शनिवार, २१ जून, २०२५

जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या रेडिओचे महत्त्व अबाधित-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या रेडिओचे महत्त्व अबाधित-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. २१ जून रेडिओवर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांनी रेडिओवरील कार्यक्रमांना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनविले आहे. त्यामुळे रेडिओचे महत्व कधीही कमी होणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे व्यक्त केला. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व आशा रेडिओ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध एफएम रेडिओ वाहिन्यांच्या सिद्धू, अक्की, अर्चना, ब्रजेश, भूषण, सपना भट या रेडिओ जॉकींनी मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी फडणवीस बोलत होते. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, संचालक विभीषण चवरे यावेळी उपस्थित होते. लहानपणी दिवसाची सुरूवात रेडिओ ऐकण्यापासून व्हायची. 'विविध भारती' वरील सकाळची गाणी अगदी न चूकता ऐकली जायची. त्यामुळे रेडिओशी लहानपणापासूनच जुळला गेलो‌‌. रेडिओचे महत्व पूर्वीपासून असून आजही ते अबाधीत आहे. रेडिओ हे समाजातील शेवटच्या व्यक्तिपर्यंत पोहोचण्याचे सशक्त माध्यम असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस यांनी या मुलाखतीत रेडिओवरील संगीत ऐकणे, गाणी लिहिणे आदी छंदाविषयीही सांगितले. शीघ्र कविता करत फडणवीस यांनी गाणेही गायले. या कार्यक्रमात आशा रेडिओ जीवन गौरव पुरस्कार २०२५ विश्वनाथ ओक यांना प्रदान करण्यात आला. आशा सर्वोत्कृष्ट पुरूष निवेदक पुरस्कार रेडिओ मिर्ची वाहिनीचे रेडिओ जॉकी जितूराज, आशा सर्वोत्कृष्ट महिला निवेदक पुरस्कार रेड एफ एम वाहिनीच्या रेडिओ जॉकी मल्लिशा यांना प्रदान करण्यात आला. आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ केंद्र पुरस्कार रेडिओ सिटीला, आशा सर्वोत्कृष्ट कम्युनिटी रेडिओ केंद्राचा पुरस्कार विकास भारती रेडिओ केंद्र नंदूरबार यांना देण्यात आला. यासह अन्य १२ गटात रेडिओ पुरस्कार देण्यात आले. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.‌ आशिष शेलार यांनीही मनोगत व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: