गुरुवार, ११ मे, २०२३

राजीनामा देऊन उद्धव ठाकरे तोंडावर आपटले

 

राजीनामा देऊन उद्धव ठाकरे तोंडावर आपटले 

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला.  उद्धव ठाकरे यांची ही चूक त्यांच्यासाठी आणि महाविकास आघाडीसाठीही महागात पडली आहे. उद्धव ठाकरे यांनी तेव्हा राजीनामा दिला नसता तर आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कदाचित वेगळे चित्र पाहायला मिळाले असते. 

सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनीही उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर भाष्य केले होते. जर तुम्ही विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेला असता  (ज्यात खुल्या पद्धतीने मतदान होते) आणि जर हरला असतात तर त्या आमदारांमुळे नेमका काय परिणाम झाला ते स्पष्ट झाले असते. कारण त्या आमदारांमुळे तुम्ही विश्वासदर्शक ठराव हरला असतात तर ते अपात्र ठरल्यानंतर तुम्ही तो ठराव जिंकला असता, असे सरन्यायाधीश म्हणाले होते.

तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोणत्याही ठोस पुराव्यांशिवायच उद्धव ठाकरे सरकार अल्पमतात आल्याचा आंदाज बांधून त्यांना बहुमत चाचणी घेण्यास सांगितले. कोश्यारी यांचा हा निर्णय अवैध होता, असेही न्यायालायने आज नमूद केले. 




उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता, तर आत्ता कदाचित निकाल वेगळा लागला असता, असे आता काही राजकीय विश्लेषक आणि कायद्याचे अभ्यासक म्हणू लागले आहेत. महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा दस्तुरखुद्द शरद पवार यांनीही काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांना विश्वासात न घेता उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता, असे सांगितले होते. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकातही विवेचन केले आहे

उद्धव ठाकरेंनी जर बहुमत चाचणीआधी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता, तर पुन्हा पूर्वस्थिती कायम करता आली असती. पण त्यांनी राजीनामा दिल्यामुळे आता त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसवता येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. 

२१ जून २०२२ रोजी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बंडखोर गटाने वेगळा मार्ग स्वीकारल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला. शिंदेंसमवेत बंड केलेल्या आमदारांनी भाजपाच्या आमदारांसह राज्यपालांना सरकारच्या भूमिकांशी सहमत नसल्याचे सांगितले आणि उद्धव ठाकरे सरकारकडे बहुमत नसल्याचाही दावा केला. 

त्यावर राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणीला सामोरे जाण्याचे आदेश दिले. या आदेशांना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. २९ जूनला दुपारी न्यायालयाचा निकाल आल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयानंतर माझ्यावर माझ्या घराण्याचे संस्कार आणि शिकवण आहे. म्हणूनच मी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला, असे  माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सत्तेत बसलात तेव्हा ही नैतिकता कुठल्या डब्यात बंद करून ठेवली होती? असा टोला उद्धव ठाकरे यांना हाणला.

उद्धव ठाकरे यांच्या बदसल्लागारांनी त्यांना राजीनामा द्या, असा दिलेला सल्ला किती महागात पडला? याचा पश्चात्ताप उद्धव ठाकरे यांना आता होत असला तरी आता वेळ निघून गेली आहे. 


झळाळती शंभरी- लंडन जोशी


 डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवारातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या झळाळती शंभरी या ग्रंथात माझे आजोबा वामन दिनकर जोशी यांच्यावरील लेख आहे. 



लंडन येथे ३१ जुलै ते १३ ऑगस्ट १९२९ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या जागतिक स्काऊट जांबोरीसाठी माझे आजोबा एक महिन्याचा बोटीचा प्रवास करून लंडनला गेले होते. त्याकाळी डोंबिवलीतून परदेशी गेलेली पहिली व्यक्ती म्हणजे माझे आजोबा. याविषयीची माहिती झळाळती शंभरी या ग्रंथात देण्यात आली आहे.





सोमवार, ८ मे, २०२३

कर्तव्य पथावर भारतीय स्त्री शक्तीचा आविष्कार!

 


कर्तव्य पथावर भारतीय स्त्री शक्तीचा आविष्कार! 

पुढील वर्षी म्हणजे २०२४ च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे कर्तव्य पथावर होणा-या संचलनात भारतीय स्त्री शक्तीचा आविष्कार सादर होणार आहे.‌ या संचलनात संपूर्ण महिला पथकांचा सहभाग असा प्रस्ताव केंद्र शासनाच्या विचाराधीन आहे. 

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावरील संचलनामध्ये फक्त महिलांची पथके, बॅण्ड, सादरीकरण आणि चित्ररथ असावेत, यावर विचार सुरु आहे. 

गेल्या काही वर्षांमध्ये संपूर्ण महिला पथक, महिला अधिकारी कर्तव्यपथावरील संचलनामध्ये सहभागी होत आहेत. यावर्षी २६ जानेवारीला झालेल्या ७४व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये भारताने आपले लष्करी सामर्थ्य आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविले. त्यावेळी ‘स्त्री शक्ती’ ही मध्यवर्ती संकल्पना होती. २०२३च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये भारतीय हवाई दलाच्या १४४ जवानांच्या संचलन तुकडीचे नेतृत्व एका महिला अधिकाऱ्याने केले होते.

 देशाचा पहिला प्रजासत्ताक दिन सोहळा १९५०मध्ये मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर पार पडला होता. १९५१पासून राजपथावर संचलन होत आहे. विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेश, अनेक विभाग, राज्ये आणि मंत्रालये दरवर्षी कला, संस्कृती, वारसा आणि सामर्थ्याचे दर्शन घडवतात. 

२०२३च्या संचलनामध्ये केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र आणि त्रिपुरा या राज्यांच्या चित्ररथांची ‘नारी शक्ती’ ही प्रमुख संकल्पना होती

बुधवार, १९ एप्रिल, २०२३

पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे 'पुस्तक रस्ता' उपक्रम

पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे २३ एप्रिल रोजी 

डोंबिवलीत' पुस्तक रस्ता' उपक्रमाचे आयोजन 

- महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पहिला, आगळा उपक्रम 

पुस्तकाचा प्रचार आणि प्रसार याबरोबरच वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी यासाठी पै फ्रेंड्स लायब्ररी विविध उपक्रम राबवित असते. याचाच एक भाग म्हणून पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे जागतिक पुस्तक दिनानिमित्त येत्या २३ एप्रिल रोजी पहाटे ५ ते सकाळी १० या वेळेत 'पुस्तक रस्ता' उपक्रमातचे आयोजन करण्यात आले आहे.


हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिला उपक्रम असल्याचे पै फ्रेंड्स लायब्ररीचे संस्थापक संचालक पुंडलिक पै यांनी सांगितले. डोंबिवली पूर्व येथे मॉडर्न कॅफे ते अप्पा दातार चौकापर्यंतर स्त्यावर गालिचा अंथरून विविध विषयांवरील सुमारे एक लाख पुस्तके मांडण्यात येणार आहेत. हे काम आदल्या दिवशी म्हणजेच २२ एप्रिल रोजी रात्री केले जाणार असल्याचे पै म्हणाले.

मांडण्यात येणारी पुस्तके बहुभाषिक असून यात कथा कादंबरी, ऐतिहासिक, अनुवादीत, विज्ञानविषयक पुस्तकांसह लहान मुलांच्या इंग्रजी व मराठी गोष्टींच्या पुस्तकांचा समावेश आहे. डोंबिवलीतील विविध संघटनांचे २०० हून अधिक स्वयंसेवक या उपक्रमात सहभागी होणार आहेत. येथे भेट देणा-या प्रत्येक वाचकाला पुस्तक रस्त्यावरील कोणतेही एक पुस्तक मोफत दिले जाणार आहे.

शेखर जोशी 

सोमवार, १० एप्रिल, २०२३

आणि ७२ वर्षांच्या प्रमोद नाईक यांनी कोलू फिरविण्याचा अनुभव घेतला

 


स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अंदमानात कोलूला जुंपून तेल काढण्याची अमानुष शिक्षा देण्यात आली होती. यावेळी त्यांना काय यातना भोगाव्या लागल्या असतील, त्याचा अनुभव आज मला आला, असे टाटा पॉवर कंपनीतील ७२ वर्षीय सेवानिवृत्त वरिष्ठ अभियंता प्रमोद नाईक यांनी रविवारी येथे सांगितले.

दादरच्या शिवाजी उद्यानासमोरील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या दर्शनी भागात अंदमानच्या तुरुंगाची प्रतिकृती आणि 

कोलूची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना तेल काढण्यासाठी ब्रिटिशांनी अंदमानात कोलूला जुंपले होते. उन्हात,पावसात ही शिक्षा दिली. हा अनुभव घेण्यासाठी नाईक यांनी सावरकर स्मारकाला कोलू फिरविण्यास अनुमती द्यावी अशी विनंती केली होती. 





हा कोलू थेट ऊन येत नाही तिथे आहे. मात्र तरीही सध्याचा उन्हाळा आणि कोलूची कृती यातून माणसाच्या अंगातून घामाच्या धारा तर निघतातच पण त्याशिवाय ताकद लावायला लागते, गोल फिरवत चक्करा माराव्या लागतात. मी अधूनमधून थांबून हा प्रयत्न केला मात्र नंतर दमल्याने तेथेच पथारी टाकून पडलो, असेही नाईक म्हणाले.

त्यानंतर सावरकर स्मारकाच्या कर्मचाऱ्यांनी मला आतमध्ये नेऊन विश्रांती घेण्याची व्यवस्था केली. विश्रांतीनंतर पुन्हा कोलू चालविण्यासाठी आलो पण पाय जडावले होते यामुळे काम थांबविले. यातून तेल निघण्यासाठी पांढरे नव्हे तर लाल शेंगदाणे वापरावे लागतात, असे तेथे आलेल्या एका तेल घाण्याच्या व्यावसायिकाने सांगितल्याने मी पांढरे शेंगदाणे टाकून जो प्रयत्न केला त्यातून आणखी वेळ जाणार हे नक्की झाले. त्यानंतर कोलू ओढता आला नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानात किती भीषण आणि भयावह त्रास सहन केला असेल, त्याची कल्पना करणेही कठीण असल्याचे नाईक यांनी सांगितले.

नाईक यांनी पहिल्यांदा बेड्या घालून कोलू ओढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या पँटवरूनही त्या बेड्यांमुळे कासले गेल्याने त्यांनी बेड्या काढून कोलू ओढला. त्यासाठी त्यांनी ५ किलो शेंगदाणे घेतले होते. त्यापैकी अडीच किलो शेंगदाणे कोलूमध्ये टाकले. कोलूला असलेला दांडा उचलणेही कठीण असून त्यासाठी दोन माणसे लागतात, हे त्यांना लक्षात आले. तर कोलू द्वारे सुमारे दोन ते अडीच तास त्यांनी थांबत थांबत कोलू चालवून शेंगदाणे बारीक केले.


(छायाचित्रे आणि चित्रफित स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र य. बिवलकर यांच्या सौजन्याने)

मंगळवार, २८ मार्च, २०२३

'नाना'ची टांग



क्रांतिकारकांचे मुकुटमणी आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी वंदनीय आहेत. युती आणि आघाडीच्या दळभद्री आणि गलिच्छ राजकारणात स्वातंत्र्यवीर सावरकर किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही, असे म्हणणेही त्या क्रांतीसूर्याचा अपमान आहे. 

काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या दोन्ही पक्षांची सावरकर यांच्याबाबतची भूमिका भिन्न आहे. ‘सावरकर’ आमच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाहीत. लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. पटोले यांचे हे वक्तव्य म्हणजे त्यांच्या सडक्या मेंदूचे लक्षण आहे. 

राहुल गांधी आणि काँग्रेसधील सडक्या मेंदूचे भोंदू आणि ढोंगी धर्मनिरपेक्षवादी नेते वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करत आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची मुस्लिम लांगुलचालनाची, हिंदुत्व द्वेषाची भूमिका नवी नाही आणि तरीही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आपला पक्ष दोन्ही काँग्रेसच्या दावणीला बांधला. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असतानाही राहल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी किंवा त्यांच्या नेत्यांनी, पक्षाने आजवर कधीही राहुल गांधी यांच्या विरोधात थेट आणि ठोस कृती केली नाही. 

परवा मालेगावच्या सभेतही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राहुल गांधी यांचा तोंडदेखला निषेध केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना तुम्ही खरोखरच दैवत मानत असता तर राहुल गांधी यांनी आजवर सावरकर यांचा वेळोवेळी जो अपमान केला त्यासाठी रस्त्यावर उतरायला हवे होते. मणिशंकर अय्यर विरोधात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी जी भूमिका घेतली होती ती भूमिका तुम्ही घ्यायला हवी होती. पण? ते होणार नाही.



आताही नाना पटोले यांनी ‘सावरकर’ आमच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाहीत, असे वक्तव्य केल्यानंतर तातडीने पटोले यांचा निषेध करणारे वक्तव्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून यायला हवे होते. आणि महाविकास सरकार स्थापन करण्यापूर्वी कॉंग्रेसने सावरकर’ किमान समान कार्यक्रमाचा भाग होऊ शकत नाहीत, अशी जर अट घातली होती तर त्याच वेळी सावरकरप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटना म्हणून ती अट धुडकावून लावायला हवी होती. पण मुख्यमंत्रीपदाच्या खूर्चीवर बसायची अतीघाई झाल्यामुळे तुम्ही याकडे दुर्लक्ष केलेत. आणि खरे तर त्याचवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुत्ववाला तुम्ही तिलांजली दिली हे सत्य आहे. 

शेखर जोशी

२८ मार्च २०२३

गुरुवार, २३ मार्च, २०२३

ठाकरे, फडणवीस यांची 'दिल दोस्ती' आणि बासनात गुंडाळलेली प्रकरणे

 ठाकरे, फडणवीस यांची 'दिल दोस्ती' 

आणि बासनात गुंडाळलेली प्रकरणे

 


'निनावी' पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना थेट वरुन अभय मिळाले? आणि म्हणून त्यांनी आपले कट्टर राजकीय हाडवैरी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी हसतखेळत गप्पा मारल्या? 

आधी अडीच वर्षे याच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर   किती गरळ ओकली होती? 

आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहखाते आहे. सुशांतसिंह, दिशा सालियन संशयास्पद मृत्यू प्रकरण, पालघर साधू हत्याकांड,  पत्राचाळ प्रकरण, करमुसे मारहाण, रश्मी उद्धव ठाकरे यांचे कथित बंगले, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि कुटुंबीय यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी, 'मातोश्री'च्या गळ्याशी आलेला 'पाटणकर' काढा‌ ही सगळी प्रकरणे देवेंद्र फडणवीस यांनी बासनात गुंडाळून ठेवली का? की गुंडाळून ठेवा म्हणून वरुन आदेश आले? 

सर्वसामान्य नागरिकांच्या मनात या घडलेल्या सर्व घटनांबाबत संशयाचे वातावरण आहे. त्या त्या वेळी भाजपने, भाजपच्या सर्व नेत्यांनी आणि दस्तुरखुद्द फडणवीस यांनीही त्यावेळी अगदी घसा खरवडून आवाज उठवला होता. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सत्ता स्थापन करून झाले की बरेच महिने. फडणवीस यांच्याकडेच गृहखाते आहे. काढा की सगळे पहिल्यापासून खणून. यावर, याची चौकशी केंद्रीय तपास संस्थांकडून सुरू आहे, असे तकलादू कारण पुढे केले जाईल. पण महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून जे तुमच्या हातात आणि अधिकारात आहे, ते तरी करा.

महाराष्ट्रात राजकीय शत्रुत्व नाही, आपली राजकीय संस्कृती, परंपरा वेगळी आहे, ही वाक्ये टाळ्या घेण्यासाठी ठिक आहेत. सत्ताधारी आणि विरोधक मग ते कोणत्याही राजकीय पक्षांचे असोत आतून सर्व एकमेकांशी मिळालेलेच असतात, एका मर्यादेपर्यंत एकमेकांच्या भानगडी, घोटाळे राजकीय सोयीसाठी बाहेर काढले जातात आणि नंतर बासनात गुंडाळूनही ठेवले जातात. 

विद्यमान सत्ताधारी विरोधक आणि विद्यमान विरोधक सत्ताधारी झाले की लुटुपुटूची लढाई सुरू होते. कोणी किती ताणायचे हे आधीच ठरलेले असते. त्या त्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, समर्थक मात्र एकमेकांचे गळे धरतात आणि सर्वपक्षीय राजकीय नेते पडद्याआड गळ्यात गळे घालून याची मजा लुटतात, हेच कटू आणि संतापजनक सत्य आहे. 

आम्ही योगायोगाने समोरासमोर आलो आणि म्हणून काही वेळ हसत खेळत गप्पा मारल्या, त्यातून कोणताही राजकीय अर्थ काढू नये किंवा भाकित करू नये अशी ठोकळेबाज मखलाशी उद्या ठाकरे आणि फडणवीस करतीलही, पण त्याला काहीही अर्थ नाही. कोणी शेंबडे पोरही त्यावर विश्वास ठेवणार नाही.‌

 शेखर जोशी

२३ मार्च २०२३