मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५

'शिवप्रताप'दैनंदिनीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक हजार घटनांची नोंद

'शिवप्रताप'दैनंदिनीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक हजार घटनांची नोंद मुंबई, दि. ३० सप्टेंबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्वाच्या एक हजार घटनांचा उल्लेख असलेली 'शिवप्रताप' दैनंदिनी लवकरच प्रकाशित होणार आहे.‌ डॉ. रवींद्र पाटील यांची संकल्पना असलेल्या २०२६ च्या दैनंदिनीत युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांची सचित्र माहिती देण्यात येणार आहे.
'शिवप्रताप' दैनंदिनीची पृठसंख्या २४० असून दैनंदिनीत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज्ञापत्रे, जीवनपट, सनावळी, दर महिन्याचे नियोजन पान याचा समावेश असेल.‌ दैनंदिनीचे प्रकाशक शब्दप्रभू पब्लिकेशन असून शिवप्रताप दैनंदिनीची नोंदणी सुरू झाली आहे. अधिक माहिती आणि संपर्क संजय जोशी- 9819371425 ( सकाळी साडेदहा ते रात्री साडेसात) किंवा शब्दप्रभू पब्लिकेशन- 7887337332

शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५

कोकणातील कातळशिल्पांचे जतन संवर्धन करणार

कोकणातील कातळशिल्प जतन संवर्धनसाठी पर्यटन विकास महामंडळ,निसर्गयात्री संस्थेत सामंजस्य करार - जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मार्फत राज्यात विविध कार्यक्रम मुंबई, दि. २७ सप्टेंबर कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्पांचे जतन संवर्धन तसेच प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.‌ पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे यांनी रत्नागिरीतील कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्राला भेट दिली. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत गणपतीपुळे येथे झालेल्या कार्यक्रमात निसर्गयात्री संस्था, रत्नागिरीचे संस्थापक अध्यक्ष तसेच कोकणातील कातळशिल्प शोधकर्ते व अभ्यासक सुधीर रिसबूड आणि प्रादेशिक व्यवस्थापक दीपक माने या दोघांच्या स्वाक्षरीने हा सामंजस्य करार करण्यात आला जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने पर्यटन विकास महामंडळाच्या मुख्य कार्यालय आणि संलग्नित सर्व प्रादेशिक कार्यालये, पर्यटक निवास येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक पर्यटन दिन उपक्रमात विविध स्पर्धेत यशस्वी स्पर्धकांना व्यवस्थापकीय संचालक नीलेश र . गटणे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर , नाशिक, रत्नागिरी येथील प्रादेशिक कार्यालयात पर्यटकांचे स्वागत, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. विविध पर्यटक निवासात पर्यटकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. राज्य पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, हॉटेल रिसॉर्ट चे प्रख्यात वास्तुविशारद खोझेमा चितलवाला व वन्यजीव पर्यटन तज्ज्ञ संजय देशपांडे यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.

सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५

महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे सर्व अंक आता माहितीच्या महाजालावर

महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे सर्व अंक आता माहितीच्या महाजालावर गेल्या ९७ वर्षांपासून त्रैमासिक स्वरूपात प्रकाशित होत असलेल्या 'महाराष्ट्र साहित्य पत्रिका' या मासिकाच्या आत्तापर्यंतच्या सर्व अंकांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे सर्व अंक आता साहित्यप्रेमी आणि वाचकांसाठी माहितीच्या महाजालात उपलब्ध झाले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची घटक संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे १९२८ पासून 'महाराष्ट्र साहित्य पत्रिका' हे त्रैमासिक प्रकाशित करण्यात येत आहे. राज्य मराठी विकास संस्थेतर्फे या मासिकाच्या डिजिटायझेशनचे काम हाती घेण्यात आले होते. या त्रैमासिकाचा पहिला अंक १९१३ मध्ये 'विविधज्ञानविस्तार'ची पुरवणी म्हणून प्रकाशित झाला होता. १९२८ पासून ते त्रैमासिक स्वरूपात स्वतंत्रपणे सुरू झाले. त्रैमासिकाचे सर्व अंक महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या sahityaparishad.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

शनिवार, २० सप्टेंबर, २०२५

'सागरी सीमा मंच‘ कोकण प्रांतातर्फे किनारपट्टी स्वच्छता अभियान

'सागरी सीमा मंच‘कोकण प्रांतातर्फे किनारपट्टी स्वच्छता अभियान मुंबई, दि. २० सप्टेंबर जागतिक किनारपट्टी अभियान दिन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षाच्या औचित्याने 'सागरी सीमा मंच'च्या कोकण प्रांतातर्फे किनारा स्वच्छता अभियान उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शनिवारी ( २० सप्टेंबर) या अभियानाची सुरुवात झाली. कोकण किनारपट्टीवरील तब्बल शंभरहून अधिक ठिकाणी हा उपक्रम एकाचवेळी राबविण्यात येणार आहे. समुद्र किनाऱ्यांवरील प्लास्टिक व घनकचरा हटविणे, किनाऱ्यांची प्रत्यक्ष स्वच्छता करणे आणि किनारपट्टी सुरक्षेबाबत जनजागृती करणे असे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. 'स्वच्छ सागर - सुरक्षित सागर, सुरक्षित किनारपट्टी - समर्थ भारत' संकल्पनेला या उपक्रमात मूर्त स्वरूप देण्यात येणार आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी भारतीय तटरक्षक दल, राष्ट्रीय सेवा योजना, मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास खाते, विविध अशासकीय संस्था, शासकीय विभाग, पर्यावरण स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये व शाळा या उपक्रमात सहभागी होणार आहेत. 'सागरी सीमा मंचा' तर्फे विद्यार्थी व स्थानिक नागरिकांमध्ये स्वच्छ व सुरक्षित समुद्रकिनाऱ्यांचे महत्त्व पटवून दिले जात आहे. भारतीय संस्कृतीत भूमातेबद्दल असलेला आदर लक्षात घेऊन आजच्या पिढीने समुद्र, किनारे आणि निसर्ग जतन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, हा संदेश रा. स्व. संघाच्या शताब्दीवर्षातील अभियानातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे 'सागरी सीमा मंच' कोंकण प्रांतच्यावतीने सांगण्यात आले.‌ अधिक माहितीसाठी संपर्क दुर्गेश बोराडे (अभियान प्रमुख) ८१०८०६६२३८

शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५

सीमेवरील दहा हजार जवानांना डोंबिवलीतून फराळ पोहोचणार!

सीमेवरील दहा हजार जवानांना डोंबिवलीतून फराळ पोहोचणार! -भारत विकास परिषदेच्या डोंबिवली शाखेचा उपक्रम डोंबिवली, दि. १९ सप्टेंबर 'ऑपरेशन सिंदूर' निमित्ताने सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारत विकास परिषद-हुतात्मा कॅप्टन विनयकुमार सचान डोंबिवली शाखेतर्फे यावर्षी देशाच्या सीमांवरील दहा हजार जवानांना डोंबिवलीतून दिवाळी फराळ आणि शालेय विद्यार्थ्यांनी बनविलेली शुभेच्छा पत्र पाठविण्यात येणार आहेत. उपक्रमाचे हे तिसरे वर्ष असून २०२४ या वर्षी सीमांवरील पाच हजार तर त्या आधीच्या वर्षी दोन हजारसैनिकांपर्यंत दिवाळी फराळ पोहोचविण्यात आला होता. फराळाचे डबे सीमावर्ती भागात पाठवण्यासाठी सुमारे पन्नास लाख रुपये इतका खर्च अपेक्षित असून लोकसहभागातून ही रक्कम उभी केली जाणार आहे. फराळाचे सर्व पॅकिंग परिषदेचे सदस्य, डोंबिवली शहरातील नागरीक, विद्यार्थी यांच्या श्रमदानातून होणार आहे. याची सुरवात शारदीय नवरात्र घटस्थापनेच्या दिवशी (२२ सप्टेंबर ) या दिवशी पद्मश्री गजानन माने आणि इतर मान्यवरांच्या हस्ते फराळाचे डबे भरून केली जाणार आहे. ‌या सेवायज्ञात कमीत कमी ५०० रुपये देऊन फराळाचा एक डबा किंवा अधिक कितीही देणगी देऊन सहभागी होता येईल. दिलेल्या देणगीला आयकर कायद्यानुसार ८० जी ची वजावट आहे. दानशूर आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन भाविप, डोंबिवली शाखा अध्यक्षा अँड वृंदा कुलकर्णी यांनी केलेआहे. अधिक माहितीसाठी ९८२१४२९६७७/९८९२२५८९२३ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. चाणक्य मंडळचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी, 'एसआयआरएफ' संस्थेच्या संचालिका सुमेधा चिथडे, निवेदिका आणि सूत्रसंचालिका अनघा मोडक आदी मान्यवरांनी ध्वनीचित्रफित तयार करून या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

सोमवार, १५ सप्टेंबर, २०२५

आचार्य अत्रे चौक, आरे मेट्रो स्थानकातून पहिली मेट्रो गाडी आता सकाळी ५.५५ ला सुटणार

आचार्य अत्रे चौक, आरे मेट्रो स्थानकातून पहिली मेट्रो गाडी आता सकाळी ५.५५ ला सुटणार - १५ सप्टेंबरपासून अंमलबजावणी सुरू मुंबई, दि. १५ सप्टेंबर कुलाबा-वांद्रे-आरे-सीप्झ भुयारी मेट्रो ३ मार्गिकेतील आचार्य अत्रे चौक आणि आरे मेट्रो स्थानकावर सकाळी ६.३० ऐवजी आता सकाळी ५.५५ वाजता पहिली मेट्रो गाडी सुटणार आहे. आरे ते बीकेसी मार्गिका ऑक्टोबर २०२४ मध्ये तर बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मार्गिका मे २०२५ मध्ये सुरू झाली. ही मार्गिका सेवेत दाखल झाल्यापासून सोमवार ते शनिवारदरम्यान सकाळी ६.३० ते रात्री १०.३० या वेळेत आरे ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकादरम्यान मेट्रो गाड्या चालवल्या जातात. तर रविवारी मात्र सकाळी ८.३० ते रात्री १०.३० अशी मेट्रो सेवेची वेळ होती.

दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचे बुधवारी उदघाटन; 'संत तुकाराम' चित्रपटाचे सादरीकरण

दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचे बुधवारी उदघाटन; 'संत तुकाराम' चित्रपटाचे सादरीकरण मुंबई, दि. १५ सप्टेंबर महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचे येत्या १७ सप्टेंबर रोजी उदघाटन करण्यात येणार आहे.‌ प्रभात फिल्म कंपनीनिर्मित 'संत तुकाराम' हा चित्रपट यावेळी दाखविण्यात येणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या लघू नाट्यगृहात दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगातील सर्वोत्तम दहा चित्रपटांमध्ये स्थान मिळवणारा 'संत तुकाराम' पहिला भारतीय चित्रपट ठरला होता. दर्जेदार चित्रपट बघणारा रसिकवर्ग घडविणे आणि जुन्या काळातील गाजलेले, ऐतिहासिक चित्रपट तसेच नव्या पिढीने निर्मित केलेले सकस, प्रगल्भ व विचारप्रवर्तक चित्रपट यांचा रसिकांना आस्वाद घेता यावा, याकरिता हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील सांगितले. कार्यक्रम विनामूल्य असून 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश' या तत्वावर आसन व्यवस्था करण्यात येणार आहे.

शनिवार, १३ सप्टेंबर, २०२५

यावर्षी नवरात्र दहा दिवसांचे

यावर्षी नवरात्र दहा दिवसांचे- ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ.सोमण ठाणे, दि. १३ सप्टेंबर आश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी होत असल्याने यंदाच्या वर्षी नवरात्र दहा दिवसांचे असून २२सप्टेंबर ते १ आक्टोबर २०२५ या कालावधीत नवरात्रोत्सव आहे, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.‌ आश्विन महिन्यात शेतात तयार झालेले धान्य घरात येत असते. म्हणून नवरात्र निर्मिती शक्तीचा,आदिशक्तीचा उत्सव असून तो महिलांच्या सबलीकरणाचाही उत्सव असतो, असे सोमण यांनी सांगितले.‌ नवरात्रात कुठल्या रंगाचे वस्त्र परिधान करावे हे कुठल्याही धर्मग्रंथात सांगितलेले नाही. परंतु नवरात्र उत्सव हा केवळ धार्मिक नाही तर तो सामाजिक, सांस्कृतिकही आहे. नवरात्रात महिलांनी एकाच रंगाची वस्त्रे परिधान केल्याने त्यांच्यात समानतेची, एकतेची आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत होते, असेही सोमण म्हणाले.‌ नवरात्री नवरंग २०२५ -------------------------- १)सोम.२२सप्टें. सफेद/पांढरा २) मंगळ.२३ सप्टें. लाल ३) बुध.२४ सप्टें. निळा ४) गुरू.२५ सप्टें.पिवळा ५) शुक्र.२६ सप्टें. हिरवा ६) शनि.२७ सप्टें.करडा/ग्रे ७) रवि. २८ सप्टें.केशरी/भगवा ८) सोम.२९सप्टें. मोरपिशी/पिकाक ग्रीन ९) मंगळ.३० सप्टें. गुलाबी. १०) बुध.१ आक्टो. जांभळा.

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करणार

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करणार- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार मुंबई, दि. १३ सप्टेंबर ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार यांनी शनिवारी येथे दिली. सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेल्या एका बैठकीत बारव संवर्धन, संरक्षण याबाबत आढावा घेण्यात आला.‌ राज्यात ऐतिहासिक वारसा असलेल्या आणि पुराणकाळापासून ज्यांच्या नोंदी सापडतात अशा तीन हजारांहून अधिक बारव आहेत. येथे ज्या पद्धतीचे स्थापत्यशास्त्र वापरले आहे, त्या स्थापत्यशास्त्राचा नमुना जगामध्ये दुर्मिळ असून या बारवमुळे जलसंवर्धन आणि जलसंधारणाचेही काम केले जात आहे. शासकीय यंत्रणेतील अधिकारी तसेच जलसंधारण, ऐतिहासिक वारसा विषयांमध्ये काम करणाऱ्या तज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहे, असे शेलार यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यामध्ये या सगळ्यांचं दस्तावेजीकरण करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व बारवांच्या प्राथमिक सर्वेक्षणाच्या अहवालाचे काम येत्या तीन महिन्यांमध्ये पूर्ण केले जाणार आहे.

बुधवार, १० सप्टेंबर, २०२५

भारत विकास परिषद आयोजित 'भारत को जानो' स्पर्धा

भारत विकास परिषद आयोजित 'भारत को जानो' स्पर्धा डोंबिवली, दि. १० सप्टेंबर भारत विकास परिषद- डोंबिवली शाखा आणि हुतात्मा कॅप्टन विनयकुमार सचान स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच 'भारत को जानो' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता ६ वी वी ते ८ वी या छोट्या गटात २८ तर मोठ्या गटात २५ संघ सहभागी झाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून अतिश कुलकर्णी तर कविता मिश्रा प्रांत निरीक्षक म्हणून उपस्थित होत्या. छोट्या गटात ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूलने पहिला तर मोठ्या गटात स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, विष्णुनगरने पहिला क्रमांक पटकावला. भारत विकास परिषद डोंबिवली शाखेच्या अध्यक्षा ॲड. वृंदा कुळकर्णी यांच्यासह दोन्ही संस्थानचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

'शालू झोका दे गो मैना' आता मोठ्या पडद्यावर

'हास्यजत्रा'प्रसिद्ध प्रभाकर मोरे यांचे 'शालू झोका दे गो मैना' आता मोठ्या पडद्यावर - आनंद शिंदे यांनी गायलेले गाणे समाज माध्यमांवर सादर मुंबई, दि. १० सप्टेंबर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' प्रसिद्ध अभिनेते प्रभाकर मोरे यांचे 'शालू झोका दे गो मैना' हे गाणे लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असून गायक आनंद शिंदे यांनी ते गायले आहे. समाज माध्यमांवर हे गाणे नुकतेच प्रकाशित झाले आहे. प्रभाकर मोरे,धनश्री काडगावकर यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे 'लास्ट स्टॉप खांदा' या आगामी मराठी चित्रपटात असून हा चित्रपट येत्या २१ नोव्हेंबररोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. श्रमेश बेटकर यांनी लिहिलेलं हे गाणं किशोर मोहिते यांनी संगीतबद्ध केले आहे. या गाण्याची युट्यूब लिंक https://youtu.be/Hbgz8RMOcPI?si=iUrLbZGyQ83ljp48

वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी ग्रंथालय मित्र मंडळ

वाचन संस्कृतीच्या जतन,संवर्धनासाठी ग्रंथालय मित्र मंडळ मराठी वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने डोंबिवली ग्रंथ संग्रहालयातर्फे ग्रंथालय मित्र मंडळ ही संकल्पना घेऊन काम करण्यात येत आहे. वाचक, लेखक आणि ग्रंथालये यांच्यात संवाद साधून, समाजातील विविध घटकांना बरोबर घेऊन ही चळवळ पुढे नेण्याचा मानस डोंबिवली ग्रंथ संग्रहालयाचे माजी मुख्य कार्यवाह सुधीर बडे यांनी व्यक्त केला. ग्रंथालय मित्र मंडळ संकल्पनेविषयी बडे यांच्याशी केलेली बातचीत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीकरता संपर्क सुधीर बडे- +91 93214 31548 गिरीश घाटे- +91 98201 46432 विलास चंदने- +91 98194 23626 प्रकाश ओक- +91 81082 36901 ग्रंथालय मित्र मंडळ संकल्पनेविषयी डोंबिवली ग्रंथ संग्रहालयाचे माजी मुख्य कार्यवाह सुधीर बडे यांच्याशी केलेली बातचीत शेजो उवाच या युट्यूब चॅनेलवर ऐकता/ पाहता येईल. खाली दिलेल्या लिंकवर अंगठा टेकवला की ही लिंक ओपन होईल. शेजो उवाच https://youtu.be/olPxM6iD31E?feature=shared

ग्रामीण भागातील मुलांच्या रखडणाऱ्या लग्नाच्या विषयावरील 'कुर्ला टू वेंगुर्ला'

ग्रामीण भागातील मुलांच्या रखडणाऱ्या लग्नाच्या विषयावरील 'कुर्ला टू वेंगुर्ला' - येत्या १९ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित मुंबई, दि. १० सप्टेंबर ग्रामीण भागातील तरुणांच्या रखडणाऱ्या लग्नाचा विषय 'कुर्ला टू वेंगुर्ला' या आगामी चित्रपटात मांडण्यात आला असून हा चित्रपट येत्या १९ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. विजय कलमकर दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ग्रामीण भागात मुलांची लग्न जमणे ही समस्या झाली आहे. गावातल्या मुलींना शहराचे आकर्षण असते, त्यांच्याही आयुष्याबद्दल काही इच्छा-आकांक्षा असतात. परिणामी शहर आणि ग्रामीण भाग अशी एक दरी निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या रखडणाऱ्या लग्नाचा संवेदनशील विषय, त्याच्याशी जोडलेले सामाजिक मुद्दे, परस्पर नातेसंबंध अशा विषयाची मांडणी कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटात करण्यात आली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लेखन अमरजीत आमले यांचे असून चित्रपटात वीणा जामकर, प्रल्हाद कुडतरकर, वैभव मांगले, सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर, साईंकित कामत, अमेय परब, शेखर बेटकर, अनघा राणे इत्यादी कलाकार आहेत.

मंगळवार, ९ सप्टेंबर, २०२५

राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला हाच का तुमचा सार्वजनिक गणेशोत्सव?

राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला हाच का तुमचा सार्वजनिक गणेशोत्सव? शेखर जोशी राज्य शासनाने म्हणे यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला होता.‌ हाच का तुमचा राज्य महोत्सव... पुण्यात विसर्जन मिरवणूक ३५ तास, छातीत धडकी भरविणा-या डीजेच्या भींती, अचकट विचकट गाणी व अश्लील नृत्य, ढोल ताशांचा दणदणाट ( दोन/चार ढोल ताशे वादक असतील तर एकवेळ समजू शकतो, ढोल ताशा वादकांची पथके च्या पथके. पारंपरिक असले तरी एका मर्यादेपलीकडे त्याचाही त्रासच होतो), लेझर दिवे आणि धांगडधिंगा.‌(काही अपवाद वगळता) पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात काही अपवाद वगळता सर्वत्र हेच चित्र होते. स्थानिक पातळीवरील सर्वपक्षीय निर्लज्ज,कोडग्या लोकप्रतिनिधींचाच वरदहस्त या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर असल्याने वेगळे काय होणार? तुम्ही काहीही करा, सर्वसामान्य सुजाण व सुसंस्कृत नागरिकांना कितीही बोंबलू द्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, या मानसिकतेमुळे ही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व त्याचे पदाधिकारी, कार्यकर्ते सोकावले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हा निर्णय घेतला खरा. पण उत्सवाचे विकृतीकरण आणि बाजारीकरण होणार नाही, हे ही राज्य शासन आणि सर्व प्रशासकीय यंत्रणांनी पाहायला हवे होते.‌ पण राज्यात काही सन्माननीय अपवाद वगळता कुठेही दिसले नाही. सोलापूरमध्ये शांततेत विसर्जन मिरवणूक पार पडते तर राज्यात इतर ठिकाणी ते का होत नाही? रस्ता अडवून, पादचारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे भव्य मंडप उभारून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झालाच पाहिजे हा हट्ट कशासाठी? शहरातील बंदिस्त सभागृह, मंगल कार्यालय याठिकाणी गणपती बसवणार असाल तर आणि तरच सार्वजनिक गणेशोत्सवाला परवानगी दिली जाईल, याची कठोरात कठोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी सत्ताधारी राज्यकर्ते आणि विरोधक यांनी धाडस दाखवले पाहिजे. डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेली अनेक वर्षे त्यांचा गणेशोत्सव सुयोग मंगल कार्यालयात साजरा करत आहेत. मंडळाची गणपती आगमन आणि विसर्जन मिरवणूकही पारंपरिक पद्धतीने निघते.फटाके, डीजेजा वापर नसतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे सदानकदा फडणवीस, शिंदे यांच्यावर तोंडसुख घेत असतात. टोमणेगिरी करतात. पण या प्रकरणी त्यांची अळी मिळी गूप चिळी आहे. अर्थात लोकानुनय न करता प्रसंगी कटू निर्णय घेऊन सत्ता राबवायची असते. शिवसेना एकसंघ असताना शिवसेनेच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी मुंबईतील गणेश मूर्तींच्या उंचीवर मर्यादा आणण्यासाठी महापौर असताना प्रयत्न सुरू केले होते. खरे तर पक्षप्रमुख आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा सांगणाऱ्या त्यांच्या या नातवाने महापौर डॉ. राऊळ यांना पाठिंबा देऊन हा विषय धसास लावायला हवा होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेत तर शिवसेनेचेच बहुमत होते, सत्ताही होती. पण उद्धव ठाकरे यांनी कच खाल्ली आणि धमक दाखवली नाही. मतपेढीवर डोळा ठेवून सद्गुण विकृती असलेले मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, चमकेश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी याची गंभीर दखल घेऊन कायदा धाब्यावर बसविणारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि पदाधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कायद्यानुसार कारवाई, शिक्षा केली पाहिजे. आम्ही अमूक करू, तमूक करु, कायद्याची अंमलबजावणी करू, यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याची काळजी घेऊ, अशी तोंडपाटीलकी न करता प्रत्यक्ष व ठोस कारवाई झाली असल्याचे लोकांना दिसू द्या. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा काळ सोकावत चालला आहे. शेखर जोशी

सोमवार, ८ सप्टेंबर, २०२५

'एक प्रभाग एक गणपती' काळाची गरज

'एक प्रभाग एक गणपती' काळाची गरज शेखर जोशी दहीहंडी, गणपती, नवरात्र या सर्व उत्सवातील पावित्र्य, मांगल्य लोप पावले आहे. हे उत्सव आता इव्हेंट झाले असून सर्वपक्षीय राजकारण्यांनी त्यावर कब्जा केला आहे. गल्ली ते राज्य पातळीवरील सर्वपक्षीय नेत्यांसाठी तो मनी, मसल पॉवरचा खेळ झाला आहे. या सर्व उत्सवांचे झालेले विकृतीकरण आणि बाजारीकरण थांबविण्यासाठी आता 'एक प्रभाग एक गणपती' ही काळाची गरज बनली आहे. कटू वाटला तरी लोकानूनय न करता कठोरात कठोर निर्णय घेऊन ते कागदावर न राहता, त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होईल, ते पाहिले पाहिजे.‌ फटाके, डीजे, लेझर बंदी फक्त कागदावरच राहिली असून नियम, कायदा धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने सर्व काही सुरू आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर कोणतेही मंडळ असो ती मिरवणूक रात्री दहा वाजता संपलीच पाहिजे. फटाके, डीजे, लेझर बंदी म्हणजे बंदीच हवी. जी मंडळे याचे उल्लंघन करतील त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात कायद्यानुसार गुन्हा दाखल करून मंडळाला जबरदस्त आर्थिक दंड ठोठावला पाहिजे. किमान एक तरी उदाहरण समोर आले तर कदाचित या बेबंद वागण्याला आळा बसेल.
उंचच उंच मूर्तींची स्पर्धा, रस्ते अडवून, पादचारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे मंडप उभारून, आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत अचकट विचकट गाणी, अश्लील नृत्य, छातीत धडकी भरेल आणि कानाचे पडदे फाटतील इतक्या मोठ्या आवाजातील डीजे, लेझर दिवे म्हणजेच गणपती उत्सव हे रूढ होत चालले आहे. आगमन आणि विसर्जन मिरवणुकींना वेळेचे बंधन, भान जराही राहिलेले नाही. निवासी परिसर, रुग्णालये परिसरातही छातीत धडकी भरेल आणि कानठळ्या बसतील अशा आवाजात मिरवणूक काढली जाते. आपल्यामुळे इतरांना त्रास होतो, ही गोष्ट मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनाही जाणवत असणारच. पण आमचे कोणी, काही वाकडे करू शकत नाही, अशा माजात वर्षानुवर्षे हे सुरू आहे. दहीहंडी, गणपती, नवरात्र उत्सवाचे विकृतीकरण, बाजारीकरण झाले आहे.‌ सण/ उत्सवातील हे बाजारीकरण, विकृतीकरण, मनी व मसल पॉवरची स्पर्धा म्हणजे हिंदुत्व, असे केले म्हणजेच सण/ उत्सव साजरे करणे नाही, सुजाण, सुसंस्कृत आणि सारासार विचार करण्यारे याच्याशी नक्कीच सहमत असतील.
खरे तर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक अशा महापालिका क्षेत्रात 'एक प्रभाग एक गणपती' ही संकल्पना राबविली पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. अर्थात हे स्वप्नच आहे. निगरगट्ट आणि कोडगे सर्वपक्षीय राजकीय नेते हे कधीच होऊ देणार नाही. 'पार्टी विथ डिफरन्स' असे स्वतःला म्हणवून घेणाऱ्या भाजपने, मुख्यमंत्री- गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या सर्व लोकप्रतिनिधींनी तरी किमान एक वर्ष तरी आपापल्या कार्यक्षेत्रात, मतदार संघात, शहरात 'एक प्रभाग एक गणपती' हा उपक्रम राबवून दाखवावा.‌
खरे तर घरगुती गणपती आणि सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणपती मूर्तीची उंची अनुक्रमे दोन फूट आणि पाच इतकीच असली पाहिजे. रस्ते अडवून, पादचारी व वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे मंडप उभारून सार्वजनिक दहीहंडी गणेशोत्सव, नवरात्रौत्सव बंदच झाले पाहिजेत. 'एक प्रभाग एक गणपती' ही संकल्पना राबविली पाहिजे. प्रभागातील शाळा, महाविद्यालय किंवा खासगी सभागृहात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाला पाहिजे. मूर्तीच्या उंचीवर मर्यादा आणली की हे करणे सहज शक्य आहे. अर्थात हे सर्व करण्यासाठी तळमळ, आच असायला हवी. लोकानुनय न करता कटू निर्णय घेऊन ते राबविण्याची धमक आणि त्याला पाठिंबा देण्याची तयारी अनुक्रमे सत्ताधारी आणि विरोधकांनी दाखवली पाहिजे. अर्थात निगरगट्ट आणि कोडग्या सर्वपक्षीय राजकारण्यांकडून ही अपेक्षा बाळगणे म्हणजे स्वप्नरंजनच आहे. शेखर जोशी ८ सप्टेंबर २०२५

रविवार, ७ सप्टेंबर, २०२५

सामूहिक अथर्वशीर्ष पठणाने बाप्पाला निरोप!

सामूहिक अथर्वशीर्ष पठणाने बाप्पाला निरोप! - डोंबिवलीच्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूक डोंबिवली, दि. ७ सप्टेंबर डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण करून विसर्जन करण्यात आले. मंडळाच्या ७६ व्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता शनिवारी झाली. यंदाच्या वर्षी उत्सवातील सर्व जबाबदाऱ्या मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आल्या होत्या. यंदाच्या वर्षी बाप्पांच्या विसर्जनापूर्वी सामूहिक श्री अथर्वशीर्षाचे पठण करण्याचे मंडळाने ठरविले होते. त्यानुसार ताई पिंगळे चौकात मिरवणूक पोहोचल्यावर मंडळाचे कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व भाविकांनी अथर्वशीर्षाचे पठण केले.
मंडळाची गणपती आगमन आणि विसर्जन मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण असते.‌ ढोल पथके, किंवा डी जे, गुलाल, फटाके यापैकी कोणत्याच गोष्टीचा समावेश हा टिळकनगरच्या विसर्जन मिरवणुकीत कधीच नसतो. पारंपरिक पद्धतीने निघणाऱ्या या विसर्जन मिरवणुकीत बाप्पाची पालखीत विराजमान झालेली मूर्ती, त्यापुढे असणारे लेझीम पथक, ढोल आणि हलगी वाजवणारे मंडळाचेच कार्यकर्ते आणि त्यापुढे लेझीम, झांज खेळणारे, झेंडे नाचवणारे नागरिक असे या मिरवणुकीचे स्वरूप असते. यंदाच्या वर्षी तब्बल ५२ लहान मुलामुलींचे पथक या मिरवणुकीत होते. त्यांनी साकारलेले मानवी मनोरे पाहून सर्वच नागरिक थक्क झाले.‌
मंडळातर्फे उत्सव काळात श्री गणपती अथर्वशीर्षाची सहस्त्रावर्तने, श्री विष्णु सहस्रनामाचे पठण, श्री सत्यनारायण पूजा, कोकणातल्या सुप्रसिद्ध आरत्या, भोवत्या आणि ७६ पदार्थांचा अन्नकोट इत्यादी उपक्रम आयोजित करण्यात आले होते. मूळचे डोंबिवलीकर असलेले प्रसिद्ध कलादिग्दर्शक संजय धबडे गेली २४ वर्षे गणेशोत्सवासाठी भव्य सजावट/ देखावे साकारत आहेत.‌ यूनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेल्या १२ किल्ल्यांच्या प्रतिकृतीचे दर्शन यंदा घडविले.