सोमवार, २९ डिसेंबर, २०२५
मुंबई मराठी पत्रकार संघाचे विविध पुरस्कार जाहीर
मुंबई मराठी पत्रकार संघाचे विविध पुरस्कार जाहीर
- ज्येष्ठ पत्रकार विवेक दिवाकर,दिलीप ठाकूर, तुळशीदास भोईटे, अविनाश कोल्हे आणि अन्य मानकरी
६ जानेवारीला पुरस्कार वितरण
मुंबई, दि. २९ डिसेंबर
मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार विवेक दिवाकर, दिलीप ठाकूर, तुळशीदास भोईटे, अविनाश कोल्हे आणि अन्य पत्रकाराचा यात समावेश आहे. पत्रकार दिनी (६ जानेवारी २०२६) ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
बृहन्मुंबईतील नागरी समस्यांवरील गेल्या वर्षभरातील उत्कृष्ट वृत्तांत, स्तंभ व लिखाण यासाठी दिला जाणा-या पुरस्कारासाठी सचिन अंकुश लुंगसे (लोकमत) यांची तर पत्रकारितेला उपयुक्त ठरणार्या विषयावर (उदा. सामाजिक, आर्थिक, पर्यावरण आदी) लेखन करणार्या जयहिंद प्रकाशन पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे यांची निवड करण्यात आली आहे
कामगार, झोपडपट्टी, भाडेकरू, घरदुरुस्ती व दलितोद्धार या विषयांवरील पत्रकारितेसाठी दिला जाणारा कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार विवेक शंकर दिवाकर (नवराष्ट्र) यांना तर
पत्रकाराने केलेल्या ललित लेखनासाठी दिला जाणारा विद्याधर गोखले ललित लेखन पुरस्कार मुक्त पत्रकार अविनाश कोल्हे यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट राजकीय बातम्या व राजकीय वृत्तांताबद्दल दिला जाणारा रमेश भोगटे पुरस्कार अशोक नागनाथ अडसूळ( लोकसत्ता) आणि चित्रपट व मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असलेल्या ज्येष्ठ सिनेपत्रकारासाठीचा शिरीष कणेकर स्मृती पुरस्कार पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार दिलीप अनंत ठाकूर यांना जाहीर झाला आहे.
इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करणार्या वरिष्ठ वृत्तवाहिनी कॅमेरामनसाठीच्या वैभव कनगुटकर स्मृती वृत्तवाहिनी कॅमेरामन पुरस्कारासाठी राजेश माळकर (न्यूज नेशन) यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आणि निवड झालेल्या छायाचित्रकारांचा सत्कारही या वेळी करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ पत्रकार योगेश बिडवई, अजय कौतिकवार, अभिजित मुळये, समीर चवरकर यांच्या निवड समितीने ही निवड केली. मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन, बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयासमोर, आझाद मैदान येथे संध्याकाळी पाच वाजता होणार आहे.
शनिवार, २७ डिसेंबर, २०२५
द्रौपदी बुध्दिमान, तेजस्विनी आणि विवेकी-प्रा. मेधा सोमण
द्रौपदी बुध्दिमान, तेजस्विनी आणि विवेकी- प्रा. मेधा सोमण
'द्रौपदी : काल, आज, उद्या' महाकादंबरी प्रकाशित
मुंबई, दि. २७ डिसेंबर
द्रौपदी बुध्दिमान, तेजस्विनी आणि विवेकी होती. द्रौपदीचा मातृत्व आणि विवेकाचा हा गुण अनन्यसाधारण आहे, असे प्रतिपादन संस्कृत तज्ज्ञ, अभ्यासक व लेखिका प्रा. मेधा सोमण यांनी केले.
ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक अशोक समेळ यांनी लिहिलेल्या 'द्रौपदी : काल, आज, उद्या' या महाकादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. डिंपल पब्लिकेशन'ने ही कादंबरी प्रकाशित केली आहे.
द्रौपदीच्या पाचही मुलांना अश्वत्थाम्याने अत्यंत क्रूरतेनं आणि अधर्मानं मारल्यावर त्याला तिच्यासमोर आणले असता आणि अश्वत्थाम्याला ठार करण्यासाठी तिची अनुमती मागितली असताना ती, त्याला मारू नका.' असे सांगते. यामागची द्रौपदीची विवेकबुध्दी स्पष्ट करताना प्रा.सोमण म्हणाल्या, कृपीला पतीवियोगाचे दुःख आहे. अश्वत्थाम्याला ठार केले तर तिला पुत्र वियोगाचे दुःख सहन होणार नाही. पुत्र वियोगाचे दुःख काय असते, ते मी अनुभवतेय. ज्या द्रौपदीच्या पाचही मुलांना ठार मारले हे कळले आहे, तरीही ती आपला विवेक ढळू देत नाही.
'द्रौपदीला एकाच दुर्योधनाकडून, एकाच दुःशासनाकडून अत्याचार सहन करावा लागला. आजच्या द्रौपदीला अनेक दुर्योधन, दुःशासनांशी सामना, संघर्ष करावा लागतोय. द्रौपदीला जे एक कृष्णतत्व मिळाले, तसे आज अनेकांमधून कृष्णतत्व मिळायला हवे, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षपदावरून बोलताना दा. कृ. सोमण म्हणाले, आज मी सगळ्या नक्षत्र, ताऱ्यांना घेऊन आलोय. अशोक समेळ यांच्या महकादंबर्या वाचल्या आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांच्या शंभर आवृत्या निघोत आणि त्या मागच्या पिढीपासून पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचोत. डिम्पल पब्लिकेशनचे अशोक मुळ्ये यांनीही मनोगत व्यक्त केले. लेखक समेळ यांची मुलाखत किरण वालावलकर, स्मिता गवाणकर यांनी घेतली. संग्राम समेळ, संजीवनी समेळ यांनी 'द्रौपदी' महाकादंबरीतील काही भागाचे अभिवाचन केले. सूत्रसंचालन स्मिता गवाणकर यांनी केले तर अरूण घाडीगावकर यांनी आभार मानले.
छायाचित्रात डावीकडून कौतुक मुळ्ये, अशोक समेळ, किरण वालावलकर, प्रा. मेधा सोमण, दा. कृ. सोमण, अशोक मुळ्ये, अरुण घाडीगावकर
शनिवार, २० डिसेंबर, २०२५
'गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि त्यावरील लस' या विषयावर डॉ. अंजली खाडिलकर यांचे व्याख्यान
'गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि त्यावरील लस'
या विषयावर डॉ. अंजली खाडिलकर यांचे व्याख्यान
- भारत विकास परिषद, ध्रुव अकादमीतर्फे आयोजन
डोंबिवली, दि. २० सप्टेंबर
भारत विकास परिषद आणि ध्रुव अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २५ डिसेंबर रोजी डोंबिवलीत 'गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (cervical cancer) आणि त्यावरील लस' या विषयावर सकाळी अकरा वाजता एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत विकास परिषदेच्या डोंबिवली शाखेच्या सदस्य डॉ. अंजली खाडिलकर या विषयावर माहिती देणार आहेत.
भारतात स्तनाच्या कर्करोगानंतर महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग अधिक प्रमाणात दिसून येतो. दरवर्षी साधारण १ लाख ३० हजार महिला दरवर्षी या रोगाच्या तडाख्यात सापडतात आणि ७५ हजारांहून अधिक महिला मृत्युमुखी पडतात. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग ज्या HPV विषाणूमुळे होतो त्यावर आता लस उपलब्ध आहे.ही लस ७ ते ४० या वयोगटातील मुलींना / महिलांना घेता येऊ शकते. भारत विकास परिषदेच्या पुढाकाराने ही लस अल्प किंमतीत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या मुलींचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे त्यांना ही लस घेण्यासाठी पालकांची संमती असणे आवश्यक आहे.
व्याख्यानाला उपस्थित राहण्यासाठी तसेच लसीकरणासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त महिला, मुलींनी वैयक्तिक किंवा पालकांसह व्याख्यानास उपस्थित राहावे. नावनोंदणीसाठी पालवी मोघे यांच्याशी
९६१९ १८५ ७४६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन भारत विकास परिषद, ध्रुव अकादमीने केले आहे.
शुक्रवार, १९ डिसेंबर, २०२५
'रिक्षा मीटरसक्ती' विषयावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची 'अळी मिळी गुप चिळी'!
'रिक्षा मीटरसक्ती' विषयावर सर्वपक्षीय
लोकप्रतिनिधींची 'अळी मिळी गुप चिळी'!
- लोकसत्ता ठाणे वृत्तान्तच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा
- आमदार रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
यांची उदासीनता, अनास्था खेदजनक, संतापजनक
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक २०२६
रिक्षा मीटर सक्ती चळवळ
शेजो उवाच -५
शेखर जोशी
डोंबिवली, दि. १९ डिसेंबर
'रिक्षा मीटरसक्ती' या विषयावर गेली बारा वर्षे सातत्याने पाठपुरावा करत आहे. लोकसत्ता ठाणे वृत्तान्तच्या माध्यमातून वेळोवेळी अनेक बातम्या दिल्या होत्या. मात्र खेदाची आणि संतापजनक बाब म्हणजे कल्याण डोंबिवलीतील एकही राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींनी, राजकीय पक्षांचे स्थानिक व राज्य पातळीवरील नेते, स्थानिक सर्वपक्षीय नेते, नगरसेवक यांनीही या प्रकरणी अळी मिळी गुप चिळी अशी भूमिका घेतली.
रिक्षा चालक मालक संघटना, पदाधिकारी आणि मुठभर मुजोर रिक्षाचालकांपुढे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, राजकीय नेते, पदाधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक पोलीस यांनी नेहमीच नांगी टाकली.
काही वर्षांपूर्वी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी लोकसत्ता आणि अन्य काही वृत्तपत्रांनी सुरू केलेल्या रिक्षा मीटर सक्ती चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला होता. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासह स्वतः डोळे यांनी आपला दूरध्वनी क्रमांक जाहीर केला होता. रिक्षात बसल्यावर रिक्षा चालकाला सांगूनही त्यांने मीटर डाऊन केले नाही तर फोन केल्यावर शक्य तिथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, स्वतः डोळे, वाहतूक पोलीस हजर राहात होते. मी व माझ्या कुटुंबीयांनानीही त्या वेळी मीटर न टाकणा-या मुजोर रिक्षाचालकांच्या विरोधात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक पोलीस यांच्याकडेच लेखी तक्रारी करणे, रिक्षात बसल्यावर मीटर टाकण्याचा आग्रह धरणे इत्यादी मार्ग अवलंबिले होते.
माझ्या आठवणीप्रमाणे २०१३/ १४ मध्ये लोकसत्ता आणि अन्य काही वृत्तपत्रांनी रिक्षा मीटर सक्ती विषय लावून धरल्याने कल्याण डोंबिवलीत रिक्षा मीटर सक्ती दृष्टीपथात आली असे वाटत होते. पण त्यावेळीही स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राजकीय इच्छाशक्ती व रिक्षा मीटर सक्तीसाठी ठोस प्रयत्न केले नाहीत. हा विषय कधीच गांभीर्याने घेतला नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वगळता तेव्हा अन्य सर्व राजकीय पक्षांच्या रिक्षा चालक मालक संघटना होत्या. याचे पदाधिकारीही राजकीय पक्षांचेच लोकप्रतिनिधी होते. या विषयावर तेव्हा मनसेच्या स्थानिक पातळीवरील नेते, पदाधिकारी यांचे लक्ष वेधले होते. हा विषय हाती घेण्यास सांगितले होते. सुरुवातीला मनसेकडून फलक लावून रिक्षा मीटर सक्तीसाठी प्रयत्न केले गेले. नंतर त्यांनीही या विषयाकडे पाठ फिरवली.
भारतीय जनता पक्ष स्वतःला पार्टी विथ डिफरन्स' असे म्हणवून घेतो. त्यामुळे भाजपप्रणित रिक्षा चालक मालक संघटनेच्या रिक्षा चालकांनी तरी मीटरप्रमाणे रिक्षा चालवायला हव्यात, आमदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्या संघटनेच्या सदस्यांना तरी मीटरप्रमाणे रिक्षा चालवायला भाग पाडायला हवे, पण आजवर ते झालेले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मुठभर रिक्षाचालकांची मनमानी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना वेळोवेळी ई मेल करून, ट्विटरवर ट्विट करून लक्ष वेधून घेतले आहे. पण कोणालाही काही पडलेले नाही.
त्यामुळे आता आगामी महापालिका निवडणुकीत
रिक्षा मीटर सक्ती नाही तर मतदान नाही
किंवा 'नोटा' वापरून निषेध.
लोकसत्ता ठाणे वृत्तान्तच्या माध्यमातून रिक्षा मीटर सक्तीसाठी पाठपुरावा केला होता त्या बातम्यांच्या लिंक्स
http://www.loksatta.com/vruthanta-news/no-any-action-on-rude-rickshaw-drivers-80909/
(मुजोर रिक्षाचालकांच्या विरोधात पदाधिकाऱयांची अळीमिळी गुपचिळी-लोकसत्ता-ठाणे वृत्तान्त/१४ मार्च २०१३/ पान क्रमांक
http://www.loksatta.com/vruthanta-news/indisciplined-rikshaw-driver-on-the-root-of-disciplined-rikshaw-driver-81471/
(बेशिस्त रिक्षाचालक प्रामाणिक रिक्षाचालकांच्या मुळावर, लोकसत्ता-ठाणे वृत्तान्त/१५ मार्च २०१३/ पान क्रमांक ३)
http://www.loksatta.com/vruthanta-news/woman-hitch-to-arrogant-rikshaw-driver-81470/
(उद्दाम रिक्षाचालकांना रणरागिणीचा हिसका, लोकसत्ता-ठाणे वृत्तान्त/ १५ मार्च २०१३/ पान क्रमांक ३)
http://www.loksatta.com/vruthanta-news/rickshaw-drivers-in-dombivli-impudence-behaviour-80269/
(पूल पार करावा लागतो म्हणून द्या मागू तेवढे भाडे-डोंबिवलीतील रिक्षाचालकांचे अजब तर्कट
लोकसत्ता-ठाणे वृत्तान्त/ १३ मार्च २०१३/ पान क्रमांक १)
http://www.loksatta.com/vruthanta-news/andolan-in-front-of-auto-rickshaw-drivers-for-takeing-the-fare-meter-79542/
(मुजोर रिक्षाचालकांपुढे रिक्षा संघटना आणि लोकप्रतिनिधींची नांगी/ लोकसत्ता-ठाणे वृत्तान्त/ १२ मार्च २०१३/ पान क्रमांक १
http://www.loksatta.com/vruthanta-news/rto-notice-to-riksha-driver-who-denay-fare-as-per-meter-77564/
मीटरनुसार भाडे नाकारणाऱया रिक्षाचालकाला आरटीओची नोटीस लोकसत्ता-ठाणे वृत्तान्त/९ मार्च २०१३
शेखर जोशी
१९ डिसेंबर २०२५
महापालिका निवडणुकीत राष्ट्रासाठी मतदान करा - आमदार व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन
महापालिका निवडणुकीत राष्ट्रासाठी मतदान करा
- आमदार व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन
- स्थानिक समस्यांना ओझरता स्पर्श
- मोदी, फडणवीस यांचे गुणगान
- भाषणे सुरू होण्यापूर्वी आवाजाची पातळी ८८ डेसीबल
- महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात
- भाजपचाच महापौर हवा याचा चव्हाणांकडून अप्रत्यक्ष तर दोन्ही पाटील यांच्याकडून थेट उल्लेख
डोंबिवली, दि. १९ डिसेंबर
केरळसारख्या डावी विचारसरणी असलेल्या राज्यात भारतीय जनता पक्षाचा महापौर झाला असल्याचे सांगून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रासाठी, विकासासाठी योग्य ठिकाणी, योग्य वेळी मतदान करा, असे आवाहन आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी येथे केले.
भाजप कल्याण जिल्ह्यातर्फे डोंबिवली पश्चिम येथील भागशाळा मैदानात आयोजित करण्यात आलेल्या भाजप कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
कल्याण डोंबिवली महापालिकेची ही निवडणूक कल्याण डोंबिवलीचे भविष्य ठरविणारी निवडणूक असून विचारसरणीला मतदान करा. ठरविलेले साध्य करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन भाजपचे विचार पटवून द्यावेत, असेही चव्हाण म्हणाले.
आपण शहरांतील समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी, पूर्णत्वास नेण्यासाठी पारदर्शक कारभार करणारा महापौर असणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही व कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. केंद्रात आणि राज्यात अनुक्रमे राष्ट्रीय लोकशाही आघाडी व महायुतीचे शासन आल्यानंतर विकास कामांना गती मिळाली आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचीही भाषणे झाली.
आवाजाची पातळी ८८ डेसीबेल
मेळाव्याची वेळ संध्याकाळीच साडेपाच अशी होती. मेळाव्याला सुरूवात होण्यापूर्वी ढोल ताशा पथकाचे वादन, भाजप, फडणवीस, चव्हाण यांच्यावरील गाणी, मेळाव्यासाठी येणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी आणलेले ताशा पथक, स्पिकर लावून आणलेली रिक्षा या सगळ्या आवाजाची पातळी ८८ डेसीबेल इतकी होती. कानठळ्या आणि छातीत धडकी भरविणारा हा आवाज होता. भाषणांच्या वेळी असलेला आवाज सहन करण्यायोग्य होता. नियमानुसार निवासी क्षेत्रात दिवसा आवाजाची पातळी ४५ डेसीबेल इतकी असायला हवी.
स्थानिक समस्यांना ओझरता स्पर्श
महापालिका निवडणूक असल्याने रवींद्र चव्हाण स्थानिक गंभीर प्रश्न, नागरी समस्यांवर अधिक बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र चव्हाण यांनी त्यांना ओझरता स्पर्श केला. दररोज सकाळी नोकरीसाठी मुंबईत जाणारे येथील नागरिक, त्यांच्या अडचणी, शहरातील वाहतूक कोंडी हे प्रश्न आहेत. या सर्व समस्या येणाऱ्या काळात सोडवायच्या आहेत, इतकाच उल्लेख केला. शहरातील अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत बांधकामे, रेल्वे स्थानक परिसराला पडलेला फेरिवाले व रिक्षाचालक यांचा विळखा, अरुंद रस्ते, न झालेली रिक्षा मीटर सक्ती, मुजोर व बेशिस्त रिक्षाचालक, शहरातील पाणी समस्या, घनकचरा आणि इतरही गंभीर नागरी समस्यांवर चव्हाण एका शब्दानेही बोलले नाहीत.
नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांचे गुणगान
चव्हाण यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जोरदार गुणगान गायले. पहेलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर,भाजप पुन्हा सत्तेवर आला तर राज्यघटना बदलण्यात येणार, असा लोकसभा निवडणुकीत विरोध पक्षाकडून करण्यात आलेला अपप्रचार, २०१४ ते २०१९ आणि त्यानंतर फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी विकास कामांना दिलेली गती, स्थानिक स्वराज्य संस्था सक्षम होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी दिलेले भरघोस अर्थसहाय्य याविषयी सांगितले.
दोन्ही पाटील म्हणाले भाजपचाच महापौर हवा
आगामी महापालिका निवडणुकीत भाजपच्याच उमेदवारांना मतदान करून महापालिकेत भाजपचाच महापौर बसला पाहिजे, असे जगन्नाथ पाटील यांनी सांगितले तर भाजपचाच महापौर होणे ही कल्याण डोंबिवलीतील गरज असून कार्यकर्त्यांनी आपले योगदान द्यावे. भाजपचाच महापौर होईल, असे कपिल पाटील म्हणाले.
गुरुवार, १८ डिसेंबर, २०२५
आचार संहितेमुळे राजकीय नेत्यांच्या चेहरेफलकबाजीला तात्पुरता विराम
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक
शेजो उवाच- २
आचार संहितेमुळे राजकीय नेत्यांच्या
चेहरेफलकबाजीला तात्पुरता विराम
- रस्ता व चौक नामफलक महिनाभर घेणार मोकळा श्वास
शेखर जोशी
डोंबिवली, दि. १६ डिसेंबर
राज्यातील २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीची सोमवारी घोषणा करण्यात आली. कल्याण डोंबिवली महापालिकेसाठीही येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या चेहेफलकबाजीला तात्पुरता विराम मिळणार आहे. त्यामुळे रस्ता व चौक नामफलक एक महिनाभर तरी मोकळा श्वास घेतील.
सर्वपक्षीय राजकीय नेते, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी रस्ता व चौक नामफलक आपल्याच वडिलांचे आहेत, या जागा आपली वैयक्तिक मालमत्ता आहे, असे वाटते. त्यामुळे कोणताही विचार न करता ही मंडळी रस्ता व चौकांचे नामफलक झाकून बिनधास्त चेहरे फलकबाजी करतात. कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन व संबंधित अधिकारी यांचा यावर कोणताही वचक नसल्याने, संबंधितांना या बेकायदा फलकबाजीसाठी कोणताही दंड ठोठावला जात नसल्याने ही मंडळी चेहरेफलकबाजी करण्यासाठी सोकावली होती.
ज्या स्थानिक महनीय व्यक्तींची किंवा राज्य/ राष्ट्रीय स्तरावरील महापुरुषांची नावे रस्ता किंवा चौकाला देण्यात आली आहेत, ते नामफलक झाकून राजकीय मंडळी चेहरेफलकबाजी करत आहेत. वाढदिवस, अभिनंदन, निवड/ नियुक्ती, सण/ उत्सव शुभेच्छा इत्यादी प्रकारच्या चेहरे फलकबाजीचा यात समावेश आहे. समाज माध्यमातून यासंदर्भात वेळोवेळी लिहिले गेले, टीका केली गेली. या चेहरेफलकबाजीमुळे शहर विद्रुप, बकाल होते हे माहित असूनही लाज सोडलेली ही मंडळी वर्षानुवर्षे चेहरेफलकबाजी वसा घेतल्याप्रमाणे करत आहेत. रस्ता व चौक नामफलक झाकून केली जाणारी ही चेहरेफलकबाजी कायमची बंद झाली पाहिजे.
'नोटा' चा वापर करून चेहरेफलकबाजीचा निषेध करा
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी, उमेदवार मतं मागायला घरी येतील तेव्हा निवडून आल्यानंतर मी फलकबाजी करणार नाही, कोणाला करू देणार नाही आणि कोणी केली तर मी तातडीने कारवाई करेन, असे लेखी हमीपत्र उमेदवारांकडून लिहून घेण्याची गरज आहे. रस्ता व चौक नामफलक झाकून चेहरे फलकबाजी करणा-यांना मत नाही. 'नोटा' चा वापर करून मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त झाला पाहिजे.
शेखर जोशी
१६ डिसेंबर २०२५
रिक्षा मीटर सक्ती झालीच पाहिजे... मीटर सक्ती नाही तर मत नाही
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक २०२६
शेजो उवाच- ३
रिक्षा मीटर सक्ती झालीच पाहिजे...
मीटर सक्ती नाही तर मत नाही
डोंबिवली, कल्याणमध्ये रिक्षा मीटर सक्ती नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून काही मुजोर रिक्षाचालक मनमानी करत अव्वाच्या सव्वा पैसे मागत आहेत. स्थानिक आमदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंसह कोणताही राजकीय पक्ष, नेते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक पोलीस या मनमानीला आजपर्यंत आळा घालू शकलेले नाहीत. त्यामुळे प्रवाशांची लुटमार सुरू आहे.
बाजीप्रभू चौक, डोंबिवली पूर्व ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस. टी. स्टॅण्ड, एमआयडीसी, डोंबिवली पूर्व हे अंतर दोन किलोमीटर आहे. त्यामुळे नियमानुसार रिक्षा चालकांनी या अंतरासाठी ३५ रुपये आकारणे अपेक्षित आहे. पण या अंतरासाठी ६०/ ७० रुपये घेतात. याच अंतरासाठी रात्री बारा वाजल्यानंतरचे भाडे ४४ रुपये आहे.
भागशाळा मैदान डोंबिवली पश्चिम ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस. टी. स्टॅण्ड, एमआयडीसी, डोंबिवली पूर्व हे अंतर २.०९ किलोमीटर आहे. नियमानुसार रिक्षा चालकांनी या अंतरासाठी दिवसा आणि रात्री बारा वाजल्यानंतर अनुक्रमे ५० आणि ६३ रुपये भाडे आकारले पाहिजे. मात्र रिक्षा चालकांकडून दिवसाच १२० रुपये आकारले जातात. रात्री बारा वाजल्यानंतर कोणी प्रवासी तिथून येणार असेल तर अर्थात १५० पेक्षाही जास्त (किती ते त्या रिक्षाचालकावर अवलंबून) पैसे मागितले जातात. अशी ही मनमानी गेल्या अनेक वर्षांपासून बिनधास्त सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस. टी. स्टॅण्ड, एमआयडीसी, डोंबिवली पूर्व येथून बाजीप्रभू चौक, डोंबिवली पूर्व येथे येण्यासाठी रिक्षा पकडली. आणि शेअर पद्धतीने प्रवासी आला तरी रिक्षा चालकांकडून प्रत्येक प्रवासी ३० रुपये घेतले जातात. रिक्षात मागे ३ आणि पुढे एक/ दोन प्रवासी बसवले जातात. खरे तर हे ही बेकायदा आहे. हे अंतर दोन किलोमीटर आहे. मीटर टाकले तर या अंतरासाठी ३५ रुपये होतात. म्हणजे रिक्षात वेगवेगळे प्रवासी बसले तरी प्रत्येकी तीन प्रवासी बसवले तर प्रत्येकी १२ रुपये आणि चार प्रवासी बसवले तर १० रुपयेच घेतले पाहिजेत.
कल्याण डोंबिवली महापालिका आगामी सार्वत्रिक निवडणुकीत डोंबिवलीकर/ कल्याणकर नागरिकांनी हा मुद्दा ऐरणीवर आणला पाहिजे. मतं मागायला येणारे सर्वपक्षीय उमेदवार आणि राज्य व स्थानिक पातळीवरील सत्ताधारी लोकप्रतिनिधी, विरोधी पक्षातील नेते, स्थानिक पदाधिकारी, नेते यांना रिक्षा मीटर सक्तीची अंमलबजावणी न झाल्याप्रकरणी जाब विचारला पाहिजे. रिक्षा मीटर सक्ती नाही तर मतदार नाही किंवा 'नोटा' चा वापर अशी भूमिका घेतली पाहिजे. हीच संधी आहे. आत्ता नाही तर कधीच नाही.
शेखर जोशी
१७ डिसेंबर २०२५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...








