मंगळवार, १० जून, २०२५

संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, लेखक वामन देशपांडे यांचे निधन

संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, लेखक वामन देशपांडे यांचे निधन डोंबिवली, दि. १० जून संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि लेखक वामन देशपांडे यांचे मंगळवारी सकाळी डोंबिवलीत एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८१ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन विवाहित पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून देशपांडे यांच्यावर डोंंबिवलीत एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र ते उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. मंगळवारी सकाळी त्यांची अखेरचा श्वास घेतला. संत साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास होता. दैनंदिन ज्ञानेश्वरी, दैनंदिन दासबोध, संत तुकाराम आदी धार्मिक विषयांवर तसेच कविता, भावगीते, भक्तिगीते, कथा, समीक्षा, कांदबरी इत्यादी विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले होते. देशपांडे यांची १२५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. संत साहित्यासह विविध विषयांवरील ११८ पुस्तकांना वामन देशपांडे यांनी प्रस्तावना लिहिल्या होत्या. धार्मिक विषयांसह विविध विषयांवरील सुमारे तीन हजाराहून अधिक पुस्तकांचा संग्रह त्यांच्याकडे होता. 'अच्युतानंद' या टोपण नावाने त्यांनी ज्ञानेश्वरीवर लिखाण केले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या डोंबिवली शाखेचे अध्यक्ष म्हणूनही काम केले होते.‌ संत साहित्यावर ते प्रवचनही करत असत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: