बुधवार, ११ जून, २०२५

'उदकशांंत' दीर्घांकाचे शनिवारी कल्याणला सादरीकरण

शरद तळवलकर स्मृती दीर्घांक स्पर्धेतील विजेत्या 'उदकशांंत'चे शनिवारी कल्याणला सादरीकरण - मुलगा गमावलेल्या आई वडिलांच्या भावनिक संघर्षाची कहाणी डोंबिवली, दि. ११ जून शरद तळवलकर स्मृती करंडक दीर्घांक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या 'उदकशांत' या दीर्घांकाचा प्रयोग येत्या १४ जून रोजी रात्री साडेआठ वाजता आचार्य अत्रे नाट्यगृह, कल्याण येथे आयोजित करण्यात आला आहे. हा प्रयोग सशुल्क असून प्रयोगाचा कालावधी सलग एक तास २० मिनिटे इतका आहे. आपला मतीमंद मुलगा आता या जगात नाही हे सत्य मुलाच्या आईने स्विकारले आहे पण मुलाचे वडील ते स्विकारायला तयार नाहीत. मुलाच्या मृत्यूची सावली या दोघांच्याही आयुष्यावर पडली आहे.‌ ही सावली इतकी गडद आहे की ते दोघे सुखाने जगूही शकत नाहीत. या आई-वडिलांच्या भावनिक संघर्षाची कहाणी 'उदकशांत' या दीर्घांकात सादर करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे यंदा पहिल्यांदाच शरद तळवलकर स्मृती करंडक दीर्घांक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत डॉ. समीर मोने लिखित आणि अभिनेते मिलिंद अधिकारी दिग्दर्शित 'उदकशांत' या दीर्घांकाला प्रथम क्रमांक मिळाला. डोंबिवलीच्या तिहाई कलासाधक संस्थेने हा दीर्घांक सादर केला होता. महाराष्ट्रातून एकूण २७ संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. 'उदकशांत' दीर्घांकात प्रतिक खिसमतराव, श्रद्धा भालेकर, धनंजय धुमाळ, मिनाक्षी जोशी, देवेश काळे हे कलाकार आहेत.‌ दिग्दर्शशनासह नेपथ्याची जबाबदारी मिलिंद अधिकारी यांनी सांभाळली असून पार्श्वसंगीत आणि प्रकाशयोजना अनुक्रमे आशुतोष वाघमारे व राजेश शिंदे यांची आहे.
'उदकशांत' मधील जोडप्याचा मतिमंद मुलगा गेल्याला आता एक वर्ष झाले आहे. परंतु ते दोघेही त्याच्या आठवणी विसरू शकत नाहीत. वेगवेगळ्या प्रकारे ते दोघेही आपल्या मतिमंद मुलाचे मरण स्विकारायला तयार नाहीत. हा दीर्घांक एका रात्रीतला असला तरी त्याची पार्श्वभूमी त्या जोडप्याच्या पूर्ण आयुष्याचे भोगणे असल्याचे 'उदकशांत' चे दिग्दर्शक व‌ नेपथ्यकार मिलिंद अधिकारी यांनी सांगितले. 'एका कोंडीतून मुक्त होणाऱ्या जोडप्याची गोष्ट', असा प्रवास आपल्याला जाणवला आणि मी त्या पद्धतीने नाटक बसवत गेलो. सर्व कलाकारांची उत्तम साथ मिळाली आणि हा प्रयोग चांगल्या प्रकारे सादर करू शकलो, असेही अधिकारी म्हणाले.‌ शरद तळवलकर स्मृती दीर्घांक स्पर्धेत 'उदकशांत'ने पुढील पारितोषिकेही पटकावली आहेत.‌ दिग्दर्शक (मिलिंदअधिकारी)- प्रथम संगीत (आशुतोष वाघमारे) - प्रथम अभिनेत्री ( श्रद्धा भालेकर) - प्रथम अभिनेत्री (मीनाक्षी जोशी)- तृतीय अभिनेता ( प्रतिक खिसमतराव) - तृतीय

'सहा सरसंघचालक' पुस्तकाचे शुक्रवारी प्रकाशन

'सहा सरसंघचालक'पुस्तकाचे शुक्रवारी प्रकाशन छत्रपती संभाजीनगर, दि. ११ जून प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर लिखित'सहा सरसंघचालक'तसेच प्रा. डॉ. रवींद्र बेम्बरे (देगलूर) यांनी लिहिलेल्या‘नैसर्गिक आपत्तीत मराठी संतांचे मनोविज्ञान’या दोन पुस्तकांचे प्रकाशन येत्या १३ जून रोजी येथे होणार आहे.साहित्यभारती,देवगिरी प्रांत,शाखा छत्रपती संभाजीनगर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.‌ माजी लोकायुक्त-गोवा व माजी न्यायमूर्ती अंंबादासराव जोशी, अखिल भारतीय साहित्य परिषदेचे सहसंघटनमंत्री मनोजकुमार,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र सेवा कार्य प्रमुख प्रा. डाॕ. उपेंद्र कुलकर्णी,साहित्य भारतीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. बळिराम गायकवाड हे प्रमुख पाहुणे तर देवगिरी प्रांताचे संघचालक अनिल भालेराव हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.'सहा सरसंघचालक' या पुस्तकावर प्रा. डॉ. कैलास अतकरे भाष्य करणार आहेत.‌ हा कार्यक्रम संध्याकाळी साडेसहा वाजता दामूअण्णा दाते सभागृह, डॉ. हेडगेवार रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.‌

मंगळवार, १० जून, २०२५

विश्व संवाद केंद्राचे 'देवर्षी नारद' पुरस्कार जाहीर

विश्व संवाद केंद्राचे 'देवर्षी नारद' पुरस्कार जाहीर - समीर कर्वे,संदीप रामदासी,अश्विनी मयेकर आणि अन्य मानकरी मुंबई, दि. १० जून विश्व संवाद केंद्र- मुंबईतर्फे देण्यात येणार-या ’देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.प्रसारमाध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या पत्रकारांचा दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने समीर कर्वे (मुद्रीत माध्यम),संदीप रामदासी(इलेक्ट्रॉनिक माध्यम),शैलेश गायकवाड (समाज माध्यम) यांना तसेच पत्रकारितेतील विशेष कामगिरीबद्दल साप्ताहिक विवेकच्या संपादक अश्विनी(कविता) मयेकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे यंदा २५ वे वर्ष आहे २०३ वर्षे जुन्या असलेल्या 'मुंबई समाचार'चा पत्रकारितेतील विशेष योगदानाबद्दल तसेच गेली ७७ वर्षे कार्यरत असलेल्या 'हिंदुस्थान समाचार' या बहुभाषिक वृत्त संस्थेलाही या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यूट्यूबसाठी जय गगन, फेसबुकसाठी मृगा वर्तक, इन्स्टाग्रामसाठी सुनीता पावसकर,अमोल जामदारे यांची निवड करण्यात आली आहे.पत्रकारितेतील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून सूरज चौगुले याला गौरविण्यात आले आहे. पुरस्कार वितरण सोहळा येत्या १४ जून रोजी एनएसई बिल्डिंग, वांद्रा कुर्ला संकूल, वांद्रे (पू.) येथे होणार आहे. द इंडियन एक्सप्रेस समुहाचे कार्यकारी संचालक अनंत गोयंका हे प्रमुख पाहुणे तर टाइम्स नेटवर्कच्या समुह संपादक व टाइम्स नाऊ नवभारतच्या मुख्य संपादक नाविका कुमार विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम विभागाचे कार्यकारिणी सदस्य राजाभाऊ मुळे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृत्रिम प्रवाळमध्ये पाण्याखालील संग्रहालय!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृत्रिम प्रवाळमध्ये पाण्याखालील संग्रहालय! - निवती रॉकजवळ नियोजित प्रकल्प मुंबई, दि. १० जून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉकजवळ कृत्रिम प्रवाळमध्ये पाण्याखालील संग्रहालय उभारण्यात येणार आहे. नौदलाच्या 'आयएनएस गुलदार' (आता सेवेत नाही) या युद्धनौकेचा यासाठी उपयोग केला जाणार असून देशातीलहा पहिलाच उपक्रम असणार आहे. सागरी संवर्धन आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून केंद्र शासनाने भारतीय नौदलाचे 'आयएनएस गुलदार' हे जहाज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सुपूर्द केले आहे.
मुंबईतील मंगळवारी दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते नियोजित प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.‌उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल हे उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक दिवे, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर सहभागी झाले होते. समुद्रातील या जहाजाभोवती प्रवाळ निर्मितीकरून त्याद्वारे स्कुबा डायव्हिंग व भविष्यात पाणबुडीद्वारे पर्यटकांना या प्रवाळ व समुद्रतळाशी विराजमान जहाजाची सफर घडविण्याची योजना आहे.

संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, लेखक वामन देशपांडे यांचे निधन

संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, लेखक वामन देशपांडे यांचे निधन डोंबिवली, दि. १० जून संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि लेखक वामन देशपांडे यांचे मंगळवारी सकाळी डोंबिवलीत एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८१ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन विवाहित पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून देशपांडे यांच्यावर डोंंबिवलीत एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र ते उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. मंगळवारी सकाळी त्यांची अखेरचा श्वास घेतला. संत साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास होता. दैनंदिन ज्ञानेश्वरी, दैनंदिन दासबोध, संत तुकाराम आदी धार्मिक विषयांवर तसेच कविता, भावगीते, भक्तिगीते, कथा, समीक्षा, कांदबरी इत्यादी विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले होते. देशपांडे यांची १२५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. संत साहित्यासह विविध विषयांवरील ११८ पुस्तकांना वामन देशपांडे यांनी प्रस्तावना लिहिल्या होत्या. धार्मिक विषयांसह विविध विषयांवरील सुमारे तीन हजाराहून अधिक पुस्तकांचा संग्रह त्यांच्याकडे होता. 'अच्युतानंद' या टोपण नावाने त्यांनी ज्ञानेश्वरीवर लिखाण केले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या डोंबिवली शाखेचे अध्यक्ष म्हणूनही काम केले होते.‌ संत साहित्यावर ते प्रवचनही करत असत.

सोमवार, ९ जून, २०२५

अशी ही साता-याची त-हा-! विशेष लेख

इंट्रो आगामी ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे होणार आहे. ३३ वर्षांनंतर पुन्हा एकदा साता-यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होण्याचा योग जुळून आला आहे. त्यानिमित्ताने साहित्य, चित्रपट, कविता यातील 'अशी ही साता-याची त-हा'! 'अशी ही साता-याची त-हा-!' शेखर जोशी मराठी साहित्य व्यवहारातील 'कुंभमेळा' अशी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ओळख आहे. दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या या साहित्य संमेलनाचा आता 'इव्हेंट' झाला असून हे संमेलन राजकारण्यांच्या ताब्यात गेले आहे. साहित्य संमेलन आणि वाद ,कार्यक्रमातील साचेबद्धपणा हे नेहमीचे रडगाणे असले तरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही मराठी साहित्य व्यवहारातील एक महत्त्वाची गोष्ट आहे. आगामी ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे होणार आहे. रविवारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे यंदा सातारा येथे साहित्य संमेलनाचा फड रंगणार आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर सातारा शहराला ऐतिहासिक वारसा असून हे शहर कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमावर वसले आहे. छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसूबाई यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज हे साता-याच्या गादीचे पहिले संस्थापक. १८ मे १६८२ ते १५ डिसेंबर १७४९ असा त्यांचा कार्यकाळ होता. १७०८ मध्ये त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. ब्रिटिशांच्या काळात सातारा हे एक अग्रगण्य संस्थान म्हणून ओळखले जात होते.‌ शहराभोवती असलेल्या सात किल्ल्यांवरून शहराला सातारा हे नाव मिळाले.‌ प्रत्येक शहराची स्वतःची काही ना काही अशी स्वतंत्र ओळख असते. अजिंक्यतारा किल्ला, व्योम धरण, कास पठार, सज्जनगड, ठोसेघर धबधबा, जरंडेश्वर हनुमान, बारा मोट्याची विहीर, ही साताऱ्या जवळील काही प्रसिद्ध ठिकाणे सातारा शहर आणि जिल्ह्याची मुख्य ओळख ठरली आहेत. सातारी कंदी पेढे आणि सातारी जर्दा ही सुद्धा साता-याची वेगळी ओळख आहे. साहित्य, चित्रपटातील सातारा 'सातारा' हे नाव असलेला, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 'अलगूज' कादंबरीवर आधारित 'अशी ही साता-याची त-हा' हा चित्रपटही सुमारे पन्नास वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. अरुण सरनाईक, उमा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मुरलीधर कापडी यांनी केले होते. चित्रपटातील 'परभणीहुनी कुणी आलेत पाहुणे मला घालाया मागणी, काय करू काय करू' हे गाणे प्रसिद्ध आहे. https://youtu.be/q7tTNzfDX5w?feature=shared या लिंकवर हे गाणे पाहता व ऐकता येईल. अशाच एका अत्यंत लोकप्रिय गाण्यात/ लावणीत 'सातारा' आलेला आहे. 'सांगत्ये ऐका' चित्रपटातील 'बुगडी माझी सांडली गं जाता साताऱ्याला गं जाता साताऱ्याला ' हे ते गाणे. आज इतक्या वर्षांनंतरही गाण्याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही.‌ https://youtu.be/lSLMTR0tCZY?feature=shared या लिंकवर क्लिक करून हे गाणे ऐकता येईल. गदिमांचा 'जोगिया' 'आधुनिक वाल्मिकी' अशी ओळख असलेले कवी, गीतकार ग. दि. माडगूळकर यांचा 'जोगीया' हा पहिला काव्यसंग्रह. यातील १६ कविता संगीतबद्ध करून एक सांगितिक अल्बम प्रकाशित झाला आहे. गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी या अल्बमची निर्मिती केली असून सुरेश देवळे यांनी ही गाणी संगीतबद्ध केली आहेत. श्रीधर फडके रवींद्र साठे उत्तरा केळकर चारुदत्त आफळे, ज्ञानदा परांजपे यांनीही गाणी गायली आहे. चारुदत्त आफळे यांची किर्तनकार/ प्रवचनकार अशी महाराष्ट्राला ओळख आहे. मात्र या आल्बममध्ये आफळे बुवांनी चक्क गदिमांनी लिहिलेली 'ही घोळ निऱ्यांचा पदी अडखळे, जलद चालणे जरा, दिसे ही साताऱ्याची तऱ्हा' ही लावणी गायली आहे. लावणीचे शब्द, संगीत आणि स्वर एकदम फक्कड आहेत. रसिक वाचकांना ही लावणी https://www.gadima.com/jogia/index.php#google_vignette या लिंकवर ऐकता येईल. साताऱ्यात होणारे ४ थे साहित्य संमेलन आगामी ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे होणार आहे. या आधीही तीन संमेलने साता-यात झाली होती. १८७८ मध्ये लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी 'ग्रंथकार संमेलन' सुरु केल्यानंतर १९०५ मध्ये तिसरे संमेलन रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात झाले होते. १९६२ मध्ये न. वि. गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली ४४ वे तर १९९३ मध्ये विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली ६६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साता-यात झाले होते. सातारा येथे होणाऱ्या आगामी ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजनाचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशनला मिळाला आहे. असाही एक योगायोग सातारा येथे होणारे नियोजित ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन छत्रपती शाहू स्टेडियम येथे होणार आहे. १९९३ साली ६६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याच ठिकाणी झाले होते. हे स्टेडियम १४ एकरात असून तिथे एक मुख्य मंडप, दोन अन्य मंडप, ग्रंथ प्रदर्शन, कवी गझल कट्टा अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. इतर परिसंवाद/कार्यक्रम करण्यासाठी तीन सभागृहेही उपलब्ध आहेत. स्टेडियममध्ये २५ हजार प्रेक्षक क्षमतेची गॅलरी आहे. स्टेडियम सातारा बस स्थानकापासून पायी चालत जाण्याच्या अंतरावर आहे.‌ स्टेडियमच्या मागील बाजूस पोलीस परेड ग्राउंडची मोठी जागा असून त्याचा वापर पार्किंगसाठी करता येणार आहे. पूर्ण--

शनिवारी डोंबिवलीत रंगणार चतुरंग चैत्रपालवी संगीतोत्सव

शनिवारी डोंबिवलीत रंगणार चतुरंग चैत्रपालवी संगीतोत्सव डोंबिवली, दि. ९ जून चतुरंग प्रतिष्ठान आयोजित चतुरंग चैत्रपालवी संगीतोत्सव येत्या १४ जून रोजी डोंबिवलीत रंगणार आहे. या कार्यक्रमात म्हैसकर फाऊंडेशन पुरस्कृत 'चतुरंग संगीत सन्मान' डॉ. पं. विद्याधर व्यास यांना तर 'चतुरंग संगीत शिष्यवृत्ती' अद्वैत केसकर यांना पं. अरुण कशाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रीय संगीत/ नाट्य संगीत गायिका आशा खाडिलकर यांच्या सत्तर वर्षपूर्ती निमित्ताने ‘आशाताई - एक सुरदासी’ हा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे. यात आशा खाडिलकर यांच्या सांगितिक कारकिर्दीचा आढावा घेण्यात येणार असून आशा खाडिलकर यांच्या कन्या वेदश्री खाडिलकर- ओक सहभागी होणार आहेत. त्यांना अनिरुद्ध गोसावी (संवादिनी), निषाद करलगीकर (तबला) हे संगीतसाथ करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन डॉ . समीरा गुजर - जोशी यांचे आहे. याच कार्यक्रमात अद्वैत केसकर यांचेही गायन होणार आहे. त्यांना निषाद चिंचोले (तबला), निनाद जोशी (संवादिनी) संगीतसाथ करणार आहेत.‌ हा कार्यक्रम दुपारी साडेचार ते नऊ या वेळेत सुयोग मंगल कार्यालय, डोंबिवली पूर्व येथे होणार असून रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.