बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५

उदवाहनापर्यंत जाण्याची डोंबिवलीकरांची वाट बिकट

पक्ष फोडाफोडीच्या महत्त्वाच्या कामामुळे चव्हाण, शिंदे यांचे 'या'नागरी प्रश्नाकडे दुर्लक्ष - उदवाहनापर्यंत जाण्याची वाट बिकट शेखर जोशी डोंबिवली, दि. १८ नोव्हेंबर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सध्या पक्ष फोडाफोडीच्या महत्त्वाच्या कामात व्यग्र आहेत. त्यामुळे डोंबिवली पश्चिमेकडील उदवाहनाच्या नागरी समस्येकडे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कल्याण एण्डच्या दिशेकडील रस्ता पत्रे लावून बंद केल्याने प्रवाशांना पूर्ण हेलपाटा मारून उदवाहनापर्यंत जावे लागते आहे.
दहा ते बारा महिन्यांपूर्वी रेल्वे स्थानक सुशोभीकरण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेकडे बांधण्यात येणाऱ्या पादचारी पुलाच्या कामामुळे येथे असलेले लोकल ट्रेन तिकिट घर आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आरक्षण केंद्र डोंबिवली पश्चिमेला कल्याण‌‌‌ एण्ड दिशेकडे फलाट क्रमांक एकवर हलविण्यात आले. तसेच सुशोभीकरणाच्या कामामुळे कल्याण एण्ड दिशेकडून उदवाहनापर्यंत जाण्या- येण्याचा सहज, सुलभ मार्ग होता तो पत्रे लावून बंद करून टाकला. त्यामुळे आता रेल्वे स्थानकात शिरून उदवाहनापर्यंत पोहोचण्यासाठी काही मुठभर व मुजोर, बेशिस्त रिक्षाचालकांचा अडथळा पार करून, वळसा घालून उदवाहनापर्यंत जावे लागते आहे. खरे म्हणजे या उदवाहनापर्यंत जाण्या-येण्यासाठी रस्त्यावरून थेट सोय सहज करता येणे शक्य आहे. जेव्हा उदवाहन सुरू झाले तेव्हाच हे करता आले असते. ठिक आहे, तेव्हा केले नाही. पण आता कल्याण एण्ड दिशेकडील रस्ता पत्रे लावून बंद केल्याने प्रवासी, नागरिक यांची होणारी गैरसोय व त्रास ठरविले तर एका दिवसात दूर करता येऊ शकतो. पण ते करण्याचीही इच्छा हवी. रस्त्यावरून उदवाहनापर्यंत एका बाजूला पायऱ्या आणि एका बाजूला उतार केला तर नागरिक, प्रवासी यांची दररोजच्या त्रासातून सुटका होऊ शकते. अर्थात त्यासाठी रेल्वे स्थानक परिसर व उदवाहनाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर रस्ता अडवून उभ्या राहणाऱ्या बेशिस्त रिक्षाचालकांचा बंदोबस्त करावा लागेल, तसेच इथे कचरा व राडारोडा टाकला जातो त्यावरही बंदी घालावी लागेल. आमदार व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भाजप व शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, माजी नगरसेवक यांनी मनात आणले तर अक्षरशः एका रात्रीत हे काम ते करू शकतात. पण पक्ष फोडाफोडीतून वेळ मिळाला तर या नागरी समस्येकडे लक्ष द्यायला सवड मिळेल. शेखर जोशी १९ नोव्हेंबर २०२५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: