मंगळवार, २१ जून, २०१६

शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग आवश्यक


योग ही प्राचीन भारतीय पद्धती असून प्रत्येक माणसाच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी योग आवश्यक आहे, असे कैवल्यधाम या संस्थेचे कार्यकारी विश्वस्त सुबोध तिवारी यांनी सांगितले.

आपल्या प्रत्येकाच्या जीवनात या तीन गोष्टींना महत्व असून योगाच्या माध्यमातून या तीनही गोष्टींचा समन्वय राखला जातो. सध्याच्या बदलत्या आणि धावपळीच्या जीवनशैलीत प्रत्येकालाच योगाची गरज आहे. योगातील योगासने, प्राणायाम, कपालभाती, भस्त्रिका, व अन्य कृतींमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगल्या प्रकारे टिकून राहाते. योगाच्या जोडीला आपल्याकडे सुयोग्य आहाराची जोड दिलेली आहे. आहार हा सात्विक व मर्यादित असावा. यासाठी काही नियम केले आहेत. धावपळीचे जीवन, जीवघेणी स्पर्धा, ताण व तणाव, जेवण आणि खाण्याच्या बदललेल्या वेळा व सवयी, पोट भरण्यासाठी खाल्ले जाणारे फास्ट फूड, मसालेदार, तळलेले पदार्थ याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावरही होत असतो. यातून शारीरिक व्याधी जडतात. या सगळ्यावर आपल्या ऋषीमुनींनी योगाच्या माध्यमातून उपाय दिला आहे. कितीही धावपळ असली तरी प्रत्येकाने किमान अर्धा तास योग करण्यासाठी द्यावा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करु नका. मर्यादा पाळा आणि योगाला आपली जीवनशैली बनवा, असेही तिवारी यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात कशी झाली याविषयी माहिती देताना तिवारी म्हणाले, नऊ वर्षांपूर्वी पोर्तुगाल येथे २१ जून या दिवशी योग दिन साजरा करणयात आला होता. योगाचे महत्व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व योगाच्या प्रसारासााठी एक दिवस निश्चित करुन तो दिवस आंतरराष्टीय पातळीवर साजरा केला जावा, यासाठी काही योग संस्थांनी एकत्र येऊन प्रयत्न सुरु केले होते. संंयुक्त राष्ट्रसंघाकडे एक निवेदनही देण्यात आले होते. २७ सप्टेंबर २०१४ या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्यांसमोर भाषण करताना योगाची प्राचीन भारतीय परंपरा, योगाचे महत्व सांगितले होते. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन साजरा करण्याची सूचना केली होती. ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रतिनिधी सभेत या विषयावर मतदान घेण्यात आले. नव्वद टक्क्यांहून अधिक मतांनी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाकडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.

भारतीय सस्कृतीत योगाला हजारो वर्षांची परंपरा आहे. पतंजली ऋषींनी १९५ योगसुत्रे लिहिली असून योगाची व्याख्याही केली आहे. त्यामुळे पतंजली ऋषींना योगाचे मुख्य प्रवर्तक किंवा संस्थापक म्हणता येईल. पुढे महर्षी घेरंंड, वासिष्ठ यांनीही त्यात आपले योगदान दिले. योगविषयक प्राचीन संस्कृत ग्रंथही आपल्याकडे आहेत. अर्थात योग म्हणजे केवळ आणि केवळ आसने नाहीत. पतंजली ऋषींनी सांगितलेल्या योग सुत्रात फक्त तीन सुत्रे आसनांबाबत आहेत. नाथ संप्रदायाने योगासनांना विशेष महत्व दिले. आजही सर्वसामान्य लोकांमध्ये योग म्हटले की फक्त योगासने असा एक गैरसमज आहे.स्वामी कैवल्यानंद यांनी १९१७ मध्ये अमळनेर येथे कैवल्यधामची स्थापना केली. त्यानंतर १९२४ मध्ये लोणावळा येथे कैवल्यधाम सुरु झाले. योग आणि विज्ञान यांची सांगड स्वामी कैवल्यानंद यांनी घातली. १९२६ मध्ये त्यानी योग मिमांसा हे माासिक सुरु केले. संस्थेतर्फे योगविषयक २०० संशोधन प्रबंध आत्तापर्यंत सादर झाले आहेत. योग हा वैद्यकशास्त्रालाही कसा पुरक आहे ते पटवून देण्याची सुरुवात स्वामी कैवल्यानंद यांनी केल्याचेही तिवारी यांनी सांगितले.

महाराष्ट्रात विविध संस्थांककडूनन योग प्रसाराचे, योग शिक्षक तयार करण्याचे काम सुरु आहे. या संस्थांमधून दरवर्षी २०० ते ३०० योग शिक्षक तयार होत आहेत. या सर्व योगशिक्षण संस्थांचा आत्तापर्यंत अभ्यासक्रम वेगवेगळा होता. आता केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार सर्वांचा समान अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. योग परीक्षांमध्येही समानता आणण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयातर्फे योग विषयात सकारात्मक पावले उचलली गेली आहेत. योग या विषयात भविष्यात खूप चांगली संधी आहे. देशभरातील सीबीएसईच्या २७ हजार शाळांमधून आता योगशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येत योग शिक्षकांची गरज लागणार आहे. योगतज्ज्ञ आणि योग शिक्षकांना परदेशातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शळा, महाविद्यालये, कॉपोरेट क्षेत्र, रिसार्ट, स्पा येथेही योग शिक्षक लागतात. करिअर म्हणून यात चांगली संधी असल्याचेही तिवारी म्हणाले.

शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग आवश्यक


योग ही प्राचीन भारतीय पद्धती असून प्रत्येक माणसाच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी योग आवश्यक आहे, असे कैवल्यधाम या संस्थेचे कार्यकारी विश्वस्त सुबोध तिवारी यांनी सांगितले.

आपल्या प्रत्येकाच्या जीवनात या तीन गोष्टींना महत्व असून योगाच्या माध्यमातून या तीनही गोष्टींचा समन्वय राखला जातो. सध्याच्या बदलत्या आणि धावपळीच्या जीवनशैलीत प्रत्येकालाच योगाची गरज आहे. योगातील योगासने, प्राणायाम, कपालभाती, भस्त्रिका, व अन्य कृतींमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगल्या प्रकारे टिकून राहाते. योगाच्या जोडीला आपल्याकडे सुयोग्य आहाराची जोड दिलेली आहे. आहार हा सात्विक व मर्यादित असावा. यासाठी काही नियम केले आहेत. धावपळीचे जीवन, जीवघेणी स्पर्धा, ताण व तणाव, जेवण आणि खाण्याच्या बदललेल्या वेळा व सवयी, पोट भरण्यासाठी खाल्ले जाणारे फास्ट फूड, मसालेदार, तळलेले पदार्थ याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावरही होत असतो. यातून शारीरिक व्याधी जडतात. या सगळ्यावर आपल्या ऋषीमुनींनी योगाच्या माध्यमातून उपाय दिला आहे. कितीही धावपळ असली तरी प्रत्येकाने किमान अर्धा तास योग करण्यासाठी द्यावा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करु नका. मर्यादा पाळा आणि योगाला आपली जीवनशैली बनवा, असेही तिवारी यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात कशी झाली याविषयी माहिती देताना तिवारी म्हणाले, नऊ वर्षांपूर्वी पोर्तुगाल येथे २१ जून या दिवशी योग दिन साजरा करणयात आला होता. योगाचे महत्व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व योगाच्या प्रसारासााठी एक दिवस निश्चित करुन तो दिवस आंतरराष्टीय पातळीवर साजरा केला जावा, यासाठी काही योग संस्थांनी एकत्र येऊन प्रयत्न सुरु केले होते. संंयुक्त राष्ट्रसंघाकडे एक निवेदनही देण्यात आले होते. २७ सप्टेंबर २०१४ या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्यांसमोर भाषण करताना योगाची प्राचीन भारतीय परंपरा, योगाचे महत्व सांगितले होते. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन साजरा करण्याची सूचना केली होती. ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रतिनिधी सभेत या विषयावर मतदान घेण्यात आले. नव्वद टक्क्यांहून अधिक मतांनी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाकडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.

भारतीय सस्कृतीत योगाला हजारो वर्षांची परंपरा आहे. पतंजली ऋषींनी १९५ योगसुत्रे लिहिली असून योगाची व्याख्याही केली आहे. त्यामुळे पतंजली ऋषींना योगाचे मुख्य प्रवर्तक किंवा संस्थापक म्हणता येईल. पुढे महर्षी घेरंंड, वासिष्ठ यांनीही त्यात आपले योगदान दिले. योगविषयक प्राचीन संस्कृत ग्रंथही आपल्याकडे आहेत. अर्थात योग म्हणजे केवळ आणि केवळ आसने नाहीत. पतंजली ऋषींनी सांगितलेल्या योग सुत्रात फक्त तीन सुत्रे आसनांबाबत आहेत. नाथ संप्रदायाने योगासनांना विशेष महत्व दिले. आजही सर्वसामान्य लोकांमध्ये योग म्हटले की फक्त योगासने असा एक गैरसमज आहे.स्वामी कैवल्यानंद यांनी १९१७ मध्ये अमळनेर येथे कैवल्यधामची स्थापना केली. त्यानंतर १९२४ मध्ये लोणावळा येथे कैवल्यधाम सुरु झाले. योग आणि विज्ञान यांची सांगड स्वामी कैवल्यानंद यांनी घातली. १९२६ मध्ये त्यानी योग मिमांसा हे माासिक सुरु केले. संस्थेतर्फे योगविषयक २०० संशोधन प्रबंध आत्तापर्यंत सादर झाले आहेत. योग हा वैद्यकशास्त्रालाही कसा पुरक आहे ते पटवून देण्याची सुरुवात स्वामी कैवल्यानंद यांनी केल्याचेही तिवारी यांनी सांगितले.

महाराष्ट्रात विविध संस्थांककडूनन योग प्रसाराचे, योग शिक्षक तयार करण्याचे काम सुरु आहे. या संस्थांमधून दरवर्षी २०० ते ३०० योग शिक्षक तयार होत आहेत. या सर्व योगशिक्षण संस्थांचा आत्तापर्यंत अभ्यासक्रम वेगवेगळा होता. आता केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार सर्वांचा समान अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. योग परीक्षांमध्येही समानता आणण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयातर्फे योग विषयात सकारात्मक पावले उचलली गेली आहेत. योग या विषयात भविष्यात खूप चांगली संधी आहे. देशभरातील सीबीएसईच्या २७ हजार शाळांमधून आता योगशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येत योग शिक्षकांची गरज लागणार आहे. योगतज्ज्ञ आणि योग शिक्षकांना परदेशातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शळा, महाविद्यालये, कॉपोरेट क्षेत्र, रिसार्ट, स्पा येथेही योग शिक्षक लागतात. करिअर म्हणून यात चांगली संधी असल्याचेही तिवारी म्हणाले.

शुक्रवार, २० मे, २०१६

नेत्रदान चळवळीचा 'सदिच्छादूत'


तुला पाहते रे तुला पाहते तुझी मूर्त माझ्या उरी राहते तुला पाहते रे तुला पाहते जरी आंधळी मी तुला पाहते.. गाण्यातील कविकल्पना ही भव्य आणि उदात्त असली तरी वास्तवात मात्र चित्र फार वेगळे आहे. भारतात आज सुमारे सव्वा कोटी लोक अंध आहेत. हे अंधत्व काहीना काही कारणाने आलेले असले तरी यातील सुमारे ३० लाख लोकांना पारपटल रोपणाने दृष्टी प्राप्त होऊ शकते. इतक्या लोकांना दृष्टी प्राप्त करून द्यायची असेल तर वर्षांला किमान एक ते दीड लाख लोकांचे मरणोत्तर नेत्रदान होणे गरजेचे आहे. मात्र दुर्दैवाने भारतात अवघ्या २५ ते ३० हजार व्यक्तींचे मरणोत्तर नेत्रदान होत आहे. गेली ३५ वर्षे तळमळीने आणि ध्येयाने मरणोत्तर नेत्रदान प्रसाराचे कार्य करणारे ठाण्याचे श्रीपाद आगाशे यांनी या वास्तवाकडेच दृष्टी ठेवून आपले कार्य सुरू केले.

नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर आगाशे यांच्या नेत्रदान चळवळीच्या प्रचार आणि प्रसाराला अधिक वेग आला. मरणोत्तर नेत्रदान चळवळीचे ते ‘सदिच्छादूत’ झाले आहेत. या सगळ्या कामाची सुरुवात १९८१ मध्ये झाली. अणुशक्ती खात्यातील नोकरीच्या निमित्ताने आगाशे हे १९७१ ते १९९१ या कालावधीत चेन्नईजवळील कल्पाकम येथे वास्तव्यास होते. १९८० च्या सुमारास ‘रीडर्स डायजेस्ट’मधील एक लेख त्यांच्या वाचनात आला आणि त्यांची ‘दृष्टी’ बदलून गेली. श्रीलंकासारखा छोटा देश फक्त भारताला नव्हे तर संपूर्ण जगाला डोळे पुरवतो, अशी माहिती त्या लेखात होती. ते वाचून आगाशे अस्वस्थ झाले. भारतापेक्षा कितीतरी पटीने लहान असणारा देश नेत्रदान चळवळीत इतके मोठे काम करू शकतो आणि आपण त्या तुलनेत कुठेच नाही, या लाजिरवाण्या वास्तवाने ते बैचैन झाले. नेत्रदानाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी चेन्नईजवळील एगमोर येथील नेत्ररुग्णालय व नेत्रपेढीला भेट दिली. तेथील डॉक्टर्स व तज्ज्ञांशी बोलून हा विषय समजून घेतला. पुस्तके वाचून अभ्यास केला आणि याच विषयावर काम करण्याचे नक्की केले. नोकरीत असताना शनिवार आणि रविवार या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी त्यांनी हा विषय जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. अर्थात नोकरीमुळे या कामावर काही मर्यादा होती. १ जानेवारी २०११ मध्ये आगाशे सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतर त्यांनी पूर्णपणे या कामाला वाहून घेतले.

‘नेत्रदान एक राष्ट्रीय गरज’ या विषयावर त्यांनी मुंबई, ठाणे परिसर तसेच राज्यभरातही विविध ठिकाणी सुमारे अडीचशे व्याख्याने दिली आहेत. विविध ठिकाणी भरणारी प्रदर्शने, ग्राहक पेठा यातही आगाशे सहभागी होतात. येथे भेट देणाऱ्या लोकांपर्यंत पत्रके वाटप करून आणि त्यांच्याशी संवाद साधून आगाशे हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवितात. त्यासाठी आगाशे यांनी मराठीसह हिंदी, इंग्रजी आणि गुजराथी भाषेत नेत्रदान चळवळीविषयीची माहिती देणारी पत्रके छापून घेतली आहेत. नेत्रदान प्रचाराचे काम करत असताना त्यांना बऱ्या-वाईट अनुभवांना नेहमीच सामोरे जावे लागते. काही मंडळी आगाशे यांच्या कामाचे तोंडदेखले कौतुक करतात आणि आपल्यावर प्रसंग आला की नातेवाईक काय म्हणतील, रूढी, परंपरा यांचा विचार करून नेत्रदानाचे पाऊल मागे घेतात. खरे तर मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांची नेत्रदानात महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे त्यांनी अशा प्रसंगी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे, असे आगाशे सांगतात. मरणोत्तर नेत्रदान चळवळीत सुशिक्षित मंडळींपेक्षा कमी शिकलेल्या आणि अशिक्षित लोकांचा अधिक सहभाग आहे. तसेच स्त्रियांची संख्याही खूप मोठी असल्याचे निरीक्षण ते नोंदवितात.

मरणोत्तर नेत्रदानाचा अर्ज भरला असेल तरच नेत्रदान करता येते आणि तसा अर्ज भरला नसेल तर नेत्रदान करता येत नाही, असा एक मोठा गैरसमज लोकांमध्ये पसरला असल्याकडेही ते लक्ष वेधतात. खरे तर तसे काहीही नाही. एखाद्या व्यक्तीने मरणोत्तर नेत्रदानाचा अर्ज भरला नसला तरीही त्याच्या मृत्यूनंतर जवळच्या नातेवाईकांनी ठरविले तर ते जवळच्या नेत्रपेढीला नुसता एक दूरध्वनी करून मृत व्यक्तीचे नेत्रदान करू शकतात. मृत्यूनंतर एक किंवा दोन तासांतच नेत्रदान केले पाहिजे असे सांगितले जाते, पण त्यात तथ्य नाही. सहा तासांपर्यंत नेत्रदान होऊ शकते. काही दिवसांच्या बालकांपासून ते ८० ते ९० वर्षांपर्यंतच्या वृद्ध व्यक्तींचे नेत्रदान केले जाऊ शकते. डोळे काढून घेतल्यानंतर पूर्ण डोळ्याचे रोपण केले जात नाही तर डोळ्यातील पारपटलाचे रोपण केले जाते. अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे डोळे दान करण्याची परवानगी स्थानिकपोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या अधिकारात देऊ शकतात. पण पोलिसांनाही या विषयी फारशी माहिती नाही. त्यामुळे पोलिसांचेही प्रबोधन करणे आवश्यक आहे.

सर्व खासगी किंवा शासकीय रुग्णालयांतून रुग्णाच्या शस्त्रक्रियेच्या वेळी त्याच्या जवळच्या नातेवाईकांकडून एक अर्ज भरून घेतला जातो. त्यात शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही, अशी एक अट असते. दुर्दैवाने रुग्णाचा मृत्यू झाला तर रुग्णाचे नेत्रदान करण्याविषयीची एक अटही त्या अर्जात टाकली तर नेत्रदानासाठी आणि अंधांना दृष्टी मिळवून देण्यासाठी त्याचा खूप फायदा होऊ शकेल, याकडेही आगाशे लक्ष वेधतात. अनेक सामाजिक संस्था, धार्मिक किंवा आध्यात्मिक गुरूंकडून लोकांचे मरणोत्तर नेत्रदानाचे अर्ज भरून घेतले जातात. पण केवळ अर्ज भरून घेणे उपयोगाचे नाही. संबंधित व्यक्तीला ‘डोनर कार्ड’ मिळेल व सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता केलेली आहे ना, याचीही खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे आगाशे आवर्जून सांगतात. मरणोत्तर नेत्रदानाच्या प्रचाराबरोबरच गेल्या काही वर्षांपासून आगाशे मरणोत्तर अवयवदान तसेच त्वचादान याचाही प्रचार करत आहेत. आय बँक असोसिएशन ऑफ इंडियाचे ते आजीव सदस्य आहेत. आगाशे यांच्या पत्नी पुष्पा तसेच अनिल आणि आशीष ही दोन्ही मुलेही त्यांच्या परीने या कामात आगाशे यांना मोलाची मदत करत असतात.

श्रीपाद आगाशे- ९९६९१६६६०७

(पूर्वप्रसिद्धी-लोकसत्ता ठाणे/ २० मे २०१६/ सेकंड इनिंग सदर/ पान क्रमांक ७

सोमवार, ९ मे, २०१६

'मंचविशी प'मध्ये रमलेल्यांसाठी... -चंद्रशेखर गोखले यांचा नवा काव्यसंग्रह


कविता किंवा गाणे कसे सुचते/स्फुरते, असा प्रश्न कवी किंवा गीतकाराला विचारला तर तो त्याच्यापरिने त्याचे उत्तर देतो.त्या कशा सुचतात याबाबतचे प्रत्येकाचे उत्तर वेगवेगळे असू शकते.आपल्यापैकीही अनेकांनी विशिष्ट वयात किंवा विशिष्ट वेळी/प्रसंगात कविता केल्याही असतील. कविता किंवा आपल्याला जे व्यक्त करायचे आहे ते शब्दात मांडणे महत्वाचे. साधे-सोपे शब्द वाचकांच्या मनाचा ठाव घेतात, त्यांना ती कविता भावते.त्यांच्या कविता दीर्घकाळ स्मरणात राहतात. त्या अमाप लोकप्रिय होतात, इतकेच नव्हे तर त्या कवीसारख्या कविता लिहिणारे अनेक नवीन कवी तयार होतात. तो काव्यप्रकार मराठी साहित्यात रुजतो. हे भाग्य २५/३० वर्षांपूर्वी चंद्रशेखर गोखले या कवीला लाभले. त्यांनी सादर केलेला 'चारोळी' हा काव्यप्रकार नवीन होता. गोखले यांनी फक्त चार ओळींमध्ये आपल्या मनातील भावना ताकदीने व्यक्त करण्याचे आव्हान आणि कसब 'मी माझा'च्या निमित्ताने पेलून दाखवले आणि संपूर्ण महाराष्टात 'मी माझा' हा काव्यसंग्रह आणि चारोळी हा काव्यपप्रकार लोकप्रिय झाला.

'मी माझा' नंतर गोखले यांचे 'पुन्हा मी माझा', 'मी नवा', 'माझे शब्द', 'माझ्या परीने मी' हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. आता गोखले यांचा 'मंचविशी प' हा नवा काव्य/चारोळी संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. 'मी माझा'हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित करण्याबाबत गोखले यांनी काही प्रकाशकांशी संपर्क साधला होता. पण त्यांनी 'मी माझा' नाकारला आणि शेवटी गोखले यांनी 'मी माझा' स्वत;च प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला, त्यांनी तो प्रकाशितही केला व 'मी माझा'ने इतिहास घडविला. हिंदी, गुजराथी व इंग्रजी भाषेतही त्याचा अनुवाद झाला असून 'ब्रेल लिपी'तही 'मी माझा' प्रकाशित झाले आहे. खरे तर 'मी माझा'च्या ही अगोदर रॉय किणीकर यांचा 'उत्तररात्र'हा चार ओळींची कविता असलेला काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता. पण दुर्देवाने तो लोकांपर्यंत पोहोचलाच नाही. पण आपल्याही अगोदर चारोळी हा काव्यप्रकार किणीकर यांनी सादर केला होता, असे गोखले आवर्जून सांगतात.

गोखले यांच्या नव्या काव्यसंग्रहाचे शीर्षकच ते कोणत्या वयोगटातील व्यक्तींसाठी आहे, हे सांगते. त्यांनी काव्यसंग्रहाच्या अर्पण पत्रिकेतही 'जे जे आपल्या मंचविशीपमध्ये मनापासून रमलेत त्यांच्यासाठी' असे लिहिले आहे. पण असे असले तरी जे मनाने तरुण आहेत त्या सगळ्यांसाठी हा नवा काव्यसंग्रह आहे.

'मंचविशी प'ची सुरुवात
कितीदा तो तिच्या आधी येऊन बसायचा आणि कितीदा ती गेल्यावर तो तिथेच बसलेला दिसायचा या चारोळी ने केली आहे.

चारोळ्या वाचतांना पुढे

त्या दोघांतला संवाद असाच असायचा जरा वेळाने वाळूत चार रेघोट्या दिसायच्या

मनात एक असतं आणि ओठावरती भलतंच नंतर कितीही म्हटलं जाऊ दे तरी मनातलं मनात सलतंच

असं पाहू नकोस सगळं माहित असल्यासारखं तुला हवं असलेले उत्तर माझ्या डोळ्यांत दिसत असल्यासाऱखं

तुला काय शब्द ओठांत धरता येतात आणि कधी काजळासारखे डोळयांत भरता येतात

या आणि इतर चारोळ्या वाचकांसमोर येतात.

काव्यसंग्रहाच्या शेवटी

रंगाचा इवलासा टिळा तू लावून गेलास बंद दारावर आणि त्याचा नाजुकसा ठसा उमटला माझ्या उरावर ही चारोळी आहे.

अवघ्या ३२ पानांच्या या छोटेखानी (पॉकेट साईज आकारातील) पुस्तकात २९ चारोळ्या आहेत. एक चारोळी पुस्तकाच्या मलपृष्ठावर दिली आहे. या सर्व चारोळ्या मनाचा ठाव घेणाऱया आहेत. चारोळ्या वाचतांना प्रत्येकालाच ती चारोळी म्हणजे आपला स्वतचा अनुभव वाटेल. मलपृष्ठावर दिलेल्या चारोळीत

डोळे भरुन आले की तुझं रुप कसं दिसायला लागतं छे, ते दिसण्यासाठी डोळ्यातलं पाणी हलक्या हातानी कुणी पुसावं लागतं

असे गोखले सहजपणे सांगून जातात आणि ते आपल्यालाही पटते.

@शेखर जोशी --------------------------------------

चंद्रशेखर गोखले यांचा ई-मेल आयडी

chandrashekhargokhale18@gmail.com

रविवार, २४ एप्रिल, २०१६

भावगीताची नव्वदी


मराठी भावगीताची नव्वदी लोकसत्ता-मुंबई/रविवार वृत्तान्त/२४ एप्रिल २०१६/पान क्रमांक-१ http://epaper.loksatta.com/c/9867860

बुधवार, २० एप्रिल, २०१६

'चैत्रेय' वासंतिक


मराठीत दिवाळी अंकाची एक परंपरा आहे. दरवर्षी मराठीत कथा, कविता, कादंबरी, व्यंगचित्रे, लेख आदी साहित्य असलेले किंवा पाककला, ज्योतिष, आध्यात्मिक, पर्यटन अशा विशिष्ट विषयांना वाहिलेले दिवाळी अंक प्रकाशित होत असतात. गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळ ही परंपरा सुरु आहे. मराठीत ज्या प्रकारे दरवर्षी दिवाळी इतक्या मोठ्या प्रमाणात (साडेतीनशे ते चारशे) अंक निघतात तसे अन्य कोणत्याही भारतीय भाषेत निघत नाहीत.

दिवाळी अंकाच्या परंपरेप्रमाणेच चैत्र महिन्यात वासंतिक अंकाची परंपरा सुरु व्हावी या उद्देशाने प्रा. नरेंद्र पाठक यांनी 'चैत्रेय वासंतिक' ची सुरुवात केली. गेली १४ वर्षे नियमितपणे चैत्र महिन्यात 'चैत्रेय' प्रकाशित होत असून यंदाच्या वर्षी १५ वा अंक नुकताच प्रकाशित झाला. प्रसिद्ध चित्रकार दीनानाथ दलाल यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष सुरु असल्याने त्यांना अभिवादन करण्यासाठी यंदाच्या चैत्रेयच्या मुखपृष्ठावर दलाल यांनी रेखाटलेले छायाचित्र देण्यात आले आहे. या चित्राच्या संदर्भात चित्रकार विजयराज बोधनकर यांचा विशेष लेखही अंकात आहे.

कथा, मुलाखत, लेख, कविता यासह खास बालविभागही अंकात देण्यात आला आहे. ज्येष्ठ संगीतकार पं. यशवंत देव यांची प्रा. नरेंद्र पाठक यांनी घेतलेली खास मुलाखत अंकात आहे. मॉं रेवा तेरा पानी निर्मल (अश्विन पुंडलिक),नाटक, सिनेमा आणि देश (सुधीर जोगळेकर), टोकिओची सडक सुरक्षा संस्कृती (नि.श. गुळवणी), गुलमोहराचा जळलेला बुंधा (सतीश सोळांकूरकर), बाया कर्वे आणि तिचा संसार (अशोक बेंडखळे), गीत आणि गझलचा बादशाह संगीतकार मदनमोहन (शरद सोनवणे) व अन्य लेख यात आहेत.

दहा कथा, वीस कविता यासह अंकात विशेष बालविभाग देण्यात आला आहे. नव्या पिढीवर वाचनाचा संस्कार व्हावा, त्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी 'चैत्रेय'च्या अंकात काही पाने बालवाचकांसाठी राखून ठेवली जातात. या विभागात गोष्टी, कविता, गाणी, नाट्यछटा, काव्यकोडी असा विविधांगी मजकूर आहे. एकनाथ आव्हाड यांनी या बालविभागाचे संपादन केले आहे.

महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी 'चैत्रेय'चे खास समारंभात प्रकाशन करण्याची पद्धत प्रा. पाठक यांनी सुरु केली आहे. पहिल्या अंकाचे प्रकाशन ठाणे व अंमळनेर येथे २००२ मध्ये झाले होते. आत्तापर्यंत दादर, रत्नागिरी, विलेपार्ले, मुलुंड, गेट वे ऑफ इंडिया येथे भर समुद्रात बोटीवर, नाशिक, वाशी, कल्याण, औरंगाबाद, इंदूर येथे अंकाचे प्रकाशन झाले आहे. यंदाच्या अंकाचे प्रकाशन बडोदे येथे झाले.

'चैत्रेय'च्या रुपाने वासंतिक अंक सुरु करण्याची परंपरा अंकाचे संपादक आणि प्रकाशक प्रा. पाठक यांनी सुरु केली असून हा प्रयोग वाचकांच्याही पसंतीस उतरला आहे.

प्रा. नरेंद्र पाठक यांचा संपर्क

०२२-२५४१६९११/९८६९६८४०८६/९१६७४०६०५०

ई-मेल आयडी chaitreya@yahoo.com

@शेखर जोशी

मंगळवार, १९ एप्रिल, २०१६

माझे स्वाक्षरी पुराण


आपल्यापैकी बहुतेकांना लहानपणी म्हणजे शालेय वयात पोस्टाची तिकिटे गोळा करणे, वेगवेगळ्या देशातील नाणी व नोटा जमविणे, मान्यवर व्यक्तींच्या स्वाक्षऱया घेणे असे छंद असतात. पुढे ते जोपासले जातात किंवा थांबतात. मी शाळेत असताना मलाही मान्यवर व्यक्तिंच्या स्वाक्षऱया जमा करण्याचा छंद होता. या स्वाक्षऱया आठवी ते दहावी-बारावीपर्यंतच्या काळात जमा केलेल्या आहेत. डोंबिवलीमध्ये तेव्हाही अनेक साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे आणि आजही होत असतात. त्या कार्यक्रमाला जाऊन या पैकी काही मान्यवरांच्या स्वाक्षऱया घेतलेल्या आहेत. तर काही स्वाक्षऱया डोंबिवलीतील भरत नाट्य मंदिर या खुल्या नाट्यगृहात झालेल्या नाट्य प्रयोगाच्या वेळी घेतलेल्या आहेत.

सुनील गावसकर यांच्या स्वाक्षरीची आठवण मनात घर करुन आहे. परदेशातील मोठा दौरा जिंकून भारतीय संघ मुंबईत परतला होता. गावसकर हे संघाचे कप्तान होते. त्या निमित्ताने गावसकर यांचा सत्कार डोंबिवली नगरपालिकेच्या कार्यालयातील मोकळ्या जागेत झाला होता. कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती. कार्यक्रम संपल्यानंतर व्यासपीठावर जाऊन त्या गर्दीत गावसकर यांची सही घेतल्याचे आठवत आहे.

'सौजन्याची ऐशी तैशी' या नाटकाच्या वेळी अभिनेते राजा गोसावी यांची घेतलेली सही (८-१२-८४) माझ्या संग्रहात आहे. अभिनेते अजय वढावकर यांचीही स्वाक्षरी आहे. जर मी चुकत नसेन तर 'पळा पळा कोण पुढे पळे तो'या नाटकात भक्ती बर्वे काम करत होत्या. त्यांच्यासह माधव वाटवे, आत्माराम भेंडे हे कलाकारही या नाटकात होते. हे नाटक भरत नाट्य मंदिर येथे पाहिले. त्या वेळेस या तिघांच्या स्वाक्षऱया घेतल्या. अभिनेते यशवंत दत्त, जयंत सावरकर, अभिनेते, दिग्दर्शक कमलाकर सारंग यांच्याही स्वाक्षऱया संग्रहात आहेत.

लहान मुलांसाठी लिहिणारे भा. रा. भागवत (फास्टर फेणे प्रसिद्ध) आणि लिलावती भागवत, वाचकप्रिय लेखक बाबा कदम, लक्ष्मण माने, कुमुदिनी रांगणेकर, कवी ना.धों.महानोर, ज्येष्ठ पत्रकार अशोक जैन, कुमार केतकर, अरुण साधू, कवीवर्य शंकर वैद्य, गायिका उत्तरा केळकर, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, वृत्तनिवेदक व सूत्रसंचालक प्रदीप भिडे, लेखक व नाटककार जयवंत दळवी, वसंत सबनीस, समीक्षक प्रा. माधव मनोहर, लेखक व नाटककार आणि आमचे डोंबिवलीकर असलेले शं. ना.नवरे, 'बलुत'कार दया पवार, व्यंगचित्रकार बळी लवंगारे, दूरदर्शनचे निर्माते 'ज्ञानदीप'कार आकाशानंद, ज्येष्ठ संगीत समीक्षक, तज्ज्ञ आणि आवाजाची जोपासना कशी करावी याचे मार्गदर्शन करणारे अशोक दा. रानडे, ज्येष्ठ अभिनेत्री रेखा (मराठीतील), विक्रमवीर धनंजय कुलकर्णी यांच्यासह कवी व लेखक रमेश तेंडुलकर (आत्ताच्या पिढीसाठी सचिन तेंडुलकर याचे वडील) यांचीही स्वाक्षरी संग्रहात आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची व्याख्यानमाला काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत स. वा. जोशी विद्यालयाच्या पटांगणावर झाली होती. त्यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांची स्वाक्षरी घेतल्याचे आठवते. स्वाक्षरी घेताना काही मान्यवरांनी त्या खाली तारीख टाकलेली आहे. पण ज्यांनी ती टाकली नाही त्या स्वाक्षरीच्या खाली ती सही केव्हा घेतली त्याची तारीख किमान मी तरी टाकायला हवी होती, असे आता वाटते.

स्वाक्षरी घेण्याच्या निमित्ताने का होईना पण ती एक-दोन मिनिटे या मान्यवरांशी थेट बोलता व भेटता आले हा आनंद व समाधान खूप मोठे आहे...

गुरुवार, १४ एप्रिल, २०१६

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संस्कृत भाषेवरील प्रेम


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संस्कृत भाषेवरील प्रेम

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव उच्चारले की आपल्याला आठवते त्यांनी दलित आणि स्त्रियांच्या मुलभूत हक्कांसाठी केलेले कार्य आणि भारताची राज्यघटना. त्यांच्या या कामाबरोबरच डॉ. आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाविषयी फारसा प्रकाशात न आलेला एक भाग व तो म्हणजे त्यांचे संस्कृत भाषेवरील प्रेम आणि आस्था.

लेखक व प्राध्यापक प्र.शं. जोशी यांनी डॉ. आंबेडकर यांच्यावर संस्कृत श्लोकांच्या स्वरुपात भीमायन हे चरित्र काव्य लिहिले आहे. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील या प्रा. जोशी यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी हे चरित्र लिहिले. डॉ. आंबेडकर यांना संस्कृत भाषेविषयी किती आदर होता आणि संस्कृत भारताची राष्ट्रभाषा व्हावी यासाठी डॉ. आंबेडकर यांनी कसे प्रयत्न केले ते यात वाचायला मिळते.

दलित महासंघाच्या कार्यकारिणीच्या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संस्कृत भाषेला राष्ट्रभाषा करण्यात यावी, असा ठराव मांडला होता. हिंदी प्रमाणेच राष्ट्रभाषेच्या जागी संस्कृत भाषा असावी, अशी त्यांची इच्छा होती. संस्कृत भाषा ही भारतीय संस्कृतीचे मूळ आहे. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातील, वेगवेगळ्या भारतीय भाषांना जन्म देणारी, विद्वानांना नेहमीच आदरणीय वाटणारी अशी ही संस्कृत भाषा भारताची राष्ट्रभाषा होण्यास योग्य आहे, अशा शब्दात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संस्कृत भाषेचे महत्व अधोरेखीत करत हा ठराव मांडला होता.

पुढे घटना समितीच्या बैठकीतही डॉ. आंबेडकर यांच्यासह भारताच्या परराष्ट्र खात्याचे उपमंत्री डॉ. बी. व्ही. केसकर आणि खासदार नजिरुद्दिन अहमद यांनी संस्कृत राष्ट्रभाषा व्हावी, असा प्रस्ताव/ठराव मांडण्याचा प्रयत्न केला होता. पश्चिम बंगालचे खासदार पं. लक्ष्मीकांत मैत्र यांनीही त्याला पाठिंबा दिला. पं. मैत्र यांना डॉ. आंबेडकर यांच्या संस्कृत भाषेच्या ज्ञानाविषयी खात्री वाटत नव्हती. म्हणून पं. मैत्र यांनी आपल्या काही शंका संस्कृतमधूनच डॉ. आंबेडकर यांना विचारल्या. आणि डॉ. आंबेडकर यांनी संस्कृतमधूनच पं. मैत्र यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. हा संवाद ऐकून घटना समितीच्या बैठकीतील सर्व सदस्य आश्चर्यचकित झाले. ही बातमी तेव्हाच्या काही प्रमुख वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती.

मात्र घटना समितीच्या सभेतील अनेकांच्या विरोधामुळे संस्कृत भाषेला राष्ट्रभाषा करण्याचा हा ठराव/प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. संस्कृत भाषेवर मनापासून प्रेम करणाऱया डॉ. आंबेडकर यांच्यासह अनेकांना वाईट वाटले.

डॉ.आंबेडकर यांनी राज्यघटना तयार करताना वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ वाचून, त्यांचा सखोल अभ्यास करुन नवीन कायदे करुन राज्य घटनेत स्त्रिया व दलितांच्या हक्कांचा समावेश केला. यासाठी त्यांनी भारद्वाज, याज्ञवल्क्य आदी स्मृतीग्रंथाचाही अभ्यास केला. डॉ. आंबेडकर यांचे हे संस्कृतप्रेम, त्यांनी मांडलेला हा ठराव याबाबतची माहिती प्रा. जोशी यांनी लिहिलेल्या भीमायन या ग्रंथात आहे. या ग्रंथातील ही माहिती देणारे श्लोक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या इयत्ता १० वी संस्कृत संपूर्ण या पाठ्यपुस्तकात देण्यात आली आहे.

-शेखर जोशी

रविवार, ३ एप्रिल, २०१६

लगीन घाई


बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर दिसणाऱ्या नायक-नायिकांचे चित्रपटात शुभमंगल होऊन चित्रपटाचा ‘दी एण्ड’ होतो. पडद्यावरील काही नायक-नायिका वास्तव जीवनातही ‘शुभमंगल’ करतात. काही जोडय़ांचे हे शुभमंगल दीर्घकाळ टिकते तर काहीं जोडय़ांच्या बाबतीत ते ‘औटघटकेचे’ ठरते. अलीकडेच बॉलीवूडच्या काही अभिनेत्रींचे शुभमंगल झाले असून काहींचे वर संशोधन सुरु आहे. पूर्वीच्या काळी बहुतांश लग्नं ही अगदी लहान वयातच होत असत. नंतरच्या काही वर्षांत मुलीच्या लग्नाचे वय सरासरी २२ ते २४ पर्यंत गेले आणि आता उच्च शिक्षण, नोकरी आणि करिअरमुळे ते २५ ते ३० पर्यंत किंवा त्या ही पुढे गेले आहे. अर्थात हे सर्वसामान्यांच्या बाबतीत झाले. बॉलीवूडमधील सगळ्याच गोष्टी वेगळ्या असतात. बॉलीवूडच्या काही नायिका वय उलटून गेले तरी लग्न करत नाहीत, काही जणी वय उलटल्यानंतर लग्न करतात, काहीतर लहान वयातच ‘शुभमंगल’ करून टाकतात. तर काही जणी आपल्यापेक्षा वयाने मोठय़ा असलेल्या मुलाशी लग्न करतात. ऊर्मिला मातोंडकर, प्रीती िझटा यांनी अलीकडेच त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलांशी लग्न केले. लग्नाच्या वेळी या दोघींचेही वय जास्त होते. म्हटले तर लग्नाचे वय उलटून गेलेले होते. वाढत्या वयात लग्न केलेल्या ‘या’ नायिकांपेक्षा लहान वयात लग्न केलेल्या बॉलीवूडच्या ‘त्या’ नायिकांना ‘बालिका वधू’च म्हणावे लागेल.

बॉलीवूडची ‘रंगीला’गर्ल ऊर्मिला मातोंडकर हिने नुकतेच तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेल्या मोहसीन अख्तर मीर या व्यावसायिकाशी लग्न केले. तर तिच्या अगोदर अभिनेत्री प्रीती झिंटानेही तिच्यापेक्षा लहान असलेल्या जेन गुडईन फशी या अमेरिकन मित्राबरोबर लग्न केले. लग्नाच्या वेळी ऊर्मिलाचे वय ४२ होते. पण बॉलीवूडच्या इतिहासावर सहज नजर टाकली तर लग्नाच्या वेळी बॉलीवूडच्या या नायिकांचे वय कमी होते, अशीही काही उदाहरणे पाहायला मिळतात. वय वर्षे १८ ते २५ किंवा २७ या वयात त्यांनी ‘दोनाचे चार हात’ केलेले दिसते. लग्न करत असताना यापैकी काही जणींनी बॉलीवूडमध्ये पदार्पणातच आपले बस्तान बसविलेले होते. लग्न झाल्यानंतर त्याचा चित्रपट किंवा अभिनय कारकीर्दीवर काय परिणाम होईल याचा विचार न करता त्यांनी ‘आले मना मी करून टाकते लग्ना’ असे पाहायला मिळते. लहान वयात लग्न केलेल्या अभिनेत्रींमध्ये ठळकपणे समोर येणारे नाव म्हणजे अभिनेत्री डिम्पल. डिम्पलने राजेश खन्नाशी लग्न केले तेव्हा तो बॉलीवूडचा सुपरस्टार होता तर डिम्पलची ‘बॉबी’पासून अभिनय कारकीर्द सुरू झाली होती. या लग्नाच्या वेळी डिम्पल अवघी १७ वर्षांची होती. डिम्पल व राजेश खन्ना यांच्या लग्नाच्या वेळी त्यांच्या वयात थोडेथोडके नव्हे तर तब्बल १७ वर्षांचे अंतर होते. पण प्रेमात सर्व काही क्षम्य आहे, असे म्हणतात. डिम्पल आणि राजेश खन्ना यांचे लग्न त्या वेळी खूप गाजले होते. बॉलीवूडचा ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीपकुमार आणि अभिनेत्री सायरा बानू यांचेही लग्न त्या काळी गाजले. कारण लग्नाच्या वेळी दिलीपकुमारपेक्षा सायरा बानूचे वय खूपच कमी होते. पण तरीही त्यांचे लग्न झाले आणि ते ‘शुभमंगल’ आजपर्यंत टिकून आहे. बॉलीवूडची ‘ट्रॅजेडी क्वीन’ मीनाकुमारी आणि दिग्दर्शक कमाल अमरोही यांची लग्नही त्या काळी गाजले. १९५२ मध्ये या दोघांनी लग्न केले. लग्नाच्या वेळी मीनाकुमारीचे वय फक्त २१ होते. लग्नानंतर १४ वर्षांनी दोघे एकमेकांपासून वेगळे झाले.

बॉलीवूडची अभिनेत्री दिव्या भारती हिचे अकाली निधन झाले. मोजकेच चित्रपट केलेल्या दिव्या भारतीने तरुणांच्या मनावर काही काळ अधिराज्यही गाजविले. दिव्या भारतीने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी निर्माता-दिग्दर्शक साजिद नडियाडवाला यांच्याशी लग्न केले. या दोघांची ओळख ‘शोला और शबनम’या चित्रपटाच्या चित्रीकरणप्रसंगी झाली होती. १० मे १९९२ रोजी या दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर अवघ्या दहा-अकरा महिन्यात तिचा मृत्यू झाला. दिव्या भारतीच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा होती. बॉलीवूडचा तरुण पिढीचा प्रतिनिधी म्हणून ज्याची ओळख आहे त्या रणबीर कपूरचे आई-बाबा अर्थात नितू सिंह व ऋषी कपूर हेही याच क्षेत्रातील. दोघांचाही प्रेमविवाह. ‘जहरिला इन्सान’या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमात आणि लग्नात झाले. १९८० मध्ये दोघांनी लग्न केले. लग्नाच्या वेळी नितू सिंहचे वय २१ होते. अभिनेत्री आयेशा टकिया आणि फरहान आझमी (समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांचा मुलगा) यांचे लग्न झाले तेव्हा आयेशाचे वय २३ इतके होते. दोघे जण लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते, मित्र होते. बॉलीवूड ‘खान’दानातील एक सलमान खान आणि भाग्यश्री पटवर्धन या दोघांचा ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट त्या काळी खूप गाजला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ‘हिट’ म्हणून गणला गेला. या चित्रपटाच्या प्रसिद्धीनंतरही भाग्यश्रीने तिचा बालपणीचा मित्र हिमालय दासानी याच्याशी लग्न केले आणि चित्रपट संन्यास घेतला. पण प्रेक्षक अद्यापही भाग्यश्रीला अद्यापही विसरलेले नाहीत. भाग्यश्रीचे लग्नाच्या वेळी वय २१ होते. ‘ही मॅन’ धर्मेद्र ‘ड्रीम गर्ल’ हेमामलिनी तसेच अमिताभ बच्चन व जया भादुरी यांचेही लग्न गाजले.

बॉलीवूडची लग्ने किती टिकतात किंवा किती मोडतात हा वेगळा विषय आहे. रुपेरी पडद्यावर गाजलेल्या काही जोडय़ांचे वास्तवातही लग्न झाले ते दीर्घकाळ टिकले तर काही जणांचे मोडले. काहींनी लग्न मोडल्यानंतर पुन्हा दुसऱ्याबरोबर लग्न केले. काहींनी केलेच नाही. ‘लग्न पाहावे करून आणि घर पाहावे बांधून’ असे म्हटले जाते. असे असले तरी बॉलीवूडच्या लग्नाचा हा एकूणच प्रवास मनोरंजक आहे.

(पूर्वप्रसिद्धी-लोकसत्ता-मुंबई/रविवार वृत्तान्त/३ एप्रिल २०१६/ पान क्रमांक १)

शनिवार, २६ मार्च, २०१६

'जित्या'ची खोड


काही जणांना विषय कोणताही असो त्यात नाक खुपसायची सवयच असते. येन केन प्रकारेण चर्चेत व बातम्यात राहण्यासाठीची ही धडपड असते. 'थोरल्या' साहेबांचा हात कायम आपल्या पाठीवर कसा राहिल, याचीही दक्षता ही मंडळी घेत असतात. अशी 'जित्या'ची खोड अनेकांना असते.

याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे पुण्यातील फर्ग्यसन महाविद्यालयातील प्रकरण. इतिहासाचा किती विपर्यास करायचा, त्यालाही काही मर्यादा असते.काही 'जित्या'ना कायम फुले, शाहु, आंबेडकर यांच्या नावाचा जप करायची सवय लागलेली असते. पण हे करताना इतरांचे थेट सांगायचे तर ब्राह्मणांचे कर्तृत्व, त्यांनी दिलेले सामाजिक योगदान, त्यांनी केलेल्या सामाजिसुरुचक सुधारणा ते जाणीवपूर्वक नाकारतात. किंवा त्यांच्याबाबत नाहक द्वेष पसरवतात. अनेक 'जित्या'ना त्यातच धन्यता वाटते. पण त्यांना हे कळत नाही की यातून ती मंडळी खुजी होत नाही किंवा त्यांचे योगदान कमी होत नाही तर तुम्ही खुजे ठरता व यातून तुमचा फक्त द्वेष आणि द्वेषच दिसून येतो.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्र पोहोचविणारे आणि त्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातलेले बाबासाहेब पुरंदरे यांना राज्य शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करताच अशाच काही 'जित्यां'चे पीत्त खवळले होते.

मागे एकदा मुंब्रा येथे अशाच एका 'जित्या'च्या खोडाने एका पोलीस अधिकाऱयाला नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी हा मोर्चा अडवला म्हणून तीळपापड झालेल्यांनी पोलीस अधिकाऱयाशी हुज्जत घालून ही धमकी दिली.

इशरत जहॉं प्रकरण असो, फेस्टिव्हलमध्ये वादग्रस्त चित्रकार एम. एफ. हुसेन यांची चित्रे लावणे असो किंवा ठाणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात महात्मा गांधी यांची हत्या करणाऱया नथुराम गोडसे यांच्यावरील लेख स्मरणिकेत छापण्यात आला म्हणून ती स्मरणिका जाळण्याचे हिंसक आंदोलन असो, अशा 'जित्या'च्या खोड्या सुरुच असतात.

या सगळ्या प्रकरणात अशा 'जित्यां'च्या घरातील वडीलधारी मंडळी आणि थोरले साहेबही मुग गिळून गप्प असतात. ते चकार शब्दाने अशा 'जित्यां'ना काहीही बोलत नाहीत की दटावत नाही. त्यामुळे आपण जे करतो ते बरोबरच आहे, असा समज करुन ते चेकाळतात. अर्थात काही 'जित्यां'च्या थोरल्या साहेबांनाही अप्रत्यक्षपणे तेच हवे असते.

अशा वाचाळ, बोलघेवड्या, चमकेश 'जित्या'नीच राजकारणाची वाट लावली आहे. अर्थात ते सगळीकडेच आहेत. 'जित्या'ही व्यक्ती नसून प्रवृत्ती झाली आहे.

असो. आपल्या आजूबाजूला तुम्हाला असा 'जित्या' आढळून आला तर तो योगायोग.... समजू नये.

गुरुवार, २४ मार्च, २०१६

हरवलेली रंगपंचमी


होळी, धुळवड आणि रंगपंचमी हे तीनही उत्सव वेगवेगळे आहे. मात्र आपण या तीनही उत्सवांची गल्लत करतो. वास्तविक फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी असते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी धुळवड असते. फाल्गुन वद्य पंचमीला रंग उधळण्याचा कार्यक्रम असतो म्हणून ती रंगपंचमी असते. आपण हल्ली रंगपंचमी विसरून गेल्याने रंगपंचमीतील खरा आनंद हरवून बसलो आहोत. आजच्या या धुळवडीला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे.

काही वर्षांपूर्वीपर्यंत अशी प्रथा होती की फाल्गुन पौर्णिमेला होळीचे पूजन झाल्यानंतर दुसऱया दिवशी त्या होळीतील राख अंगाला लावून आंघोळ केली जायची. ही राख औषधी आणि त्वचाविकार बरे करणारी असायची. अर्धवट जळत राहिलेल्या होळीवर पाणी तापवून त्या पाण्याने आंघोळ केली जायची. होळीनंतर पाच दिवसांनी येणारा सण म्हणजे रंगपंचमी. या दिवशी परिचित,मित्रमंडळी आपापसात एकमेकांना रंग लावून रंगपंचमी साजरी करायचे.

मात्र गेल्या काही वर्षात रंगपंचमी ऐवजी आपण धुळवडच रंगपंचमी म्हणून साजरी करू लागलो आहोत. रस्त्यावरून जाणाऱया-येणाऱया लोकांवर घातक रसायने मिसळलेल्या रंगाचे किंवा गटाराच्या पाण्याने भरलेले फुगे/पिशव्या फेकून मारणे, रस्त्यावरून टोळक्याने अचकट-विचकट अंगविक्षेप करत फिरणे, समोरचा माणूस आपल्या ओळखीचा नसला तरी त्याच्यावर रंग टाकणे, गुलाल उधळणे, मद्यप्राशन करणे म्हणजेच धुळवड असे समीकरण तयार झाले आहे. त्यामुळे होळीच्या दुसऱया दिवशी अर्थात धुळवडीला जणूकाही अघोषित बंद असल्यासारखी परिस्थिती असते. अनेक जण सकाळी घराबाहेर पडणे टाळतात तर दुकानदार सकाळी दुकाने बंद ठेवणे पसंत करतात.

धुळवडीच्या दुसऱया दिवशी वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाहिन्यांवरून पाण्याने/किंवा रंगाने भरलेली पिशवी-फुगा लागल्याने कोणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत, घातक रंगांचा वापर केल्यामुळे डोळ्यांचे किंवा त्वचेचे झालेले विकार या विषयीच्या बातम्या दरवर्षी येत असतात. घातक रसायने असलेल्या रंगांचा वापर न करता नैसर्गिक रंगांनी धुळवड खेळा, असा कितीही कंठशोष केला तरी अपवाद वगळता त्याकडे कोणी लक्ष देत नाहीत. आपण स्वतला सुसंस्कृत म्हणवतो आणि जे काही करतो ते योग्य आहे का याचा सर्वानीच गंभीरपणे विचार केला पाहिजे.

एक दिवस जरा गंमत आणि मजा केली तर काय बिघडले, असा सूर धुळवडीला रंग खेळणाऱया मंडळींकडून विचारला जातो. पण उत्सव हा आपल्या आनंदासाठी असतो. रंगाचा बेरंग होत असेल तर तो उत्सव काय कामाचा...

मंगळवार, २२ मार्च, २०१६

जनसेवा हेल्थकेअर रुग्णालय- आगळी आरोग्यमय जीवन योजना


एखाद्या आजाराचे निदान करण्यासाठीच्या विविध तपासण्या, कराव्या लागणाऱया शस्त्रक्रिया, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर रुग्णालयाचे भरमसाठ देयक या करता येणारा भरमसाठ खर्च सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय माणसांच्या आवाक्याबाहेरचा असतो. मेडिक्लेम पॉलिसी जरी असली तरीही अनेकदा या सगळ्या दिव्यातून पार पडताना डोळे पांढरे होतात. अनेकदा साठवलेली सर्व पुंजीही खर्च करावी लागते. अशा सध्याच्या परिस्थितीत सर्वसामान्यांसाठी आधार ठरेल अशी एक आगळी आरोग्यमय जीवन योजना जनसेवा हेल्थ केअरने सादर केली आहे. वसई येथे हे जनसेवा हेल्थकेअर रुग्णालय लवकरच सुरु होणार आहे. प्रसाद राऊत, डॉ.रत्नाकर पाटील, प्रतिक राऊत, अभिजित पंडित आणि शैलेश ठाकूर या पाच जणांनी एकत्र येऊन हे शिवधनुष्य उचलायचे ठरविले आहे. भारतात पहिल्यांदाच जनसेवा हेल्थकेअर रुग्णालयाच्या माध्यमातून 'झीरो बिलिंग'हही संकल्पना राबविण्यात येणार आहे.

जनसेवा हेल्थ केअर रुग्णालयाच्या माध्यमातून मर्यादित सदस्यत्व योजनेअंतर्गत ही सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. केवळ वसई-विरार नव्हे तर मुंबई, महाराष्ट्र किंवा भारतातील कोणीही नागरिक याचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत रुग्णालयाचे आणि रुग्णालयातील विविध आरोग्य सेवा-सुविधांचा लाभ घेण्यासाठी रुग्णालययाचे वार्षिक सभासद शुल्क भरुन सदस्य होणे आवश्यक आहे. सदस्यांसाठीच ही सेवा उपलब्ध असणार आहे. या सेवा-सुविधासांठी जनसेवा हेल्थकेअर रुग्णालयाने ठेवलेले वार्षिक शुल्क हे सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांना सहज परवडण्यासारखे आहे. ५ ते ५० या वयोगटासाठी एका व्यक्तीसाठीचे वार्षिक शुल्क अवघे १ हजार ५०० रुपये इतके आहे. ५० ते ७० आणि ७० वर्षांपुढील वयोगटासाठी ते अनुक्रमे २ हजार रुपये व २ हजार ५०० रुपये इतके एका व्यक्तीसाठीचे आहे. जी व्यक्ती सदस्य झालेली असेल त्या एका व्यक्तीलाच याचा लाभ घेता येणार आहे.

वार्षिक शुल्क भरुन सभासद झाल्यानंतर मोफत वैद्यकीय सल्ला (ओपीडी), मोफत हॉस्पीटलायझेशन (आयपीडी), मोफत वैद्यकीय चाचण्या (रक्त व लघवी), मोफत एक्स रे, सोनोग्राफी, ईसीजी या सुविधा त्या व्यक्तिला मिळणार आहेत. तसेच जनरल सर्जिकल विभाग, अस्थीरोगतज्ज्ञ विभाग, मुत्ररोगतज्ज्ञ विभाग, वैद्यकीय चाचणी विभाग, अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया अतिदक्षता विभाग, मेडिसिन विभाग, एक्स रे विभााग, सोनग्राफी विभग, ईसीजी विभाग या मोफत विशेष सुविधा तसेच औषधांच्या दरात १० टक्के सवलतही मिळणार आहे. वसई-विरार भागातील पहिले आणि मोठे स्टेनलेस स्टीलचे ऑपरेशन थिएटर असणारेही हे पहिलेच रुग्णालय असणार आहे. मेडिसीन (मलेरिया, डेंग्यू, टॉयफाईड, हार्टअॅटॅक, उच्च रक्तदाब,मधुमेह, अर्धांगवात व अन्य आजार) ऑर्थोपेडिक (क्नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट, लहान-मोठे फ्रॅक्चर्स, अपघात, स्पाईन सर्जरिज व इतर) जनरल सर्जरिज् (स्तनाचा कर्करोग, रेक्टल कॅन्सर, अॅपेंडिक्स, हर्निया, मूळ्याध व इतर) युरोल़ॉजी(ब्लॅडर कॅन्सर, मुतखडा व इतर), पॅथोलॉजी (सीबीसी, मलेरिया पॅरासाईट, रक्तगट, युरिन व स्टुल आरआयएम, रक्तातील साखर व ग्लुकोज, किडणी, लिव्हर, लिपीड प्रोफाईल, कोलेस्टेरॉल) आणि डायग्नोस्टिक्स (सर्व प्रकारचे एक्स रे सोनोग्राफी, इसीजी) आदी विभाग रुग्णालयात असणार आहेत. त्याचाही भरलेल्या वार्षिक शुल्कातच लाभ घेता येणार आहे.

जनसेवा हेल्थकेअर रुग्णालयाचे आणखी एक खास वैशिष्ठ्य म्हणजे प्रत्येक सदस्याचे इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेक़ॉर्ड (ईएमआर) ठेवले जाणार असून ते सर्व्हरवर सुरक्षित असेल. या संपूर्ण रुग्णालययात ११० खाटा (बेड्स) असून एसआयसीयु व आयसीयुचे प्रत्येकी एक असे दोन आणि चार सर्वसाधारण वॉर्ड्स असणार आहेत. रुग्णालयासाठी २१ तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टर्स व इतर १५४ जण असा एकूण १७५ जणांचा स्टाफ असणार आहे.


या पाच जणांनी जनसेवा हेल्थकेअर रुग्णालयाच्या माध्यमातून सुरु केलेला हा उपक्रम निश्चितच अभिनंदनीय व कौतुकास्पद आहे. त्याचे अन्य ठिकाणीही अनुकरण होणे आवश्यक आहे. सामाजिक संस्था, नगरपालिका किंवा महानगरपालिका यांच्या पातळीवरही असा उपक्रम सुरु करता येऊ शकेल. मात्र त्यासाठी प्रखर इच्छाशक्तीची गरज आहे.

या बाबत अधिक माहिती व संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक

९१६८४९०२०२/९९२३५५६४८३/९८६०९३०२२२

शनिवार, १९ मार्च, २०१६

मिळून साऱया जणांचे पंचगव्य चिकित्सालय


पचंगव्य चिकित्सा अर्थात गोमुुत्र उपचार पद्धतीबाबत आता समाजात हळूहळू जागृती व्हायला सुरुवात झाली आहे. अॅलोपॅथीचे दुष्पपरिणाम समोर येऊ लागल्याने अॅलोपॅथीला पर्याय म्हणून या चिकित्सेकडे पाहिले जात आहे. आपल्याकडे प्राचिन काळापासून गाईला पवित्र मानले गेले आहे. गाईचे मूत्र, दूध, दही, तूप, शेण या पाच घटकांचा वापर आणि अन्य पुरक वनौषधी किंवा आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर यात केला जातो. महाराष्ट्राच्या विविध भागात गोपालन, गोसेवा आणि गोमूत्रावर संशोधन व त्यापासून विविध औषधे व उत्पादनांची निर्मिती केली जात आहे. सुशिक्षित व उच्चशिक्षित तरुण वर्गही याकडे आता वळायला लागला आहे. आमोद केळकर यांनी प्रद्युम्न गोडबोले, श्रीनाथ आगाशे, योगेश राऊत, पुनम राऊत, गोरक्ष वाल्हेकर, विजय खुटवड, मेहुल आंबेकर या उच्चशिक्षित तरुणांसोबत २०१४ मध्ये वेदिक फार्म्सचे काम सुरु केले. सहा गायींपासून सुरुवात झाली आज त्यांच्याकडे १८ गायी, १ नंदी आणि काही वासरे अशी गोधनाची एकूण ३५ इतकी संख्या आहे.

या सगळ्यांनी मिळून वेदिक फार्म्स पंचगव्य चिकित्सालय सुरु केले असून त्याचे उदघाटन रविवार २० मार्च रोजी चेन्नई येथील पंचगव्य गुरुकुलाचे गव्यसिद्धाचार्य निरंजनी वर्मा यांच्या प्रमुख आहे. ते स्वत चिकित्सा करुन या चिकित्सालयाची सुरुवात करणार आहेत. स्वदशी प्रचारक व दिवंगत राजीव दीक्षित यांचे सहकारी प्रा. मदनभाई हे ही या वेळी उपस्थित राहणार आहेत. स्वदेशी प वेदिक फार्म्स पंचगव्य चिकित्सालय व संशोधन केंद्र मुक्काम व पोस्ट-बावडा, तालुका-खंडाळा आणि जिल्हा सातारा येथे आहे.

वेदिक फार्म्स पंचगव्य चिकित्सालय व संशोधन केंद्रातर्फे चंद्रमा अर्क, तुलसी अर्क, त्रिफळा टॅब्ज, अर्जुन टॅलब्ज, पेन रिलीफ ऑईल, दंतमंजन, वेदिक मिल्क, वेदिक गोघृत आदी उत्पादनांची निर्मिती केली जाते.

अधिक माहिती व संपर्कासाठी आमोद केळकर यांचा संपर्क क्रमांक

९०११६४८३८३

शुक्रवार, १८ मार्च, २०१६

गोसेवा प्रचारक-अरुण ओक


एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात असा एक क्षण येतो की, त्याचे आयुष्य पालटून जाते. तो एखाद्या विशिष्ट ध्येयाने, उद्देशाने आणि कामाने पूर्णपणे झपाटला जातो. आपले पुढील आयुष्य केवळ त्याच कामासाठी वाहून घेण्याचा मनाशी निश्चय करतो. समाजामध्ये अशी माणसे तशी कमीच, पण ही माणसे आपल्या कामाने इतरांपुढे आदर्श निर्माण करतात. अन्य लोकांसाठीही प्रेरणास्थान ठरतात. सध्याच्या काळात अपवाद वगळता प्रत्येक जण आपण आणि आपले कुटुंब एवढय़ाच वर्तुळापुरता मर्यादित असतो. त्यामुळे समाजासाठी काही करणे किंवा एखाद्या विशिष्ट ध्येयाने काम करणे तसे विरळाच. नोकरी-व्यवसायातून निवृत्ती घेतल्यानंतर आता आराम करूम्हणणारेच जास्त. मात्र त्यालाही अपवाद असतात. डोंबिवलीचे अरुण ओक हे असेच सन्माननीय अपवाद.

पंच ऑपरेटर, मशीन ऑपरेटर, कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून ‘लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो’त नोकरी, ‘टोटल क्वालिटी मॅनेजमेंट टीम’ तसेच नवी मुंबईतील सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया येथे ‘एचटीपीआय’ स्कीममध्ये व्याख्याते, त्यानंतर स्वत:ची ‘विजया इन्फोटेक’ ही कंपनी स्थापन करून ‘सॉफ्टवेअर इंजिनीयरिंग’ क्षेत्रासाठी सल्लागार म्हणून काम असा अनुभव ओक यांच्या गाठीशी जमा आहे. आता गेल्या आठ ते दहा वर्षांपासून ओक यांनी गोसेवा, गोउत्पादन व संशोधन या कामाला वाहून घेतले आहे. बदलापूर-वांगणीदरम्यान कासगाव येथे स्वामी समर्थ संप्रदाय वाडी आहे. या वाडीतील गोशाळेचे सर्व व्यवस्थापन ओक पाहतात. या कामात अधिक सुसूत्रता यावी यासाठी ‘गोवर्धन गोवत्स पालन सोसायटी’ या विश्वस्त न्यासाची स्थापना करण्यात आली आहे. अरुण ओक हे मूळचे रायगड जिल्हय़ातील. सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा या गावचे. त्यांचे वडील केशव गोपाळ ओक हे वेदशास्त्रसंपन्न होते. त्यांचा भिक्षुकीचा व्यवसाय होता. ओक यांचे बालपण दादर येथे गेले. छबिलदास शाळेत त्यांचे शिक्षण झाले. ९ एप्रिल १९४४ रोजी जन्मलेल्या ओक यांना पाच भाऊ. त्यात अरुण ओक यांचा चौथा क्रमांक. वडील गेल्यानंतर आर्थिक परिस्थिती बेताची झाली. शिक्षण अर्धवट सुटते की काय असे वाटत असतानाच शाळेचे प्राचार्य एम. एल. जोशी आणि मुख्याध्यापक बापट यांच्यामुळे त्यांना शाळेची फी माफी मिळाली. त्या दोघांमुळे आपले शिक्षण (तेव्हाची अकरावी मॅट्रिक) पूर्ण होऊ शकले, असे ओक कृतज्ञतेने सांगतात. १९६१ च्या सुमारास ओक कुटुंबीय (आई व तीन भाऊ) डोंबिवलीत राहायला आले. दरम्यानच्या काळात शिकत असतानाच त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात दोन रुपये रोजावर ‘लिपिक’ म्हणून नोकरी केली. या काळात विद्युत मंडळातील पी.जी. कुलकर्णी, बी.एन. धर्माधिकारी या अधिकाऱ्यांचीही त्यांना मोलाची मदत झाली. या दोघांनीही पुढे शिकण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले.

पुढे मुंबईच्या राज्य विद्युत मंडळाच्या विभागीय कार्यालयात बदली, कार्ड पंचिंगचा अभ्यासक्रम, राज्य विद्युत मंडळात लोअर डिव्हिजन क्लार्क, मुंबई विद्यापीठात पंच ऑपरेटर म्हणून नोकरी, तिथून ‘कॅलिको केमिकल्स’मध्ये पंच ऑपरेटर, नंतर ‘फिलिप्स’मध्ये ‘इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग सेंटर’ (ईडीपी) येथे व पुढे लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोमध्ये नोकरी असा प्रवास त्यांचा झाला. १९९८ मध्ये नोकरीतून बाहेर पडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोमधील नोकरी सोडल्यानंतर सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया येथे सल्लागार म्हणून काही काळ काम केले. या काळात ते बदलापूर-वांगणीदरम्यान असलेल्या स्वामी समर्थ संप्रदाय वाडीचे संस्थापक श्री स्वामी सखा यांच्या ते संपर्कात आले. श्री स्वामी सखा यांनी सुमारे तेरा एकर परिसरांत १९९५ मध्ये ही वाडी स्थापन केली आहे. दत्त संप्रदायाचे विचार, आध्यात्मिक शिकवण याच्या प्रसाराचे काम येथून चालते. येथे गुरुपंचायतन मंदिरासह दत्तावतारातील सोळा प्रमुख अवतारांची तसेच सूर्यमंदिर, हनुमान, रेणुकादेवी मंदिर आणि गोशाळाही आहे. या वाडीत ते काम करू लागले. याच दरम्यान दूरचित्रवाहिनीवरील एक कार्यक्रम त्यांच्या पाहण्यात आला. शरद पाटील (जिल्हा- लातूर, गाव- मावळ, तालुका-अहमदपूर) यांच्यावर दाखविण्यात आलेल्या त्या कार्यक्रमात केवळ पाच गाईंच्या पाठबळावर पाटील यांनी त्यांच्या मुलीला डॉक्टरकीपर्यंतचे शिक्षण कसे दिले हे दाखविण्यात आले होते. हे पाहून प्रभावित झालेल्या ओक यांनी हे सगळे स्वामी समर्थ संप्रदाय वाडीच्या श्री स्वामी सखा यांना सांगितले. त्यांनी ओक यांना वाडीच्या गोशाळेचे काम पाहण्याची सूचना केली आणि ओक यांचे गोसेवेचे काम सुरू झाले.

कामाला सुरुवात केल्यानंतर भिवंडीजवळील अनगाव, नेरळजवळील नसरापूर येथील गोशाळा, औरंगाबाद येथील पोटुळ गावी सुधीर विद्वांस यांचे सुरू असलेले गोसेवेचे काम आणि अशा प्रकारचे काम जेथे जेथे सुरू आहे त्या त्या ठिकाणी ओक यांनी भेट दिली. गोमूत्रापासून अर्कनिर्मिती, साबण, कीटकनाशके, फिनेल तयार करणे याचे प्रशिक्षण घेतले. संकरित गाईंची निर्मिती करणे ते गोसेवा व अन्य आनुषंगिक कामांची सर्व माहिती त्यांनी घेतली. काही कार्यशाळांमध्येही ते सहभागी झाले. या सगळ्या कामात त्यांना डॉ. नितीन मरकडेय, मिलिंद देवल, डॉ. विनायक रानडे या तज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले व आजही मिळते आहे. गोमूत्र आणि पंचगव्य (गाईचे गोमूत्र, शेण, दूध, दही आणि तूप) यावर वेगवेगळे प्रयोग व संशोधन होत आहे. पाश्चिमात्य देशातही यावर संशोधन सुरू आहे. गोमूत्र सेवनाने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, गोमूत्रापासून तयार केलेली औषधे मधुमेह, कर्करोग आणि अन्य विकारांवरही उपयोगी ठरत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आमच्या स्वामी समर्थ संप्रदाय वाडीच्या गोवर्धन गोवत्स पालन सोसायटीतर्फेही आम्ही यावर काम व संशोधन करत आहोत. वेगवेगळ्या आजारांवर विविध प्रकारचे आठ गोमूत्र अर्क तसेच दंतमंजन, उटणे, साबण, गोघृत, वातावरणशुद्धी स्प्रे, गोमूत्र फिनेल, फेसपॅक आणि अन्य उत्पादने तयार करायची आहेत. या सर्व उत्पादनांची निर्मिती आणि विक्री यासाठी शासकीय मान्यता मिळविण्याची प्रक्रिया आम्ही सुरूकेली आहे. रीतसर मान्यता मिळाल्यानंतर आमची ही उत्पादने बाजारात विक्रीसाठी आणली जातील. सध्या आमच्या गोशाळेत १२ गाई, ५ वळू आणि ८ वासरे असल्याची माहितीही ओक यांनी दिली. गाय मेल्यानंतर तिचा मृतदेह वर्षभर जमिनीत पुरून ठेवला तर त्यापासूनही उत्तम असे खत तयार होते. ते शेतीसाठी उपयुक्त ठरते. गाईच्या शेणाच्या गोवऱ्यांची ऑनलाइन विक्रीही चांगली होत आहे. गीर जातीच्या एका गाईची किंमत सुमारे ४० हजार, तर थारपारकर जातीच्या एका गाईची किंमत एक लाख रुपयांपर्यंत असते. माणसाप्रमाणे गाईलाही रक्तदाब असतो. एका गाईला दररोज सुमारे ६ किलो ओले गवत, ६ किलो सुका चारा (त्यात मिठाच्या व गुळाच्या पाण्याचा थोडासा शिडकावा) लागतो, अशी माहितीही ते गप्पांच्या ओघात देतात.

अरुण ओक यांच्या या कामात त्यांना मुलगा मनोज, सून मानसी, नातू मोहित, मुलगी ऋजुता जोशी, जावई भूषण यांचा नैतिक व सक्रिय पािठबा आहे. अनुभव, वाचन, अभ्यास यातून शिकत गेलो. पंचगव्यावर संशोधन व त्यापासून उत्पादन निर्मिती यावर आता काम करायचे ठरविले असल्याचे ओक सांगतात.

अरुण ओक यांचा संपर्क क्रमांक- ९८२०२९३४०१

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता-ठाणे/१८ मार्च २०१६/ पान क्रमांक ७)

लोकसत्ता-ठाणेमधील लेखाची लिंक http://epaper.loksatta.com/c/9174061

मंगळवार, १५ मार्च, २०१६

माकडीण आणि काकांचे अभय सिचंन


माकडीण आणि काकांचे 'अभय' 'सिंचन'! माकडीणीची गोष्ट आठवते कां? नाका तोंडात पाणी जाईपर्यंत माकडीण त्या पिल्लाला डोक्यावर घेते, पण जेंव्हा तिच्याच नाकातोंडात पाणी जायला लागते तेंव्हा मात्र ती स्वतः त्याच्या डोक्यावर उभी राहाते आणि आपला जीव वाचवते. ही गोष्ट आत्ताच आठवण्याचे कारण आहे. इतिहासात 'काका मला वाचवा' अशी याचना एका पुतण्याने काकांकडे केली होती पण काकांनी ती हाक ऐकलीच नाही. वर्तमानातील एका पुतण्याने 'काका मला वाचवा' अशी आरोळी ठोकताच हे काका त्याच्या मदतीला धावून गेले आणि 'भुजां'मधील 'बळ' कमी झालेल्या चेल्याचा व त्याच्या पुतण्याचा कसा बळीचा बकरा केला हे पाहायला मिळाले. याला म्हणतात अभयाचे 'सिंचन'! वर्तमानातील हे चित्र पाहून मला आपली माकडीणीची गोष्ट आणि इतिहासातले व वर्तमानातील काका आठवले. वास्तवात याचा काही संबंध आहे की नाही माहिती नाही, असलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा.

रविवार, १३ मार्च, २०१६

जुना 'पिंजरा' पुन्हा नव्याने


हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ ‘पब्लिसिटी डिझायनर’ श्रीकांत धोंगडे यांनी ४४ वर्षांपूर्वी (१९७२) ‘पिंजरा’ची जाहिरात केली होती आणि आज नवा साज घेऊन सादर होणाऱ्या ‘पिंजरा’ची जाहिरातही धोंगडे यांनीच केली आहे.

तमाशातील स्त्रीच्या नादी लागल्यामुळे एका शिक्षकाची झालेली वाताहात ‘पिंजरा’ चित्रपटात मांडण्यात आली. त्या काळी हा चित्रपट आणि त्यातील सर्व गाणी हिट ठरली. ४४ वर्षांपूर्वी सादर झालेल्या या चित्रपटावर काही तांत्रिक प्रक्रिया करून तो पुन्हा येत्या १८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चित्रपटाला किंवा त्यातील गाण्यांना, मूळ चालींना संगीतकार अविनाश-विश्वजित यांनी आधुनिक पाश्र्वसंगीताची जोड दिली आहे. मूळ चित्रपटातील काही प्रसंगाना नव्या ध्वनीचीही जोड देण्यात आली आहे. गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून चित्रपटाच्या मूळ प्रिंटवर तांत्रिक प्रक्रिया करण्याचे हे काम सुरू आहे. मूळ अभिजात कलाकृतीला कुठेही धक्का न लावता ‘पिंजरा’ पुन्हा प्रेक्षकांसाठी सादर होणार आहे. त्याला कसा प्रतिसाद मिळतो याची उत्सुकता सर्वानाच आहे. त्या निमित्ताने..

व्ही. शांताराम दिग्दर्शित व डॉ. श्रीराम लागू, संध्या, वत्सला देशमुख, निळू फुले यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘पिंजरा’ हा मराठी चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे. चित्रपटातील ‘आली ठुमकत नार’, ‘दे रे कान्हा चोळी आणि लुगडी’, ‘छबीदार छबी मी तोऱ्यात उभी’, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’, ‘मला इष्काची इंगळी डसली’ ही आणि अन्य सर्व गाणी/लावण्या आजही लोकप्रिय आहेत. जगदीश खेबुडकर यांची गाणी आणि राम कदम यांच्या संगीताची जादू कायम आहे. विविध पुरस्कार सोहळ्यांमध्ये सादर होणाऱ्या नृत्याविष्काराच्या कार्यक्रमात ‘पिंजरा’मधील काही गाणी हमखास असतातच. चित्रपटातील गाण्यांच्या मूळ चालींना संगीतकार अविनाश-विश्वजित यांनी आधुनिक पाश्र्वसंगीताची जोड दिली आहे. मूळ अभिजात

कलाकृतीला कुठेही धक्का न लावता ‘पिंजरा’ पुन्हा प्रेक्षकांसाठी सादर होणार आहे.
नव्याने सादर होणाऱ्या या चित्रपटाचे एक ठळक वैशिष्टय़ आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ ‘पब्लिसिटी डिझायनर’ श्रीकांत धोंगडे यांनी ४४ वर्षांपूर्वी (१९७२) ‘पिंजरा’ची जाहिरात केली होती आणि आज नवा साज घेऊन सादर होणाऱ्या ‘पिंजरा’ची जाहिरातही धोंगडे यांनीच केली आहे. या संदर्भात ‘रविवार वृत्तान्त’शी बोलताना ते म्हणाले, बॉम्बे पब्लिसिटीचे वसंत साठे यांनी माझे नाव व्ही. शांताराम यांना सुचविले. चित्रपटाचे बॅनर, पोस्टर याचे काम ‘राजकमल’च्याच विभागाकडून केले जाणार होते. माझ्याकडे वर्तमानपत्रासाठी ‘पिंजरा’च्या जाहिराती करण्याचे काम सोपविण्यात आले. वर्तमानपत्रासाठी जाहिरात करताना तेव्हा फोटोचा ब्लॉग, हाफटोन फोटोला स्क्रीन टाकणे, फोटोवरून लाइनवर्क असे सर्व सोपस्कार करावे लागायचे. चित्रपटाच्या जाहिरातीसाठी अभिनेत्री संध्या यांचा पदर वाऱ्याने उडतोय अशा नृत्याच्या आविष्कारातील त्यांचे छायाचित्र मला मिळाले. डॉ. श्रीराम लागू यांच्या छायाचित्रावरून लाइन ड्रॉईंग करून झाले पण संध्या यांच्या छायाचित्रावरून लाइन ड्रॉईंग करणे अवघड जात होते. त्यांच्या नाकाची ठेवण अचूकपणे उतरत नव्हती. वेगवेगळ्या प्रकारे २८ वेळा प्रयत्न केले. अखेर तांत्रिक सोपस्कार पूर्ण करून ‘पिंजरा’ची वर्तमानपत्रासाठीची जाहिरात तयार झाली. व्ही. शांताराम यांना ती जाहिरात दाखविल्यानंतर मी केलेल्या जाहिरातीवर त्यांनी शिक्कामोर्तब केले.

पूर्वी वर्तमानपत्रांसाठी जाहिरात करताना ती कृष्णधवल रंगातच करावी लागत असे. आता जाहिराती रंगीत झाल्या आहेत. जाहिरातीसाठी जे छायाचित्र वापरायचे आहे, त्यात काही दोष असेल तर तो आता संगणकावर दूर करून ते छायाचित्र एकदम छान करता येते. मात्र पूर्वी तशी सोय नव्हती. छायाचित्रात दोष असेल तर त्यात फार काही सुधारणा करता यायची नाही. आता संगणकामुळे सगळे काम झटपट व सोपे झाले आहे. मात्र तंत्रज्ञान कितीही पुढे गेले असले आणि संगणकावर सर्व काही करता येत असले, तरीही संगणक केवळ ‘ऑपरेट’ करतो तो ‘क्रिएट’ करू शकत नाही. एखादी कल्पना, सर्जनशिलता ही माणसाच्या मेंदूमधूनच बाहेर पडते. त्यामुळे या कलेतसर्जनशीलतेला आणि माणसाच्या हाताला आजही तेवढेच महत्त्व असल्याचे धोंगडे यांनी सांगितले. हा चित्रपट ज्यांच्यामुळे नव्या पिढीला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे ते पुरुषोत्तम लढ्ढा म्हणाले, ‘पिंजरा’सारखी अजरामर कलाकृती आत्ताच्या पिढीसमोर यावी, या एकमात्र उद्देशाने आम्ही हा सगळा घाट घातला आहे. चित्रपटाच्या मूळ प्रिंटवर तांत्रिक सोपस्कार करून आणि नवे रंगरूप देऊन हा चित्रपट आम्ही प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहोत. मूळ प्रिंटचे २ के स्कॅनिंग करून नवी अद्ययावत प्रिंट तयार करण्यात आली आहे. हॅण्ड क्लिनिंग, अल्ट्रासॉनिक क्लिनिंग, ऑडिओ ग्रॅम्बिंग, कलर ग्रेडिंग आदी तांत्रिक प्रक्रिया करण्यात येऊन चित्रपटाला आधुनिकतेचा साज चढविण्यात आला आहे. या तांत्रिक कामाची जबाबदारी प्रामुख्याने ज्यांनी पाहिली ते ‘लाइन प्रोडय़ुसर’ मंदार खानविलकर यांनी सांगितले, चित्रपटाची निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मूळ प्रिंट खूप पुसट झालेली होती. त्यातील रंग एकमेकांमध्ये मिसळले गेले होते. प्रसाद लॅबच्या चेन्नई आणि मुंबई येथील प्रयोगशाळेत त्यावर सर्व तांत्रिक सोपस्कार करण्यात येऊन चित्रपटाच्या प्रिंटला आधुनिक साज चढविण्यात आला. गेले साडेतीन महिने हे काम सुरू आहे.

हे अनुभवण्यासाठी अण्णा हवे होते! ‘पिंजरा’ चित्रपटाला ४४ वर्षांपूर्वी अमाप यश आणि लोकप्रियता मिळाली. चित्रपटातील सर्व गाणी तेव्हा लोकप्रिय झाली आणि आजही ती तेवढीच लोकप्रिय आहेत. आता पुन्हा एकदा नव्याने ‘पिंजरा’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आताच्या पिढीकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास वाटतो. हे सर्व अनुभवण्यासाठी व्ही. शांताराम ऊर्फ अण्णा असायला हवे होते. आज त्यांची प्रकर्षांने आठवण येत आहे. मी आणि संध्या आम्ही दोघीही बहिणी. आमच्या दोघींची एकत्र भूमिका असलेला एखादा चित्रपट असावा, असे संध्याला खूप वाटायचे. ‘पिंजरा’च्या निमित्ताने तो योग जुळून आला आणि अण्णांमुळे चित्रपटातही मी संध्याच्या मोठय़ा बहिणीची ‘आक्का’ची भूमिका साकारली. चित्रपटावर अण्णांनी खूप मेहनत घेतली. चित्रपटातील सर्वच छोटय़ा-मोठय़ा भूमिकेचे त्यांच्या दृष्टीने महत्त्व होते. त्यामुळे चित्रपटातील सर्वच भूमिका ठळकपणे आजही लक्षात राहणाऱ्या ठरल्या. चित्रपटात भूमिका करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला महत्त्व देऊन, त्याच्याशी चर्चा करून, सल्लामसलत करून चित्रपट तयार केला. वत्सला देशमुख, ज्येष्ठ अभिनेत्री

(पूर्वप्रसिद्धी लोकसत्ता-मुंबई/ रविवार वृत्तान्त/१३ मार्च २०१६)

सोमवार, ७ मार्च, २०१६

मुकबधिर मुलांची शाळा उभारणारी माऊली

माझी मामी सौ. अपर्णा आगाशे हिने मुकबधीर मुलांसाठी १९९२ मध्ये संवाद कर्णबधिर प्रबोधिनी ही शाळा सुरु केली. या शाळेविषयी दैनिक प्रहारच्या प्रवाह पुरवणीत (६ मार्च २०१६) आलेला लेख

मुकबधिर मुलांची शाळा उभारणारी माऊली ‘आई’ म्हणजे केवळ दोन शब्द नव्हे तर संपूर्ण विश्व त्यामध्ये सामावलेले असते. आपल्या मुलांसाठी काहीही करायला नेहमी सज्ज राहणारी आई सर्वानाच ठाऊक आहे. Untitled-TrueColor-04‘आई’ म्हणजे केवळ दोन शब्द नव्हे तर संपूर्ण विश्व त्यामध्ये सामावलेले असते. आपल्या मुलांसाठी काहीही करायला नेहमी सज्ज राहणारी आई सर्वानाच ठाऊक आहे. मात्र, अपर्णा आगाशे या सर्वसामान्य माऊलीने चक्क आपल्या कर्णबधिर मुलाला समाजात आत्मविश्वासाने वावरता यावे, तो स्वावलंबी व्हावा, यासाठी १९९२ साली स्वत: शाळा स्थापन केली. गेली १५ र्वष त्या डोंबिवली पश्चिम भागात ‘संवाद कर्णबधिर प्रबोधिनी’ ही विशेष शाळा चालवत आहेत.

लहान मुलगा अमेय आगाशे ‘अस्तित्व’ या शाळेत शिकत असताना तेथील अपंग मुलांच्या महिला पालकांनी एकत्र येऊन ‘संवाद कर्णबधिर प्रबोधिनी’ ही शाळा सुरू केली. केवळ सात महिलांनी एकजूट होऊन आपल्या मुलांसाठी एक लहानसे रोपटे लावले. मात्र, आता या रोपटय़ाचे मोठय़ा वृक्षात रूपांतर झाले आहे. सुरुवातीला अपर्णा आगाशे यांच्या लहान घरातून या शाळेची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी शाळेत पाच ते सहा मुलं असायची. परंतु त्यानंतर मुलांची संख्या वाढत गेल्याने बसण्यासाठी जागा अपुरी पडायला लागली.

घरात शाळा असल्याने शासनमान्यता मिळत नसल्याच्या कारणास्तव त्यांनी आरोग्यक्रेंद्र बिल्डिंग, काळुनगर, ठाकूर वाडी, डोंबिवली (प.) येथे एक जागा भाडेतत्त्वावर घेतली. सध्या या शाळेला सरकारमान्यता प्राप्त झालेली आहे. कर्णबधिर मुलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी या शाळेचे संचालक मंडळ व शिक्षकवर्ग प्रयत्नशील आहे. याशिवाय सध्या शाळेत एकूण ४५ मुलं आहेत. मुळात शाळेत प्रवेश घेण्यासाठी मुलं येत नाहीत. आगाशे आणि शाळेतील शिक्षक प्रत्येकाच्या घरी जाऊन अशा कर्णबधिर मुलांचे सर्वेक्षण करतात. त्यांना अशी मुलं आढळल्यास त्यांच्या पालकांची समजूत काढून त्यांना शाळेत प्रवेश देण्यात येतो. आता बहुतांश लोकांना या शाळेबाबत माहिती मिळालेली आहे. परंतु तरीही संचालक मंडळ विविध परिसरात जाऊन अशा मुलांचा शोध घेतात. संवाद कर्णबधिर प्रबोधिनी या शाळेचे वैशिष्टय़ म्हणजे येथे आíथकदृष्टय़ा दुर्बल घटकातील मुलांना विशेष प्राधान्य देण्यात येते. कारण, अशा मुलांना शाळेत घालण्यासाठी त्यांच्या पालकांकडे पैसा नसतोशाळा. त्यामुळे ही मुलं शिक्षणापासून वंचित राहतात. या शाळेच्या माध्यमातून या गरजू मुलांसाठी एक विश्व मंडळाने तयार केले आहे. ही मुलं इतरांपेक्षा कमी नाहीत. त्यामुळे इतर शाळांमधील मुलांप्रमाणेच या मुलांना सुद्धा सर्व विषय शिकविण्यात येतात. शिशू गटातील मुलांना विशेष मार्गदर्शन, व्यवसायभिमुख शिक्षणाची पूर्वतयारी, मुलांच्या आरोग्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. सर्व प्रकारच्या अपंग मुलांना शासकीय योजनांची माहिती देण्यात येते.

शिशू वर्गापासून सातवी ते नववीपर्यंत मुलांना शिकविण्यात येते. त्यानंतर शाळाबाह्य मुलांना सतरा नंबरचा फॉर्म भरून दहावीच्या परीक्षेला बसविण्यात येते. या मुलांना लहानपणापासूनच संगणकाचे धडे गिरविण्यात येत आहेत. ठाणे, मुंबई, नाशिक, कल्याण परिसरातील होणा-या कला, क्रीडा बौद्धिक स्पर्धामध्ये राज्यस्तरीय नाटय़ स्पध्रेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकावली आहेत. कर्णबधिर विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व जडणघडण होण्यासाठी शाळेत कवायत स्पर्धा, भाषा आकलन स्पर्धा, स्मरणशक्ती स्पर्धा, अभ्यासपूर्ण सहली व भेटीचे आयोजन, क्रीडास्पर्धा या मुलांना सामाजिक जाणिवांची जाण होण्यासाठी रेल्वेस्थानक परिसर स्वच्छ करणे, रुग्णालयात जाऊन रक्षाबंधन करणे, सर्वधर्मीय सण- उत्सव साजरे करणे याकडे लक्ष दिले जाते. त्याचबरोबर हवाईदलाची माहिती देणे, हिवताप निर्मूलनासाठी परिसरातील साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे, अपंगांच्या हक्कासाठी व जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढण्यात येते. आजपर्यंत या शाळेचा एस.एस.सी. निकाल १०० टक्के लागला आहे. संवाद कर्णबधिर प्रबोधिनीतील इन्फंट सेंटरचा रत्नागिरी, डहाणू येथील कर्णबधिर मुलांनी लाभ घेतला आहे.

कर्णबधिर मुलांच्या शाळेतील शिक्षक हे विद्यार्थ्यांचे सहावे इंद्रिय म्हणून काम करीत असतात. त्यामुळे ही मुले प्रगती करतात. योग्य वयात योग्य असे श्रवणहासाचे निदान करून श्रवणयंत्र मिळवून देणे आवश्यक असते. योग्य श्रवणयंत्र न मिळाल्यास भाषा व ज्ञानापासून त्यांना वंचित राहावे लागते. म्हणून शाळा मुलांना योग्य ते श्रवणयंत्र मिळवून देण्याचा प्रयत्न करत असते. कर्णबधिर मुलांच्या विविध आíथक, शारीरिक इतर अडचणी सोडविण्याचा प्रयत्न शाळेत केला जातो. विद्यार्थ्यांना इतर दानशूर व्यक्तींकडून शालेय साहित्य, पोषक आहार मिळावा यासाठी विश्वस्त शिक्षण जागरूक असतात. त्यामुळे या शाळेला पुढे नेण्यासाठी प्रबोधिनीच्या संचालक मंडळ व शिक्षकांची अखंड धडपड सुरू असते. त्यामुळे एका लहानशा रोपटय़ाचे आता मोठय़ा वटवृक्षात रूपांतर झाले आहे. (दैनिक प्रहार/६ मार्च २०१६/प्रवाह पुरवणी/

http://prahaar.in/collag/390258

सौ.अपर्णा आगाशे यांचा संपर्क क्रमांक ७७३८७११०३२

मान्यवरांच्या पत्रांचा संग्रह

विविध क्षेत्रातील मान्यवरांचे हस्ताक्षर संग्रही असावे या उद्देशाने मान्यवरांना मी वाढदिवस, दिवाळी शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने पत्र पाठवत असे. हा छंद मी शाळा-कॉलेजपर्यंत जोपासला होता. त्यातून हा पत्रसंग्रह तयार झाला आहे.