शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०२५
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रूरकर्मा टीपू सुलतान'ची जयंती साजरी
क्रूरकर्मा टीपू सुलतान'ची जयंती
शाळेत साजरी करणे हा 'राष्ट्रद्रोह' - हिंदू जनजागृती समिती
- माजलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रकार
बीड, दि. २१ नोव्हेंबर
बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 'क्रूरकर्मा टीपू सुलतान'ची जयंती साजरी करण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
शासकीय परिपत्रकात कोणताही उल्लेख नसताना, एका क्रूर शासकाचे उदात्तीकरण करणे हा केवळ नियमांचा भंग नाही, तर हिंदुच्या भावना दुखावून राज्यातील शांतता बिघडवण्याचा अक्षम्य प्रयत्न आहे. या राष्ट्रद्रोही कृत्यासाठी संबंधित शिक्षक, आयोजक आणि निष्काळजी शिक्षण अधिकाऱ्यांवर तातडीने 'गुन्हा दाखल' करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.
टीपू सुलतान हा कोणताही आदर्श राजा नसून, त्याने सक्तीचे हिंदुचे धर्मपरिवर्तन, मंदिरांचा विध्वंस आणि हजारो निष्पाप हिंदुच्या हत्यांसारखी क्रूरकृत्ये केली आहेत. एका बाजूला संपूर्ण महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जपत असताना, शासकीय यंत्रणेचा भाग असलेल्या शाळेत अशा क्रूरकर्मा व्यक्तीचे उदात्तीकरण करणे म्हणजे पुढील पिढीला चुकीचा इतिहास शिकवून राष्ट्रविरोधी प्रवृत्तींना खतपाणी घालण्यासारखे असल्याचे हिंदू जनजागृती समितीचे म्हणणे आहे.
हा कार्यक्रम आयोजित करणारे शिक्षक, मुख्याध्यापक व निष्काळजी शिक्षण अधिकारी यांच्यावर भारतीय दंड संहिता अंतर्गत धार्मिक भावना दुखावणे आणि राज्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.
तसेच संबंधित शिक्षकांचे त्वरित निलंबन करावे. जर या प्रकरणातील सूत्रधारांवर तातडीने आणि कठोर कारवाई झाली नाही, तर हिंदु जनजागृती समिती तीव्र जनआंदोलन छेडण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही हिंदू जनजागृती समितीने दिला आहे.
गुरुवार, २० नोव्हेंबर, २०२५
कल्याणमध्ये मीटर पद्धतीने रिक्षा सुरू;ही तर धूळफेक.
ही तर निव्वळ धूळफेक...
शेखर जोशी
कल्याणमध्ये मीटर पद्धतीने रिक्षा सुरू झाली म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रिक्षा चालक मालक संघटनांचे नेते, पदाधिकारी, वाहतूक पोलीस डांगोरा पिटत आहेत, पण ही निव्वळ धूळफेक आहे. रिक्षा मीटर सक्ती एखाद्या ठराविक ठिकाणी नको तर संपूर्ण कल्याण डोंबिवली शहरात सर्वत्र होण्याची आवश्यकता आहे.
या बातमीनुसार सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी कल्याण रेल्वे स्थानकातून मीटर रिक्षा चालविण्यात येत आहे. मंगळवारपासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. याआधीही कल्याण, डोंबिवलीत मीटर रिक्षासाठी वेगळी रांग ठेवण्याचा प्रयोग करण्यात आला होता. मात्र प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी तो बंद पडला. अर्थात तो फसणारच होता. आता कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर मीटर रिक्षा सुरू करण्याचा प्रयोगही फसण्याचीच शक्यता जास्त आहे. फक्त सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळेत कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरून मीटर पद्धतीने रिक्षा चालविण्याचा हा प्रकारच मुळात हास्यास्पद आहे. म्हणजे कल्याण शहराच्या अन्य वेगवेगळ्या भागातून एखाद्याला रेल्वे स्थानकावर मीटर पद्धतीने यायचे असेल तर तो येऊ शकत नाही. रिक्षाचालक मनमानी पद्धतीने जेवढे पैसे सांगतील तेवढे देऊनच यावे लागेल. त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरून सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी मीटर पद्धतीने रिक्षा सुरू करण्याचा प्रयोग अत्यंत अयोग्य व चुकीचा आहे. प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रिक्षा चालक मालक संघटना, पदाधिकारी यांना खरोखरच आणि मनापासून मीटर पद्धतीने रिक्षा सुरू करायच्या असतील तर त्या संपूर्ण कल्याण शहरात सुरू कराव्यात. संपूर्ण कल्याण शहरात मीटर पद्धतीने रिक्षा सुरू झाल्या म्हणजे शेअर पद्धत बंद करावी, असे अजिबात म्हणणे नाही. दोन्ही पद्धतीने रिक्षाप्रवास करता आला पाहिजे. रिक्षाचालक किंवा रिक्षा चालक मालक संघटना, पदाधिकारी यांना मीटर पद्धतीने रिक्षा नकोत आणि फक्त शेअर पद्धतीनेच रिक्षा चालवायचे एकमेव कारण म्हणजे जर रिक्षा मीटर सक्ती केली गेली तर रिक्षा चालकांना मनमानी पद्धतीने पैसे उकळता येणार नाहीत.
कल्याण किंवा डोंबिवलीत रेल्वे स्थानकाच्या बाहेर जे रिक्षातळ आहेत, तिथे प्रवासी बसला की ठरवून दिलेले जे शेअर भाडे आहे त्यापेक्षा जास्त पैसे रिक्षाचालक घेऊ शकत नाहीत. याउलट मीटर सक्ती नसल्याने रिक्षातळ सोडून शहराच्या कोणत्याही भागात प्रवासी रिक्षात बसला की त्याला मनमानी पद्धतीने पैसे उकळता येतात. मीटर पद्धतीने १.०५ किलोमीटर अंतरासाठी फक्त २६ रुपये इतके भाडे ठरवून दिलेले आहे. मात्र इतक्या किंवा यापेक्षाही कमी अंतरासाठी रिक्षाचालक ५० ते ७० रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त पैसे सांगतात. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि अन्य हतबल प्रवाशांना ते देऊन प्रवास करावाच लागतो. अशा रिक्षाचालकांची तक्रार करा, असे
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक पोलीस सांगत असतात. पण प्रत्येक वेळी प्रत्येक प्रवासी, ज्येष्ठ नागरिक रिक्षाचालकांशी वाद घालत बसत नाही. सर्वांना ते शक्य होते असे नाही.
त्यामुळे संपूर्ण शहरात, कोणत्याही भागात प्रवासी रिक्षात बसला आणि त्याने मीटरने जायचे आहे सांगितले तर रिक्षाचालकाने मीटर टाकलेच पाहिजे. आणि त्यासाठीच अमूक एखाद्या ठिकाणी, अमूक रिक्षा तळावर, मीटर रिक्षांची वेगळी रांग असा तोंडाला पाने पुसण्याचा आणि मीटर पद्धतीने रिक्षा सुरू झाल्याची धुळफेक न करता तातडीने संपूर्ण कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत रिक्षा मीटर सक्ती केली जावी. सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी, रिक्षा चालक मालक संघटना, त्यांचे पदाधिकारी आणि निष्क्रिय लोकप्रतिनिधी- अर्थात निवडून आलेले आमदार व खासदार या सर्वांनी मुठभर आणि मुजोर, बेशिस्त रिक्षाचालकांच्यापुढे नांगी टाकली आहे.
लवकरच कल्याण डोंबिवली महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत कल्याण डोंबिवलीत रिक्षा मीटर सक्ती हा मुद्दा ऐरणीवर आला पाहिजे. सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी आणि उमेदवार मत मागायला येतील तेव्हा प्रत्येकाने 'आधी रिक्षा मीटर सक्ती नंतर मतदान' किंवा ' रिक्षा मीटर सक्ती नाही तर मतही नाही' अशी भूमिका घेतली पाहिजे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही संधी आहे. आत्ता झाले तरच काहीतरी हालचाल होईल. निवडणूक पार पडली की काहीही होणार नाही.
गुगल मॅपवर अंतर पाहून भाडे द्यावे
आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतो. प्रत्येक प्रवाशाने रिक्षात बसल्यावर जिथे बसलो ते आणि जिथे उतरायचे असेल ते ठिकाण टाकावे. जितके किलोमीटर अंतर दाखवतील तितकेच पैसे द्यावे. एम. इंडिकेटर ॲपवर १.०५ किलोमीटर अंतरापासून ते पुढील किलोमीटरपर्यंत किती भाडे होते त्याचा तक्ता दिला आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रिक्षा चालक मालक संघटनांनी या भाडेतक्त्याचा फलक सर्व प्रमुख रिक्षातळांवर आणि शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी लावावेत. रिक्षा चालक मालक संघटना, पदाधिकारी आणि रिक्षा चालकांना मीटर सक्ती मान्य नसेल तर या पद्धतीने प्रवासी पैसे देतील आणि ते तुम्हाला मान्य करावेच लागेल, असे आदेश, सूचना द्याव्यात.
आमदार व खासदारांचे दुर्लक्ष
विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रिक्षा मीटर सक्ती या प्रश्नाकडे सोयीस्कर डोळेझाक केली आहे. या दोघांनी आणि त्यांच्या राज्यातील वरिष्ठांनी अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनावर घेतले तर कल्याण डोंबिवलीत रिक्षा मीटर सक्ती होऊ शकते. ते अशक्य नाही. भाजप स्वतःला 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणवून घेतो. आमदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी किमान भाजपप्रणीत रिक्षाचालक मालक संघटनेला व याचे सभासद असलेल्या रिक्षाचालकांनी तरी आपली रिक्षा मीटरप्रमाणे चालविण्यासाठी सक्ती करावी, आवाहन करावे.
शेखर जोशी
२० नोव्हेंबर २०२५
बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५
महाराष्ट्रात 'अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट' लागू करा
देवस्थानांच्या भूमींचे रक्षण करण्यासाठी
'अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट' राज्यात तात्काळ लागू करा
- २२ जिल्ह्यांतील १ हजारांहून अधिक
मंदिर विश्वस्तांची शासनाकडे मागणी
मुंबई, दि. १९ नोव्हेंबर
महाराष्ट्रातील देवस्थानांच्या हजारो एकर जमिनी भूमाफियांनी, महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने बेकायदेशीरपणे हडपल्या आहेत. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी, गुजरात व कर्नाटकच्या धर्तीवर ‘अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ लागू करावा, अशी मागणी महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांतील एक हजारांहून अधिक मंदिर विश्वस्तांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना
मंदिर महासंघाने सादर केलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे. तसेच महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह सुमारे २२ जिल्हाधिकारी, तहसिलदार,आमदार यांना ३०० हून अधिक निवेदने सादर करण्यात आली आहेत.
देवस्थानांच्या इनाम जमिनी (वर्ग-३) कायद्याने अहस्तांतरणीय असतांनाही, महसूल विभागातील भ्रष्टाचारामुळे भूमाफियांना मुक्त संधी मिळाली असून हजारों एकर जमिनी हडपल्या आहेत. केवळ पश्चिम महाराष्ट्रातच ६७१ गटांवर थेट अतिक्रमण झाले आहे; विदर्भातील अमरावती, अकोला जिल्ह्यांत ५० कोटींची जमीन केवळ ९६० रुपयांना विकल्याचे समोर आले असल्याचे मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी सांगितले.
या राज्यव्यापी अभियानात रायगड येथील श्री हरिहरेश्वर, साताऱ्याचे श्री सज्जनगड, पालीतील श्री बल्लाळेश्वर, वसईचे श्री परशुराम तपोवन, नाशिकचे श्री मुक्तीधाम, आकोट-अकोल्याचे श्री कान्होबा, रत्नागिरीचे श्री काशी विश्वेश्वर, कोल्हापूरचे श्री उजळाई व अनेक क्षेत्रातील मंदिरांचे विश्वस्त तसेच विविध जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह अकोला येथील १६० अधिवक्ते उपक्रमात सहभागी झाले होते.
उदवाहनापर्यंत जाण्याची डोंबिवलीकरांची वाट बिकट
पक्ष फोडाफोडीच्या महत्त्वाच्या कामामुळे
चव्हाण, शिंदे यांचे 'या'नागरी प्रश्नाकडे दुर्लक्ष
- उदवाहनापर्यंत जाण्याची वाट बिकट
शेखर जोशी
डोंबिवली, दि. १८ नोव्हेंबर
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सध्या पक्ष फोडाफोडीच्या महत्त्वाच्या कामात व्यग्र आहेत. त्यामुळे डोंबिवली पश्चिमेकडील उदवाहनाच्या नागरी समस्येकडे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कल्याण एण्डच्या दिशेकडील रस्ता पत्रे लावून बंद केल्याने प्रवाशांना पूर्ण हेलपाटा मारून उदवाहनापर्यंत जावे लागते आहे.
दहा ते बारा महिन्यांपूर्वी रेल्वे स्थानक सुशोभीकरण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेकडे बांधण्यात येणाऱ्या पादचारी पुलाच्या कामामुळे येथे असलेले लोकल ट्रेन तिकिट घर आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आरक्षण केंद्र डोंबिवली पश्चिमेला कल्याण एण्ड दिशेकडे फलाट क्रमांक एकवर हलविण्यात आले. तसेच सुशोभीकरणाच्या कामामुळे कल्याण एण्ड दिशेकडून उदवाहनापर्यंत जाण्या- येण्याचा सहज, सुलभ मार्ग होता तो पत्रे लावून बंद करून टाकला. त्यामुळे आता रेल्वे स्थानकात शिरून उदवाहनापर्यंत पोहोचण्यासाठी काही मुठभर व मुजोर, बेशिस्त रिक्षाचालकांचा अडथळा पार करून, वळसा घालून उदवाहनापर्यंत जावे लागते आहे.
खरे म्हणजे या उदवाहनापर्यंत जाण्या-येण्यासाठी रस्त्यावरून थेट सोय सहज करता येणे शक्य आहे. जेव्हा उदवाहन सुरू झाले तेव्हाच हे करता आले असते. ठिक आहे, तेव्हा केले नाही. पण आता कल्याण एण्ड दिशेकडील रस्ता पत्रे लावून बंद केल्याने प्रवासी, नागरिक यांची होणारी गैरसोय व त्रास ठरविले तर एका दिवसात दूर करता येऊ शकतो. पण ते करण्याचीही इच्छा हवी. रस्त्यावरून उदवाहनापर्यंत एका बाजूला पायऱ्या आणि एका बाजूला उतार केला तर नागरिक, प्रवासी यांची दररोजच्या त्रासातून सुटका होऊ शकते. अर्थात त्यासाठी रेल्वे स्थानक परिसर व उदवाहनाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर रस्ता अडवून उभ्या राहणाऱ्या बेशिस्त रिक्षाचालकांचा बंदोबस्त करावा लागेल, तसेच इथे कचरा व राडारोडा टाकला जातो त्यावरही बंदी घालावी लागेल.
आमदार व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भाजप व शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, माजी नगरसेवक यांनी मनात आणले तर अक्षरशः एका रात्रीत हे काम ते करू शकतात. पण पक्ष फोडाफोडीतून वेळ मिळाला तर या नागरी समस्येकडे लक्ष द्यायला सवड मिळेल.
शेखर जोशी
१९ नोव्हेंबर २०२५
शनिवार, १५ नोव्हेंबर, २०२५
महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रे मद्य-मांसमुक्त व्हावीत;
महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रे मद्य-मांसमुक्त व्हावीत;
- वारकरी महाअधिवेशनात ठराव मंजूर
आळंदी, दि. १५ नोव्हेंबर
महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रे मद्य आणि मांसमुक्त करावीत, तसेच मंदिर परिसरात अन्य धर्मियांच्या प्रचारावर बंदी घालण्यासाठी कठोर कायदा करावा, असे ठराव येथे झालेल्या १९ व्या वारकरी महाअधिवेशनात संमत करण्यात आले.
‘वारी आळंदीची, राष्ट्र आणि धर्मरक्षणाची’ हे ब्रीदवाक्य घेऊन पार पडलेल्या या अधिवेशनात राज्यभरातील एक हजाराहून अधिक वारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते सहभागी झाले होते. हिंदू जनजागृती समिती, राष्ट्रीय वारकरी परिषद आणि अन्य संघटनांच्या संयुक्त विद्यमाने येथील सद्गुरू श्री गंगागिरी महाराज मठात कार्तिक वद्य एकादशीच्या निमित्ताने हे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.
या वेळी बोलताना रामगिरी महाराज म्हणाले, रामायणातील उदाहरणे विकृत पद्धतीने मांडून आदिवासींचे धर्मांतरण करण्याचे ख्रिस्ती मिशनऱ्यांचे षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे. सद्गुरू गंगागिरी महाराजांनी २०० वर्षांपूर्वी चारी वर्णाच्या हिंदूंना एकत्र करण्याचे महान कार्य केले. आपणही आपापल्या प्रभावक्षेत्रात हे कार्य केले, तर धर्मांतरण रोखणे शक्य होईल. तर संत-महंतांनी संघटित होऊन संदेश देण्याची परंपरा ज्ञानेश्वर माऊलींच्या काळापासून चालत आली आहे; पण आज आळंदीत आरोग्य आणि शिक्षण याचे महत्त्व सांगत ख्रिश्चन मिशनरी आळंदीतील हिंदूंचे धर्मांतरण करत आहेत. याला आपण आळा घातला पाहिजे, असे ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे यांनी सांगितले.
जादूटोणा कायद्याच्या प्रचारासाठी नेमलेली; परंतु देव-धर्माची टीका करणारी महाराष्ट्र शासनाची ‘जादूटोणा विरोधी कायद्याची जनजागृती, प्रचार व प्रसार समिती’ (PIMC) तात्काळ बरखास्त करण्यात यावी. तसेच नास्तिक आणि अर्बन नक्षलवादी विचारसरणीचे काही लोक पंढरीच्या वारीमध्ये वारकऱ्यांचा बुद्धीभेद घडवून आणत आहेत; हे त्वरित थांबवले पाहिजे. राज्यातील हिंदुत्ववादी सरकारने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व संत-महंतांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या वेळी सरकारशी चर्चेसाठी एकत्र येण्याचे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी केले.
रणरागिणी समितीच्या कु. क्रांती पेटकर, ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांचीही भाषणे यावेळी झाली. हिंदू युवतींच्या संरक्षणासाठी राज्यात 'लव्ह जिहाद विरोधी कायदा' तातडीने संमत करावा, हिंदूंची मंदिरे आणि भूमी बळकावणारा 'वक्फ कायदा' त्वरित रद्द करण्यात यावा, इंद्रायणी आणि चंद्रभागा नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, गोवंश हत्याबंदी कायद्याची राज्यात अत्यंत कठोर अंमलबजावणी करावी इत्यादी ठरावही अधिवेशनात मंजूर करण्यात आले.
शनिवार, ८ नोव्हेंबर, २०२५
'मणिपूरचे महाभारत' पुस्तकाचे प्रकाशन आणि मणिपूर सद्यस्थिती' विषयावर व्याख्यान
पूर्व सीमा प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमात'मणिपूरचे महाभारत' पुस्तकाचे प्रकाशन, 'मणिपूर सद्यस्थिती' विषयावर व्याख्यान
ठाणे, दि. ८ नोव्हेंबर
'ईशान्य वार्ता'चे माजी संपादक पुरुषोत्तम रानडे लिखित 'चुराचांदपर्व मणिपूरचे महाभारत' या पुस्तकाचे प्रकाशन येत्या १६ नोव्हेंबर रोजी ठाणे येथे एका कार्यक्रमात होणार आहे.
पूर्व सीमा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास रुईया महाविद्यालयाच्या तत्वज्ञान विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. हिमानी चौकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी पूर्व सीमा प्रतिष्ठानचे कार्यवाह आणि १९९९ पासून मणिपूर सीमावर्ती भागात 'शिक्षणातून राष्ट्रीय एकात्मता' या विषयावर कार्य करणारे जयवंत कोंडविलकर यांचे 'मणिपूर सद्यस्थिती' या विषयावर व्याख्यानही होणार आहे.
हा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता श्रीराम व्यायामशाळा, गडकरी रंगायतनसमोर, ठाणे (पश्चिम) येथे होणार असून शंकर दिनकर काणे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा पुस्तक प्रकाशन सोहळा आणि व्याख्यान होणार आहे.
शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०२५
पादचारी पुलाला अडथळा ठरणारा रेल्वेस्थानक सुशोभीकरणाचा पूर्वेकडील काही भाग जमीनदोस्त
पादचारी पुलाला अडथळा ठरणारा रेल्वेस्थानक
सुशोभीकरणाचा पूर्वेकडील काही भाग जमीनदोस्त
- तोडकाम केलेला भाग रेल्वे पुन्हा बांधून देणार असली तरी सुशोभीकरणावर झालेला खर्च वाया
डोंबिवली, दि. ७ नोव्हेंबर
डोंबिवली रेल्वे स्थानकात नव्याने उभारण्यात येत असलेल्या पादचारी पुलाला अडथळा ठरणारा रेल्वे स्थानक सुशोभीकरणाचा पूर्वेकडील काही भाग शुक्रवारी सकाळी जमीनदोस्त करण्यात आला. डोंबिवली पश्चिमेतील चार मीटर आणि पूर्व भागातील वीस मीटर असा सुमारे २४ मीटर इतका सौंदर्यीकरणाचा भाग काढण्यात येणार आहे.अवघ्या काही महिन्यांपूर्वी करण्यात आलेले हे सुशोभीकरण व पाट्यांचा काही भाग जमीनदोस्त केल्याने त्यावर झालेला खर्च वाया गेला आहे.
पादचारी पुलाच्या कामात सुशोभिकरणातील एकूण २४ मीटरचा भाग अडथळा ठणारा एकूण २४ मीटरचा भाग तात्पुरता काढण्याचा प्रस्ताव कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागाने मंजूर केला होता. त्यानुसार पूर्वेकडील काही भाग शुक्रवारी तोडण्यात आला. रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक ते पाच दरम्यानचे पादचारी पूल उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूकडील तोडण्यात आलेले सुशोभीकरणाचे काम रेल्वेने पू्र्ववत करून देण्याची अट महापालिकेच्या प्रस्तावात समाविष्ट आहे.
डोंबिवली पूर्व व पश्चिम जोडणारा नवा पादचारी पूल डोंबिवली रेल्वे स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज एण्ड दिशेने उभारण्यात येत आहे. त्यासाठी डोंबिवली पश्चिमेला छत्रपती शिवाजी महाराज एण्ड दिशेकडे असलेले लोकल ट्रेनचे तिकीट कार्यालय व लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आरक्षण केंद्रही काही महिन्यांपूर्वी हटविण्यात आले. लोकसभा/ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानक सुशोभीकरणाचे उदघाटन करण्यात आले होते. पादचारी पुलाच्या उभारणीत डोंबिवली पूर्व व पश्चिम भागातील या सुशोभीकरणाचा काही भाग अडथळा ठरणार आहे, ही गोष्ट आधी का लक्षात आली नाही? की लक्षात येऊनही जाणूनबुजून सुशोभीकरणाचे काम करण्याची घाई करण्यात आली? तोडण्यात आलेल्या सुशोभीकरणाचा भाग रेल्वे पुन्हा बांधून देणार असली तरी सुशोभीकरणावरील वाया गेलेला खर्च कोणाकडून वसूल करणार? रेल्वे आणि कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय, संवाद नव्हता का? काही महिन्यांत नवीन पादचारी पुलाचे बांधकाम सुरू करायचेच होते तर या सुशोभीकरणाला सुरुवातच का केली? पादचारी पूल बांधून पूर्ण झाल्यानंतरच सुशोभीकरण केले असते तर आकाश कोसळले असते का? असे अनेक प्रश्न डोंबिवलीकरांना भेडसावत आहेत.
जाता जाता- सुशोभीकरण आणि उभारण्यात आलेल्या कमानी, पाट्यांना डोंबिवली पूर्वैतील रेल्वे स्थानक परिसरातील फेरिवाल्यांचा विळखा पडला आहे. फेरीवाले त्यांचे सामान, विकण्याच्या वस्तू या सुशोभीकरणाला बिनधास्त टांगून ठेवतात. तर पश्चिमेला अधिकृत रिक्षा थांबा आणि मुठभर मुजोर रिक्षाचालकांचा विळखा पडलेला असतो. हे असले सुशोभीकरण व सौंदर्यीकरण काय कामाचे?
शेखर जोशी
७ ऑक्टोबर २०२५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...










