बुधवार, २९ ऑक्टोबर, २०२५

सहा डझनांच्या हापूस आंब्याच्या पेटीला तब्बल २५ हजार रुपये भाव

नवी मुंबई फळ बाजारात हापूस आंबा आला - सहा डझनांच्या पेटीला तब्बल २५ हजार रुपयांचा भाव वाशीच्या नवीमुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात कोकणाततील देवगडवरून आलेल्या हापूस आंब्याच्या ६ डझनांच्या पेटीला तब्बल २५ हजार रुपयांचा भाव मिळाला आहे.देवगड तालुक्यातील पडवणे गावचे बागायतदार प्रकाश धोंडू शिर्सेकर यांनी ऑक्टोबर महिन्यात दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर हापूस आंब्याची ६ डझनाची पेटी पाठवली होती.‌ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नानाभाऊ जेजूरकर अँड कंपनी या व्यापाऱ्यांकडे ही पेटी दाखल झाली. पेटीची विधिवत पूजा करण्यात येऊन आंबे पूर्णपणे पिकल्यानंतरच विक्रीसाठी ठेवण्यात येतील अशी माहिती व्यापाऱ्यांकडून देण्यात आली होती.‌ त्यानंतर काही दिवसांनी बोली लावण्यात आली असता, या मुहूर्ताच्या आंब्याच्या पेटीला तब्बल २५ हजारांचा विक्रमी दर मिळाल्याचे व्यापारी हर्षल जेजुरकर यांनी सांगितले. मुंबईतील एका ग्राहकाने ही पेटी खरेदी केली असून, त्याचे नाव व्यापाऱ्यांनी गोपनीय ठेवले आहे. आतापर्यंत हापूस आंब्याच्या पेटीला २० ते २२ हजारांपर्यंत विक्रमी दर मिळाला होता. परंतु, यंदा लक्ष्मी पूजनाच्या शुभ मुहूर्तावर आलेल्या हापूसच्या पेटीला २५ हजारांचा दर मिळाला आहे. शिर्सेकर यांच्या बागेत जुलै महिन्यातच काही कलमांना आगाऊ मोहोर आला होता. त्या कलमांवर त्यांनी विशेष प्लास्टिक आवरण व फवारणी करून फळधारणा टिकवली. त्यातून तयार झालेल्या आंब्यांपैकी पहिली पेटी दिवाळीपूर्वीच बाजारात पोहोचली. (छायाचित्र गुगल फोटोवरून साभार)

जल आणि वन संवर्धनाच्या जनजागृतीसाठी ७३ वर्षीय विद्याधर भुस्कुटे यांची पदयात्रा

जल आणि वन संवर्धनाच्या जनजागृतीसाठी ७३ वर्षीय विद्याधर भुस्कुटे यांची पदयात्रा - महाराष्ट्रात ३ हजार १२५ किलोमीटरचा प्रवास डोंबिवली, दि. २९ ऑक्टोबर जल आणि वन संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी डोंबिवलीतील ७३ वर्षीय सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक विद्याधर भुस्कुटे येत्या ३१ ऑक्टोबरपासून पदयात्रा सुरू करणार आहेत.‌ महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांमधून ३ हजार १२५ किलोमीटरची ही पदयात्रा असणार आहे.‌ डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुल येथील कॅप्टन विनयकुमार सचान स्मारक येथून सकाळी साडेसात वाजता पदयात्रेला भुस्कुटे सुरुवात करणार आहेत.‌ आरोहण या संस्थेने या पदभ्रमंतीचे नियोजन केले आहे. जल आणि वनसंवर्धनासह देशात, राज्यात शांती, मानवता, भ्रृणहत्या प्रतिबंध, मूल्याधिष्ठीत शिक्षण व्यवस्था यावर पदयात्रेत ते जनजागृती करणार आहेत. २४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत भुस्कुटे डोंबिवलीत परतणार आहेत. यावेळी भुस्कुटे यांची चौथी पदयात्रा असून भुस्कुटे यांनी पहिली पदयात्रा काश्मीर ते कन्याकुमारी केली होती.‌ चार हजार किलोमीटरच्या या पदयात्रेची लिम्का बुक, अशिया आणि इंडिया बुक्स ऑफ रेकाॅर्डमध्ये नोंद झाली आहे. दुसरी पदयात्रा अरूणाचल प्रदेशातील किबिथू ते गुजरातमधील पोरबंदर अशी चार हजार किलोमीटरची होती. या पदयात्रेचीही लिम्का बुकमध्ये नोंद झाली. तिसरी पदयात्रा गुजरातमधील साबरमती आश्रम, अहमदाबाद, शांतिनिकेतन, कोलकोता, भारताच्या किनारपट्टी मार्गाने तामीळनाडू ते कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक अशी केली होती.

सोमवार, २७ ऑक्टोबर, २०२५

दिवंगत मोरेश्वर कुंटे यांनी काढलेल्या विविध मंदिरांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन

दिवंगत मोरेश्वर कुंटे यांनी काढलेल्या विविध मंदिरांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन - विश्व हिंदू परिषद,मंदिर कोश यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन डोंबिवली, दि. २७ ऑक्टोबर विश्व हिंदू परिषद आणि मंदिर कोश यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीत महाराष्ट्रातील विविध मंदिरांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवंगत मोरेश्वर कुंटे यांनी दुचाकी वाहनावरून महाराष्ट्रातील सुमारे १८ हजार मंदिरांना भेट दिली होती. यातील काही वेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांची छायाचित्रे प्रदर्शनात पाहता येणार आहेत. गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली पूर्व येथे येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत सर्वांसाठी खुले आहे. प्रदर्शनात तरंगणारे तसेच विविध ध्वनी निर्माण करणारे, गाणारे,पाषाणही मांडण्यात आले आहेत.

'आवाज'चा अमृत महोत्सव!

'आवाज'चा अमृत महोत्सव! शेखर जोशी 'विनोदी वार्षिक' असे बिरूद मिरविणाऱ्या 'आवाज' या वार्षिकाचा यंदाचा दिवाळी अंक 'अमृत महोत्सवी' अंक आहे. 'आवाज' चे संस्थापक- संपादक मधुकर पाटकर यांनी १९५१ च्या दिवाळीमध्ये आवाज वार्षिक प्रकाशनला सुरुवात केली. यंदा आवाज ७५ वर्षांचा झाला. 'हवालदिल मानवाला प्रफुल्लित करणाऱ्या फटाकड्यांच्या 'आवाजां'ची तरी आजच्या काळात खात्री कोण देईल? इतके मात्र खरे 'आवाज'चा हा दिवाळी अंक त्यांना पोटभर हासवील, रिझवील नि त्यांची करमणूकही करील' असे 'आवाज' वार्षिकाच्या पहिल्या दिवाळी अंकाच्या मनोगतात मधुकर पाटकर यांनी म्हटले होते. मधुकर पाटकर यांच्या पश्चात पाटकर यांचे सुपुत्र आणि 'आवाज'चे संपादक -प्रकाशक भारतभूषण पाटकर यांनी हा वारसा 'आवाज'च्या अमृत महोत्सवी वर्षीही पुढे चालविला आहे‌. त्या काळात दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठावर महिलांची चित्रे/ छायाचित्रे असणे हा अलिखित नियम होता. 'आवाज' त्याला अपवाद ठरला आणि 'आवाज' ने मुखपृष्ठावरती विनोदी चित्रे/हास्यचित्रेच प्रकाशित केली. १९६० च्या दिवाळी अंकापासून ' आवाज'च्या मुखपृष्ठाला 'खिडकी चित्रां'ची जोड मिळाली. खिडकी चित्र हे आवाजचे खास वैशिष्ठ्य आहे. पुढे इतर काही दिवाळी अंकात या खिडकी चित्रांचे अनुकरण केले गेले. 'आवाज'च्या सुरुवातीच्या काही अंकांचे स्वरूप निखळ विनोदी नव्हते. मात्र १९५३ पासून मुखपृष्ठापासून ते आतील मजकूरापर्यंत 'आवाज' मध्ये अधिकाधिक विनोदी साहित्य, व्यंगचित्रे, हास्यचित्रे, कथा, कादंबरी देण्यास सुरुवात झाली.‌ आणि 'आवाज' संपूर्ण विनोदी वार्षिक झाले. वाचनालयात वाचक 'आवाज' साठी नंबर लावू लागले. १९८९ मध्ये 'आवाज'च्या सुमारे पाऊण लाख अंकांची विक्री झाली आणि दिवाळी अंक विक्रीत 'आवाज'ने एक नवा इतिहास निर्माण केला. 'आवाज' दिवाळी अंकात सुरुवातीपासून ते आजपर्यंत प्रथितयश तसेच प्रयोगशील नवोदित लेखक आणि चित्रकारांना स्थान दिले. महिला लेखिकांचेही विनोदी साहित्य 'आवाज' विनोदी वार्षिकात सातत्याने प्रकाशित होत आहे. 'आवाज' वार्षिकाचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे 'आवाज'मध्ये प्रसिद्ध झालेल्या कथांवरून पुढे काही मराठी, हिंदी चित्रपट आणि नाटके सादर झाली. गेल्या ७५ वर्षात 'आवाज'ला उत्कृष्ट निर्मितीसह विविध गटांत विभागात शासन आणि सार्वजनिक संस्थांकडून अनेक पुरस्कार, 'आवाज' मधील विविध साहित्याला आणि चित्र साहित्यालाही स्वतंत्र पुरस्कार मिळाले आहेत. आवाजाच्या पुढील वाटचालीसाठी आणि शतक महोत्सवी दिवाळी अंकासाठी शुभेच्छा. शेखर जोशी

शनिवार, ११ ऑक्टोबर, २०२५

राज्यात येत्या बुधवारी 'वाचन प्रेरणा दिन'

राज्यात येत्या बुधवारी 'वाचन प्रेरणा दिन'साजरा होणार मुंबई, दि. ११ ऑक्टोबर वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्यात येत्या बुधवारी ( १५ ऑक्टोबर) वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येणार आहे. माजी राष्ट्रपती दिवंगत डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्यानिमित्ताने राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद मराठवाडा साहित्य परिषद विदर्भ साहित्य संघ कोकण मराठी साहित्य परिषद दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा आणि मुंबई मराठी साहित्य संघ या संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. राज्य शासनाचे मंत्रालयातील सर्व विभाग तसेच त्यांच्या अधिपत्याखातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये, शासकीय संस्था, मंडळे सार्वजनिक उपक्रम, सर्व आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम साजरा होणार असून त्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रंथालय, महाविद्यालये, तंत्र महाविद्यालये, पदविका संस्था या ठिकाणीही वाचन प्रेरणा दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

मुंबईतून मान्सून माघारी,ऑक्टोबर हीट जाणवायला सुरुवात

मुंबईतून मान्सून माघारी,ऑक्टोबर हीट जाणवायला सुरुवात मुंबई, दि. ११ ऑक्टोबर संपूर्ण राज्यभरातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला असून मुंबईतून शुक्रवारी मान्सूनने माघार घेतली. यंदाच्या वर्षी मे महिन्यापासून महाराष्ट्रात पाऊस सुरू झाला होता. मान्सूनच्या माघारीनंतर आता मुंबईत 'ऑक्टोबर हीट' जाणवायला सुरुवात झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून मान्सूनचा परतीचा प्रवास खोळंबला होता. येत्या तीन ते चार दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघार घेईल असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी मुंबई सह देशातून 15 ऑक्टोबर रोजी मान्सूनचा माघारीचा प्रवास संपल्याचे जाहीर करण्यात आले होते. दरम्यान मुंबईच्या कमाल तापमानात रविवारपासून वाढ होण्याची शक्यता आहे पुढच्या आठवड्यात सांताक्रुज येथे कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०२५

'डोंबिवली टॅलेंट हंट' स्पर्धेत ओंकार इंटरनॅशनल, पवार पब्लिक स्कूलची बाजी

लायन्स क्लब डोंबिवलीच्या'डोंबिवली टॅलेंट हंट'स्पर्धेत ओंकार इंटरनॅशनल, पवार पब्लिक स्कूलची बाजी डोंबिवली, दि. ७ ऑक्टोबर लायन्स क्लब डोंबिवली आयोजित 'डोंबिवली टॅलेंट हंट' स्पर्धेच्या अंतिम फेरीत ओंकार इंटरनॅशनल, पवार पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. इयत्ता ५ वी ते ७वी आणि ८ वी ते १०वी अशा दोन गटात झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. स्पर्धेचे यंदा १३ वे वर्ष होते. शिक्षणतज्ज्ञ दिवंगत सुरेंद्र बाजपेई सर यांच्या स्मरणार्थ घेण्यात येणा-या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत ४१ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. प्राथमिक फेरीतून दुसऱ्या फेरीसाठी एक हजार तर अंतिम फेरीसाठी ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. वक्तृव, वैयक्तिक मुलाखत, बुद्धिकौशल्य, समयसूचकता, सामान्य ज्ञान, निर्णय घेण्याची क्षमता, संयम, इत्यादी निकषांचा आधारावर दोन्ही गटातील पहिल्या पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ दंतचिकित्सक डॉ. नितीन जोशी, प्रख्यात मानसोपचारतज्ञ डॉ. अद्वैत पाध्ये, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. विंदा भुस्कुटे, सनदी लेखापाल मंथन मेहता यांनी काम पाहिले. विजेत्यांना लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन ट्रेवर मार्टीस यांच्या हस्ते पारितोषिक सन्मानपदक, सन्मानपत्र, पुस्तक आणि शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले. दोन्ही गटातील प्रथम आलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व सायकल, द्वितीय ते पाचवा क्रमांक आलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि स्मार्ट वॉच देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक लायन्स क्लब ऑफ डोंबिवलीच्या विद्यमान अध्यक्षा लायन सपना सिंग यांनी केले, तर सचिव लायन रुपाली डोके यांनी उपस्थितांचे आभार मानले. डोंबिवली टॅलेंट हंट २०२५ चे प्रकल्प प्रमुख लायन नित्यानंद पोवार यांनी यंदाच्या स्पर्धेचा आढावा घेतला तर लायन अमोल पोतदार यांनी अंतिम फेरीतील सर्व स्पर्धकांसाठी पुढील महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या 'युथ लीडरशिप अवेयरन्स कॅम्प' ची माहिती दिली. कौस्तूभ कुलकर्णी, लायन अनघा चक्रदेव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. स्पर्धेतील पारितोषिक विजेते गट इयत्ता ५ वी ते ७ वी प्रथम क्रमांक : कु. मयूख नायर - पवार पब्लिक स्कूल, द्वितीय क्रमांक : आयुष दुघाडे - पवार पब्लिक स्कूल, तृतीय क्रमांक : अर्णव वैद्य ओंकार इंटरनॅशनल स्कूल, चौथा क्रमांक : दीक्षा प्रभुखोत - चंद्रकांत पाटकर विद्यालय (सेमी), पाचवा क्रमांक : गौरी तेवारी - रॉयल इंटरनॅशनल स्कूल. गट इयत्ता ८ वी ते १० वी प्रथम क्रमांक : राजनील चौधरी - ओंकार इंटरनॅशनल स्कूल, द्वितीय क्रमांक : ओजस करंदीकर - ओंकार इंटरनॅशनल स्कूल, तृतीय क्रमांक : यथार्थ शिंदे - गार्डियन हायस्कूल, चौथा क्रमांक : आभा लेले - सिस्टर निवेदिता हायस्कूल, पाचवा क्रमांक : आर्यन सेठ - पवार पब्लिक स्कूल