त्यामुळे लांबी-रुंदीच्या दृष्टीने त्या फार मोठय़ा नसल्या तरीही प्रत्येक भूमिकेवर मी माझी छाप पाडली, माझ्या अभिनय शैलीत ती साकारली आणि म्हणूनच आजही मी प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ‘हुंटाश’ (यात माझी एकदम वेगळी भूमिका आहे), ‘मिस यू मिस’, ‘कंदीलगाव’ हे माझे आगामी चित्रपट आहेत.

पत्नी लक्ष्मी आणि तीन विवाहित पुत्र, सुना, नातवंडे असा त्यांचा परिवार. गेल्या वर्षी अचानक दम लागणे, छातीत धडधडणे असा शारीरिक त्रास त्यांना सुरू झाला. नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये व्यग्र असलेल्या नांदलस्कर यांनी त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले. पण असह्य़ झाले तेव्हा डॉक्टरांकडे जाण्यावाचून पर्यायच नव्हता. वैद्यकीय तपासण्यातून हृदयविकार, मधुमेह असल्याचे समोर आले. यातून माझी ‘बायपास’ झाली. ‘पेसमेकर’ बसवला गेला. हिंडणे-फिरणे, काम करणे यावर बंधनं आली. त्यामुळे सध्या काही काळ विश्रांती घेतली आहे. या अल्पविरामानंतर पुन्हा एकदा अभिनयाची नवी खेळी खेळण्यास आपण उत्सुक असल्याचं नांदलस्कर म्हणाले. माझा स्वभाव काहीसा बुजरा आणि भिडस्त असल्याने अभिनय कारकीर्दीत त्याचा थोडासा तोटाही झाल्याचे नांदलस्कर यांनी मोकळेपणाने कबूल केले.

-शेखर जोशी

(हा लेख लोकसत्ता-रविवार वृत्तान्त- १९ मार्च २०१७ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे)