गुरुवार, २७ मार्च, २०२५

नारायण सुर्वे जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यात कामगार साहित्याचा जागर होणार

नारायण सुर्वे जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यात कामगार साहित्याचा जागर होणार - सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा मुंबई, दि. २७ मार्च पुढील वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून कवीवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दी वर्ष सुरू होणार आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे नारायण सुर्वे यांच्या साहित्य संपदेवर आधारित कार्यक्रमाची निर्मिती तसेच राज्यात विविध ठिकाणी कामगार साहित्याचा जागर केला जाईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी गुरुवारी येथे केली.
प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या 'मराठी आठव दिवस' चा तृतीय वर्धापन दिन आणि सुर्वे साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात ॲड. शेलार बोलत होते. कामगार साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या एका साहित्यिकाला माझ्याकडून ५० हजार रुपयांचा पुरस्कार 'मराठी आठव दिवस' च्या नारायण सुर्वे वार्षिक साहित्य संमेलनात पुढील वर्षापासून दिला जाईल, अशी घोषणाहीम्हणाले. ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिवसभर झालेल्या सुर्वे साहित्य संमेलनात सर्वश्री भाऊ कोरगावकर, डॉ. महेश केळुसकर, अशोक नायगावकर या 'मराठी आठव दिवस' च्या सुरुवातीपासूनच्या पाठीराख्यांना कृतज्ञता सन्मानाने सन्मानित करण्यात आले. तसेच प्रदीप आवटे, योगिता राजकर, मधुकर मातोंडकर, सुनील उबाळे, सुजाता राऊत, सफरअली इसफ या नवोदित साहित्यिकांना 'जाहीरनामा पुरस्कार' देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. दर महिन्याच्या २७ तारखेला ' मराठी आठव दिवस' कार्यक्रम करण्यासाठी राज्यभरातून अनेक मराठी दानशूर व्यक्ती उत्स्फूर्तपणे पुढे येत असल्याबद्दल संस्थापक रजनीश राणे यांनी समाधान व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: