रविवार, १ जून, २०२५

अकरावी ऑनलाईन प्रवेश; १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत रविवारी संध्याकाळपर्यंत १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी मुंबई, दि. १ – इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत रविवारी संध्याकाळी सहापर्यंत १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेचा नोंदणी अर्ज भरण्याकरिता दिनांक २६ मे २०२५ ते ३ जून २०२५ पर्यंतचा एकूण नऊ दिवसांचा पुरेसा कालावधी देण्यात आला असून या फेरीची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याची तक्रार असल्यास अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्यापूर्वी प्रत्येक तक्रार दूर केली जाईल,असे सहसंचालक (माध्यमिक) डॉ.श्रीराम पानझाडे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी विभागस्तरावर तांत्रिक सल्लागार, मार्गदर्शन केंद्र, हेल्पलाईन नंबर, सपोर्ट डेस्क, संकेतस्थळावर मराठी आणि इंग्रजी भाषेमधील माहिती पुस्तिका, प्रश्न-उत्तरे, विद्यार्थी युजर मॅन्युअल,‘करीअर पाथ’ चा टॅब तसेच विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये विद्यार्थ्यांस काही बदल करावयाचा असल्यास ग्रीवन्सचा टॅब उपलब्ध करुन देण्यात आला आहे. विद्यार्थी/ पालक यांच्यासाठी विभाग स्तरावर/ जिल्हा स्तरावर अधिकारी/ कर्मचारी यांचे संपर्क क्रमांकही संकेत स्थळावर देण्यात आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: