शुक्रवार, २८ मार्च, २०२५

डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग

डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. जम्मू काश्मीर भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरळीत व सुरक्षित शिक्षण घेता यावे आणि भारतातील इतर भागांशी या विद्यार्थ्यांची सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने डोंबिवलीतील हम चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था गेली आठ वर्षे जम्मू काश्मीरमध्ये काम करत आहे.'जोडो काश्मीर'हे संस्थेचे ध्येय आहे.
डोंबिवलीतील यंदाच्या नववर्ष शोभायात्रेत सेवाभारती संचालित जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थी वसतिगृहातील ३१ विद्यार्थी आणि 'सेवाभारती'चे काही पदाधिकारी चित्ररथासह सहभागी होणार आहेत.‌ डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थान आयोजित या नववर्ष स्वागत यात्रेत हम चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जम्मू काश्मीरमधील विद्यार्थी करोना काळ वगळता गेली काही वर्षे सातत्याने सहभागी होत आहेत.‌
(संग्रहित छायाचित्र) जम्मू आणि कटरा येथील या विद्यार्थ्यांचा डोंबिवलीत पाच दिवसांचा मुक्काम असून हे विद्यार्थी सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रमांतर्गत डोंबिवलीत वेगवेगळ्या कुटुंबात एक दिवस राहणार आहेत. तसेच या दौऱ्यात सर्व विद्यार्थी डोंबिवलीतील टिळकनगर विद्या मंदिर, पै फ्रेंड्स लायब्ररी, हेरंब म्युझिक अकादमीला तसेच मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्र तसेच अन्य काही महत्त्वाच्या ठिकाणीही भेट देणार आहेत.‌ दरम्यान हम चॅरिटेबल ट्रस्टच्या जम्मू काश्मीर येथील शिक्षण क्षेत्रातील कामाची माहिती डोंबिवलीकर नागरिकांना व्हावी यासाठी ३१ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात हम संस्थेच्या कार्याची माहिती तसेच जम्मू व कटरा येथून डोंबिवलीत आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद, या विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.‌ हा कार्यक्रम सर्वेश सभागृह, दुसरा मजला, डोंबिवली पूर्व येथे होणार असून डोंबिवलीकर नागरिक, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन हम चॅरिटेबल ट्रस्टने केले आहे. शेखर जोशी २८ मार्च २०२५

भारतीय किसान संघाचे 'भाकरी ठेचा' खाऊन निषेध आंदोलन!

भारतीय किसान संघाचे 'भाकरी ठेचा' खाऊन निषेध आंदोलन! अहिल्यानगर, दि. २८ मार्च शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भारतीय किसान संघाने राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारने शेतीमालाची हमीभावाने खरेदी न केल्याने किसान संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी अहिल्या नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात भाकरी व ठेचा खाऊन निषेधात्मक आंदोलन केले. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना निवेदन सादर करण्यात आले.‌ शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याने गोडधोड खाण्याऐवजी त्याला भाकरी -ठेचा खावा लागत आहे. याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी भारतीय किसान संघाचे अहिल्यानगर शाखेचे अध्यक्ष दिलीप गोंदकर, जिल्हा मंत्री निलेश चिपाडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने आपल्या सरकारला पाठिंबा दिला. निवडणुकीच्या वेळी कर्जमुक्ती तसेच सोयाबीन, तूर, हरभरा, कापूस यांची हमीभावाने खरेदी केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या गेल्या नाहीत, असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.‌ मध्यप्रदेशात सोयाबीनसाठी बोनससह ४५० रुपयांनी तर तेलंगणात ९० टक्के कापूस खरेदी करण्यात आला. कर्नाटकात तुरीसाठी ५० रुपये बोनस अधिक एमएसपी मिळून ८ हजार रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी झाली आहे. गुढीपाडवा हा नव्या कृषीवर्षाचा प्रारंभ आहे. या दिवशी शेतकऱ्यांची पुरणपोळी खाण्याची परंपरा असते. मात्र, यंदा शेतकरी आर्थिक संकटात अडकले असल्याने त्यांना गोडधोड नव्हे तर भाकरी ठेचा खावा लागणार आहे, याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

गुरुवार, २७ मार्च, २०२५

नारायण सुर्वे जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यात कामगार साहित्याचा जागर होणार

नारायण सुर्वे जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यात कामगार साहित्याचा जागर होणार - सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा मुंबई, दि. २७ मार्च पुढील वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून कवीवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दी वर्ष सुरू होणार आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे नारायण सुर्वे यांच्या साहित्य संपदेवर आधारित कार्यक्रमाची निर्मिती तसेच राज्यात विविध ठिकाणी कामगार साहित्याचा जागर केला जाईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी गुरुवारी येथे केली.
प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या 'मराठी आठव दिवस' चा तृतीय वर्धापन दिन आणि सुर्वे साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात ॲड. शेलार बोलत होते. कामगार साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या एका साहित्यिकाला माझ्याकडून ५० हजार रुपयांचा पुरस्कार 'मराठी आठव दिवस' च्या नारायण सुर्वे वार्षिक साहित्य संमेलनात पुढील वर्षापासून दिला जाईल, अशी घोषणाहीम्हणाले. ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिवसभर झालेल्या सुर्वे साहित्य संमेलनात सर्वश्री भाऊ कोरगावकर, डॉ. महेश केळुसकर, अशोक नायगावकर या 'मराठी आठव दिवस' च्या सुरुवातीपासूनच्या पाठीराख्यांना कृतज्ञता सन्मानाने सन्मानित करण्यात आले. तसेच प्रदीप आवटे, योगिता राजकर, मधुकर मातोंडकर, सुनील उबाळे, सुजाता राऊत, सफरअली इसफ या नवोदित साहित्यिकांना 'जाहीरनामा पुरस्कार' देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. दर महिन्याच्या २७ तारखेला ' मराठी आठव दिवस' कार्यक्रम करण्यासाठी राज्यभरातून अनेक मराठी दानशूर व्यक्ती उत्स्फूर्तपणे पुढे येत असल्याबद्दल संस्थापक रजनीश राणे यांनी समाधान व्यक्त केले.

फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण!

 

गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त
यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक

फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण!

- शैलेंद्र रिसबुड, प्रल्हाद परशुराम म्हात्रे यांचा संयुक्त उपक्रम 

शेखर जोशी 

डोंबिवली, दि. २७ मार्च 

गेल्या काही वर्षांपासून सर्वपक्षीय राजकारण्यांनी सण, उत्सव, वाढदिवसाच्या निमित्ताने 'चेहरे फलक' लावून शहर विद्रुप करण्यात मोठा हातभार लावला आहे. त्यामुळे फलक/बॅनर दिसले की सर्वसामान्य व सुजाण नागरिकांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. या पाश्र्वभूमीवर लोकमान्य टिळकप्रेमी व त्यांच्या चरित्राचे अभ्यासक शैलेंद्र रिसबूड आणि सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते प्रल्हाद परशुराम म्हात्रे यांनी गेल्या सात वर्षांपासून राबविलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. 

भारतीय असंतोषाचे जनक आणि स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे कार्य/विचार मोठ्या फलकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. या निमित्ताने लोकमान्य टिळकांचे स्मरणही केले जात आहे. विशेष कौतुकास्पद बाब म्हणजे या फलकावर फक्त आणि फक्त लोकमान्य टिळक यांचेच छायाचित्र प्रदर्शित केले जाते. रिसबूड आणि म्हात्रे यांची छायाचित्रे या फलकावर नसतात. तसेच रस्ता किंवा चौकांचे नामफलक न झाकता हा फलक उभारण्यात येत आहे. आणि या दोघांनीही ही गोष्ट आजवर कटाक्षाने जपली आहे. संयोजक शैलेंद्र रिसबुड व सौजन्य प्रल्हाद परशुराम म्हात्रे अशी एक ओळ या फलकाच्या खाली लिहिण्यात येते. 

लोकमान्य टिळक यांच्या शताब्दी पुण्यस्मरणाच्या निमित्ताने लावण्यात आलेला फलक 

मध्य रेल्वेवरील कोपर रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागातील मोकळ्या जागेत हा फलक लावण्यात येतो. लोकमान्य टिळक यांची जयंती, पुण्यतिथी, गीता रहस्य ग्रंथ जयंती ( लोकमान्य टिळक यांनी लिहिलेला हा एकमेव ग्रंथ आहे की या ग्रंथाचा जयंती उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी येत्या ३० मार्च रोजी गीतारहस्य जयंती असून त्या निमित्ताने कोपर रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात हा फलक उभारण्यात आला आहे.

लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या 'केसरी'चा वर्धापनदिन


लोकमान्य टिळक यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवावेत आणि त्यांचे अशा प्रकारे स्मरण करावे, ही मूळ संकल्पना रिसबूड यांची. ही कल्पना म्हात्रे यांच्या समोर मांडल्यानंतर त्यांना आवडली आणि त्यांनी रिसबूड यांना पाठिंबा दिला. जागा आणि फलक यासाठी येणा-या खर्चाचा सर्व आर्थिक जबाबदारी म्हात्रे यांनी सांभाळली आहे. 

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने लावण्यात आलेला फलक 

कल्याण, कर्जत आणि कसा-याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कल्याणच्या दिशेने येताना अप आणि डाऊन मार्गावर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांचे विचार पोहोचविण्यात येत आहेत. 

शेखर जोशी 

२७ मार्च २०२५


नेपाळ येथील जागतिक युवा महोत्सवात डोंबिवलीचे मिहिर देसाई विशेष निमंत्रित

 

नेपाळ येथील जागतिक युवा महोत्सवात

डोंबिवलीचे मिहिर देसाई विशेष निमंत्रित 

- तीन वर्षांपासून भरडधान्य प्रक्रिया उद्योगात कार्यरत

- ७५ हून अधिक देशांतील युवा नवउद्योजकांचा सहभाग

नेपाळ येथे २७ ते ३१ मार्च या कालावधीत होणाऱ्या

जागतिक युवा महोत्सवासाठी सहभागी नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष अतिथी म्हणून डोंबिवलीतील नवउद्योजक (नवउद्यमी-स्टार्टअप) मिहिर मुकुंद देसाई यांना निमंत्रित करण्यात आले आहे. देसाई गेल्या तीन वर्षांपासून भरडधान्य प्रक्रिया उद्योग व्यवसायात काम करत आहेत. 

नेपाळमधील कावरेपल्लानचोक येथे होणाऱ्या जागतिक युवा महोत्सवासाठी ७५ हून अधिक देशांतील प्रतिभाशाली युवा नवउद्योजक, नवउद्यमी (स्टार्टअप), युवा संशोधक, विद्यार्थी, कलाकार, युवा मार्गदर्शक सहभागी होणार आहेत.

या जागतिक युवा महोत्सवातील ‘कृषी आणि अन्न सुरक्षा’ विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी जागतिक युवा परिषदेचे अध्यक्ष आणि जिल्हा समन्वयक समितीचे प्रमुख दीपक कुमार गौतम यांनी मिहिर देसाई यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केले आहे

देसाई आठ वर्षापूर्वी रशियातील सोची येथे पार पडलेल्या जागतिक युवा आणि विद्यार्थी महोत्सवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भारताचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले होते.

मिहिर देसाई भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले देसाई भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद उर्फ भाई देसाई यांचे चिरंजीव आहेत.

बुधवार, २६ मार्च, २०२५

'आपले सरकार सेवा केंद्रां'ची संख्या वाढवणार

आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार

- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा*

मुंबई, दि. २६ मार्च 

राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ रितीने उपलब्ध करून देण्यासाठी 'आपले सरकार सेवा केंद्रे' यांचे जाळे विस्तारीत करण्यात येणार असून सेवा केंद्राची संख्या वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी बुधवारी विधानसभेत दिली.

माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सुधारित निर्णयानुसार, लोकसंख्या आणि प्रशासनाच्या गरजेनुसार सेवा केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. सुधारित निकषानुसार ग्रामपंचायत स्तरावर ५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी १ ऐवजी २ सेवा केंद्रे तर पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी २ ऐवजी ४ सेवा केंद्रे देण्यात देणार आहेत.  बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात १२ हजार ५०० लोकसंख्येसाठी २ केंद्रे तर इतर महापालिका व नगरपरिषद क्षेत्रांमध्ये दहा हजार लोकसंख्येसाठी एक ऐवजी दोन सेवा केंद्रे देण्यात येणार असल्याचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी जाहीर केले. 

सध्या आपले सरकार सेवा केंद्रांवरील सेवा शुल्क २० रुपये असून २००८ पासून या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती. वाढती महागाई आणि सेवा केंद्र चालकांच्या मागणीच्या अनुषंगाने सेवा शुल्क आता ५० रुपये करण्यात येणार आहेत.‌ नागरिकांना अधिक सुलभ सेवा मिळण्यासाठी घरपोच वितरण सेवाही सुरू करण्यात येणार आहे. घरपोच भेटीसाठी सेवा शुल्क १००रुपये प्रति नोंदणी (कर वगळून), महाआयटी सेवा दर २० टक्के, सेवा केंद्र चालक सेवा दर ८० टक्के, याशिवाय प्रति अर्ज अतिरिक्त शुल्क ५० रुपये असणार आहे.

श्री विठ्ठल रुख्माई संस्थान रेवसाची जमीन पुन्हा देवस्थानच्या नावावर होणार

श्री विठ्ठल रुख्माई संस्थान रेवसाची जमीन 

पुन्हा देवस्थानच्या नावावर होणार

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पुढाकाराने मिळाला ऐतिहासिक विजय 

श्री विठ्ठल रुख्माई संस्थान, रेवसा (ता. जि. अमरावती) यांच्या मालकीची तब्बल ३० कोटी रुपयांची शेतजमीन अखेर देवस्थानच्या नावावर पुन्हा नोंदवली जाणार आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे झालेल्या पत्रकार परिषदेत मंदिर महासंघाचे राज्य पदाधिकारी अनुप प्रमोद जयस्वाल यांनी ही माहिती दिली. 

महासंघाचे जिल्हा संयोजक विनीत पाखोडे, हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक निलेश टवलारे, अधिवक्ता अभिजीत बजाज संस्थानचे विश्वस्त राजेंद्र वाकोडे, हरीभाऊ वाकोडे, हरिदास मानवटकर, समितीचे सचिन वैद्य उपस्थित होते. 

मौजा रेवसा येथील गट क्र. १६५, क्षेत्रफळ ३ हेक्टर ६९ आर ही शेतजमीन श्री विठ्ठल रुख्माई संस्थानच्या मालकीची आहे. मात्र, ही जमीन हडप करण्याच्या उद्देशाने प्रदीप त्र्यंबकराव वाकोडे व प्रवीण त्र्यंबकराव वाकोडे यांनी तत्कालीन तहसीलदार संतोष काकडे यांच्यासमोर जमिनीच्या ७/१३ उताऱ्यावरील संस्थानचे नाव कमी करून स्वतःच्या नावावर नोंद करण्यासाठी अर्ज सादर केला. 

९ मे २०२२ रोजी तहसीलदार काकडे यांनी महसूल कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करून ७/१२ उताऱ्यातून संस्थानचे नाव कमी केले आणि वाकोडे बंधूंच्या नावावर बेकायदेशीर नोंद केली. या निर्णयाविरोधात राजेंद्र पद्माकर वाकोडे यांनी उपविभागीय अधिकारी अमरावती यांच्यासमोर अपील दाखल केले. अपील प्रकरणात वाकोडे बंधू आणि महसूल कर्मचाऱ्यांचे संगनमत उघड झाले.‌

तहसिलदार काकडे यांनी पारीत केलेला आदेश हा आर्थिक लाभ घेण्याच्या दृष्टीनेच करुन घेतल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याचा निष्कर्ष भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी रिचर्ड यंथन यांनी नोंदविला आणि १ ऑगस्ट २०२३ रोजी तहसीलदार काकडे यांचा आदेश रद्द केला. उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशावरील अपिल प्रकरणात अतिरिक्त जिल्हाधिकारी अमरावती यांनी प्रकरणाचा अधिक सखोल तपास करून पुन्हा सुनावणीचे आदेश दिले असल्याचे या वेळी सांगण्यात आले.‌ 

मंदिर महासंघाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देवस्थानच्या हितासाठी तहसीलदारांना निवेदन दिले. या पाठपुराव्याला यश मिळाले आणि तहसीलदार विजय लोखंडे यांनी २० मार्च २०१५ संस्थानच्या बाजूने अंतिम निर्णय दिला.