रविवार, २१ मार्च, २०२१

व्यक्तिवेध-विनायक चासकर

मुंबई दूरदर्शनच्या स्थापनेपसून तेथे कार्यरत असलेले ज्येष्ठ निर्माते विनायक चासकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्यावरील हा व्यक्तिवेध. हा लेख लोकसत्ता-मुख्य अंक, २० मार्च २०२१ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. विनायक चासकर ग्रॅण्ट रोड येथे जाण्यासाठी माटुंगा रोड स्थानकात आले. स्थानकातील पादचारी पूल उतरत असतानाच गाडी सुटली. आता मला ती गाडी मिळणे शक्यच नव्हते. पण ती गाडी काही क्षणातच थांबली आणि मला त्याच गाडीत चढायला मिळाले. ही किमया ‘गजरा’ कार्यक्रमाने घडविली. धावतपळत उतरूनही मला गाडी पकडता आली नाही हे त्या गाडीच्या मोटरमनने पाहिले. त्या अमराठी मोटरमनला ‘गजरा’ कार्यक्रमामुळे मी परिचित होते. केवळ त्या ओळखीमुळे त्यांनी सुरू झालेली गाडी काही क्षण पुन्हा थांबविली आणि ‘मॅडम मैं आपका प्रोग्रॅम देखता हूँ, हमें अच्छा लगता हैं’अशी दादही त्यांनी दिली… ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांच्या बाबतीत घडलेला हा किस्सा त्यांनीच ‘लोकसत्ता-रविवार वृत्तान्त’मधील ‘पुनर्भेट’ या सदरासाठी घेतलेल्या मुलाखतीच्या वेळी सांगितला होता. खरोखरच अशी अमाप लोकप्रियता त्या काळी विनायक चासकर यांच्या ‘गजरा’ कार्यक्रमाला मिळाली होती. अमराठी प्रेक्षकांमध्येही ‘गजरा’ पाहिला जायचा. निखळ विनोद आणि करमणूक असे त्याचे स्वरूप होते. चासकर यांनी सादर केलेला ‘गजरा’ आणि ‘नाटके’ यातून शं. ना. नवरे, रत्नाकर मतकरी, लक्ष्मीकांत बेर्डे, सुमती गुप्ते, अरविंद देशपांडे, रिमा लागू, मोहन गोखले यांच्यासह सुरेश खरे, दया डोंगरे, मोहनदास सुखटणकर, बाळ कर्वे, जयंत सावरकर, दिलीप प्रभावळकर, विजय कदम आदी आणि आता नामवंत, मातब्बर असलेल्या लेखक, कलाकारांचा सहभाग होता. या सर्वांना ‘गजरा’ आणि दूरदर्शनच्या नाटकांनी महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचविले.
चासकर हे दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे (नॅशनल स्कू ल ऑफ ड्रामा) पदवीधर. मुंबई दूरदर्शनमध्ये ते नेपथ्यकार म्हणून रुजू झाले. पुढे जिद्द, मेहनत, बुद्धिमत्ता, कल्पकता या गुणांच्या जोरावर एक सर्जनशील निर्माता अशी ओळख मिळविली. दूरचित्रवाणीसारख्या सरकारी, कौटुंबिक माध्यमाच्या प्रेक्षकांना काय आवडेल याचा विचार करून त्यांनी मुंबई दूरदर्शनवर अनेक वेगवेगळे कार्यक्रम सादर केले. पण यातही चासकर यांनी सादर केलेली विविध नाटके आणि ‘गजरा’ हे कार्यक्रम विशेष लक्षवेधी ठरले. दूरदर्शन परिवारात ते ‘भाऊ’ या नावाने प्रसिद्ध होते. २ ऑक्टोबर १९७२ रोजी मुंबई दूरदर्शनची म्हणजेच आत्ताच्या ‘सह्याद्री’ वाहिनीची सुरुवात झाली. तेव्हापासून अनेक ‘व्यत्यय’ पार करत मुंबई दूरदर्शनवरील निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, वृत्तनिवेदक, निवेदक, सूत्रसंचालक आणि पडद्यामागच्या सर्वानीच अनेक दर्जेदार, मनोरंजक, ज्ञानवर्धक कार्यक्रम सादर करून काही पिढ्या संस्कारित केल्या आणि या प्रत्येकानेच आपला स्वतंत्र ठसा कामावर उमटविला. डॉ. विश्वास मेहंदळे, याकूब सईद, विजया जोगळेकर-धुमाळे, अरुण काकतकर, सुहासिनी मुळगावकर, विनय धुमाळे, आकाशानंद, मनोहर पिंगळे, डॉ. किरण चित्रे, प्रदीप भिडे, अनंत भावे, सुधीर गाडगीळ, भक्ती बर्वे, स्मिता पाटील आदींसह विनायक चासकर हे नावही अग्रक्रमाने घ्यावेच लागेल. मुंबई दूरदर्शनचा इतिहास विनायक चासकर या नावाशिवाय पूर्णच होणार नाही.

मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७

उचलली जीभ आणि लावली टाळ्याला


मराठीत 'उचलली जीभ आणि लावली टाळ्याला' अशी म्हण आहे. सध्या काही राजकीय नेत्यांनी हा प्रकार सुरु केला असून सभा, संमेलने, जाहीर कार्यक्रमातून राजकीय नेत्यांची जीभ घसरत चालली आहे. हातात माईक आणि समोर श्रोता मिळाला की काय बोलावे, कसे बोलावे याचे भान व ताळतंत्र सुटत चाललेले पाहायला मिळत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन. दारु विक्री वाढवायची असेल तर दारुला महिलांचे नाव द्या. कारखान्यात तयार केलेल्या दारुला 'महाराजा' ऐवजी 'महाराणी' असे नाव ठेवा त्याची विक्री वाढेल असा सल्ला महाजन यांनी सातपुडा साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाला दिला. महाजन यांच्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध झाल्यानंतर त्यांना उपरती झाली आणि त्यांनी जाहीर माफी मागितली. पण मुळात जाहीरपणे असे बोलायची खुमखुमी महाजन यांना का आली हा प्रश्नच आहे.

जाहीर कार्यक्रमातून बोलताना जीभ घसरणारे महाजन हे काही पहिलेच राजकीय नेते किंवा मंत्री नाहीत. याही अगोदर अजित पवार, आर. आर. पाटील, गिरीश बापट, रावसाहेब दानवे आदी राजकीय नेत्यांची जीभ घसरली होती. महाराष्ट्रात ऐन दुष्काळी परिस्थीती असताना धरणात पाणी नाही तर मी काय xx का?, असा सवाल जाहीरपणे विचारुन अजित पवार यांनी खालची पातळी गाठली होती. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तेव्हाचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी 'बडे बडे शहरोंमे ऐसे छोटे छोटे हादसे होते है असे विधान करुन गदारोळ उडविला होता. 'भाजप'चे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी 'साले'हा शब्द उच्चारला आणि स्वतला व पक्षालाही अडचणीत आणले होते. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनीही 'तसल्या'व्हिडिओ क्लिपा आम्ही पण पाहतो, आम्ही पिकलेलं पान असलो तरी आमचे हिरवे देठ आहेत असे वक्तव्य करुन वाद ओढवून घेतला होता. भाजप समर्थक आमदार प्रशांत परिचारक यांचीही जीभ अशीच घसरली. राजकारण कसे असते हे उपस्थीतांना समजून सांगताना परिचारकांनी सैनिकांविषयी संतापजनक वक्तव्य केले. ‘सीमेवरील जवान वर्ष भर घरी येत नाही. तरीदेखील घरी आल्यावर त्याला मुलगा झाल्याचे समजते आणि तो गावात मुलगा झाल्याच्या आनंदात पेढेही वाटतो’, असे परिचारक बोलले होते. केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात पत्रकार आणि नागरिकांना उद्देशून‘तुमच्या नशिबी लक्ष्मीदर्शनाचा योग आहे. येणाऱ्या लक्ष्मीला नाकारू नका’, असे वक्तव्य केले होते. निवडणुक आयोगनेही गडकरी यांच्या या विधानाची दखल घेऊन ताशेरे ओढले होते.लोकसभा निवडणुकीच्या वेळी साताऱ्यातील सभेत बोलताना ‘बोटाची शाई पुसून पुन्हा मतदान करा’ हे त्यांचे विधान भलतेच गाजले. त्यांच्या या विधानाची निवडणुक आयोगानेही दखल घेतली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही मराठी साहित्यिकांची ‘बैल’ या शब्दांत संभावना करून तसेच ‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व’ पु. ल. देशपांडे यांना दिलेल्या ‘महाराष्ट भूषण’ पुरस्कारावरून ‘झक मारली आणि पुलंना हा पुरस्कार दिला’, 'मोडका पूल' अशी विधाने केली होती.

खरे तर सार्वजनिक जीवनात वावरताना मोठ्या पदावर किंवा समाजात ज्याला मान व प्रतिष्ठा आहे अशा कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीने आचार-विचार आणि कृतीचे काही किमान संकेत पाळणे अत्यंत गरजेचे आहे. कारण ही सर्व मंडळी ज्या पदावर काम करत आहेत, त्यांना अशा प्रकारची बेजबाबदार आणि जीभ घसरणारी वक्तव्ये करणे न शोभणारे आहे. आजही आपल्या समाजात अशा प्रकारचे बोलणे हे असंस्कृत आणि निषेधार्ह मानने जाते आणि त्यात काहीही चूक नाही. भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क दिला असला तरी त्याचा अर्थ उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असा होत नाही, याचे भान राजकीय नेत्यांनी ठेवण्याची गरज आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काहीही कृती करून, काहीही बोलून, आपल्या जीभेचा पट्टा वाट्टेल तसा सैल सोडून इतरांना दुखावणे नव्हे. आपण बोलतो किंवा वागतो त्याचा काय परिणाम होईल याचा विचार प्रत्येक राजकीय नेत्याने केला पाहिजे. अशी विधाने करताना त्याचा इतरांवर, समाजावर काय परिणाम होईल याचे भान ठेवले पाहिजे. जीभ घसरणार नाही याची त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे अशा प्रकारे वादग्रस्त वक्तव्य एखाद्या राजकीय नेत्याने केले तर तो माफी मागून मोकळा होतो आणि सुटतो. काही दिवसांनी लोकही तो काय बोलला होता ते विसरुन जातात. या मंडळींच्या विरोधात पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व कोणतीही कारवाई करत नाही त्यामुळे राजकीय मंडळीही पुन्हा आपल्याला हवे ते बोलायला मोकळी होतात. असे वक्तव्य पुन्हा होणार नाही याची जरब बसण्यासाठी त्यांना काहीतरी शिक्षा झाली पाहिजे, तरच असे प्रकार थांबतील. राजकीय पक्ष त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करणा नसेल तर त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणे, न्यायालयात याचिका दाखल करणे किंवा निवडणुकीत मत मागायला आले की त्यांच्या वक्तव्याची आठवण करुन देऊन त्यांना मतदान न करणे अशी पावले उचलून त्यांना धडा शिकविला पाहिजे.

असे जो पर्यंत होत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांची जीभ अशीच वळवळत राहणार, घसरणार आणि उचलली जीभ व लावली टाळ्याला असेच घडत राहणार...

-शेखर जोशी

सोमवार, १७ जुलै, २०१७

समर्थ रामदास स्वामींचे बोल


आज अमरनाथ यात्रा नरसंहाराच्या पार्श्वभूवीवरती ,,,, रामदास स्वामी आठवतात

अध्यात्माच्या पोकळ आणि वांझोट्या गप्पा न मारता ज्यांनी हिन्दु समाजास बलोपासनेची शिकवण दिली आणि क्षात्रतेज जागृत ठेवले त्या समर्थ रामदास स्वामींना साष्टांग प्रणाम.

जयासी वाटे जीवाचे भय।

तेणे क्षात्रधर्म करो नये।

काहीतरी करोनी उपाये।

पोट भरावे।।

मराठा तितुका मेळवावा।


महाराष्ट्र धर्म वाढवावा।

सगट स्वकीयांचा जिव्हाळा।

सोडु नये।।

धर्मासाठी झुंजावे।

झुंजोनी अवघ्यासी मारावें।

मारितां मारितां घ्यावें।

राज्य आपुलें।।

आधी गाजवावे तडाखे।

तरिच भूमंडळ धाके।

हे न करिता धक्के।

राज्यास होती।।

धटासी आणावा धट।

उद्धटासी उद्धट।

खटनटासी खटनट।

सामर्थ्य करीं।।

देशद्रोही तितुके कुत्ते।

मारोनि घालावे परते।

देवदास पावती फत्ते।

यदर्थी संशयो नाही।।

आहे तितुके जतन करावें।

पुढे आणिक मेळवावें।

महाराष्ट्र राज्य करावें।

जिकडे तिकडे।।

~समर्थ रामदास स्वामी

असा रांगडा आणि क्षात्रवृत्ती उत्तेजित करणारा उपदेश करणारा संत क्वचितच कोणत्याही प्रांतात जन्मला असेल. राष्ट्रभक्ती आणि धर्मभक्ती हेच खरे अध्यात्म असा उपदेश करणारे समर्थ रामदास लवकरात लवकर उभ्या हिन्दुस्थानास समजणे अत्यंत आवश्यक आहे. रामदास स्वामींच्या उपदेशाप्रमाणे स्वत्व आणि स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा, हिंमत आणि ताकत सर्व भारतीयांना लाभो हीच प्रार्थना.

।।जय जय रघुवीर समर्थ।।

महाराष्ट्राची 'राज'धारा


http://epaper.loksatta.com/c/20620076 महाराष्ट्राची 'राज'धारा लोकसत्ता-मुख्य अंक ३० एप्रिल २०१७

लावणी सम्राज्ञी


पुनर्भेट

सुलोचना चव्हाण

संगीतकार वसंत पवार एक दिवस अचानक त्यांच्या घरी आले आणि चित्रपटासाठीची एक लावणी मला तुमच्याकडूनच गाऊन घ्यायची आहे, असे त्यांनी सांगितले. लावणी आणि तीही आपण गायची या कल्पनेने त्या क्षणभर गांगरल्या. लावणी गाऊ शकणार नाही, असे त्यांनी सांगितले. पण वसंत पवार यांनी आपला हट्ट सोडला नाही. अखेर त्या ती लावणी गायला तयार झाल्या. ती लावणी होती ‘नाव गाव कशाला पुसता मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हनत्यात लवंगी मिरची’. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली ती लावणी ‘रंगल्या रात्री अशा’ चित्रपटातील होती. या लावणीने ज्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले आणि आचार्य अत्रे यांनी ज्यांना ‘लावणीसम्राज्ञी’ हा किताब दिला त्या ज्येष्ठ पाश्र्वगायिका सुलोचना चव्हाण आजच्या ‘पुनर्भेट’च्या मानकरी आहेत. ‘सेलिब्रेटी’पणाचा कोणताही तोरा नसलेल्या सुलोचानाबाई यांना घरात आणि परिचितांमध्ये ‘माई’ या नावाने संबोधले जाते. त्यांच्याकडे पाहिले तर या व्यक्तिमत्त्वाने लावणीचा तो ठसका, खटय़ाळपणा, शृंगार गाण्यातून पुरेपूर पोहोचवला यावर विश्वासच बसत नाही. प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर असतानाही त्या जशा साध्या होत्या तशा त्या आजही आहेत. कपाळावर मोठे कुंकू आणि अंगभर लपेटून घेतलेला पदर हे त्यांचे रूप आजही तसेच आहे.

‘नाव गाव कशाला पुसता..’ या लावणीचा किस्सा अधिक विस्ताराने सांगताना त्या म्हणाल्या, माझे पती शामराव चव्हाण हे मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक-कॅमेरामन म्हणून काम करत होते. त्यांचा आणि वसंत पवार यांचा परिचय होता. मी पाश्र्वगायन करते हे पवार यांना ठाऊक होतेच. पण तेव्हा मी हिंदीत जास्त गात होते. मराठीत नुकतीच सुरुवात केली होती. पवार घरी आले आणि चव्हाणांना (मी आशा भोसले यांच्या सांगण्यावरून शामरावांना ‘अहो’च्या ऐवजी चव्हाण अशी हाक मारू लागले.) म्हणाले, ‘नाव गाव कशाला पुसता’ ही लावणी मला सुलोचनाबाईंकडूनच गाऊन घ्यायची आहे. चव्हाणांना मी खुणेने नाही नाही असे म्हणत होते. चव्हाण यांनी मला थांब अशी खूण केली. पवार यांनी ही लावणी गाऊन घेणार तर तुमच्याकडूनच असा प्रेमळ हट्ट धरला. चव्हाण यांनीही तू लावणी गाऊ शकशील असे प्रोत्साहन दिले.

पवार यांनी खिशातून लावणी लिहिलेला कागद काढला आणि त्यांनी केलेल्या संवादिनीच्या साथीवर लावणी गायले. त्यांना ती आवडली. पुढे लावणीचे ध्वनिमुद्रण झाले आणि त्या एका लावणीने माझे आयुष्य बदलून गेले. पुढे लावणी गायिका म्हणून प्रसिद्ध झाले, त्याचा पाया ‘नाव गाव कशाला’ने घातला होता. आठवणींचा पट उलगडताना त्यांनी सांगितले, मी मूळची गिरगावचीच. माहेरची सुलोचना कदम. गिरगावातील फणसवाडी येथील चाळीतच लहानाची मोठी झाले. माझा मोठा भाऊ दीनानाथ कदम याने मेळा काढला होता. त्या मेळ्यात अभिनेत्री संध्या, त्यांची बहीण वत्सला देशमुख काम करायच्या. माझी मोठी बहीण शकुंतलाही त्यात असायची. घरचाच मेळा असल्याने मीही त्यात लहानसहान कामं करायची. आमच्या घरचे वातावरण बाळबोध. एकदा भावाने वत्सलाबाई कुमठेकर यांनी गायलेल्या ‘सांभाळ गं दौलत लाखाची तुझ्या ज्वानीची..’ ही ध्वनिमुद्रिका घरी आणली. ग्रामोफोनवर ती लावली. मला ते गाणे आवडले. ते मी सतत म्हणू लागले. आमच्या आईला काही ते आवडले नाही. लावणी किंवा असली गाणी घरात आणि तीही मुलीने म्हणायची, असा तो काळ नव्हता. ही अशी गाणी घरात लावतात का, म्हणून ती ओरडायची. प्रसंगी मला तिच्या हातचा मारही खावा लागला. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. कारण पुढे लावणी गायिका म्हणूनच मी प्रसिद्ध झाले.

मेळ्यात काम करत असताना काही भजने व गाणी गायचे. आमच्या मेळ्यातील रंगभूषाकार दांडेकर एके दिवशी मला संगीत दिग्दर्शक श्यामबाबू पाठक यांच्याकडे घेऊन गेले. माझा आवाज त्यांनी ऐकला आणि ‘कृष्ण सुदामा’ या हिंदी चित्रपटातील गाणे गायची संधी मला मिळाली. पाश्र्वगायन केलेले ते माझे पहिले गाणे. गाण्याचे ध्वनिमुद्रण फ्रॉकमध्ये केले होते. तेव्हा मी जेमतेम आठ ते दहा वर्षांची होते. पुढे काही वर्षांनी मा. भगवान यांच्या चित्रपटांसाठी मी पाश्र्वगायन केले. सी. रामचंद्र, मन्ना डे, मोहंमद रफी, मुकेश, जोहराबाई, आमीरबाई, शमशाद बेगम आणि त्या काळातील सर्व मान्यवर गायक-गायिकांबरोबर द्वंद्वगीते, तसेच माझी स्वत:ची वैयक्तिक गाणीही त्या वेळी ध्वनिमुद्रित झाली. ‘चोरी चोरी’, ‘जो बिगड गयी वो किस्मत हू’, ‘नजर से नजर लड गई’, ‘जिगर में छुरी गड गई’ ‘हाए राम’या , ‘आँखो से मिली आँखे’, ‘आरमानोंकी दुनिया मे एक’, ‘रात अंधेरी मत कर देरी तु मेरा मै तेरी’, ‘अब तू ही बता तेरा दिल किसको पुकारे’, ही आणि अशी अनेक हिंदी गाणी मी गायले असून त्यांची संख्या सुमारे अडीचशे इतकी आहे. ही सर्व गाणी त्या काळात खूप लोकप्रिय झाली. मी गायलेली ही हिंदी गाणी माझ्या वाढदिवसाच्या (१३ मार्च) दिवशी ‘रेडिओ सिलोन’वरून दरवर्षी सकाळी दीड ते दोन तास वाजवली जातात. ती ऐकून रसिक श्रोते व चाहत्यांकडून आजही प्रतिसाद मिळतो, आपल्यासाठी ती आनंदाची गोष्ट असल्याचेही सुलोचनाबाई यांनी सांगितले. लावणी गायनाने मला प्रसिद्धी व यश मिळवून दिले. मला मोठे केले. लावणी गायनाला मी प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून दिली. स्वत:चा आब, मर्यादा राखूनच मी लावणी गायनाचे अक्षरश: हजारो कार्यक्रम केले. महाराष्ट्रातील असे कोणतेही छोटे-मोठे शहर, गाव, तालुका किंवा खेडे नसेल की जेथे मी कार्यक्रम केला नाही. आणि खरे सांगू का, कोणत्याही प्रकारचे संगीत असो ते कधीही कमी दर्जाचे नसते. प्रत्येक संगीत प्रकाराची स्वत:ची स्वतंत्र ओळख आणि वैशिष्टय़ आहे, हे विसरता कामा नये. हल्लीचे लावणी सादरीकरण, गायन याविषयी आपले मत स्पष्टपणे मांडताना त्या म्हणाल्या, आज लावणी सादर करण्यापेक्षा त्याचे प्रदर्शन अधिक प्रमाणात केले जाते. श्रोते किंवा प्रेक्षकांपर्यंत लावणी पोहोचवण्यासाठी तोकडे कपडे, अश्लील हावभाव, भडक रंगभूषा, अंगप्रदर्शन याची काहीही गरज नसते. ‘शिवाजी मंदिर नाटय़गृहा’चे उद्घाटन माझ्या लावणी गायन कार्यक्रमाने झाले. तसेच ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनप्रसंगीही माझ्या गाण्याचा कार्यक्रम झाला असल्याची आठवण त्यांनी सांगितली.

गायन क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना विविध सन्मान पुरस्कार मिळाले. राज्य शासनाच्या लता मंगेशकर पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले. पण केंद्र शासनाच्या पद्मश्री, पद्म पुरस्कारासाठी अद्याप त्यांची दखल घेण्यात आलेली नाही. या दिग्गज पाश्र्वगायिकेला स्वत:चे हक्काचे घर नाही. आजही त्या गिरगावात एका चाळीत छोटय़ा घरात भाडय़ाच्या जागेत राहात आहेत. मोठी सून प्रफुल्ल, (मोठा मुलगा जय आता या जगात नाही) व त्यांची मुलगी आरती, धाकटा मुलगा विजय, त्यांची पत्नी कविता आणि त्यांचा मुलगा अजय असा त्यांचा परिवार. विजय हे प्रसिद्ध ढोलकी वादक असून अन्यही लोकतालवाद्ये ते वाजवितात. मराठी, हिंदूीसह काही भारतीय प्रादेशिक भाषांमधील मान्यवर संगीतकारांकडे ते संगीतसाथ करतात. लौकिक अर्थाने केवळ चौथीपर्यंत शिक्षण झालेल्या आणि गाण्यातील कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण न घेतलेल्या सुलोचनाबाई यांनी अथक परिश्रम, सतत शिकण्याची वृत्ती यामुळे गाण्याच्या क्षेत्रात विशेषत: लावणी गायनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे.

आचार्य अत्रे यांच्या ‘हीच माझी लक्ष्मी’ चित्रपटात संगीतकार वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली ‘मुंबईच्या कॉलेजात गेले पती, आले होऊनशान बी.ए. बी.टी.’ ही लावणी त्यांनी गायली. पुढे ‘कलगीतुरा’ चित्रपटासाठी काही लावण्या त्या गायल्या. लावणी गायनाने त्यांना प्रसिद्धी मिळाल्यानंतर पुढे अनेक तमाशाप्रधान चित्रपटांतील लावण्या त्यांनी आपल्या दमदार आणि खडय़ा आवाजाने लोकप्रिय केल्या. लावणी आणि सुलोचना चव्हाण असे एक अतूट नाते तयार झाले. ‘औंदा लगीन करायचं’, ‘कसं काय पाटील बरं हाय का’, ‘कळीदार कपुरी पान’, ‘खेळतांना रंग बाई होळीचा’, ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’, ‘पाडाला पिकलाय आंबा’, ‘फड सांभाळ गं तुऱ्याला आला’, ‘मी बया पडले भिडची, ग बाई भिडची’, ‘सोळावं वरिस धोक्याचं’ या आणि इतरही अनेक लावण्या आजही लोकप्रिय आहेत. त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. विविध पुरस्कार वितरण सोहळ्यांत या लावण्यांवर नृत्य सादरीकरण केले जाते ते मूळ गाणे सुलोचना यांच्याच आवाजातील असते.

शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता-रविवार वृत्तान्त, ३० एप्रिल २०१७

जीएसटी कारणे संभ्रमाचा अंक


जीएसटीकारणे संभ्रमाचा अंक..

शेखर जोशी

जीएसटी’ लागू झाला असल्याने २५० रुपयांवरील तिकीटांसाठी निर्मात्यांना १८ टक्के कर भरावा लागणार आहे. वस्तू-सेवा कराला अर्थात ‘जीएसटी’ला नाटय़वर्तुळातून विरोध झाला. त्यापुढे नाटकांच्या तिकिटांवर २५० रुपयांची असलेली मर्यादा ५०० रुपयांपर्यंत वाढवावी, अशी मागणी नाटय़ निर्मात्यांनी नुकतीच राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली. ही मागणी मान्य होईल तेव्हा होईल, पण तोपर्यंत ‘जीएसटी’ भरावा लागू नये म्हणून नाटय़व्यावसायिकांनी काही नवनव्या शक्कल लढवायला सुरुवात केली आहे. अर्थात, या युक्त्या व्यवहार्य किती हा भाग वेगळा, पण या ‘जीएसटी’ कारभारामुळे नाटय़निर्मात्यांमध्ये आपापसातही सावळ्यागोंधळाचा अंक सुरू झाला आहे.

जीएसटी' कारणे संभ्रमाचा अंक... लोकसत्ता-रविवार वृत्तान्त १६ जुलै २०१७ http://epaper.loksatta.com/c/20591400 पान-१ http://epaper.loksatta.com/c/20591443 पान-६

अगदी आत्ता-आत्तापर्यंत नाटकाचे दर सरसकट ३०० ते ३५० रुपयांपासून सुरू व्हायचे. मात्र, आता ‘जीएसटी’ लागू झाला असल्याने २५० रुपयांवरील तिकीटांसाठी निर्मात्यांना १८ टक्के कर भरावा लागणार आहे. त्यामुळे हा कर भरावा लागू नये यासाठी आता बहुतांश नाटय़निर्मात्यांनी नाटकांच्या तिकिटांचे दर २५० रुपयांपासून सुरू केले आहेत. नाटकांच्या तिकिटांचे दर आम्ही कमी केले आहेत असे ते सांगत असले तरी ‘जीएसटी’तून वाचण्यासाठीच त्यांनी ही पळवाट काढली हे वास्तव आहे. तर काही जण तीनशे ते पाचशे रुपये तिकीट दर लावून नाटकाचे प्रयोग करत आहेत. मात्र ही सगळीच मंडळी ‘जीएसटी’चे सर्व कायदे, नियम पाळत आहेत का?, याबद्दलबही शंका घ्यावी अशी परिस्थिती आहे. पाऊस आणि अन्य कारणांमुळे आधीच नाटय़ व्यवसायाची गाडी खडखड करत चालली आहे. त्यात १८ टक्केजीएसटी लागू झाल्याने नाटय़निर्मात्यांचे कंबरडेच मोडले आहे. त्यामुळे एकीकडे नाईलाज म्हणून अडीचशे रुपये तिकीटविक्री करणारे नाटय़निर्माते तर दुसरीकडे हा व्यवसाय असल्याने त्यातील बदलत जाणारी आर्थिक गणिते सांभाळायलाच लागणार असे म्हणत तीनशे-पाचशे रुपये तिकीट लावणारे नाटय़निर्माते असे दोन गट नाटय़निर्मात्यांमध्ये तयार झाले आहेत.

मुळात काही नाटकांचे अपवाद वगळता मराठी नाटकांचे ‘हाऊसफुल्ल’ बुकिंग होत नाही. नाटकाचे ३०० ते ३५० रुपयांपासून सुरू होणारे तिकीटही सर्वसामान्य मराठी प्रेक्षकांना महाग वाटते. त्यामुळे पाचशे रुपये तिकीट झाले तर जो आहे तो प्रेक्षकवर्ग नाटकांकडे पाठ फिरविण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘जीएसटी’नंतर नाटय़व्यावसायिक आणि निर्मात्यांमध्ये एकूण संभ्रमाचे व गोंधळाचे वातावरण आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने काही ना काही शक्कल लढवीत आहेत.

वस्तू आणि सेवा कर ‘मनोरंजन’ क्षेत्राला लागू होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर या क्षेत्रातही खळबळ उडाली. मराठी नाटय़ निर्मात्यांनी या कराला विरोध केला. २५० रुपयांपर्यंतच्या तिकिटांना ‘जीएसटी’ लागू नाही. मात्र २५० रुपयांमध्ये नाटक चालविणे शक्य नाही, अशी भूमिका घेत नाटय़निर्माते-व्यावसायिकांनी ही मर्यादा ५०० रुपयांपर्यंत वाढविण्याची मागणी केली आहे. अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी ही मागणी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यापर्यंत पोहोचवू असे आश्वासन मराठी नाटय़निर्मात्यांना दिले आहे. ती मागणी पूर्ण होईल की नाही ते आत्ताच सांगता येणार नाही. पण समजा नाटय़निर्मात्यांची ही मागणी मान्य झाली तर ५०० रुपयांचे तिकीट काढून प्रेक्षक नाटकाकडे येईल का? की आहे त्या प्रेक्षकांमध्येही घट होईल?, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

नाटय़निर्माते शेखर ताम्हाणे म्हणाले, हल्ली बहुतांश नाटके दोन अंकी असतात. पहिल्या आणि दुसऱ्या अंकाला प्रत्येकी २५० रुपये असा दर लावून तिकिटांची विक्री करायची. आमचे नवे नाटक लवकरच रंगभूमीवर येणार असून त्या नाटकासाठी हा प्रयोग करण्याचा विचार आहे. ज्या प्रेक्षकांना संपूर्ण नाटक पाहायचे आहे ते प्रेक्षक दोन्ही अंकांची तिकिटे किंवा ज्यांना फक्त एकच अंक पाहायचा आहे ते प्रेक्षक त्यांना जो अंक पाहायचा आहे, त्या अंकाची तिकिटे घेतील. यासाठी नाटकाच्या तिकिटावर भाग १ व भाग २ असे लिहून तिकिटांची विक्री करण्याचा विचार असून या विषयातील तज्ज्ञ आणि कायदेशीर सल्ला घेऊनच हा नवा प्रयोग करणार आहोत. हिंदी किंवा गुजराथी नाटकांपेक्षा आपल्या मराठी नाटकांचे तिकिट दर कमीच आहेत. दोन अंकांना अशी वेगवेगळी तिकिटे करण्याच्या प्रयोगाला प्रेक्षकांकडून कसा आणि किती प्रतिसाद मिळेल, हा प्रयोग यशस्वी होईल की नाही, त्याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही. कारण शेवटी तो ‘प्रयोग’ आहे.

व्यावसायिक नाटय़ निर्माता संघाचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांना याविषयी विचारले असता त्यांनी दोन अंकांसाठी स्वतंत्र तिकिटे विकण्याचा प्रकारच मुळात अव्यहार्य असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘जीएसटी’ लागू झाल्यानंतर मुळातच बहुतांश नाटय़ निर्मात्यांनी नाटकाचा तिकीट दर २५० रुपये व त्याखाली असा केला आहे. त्यामुळे सध्या जो काही तोटा होत आहे तो निर्माते सहन करत आहेत. २५० रुपये असलेली मर्यादा ५०० रुपयांपर्यंत करावी ही आमची मागणी मान्य झाली तर त्यात सर्वाचेच हित आहे. त्याचा निर्णय येत्या २ ते ३ महिन्यांत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडी वाट पाहावी. ज्या कोणाला २५० रुपयांच्या वरती तिकीट दर ठेवायचे असतील त्यांनी ते खुशाल ठेवावेत. मात्र त्यासाठी ‘जीएसटी’चे जे काही नियम आणि कायदे आहेत त्याचे त्यांनी पालन करावे. नाटय़गृहातही पहिला आणि दुसरा अंक असे सत्र नसते. असे दोन-दोन तासांचे सत्र कोणतेही नाटय़गृह देत नाही ते सलग चार तासांचे दिले जाते. त्यामुळे मला तरी ते व्यवहार्य वाटत नाही, असे त्यांनी सांगितले.

‘३०० रुपयांपर्यंतच्या तिकिटावर ‘जीएसटी’ लावू नये. त्याच्यावर जो कोणी तिकीट दर लावेल त्यावर ‘जीएसटी’ लावायचा की नाही त्यावर सरकारने विचार करावा. ३०० रुपयांपर्यंत ‘जीएसटी’ लावला नाही तर सध्या जो काही बरा-वाईट नाटय़ व्यवसाय सुरू आहे तो किमान स्थिर राहील’, असे मत माजी ज्येष्ठ नाटय़ व्यवस्थापक आणि नाटय़कर्मी अशोक मुळ्ये यांनी व्यक्त केले. दोन अंकांसाठी स्वतंत्र तिकिटांची विक्री करण्याला काहीही अर्थ नाही. नाटकाला येणारे प्रेक्षकही त्याला तयार होतील का? हा प्रश्न आहे. त्यामुळे असे करणे म्हटले तर मोठ्ठा विनोद आणि म्हटले तर स्तुत्य, असे सांगत ३०० रुपयांपर्यंतच्या तिकिटावर जीएसटी नको यावर त्यांनी जोर दिला. एकंदरीत ‘जीएसटी’वरून हा गोंधळ आणि संभ्रम आणखीही काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. सध्या मराठी रंगभूमीवर काही नाटकांचा अपवाद वगळता अन्य नाटकांना ‘बुकिंग’ मिळत नाही. आणि जे चांगले नाटक आहे ते चालते असे चित्र आहे. त्यामुळे हा गोंधळ निस्तरेपर्यंत एकतर आहे त्या तिकीटदरांमध्ये नाटक चालवावी लागतील किंवा वाढीव दरांमध्ये तिकीट विकत घेऊन नाटक पाहणे प्रेक्षक आणि निर्माते दोघांच्याही अंगवळणी पडेल.

एक अंकाचे तिकीट..

‘जीएसटी’च्या जाचातून सुटका करून घेण्यासाठी काही तिसरा मार्ग निघतोय का याचाही आपापल्या परीने शोध घेणारे निर्माते आहेत. ज्यांच्यात नाटय़निर्माते शेखर ताम्हाणे यांचे नाव घ्यावे लागेल. शेखर ताम्हाणे यांनी नुकतीच ‘सामाजिक माध्यमा’वर एक पोस्ट टाकली. नाटकाला २५० रुपयांपर्यंतच्या तिकिटाला ‘जीएसटी’ लागणार नाही. त्यातून मी मार्ग काढला आहे. पहिल्या अंकाला २५० रुपये आणि दुसऱ्या अंकाला २५० रुपये अशी दोन वेगवेगळी तिकिटे विकायची. दुसऱ्या अंकाचे तिकीट पहिल्या अंकाच्या सुरुवातीला आगाऊ देण्यात येईल’, असे ताम्हाणे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. म्हणजे ज्यांना फक्त एकच अंक पहायचा आहे किंवा २५० रुपयांपर्यंतचेच तिकीट घ्यायचे आहे त्यांना पहिला किंवा दुसरा अंक पाहता येईल, अशी सोय उपलब्ध करण्याचा त्यांचा विचार आहे. प्रत्यक्षात हे व्यवहार्य आहे का हा प्रश्न आहे? २५० रुपये मोजून फक्त एक अंक बघण्यासाठी प्रेक्षक का तयार होईल?, असे प्रश्न या पर्यायासमोर उभे असल्याने त्यात तथ्य नाही हाच निष्कर्ष काढला जातो आहे.

शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता-रविवार वृत्तान्त/१६ जुलै २०१७)

शनिवार, २४ जून, २०१७

'वार'करी पवार


'वार'करी पवार

(शेखर जोशी)

राज्यात आणि केंद्रात नसलेली सत्ता, 'मराठा कार्ड'चे कमी झालेले महत्व, आधी पंतप्रधान व आता राष्ट्रपतीपद मिळवायची हुकलेली संधी, स्वतच्या राष्ट्रवादी पक्षाची (जी काही शिल्लक होती ती) घसरत आणि संपत चाललेली विश्वासार्हता, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत कमी संख्येत निवडून आलेले पक्षाचे उमेदवार, मराठा मोर्चा, शेतकरी संपातील संपलेली हवा, त्याचा पक्षाला न झालेला फायदा, आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पक्ष अस्तित्वात तरी राहील की नाही याची भेडसाविणारी चिंता या सगळ्यामुळे शरद पवार अस्वस्थ झाले आहेत. त्यातून शरद पवार असे 'वार' अधूनमधून करत असतात. अफजल खान, गो ब्राह्मण प्रतिपालक या विषयांवर त्यांनी नुकतेच केलेले विधान त्याचेच द्योतक आहे.

शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या नावाचा जप ते सतत करत असतात. सामाजिक समता व बंधुभावाचा आव आणून बहुजन व दलित समाजासाठी आपण काहीतरी करतोय असे ढोलही पवार आणि त्यांचे समर्थक नेहमी बडवतात. पण तो केवळ मुखवटा आहे. कारण पवार यांनी आजपर्यंत केवळ मराठा राजकारण व सत्ताकारणच केले आहे. राज्यात मुख्यमंत्रीपद, केंद्रात कृषीमंत्रीपद आणि केंद्रात व राज्यात सत्तेवर असताना यांना ना शेतकऱयांचे प्रश्न सोडविता आले ना त्यांच्या आत्महत्या थांबविता आल्या. आणि तरी हे म्हणे शेतकऱयांचे कैवारी.

इशरत जहाँ सारखी निष्पाप बिचारी मुलगी अतिरेकी झाली, मालेगाव स्फोटाप्रकरणी तीन वर्ष तुरूंगात खितपत पडणाऱ्यांना मुलांना हा देश आपला का वाटावा?,'या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी कोणी इतर कृत्य केलं तर त्याला दोषी का ठरवावं?, अल्पसंख्याक समाजाचा व्यक्ती ‘जुम्मा’च्या दिवशी मशिदीत कधी हल्ला करेल, हे शक्य नाही. मी अजूनपर्यंत हे पाहिले नाही, अशी वादग्रस्ते विधानेही पवार यांचीच.

निवडणुकीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशाचा उल्लेख करत भटा-ब्राह्मणांच्या हाती सत्ता देणार का, अशी विचारणा शरद पवार यांनी केली होती, संभाजीराजे छत्रपती यांची राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभेवर निवड करण्यात आल्यानंतर पवार यांनी, छत्रपतींनी पेशव्यांची नियुक्‍ती केली हा इतिहास सर्वज्ञात आहे. पेशवाईत फडणवीसांनी छत्रपतींची नियुक्‍ती कधीच केली नव्हती; मात्र संभाजीराजे छत्रपती यांच्या रुपाने प्रथमच पेशव्यांनी छत्रपतींची नियुक्‍ती केल्याची घटना घडली आहे, अशा शब्दांत टीका केली होती. ब्राह्मण द्वेष करत असताना शिवाजी महाराज यांना फितुर असलेल्या, स्वराज्याशी बेईमानी करणारया मराठा सरदारांबद्दल ते एक अवाक्षर काढत नाहीत. त्याबाबत मात्र अळी मिळी गुप चिळी!

समाजात जाणीवपूर्वक कलागती लावण्याच्या उद्देशातून ते नेहमीच वादग्रस्त विधाने आणि असे 'वार' करत असतात.

हे 'वार'करी

कसले राष्ट्रवादी

हे तर राष्ट्रघातकी!

-शेखर जोशी