सोमवार, २८ एप्रिल, २०२५

नतद्रष्ट 'नट'रंगवाला

नतद्रष्ट 'नट'रंगवाला... काश्मीर पंडितांना जीवे मारले, काश्मीरमधून हुसकावून लावले तेव्हा नतद्रष्ट 'नट'रंगवाल्याला तिथे जावेसे वाटले नाही. बैसरन- पहलगाम येथील काही स्थानिकांचीही या निर्घृण व क्रूर नरसंहारासाठी दहशतवाद्यांना मदत झाली असे समोर आले आहे. अशा परिस्थितीत दहशतवाद्यांना मदत करणा-या स्थानिकांचे आर्थिक कंबरडे मोडण्यासाठी पर्यटकांनी काही काळ काश्मीरमध्ये पर्यटनासाठी जाऊ नये, असा एक मतप्रवाह पुढे येत आहे. तो चुकीचा नाही. समाजातील तथाकथित सेलिब्रिटीनींही या चळवळीत सहभागी झाले पाहिजे. मात्र अपवाद वगळता उलटेच चित्र पाहायला मिळते आहे. स्थानिक व्यावसायिकांचा कळवळा काही जणांना आला असून हे सेलिब्रिटी तमाम भारतीयांना खिजवून हे शूरवीर मुद्दामच काश्मीरला जात आहेत. खरे तर तमाम भारतीयांनी या नतद्रष्टांवर आणि त्यांच्या कलाकृतींवर बहिष्कार टाकून व्यक्त त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. सुरुवात नतद्रष्ट 'नट'रंगवाल्यापासून... शेखर जोशी २८ एप्रिल २०२५

शुक्रवार, २५ एप्रिल, २०२५

सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले. अशी वक्तव्ये पुन्हा केली तर सर्वोच्च न्यायालयाकडून त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असेही न्यायालयाने गांधींना सुनावले. न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायाधीश मनमोहन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. महाराष्ट्रातील अकोला येथील एका सभेमध्ये राहुल गांधींनी सावरकारांचा जाणीवपूर्वक अपमान केला, असा आरोप करत वकील नृपेंद्र पांडे यांनी त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातील सत्र न्यायालयात खटला दाखल केला आहे. न्यायालयाने राहुल यांना समन्स बजावले होते. त्याविरोधात त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळली सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी ‘माफी वीर’ अशी टिप्पणी केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. स्वातंत्र्यसैनिकांची चेष्टा करू नका, असे सुनावले. महात्मा गांधी यांनीही ब्रिटिशांशी संवाद साधताना स्वतःसाठी 'तुमचा विश्वासू सेवक' या शब्दांचा वापर केला होता, हे राहुल गांधी यांना माहीत आहे का? असा प्रश्नही सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने राहुल गांधींचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांना विचारला.

मंगळवार, २२ एप्रिल, २०२५

हिंदी अनिवार्य न करता ऐच्छिक ठेवणार

पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य न करता ऐच्छिक ठेवणार - शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे मुंबई, दि. २२ एप्रिल नवीन शैक्षणिक धोरण राबविताना सुकाणू समितीने घेतलेल्या निर्णयानुसार पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा विषय अनिवार्य करण्यात आला होता. तथापि हिंदी भाषा विषय ऐच्छिक ठेवण्याबाबतचा सुधारित शासन निर्णय काढला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मंगळवारी स्पष्ट केले. सर्व शाळा व अंगणवाड्यांचे जिओटॅगिंग करण्यासाठी एमआरसॅक ॲप सुरु करण्यात आले आहे.‌'पीएमश्री' शाळेच्या धर्तीवर राज्यात 'सीएम श्री' आदर्श शाळा उभारण्यात येणार आहे. तसेच ‘आनंद गुरुकुल’ उपक्रमाअंतर्गत प्रत्येक विभागात एक निवासी शाळा सुरू करून त्यात कला, क्रीडा व एआय (AI) प्रशिक्षणासह स्पेशालिटी शिक्षण दिले जाईल. शिक्षकांवरील शिक्षणबाह्य कामांचे ओझे कमी करण्यासाठी १५ समित्यांचे एकत्रीकरण करून आता फक्त चार समित्या ठेवण्यात आल्या आहेत, असेही भुसे यांनी सांगितले. राज्यात सीबीएससी पॅटर्नमधील चांगल्या बाबींचा स्वीकार करत, त्यानुसार राज्याच्या अभ्यासक्रमात सुधारणा केल्या जाणार आहेत. तथापि राज्य शिक्षण मंडळ, बालभारती राज्याचा इतिहास, भूगोल याविषयी कुठेही तडजोड होणार नाही, असे भुसे यांनी स्पष्ट केले.

सोमवार, २१ एप्रिल, २०२५

सोनी मराठी वाहिनीवर आज काय बनवू या...?

सोनी मराठी वाहिनीवर येत्या ५ मेपासून ‘आज काय बनवू या...? मधुरा स्पेशल’ हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. ‘मधुराज् रेसिपीज्’ या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या मधुरा बाचल हा कार्यक्रम सादर करणार आहेत. महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या पाककृती आणि प्रेक्षकांचे आवडते पदार्थ यात पाहायला मिळतील.
सोमवार ते शुक्रवार, दुपारी एक वाजता कार्यक्रम प्रसारित होणार आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतातील विशेष खाद्यपदार्थ कार्यक्रमात तयार करून दाखवले जाणार आहेत.

योगी आदित्यनाथ यांना शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण लखनऊ, दि. २१ एप्रिल सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गोवा येथे येत्या १७ ते १९ मे या कालावधीत‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे निमंत्रण सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देण्यात आले. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या ‘स्वागत समिती’तील (डॉ.) चारुदत्त पिंगळे, जौनपूर, मडियाहू विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्रकुमार पटेल,विश्वनाथ कुलकर्णी आदी उपस्थित होते. सनातन संस्था’निर्मित श्रीरामाचे सात्त्विक चित्र असलेली मोठी प्रतिमा हिंदु जनजागृती समितीने निर्मिलेली ‘हिंदू राष्ट्र आवश्यक क्यो ?’, ‘हिंदू राष्ट्र स्थापना की दिशा’, ‘हिंदू राष्ट्र खंडण एवं आक्षेप’ आणि ‘हलाल जिहाद’ ही हिंदी भाषेतील पुस्तके मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेट देण्यात आली. सध्या हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू आहेत. अधिकाधिक हिंदूंना संघटित करणे आवश्यक आहे. अशा कार्यक्रमाच्या माध्यमांतून अधिकाधिक हिंदूंना संघटित करण्याचे काम सुरू ठेवावे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सनातन संस्थेच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या कल्याणला जोडल्या जाणाऱ्या अर्धवट बांधकामाचे थडगे

ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या कल्याणला जोडल्या जाणाऱ्या अर्धवट बांधकामाचे थडगे ही छायाचित्रे डोंबिवली पूर्व भागातील ठाकुर्ली परिसरातील आहेत. छायाचित्रे पाहताक्षणी ती मेट्रो रेल्वेच्या कामाची आहेत असे वाटेल. पण नाही. ही छायाचित्रे आहेत डोंबिवली पूर्व व पश्चिम परिसराला जोडणा-या ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या कल्याणला जाणाऱ्या अर्धवट बांधकामाची. ठाकुर्ली उड्डाणपुल नव्याने बांधला तो आत्ता जेवढ्या रुंदीचा आहे त्यापेक्षा अधिक रुंद व मोठा असायला हवा होता. मुळात तो पुढील २५/ ५० वर्षांचा विचार करून बांधायला हवा होता तसा बांधला गेला नाही. पुन्हा काही वर्षांनी तो पाडून नवा बांधण्यासाठीच असा बांधला असावा असा 'अर्थ' असावा.
याच पुलाची एक बाजू ( डोंबिवली पश्चिमेकडून पूर्वेकडे येताना डावीकडची आणि डोंबिवली पूर्व भागातून पश्चिमेला येताना उजवीकडची) आज वर्षानुवर्षे तशीच अर्धवट अवस्थेत आहे. ही बाजू ठाकुर्ली पूर्व स्थानकापर्यंत आणण्यात आलेली आहे. आधी असे सांगितले गेले होते की ही बाजू/ उड्डाणपुल थेट पत्रीपुलाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे डोंबिवलीहून कल्याणला आणि कल्याणहून डोंबिवलीला लांबचा फेरा न घेता अवघ्या काही मिनिटांत जाता येईल. पण म्हणे माशी शिंकली. या मार्गात एक वसाहत ( झोपडपट्टी) आडवी येत होती. ती हटविल्याशिवाय पुलाचे बांधकाम पुढे सरकणार नव्हते. अजूनही ती जागा मोकळी झालेली नाही.
हे एक बरे असते. सर्वपक्षीय राजकारण्यांनी गळ्यात गळे घालून रेल्वे मार्गाचा आजुबाजूचा भाग, रेल्वे किंवा शासकीय यंत्रणांच्या मालकीच्या मोकळ्या जागा हेरून तिथे अनधिकृत बांधकामे उभी करायची. इतकी वर्षे झाली म्हणून नंतर ती नियमित करायची. किंवा काही विकास कामे करायची असली की अनधिकृत बांधकामे तोडायला विरोध करायचा, पुनर्वसन झालेच पाहिजे म्हणून आंदोलने करायची. हे सर्व नीट मार्गी लागले तर ठिक. नाहीतर प्रकल्प रखडला किंवा खर्च वाढला. ठाकुर्ली उड्डाणपुलाचा कल्याणला जाण्याच्या मार्गातील हा अडथळा आता दूर झाला आहे असे म्हणतात. पण तसे झाले असले तरी आता ही अर्धवट राहिलेली बाजू ठाकूर्लीला ९० फूट रस्त्यावर उतरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. अर्धवट असलेली ही बाजू आधीप्रमाणे कल्याणला पत्रीपुलापर्यंत न्यायची म्हटली तरी ते कठीण होणार आहे. कारण या मार्गात आता ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील पुर्व पश्चिम जोडणारा पादचारी पूल व सरकता जिना बांधण्यात आला आहे‌. त्यामुळे हे बांधकाम आधी पाडावे लागेल. आणि तसे केले तर यावर केलेला खर्च वाया जाईल. आणि म्हणूनच ही बाजू आता ठाकुर्ली ९० फूट रस्त्यावर उतरविण्यात येणार आहे, असे म्हणतात.
अर्थात आजच्या ( २१ एप्रिल २०२५) तारखेपर्यंत तरी कामाच्या बाबतीत काही हालचाल असल्याचे दिसले नाही. स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना त्यांच्या अन्य महत्त्वाच्या कामातून वेळ मिळाला तर कदाचित ते या अनेक वर्षे रखडलेल्या कामात लक्ष घालतील. किंवा कडोंमपाची निवडणूक आली की मतं मिळवण्यासाठी पुन्हा या कामाचे ढोल पिटतील, आम्ही काहीतरी काम करतोय असे दाखविण्याचे नाटक करतील. बघू या... शेखर जोशी २१ एप्रिल २०२५

गुरुवार, १७ एप्रिल, २०२५

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव'संकेतस्थळाचे उदघाटन

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव'संकेतस्थळाचे उदघाटन पणजी, दि. १७ एप्रिल सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त येत्या १७ ते १९ मे या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. SanatanRashtraShankhnad.in या इंग्रजी भाषेतील संकेतस्थळाचे उदघाटन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. संकेतस्थळावर सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव, सनातन राष्ट्राचा उद्देश; सनातन राष्ट्राचा शंखनाद करताचे भगवान श्रीकृष्णाचे बोधचिन्ह; सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा परिचय, सनातन संस्थेची माहिती; कार्यक्रमाला उपस्थित रहाणारे संत, महंत, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रतिष्ठित व्यक्ती यांची माहिती, सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला याची माहिती देण्यात येणार आहे.‌