गुरुवार, २ मार्च, २०१७

अभिनेता विवेक यांच्या आठवणींना उजाळा


अभिनेता विवेक यांच्या आठवणींना उजाळा

मराठी चित्रपट सृष्टीतील देेखणे आणि प्रसन्न व्यक्तिमत्व म्हणून अभिनेते विवेक यांची ओळख आहे.मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या व्यक्तिमत्वाने आणि सहजसुंदर अभिनयाने त्यांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. मराठीत त्यांनी सुमारे ८० चित्रपटातून काम केले होते. रंगभूमीवरही त्यांनी काही काळ काम केले.'दूधभात', 'देवबाप्पा', 'माझं घर माझी माणसं', 'गृहदेवता', 'धाकटी जाऊ', 'वहिनीच्या बांगड्या', 'पोष्टातली मुलगी' हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट.विस्मृतीत गेलेल्या या अभिनेत्याचा जीवनपट प्रेक्षकांसमोर उलगडण्यााचा प्रयत्न 'अभिनेता विवेक' या पुस्तकातून करण्यात आला आहे. सांगाती प्रकाशनाने (भारती मोरे-९८६७४१६०१८) हे पुस्तक प्रकाशित केले असून भारती मोरे, प्रभाकर भिडे, रविप्रकाश कुलकर्णी, प्रकाश चांदे यांनी ते संपादित केले आहे. डोबिवलीत झालेल्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

खरे तर विवेक यांना चित्रकार/ क्रिकेकपटू व्हायचे होते. पण नियती त्यांना चित्रपटांच्या दुनियेत घेऊन आली. चाळीस वर्षे ते मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीत वावरले. प्रसन्न आणि चेहऱयावर कायम हास्य असणारे विवेक आजही जुन्या पिढीतील रसिकांच्या स्मरणात आहेत.विवेक यांचे खरे नाव गणेश अभ्यंकर. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरील निर्माते बाळ कुडतरकर यांनी त्यांचे नामकरण 'विवेक'असे केले. 'अभिनेता विवेक'या पुस्तकात त्यांच्याबरोबर काम केलेले काही कलावंत, त्यांचे परिचित अशा मंडळींशी बोलून विवेक यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

गंगाधर महांबरे, विवेक यांच्या मुली रेशम आठवले, रेखा काळे यांनी तसेच ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर,वसंत इंगळे, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना, अभिनेत्री चित्रा, उमा व प्रकाश भेंडे, अभिनेत्री जीवनकला, रमेश देव आणि सीमा देव, बाळ कुडतरकर आणि विवेक यांचे काही मित्र यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. विवेक यांनी त्यांच्या डायरीत लिहून ठेवलेल्या आठवणी, विवेक यांचे गाजलेले चित्रपट व त्या विषयीची सविस्तर माहिती, विवेक यांंच्या चित्रपटांची यादी, विवेक यांनी काम केलेल्या चित्रपटातील त्यांची छायाचित्रेही पुस्तकात आहेत.

विस्मृतीत गेलेल्या जुन्या पिढीतील अभिनेत्याविषयी सर्व माहिती एखाद्या पुस्तकात संकलित करण्यााचा हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे. नव्या पिढीतील कलाकारांना तसेच प्रेक्षकानाही या पुस्तकाच्या निमित्ताने अभिनेता विवेक कोण व कसे होते हे कळेल. त्यासाठी अशी पुस्तके महत्वाची आहेत. २३ फेब्रुवारी २०१७ पासून विवेक यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु झाले आहे. त्या निमित्ताने पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.

अशी मी तशी मी


अशी मी अशी मी

आत्मचरित्र हा साहित्यप्रकार मराठीत आता चांगल्यापैकी रुळला आहे. आयुष्याच्या एका टप्प्यावर मागे वळून पाहताना जीवनाचा वीणलेला आणि उलगडलेला गोफ या आत्मकथनातून मांडण्याचा प्रयत्न केला जातो. विविध क्षेत्रातील 'सेलिब्रेटीं'च्या जीवनाबद्दल सर्वसामान्यांना एक कुतूहल असते. त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रातून ते त्यांचे चाहते व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचते. अर्थात या आत्मकथनात जीवनात घडलेल्या सर्वच गोष्टी सांगितल्या जात नाही, काही हातचे ऱाखून ठेवले जाते.काही आत्मचरित्रातून मात्र वास्तव मांंडले जाते आणि ते वादग्रस्तही ठरते.

सर्वसामान्यांच्या आयुष्यातही संघर्षाचे असे अनेक प्रसंग येतात. त्याला तोंड देत आयुष्याला सामोरे जातांना त्यांचा हा जीवनप्रवास अन्य लोकांसाठी मागर्दर्शक ठरू शकतो. त्या व्यक्ती सेलेब्रेटी नसल्यामुळे त्यांच्याबाबत त्यांचे नातेवाईक, परिचित, मित्रपरिवार सोडला तर कोणाला माहिती असण्याचेही काही कारण नाही. पण तरीही अशी आत्मकथने सर्वसामान्यांना जगण्याचे व संघर्षाशी सामना करण्याचे बळ देतात हे नक्की. तारा रावत यांनी लिहिलेले आणि उद्वेली बुक्सने प्रकाशित केलेले 'अशी मी अशी मी' हे आत्मकथन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.

गरीबी, जीवनातील अस्थिरता, अनाथपण तारा रावत यांच्या वाट्याला आले. पण या सगळ्यामुळे त्या खचून गेल्या नाहीततर धीराने त्यांनी आयुष्यातील प्रत्येक प्रसंगाला तोंड दिले. आपला हा जीवनप्रवास त्यांनी या पुस्तकात उलगडला आहे. या प्रवासातील विविध आठवणी, महत्वाचे प्रसंग, जीवनात आलेल्या व्यक्ती या सगळ्याबद्दल यात सांगितले आहे.

मंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या माजी विभागप्रमुख डॉ. उषा देशमुख यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. प्रस्तावनेत डॉ. देशमुख लिहितात, माझ्या स्नेही व ज्येष्ठ कथाकार गिरिजा कीर यांच्यामुळे हे आत्मकथन माझ्या वाचनात आले. वर्तमानकाळात राहून भूतकाळाचा शोध घेण्याचा तारा रावत यांचा हा प्रयत्न आहे. निर्मळ मन, पारदर्शक विचार आणि आशावादी दृष्टीकोन हा या चिंतनाचा गाभा आहे. 'स्व'पासून तटस्थ होत आणि 'स्व'मध्ये विरघळून जात त्यांनी आपलेच रुप आपल्याच आत्मदर्पणात शोधण्याचा प्रयत्न केला आहे. आत्मशोध व व्यक्तिशोध यातील ताणांमधून 'अशी मी अशी मी' उभी राहते.

उद्वेली बुक्स-०२२-२५८१०९६८

आचरटपणाची मालिका


आचरटपणाची 'मालिका'

मराठी मनोरंजन क्षेत्रातील पहिली खाजगी वाहिनी म्हणून ‘झी मराठी’कडे पाहिले जाते. आजपर्यंत अनेक दर्जेदार मालिका या वाहिनीने सादर केल्या आहेत. अर्थात त्यामुळे त्यांचा प्रेक्षकवर्गही मोठा आहे. मात्र गेल्या काही महिन्यांत सुरू झालेल्या किंवा नुकत्याच संपलेल्या मालिका पाहिल्या तर या ‘झी मराठी’वरच्याच मालिका आहेत का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल यात शंका नाही. मालिका चालवायच्या, त्यात पाणी घालायचे आणि त्याचा शेवट गुंडाळायचा, असे चित्र सध्या पाहायला मिळते आहे. लेखन, सारासार विचार याबाबतीतही आचरटपणाचा कळस झालेला दिसतोय..

मालिकांच्या आकर्षक जाहिराती करून प्रेक्षकांवर त्याचा मारा करायचा, मालिकेबाबत उत्सुकता निर्माण करायची, त्यात भरमसाट पाणी घालत प्रेक्षकांना कंटाळा येईपर्यंत त्या खेचत न्यायच्या, किमान विचार न करता.. आले लेखक, निर्माता, वाहिनीच्या मना.. म्हणून अनाकलनीय पद्धतीने त्या मालिका गुंडाळून टाकायच्या असे सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवर चालले आहे. मालिका पाहणारा प्रेक्षक हा सुमार दर्जाचा किंवा निर्बुद्ध आहे, त्याला आपण काहीही दिले तरी चालेल, अशा पद्धतीने मालिकांतील सादरीकरण व लेखन होत चालले आहे. कितीही नाकारले आणि दूरदर्शन संचाचा ‘रिमोट’ हा प्रेक्षकांच्या हातात असला तरीही केवळ ‘झी मराठी’च नाही तर अन्य दूरचित्रवाहिन्यांवरील या मालिकांना खूप मोठा प्रेक्षकवर्ग मिळालेला आहे हे विसरून चालणार नाही.

मराठी मनोरंजन क्षेत्रातील पहिली आणि प्रस्थापित झालेली खाजगी वाहिन म्हणून ‘झी मराठी’कडे पाहिले जाते. आजपर्यंत अनेक दर्जेदार मालिका या वाहिनीने सादर केल्या आहेत. आजही अन्य वाहिन्यांच्या तुलनेत प्रत्येक घराघरात ‘झी मराठी’ वाहिनीवरच्याच मालिका पाहिल्या जातात. अन्य वाहिन्यांवरील मालिका दुसऱ्या दिवशी ‘रिपीट’ म्हणून प्रेक्षक पाहतात. याचा अर्थ आपण जे देऊ ते प्रेक्षकांनी निमूटपणे पाहावे असा होत नाही. ललित किंवा वैचारिक साहित्य वाचणारे, त्यावर चर्चा करणारे बुद्धिमान आणि मालिकांचा प्रेक्षक वर्ग ‘सुमार’ किंवा ‘निर्बुद्ध’ असा एक समज आहे. कोणी सांगितलेय तुम्हाला मालिका पाहायला, पाहू नका. तो ‘रिमोट’ तुमच्या हातात आहे.. बंद करा, अशा सूचनाही दिल्या जात असतात. ते खरे असले तरीही त्याचा अर्थ मालिका पाहणारे सर्वच जण निर्बुद्ध आहेत असे नाही आणि मालिकेच्या नावावर वाहिनी, निर्माता आणि लेखकांनी काहीही खपवावे, असाही होत नाही.

‘झी मराठी’वर काही महिन्यांपूर्वी ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका सादर झाली होती. सुरुवातीला मालिकेतून अंधश्रद्धा पसरविली जात आहे ते कोकणातील पर्यटन कमी होईल, अशी टीका त्यावर केली गेली. ती ओसरल्यावर काहीतरी वेगळे पाहायला मिळेल असे वाटत असतानाच शेवटच्या काही भागांत ही मालिका अक्षरश: गुंडाळली गेली. मालिकेतील ‘नीलिमा’ हे पात्र हो, हे खून मीच केले आहेत, असे सांगते आणि मालिकेचा ‘दी एन्ड’ होतो. प्रेक्षकही अवाक झाले. ‘नीलिमा’ ते खून कसे करते, ‘विश्वासराव’ त्याचा शोध कसा घेतो, ते उलगडून दाखविणे अधिक चांगल्या प्रकारे करता आले असते. पण त्या मालिकेतही शेवटपर्यंत घोळवत घोळवत ठेवून शेवटच्या एक-दोन भागांत सगळे ‘कोडे’ कसे सुटले आणि किती कौशल्यपूर्ण ‘तपास’ केला त्याचा आव आणलेला दाखविला गेला. आपल्याला ‘मूर्ख’बनवले गेले असल्याची भावना प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आणि ती खोटी नव्हती. समाजमाध्यमांवरून प्रतिक्रियांच्या स्वरूपात त्याचे पडसाद उमटले. रात्री साडेदहाच्या वेळेचा आणि मालिका ताणत ताणत नेऊन शेवटच्या एक किंवा दोन भागांत ती गुंडाळून टाकण्याचा ‘पायंडा’ बहुधा ‘झी मराठी’ने सुरू केला आहे. कारण नुकतीच संपलेली ‘हंड्रेड डेज’ ही मालिकाही त्याचेच उदाहरण आहे.

मालिकेच्या पहिल्याच भागात ‘राणी’ने ‘धनंजय’चा खून केल्याचे कळल्यामुळे त्यात ‘रहस्य’ असे काहीच राहिलेले नव्हते. पण त्यानंतर ‘राणी’ जे काही खून करते ते कसे करते, त्याचा तपास करण्याकरिता ‘अजय ठाकूर’ व त्यांचा चमू नेमके काय करतो ते दाखवायला हवे होते. ‘धनंजय’ला शेवटचे पाहणारा ‘राणी’चा चालक ‘तिवारी’ यालाही पहिल्यांदाच ‘पोलिसी खाक्या’ दाखविला असता तर तेव्हाच ही ‘केस’ उलगडली गेली असती. मालिकेत ‘तावडे’ (अनंत जोग) इन्स्पेक्टरचा झालेला प्रवेश मालिकेला वेगळे वळण देणारा ठरेल असे वाटत होते. ‘वेडय़ाचे सोंग घेऊन पेडगावला’ जाणाऱ्या त्या इन्स्पेक्टरने ‘राणी’च्या सभ्यपणाचा बुरखा कसा फाडला आणि तिच्या विरोधात सर्व पुरावे कसे गोळा केले हे खूप चांगल्या प्रकारे दाखविता आले असते. पण तेथेही निराशा झाली. ‘अजय ठाकूर’ ‘राणी’चे आई-वडील, तिचा पहिला नवरा आणि तिच्या एकूणच पूर्वायुष्याबाबत जो तपास अगदी ‘वेगाने’ शेवटच्या दोन/चार भागांत करताना दाखविला तो अगोदरच्या काही भागापासून करतोय असे दाखविता आले असते. प्रेक्षकांना उत्कंठा होती ती पोलिसी तपासाची. पण छे.. तो तपास शेवटपर्यंत दिसलाच नाही.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही सध्या सुरू असलेली मालिकाही अशीच. मालिकेतून लेखक, निर्माता आणि वाहिनीला नेमके काय सांगायचे आहे? आपला नवरा आपल्यावर प्रेम करतच नाही पण नवरा आणि वडील म्हणूनही त्याचे कर्तव्यही बजावत नाही. लग्नाची बायको, लहान मुलगा असतानाही आपल्या हक्काच्या घरात दुसऱ्या मुलीबरोबर राहतोय. पैशांची व जागेची अडचणही एकवेळ दुय्यम समजली तरी जिथे आपल्याबद्दल नवऱ्याच्या मनातच तिरस्कार आहे, स्वत:चे आई व वडील, मित्र यांनाही तो जुमानत नाही आणि एका मुलीच्या प्रेमात पडून तो आंधळा झाला आहे अशा माणसाला ‘मी माझ्या संसारात परत आणून दाखवेन’ या अट्टहासाला काय म्हणायचे? स्वत:चा झालेला अपमानही ‘ती’ बाई विसरते की तो तिला जाणवतच नाही. कार्यालयात झालेला अपमान तिच्या जिव्हारी लागलाय असे वाटत असतानाच पुढच्याच भागात ती ‘शनया’शी ड्रेसची अदलाबदल करून आपण कसे लहान मुलांसारखे गंमत गंमत करतोय हे दाखवून देते. खरे तर अशा प्रसंगी एखादी बाई खमकेपणा दाखवून, कायदा, स्त्री हक्क संघटना यांची मदत घेऊन नवऱ्याला कशा प्रकारे वठणीवर आणते ते सादर करायला हवे होते. पण ‘मी माझ्या नवऱ्याला परत मिळवेनच’ (तो कसाही चुकीचा वागत असला तरी) असे दाखवून मालिकेला कोणता संदेश द्यायचा आहे ते कळत नाही.

‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेत तर सगळी गंमतच आहे. एकदा का घटस्फोट द्यायचा ठरविल्यानंतर घरातल्यांना न सांगण्यासारखे काय आहे? ‘विक्रांत’ला जर ‘सज्जनाचा पुतळा’च दाखवायचे असेल तर झालेल्या ‘बाळा’चे वडील शोधून काढून ‘मोनिका’ व ज्याच्यापासून ते मूल झाले आहे त्याचे लग्न लावून देऊन त्या बाळाच्या भल्याचा विचार तो का करत नाही? स्वत:च गुन्हा केल्याप्रमाणे त्याला ‘अपराधी’ दाखविण्याचे काय कारण?

‘चुक भूल’ आणि ‘नकटीच्या लग्नाला’ या दोन्ही नव्याने सुरू झालेल्या मालिकाही अशाच चित्रविचित्र संकल्पनांवरच्या आहेत. १०३ वर्षांची वृद्ध आई अजूनही २० हजार रुपयांच्या साडय़ा घ्यायला लावतेय.. मुळात ते पात्र १०३ वर्षांचे वाटत नाही.

‘लग्न’ या गोष्टीकडे इतक्या वरवर पाहणारी मुलगी असू शकते? पण तिच्या पालकांना ‘टॉवर’ मिळणार आहे म्हणून ते आपल्या पोटच्या पोरीचे लग्न कोणत्याही प्रकारच्या मुलाला बळेच जावई करून घेण्यासाठी इतके अधीर होतील?

असो. अजूनही अशा अनेक आचरटपणाच्या गोष्टी सांगता येतील. केवळ ‘झी मराठी’च नव्हे तर इतरही वाहिन्यांवर मालिकांच्या बाबतीत थोडय़ाफार प्रमाणावर हाच आचरटपणा दिसून येतो. एकंदरीत सध्या वाहिन्यांकडे चांगल्या लेखकांचा किंवा कल्पनांचा दुष्काळ आहे असे वाटते किंवा आपण काहीही दिले तरी प्रेक्षक ते पाहाताहेत ना? मग द्या त्यांना काहीही, असा विचार बहुधा ते करत असावेत.

जाता जाता- ‘दिल दोस्ती दोबारा’ ही नवी मालिका ‘झी मराठी’वर सुरू झाली आहे. ही मालिका तरी प्रेक्षकांचा अपेक्षाभंग करणार नाही, अशी आशा बाळगू या..

हा लेख लोकसत्ता-रविवार वृत्तान्त- १९ फेब्रुवारी २०१७ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे)

महापौर निवासस्थानी स्मारक नकोच


ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महापौर निवासस्थानी स्मारक नकोच

'हेरिटेज वास्तू'असलेल्या मुंबई महापौरांच्या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक कशासाठी? मुंबईत अन्यत्र भूखंड घेऊन किंवा शिवसेना भवन येथेही स्मारक उभारता येऊ शकते. बाळासाहेब ठाकरे हे कधीही महापौर निवास येथे राहायला नव्हते. त्यामुळे महापौर निवासातच त्यांचे स्मारक झाले पाहिजे असे नाही.

महापौर निवासस्थान ही हेरिटेज वास्तू (ऐतिहासिक वारसा लाभलेली) आहे. मुंबईचा प्रथम नागरिक अर्थात महापौर यांचे ते अधिकृत निवासस्थान आहे. उद्या अन्य राजकीय पक्षांनी मुंबईतील अशा हेरिटेज वास्तू असलेल्या ठिकाणी दुसऱया कोणाचे स्मारक करावे, अशी मागणी केली तर? त्यामुळे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वास्तूंमध्ये कोणाचेही स्मारक केले जाऊ नये.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या अन्य नेत्यांनी ठरविले तर ते मुंबईत अगदी दादर किंवा वांद्रे येथे स्वतंत्र भूखंड घेऊन त्यावर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारु शकतात. तेवढी आर्थिक ताकद या मंडळींची नक्कीच आहे. तसेच आवाहन केले तर सर्वसामान्य शिवसैनिकही बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी आर्थिक मदत नक्कीच करतील. त्यामुळे पैशांअभावी स्मारक रखडले किंवा उभारता येणे शक्य नाही, असे होणारच नाही. पण त्यासाठी प्रखर राजकीय इच्छाशक्ती मात्र हवी आणि महापौर निवासस्थानीच स्मारक उभारण्याचा हट्ट सोडून देण्याची गरज आहे. महापालिकेत आज अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. समजा पालिकेत कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीची सत्ता अगदी भाजपची सत्ता असती आणि त्यांनी त्यांच्या कोणा नेत्याचे स्मारक महापौर निवासात करावे, अशी मागणी केली असती तर तेव्हा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची काय भूमिका राहिली असती? त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता, राजकारण न करता पठिंबा दिला असता? की तेव्हा त्यांची भूमिका वेगळी राहिली असती?

'मातोश्री' या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे अनेक वर्षे वास्तव्य होते. खरे तर याच ठिकाणी त्यांचे स्मारक होणे अधिक उचित ठरेल असे वाटते. भावनेचाच विचार केला तर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठीचे सगळ्यात पहिले प्राधान्य 'मातोश्री' येथेच असायला पाहिजे. त्यानंतर शिवसेना भवनाचाही विचार व्हावा. नाहीतर स्वतंत्र भूखंड घेऊन तिथे स्मारक उभे केले जावे. पण कोणत्याही परिस्थीतीत केवळ मुंबईतच नव्हे तर कुठेही ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वास्तूत कोणाही राजकीय नेत्याचे स्मारक केले जाऊ नये असे वाटते.

-शेखर जोशी

'प्रतिभा'वंत दिलखुलास पवार

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्र व भारतीय राजकारणातील अनाकलनीय व्यक्तिमत्व म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते. धूर्त, पाताळयंत्री, विश्वासघातकी, मनाचा थांगपत्ता लागू न देणारे वगैरे वगैरे अशा अनेक शब्दांत त्यांच्यावर टिका केली जाते. राजकारणात पवार हे कधी कुणाला कात्रजचा घाट दाखवतील याची कल्पना नसते, तसेच पवार यांचे हो म्हणजे नाही आणि नाही म्हणजे हो असेही त्यांच्याबाबतीत म्हटले जाते. पण पुण्यातील एका कार्यक्रमात पवार यांचे एक वेगळेच रुप उपस्थिताना पाहायला मिळाले. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या राम कदम कलागौरव पुरस्कार सोहोळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी शरद पवार आणि त्यांच्या सौभ्यागवती प्रतिभा पवार यांची प्रकट मुलाखत घेतली आणि या मुलाखतीमधून 'प्रतिभा'वंत पवार आणि राजकारणाबाहेरील 'दिलखुलास'पवार उलगडले गेले. सोमवारी रात्री झी २४ तास वर 'प्रतिभा'वंत पवार या कार्यक्रमात त्याची झलक पाहायला मिळाली. राजकारणाबाहेरील पवार यांचा मिश्कीलपणा, हजरजबाबीपणा, त्यांचे वाचन, अभ्यास या पैलूंचे दर्शन घडले.

त्या मुलाखतीमधील काही किस्से

येड्याचा पाटील ठाण्याचा नगराध्यक्ष झाला रे ही १९६८-६९ मधली गोष्ट आहे. मी विधानसभेवर निवडून गेलो होतो. वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री होते. काही कामानिमित्त मी वसंतराव नाईक यांच्या घरी गेलो होतो. तिथे ग.दि.मा अर्थात ग.दि. माडगूळकर आलेले होते. त्यांनी वसंतराव नाईक यांना सांगितले आमचा मित्र सावळराम पाटील अर्थात कवी पी. सावळाराम हे ठाणे नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभे आहेत आणि कोणत्याही परिस्थीतीत आमचा हा दोस्त निवडून आला पाहिजे. वसंतराव नाईक यांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी तुझ्यावर सोपवली. त्यांना कसेही करुन निवडून आणायचेच. मी म्हटले हे कवी राजकारणाच्या भानगडीत कशाला पडताहेत. पण नाईक साहेबांनी सांगितले आणि मी कामाला लागलो. ठाण्यात दोन दिवस राहिलो. दोन/चार मते कमी पडत होती. माझ्या परीने काय करायचे ते 'उद्योग'केले आणि पी. सावळाराम नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर आम्ही त्यांना घेऊन वसंतराव नाईक यांच्याकडे गेलो. तिथे माडगूळकर यांंनी मला मिठी माररली आणि मला म्हणाले, दोस्ता येड्याचा पाटील ठाण्याचा नगराध्यक्ष केलास रे. (पी. सावळाराम यांचे मूळ गाव येडे निपाणी होते.)

माझ्या बायकोची प्रत्येक साडी मीच आणलेली

माझ्या बायकोने नेसलेली प्रत्येक साडी मी स्वतः खरेदी केलेली आहे. मी जिथे जिथे जाईन तिथून तिला साड्या घेऊन येतो. गेली पन्नास वर्षे मी हे करतोय. मग आठवड्याचे सात दिवस फिरायला मी मोकळा असतो. शरद पवार यांच्या चेहऱयाककडे पाहून त्यांच्या मनात काय चाललाय याचा थांगपत्ता तुम्हाला तरी कधी लागतो का, असा प्रश्न गाडगीळ यांनी प्रतिभाताई यांना विचारला तेव्हा त्या 'नाही' असे उत्तरल्या. त्यावर पवार यांनी आयुष्यात ‘गुगली बॉलरच्या मुलीशी लग्न केले की विकेट जातेच' तसेच आत्ता घडले. असे प्रत्युत्तर दिले.

आवडत्या गायिका किशोरी आणि गायक पं. भीमसेन जोशी

‘आवडते गायक-गायिका कोण?’या प्रश्नावर पवार म्हणाले, माझी आवडती गायिका किशोरी (आमोणकर) आहे. आणि गायक अर्थातच भीमसेन (जोशी), असे उत्तर दिले.

चरित्र व आत्मचरित्र वाचण्यात जास्त गंमत

चरित्र व आत्मचरित्रात्मक पुस्तके वाचायला जास्त मला आवडते.त्यातून ती माणसे कळायला व जाणून घ्यायला मदत होते.

विल्सन आणि यशवंतराव यांची मैत्री

लंडनच्या पार्लमेंटमधील मी गेलो होतो. एक वयस्कर गृहस्थ बसले होते. त्यांना कुठेतरी पाहिल्यासारखे वाटत होते. मी शेजारच्या माणसाला विचारले ते कोण आहेत, त्याने सांगितले की ते इंग्लंडचे माजी पंतप्रधान विल्सन होते. त्यांच्यापाशी मी गेलो. माझी ओळख करुन दिली. कठुन आलात ते त्यांनी विचारले तेव्हा मी महाराष्ट्रतून आलो असे सांगितल्यावर ते म्हणाले आमचे मित्र वाय.बी. चव्हाण कसे आहेत. तुम्ही एकमेकांना ओळखता असे दिसताय. ते म्हणाले आम्ही दोघेही परराष्ट्र मंत्री होतो. 'युनो'च्या अधिवेशनाला आम्ही न्यूयॉर्कला बरोबर असायचो. काम झाले की दुपारी मी ग्रंथालयात येऊन बसायचो. माझ्याबरोबर ग्रंथालयात आणखी एक व्यक्ती यायची आणि ती म्हणजे वाय. बी. चव्हाण. माझ्यासारखीच त्यांनाही पुस्तके वाचण्याची आवड होती. जगात प्रकाशित झालेल्या कोणत्याही चांगल्या इंग्रजी पुस्तकावर आमची चर्चा व्हायची तेव्हा चव्हाण मला त्या पुस्तकाचा थोडक्यात परिचय करुन द्यायचे.

http://zeenews.india.com/marathi/news/video/prabhavant-pawar-24th-february-2017/354381

पवार यांच्या मुलाखतीची लिंक

दफन नको दहनच हवे


दफन नको दहनच हवे

खासदार साक्षी महाराज हे त्यांच्या वक्तव्याबाबत नेहमीच प्रसारमाध्यमातून चर्चेत असतात. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद-विवाद व चर्चा घडत असते. भारतात कोणाचाही अंत्यसंस्कार दहन पद्धतीनेच केला जावा. हिंदू धर्मात ज्यांनी संन्यास घेतला आहे अशा साधूंचे दहन केले जात नाही तर त्यांची समाधी बांधली जाते. मात्र साक्षी महाराज यांनी मुसलमानांसह साधूंचेही दहन करावे, असे प्रतिपादन केले आहे. या देशात सुमारे वीस कोटी मुसलमान आहेत. सर्वांसाठी कबर/ दफनभूमी बनवायची म्हटली तर जागा कशी पुरणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. खरे तर साक्षी महाराज यांनी अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाला वाचा फोडली आहे.

हेच विधान साक्षी महाराज यांच्याऐवजी एखाद्या पुरोगामी किंवा समाजवादी, धर्मनिरपेक्ष व्यक्तीने केले असते तर कदाचित त्यावर वाद झालाही नसता. मृत व्यक्तीचे दफन न करता दहन करण्याची हिंदू धर्मात पद्धत आहे. (अर्थात हिंदू धर्मातील काही पंथांमध्ये दहनाऐवजी दफनाचीही पद्धत आहे) मृत व्यक्तीचे दहन करणे ही चांगली व योग्य पद्धत असल्याचे आता समोर येत आहे. पारशी समाजातील काही मृत व्यक्तींचेही दहन केले गेले असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमातूनच पुढे आल्या होत्या. त्यामुळे भारतातील हिंदूंसह इतर अन्य धर्मियांनीही दफनाऐवजी दहन करायला सुरुवात करावी, हे साक्षी महाराज यांनी केलेले विधान योग्यच आहे. काळानुरुप त्यात बदल करणे मात्र अत्यंत गरजेचे आहे. ते म्हणजे दहनासाठी लाकडांचा वापर अजिबात करु नये. ती मानसिकता आपण सर्वानीच बदलण्याची गरज आहे. लाकडाऐवजी मृत व्यक्तीचे दहन हे विद्युत दाहिनीत किंवा डिझेल, गॅस शव दाहिनीतच केले जावे. आज बहतेक स्मशानभूमीत विद्युत शवदाहिनी, डिझेल/गॅस शवदाहिनी बसविण्यात आल्या आहेत. काही जणांकडून त्याचा वापरही केला जात आहे. मात्र ज्या प्रमाणात लाकडांऐवजी याचा वापर झाला पाहिजे तेवढा तो होत नाही, असे दिसते.

हिंदू धर्मात जे सोळा संस्कार सांगितले आहे (यात जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या विविध विधिंचा समावेश आहे) त्यात शेवटचा संस्कार हा अंत्येष्टी संस्कार आहे. हिंदू धर्मातील काही पंथीयांमध्येही दहनाऐवजी दफन केले जाते. अंत्येष्टी संस्कारानुसार मृत व्यक्तीचे लाकडाच्या चितेवर दहन करावयास सांगितले आहे. हिंदू धर्मातील सती रुढी आणि अन्य अनिष्ट प्रथा/परंपरा आपण बंद केल्या. तसेच बदलत्या काळानुसार यातही बदल होणे खरोखरच गरजेचे आहे. विद्युत दाहिनी किंवा गॅस/डिझेल शवदाहिनीत दहन करताना जे काही धार्मिक/अंत्यविधिचे संस्कार करता येतात.त्यामुळे चितेवरच दहन केले पाहिजे हा अट्टहास आता सोडला पाहिजे. पर्यावरणाच्या दृष्टीनेही विचार केला तर चितेवर दहन करण्याएेवजी विद्युत दाहिनी किंवा डिझेल/गॅस शवदाहिनीतच अंत्यसंस्कार करणे ही काळाची गरज आहे. सुजाण व सुशिक्षित लोकांकडून त्याचा अधिक मोठ्या प्रमाणात वापर झाला पाहिजे.

पारसी समाजातील अनेकांना आता, आपल्या मृत्यूनंतर पारसी धर्मपद्धतीप्रमाणे आपला अंत्यविधी होऊ नये, असे वाटते. हे वाटणाऱ्यांची संख्या मुंबईत अधिक आहे, याला अर्थातच महत्त्व आहे कारण मुळात अगदीच अल्पसंख्य असले तरी पारसी लोकांची या महानगरातील संख्या केवळ राज्यातील अन्य शहरांच्या नव्हे तर देशातील पारसी लोकसंख्येच्या मानाने लक्षणीय आहे. धार्मिक रीतीनुसार ‘डूंगरवाडी’मध्ये, म्हणजे टेकडीवरील विहीरवजा बांधीव जागेत पारसी मृतदेह ठेवले जातात आणि इराणी संस्कृतीत मातास्वरूप असलेली गिधाडे तसेच सूर्य यांमुळे त्या कलेवरांची विल्हेवाट पुढील काही काळात लागत राहते. पण प्रश्न आहे गिधाडांच्या घटत्या संख्येचा आणि झपाटय़ाने वाढणाऱ्या शहरांत अशी विल्हेवाट लागणे शक्य होईल काय, याचाही. यातून व्यवहार्य आणि मनाला पटणारा मार्ग म्हणून ‘माझ्या मृत्यूनंतर माझे दहनच करा’ असे इच्छापत्र अनेक पारसी जाणत्यांनी करून ठेवले. हे एक प्रकारे, पारसी धर्मापुढले मोठे आव्हानच होते. माझे दहनच करा, अशी इच्छा ज्यांनी लिहून ठेवल्यामुळे पूर्ण करावी लागली, अशांमध्ये ३० वर्षांपूर्वी दिवंगत झालेले दाराब टाटा (जेआरडींचे बंधू) जसे होते, तसेच मुंबईच्या कलादालन विश्वाची पायाभरणी करणारे केकू गांधीदेखील होते. अशा दहन-इच्छापत्रांची संख्या वाढत असतानाच गिधाडे कमी होतच होती. मग काही पारसी धर्मगुरूंनीच मुंबई महापालिकेकडून विद्युतदाहिनी आणि तिला जोडून पारसी प्रार्थनालय अशा सुविधेची अनुमती मिळवली.भारतभरात अवघ्या ६९ हजारांच्या आसपास असलेल्या पारसी समाजातून एकटय़ा मुंबईतल्या विद्युतदाहिनीत २०१६ या वर्षात आठ महिन्यांत सुमारे ८० दहनविधी झाले. धर्मसंस्कार बुडाला तरी चालेल, सुधारणा हवीच अशी धमक पारसी समाजाने दाखविली तशी ती हिंदू धर्मियांसह अन्य धर्मियानीही दाखविण्याची आवश्यकता आहे.

मंगळवार, २१ जून, २०१६

शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग आवश्यक


योग ही प्राचीन भारतीय पद्धती असून प्रत्येक माणसाच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी योग आवश्यक आहे, असे कैवल्यधाम या संस्थेचे कार्यकारी विश्वस्त सुबोध तिवारी यांनी सांगितले.

आपल्या प्रत्येकाच्या जीवनात या तीन गोष्टींना महत्व असून योगाच्या माध्यमातून या तीनही गोष्टींचा समन्वय राखला जातो. सध्याच्या बदलत्या आणि धावपळीच्या जीवनशैलीत प्रत्येकालाच योगाची गरज आहे. योगातील योगासने, प्राणायाम, कपालभाती, भस्त्रिका, व अन्य कृतींमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगल्या प्रकारे टिकून राहाते. योगाच्या जोडीला आपल्याकडे सुयोग्य आहाराची जोड दिलेली आहे. आहार हा सात्विक व मर्यादित असावा. यासाठी काही नियम केले आहेत. धावपळीचे जीवन, जीवघेणी स्पर्धा, ताण व तणाव, जेवण आणि खाण्याच्या बदललेल्या वेळा व सवयी, पोट भरण्यासाठी खाल्ले जाणारे फास्ट फूड, मसालेदार, तळलेले पदार्थ याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावरही होत असतो. यातून शारीरिक व्याधी जडतात. या सगळ्यावर आपल्या ऋषीमुनींनी योगाच्या माध्यमातून उपाय दिला आहे. कितीही धावपळ असली तरी प्रत्येकाने किमान अर्धा तास योग करण्यासाठी द्यावा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करु नका. मर्यादा पाळा आणि योगाला आपली जीवनशैली बनवा, असेही तिवारी यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात कशी झाली याविषयी माहिती देताना तिवारी म्हणाले, नऊ वर्षांपूर्वी पोर्तुगाल येथे २१ जून या दिवशी योग दिन साजरा करणयात आला होता. योगाचे महत्व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व योगाच्या प्रसारासााठी एक दिवस निश्चित करुन तो दिवस आंतरराष्टीय पातळीवर साजरा केला जावा, यासाठी काही योग संस्थांनी एकत्र येऊन प्रयत्न सुरु केले होते. संंयुक्त राष्ट्रसंघाकडे एक निवेदनही देण्यात आले होते. २७ सप्टेंबर २०१४ या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्यांसमोर भाषण करताना योगाची प्राचीन भारतीय परंपरा, योगाचे महत्व सांगितले होते. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन साजरा करण्याची सूचना केली होती. ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रतिनिधी सभेत या विषयावर मतदान घेण्यात आले. नव्वद टक्क्यांहून अधिक मतांनी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाकडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.

भारतीय सस्कृतीत योगाला हजारो वर्षांची परंपरा आहे. पतंजली ऋषींनी १९५ योगसुत्रे लिहिली असून योगाची व्याख्याही केली आहे. त्यामुळे पतंजली ऋषींना योगाचे मुख्य प्रवर्तक किंवा संस्थापक म्हणता येईल. पुढे महर्षी घेरंंड, वासिष्ठ यांनीही त्यात आपले योगदान दिले. योगविषयक प्राचीन संस्कृत ग्रंथही आपल्याकडे आहेत. अर्थात योग म्हणजे केवळ आणि केवळ आसने नाहीत. पतंजली ऋषींनी सांगितलेल्या योग सुत्रात फक्त तीन सुत्रे आसनांबाबत आहेत. नाथ संप्रदायाने योगासनांना विशेष महत्व दिले. आजही सर्वसामान्य लोकांमध्ये योग म्हटले की फक्त योगासने असा एक गैरसमज आहे.स्वामी कैवल्यानंद यांनी १९१७ मध्ये अमळनेर येथे कैवल्यधामची स्थापना केली. त्यानंतर १९२४ मध्ये लोणावळा येथे कैवल्यधाम सुरु झाले. योग आणि विज्ञान यांची सांगड स्वामी कैवल्यानंद यांनी घातली. १९२६ मध्ये त्यानी योग मिमांसा हे माासिक सुरु केले. संस्थेतर्फे योगविषयक २०० संशोधन प्रबंध आत्तापर्यंत सादर झाले आहेत. योग हा वैद्यकशास्त्रालाही कसा पुरक आहे ते पटवून देण्याची सुरुवात स्वामी कैवल्यानंद यांनी केल्याचेही तिवारी यांनी सांगितले.

महाराष्ट्रात विविध संस्थांककडूनन योग प्रसाराचे, योग शिक्षक तयार करण्याचे काम सुरु आहे. या संस्थांमधून दरवर्षी २०० ते ३०० योग शिक्षक तयार होत आहेत. या सर्व योगशिक्षण संस्थांचा आत्तापर्यंत अभ्यासक्रम वेगवेगळा होता. आता केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार सर्वांचा समान अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. योग परीक्षांमध्येही समानता आणण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयातर्फे योग विषयात सकारात्मक पावले उचलली गेली आहेत. योग या विषयात भविष्यात खूप चांगली संधी आहे. देशभरातील सीबीएसईच्या २७ हजार शाळांमधून आता योगशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येत योग शिक्षकांची गरज लागणार आहे. योगतज्ज्ञ आणि योग शिक्षकांना परदेशातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शळा, महाविद्यालये, कॉपोरेट क्षेत्र, रिसार्ट, स्पा येथेही योग शिक्षक लागतात. करिअर म्हणून यात चांगली संधी असल्याचेही तिवारी म्हणाले.