गुरुवार, ७ ऑगस्ट, २०२५

पृथ्वीराज चव्हाण यांना १० कोटींची मानहानीची नोटीस

सनातन संस्थेला ‘दहशतवादी’ म्हटल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना १० कोटींची मानहानीची नोटीस मुंबई, दि. ७ ऑगस्ट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन संस्थेला ‘दहशतवादी’ म्हटल्याप्रकरणी सनातन संस्थेचे विश्वस्त वीरेंद्र मराठे यांच्या वतीने त्यांना दहा कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच चव्हाण यांनी सनातन संस्थेची बिनशर्त माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी दिला आहे. चव्हाण यांनी १५ दिवसांच्या आत लेखी माफी मागणे, मूळ मुलाखतीइतक्याच प्रसिद्धीने ती माफी प्रसिद्ध करणे, भविष्यात कोणतीही बदनामीकारक विधाने न करणे आणि १० हजार रुपये कायदेशीर खर्च भरपाई देणे, अशा मागण्या या नोटीसीत करण्यात आल्या आहेत. चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे सनातन संस्थेची प्रतीमा मलीन झाली असून हजारो साधकांच्या भावना दुखावल्या आहेत. ही नोटीस मिळूनही उत्तर न दिल्यास चव्हाण यांच्यावर फौजदारी आणि दिवाणी खटले दाखल करण्यात येणार आहेत, असे संस्थेचे मानद कायदेशीर सल्लागार तथा मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता रामदास केसरकर यांनी नोटिसीत म्हटले आहे. पृथ्वीराज चव्हाण आज सांगत आहेत की, ‘भगवा’ हा महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीचा, छत्रपती शिवरायांचा, संत ज्ञानेश्वरांपासून सर्व संत आणि वारकर्‍यांचा पवित्र भगवा आहे. त्यामुळे कोणीही “भगवा दहशतवाद’’ असे म्हणू नये, असे काँग्रेसी नेत्यांना आवाहन करत आहेत; पण जेव्हा मालेगाव प्रकरण झाले, त्या वेळी काँग्रेसी नेते पी. चिदंबरम्, दिग्विजय सिंह, सुशीलकुमार शिंदे आदी नेत्यांनी ‘भगवा दहशतवाद’ म्हणत हिंदूंना लक्ष्य केले. तेव्हा चव्हाण यांना ‘भगवा’ छत्रपतींचा आहे, संतांचा आहे, हे लक्षात आले नाही ? इतकी वर्षे ते झोपले होते का? असा प्रश्न वर्तक यांनी उपस्थित केला आहे.‌