बुधवार, १९ एप्रिल, २०२३

पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे 'पुस्तक रस्ता' उपक्रम

पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे २३ एप्रिल रोजी 

डोंबिवलीत' पुस्तक रस्ता' उपक्रमाचे आयोजन 

- महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पहिला, आगळा उपक्रम 

पुस्तकाचा प्रचार आणि प्रसार याबरोबरच वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी यासाठी पै फ्रेंड्स लायब्ररी विविध उपक्रम राबवित असते. याचाच एक भाग म्हणून पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे जागतिक पुस्तक दिनानिमित्त येत्या २३ एप्रिल रोजी पहाटे ५ ते सकाळी १० या वेळेत 'पुस्तक रस्ता' उपक्रमातचे आयोजन करण्यात आले आहे.


हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिला उपक्रम असल्याचे पै फ्रेंड्स लायब्ररीचे संस्थापक संचालक पुंडलिक पै यांनी सांगितले. डोंबिवली पूर्व येथे मॉडर्न कॅफे ते अप्पा दातार चौकापर्यंतर स्त्यावर गालिचा अंथरून विविध विषयांवरील सुमारे एक लाख पुस्तके मांडण्यात येणार आहेत. हे काम आदल्या दिवशी म्हणजेच २२ एप्रिल रोजी रात्री केले जाणार असल्याचे पै म्हणाले.

मांडण्यात येणारी पुस्तके बहुभाषिक असून यात कथा कादंबरी, ऐतिहासिक, अनुवादीत, विज्ञानविषयक पुस्तकांसह लहान मुलांच्या इंग्रजी व मराठी गोष्टींच्या पुस्तकांचा समावेश आहे. डोंबिवलीतील विविध संघटनांचे २०० हून अधिक स्वयंसेवक या उपक्रमात सहभागी होणार आहेत. येथे भेट देणा-या प्रत्येक वाचकाला पुस्तक रस्त्यावरील कोणतेही एक पुस्तक मोफत दिले जाणार आहे.

शेखर जोशी 

सोमवार, १० एप्रिल, २०२३

आणि ७२ वर्षांच्या प्रमोद नाईक यांनी कोलू फिरविण्याचा अनुभव घेतला

 


स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अंदमानात कोलूला जुंपून तेल काढण्याची अमानुष शिक्षा देण्यात आली होती. यावेळी त्यांना काय यातना भोगाव्या लागल्या असतील, त्याचा अनुभव आज मला आला, असे टाटा पॉवर कंपनीतील ७२ वर्षीय सेवानिवृत्त वरिष्ठ अभियंता प्रमोद नाईक यांनी रविवारी येथे सांगितले.

दादरच्या शिवाजी उद्यानासमोरील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या दर्शनी भागात अंदमानच्या तुरुंगाची प्रतिकृती आणि 

कोलूची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना तेल काढण्यासाठी ब्रिटिशांनी अंदमानात कोलूला जुंपले होते. उन्हात,पावसात ही शिक्षा दिली. हा अनुभव घेण्यासाठी नाईक यांनी सावरकर स्मारकाला कोलू फिरविण्यास अनुमती द्यावी अशी विनंती केली होती. 





हा कोलू थेट ऊन येत नाही तिथे आहे. मात्र तरीही सध्याचा उन्हाळा आणि कोलूची कृती यातून माणसाच्या अंगातून घामाच्या धारा तर निघतातच पण त्याशिवाय ताकद लावायला लागते, गोल फिरवत चक्करा माराव्या लागतात. मी अधूनमधून थांबून हा प्रयत्न केला मात्र नंतर दमल्याने तेथेच पथारी टाकून पडलो, असेही नाईक म्हणाले.

त्यानंतर सावरकर स्मारकाच्या कर्मचाऱ्यांनी मला आतमध्ये नेऊन विश्रांती घेण्याची व्यवस्था केली. विश्रांतीनंतर पुन्हा कोलू चालविण्यासाठी आलो पण पाय जडावले होते यामुळे काम थांबविले. यातून तेल निघण्यासाठी पांढरे नव्हे तर लाल शेंगदाणे वापरावे लागतात, असे तेथे आलेल्या एका तेल घाण्याच्या व्यावसायिकाने सांगितल्याने मी पांढरे शेंगदाणे टाकून जो प्रयत्न केला त्यातून आणखी वेळ जाणार हे नक्की झाले. त्यानंतर कोलू ओढता आला नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानात किती भीषण आणि भयावह त्रास सहन केला असेल, त्याची कल्पना करणेही कठीण असल्याचे नाईक यांनी सांगितले.

नाईक यांनी पहिल्यांदा बेड्या घालून कोलू ओढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या पँटवरूनही त्या बेड्यांमुळे कासले गेल्याने त्यांनी बेड्या काढून कोलू ओढला. त्यासाठी त्यांनी ५ किलो शेंगदाणे घेतले होते. त्यापैकी अडीच किलो शेंगदाणे कोलूमध्ये टाकले. कोलूला असलेला दांडा उचलणेही कठीण असून त्यासाठी दोन माणसे लागतात, हे त्यांना लक्षात आले. तर कोलू द्वारे सुमारे दोन ते अडीच तास त्यांनी थांबत थांबत कोलू चालवून शेंगदाणे बारीक केले.


(छायाचित्रे आणि चित्रफित स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र य. बिवलकर यांच्या सौजन्याने)

मंगळवार, २८ मार्च, २०२३

'नाना'ची टांग



क्रांतिकारकांचे मुकुटमणी आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी वंदनीय आहेत. युती आणि आघाडीच्या दळभद्री आणि गलिच्छ राजकारणात स्वातंत्र्यवीर सावरकर किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही, असे म्हणणेही त्या क्रांतीसूर्याचा अपमान आहे. 

काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या दोन्ही पक्षांची सावरकर यांच्याबाबतची भूमिका भिन्न आहे. ‘सावरकर’ आमच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाहीत. लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. पटोले यांचे हे वक्तव्य म्हणजे त्यांच्या सडक्या मेंदूचे लक्षण आहे. 

राहुल गांधी आणि काँग्रेसधील सडक्या मेंदूचे भोंदू आणि ढोंगी धर्मनिरपेक्षवादी नेते वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करत आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची मुस्लिम लांगुलचालनाची, हिंदुत्व द्वेषाची भूमिका नवी नाही आणि तरीही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आपला पक्ष दोन्ही काँग्रेसच्या दावणीला बांधला. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असतानाही राहल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी किंवा त्यांच्या नेत्यांनी, पक्षाने आजवर कधीही राहुल गांधी यांच्या विरोधात थेट आणि ठोस कृती केली नाही. 

परवा मालेगावच्या सभेतही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राहुल गांधी यांचा तोंडदेखला निषेध केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना तुम्ही खरोखरच दैवत मानत असता तर राहुल गांधी यांनी आजवर सावरकर यांचा वेळोवेळी जो अपमान केला त्यासाठी रस्त्यावर उतरायला हवे होते. मणिशंकर अय्यर विरोधात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी जी भूमिका घेतली होती ती भूमिका तुम्ही घ्यायला हवी होती. पण? ते होणार नाही.



आताही नाना पटोले यांनी ‘सावरकर’ आमच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाहीत, असे वक्तव्य केल्यानंतर तातडीने पटोले यांचा निषेध करणारे वक्तव्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून यायला हवे होते. आणि महाविकास सरकार स्थापन करण्यापूर्वी कॉंग्रेसने सावरकर’ किमान समान कार्यक्रमाचा भाग होऊ शकत नाहीत, अशी जर अट घातली होती तर त्याच वेळी सावरकरप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटना म्हणून ती अट धुडकावून लावायला हवी होती. पण मुख्यमंत्रीपदाच्या खूर्चीवर बसायची अतीघाई झाल्यामुळे तुम्ही याकडे दुर्लक्ष केलेत. आणि खरे तर त्याचवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुत्ववाला तुम्ही तिलांजली दिली हे सत्य आहे. 

शेखर जोशी

२८ मार्च २०२३

गुरुवार, २३ मार्च, २०२३

ठाकरे, फडणवीस यांची 'दिल दोस्ती' आणि बासनात गुंडाळलेली प्रकरणे

 ठाकरे, फडणवीस यांची 'दिल दोस्ती' 

आणि बासनात गुंडाळलेली प्रकरणे

 


'निनावी' पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना थेट वरुन अभय मिळाले? आणि म्हणून त्यांनी आपले कट्टर राजकीय हाडवैरी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी हसतखेळत गप्पा मारल्या? 

आधी अडीच वर्षे याच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर   किती गरळ ओकली होती? 

आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहखाते आहे. सुशांतसिंह, दिशा सालियन संशयास्पद मृत्यू प्रकरण, पालघर साधू हत्याकांड,  पत्राचाळ प्रकरण, करमुसे मारहाण, रश्मी उद्धव ठाकरे यांचे कथित बंगले, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि कुटुंबीय यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी, 'मातोश्री'च्या गळ्याशी आलेला 'पाटणकर' काढा‌ ही सगळी प्रकरणे देवेंद्र फडणवीस यांनी बासनात गुंडाळून ठेवली का? की गुंडाळून ठेवा म्हणून वरुन आदेश आले? 

सर्वसामान्य नागरिकांच्या मनात या घडलेल्या सर्व घटनांबाबत संशयाचे वातावरण आहे. त्या त्या वेळी भाजपने, भाजपच्या सर्व नेत्यांनी आणि दस्तुरखुद्द फडणवीस यांनीही त्यावेळी अगदी घसा खरवडून आवाज उठवला होता. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सत्ता स्थापन करून झाले की बरेच महिने. फडणवीस यांच्याकडेच गृहखाते आहे. काढा की सगळे पहिल्यापासून खणून. यावर, याची चौकशी केंद्रीय तपास संस्थांकडून सुरू आहे, असे तकलादू कारण पुढे केले जाईल. पण महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून जे तुमच्या हातात आणि अधिकारात आहे, ते तरी करा.

महाराष्ट्रात राजकीय शत्रुत्व नाही, आपली राजकीय संस्कृती, परंपरा वेगळी आहे, ही वाक्ये टाळ्या घेण्यासाठी ठिक आहेत. सत्ताधारी आणि विरोधक मग ते कोणत्याही राजकीय पक्षांचे असोत आतून सर्व एकमेकांशी मिळालेलेच असतात, एका मर्यादेपर्यंत एकमेकांच्या भानगडी, घोटाळे राजकीय सोयीसाठी बाहेर काढले जातात आणि नंतर बासनात गुंडाळूनही ठेवले जातात. 

विद्यमान सत्ताधारी विरोधक आणि विद्यमान विरोधक सत्ताधारी झाले की लुटुपुटूची लढाई सुरू होते. कोणी किती ताणायचे हे आधीच ठरलेले असते. त्या त्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, समर्थक मात्र एकमेकांचे गळे धरतात आणि सर्वपक्षीय राजकीय नेते पडद्याआड गळ्यात गळे घालून याची मजा लुटतात, हेच कटू आणि संतापजनक सत्य आहे. 

आम्ही योगायोगाने समोरासमोर आलो आणि म्हणून काही वेळ हसत खेळत गप्पा मारल्या, त्यातून कोणताही राजकीय अर्थ काढू नये किंवा भाकित करू नये अशी ठोकळेबाज मखलाशी उद्या ठाकरे आणि फडणवीस करतीलही, पण त्याला काहीही अर्थ नाही. कोणी शेंबडे पोरही त्यावर विश्वास ठेवणार नाही.‌

 शेखर जोशी

२३ मार्च २०२३

परंपरा आणि सामाजिकतेचे भान

महाराष्ट्र टाइम्स-ठाणे प्लस/ २२ मार्च २०२३

 

शुक्रवार, १७ मार्च, २०२३

नवीन शालिवाहन शकवर्ष १३ महिन्यांचे

श्रावण अधिकमास आल्याने नवीन शालिवाहन शकवर्ष १३ महिन्यांचे- ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ. सोमण

 येत्या २२ मार्च रोजी श्रीशालिवाहन शके१९४५ शोभननाम नाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे. या नवीन संवत्सरात श्रावण महिना अधिक असल्याने हे वर्ष तेरा महिन्यांचे असणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. 

 

गुढीपाडव्याच्याच दिवशी भारतीय राष्ट्रीय सौर वर्षाचाही प्रारंभ होत असून यापूर्वी २००४ या वर्षी असा योग आला होता. २०४२ मध्येही गुढीपाडव्याच्याच दिवशी राष्ट्रीय सौर वर्षाचाही प्रारंभ होणार असल्याचेही सोमण यांनी सांगितले. नूतन शालिवाहन शक १९४५ हे संवत्सर २२ मार्च २०२३ पासून ८ एप्रिल २०२४ पर्यंत असणार आहे. या नूतन संवत्सरामध्ये १८ जुलै २०२३ ते १६ ॲागस्ट २०२३ श्रावण अधिकमास आला असल्याचे सांगून सोमण म्हणाले, त्यामुळे नागपंचमी, श्रीकृष्ण जयंती, गणेशचतुर्थी , नवरात्र, विजया दशमी, दीपावली इत्यादी सण १९ दिवस उशीरा येणार आहेत.


ठराविक सण हे ठराविक ऋतूंमध्ये यावेत यासाठी भारतीय पंचांगे ही चांद्र-सौर पद्धतीवर आधारलेली आहेत. यासाठी एक नियम तयार करण्यात आला आहे. मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला चैत्र म्हणतात. मेष राशीत सूर्य असतांना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला वैशाख म्हणतात. कधी कधी एका राशीत सूर्य असताना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो , त्यावेळी पहिला तो अधिकमास आणि दुसरा तो निजमास समजला जातो. या नूतन वर्षी कर्क राशीत सूर्य असतांना १८ जुलै रोजी आणि १७ ॲागस्ट रोजी अशा दोन चांद्रमासांचा प्रारंभ होत आहे. त्यामुळे अधिक श्रावण आणि निजश्रावण असे दोन श्रावणमास आले आहेत, अशी माहिती सोमण यांनी दिली.  


या नूतन शालिवाहन शक वर्षामध्ये ३५० वा शिवराज्याभिषेकोत्सव दिन येत असून २ जून २०२३ रोजी शिवराज शक ३५० चा प्रारंभ होत आहे. शालिवाहन शके १९४५ या नूतन वर्षामध्ये एकही अंगारकी संकष्ट चतुर्थी येत नाही. सुवर्ण खरेदीदारांसाठी सहा गुरुपुष्यामृत योग येणार आहेत. या नूतन संवत्सरामध्ये भरपूर विवाहमुहूर्त देण्यात आले असल्याचे सोमण यांनी सांगितले. 

शेखर जोशी 
 १७ मार्च २०२३

शुक्रवार, १० मार्च, २०२३

मुंबईत राष्ट्रीय वसंत नाट्योत्सव

 


मुंबई विद्यापीठात उद्यापासून राष्ट्रीय वसंत नाट्योत्सव

- नाट्य रसिकांना विनामूल्य प्रवेश, 

मुंबई विद्यापीठाच्या ‘ॲकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्’ विभागातर्फे ११ ते १८ मार्च या कालावधीत वसंत राष्ट्रीय नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  यंदा नाट्य महोत्सवाचे १३ वे वर्ष आहे. पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपुर आणि दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांचे विशेष सहकार्य या नाट्य महोत्सवासाठी लाभले आहे.


पुरुषोत्तम बेर्डे आणि मनोज जोशी 

विद्यापीठाच्या कलिना संकुलातील  ‘मराठी भाषा भवन’ च्या नाट्यगृहात ११ मार्च २०२३ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता ज्येष्ठ नाटककार-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी हे प्रमुख पाहुणे तर अध्यक्ष म्हणून मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू मा. प्रा. डी. टी. शिर्के,  प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.

११ मार्च रोजी महोत्सवाच्या उदघाटनानंतर ‘स पा न, नाशिक’ या संस्थेच्या दत्ता पाटील लिखित व सचिन शिंदे दिग्दर्शित ‘तो राजहंस एक’ हे नाटक सादर होणार आहे. 

नाट्यमहोत्सवामध्ये भारतातील विविध नामांकित संस्था सहभागी होणार असून विशेषतः झारखंड, नैनिताल, गुजरात, गोवा या राज्यांसह मुंबई, नाशिक, अहमदनगर येथील नाट्यसंस्थांचे प्रयोग सादर होणार आहेत. 

कुमार सोहनी आणि अभिराम भडकमकर 

१८ मार्च रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता नाट्य महोत्सवाचा समारोप होणार असून ज्येष्ठ दिग्दर्शक कुमार सोहोनी, नाटककार अभिराम भडकमकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्या नंतर संध्याकाळी ७.३० वाजता  ‘आधे अधुरे’ हे नाटक सादर होणार आहे.

योगेश सोमण

मुंबई विद्यापीठाच्या ‘ॲकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्’चे संचालक योगेश सोमण,  महोत्सवाचे प्रमुख प्रा. डॉ. मंगेश बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा नाट्योत्सवाची आखणी करण्यात आली आहे.  नाट्योत्सवास रसिक प्रेक्षकांना विनामूल्य प्रवेश असून जास्तीत रसिकांनी या नाट्योत्सवास उपस्थित राहावे, असे आवाहन योगेश सोमण यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क ९९२०४२०३८८/ ९८९२१४३१६३ 


नाट्य महोत्सवात सादर होणारी अन्य नाटके- 

रविवार १२ मार्च, दुपारी ४ वाजता  ‘३ मेन’ 

संध्याकाळी ७.३० वाजता ‘सेम सेम बट डीफरंट’ 

सोमवार १३ मार्च, दुपारी चार वाजता‘ ‘राशोमान’ 

संध्याकाळी ७.३० वाजता ‘दास्तान-ए-रामजी’ 


स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरील सावरबेट 

मंगळवार १४ मार्च, दुपारी ४ वाजता  ‘सावरबेट’   

बुधवार,१५ मार्च,  दुपारी ४ वाजता ‘स्त्री, जातं, ओवी आणि कविता’

संध्याकाळी ७.३० वाजता- ‘पगला घोडा’

गुरुवार १६ मार्च, दुपारी चार वाजता ‘खटारा’

संध्याकाळी ७.३० वाजता, ‘लहरों के राजहंस’ 

शुक्रवार १७ मार्च, दुपारी ४ वाजता  ‘आमचं तुमचं नाटक’ 

-------