गुरुवार, ९ मार्च, २०१७

पुस्तक देवाण-घेवाण योजना


पुस्तक देवाण-घेवाण योजना

पै फ्रेंड्स लायब्ररीचा आगळा उपक्रम

दूरचित्रवाहिन्या, स्मार्ट भ्रमणध्वनी, संगणक आणि सध्याच्या माहितीच्या महाजालात वाचन संस्कृती हळूहळू लोप पावत असल्याची भीती व्यक्त करण्यात येते. काही प्रमाणात ती खरीही आहे. आत्ताच्या तरुण पिढीचे किंवा सध्या शाळेत व महाविद्यालयात असलेल्या विद्यार्थ्यांचे अवांतर मराठी वाचन हे कमी झाले आहे. शालेय किंवा महाविद्यालयीन अभ्यासक्रमासाठी असलेल्या पाठ्यपुस्तकांचे वाचन सोडले तर काही अपवाद वगळता हल्लीची पिढी मराठी पुस्तकांचे वाचन करत नाही, असे पाहायला मिळते. आत्ताचे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी हेच भावी वाचक असणार आहेत. त्यामुळे या नव्या पिढीत आणि एकूणच समाजातील लोप पावत चाललेल्या वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी डोंबिवलीतील पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे पुस्तक आदान-प्रदान योजना (डोंबिवली बुक इ चेंज एक्झिबिशन) या आगळ्या उपक्रमाचे आयोजन डोंबिवलीत करण्यात आले आहे. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ आणि डोंबिवलीकर मासिक यांचेही सहकार्य या उपक्रमास लाभले आहे.

आपल्यापैकी काही जण पुस्तके विकत घेतात तर काही जणांना वाढदिवस आणि अन्य काही निमित्ताने पुस्तके भेट म्हणून मिळतात.ही पुस्तके एकदा वाचून झाल्यानंतर काही पुस्तकांचा अपवाद वगळता तशीच पडून राहतात. ती पुन्हा काही वाचणे होत नाही. पडून राहिलेल्या या पुस्तकांच्या बदल्यात नवी पुस्तके मिळावीत, एकमेकांकडे असलेल्या अशा अनेक पुस्तकांचे आदान-प्रदान व्हावे आणि विविध विषयांवरील अशी हजारो पुस्तके पुन्हा वाचनात यावी, हा उद्देशही या योजनेमागे आहे. डोंबिवलीतील एक प्रमुख ग्रंथालय म्हणून पै फ्रेंड्स लायब्ररीची ओळख आहे. डोंबिवली पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही ठिकाणी ग्रंथालयाच्या शाखा आहेत. ग्रंथालयाचे संपूर्ण संगणकीकरण झाले असल्याने सभासदांना पुस्तक कोणत्याही शाखेत जमा करता येऊन नवीन पुस्तक घेता येऊ शकते. दोन वर्षांपूर्वी पै फ्रेंड्स लायब्ररीने एका दिवसात एक हजारांहून अधिक नवे सभासद करुन घेण्याचा आगळा विक्रमही केला होता. १ जानेवारी २०१५ रोजी सकाळी या नवीन सभासद योजनेस सुरुवात झाली आणि दिवस अखेरीस १ हजार २१ नव्या सभासदांची नोंदणी करण्यात आली. २२ मे १९८६ रोजी पुंडलिक पै यांनी टिळकनगर विभागात अवघ्या शंभर पुस्तकांसह ग्रंथालय सुरु केले. डोबिवलीत ग्रंथालयाच्या पाच शाखा आहेत. ग्रंथालयाचे चौदा हजारांहून अधिक सभासद असून विविध विषयांवरील एक लाखांहून अधिक पुस्तके ग्रंथालयात आहेत. मुंबई, पुणे, नाशिक येथील वाचकांसाठी ऑनलाईन ग्रंथालयही चालविण्यात येते. या ऑनलाईन ग्रंथालयाचेही सुमारे दोन हजार सभासद आहेत. ऑनलाईन ग्रंथालयाच्या सभासदांना त्यांना हवे असलेले पुस्तक घरपोहोच देण्यात येते. पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे डोंबिवलीत साहित्य, वाचनविषयक अन्यही विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.

पुस्तक आदान-प्रदान योजनेअंतर्गत आपल्याकडे असलेली आणि वाचून झालेली कोणत्याही विषयांवरील मराठी व इंग्रजी भाषेतील दहा पुस्तके अवघे शंभर रुपये भरुन पै फ्रेंड्स लायब्ररीकडे जमा करायची आहेत. ही पुस्तके जमा केल्यानंतर त्याची पावती देण्यात येणार आहे. आपण दिलेल्या दहा पुस्तकांच्या बदल्यात आपल्याला पाहिजे ती मराठी व इंग्रजी भाषेतील अन्य कोणतीही दहा पुस्तके घेता येणार आहेत. हे करताना आपण दिलेली पुस्तके जेवढ्या किंमतीची असतील तेवढ्याच किंमतीची पुस्तके घेतली पाहिजेत असे कोणतेही बंधन नाही. तुम्ही दिलेल्या दहा पुस्तकांच्या बदल्यात अन्य कोणतीही दहा पुस्तके तुम्हाला घेता येणार आहेत. पुस्तके ग्रंथालयाकडे जमा करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०१७ अशी असून पै फेंड्स लायब्ररीच्या कोणत्याही शाखेत ही पुस्तके जमा करता येणार आहेत.

जमा केलेली दहा पुस्तके आणि त्या बदल्यात आपण घेणार असलेल्या दहा पुस्तकांच्या आदान-प्रदान सोहोळ्यासाठी पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे येत्या ९ ते १६ एप्रिल २०१७ या कालावधीत टिळकनगर विद्या मंदिर, डोंबिवली (पूर्व) या शाळेच्या पटांगणावर भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आह. सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे. आपल्याकडे असलेली कोणतीही दहा पुस्तके येत्या ३१ मार्च पर्यंत १०० रुपये भरुन ग्रंथालयात जमा करायची आहेत. ही पुस्तके सुस्थितीत आणि वाचण्यायोग्य असली पाहिजेत. पुस्तकांच्या मूळ प्रतीच स्विकारल्या जाणार आहेत. मराठी आणि इंग्रजी भाषेतील कथासंग्रह, कादंबरी, ललितलेख संग्रह, चरित्र-आत्मचरित्र आदी पुस्तके घेण्यात येणार आहेत.

या संदर्भात अधिक माहिती ९८३३७३२७१३ या क्रमांकावर मिळू शकेल.

शेखर जोशी

बुधवार, ८ मार्च, २०१७

डोंबिवलीकर दिनदर्शिका-उद्योगशील नगरीचं प्रतिबिंब


डोंबिवलीकर दिनदर्शिका-उद्योगशील नगरीचं प्रतिबिंब

डोंबिवली नगरी सुशिक्षीतांचे शहर म्हणून ओळखले जाते. विविध साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल येथे असते. विविध क्षेत्रात उच्चपदावर काम करणारी अनेक मंडळी ही डोंबिवलीकरच आहेत. गुढीपाडव्याला अर्थात हिंदू नववर्षाच्या निमित्ताने आता मुंबईसह संपूर्ण राज्यभरात स्वागतयात्रा/ शोभायात्रा काढण्यात येतात. पण त्याची मुहूर्तमेढ डोंबिवलीने रोवली आहे. विविध क्षेत्रात काम करणाऱया कार्यकर्त्यांचे मोहोळ म्हणूनही डोंबिवलीकडे पाहिले जाते. अशा या डोंबिवलीत नेहमीच काहीतरी आगळे व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. आमदार आणि राज्यमंत्री रविंद्र चव्हाण संपादक आणि प्रकाशक असलेल्या 'डोंबिवलीकर'मासिकाने प्रकाशित केलेली 'डोंबिवलीकर' दिनदर्शिका हा त्याचाच एक भाग आहे.

दरवर्षी खासगी किंवा शासकीय आस्थापनांकडून दिनदर्शिका प्रकाशित केल्या जातात. डोंबिवलीकरच्या दिनदर्शिकेचे वेगळेपण म्हणजे दरवर्षी एक नवी संकल्पना घेऊन दिनदर्शिका प्रकाशित केली जाते. यंदाच्या दिनदर्शिकेची संकल्पना 'उद्योगशील' डोंबिवलीकर अशी आहे. डोंबिवली नगरीला विविध क्षेत्रात काम करणाऱया अनेक मान्यवरांनी सन्मािनत केले आहे. त्या त्या क्षेत्रात उच्च पदावर जाऊन अनेक डोंबिवलीकरांनी आपल्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. डोंबिवली नगरीतील ज्येष्ठ आणि तरुण उदयोगरत्नांचा सन्मान यंदाच्या दिनदर्शिकेत करण्यात आला आहे. 'डोंबिवलीकर' मासिकाचे कार्यकारी संपादक प्रभू कापसे यांच्या संकल्पनेतून ही दिनदर्शिका तयार झाली आहे. डोंबिवली नगरीतील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिंचा परिचय सगळ्यांना करुन देण्याचा प्रयत्न या दिनदर्शिकेतून करण्यात येतो.

दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती निवडल्या जातात. २०१७ या वर्षासाठी उद्योजक ही संकल्पना घेण्यात आली आहे. अशा प्रकारची संकल्पना घेऊन गेली पाच वर्षे ही दिनदर्शिका प्रकाशित होत आहे. २०१७ च्या दिनदर्शिकेत १४४ ज्येष्ठ आणि तरुण डोंबिवलीकर उद्योजकांचा त्याच्या छायाचित्रांसह थोडक्यात परिचय यात करुन देण्यात आला आहे. प्रत्येक महिन्याच्या पानावर तारीख, वार, पंचांग यासह त्या सर्वाचे एकत्र छायाचित्र आणि त्या महिन्याच्या मागील पानावर त्यांचा परिचय करुन देण्यात आला आहे.या बरोबरच दिनदर्शिकेत डोंबिवली शहरातील विविध सामाजिक संस्था, त्यांचा थोडक्याात परिचय, महत्वाचे नागरी संपर्क, दूरध्वनी क्रमांकही यात देण्यात आले आहेत. या सगळ्यामुळे ही दिनदर्शिका संग्राह्य झाली आहे.

डोंबिवलीकर मासिकाचे कार्यकारी संपादक प्रभू कापसे

prabhu.kapse@gmail.com

डोंबिवलीकर मासिक व दिनदर्शिकेसाठी संपर्क

०२५१-२४२०३७३

शेखर जोशी

मंगळवार, ७ मार्च, २०१७

दिवाकर रावते यांचा 'बोलाचा भात आणि बोलाचीच कढी'


परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा 'बोलाचा भात आणि बोलाचीच कढी'!

या पूर्वीही रावते कल्याण-डोंबिवलीत अरे होते तेव्हाही त्यांनी मुजोर आणि बेशिस्त रिक्षाचालकांना धडा शिकविण्याच्या घोषणा केल्या होत्या. मात्र त्या हवेतच विरल्या. कल्याण-डोंबिवलीत मीटरसक्ती लागू केली जाईल, ज्या प्रवाशांना मीटरनुसार प्रवास करायचा असेल त्यांना तो करता येईल, जे रिक्षाचालक मीटरनुसार रिक्षा चालविणार नाहीत त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, कल्याण येथे मीटर प्रमाणे ज्यांना प्रवास करायचा असेल त्यांच्यासाठी स्वतंत्र रांग असेल वगैरे, वगैरे घोषणा, आश्वासने फक्त कागदावर राहिली आहेत.

मुजोर रिक्षाचालकाकडून एस.टी.च्या चालकाला मारहाण झाल्याच्या प्रकरणी रावते कल्याण येथे आले होते. अशा काही घटना घडल्या, बेशिस्त व मुजोर रिक्षाचालकांच्या बाबतीत वृत्तपत्रे व अन्य प्रसारमाध्यमातून बातम्या आल्या की रावते यांच्यासह परिवहन विभाग, आरटीओ, वाहतूक पोलीस या सगळ्यांना जाग येते. रिक्षा चालक-मालक संघटनांचे नेतेही आम्हाला प्रवाशांचा किती कळवळा आहे याचा देखावा करतात. पुन्हा ये रे माझ्या मागल्या.

खरे तर शेअर पद्धत बंद करा, अशी कोणाचीही मागणी नाही. ती सुरुच ठेवण्यात यावी. पण ज्या प्रवाशांना मीटरनुसार प्रवास करायचा असेल त्यांच्यासाठी रिक्षाचालकांनी कोणतेही कारण न देता मीटर टाकावे इतकीच सर्वसामान्य प्रवाशांची माफक अपेक्षा आहे. डोंबिवलीत पूर्वेहून पश्चिमेला किंवा पश्चिमेहून पुर्वेला जायचे असेल तर केवळ उड्डाणपूल पार करावा लागतो, परतीचे भाडे मिळत नाही अशी कारणे सांगून रिक्षाचालक मनमानी पद्धतीने अव्वाच्या सव्वा पैसे मागतात. प्रवाशांची ही लूट वर्षानुवर्षे सुरु आहे.

रावते साहेब कल्याण-डोंबिवलीतील मुजोर रिक्षाचालकांना तुम्हाला खरोखरच धडा शिकवायचा असेल तर पहिल्यांदा ते मनावर घ्या. प्रसारमाध्यमातून बातम्या आल्या की केवळ तात्तुरती मलमपट्टी करु नका. सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्वपक्षीय रिक्षा संघटनांच्या नेत्यांना व पदाधिकाऱयांना पहिल्यांदा वठणीवर आणा. त्यांनी प्रवासी हिताचीच भूमिका घ्यावी अशी तंबी त्यांना द्या. कल्याण-डोंबिवलीतील बहुतांश रिक्षातळ हे शेअर पदधतीचे आहेत. मध्यंतरी मीटरनुसार रिक्षांची वेगळी रांग करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्याला यश आले नाही. त्यामुळे मीटर पद्धतीची वेगळी रांग न करता रिक्षातळावर (मग प्रवासी एकटा रिक्षात बसला आणि त्याला मीटरनुसार जायचे असले) तरी किंवा रिक्षातळसोडून अन्यत्र कुठेही प्रवाशाने रिक्षा पकडली तरीही प्रवाशाने मीटर टाका सांगितले तर रिक्षाचालकाने कोणतीही खळखळ न करता मीटर डाऊन केले पाहिजे, अशा सूचना सर्व रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱयांना द्या.ा त्यांनी आपापल्या रिक्षासंघटनेत त्याची कशी अंमलबजावणी करायची ते त्यांच्यावर सोपवा. पण हे तातडीने झालेच पाहिजे, अशा सूचना सर्वपक्षीय रिक्षा संघटनेचेने नेते आणि पदाधिकाऱयांना द्या. शिवसेनाप्रणित रिक्षासंघटनेपासून याची सुरुवत करुन अन्य संघटनांसाठी एक नवा आदर्श घालून द्या.

कल्याण-डोंबिवलीतील सर्वच रिक्षा संघटनांचे नेते राजकीय पक्षांचे पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी आहेत. त्या सगळ्यांना हजारो प्रवाशांपेक्षा मुठभर रिक्षाचालकांचे हित जपण्यात जास्त धन्यता वाटते. डोंबिवलीत पश्चिमेला पं. दिनदयाळ चौकात, पश्चिमेलाच रेल्वेस्थानक फलाट क्रमांक एकच्या बाहेर (कल्याण दिशेकडे आणि विष्णू नगर पोलीस ठाण्यासमोर) बेशिस्त व मुजोर रिक्षाचालक रस्ता अडवून वाटेल तशा रिक्षा उभ्या करतात. ना रिक्षा संघटनांचे पदाधिकारी किंवा नेते, ना वाहतूक पोलीस ना आरटीओ कोणीही त्यांना वठणीवर आणू शकलेले नाही. इथे केवळ रिक्षाचालक दोषी नाहीत तर रिक्षात बसणारे प्रवासीही तेवढेच दोषी आहेत.

अन्य काही सूचना

-डोंबिवली पश्चिमेला रेल्वेस्थानकाबाहेर रस्ता अडविणाऱया रिक्षाचालकांच्या विरोधात सातत्याने काही दिवस मोहिम राबवा.

-डोंबिवली पश्चिमेला सारस्वत बॅंकेसमोरील फलाट क्रमांक एकच्या बाहेर कडोंमपा परिवहन सेवेचा केलेला बस थांबा कल्याणच्या दिशेकडे (फलाट क्रमांक एक) सरकवा. म्हणजे रस्ता अडविणाऱया बेशिस्त रिक्षाचालकांना लगाम बसेल.

-डोंबिवली पश्चिमेला रेल्वेस्थानक ते कोपर रस्ता, रेल्वेस्थानक ते पं. दिनदयाळ रस्तामार्गे रेतीबंदर, रेल्वेस्थानक ते गरिबाचा वाडा, नवापाडा, गणेशनगर आदी मार्गावर तातडीने कडोंमपाची परिवहन बससेवा सुरु करा.

-महिन्यातून किमान एकदा तरी कल्याण-डोंबिवलीत भेट द्या आणि प्रवासी सघटना, वाहतूक पोलीस, आरटओ यांची एकत्रित बैठक घ्या.

-सर्व रिक्षातळांवर शेअर पद्धतीचे भाडे कुठून किती त्याचे तसेच रिक्षातळावरील रांगेतील रिक्षात प्रवासी बसल्यानंतर प्रवाशाने मीटरनुसार जाण्यास सांगितले तर रिक्षाचालकाने गेले पाहिजे, असे फलक तातडीने लावण्याच्या सूचना वाहतूक पोलीस आणि आरटीओ अधिकाऱयांना द्या.

सोमवार, ६ मार्च, २०१७

व्होडाफनचा मराठी द्वेष


व्होडाफोनचा मराठी द्वेष डोंबिवली पश्चिमेच्या व्होडाफोन गॅलरीत मराठी आकड्यातील टोकननंबर घेत नाहीत. फक्त इंग्रजीतलेच घेतात. त्यावरुन ग्राहक आणि तेथील कर्मचारी यांच्यात वाद झाला. मराठीतील टोकन नंबर दिले आणि ते न स्वीकारल्यावरुन सोमवारी सकाळी एका ग्राहकाचा व तेथील कर्मचारयाचा वाद झाला. तो ग्राहक तेथील महिला कर्मचाऱयाला म्हणाला, हा टोकन नंबर तुमच्याच सुरक्षा रक्षकाने मला दिला आहे.मराठीत लिहिलेला (मराठी आकडे) टोकन नंबर तुम्ही घेत नसाल तर बाहेर तसा फलक लावा.

त्यावर तेथील महिला कर्मचारयाने त्या ग्राहकाला, आमच्याकडे मराठीतले नाही तर इंग्रजीतलेच टोकन नंबर स्विकारले जाते. तुम्ही पुन्हा नवीन इंग्रजीत लिहिलेले टोकन घ्या. तुम्ही म्हणता तसा बाहेर फलक लावणे आम्हाला करता येणार नाही. तुमची जी तक्रार असेल ती आमच्या मुख्य कार्यालयाकडे करा असे उत्तर दिले. हा वाद ऐकून तो सुरक्षा रक्षक त्या ग्राहकाकडे आला व मी तुम्हाला इंग्रजीत दुसरे टोकन देतो असे सांगितले. त्या ग्राहकाने विचारणा केली की आता हे नवीन टोकन नंबर घेऊन मी पुन्हा माझा नंबर येईपर्यंत वाट पाहायची का? त्यावर व्होडाफोनच्या त्या महिला कर्मचाऱयाने शांतपणे हो असे उत्तर दिले.

यातून काही प्रश्न समोर येतात.

मुळात टोकननंबरवरील मराठीतील आकडा त्या ग्राहकाने लिहिलेला नव्हता. तो व्होडाफोन गॅलरीतील सुरक्षा रक्षकानेच लिहून दिलेला होता. मग त्या सुरक्षा रक्षकाने तो आकडा इंग्रजीतच लिहायचा, म्हणजे मग काहीच प्रश्न आला नसता. किंवा व्होडाफोन गॅलरीतील कर्मचाऱयांनी त्यांच्याकडे नोंद करताना ती इंग्रजीत करायची, व्होडाफोन गॅलरीत असलेल्या संगणकावर मराठी आकडे स्वीकारले जात नसतील तर त्यांनी त्यांच्या संगणकावर तसा बदल तातडीने करुन घेण्याची आवश्यकता आहे. टोकननंबर देण्याचे जे यंत्र असेल त्यावरही मराठी आकडे नसतील तर ते टाकून घेण्याची व्यवस्था तातडीने झाली पाहिजे.

टोकन नंबरवरील आकडा इंग्रजीतूनच असला पाहिजे हा अट्टहास का? मुळात सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात, मुंबईत ते ही महाराष्ट्राच्या राजधानीत मराठीतील टोकन नंबर का स्वीकारले जात नाह? हे धोरण फक्त व्होडाफोनच्या डोंबिवलीतील गॅलरीत आहे? की व्होडाफोनच्या सगळ्या ठिकाणी असणाऱया गॅलरीत असेच चालते. केंद्र शासनाच्या त्रिभाषा सुत्रानुसार मराठी, हिंदी आणि इंग्रजी असाच कामकाजाचा/ व्यवहाराचा क्रम असला पाहिजे. व्होडाफोनने त्या सुत्रालाच हरताळ फासला आहे. मध्यंतरी एका बॅंकेच्या एटीएम केंद्रावरही गुजराथी भाषेतील पर्याय असल्याचे तसेच वीजदेयक की मोबाईलचे देयकही गुजराथी भाषेत पाठवले गेल्याचे समोर आले होते.

व्होडाफोनचा हा मराठी द्वेष संतापजनक आहे. मराठीच्या नावाने टाहो फोडणाऱया राजकीय पक्षानी, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी (आमदार व खासदार) या प्रश्नाकडे तातडीने लक्ष ध्यावे. मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मराठीतील टोकन नंबर नाकारले जाण्याच्या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी.

-शेखर जोशी

रविवार, ५ मार्च, २०१७

रविराज...


देखणे व्यक्तिमत्त्व, हसरा आणि प्रसन्न चेहरा लाभलेल्या या व्यक्तिमत्त्वाचे खरे नाव रवींद्र अनंत कृष्णा राव. चित्रपटासाठी त्यांचे ‘रविराज’ असे नामकरण झाले आणि आज ते याच नावाने ओळखले जातात. मराठी, हिंदूी, गुजराथी चित्रपट आणि मराठी व्यावसायिक रंगभूमीवर २५ वर्षांहून अधिक काळ काम केलेले पण आता रुपेरी दुनिया आणि झगमगटापासून पूर्णपणे दूर गेलेले अभिनेते रविराज आजच्या ‘पुनर्भेट’चे मानकरी आहेत.

रविराज यांचा जन्म मंगलोरचा. ते नऊ महिन्यांचे असताना त्यांचे वडील अनंत कृष्णा राव हे नोकरीच्या निमित्ताने मुंबईत आले आणि रविराज मुंबईकरच झाले. रविराज या नावावरून किंवा त्यांच्या बोलण्यावरून ते अमराठी आहेत, असे अजिबात वाटत नाही. कानडी भाषिक असलेल्या रविराज यांचे शालेय शिक्षण मुंबईतच ‘डीजीटी’ अर्थात ‘धरमसी गोविंदजी ठाकरसी’ या मराठी शाळेत तर इंटपर्यंतचे शिक्षण के. सी. महाविद्यालयात, विज्ञान शाखेतील ‘बीएस्सी’पर्यंतचे पुढील शिक्षण रुपारेल महाविद्यालयात झाले. शाळेत असताना इयत्ता नववीच्या स्नेहसंमेलनात त्यांनी एका नाटकात काम केले होते. खरे तर इंटरनंतर त्यांना पुण्याच्या ‘फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट’ (एफटीआय) मध्ये प्रवेश घ्यायचा होता. पण घरच्यांना ते पसंत नव्हते. पदवीधर हो, नोकरी कर आणि सुरक्षित आयुष्य जग, अशी एक सर्वसाधारण मध्यमवर्गीय अपेक्षा होती. त्यामुळे त्यांनी तो विचार सोडून दिला आणि पुढे शिकायचे ठरविले. शिक्षण पूर्ण झाले आणि लगेचच त्यांना ‘प्रॉडक्शन केमिस्ट’ म्हणून जे. एन. मॉरिसन (आताची निव्हिया कंपनी) कंपनीत नोकरीही मिळाली. १९६६ ते १९७० या कालावधीत ते येथे नोकरी करत होते. पुढे ती कंपनी मुंबईतून बंगलोरला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. कोणतीही अगदी एक रुपयाही पगारवाढ मिळणार नव्हती. त्यामुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. आता पूर्णपणे मोकळे झाल्याने चित्रपटात जायच्या त्यांच्या इच्छेने पुन्हा उचल खाल् ली आणि पुढचे काही महिने त्यांचा संघर्ष सुरू झाला.

चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावरच्या प्रवेशाविषयी ते म्हणाले, ती एक गंमत आणि योगायोगच आहे. आम्ही राहात होतो त्या ठिकाणी गटार तुंबले होते. सर्वत्र घाण पाणी पसरलेले असायचे. दरुगधी यायची. मुंबई महापालिकेत तक्रार अर्ज देऊन, तिथे जाऊन, वारंवार खेपा घालूनही ते गटार काही दुरुस्त होत नव्हते. एके दिवशी रागारागाने मी आमचे स्थानिक नगरसेवक प्रभाकर निखलणकर यांच्या घरी गेलो आणि रागाच्या भरात त्यांना हे सगळे सांगितले. त्यांनी सर्व शांतपणे ऐकून घेतले आणि हे काम होईल असे सांगितले. खरी गंमत तर पुढेच आहे. निखलणकर यांनी मला ‘सध्या काय करताय?,’ असा प्रश्न केला. त्यावर मी नोकरीचा राजीनामा दिला असून सिनेमात काम करण्याची इच्छा असल्याचे त्यांना सांगितले. त्यावर त्यांनी मला गाडीत बसायला सांगितले आणि संगीतकार व ‘शुरा मी वंदिले’ या चित्रपटाचे निर्माते श्रीकांत ठाकरे यांच्या घरी घेऊन गेले. निखलणकरही त्या चित्रपटाचे एक निर्माते होते. आपण चित्रपट करतोय आणि त्या चित्रपटात याला हिरो म्हणून घेतोय असे त्यांनी ठाकरे यांना सांगितले. सरला येवलेकर त्यात माझी नायिका होती. खरे तर चित्रपटात माझी भूमिका खलनायकाची. पण तो चित्रपटातील शेवटचा धक्का होता. चित्रपटात मला ‘अरे दु:खी जीवा बेकरार होऊ नको’ हे गाणे होते. मोहंमद रफी यांनी चित्रपटासाठी पाश्र्वगायन केलेले ते पहिले मराठी गाणे.

खरे तर ‘आहट’ हा हिंदीतील माझा पहिला चित्रपट. पण काही र्वषाच्या खंडांनतर रेंगाळलेला हा चित्रपट प्रदर्शित झाला. दरम्यान, मी काम केलेला गुलजार यांचा ‘अचानक’ हा हिंदी आणि राजा ठाकूर दिग्दर्शित ‘जावई विकत घेणे आहे’ हे चित्रपट ‘आहट’च्या आधी प्रदर्शित झाले. ‘आहट’मध्ये विनोद मेहरा, जया भादुरी,अमरीश पुरी, डॉ. श्रीराम लागू, रमेश देव, सतीश दुभाषी (जया भादुरीच्या वडिलांची भूमिका), धर्मेंद्र पाहुणा कलाकार अशी मंडळी होती. रमेश देव, डॉ. लागू आणि अमरिश पुरी हे तिघेही त्यात खलनायक होते. चित्रपटाचे निर्माते किशोर रेगे यांच्यामुळे ‘आहट’ मला मिळाला. तो चित्रपट वेळच्या वेळी तयार होऊन प्रदर्शित झाला असता तर कदाचित हिंदीतही मी पुढे आलो असतो. पण ते झाले नाही, अशी खंतही रविराज यांनी व्यक्त केली. १९७२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जावई विकत घेणे आहे’चे दिग्दर्शन राजा ठाकूर यांचे होते. एक दिवस त्यांनी रविराज यांना भेटायला बोलाविले आणि ‘जावई विकत घेणे आहे’ साठी त्यांची नायक म्हणून निवड झाली. गणेश सोळंकी, शरद तळवलकर, मधुकर तोरमडल, राजा बापाट, रुही आदी कलाकार त्यात होते. हा चित्रपट गाजला आणि त्यातील रविराज आणि रुही यांच्यावर चित्रित झालेले ‘या मिलनी रात्र ही रंगली’ हे गाणे लोकप्रिय झाले. या चित्रपटाने रविराज यांना नाव आणि प्रसिद्धी मिळाली. नंतर रविराज यांनी ‘ओवाळिते भाऊराया’, ‘तूच माझी राणी’, ‘रूप पाहता लोचनी’, ‘देवापुढे माणूस’, ‘अजातशत्रू’, ‘दोस्त असावा तर असा’, ‘जावयाची जात’, ‘नणंद भावजय’, ‘भन्नाट भानू’ आदी मराठी चित्रपट केले. ‘ओवाळिते भाऊराया’मधील ‘बाजार फुलांचा भरला, मज तुळस दिसेना, मज बहीण दिसेना’, ‘दोस्त असावा तर असा’ चित्रपटातील ‘जे जे सुंदर ते माझे घर मी तर आहे मस्त कलंदर’, ‘जावयाची जात’मधील ‘प्रिया सखी चंद्रमुखी जवळ ये जरा, माझ्या प्रितपाखरा’ ही त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी गाजली. ‘अन्यायाचा प्रतिकार’ हा त्यांनी काम केलेला शेवटचा मराठी चित्रपट. रविराज यांनी ‘अचानक’, तीन चेहरे’, ‘एक चिठ्ठी प्यार भरी’, ‘चांद का टुकडा’ आणि गाजलेल्या ‘खट्टा मिठा’ या हिंदी चित्रपटातही भूमिका केल्या. यातील ‘थोडा है थोडे की जरुरत है’ आणि ‘रोल गोल माकुनिसा’ ही गाणी गाजली. ‘मेघनी रात’, ‘गाजर नी पिपुडी’, जे पीड परायी जानी रे’ आदी गुजराती चित्रपटही त्यांच्या नावावर जमा आहेत.

मधुसुदन कोल्हटकर यांचे ‘शबरी’ हे त्यांनी काम केलेले पहिले मराठी व्यावसायिक नाटक. त्यानंतर ‘डार्लिग डार्लिग’ यासह मधुसुदन कालेलकर यांची ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘दिल्या घरी तू सुखी राहा’ ही नाटके तसेच ‘हिट अ‍ॅण्ड हॉट’च्या जमान्यात ‘बदफैली’, ‘डाग’, ‘सेक्सी’ अशी नाटकेही केली. या सर्व नाटकांच्या त्यांनी केलेल्या एकूण प्रयोगांची संख्या तीन हजार इतकी आहे. रामानंद सागर यांच्या ‘श्रीकृष्ण’ मालिकेत त्यांनी ‘गर्ग’ मुनी साकारले होते. ‘अदालत’, ‘एअर होस्टेस’, ‘शिव पुराण’आदी हिंदी मालिकांमधूनही त्यांच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली. देखणे व्यक्तिमत्त्व, प्रसन्न आणि हसरा चेहरा असलेला हा अभिनेता सध्या रुपेरी दुनिया आणि मायावी झगमगटापासून पूर्णपणे दूर गेला आहे. इतकी वर्षे अभिनयाच्या क्षेत्रात काम करूनही वयाच्या ७३ व्या वर्षी हा कलाकार भाडय़ाच्या घरात राहतो आहे. कलाकारांच्या राखीव कोटय़ातून घर मिळविण्यासाठी त्यांनी १९८१ पासून प्रयत्न केले. संबंधितांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेतल्या, निवेदने दिली पण आश्वासनांखेरीज हातात काहीही मिळाले नसल्याची खंत त्यांना आहे. या क्षेत्रातील काही कडू अनुभवांमुळे त्यांनी या क्षेत्राकडेच पाठ फिरविली. कोणतेही सोहळे, पुरस्कार वितरण समारंभ याचेही त्यांना बोलावणे नसते. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे ते सदस्य आहेत. पण आता ते कुठेच दिसत नाहीत.

इतकी वर्षे या क्षेत्रात काम केल्यानंतर पुन्हा एकदा अभिनय करायची इच्छा त्यांना होते. पण जे पटणार नाही ते न करणे, स्वभावातील स्पष्टवक्ते पणा आणि ‘काम द्या’ म्हणून कोणाच्या मागे न लागणे यामुळे तशी संधी त्यांना मिळालेली नाही. पण आजवरच्या अनुभवाचा आणि वयाचा मान राखून चांगली भूमिका मिळाली तर आजही काम करायची त्यांची इच्छा व तयारी आहे. रुपेरी दुनियेपासून पूर्णपणे दूर गेलो असलो तरी आजही कुठेही लोक भेटले की ते मला ओळखतात. जुन्या चित्रपटांची आठवण काढतात. माझ्यासाठी तीच समाधानाची आणि आनंदाची बाब असल्याचे रविराज सांगतात. पत्नी उषा आणि प्रितेश हा मुलगा व पूजश्री ही मुलगी असा त्यांचा परिवार. सकाळी जमेल आणि झेपेल तसा दररोजचा व्यायाम, आध्यात्मिक पुस्तकांचे वाचन आणि निर्मलादेवी यांनी सांगितलेला ‘सहजसमाधी योग’ (ध्यानधारणा) करणे, समवयस्क मित्रांबरोबर गप्पा व भेटीगाठी हा त्यांचा सध्याचा विरंगुळा आहे.

वयोपरत्वे माणसांचे जे काही हाल होतात ते त्यांना पाहावत नाहीत. ती बाब त्यांना सतत अस्वस्थ करते. त्यामुळेच पुन्हा जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात त्यांना अडकायचे नाहीये. श्रीमद् भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे जन्ममरणाच्या फेऱ्यातून कायमची सुटका होऊन मोक्ष मिळावा, अशी माझी परमेश्वराकडे इच्छा असल्याचे सांगत त्यांनी गप्पांचा समारोप केला.

(हा लेख लोकसत्ता-रविवार वृत्तान्त (५ मार्च २०१७) मध्ये प्रसिद्ध झाला आहे)

शेखर जोशी

गुरुवार, २ मार्च, २०१७

यंदाच्या वर्षी गुढीपाडवा अमावास्येला


यंदाच्या वर्षी गुढीपाडवा अमावास्येला

-८ वाजून २७ मिनिटांनंतर गुढी उभारावी

यंदाच्या वर्षी फाल्गुन अमावास्येच्या दिवशी गुढीपाडवा येत आहे. यंदा चैत्र शुक्ल प्रतिपदा क्षयतिथी असल्याने मंगळवार, २८ मार्च २०१७ या दिवशी सकाळी ८ वाजून २७ मिनिटांनी अमावास्या संपल्यानंतरच गुढी उभारावी, असे आवाहन ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी केले आहे.

यावर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथी कोणत्याही दिवशी सूर्योदयाला नाही. अशा तिथीला ' क्षय तिथी ' असे म्हणतात. यापूर्वी २८ मार्च १९९८ , १९ मार्च २००७ आणि ६ एप्रिल २००८ रोजी अशी स्थिती आली होती. तेव्हाही फाल्गुन अमावास्या संपल्यानंतरच गुढी उभारून गुढी पाडवा साजरा करण्यात आला होता. या वर्षानंतर पुन्हा १९ मार्च २०२६ रोजी चैत्र शुक्ल प्रतिपदा क्षय तिथी येणार असल्याची माहिती सोमण यांनी दिली.

गुढी पाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईसह राज्यात सर्वत्र नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येतात. त्याची सुरुवात २८ मार्च रोजी सकाळी ८ वाजून २७ मिनिटांपूर्वी करण्यास काहीही हरकत नाही. मात्र गुढी ही ८ वाजून २७ मिनिटांनंतरच उभारावी आणि गुढीची पूजा करावी, असेही सोमण म्हणाले