शनिवार, ३१ मे, २०२५

शेजो न्यूज ॲण्ड व्ह्यूज ब्लॉग लवकरच नव्या स्वरूपात

लवकरच नव्या स्वरूपात नमस्कार, मी शेखर जोशी माझा https://shejonewsandviews.blogspot.com शेजो न्यूज ॲण्ड व्ह्यूज ब्लॉग लवकरच नव्या स्वरूपात सादर करत आहे.

सोमवार, २६ मे, २०२५

डोंबिवलीकर रमले 'अक्षरांच्या बागेत'!

डोंबिवलीकर रमले 'अक्षरांच्या बागेत'! -निनाद आजगावकर आणि सहकारी यांची भावसंगीत मैफल -तीन पिढ्यांनी सादर केली 'टाळ मृदंगाची धून' डोंबिवली, दि. २६ मे स्वरनिनाद आणि संगीतज्ञानानंद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'अक्षरांच्या बागेत' या मराठी भाव संगीताच्या मैफलित डोंबिवलीकर मंत्रमुग्ध झाले. गायक निनाद आजगावकर आणि सहकारी गायकांनी अविट गोडीची सुरेल मराठी गाणी सादर केली. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ठ्य म्हणजे ज्येष्ठ गायक व संगीतकार वसंत आजगावकर, त्यांचे सुपुत्र निनाद, निनाद यांच्या कन्या नीरजा या तीन पिढ्यांनी 'आली कुठुनशी कानी साद टाळ मृदुंगाची धून' हे अजरामर गाणे सादर केले. सर्वेश सभागृहात शनिवारी झालेल्या कार्यक्रमात मराठी भावसंगीताच्या सुवर्ण काळातील एकाहून एक अविट गाणी निनाद आजगांवकर, डॉ. शिल्पा मालंडकर आणि नीरजा आजगांवकर यांनी सादर केली. मिलिंद परांजपे ( कीबोर्ड), तुषार आग्रे (तबला), मनीष भुवड (हँडसॉनिक) यांनी संगीत साथ केली तर रश्मी आमडेकर यांनी निवेदन केले. ज्येष्ठ गायक वसंत आजगावकर कार्यक्रमास उपस्थित होते. श्रोत्यांच्या आग्रहावरून त्यांना व्यासपीठावर बोलावण्यात आले. कवी सोपानदेव चौधरी यांनी लिहिलेले आणि स्वतः आजगावकर यांनी संगीतबद्ध केलेले व गायलेले 'आली कुठूनशी कानी, टाळ मृदुंगाची धून' हे अजरामर गाणे स्वतः आजगावकर, निनाद, नीरजा या तीन पिढ्यांनी सादर केले. उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आपली दाद दिली. मराठी भावसंगीतात अमूल्य योगदान देणारे गीतकार, संगीतकार यांची लोकप्रिय तसेच अपरिचित गाणी कार्यक्रमात सादर करण्यात आली.

कॅलिफोर्निया येथे तीन दिवसीय 'नाफा' मराठी चित्रपट महोत्सव

कॅलिफोर्निया येथे तीन दिवसीय 'नाफा' मराठी चित्रपट महोत्सव मुंबई, दि. २६ में सॅनहोजे, कॅलिफोर्निया येथे येत्या २५ ते २७ जुलै या कालावधीत नाफा' मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. देऊळ' आणि 'भारतीय' चित्रपटांचे निर्माते अभिजीत घोलप यांच्या संकल्पनेतून 'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोशिएशन'ची (नाफा) स्थापना करण्यात आली आहे. गेल्यावर्षी पहिला 'नाफा' मराठी चित्रपट महोत्सव पार पडला होता. उत्तर अमेरिकेत आणि कॅनडामध्ये वास्तव्यास असणाऱ्या सुमारे साडेपाच लाख मराठी माणसांपर्यंत मराठी चित्रपट पोहचविण्याचा प्रयत्न 'नाफा'च्या माध्यमातून घोलप करत आहेत. गेल्या वर्षीपासून दर महिन्याला एक मराठी चित्रपट 'उत्तर अमेरिका - कॅनडा'मध्ये प्रदर्शित होत आहेत. ‘गुलकंद’, ‘सुजित सुशीला’, ‘संगीत मानापमान’, ‘चिकीचीकी बुबुम्बुम’, ‘पाणी’, ‘गुलाबी’, ‘नवरा माझा नवसाचा २’, ‘अशी ही जमवा जमावी’, ‘स्थळ’, ‘सलतात रेशीम गाठी’ इत्यादी चित्रपट आतापर्यंत अमेरिका आणि कॅनडामधील चित्रपटगृहांमध्ये महाराष्ट्रातील प्रदर्शनाच्याच दिवशी प्रदर्शित करण्यात आले होते. महाराष्ट्रातील मातब्बर निर्मिती व वितरण संस्थांसोबत नाफाने करार केले आहेत. आमच्या 'देऊळ’ चित्रपटाला राष्ट्रीय सुवर्ण-कमळ पुरस्कार मिळाल्यानंतर उत्तर अमेरिकेत मराठी चित्रपटसृष्टी स्थापन करावी असा विचार मनात होता. या विचाराशी सहमत असलेले पाचशेहून अधिक सदस्य अल्पावधीतच या कामाशी जोडले गेले. दोन लघुपटाची निर्मिती करण्याचे ध्येय ठेवून ‘फिल्म क्लब’च्या तयारीला लागलो. अनेक कलावंत, दिग्दर्शक, नृत्यदिग्दर्शक, गायक, कवी, सिनेमॅटोग्राफर्स, संकलक यांनी फिल्म क्लबमध्ये नोंदणी केली. त्यासाठी दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांची कार्यशाळा आयोजित केली. याशिवाय टॉक शोज, डॉ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, डॉ. सलील कुलकर्णी, सचिन खेडेकर, समीर चौघुले, अभिजीत देशपांडे यांच्या कार्यशाळा, चर्चासत्रांच्या माध्यमातून आमचे काम सुरू असल्याचे घोलप यांनी सांगितले. यावर्षीच्या 'नाफा''मराठी चित्रपट महोत्सवात डॉ. मोहन आगाशे, अमोल पालेकर, सचिन खेडेकर, महेश कोठारे, अश्विनी भावे, सोनाली कुलकर्णी (ज्येष्ठ), अवधूत गुप्ते, आदिनाथ कोठारे, वैदेही परशुरामी आणि मधुर भांडारकर उपस्थित राहणार आहेत. महोत्सवासाठी अमेरिकेतील ‘बीएमएम’च्या ५७ महाराष्ट्र मंडळांचे सहकार्य लाभले आहे.

रविवार, २५ मे, २०२५

'काश्मीर सद्यस्थिती आणि भविष्यातील योजना'

हम चॅरिटेबल ट्रस्टतर्फे 'काश्मीर सद्यस्थिती आणि भविष्यातील योजना' विषयावर कार्यक्रम - 'हम' कार्यकर्त्यांचा सीमा भागात पाहणी दौरा डोंबिवली, दि. २५ मे हम चॅरिटेबल ट्रस्टतर्फे येत्या ४ जून रोजी 'जोडो जम्मू काश्मीर- सद्यस्थिती आणि भविष्यातील योजना' विषयावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात 'हम'चे कार्यकर्ते सीमाभागातील पाहणी दौऱ्यातील आपले अनुभव सांगणार आहेत. पहेलगाम हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' च्या माध्यमातून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले.‌ पाकिस्तानने जम्मू, अखनूर, नौशेरा, राजोरी, पूँछ, उरी, कुपवाडा, तंगधार या सीमावर्ती भागात ड्रोन, मिसाईल्स, मोरटार, इ. ने शेलिंग, फायरिंग केले. सीमेवरील आपल्या नागरिकांनी त्याला धैर्याने तोंड दिले. मात्र त्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागली. 'हम' चे कार्यकर्ते वरील भागात फिरून याचा आढावा घेत आहेत. सीमा भागातील हा दौरा, तेथील अनुभव 'हम'चे कार्यकर्ते कार्यक्रमात सविस्तर सांगणार असून एकूणच 'काश्मीर सद्यस्थिती आणि भविष्यातील योजना' या विषयावरही कार्यक्रमात दृकश्राव्य माध्यमातून चर्चा, संवाद होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार, व्याख्याते मकरंद मुळे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता सर्वेश सभागृह, तळमजला, डोंबिवली पूर्व येथे होणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन हम चॅरिटेबल ट्रस्ट डोंबिवलीचे अध्यक्ष सुनील देशपांडे यांनी केले आहे.

खगोल अभ्यासकांचे संमेलन डिसेंबरमध्ये ठाणे येथे होणार

खगोल अभ्यासकांचे संमेलन डिसेंबरमध्ये ठाणे येथे होणार - खगोलशास्त्र जीवन गौरव पुरस्कार भरत अडूर यांना जाहीर ठाणे, दि. २५ मे खगोल अभ्यासकांचे १४ वे राज्यस्तरीय संमेलन येत्या २० व २१ डिसेंबर रोजी ठाणे येथे आयोजित करण्यात येणार आहे.‌ संमेलनात यंदाचा खगोलशास्त्र जीवनगौरव पुरस्कार नेहरू तारांगणातील निवृत्त शास्त्रज्ञ भरत अडूर यांना देण्यात येणार आहे.‌ मराठी खगोल अभ्यासक मंडळ कार्यकारिणीची सभा शनिवारी ठाणे येथे झाली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने हे संमेलन घेण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. दिवंगत खगोलशास्रज्ञ आणि लेखक डाॅ. जयंत नारळीकर यांनी विश्वनिर्मिती सिद्धांतसंबंधित संशोधन केले होते. डिसेंबरमध्ये होणा-या खगोल अभ्यासकांच्या संमेलनात डॉ.‌ नारळीकर यांच्या विश्वनिर्मिती सिद्धांतसंबंधित एक व्याख्यान तसेच एस्ट्राॅइड, गगनयान, आधुनिक दुर्बिणी वगैरे विषयांवर तज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. संमेलनाच्या निमित्ताने रात्री आकाश दर्शन कार्यक्रमही होणार आहे. शनिवारी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेस संस्थेचे अध्यक्ष दा.कृ.सोमण यांच्यसह छत्रपती संभाजी नगर येथील तारांगणाचे श्रीनिवास औंधकर, मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह प्रा. नामदेव मांडगे, पिंपरी चिंचवड तारांगणाचे कासार, नारायणगाव येथील रेडिओ दुर्बिणीचे सुधीर फाकटकर, कल्याण आकाशमित्र संस्थेचे हेमंत मोने, नाशिकचे सचिन मालेगावकर, नेहरू तारांगणाचे निवृत्त शास्त्रज्ञ भरत अडूर उपस्थित होते.

शनिवार, २४ मे, २०२५

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचा समारोप

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचा समारोप; भारतासह २३ देशांतील ३० हजार हिंदूंचा सहभाग फोंडा, गोवा, २४ मे येथे आयोजित करण्यात आलेल्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाची सांगता झाली.‌आगामी काळात भारताला हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी आपण सर्वांनी आवश्यक ते प्रत्येक पाऊल उचलून संघटित राहिले पाहिजे,असे आवाहन तेलंगणा येथील हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजासिंह यांनी महोत्सवाच्या सांगताप्रसंगी केले. सनातन संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आणि संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.भारतासह जगभरातील २३ देशांतून आलेले सुमारे ३० हजार हिंदू धर्मप्रेमी आणि साधक या महोत्सवात सहभागी झाले होते.
महोत्सवात विविध आध्यात्मिक,राष्ट्रहितकारी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय सैन्य, सनातन धर्मप्रेमी आणि राष्ट्ररक्षणासाठी महोत्सवात शतचंडी याग तसेच समस्त सनातन हिंदु धर्मियांना चांगले आरोग्य लाभावे यासाठी महाधन्वंतरी यज्ञही आयोजित करण्यात आला होता.देशभरात राष्ट्र अन् धर्म कार्य करणार्‍या २५ जणांना ‘हिंदु राष्ट्ररत्न’ आणि ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हे पुरस्कार आता दरवर्षी दिले जाणार आहेत. महोत्सवात कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांचा जीवनपट कीर्तनाच्या माध्यमातून उलगडला.श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरिजी, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रविंद्र पुरीजी महाराज, अयोध्या हनुमानगढी येथील महंत राजू दास, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपादजी नाईक, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, माजी केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर, तसेच काशी-मथुरा येथील मंदिरांचा खटला लढवणारे सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्यासह अनेक मान्यवर महोत्सवात सहभागी झाले होते.

मान्सून केरळमध्ये दाखल!

मान्सून केरळमध्ये दाखल! नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाला असल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने शनिवारी केली. याआधी २००९ मध्ये मान्सून केरळात २३ मे रोजी दाखल झाला होता. त्यानंतर खूप वर्षांनी मान्सून इतक्या लवकर केरळात दाखल झाला आहे. दरवर्षी १ जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा मान्सून यंदाच्या वर्षी आठवडाभर आधीच केरळमध्ये दाखल झाला आहे. आता पुढील चार ते पाच दिवसांत मान्सून कोकणात आणि येत्या १ जूनपर्यंत मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.