रविवार, १५ जून, २०२५

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा; चबुतऱ्यालगतची जमीन खचली

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा; चबुतऱ्यालगतची जमीन खचली सिंधुदुर्ग, दि. १५ जून मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यालगतची जमीन खचल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुतळ्याच्या डाव्या बाजूला भगदाड पडले असून, त्या ठिकाणी जमीन खोलवर खचल्याचे दिसून येत आहे. सुदैवाने, चबुतरा आणि पुतळा भक्कम असून त्याला कोणताही धोका निर्माण झालेला नाही. मात्र चबुतऱ्यालगतची जमीन खचल्याने या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण

विश्व संवाद केंद्र, मुंबईतर्फे देण्यात येणा-या देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण मुंबई, दि. १५ जून विश्व संवाद केंद्र, मुंबईतर्फे देण्यात येणा-या यावर्षीच्या ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण शनिवारी मुंबईत एका कार्यक्रमात झाले. पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा दरवर्षी नारद जयंतीचे औचित्य साधून ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येतो. वांद्रे – कुर्ला संकुल येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यास ‘द इंडियन एक्सप्रेस ग्रुप’चे कार्यकारी संचालक अनंत गोयंका प्रमुख पाहुणे तर ‘टाइम्स नेटवर्क’च्या समुह संपादक व ‘टाइम्स नाऊ नवभारत’च्या मुख्य संपादक नाविका कुमार विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. ज्येष्ठ पत्रकार समीर कर्वे (मुद्रीत माध्यम), संदीप रामदासी (इलेक्ट्रॉनिक माध्यम), शैलेश गायकवाड (समाज माध्यम) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. पत्रकारितेतील विशेष कामगिरीबद्दल ‘साप्ताहिक विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर यांचाही सन्मान करण्यात आला. पत्रकारितेतील विशेष योगदानाबद्दल ‘मुंबई समाचार’ला तर गेली ७७ वर्षे कार्यरत असलेल्या ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेलाही या पुरस्काराने गौरविण्यात आले. हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेचे मुंबई ब्युरो प्रमुख सुधांशु जोशी यांनी या पुरस्कार स्वीकारला.‌ समाज माध्यम पुरस्कारांमध्ये यूट्यूबसाठी जय गगन, फेसबुकसाठी मृगा वर्तक आणि इन्स्टाग्रामसाठी सुनीता पावसकर व अमोल जामदारे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. पत्रकारितेतील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून सूरज चौगुले यांचाही सन्मान करण्यात आला.

कोकण रेल्वेवर रविवारपासून पावसाळी वेळापत्रक

कोकण रेल्वेवर रविवारपासून पावसाळी वेळापत्रक मुंबई, दि. १५ जून कोकण रेल्वेवर रविवारपासून (१५ जून) पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणासाठी दरवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबरदरम्यान कोकण रेल्वेवर पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येते. मात्र, यावर्षी कोकण रेल्वेने पूर्वपावसाळी आणि इतर पायाभूत कामे पूर्ण केल्याने पावसाळी वेळापत्रकात सुधारणा करून ते १० जूनऐवजी १५ जूनपासून लागू करण्यात आले आहे. यंदा ३१ ऑक्टोबरऐवजी २० ऑक्टोबरपर्यंतच पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

शनिवार, १४ जून, २०२५

विश्व मराठी संमेलन येत्या डिसेंबर मध्ये नाशिकला 

विश्व मराठी संमेलन येत्या डिसेंबर मध्ये नाशिकला  नाशिक, १४ जून  राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे घेण्यात येणारे चौथे विश्व मराठी संमेलन येत्या २६ ते २८ डिसेंबर दरम्यान नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सहकार्य या संमेलनास लाभले आहे. पहिली दोन विश्व मराठी संमेलने मुंबईत झाली होती तर तिसरे विश्व मराठी संमेलन अलीकडेच पुण्यात पार पडले होते.  विश्व मराठी संमेलनात ज्येष्ठ सहित्यिकाला देण्यात येणाऱ्या 'साहित्य भूषण' या पुरस्काराची रक्कम यंदापासून दहा लाख रुपये करण्यात आली आहे. याआधी ही रक्कम पाच लाख रुपये होती. 

समीक्षक आणि नाटककार जयंत पवार स्मृती संमेलन येत्या २२ जूनला मालवण येथे

समीक्षक आणि नाटककार जयंत पवार स्मृती संमेलन येत्या २२ जूनला मालवण येथे मुंबई, दि. १४ जून ज्येष्ठ समीक्षक, कथाकार, नाटककार जयंत पवार स्मृती संमेलन येत्या २२ जून रोजी मालवण येथे आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते, नाट्यदिग्दर्शक अनिल गवस यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे. समाज साहित्य प्रतिष्ठान-सिंधुदुर्ग आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगण- मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने होणारे संमेलन मालवण येथील बॅरिस्टर नाथ पै सेवांगणच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे उदघाटन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक ॲड. देवदत्त परवडेकर यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनानंतर 'जयंत पवार यांचे कथात्म साहित्य'या विषयावर डॉ. दत्ता घोलप यांचे व्याख्यान होणार आहे. 'जयंत माणूस आणि लेखक, कलावंत' या विषयावर संमेलनाध्यक्ष गवस यांची प्रगट मुलाखतही यावेळी होणार आहे. समाज साहित्य प्रतिष्ठानने प्रकाशित केलेल्या मराठीतील ७५ कवींच्या 'सृजन रंग' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन तसेच निमंत्रित कवी संमेलनही होणार आहे.

शुक्रवार, १३ जून, २०२५

हिंदू धर्म आणि देवतांवर श्रद्धा आहे त्यांनाच सेवेत घ्यावे-सनातन संस्थेची मागणी -शनिशिंगणापूर मंदिरातील ११४ मुस्लिम कर्मचारी हटविण्याच्या निर्णयाचे हिंदू जनजागृती समिती कडून स्वागत मुंबई, दि. १३ जून हिंदूंची मंदिरे ही श्रद्धास्थाने असून ज्यांची हिंदू धर्म आणि देवता यांच्यावर श्रद्धा आहे,अशांनाच मंदिरसेवेत घ्यावे,अशी मागणी, सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केली आहे. तर शनिशिंगणापूर मंदिरातील ११४ मुसलमान कर्मचाऱ्यांना हटविण्याच्या निर्णयाचे हिंदू जनजागृतीनेही स्वागत केले आहे. केवळ शनिशिंगणापूरच नव्हे, तर सर्वच देवस्थानांनी ही भूमिका घेऊन सेवकांची नियुक्ती करावी, अशी मागणीही वर्तक यांनी केली आहे. दरम्यान श्री शनिशिंगणापूर मंदिरातील ११४ मुसलमान कर्मचाऱ्यांना हटविण्याच्या निर्णयाचे हिंदू जनजागृती समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी स्वागत केले आहे. शासनाच्या नियंत्रणात असलेल्या अन्य देवस्थानांमध्येही अन्यधर्मीय कर्मचारी असतील तर त्यांची चौकशी करून त्यांनाही तत्काळ सेवामुक्त करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी केली आहे.

रॅगिंग विरोधातील नियमावलीचे पालन न केल्याने ८९ शिक्षण संस्थांना 'युजीसी' कडून नोटीस

रॅगिंग विरोधातील नियमावलीचे पालन न केल्याने ८९ शिक्षण संस्थांना 'युजीसी' कडून नोटीस रॅगिंग विरोधातील नियमावलीचे गांभीर्याने पालन न केल्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील ८९ संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. या संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 'आयआयटी' मुंबई, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि पुण्यातील स्पाइसर ॲडव्हेंटिस्ट विद्यापीठांचा समावेश आहे. या संस्थांनी येत्या ३० दिवसांच्या आत संपूर्ण अहवाल सादर न केल्यास मान्यता अथवा संलग्नता रद्द करण्यात येईल असा इशारा 'युजीसी'ने दिला आहे. विद्यार्थ्यांचा मानसिक छळ, आत्महत्या यांना आळा घालण्यासाठी 'युजीसी' ने २००९ मध्ये रॅगिंग विरोधी नियमावली लागू केली होती. या नियमांचे पालन करणे प्रत्येक शैक्षणिक संस्थेस बंधनकारक असूनही देशभरातील अनेक संस्थांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यामुळे युजीसीकडून ही कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.