बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५

सरसंघचालकांचे ऐकून झाडांची कत्तल थांबणार का?

डॉ. मोहन भागवत सांगती वृक्षांची महती! - महाराष्ट्र भाजप सरसंघचालकांचे ऐकून झाडांची कत्तल थांबवणार की कत्तल करणार? शेखर जोशी भारतीय जनता पक्षासाठी आदरणीय, गुरुतुल्य असणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केलेल्या विचारांचा आदर राखून नाशिक येथील हजारो वृक्षांची संभाव्य कत्तल थांबवायची की सोयीस्कर दुर्लक्ष करून कत्तल करायची? असा पेच भाजपपुढे निर्माण झाला आहे‌. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपची मातृ/ पितृ संघटना आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते/ पदाधिकारी किंवा भाजपचे नेते जाहीरपणे मान्य करोत अथवा न करोत पण रा.स्व. संघाचे सरसंघचालक व संघ नेते, पदाधिकारी जे सांगतील ते भाजपसाठी शिरसावंद्य असते. कधीतरी नड्डा काहीतरी बरळतात आणि त्याचा प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष फटका कसा बसतो हे भाजपने लोकसभा निवडणुकीत पाहिले. आणि म्हणूनच पाठोपाठ झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत रा. स्व. संघ, संघप्रणित संस्था, संघटना भाजपच्या बाजूने अप्रत्यक्षपणे निवडणुकीत उतरल्यावर काय परिणाम झाला ते ही पाहायला मिळाले. नगरसेवक ते खासदार पदापर्यंतच्या निवडणुकीत संघ आणि संघप्रणित संस्था/ संघटना भाजप उमेदवारांसाठी किंवा संघ ज्याच्यामागे आपली संपूर्ण ताकद उभी करेल ते निवडून येतात. संघ व संघप्रणित संस्था संघटनांचे कार्यकर्ते निस्वार्थीपणे प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष काम करतात म्हणूनच भाजपचे उमेदवार निवडून येतात हे कटू सत्य आहे. असो. नाशिक येथे होणा-या आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधुग्रामसाठी सुमारे १ हजार ७०० झाडे तोडण्याच्या निर्णयामुळे स़ध्या वातावरण तापले आहे. पर्यावरण व निसर्गप्रेमी नाशिककर या संभाव्य वृक्षतोडीच्या विरोधात एकवटले आहेत. हा विषय ऐरणीवर आला आहे.‌ अयोध्येतील श्रीराम मंदिरावरील धर्मध्वजारोहणप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी जे भाषण केले, एक संस्कृत श्लोक सांगून वृक्षांची सांगितली, ते भाषण महाराष्ट्र भाजप पर्यायाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनावर घेऊन हजारो वृक्षांची होणारी संभाव्य कत्तल थांबविणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.‌ भागवत यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिरावरील धर्मध्वजारोहणप्रसंगी केलेल्या भाषणात छायां अन्य कुर्वन्ति:, तिष्ठन्ति स्वयं आतपे:, फलान्यपि परार्थाय: वृक्षाः सत्पुरुषा इव: असा संस्कृत श्लोक अर्थासहित सांगितला होता. ' या धर्मध्वजावर रघुकुलाचे प्रतिक असलेला कोवीदार वृक्ष आहे. मंदार आणि पारिजात या दोन्ही वृक्षांचे गुण या कोविदार वृक्षात आहेत. हे दोन्ही वृक्ष 'देव वृक्ष' म्हणून मानले जातात. वृक्ष स्वतः उन्हात उभे राहून दुसऱ्यांना सावली, फळे देतात. वृक्ष हे सत्पुरुष असतात', असा भावार्थ भागवतांनी सांगितला. आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधुग्रामसाठी नाशिकच्या तपोवनातील सतराशे झाडांची कत्तल केली जाणार आहे.‌ भाजपसाठी मातृ/पितृतुल्य असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्या संघाच्या सरसंघचालकांनी जे वृक्षमहात्म्य सांगितले, वृक्ष हे सत्पुरुष असतात, असा गुणगौरव केला त्या भागवतांचा व त्यांच्या भाषणाचा आदर करणार का? हा खरा प्रश्न आहे. या संभाव्य वृक्षतोड/ कत्तल प्रकरणी नाशिकमध्ये अलिकडेच जनसुनावणी झाली. या जनसुनावणीत उपस्थित सर्वच नाशिककरांनी ठाम विरोध केला.‌ झाडांची कत्तल केली जाऊ नये, अशी आग्रही भूमिका घेतली. आता महाराष्ट्र भाजपने विचार करून निर्णय घ्यायचा आहे. जनभावनेचा अनादर करून महाराष्ट्र भाजपने/ सरकारने वृक्षतोड करण्याचा निर्णय घेतलाच तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी महाराष्ट्र भाजप व सरकारला या निर्णयापासून परावृत्त केले पाहिजे. चार शब्द सुनावले पाहिजेत, अशी निसर्ग आणि पर्यावरणप्रेमींनी अपेक्षा आहे. नाहीतर भागवत यांचे भाषणही 'बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी' ठरेल. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला याची किंमत मोजावी लागेल, मतदारांनीही ती मोजून दाखवावी. शेखर जोशी २६ नोव्हेंबर २०२६ 👇सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या भाषणातील काही भाग

मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०२५

रामायण शिल्पांपैकी काही शिल्पे घडविण्यात शिल्पकार संदीप लोंढे यांचा सहभाग

श्रीराम मंदिराच्या पायातील रामायण शिल्पांपैकी काही शिल्पे घडविण्यात शिल्पकार संदीप लोंढे यांचा सहभाग - नाशिककर आणि लोंढे कुटुंबीयांसाठी गौरवाचा क्षण नाशिक, दि. २५ नोव्हेंबर अयोध्येतील श्रीराम मंदिरावर मंगळवारी धर्मध्वजारोहण झाले आणि नाशिक येथील शिल्पकार संदीप लोंढे व लोंढे घराण्यासाठी हा अभिमानाचा आणि भाग्याचा क्षण ठरला. अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या तळातील पायावर (lower plinth) जी रामायण शिल्पे आहेत, त्यातील काही शिल्पे घडविण्याचे भाग्य लोंढे यांना लाभले.‌
अयोध्येत श्रीराम मंदिरावर पवित्र भगवा ध्वज अभिमानाने, डौलाने उभारला गेला आणि माझे डोळे भरून आले. रामरायाने माझ्याहीकडून सेवा करून घेतली. यात माझ्या सहकाऱ्यांचाही मोठा वाटा आहे, अशी कृतज्ञतेची भावना यानिमित्ताने लोंढे यांनी व्यक्त केली.
आमच्या पुढील काही पिढ्यांना सांगायला आनंद होईल, की नाशिकच्या शिल्पकार लोंढे घराण्यातील एका कलाकाराला हा सन्मान मिळाला, मी धन्य झालो, अशी प्रतिक्रिया लोंढे यांनी दिली. शेखर जोशी २५ नोव्हेंबर २०२५ (सर्व छायाचित्रे संदीप लोंढे यांच्या फेसबुक पोस्टच्या सौजन्याने)

रविवार, २३ नोव्हेंबर, २०२५

अत्रे ग्रंथालयातर्फे तीन दिवसीय व्याख्यानमाला

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अत्रे ग्रंथालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तीन दिवसीय व्याख्यानमाला डोंबिवली, दि. २३ नोव्हेंबर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्र के अत्रे वाचनालयाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त येत्या २६ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.‌ प्र के अत्रे वाचनालय २०१७ मध्ये डोंबिवलीच्या श्री गणेश मंदिर संस्थानाला ३० वर्षांसाठी हस्तांतरित करण्यात आले. ही व्याख्यानमाला दररोज संध्याकाळी सात वाजता श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली-पूर्व येथे होणार आहे. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी 'संविधान सर्वांसाठी' या विषयावर संविधान अभ्यासक माधव जोशी आपले विचार मांडणार आहेत. २७ नोव्हेंबर रोज 'मला शिवराय व्हायचंय' या विषयावर अतिश अविनाश कुलकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे. तर २८ नोव्हेंबर रोजी 'डिजिटल जगात सुरक्षितता;कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर संरक्षण' या विषयावर अभिषेक सोनार बोलणार आहेत. व्याख्यानमाला सर्वांसाठी विनामूल्य असून डोंबिवलीकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गणेश मंदीर संस्थांनने केले आहे. प्र. के. अत्रे ग्रंथालयाचे सुमारे १ हजार ६०० सभासद असून ग्रंथालयात सुमारे ३९ हजार पुस्तके आहेत. येथे बारा तास मोफत वृत्तपत्र वाचनालय तसेच २५० विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची सोयही उपलब्ध आहे.

शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०२५

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रूरकर्मा टीपू सुलतान'ची जयंती साजरी

क्रूरकर्मा टीपू सुलतान'ची जयंती शाळेत साजरी करणे हा 'राष्ट्रद्रोह' - हिंदू जनजागृती समिती - माजलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रकार बीड, दि. २१ नोव्हेंबर बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 'क्रूरकर्मा टीपू सुलतान'ची जयंती साजरी करण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. शासकीय परिपत्रकात कोणताही उल्लेख नसताना, एका क्रूर शासकाचे उदात्तीकरण करणे हा केवळ नियमांचा भंग नाही, तर हिंदुच्या भावना दुखावून राज्यातील शांतता बिघडवण्याचा अक्षम्य प्रयत्न आहे. या राष्ट्रद्रोही कृत्यासाठी संबंधित शिक्षक, आयोजक आणि निष्काळजी शिक्षण अधिकाऱ्यांवर तातडीने 'गुन्हा दाखल' करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. टीपू सुलतान हा कोणताही आदर्श राजा नसून, त्याने सक्तीचे हिंदुचे धर्मपरिवर्तन, मंदिरांचा विध्वंस आणि हजारो निष्पाप हिंदुच्या हत्यांसारखी क्रूरकृत्ये केली आहेत. एका बाजूला संपूर्ण महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जपत असताना, शासकीय यंत्रणेचा भाग असलेल्या शाळेत अशा क्रूरकर्मा व्यक्तीचे उदात्तीकरण करणे म्हणजे पुढील पिढीला चुकीचा इतिहास शिकवून राष्ट्रविरोधी प्रवृत्तींना खतपाणी घालण्यासारखे असल्याचे हिंदू जनजागृती समितीचे म्हणणे आहे.‌ हा कार्यक्रम आयोजित करणारे शिक्षक, मुख्याध्यापक व निष्काळजी शिक्षण अधिकारी यांच्यावर भारतीय दंड संहिता अंतर्गत धार्मिक भावना दुखावणे आणि राज्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.‌ तसेच संबंधित शिक्षकांचे त्वरित निलंबन करावे. जर या प्रकरणातील सूत्रधारांवर तातडीने आणि कठोर कारवाई झाली नाही, तर हिंदु जनजागृती समिती तीव्र जनआंदोलन छेडण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही हिंदू जनजागृती समितीने दिला आहे.

गुरुवार, २० नोव्हेंबर, २०२५

कल्याणमध्ये मीटर पद्धतीने रिक्षा सुरू;ही तर धूळफेक.

ही तर निव्वळ धूळफेक... शेखर जोशी कल्याणमध्ये मीटर पद्धतीने रिक्षा सुरू झाली म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रिक्षा चालक मालक संघटनांचे नेते, पदाधिकारी, वाहतूक पोलीस डांगोरा पिटत आहेत, पण ही निव्वळ धूळफेक आहे. रिक्षा मीटर सक्ती एखाद्या ठराविक ठिकाणी नको तर संपूर्ण कल्याण डोंबिवली शहरात सर्वत्र होण्याची आवश्यकता आहे. या बातमीनुसार सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी कल्याण रेल्वे स्थानकातून मीटर रिक्षा चालविण्यात येत आहे. मंगळवारपासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. याआधीही कल्याण, डोंबिवलीत मीटर रिक्षासाठी वेगळी रांग ठेवण्याचा प्रयोग करण्यात आला होता. मात्र प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी तो बंद पडला. अर्थात तो फसणारच होता. आता कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर मीटर रिक्षा सुरू करण्याचा प्रयोगही फसण्याचीच शक्यता जास्त आहे. फक्त सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळेत कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरून मीटर पद्धतीने रिक्षा चालविण्याचा हा प्रकारच मुळात हास्यास्पद आहे. म्हणजे कल्याण शहराच्या अन्य वेगवेगळ्या भागातून एखाद्याला रेल्वे स्थानकावर मीटर पद्धतीने यायचे असेल तर तो येऊ शकत नाही. रिक्षाचालक मनमानी पद्धतीने जेवढे पैसे सांगतील तेवढे देऊनच यावे लागेल. त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरून सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी मीटर पद्धतीने रिक्षा सुरू करण्याचा प्रयोग अत्यंत अयोग्य व चुकीचा आहे. प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रिक्षा चालक मालक संघटना, पदाधिकारी यांना खरोखरच आणि मनापासून मीटर पद्धतीने रिक्षा सुरू करायच्या असतील तर त्या संपूर्ण कल्याण शहरात सुरू कराव्यात. संपूर्ण कल्याण शहरात मीटर पद्धतीने रिक्षा सुरू झाल्या म्हणजे शेअर पद्धत बंद करावी, असे अजिबात म्हणणे नाही. दोन्ही पद्धतीने रिक्षाप्रवास करता आला पाहिजे. रिक्षाचालक किंवा रिक्षा चालक मालक संघटना, पदाधिकारी यांना मीटर पद्धतीने रिक्षा नकोत आणि फक्त शेअर पद्धतीनेच रिक्षा चालवायचे एकमेव कारण म्हणजे जर रिक्षा मीटर सक्ती केली गेली तर रिक्षा चालकांना मनमानी पद्धतीने पैसे उकळता येणार नाहीत. कल्याण किंवा डोंबिवलीत रेल्वे स्थानकाच्या बाहेर जे रिक्षातळ आहेत, तिथे प्रवासी बसला की ठरवून दिलेले जे शेअर भाडे आहे त्यापेक्षा जास्त पैसे रिक्षाचालक घेऊ शकत नाहीत. याउलट मीटर सक्ती नसल्याने रिक्षातळ सोडून शहराच्या कोणत्याही भागात प्रवासी रिक्षात बसला की त्याला मनमानी पद्धतीने पैसे उकळता येतात. मीटर पद्धतीने १.०५ किलोमीटर अंतरासाठी फक्त २६ रुपये इतके भाडे ठरवून दिलेले आहे. मात्र इतक्या किंवा यापेक्षाही कमी अंतरासाठी रिक्षाचालक ५० ते ७० रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त पैसे सांगतात. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि अन्य हतबल प्रवाशांना ते देऊन प्रवास करावाच लागतो. अशा रिक्षाचालकांची तक्रार करा, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक पोलीस सांगत असतात. पण प्रत्येक वेळी प्रत्येक प्रवासी, ज्येष्ठ नागरिक रिक्षाचालकांशी वाद घालत बसत नाही. सर्वांना ते शक्य होते असे नाही. त्यामुळे संपूर्ण शहरात, कोणत्याही भागात प्रवासी रिक्षात बसला आणि त्याने मीटरने जायचे आहे सांगितले तर रिक्षाचालकाने मीटर टाकलेच पाहिजे. आणि त्यासाठीच अमूक एखाद्या ठिकाणी, अमूक रिक्षा तळावर, मीटर रिक्षांची वेगळी रांग असा तोंडाला पाने पुसण्याचा आणि मीटर पद्धतीने रिक्षा सुरू झाल्याची धुळफेक न करता तातडीने संपूर्ण कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत रिक्षा मीटर सक्ती केली जावी. सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी, रिक्षा चालक मालक संघटना, त्यांचे पदाधिकारी आणि निष्क्रिय लोकप्रतिनिधी- अर्थात निवडून आलेले आमदार व खासदार या सर्वांनी मुठभर आणि मुजोर, बेशिस्त रिक्षाचालकांच्यापुढे नांगी टाकली आहे. लवकरच कल्याण डोंबिवली महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत कल्याण डोंबिवलीत रिक्षा मीटर सक्ती हा मुद्दा ऐरणीवर आला पाहिजे.‌ सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी आणि उमेदवार मत मागायला येतील तेव्हा प्रत्येकाने 'आधी रिक्षा मीटर सक्ती नंतर मतदान' किंवा ' रिक्षा मीटर सक्ती नाही तर मतही नाही' अशी भूमिका घेतली पाहिजे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही संधी आहे. आत्ता झाले तरच काहीतरी हालचाल होईल. निवडणूक पार पडली की काहीही होणार नाही.‌ गुगल मॅपवर अंतर पाहून भाडे द्यावे आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतो. प्रत्येक प्रवाशाने रिक्षात बसल्यावर जिथे बसलो ते आणि जिथे उतरायचे असेल ते ठिकाण टाकावे. जितके किलोमीटर अंतर दाखवतील तितकेच पैसे द्यावे. एम. इंडिकेटर ॲपवर १.०५ किलोमीटर अंतरापासून ते पुढील किलोमीटरपर्यंत किती भाडे होते त्याचा तक्ता दिला आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रिक्षा चालक मालक संघटनांनी या भाडेतक्त्याचा फलक सर्व प्रमुख रिक्षातळांवर आणि शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी लावावेत. रिक्षा चालक मालक संघटना, पदाधिकारी आणि रिक्षा चालकांना मीटर सक्ती मान्य नसेल तर या पद्धतीने प्रवासी पैसे देतील आणि ते तुम्हाला मान्य करावेच लागेल, असे आदेश, सूचना द्याव्यात. आमदार व खासदारांचे दुर्लक्ष विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रिक्षा मीटर सक्ती या प्रश्नाकडे सोयीस्कर डोळेझाक केली आहे. या दोघांनी आणि त्यांच्या राज्यातील वरिष्ठांनी अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनावर घेतले तर कल्याण डोंबिवलीत रिक्षा मीटर सक्ती होऊ शकते. ते अशक्य नाही. भाजप स्वतःला 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणवून घेतो. आमदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी किमान भाजपप्रणीत रिक्षाचालक मालक संघटनेला व याचे सभासद असलेल्या रिक्षाचालकांनी तरी आपली रिक्षा मीटरप्रमाणे चालविण्यासाठी सक्ती करावी, आवाहन करावे. शेखर जोशी २० नोव्हेंबर २०२५

बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५

महाराष्ट्रात 'अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट' लागू करा

देवस्थानांच्या भूमींचे रक्षण करण्यासाठी 'अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट' राज्यात तात्काळ लागू करा - २२ जिल्ह्यांतील १ हजारांहून अधिक मंदिर विश्वस्तांची शासनाकडे मागणी मुंबई, दि. १९ नोव्हेंबर महाराष्ट्रातील देवस्थानांच्या हजारो एकर जमिनी भूमाफियांनी, महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने बेकायदेशीरपणे हडपल्या आहेत. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी, गुजरात व कर्नाटकच्या धर्तीवर ‘अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ लागू करावा, अशी मागणी महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांतील एक हजारांहून अधिक मंदिर विश्वस्तांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंदिर महासंघाने सादर केलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे.‌ तसेच महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह सुमारे २२ जिल्हाधिकारी, तहसिलदार,आमदार यांना ३०० हून अधिक निवेदने सादर करण्यात आली आहेत. देवस्थानांच्या इनाम जमिनी (वर्ग-३) कायद्याने अहस्तांतरणीय असतांनाही, महसूल विभागातील भ्रष्टाचारामुळे भूमाफियांना मुक्त संधी मिळाली असून हजारों एकर जमिनी हडपल्या आहेत. केवळ पश्चिम महाराष्ट्रातच ६७१ गटांवर थेट अतिक्रमण झाले आहे; विदर्भातील अमरावती, अकोला जिल्ह्यांत ५० कोटींची जमीन केवळ ९६० रुपयांना विकल्याचे समोर आले असल्याचे मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी सांगितले.
या राज्यव्यापी अभियानात रायगड येथील श्री हरिहरेश्वर, साताऱ्याचे श्री सज्जनगड, पालीतील श्री बल्लाळेश्वर, वसईचे श्री परशुराम तपोवन, नाशिकचे श्री मुक्तीधाम, आकोट-अकोल्याचे श्री कान्होबा, रत्नागिरीचे श्री काशी विश्वेश्वर, कोल्हापूरचे श्री उजळाई व अनेक क्षेत्रातील मंदिरांचे विश्वस्त तसेच विविध जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह अकोला येथील १६० अधिवक्ते उपक्रमात सहभागी झाले होते.

उदवाहनापर्यंत जाण्याची डोंबिवलीकरांची वाट बिकट

पक्ष फोडाफोडीच्या महत्त्वाच्या कामामुळे चव्हाण, शिंदे यांचे 'या'नागरी प्रश्नाकडे दुर्लक्ष - उदवाहनापर्यंत जाण्याची वाट बिकट शेखर जोशी डोंबिवली, दि. १८ नोव्हेंबर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सध्या पक्ष फोडाफोडीच्या महत्त्वाच्या कामात व्यग्र आहेत. त्यामुळे डोंबिवली पश्चिमेकडील उदवाहनाच्या नागरी समस्येकडे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कल्याण एण्डच्या दिशेकडील रस्ता पत्रे लावून बंद केल्याने प्रवाशांना पूर्ण हेलपाटा मारून उदवाहनापर्यंत जावे लागते आहे.
दहा ते बारा महिन्यांपूर्वी रेल्वे स्थानक सुशोभीकरण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेकडे बांधण्यात येणाऱ्या पादचारी पुलाच्या कामामुळे येथे असलेले लोकल ट्रेन तिकिट घर आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आरक्षण केंद्र डोंबिवली पश्चिमेला कल्याण‌‌‌ एण्ड दिशेकडे फलाट क्रमांक एकवर हलविण्यात आले. तसेच सुशोभीकरणाच्या कामामुळे कल्याण एण्ड दिशेकडून उदवाहनापर्यंत जाण्या- येण्याचा सहज, सुलभ मार्ग होता तो पत्रे लावून बंद करून टाकला. त्यामुळे आता रेल्वे स्थानकात शिरून उदवाहनापर्यंत पोहोचण्यासाठी काही मुठभर व मुजोर, बेशिस्त रिक्षाचालकांचा अडथळा पार करून, वळसा घालून उदवाहनापर्यंत जावे लागते आहे. खरे म्हणजे या उदवाहनापर्यंत जाण्या-येण्यासाठी रस्त्यावरून थेट सोय सहज करता येणे शक्य आहे. जेव्हा उदवाहन सुरू झाले तेव्हाच हे करता आले असते. ठिक आहे, तेव्हा केले नाही. पण आता कल्याण एण्ड दिशेकडील रस्ता पत्रे लावून बंद केल्याने प्रवासी, नागरिक यांची होणारी गैरसोय व त्रास ठरविले तर एका दिवसात दूर करता येऊ शकतो. पण ते करण्याचीही इच्छा हवी. रस्त्यावरून उदवाहनापर्यंत एका बाजूला पायऱ्या आणि एका बाजूला उतार केला तर नागरिक, प्रवासी यांची दररोजच्या त्रासातून सुटका होऊ शकते. अर्थात त्यासाठी रेल्वे स्थानक परिसर व उदवाहनाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर रस्ता अडवून उभ्या राहणाऱ्या बेशिस्त रिक्षाचालकांचा बंदोबस्त करावा लागेल, तसेच इथे कचरा व राडारोडा टाकला जातो त्यावरही बंदी घालावी लागेल. आमदार व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भाजप व शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, माजी नगरसेवक यांनी मनात आणले तर अक्षरशः एका रात्रीत हे काम ते करू शकतात. पण पक्ष फोडाफोडीतून वेळ मिळाला तर या नागरी समस्येकडे लक्ष द्यायला सवड मिळेल. शेखर जोशी १९ नोव्हेंबर २०२५