सोमवार, ३१ मार्च, २०२५
मुंबईकरांसाठी उन्नत मार्गावरील निसर्ग भ्रमंती
रविवार, ३० मार्च, २०२५
सामूहिक हनुमान चालीसा पठण
शनिवार, २९ मार्च, २०२५
स्वयंसेवक,प्रचारक,मुख्यमंत्री ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची संघ मुख्यालयाला भेट!
उघड्यावर कचरा जाळला तर मुंबईत एक हजार रुपये दंड
शुक्रवार, २८ मार्च, २०२५
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी आता दरमहा ५० हजार रुपये मिळणार
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग
भारतीय किसान संघाचे 'भाकरी ठेचा' खाऊन निषेध आंदोलन!
गुरुवार, २७ मार्च, २०२५
नारायण सुर्वे जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यात कामगार साहित्याचा जागर होणार
फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण!
![]() |
| गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक |
फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण!
- शैलेंद्र रिसबुड, प्रल्हाद परशुराम म्हात्रे यांचा संयुक्त उपक्रम
शेखर जोशी
डोंबिवली, दि. २७ मार्च
गेल्या काही वर्षांपासून सर्वपक्षीय राजकारण्यांनी सण, उत्सव, वाढदिवसाच्या निमित्ताने 'चेहरे फलक' लावून शहर विद्रुप करण्यात मोठा हातभार लावला आहे. त्यामुळे फलक/बॅनर दिसले की सर्वसामान्य व सुजाण नागरिकांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. या पाश्र्वभूमीवर लोकमान्य टिळकप्रेमी व त्यांच्या चरित्राचे अभ्यासक शैलेंद्र रिसबूड आणि सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते प्रल्हाद परशुराम म्हात्रे यांनी गेल्या सात वर्षांपासून राबविलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे.
भारतीय असंतोषाचे जनक आणि स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे कार्य/विचार मोठ्या फलकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. या निमित्ताने लोकमान्य टिळकांचे स्मरणही केले जात आहे. विशेष कौतुकास्पद बाब म्हणजे या फलकावर फक्त आणि फक्त लोकमान्य टिळक यांचेच छायाचित्र प्रदर्शित केले जाते. रिसबूड आणि म्हात्रे यांची छायाचित्रे या फलकावर नसतात. तसेच रस्ता किंवा चौकांचे नामफलक न झाकता हा फलक उभारण्यात येत आहे. आणि या दोघांनीही ही गोष्ट आजवर कटाक्षाने जपली आहे. संयोजक शैलेंद्र रिसबुड व सौजन्य प्रल्हाद परशुराम म्हात्रे अशी एक ओळ या फलकाच्या खाली लिहिण्यात येते.
![]() |
| लोकमान्य टिळक यांच्या शताब्दी पुण्यस्मरणाच्या निमित्ताने लावण्यात आलेला फलक |
मध्य रेल्वेवरील कोपर रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागातील मोकळ्या जागेत हा फलक लावण्यात येतो. लोकमान्य टिळक यांची जयंती, पुण्यतिथी, गीता रहस्य ग्रंथ जयंती ( लोकमान्य टिळक यांनी लिहिलेला हा एकमेव ग्रंथ आहे की या ग्रंथाचा जयंती उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी येत्या ३० मार्च रोजी गीतारहस्य जयंती असून त्या निमित्ताने कोपर रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात हा फलक उभारण्यात आला आहे.
![]() |
| लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या 'केसरी'चा वर्धापनदिन |
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने लावण्यात आलेला फलक
कल्याण, कर्जत आणि कसा-याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कल्याणच्या दिशेने येताना अप आणि डाऊन मार्गावर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांचे विचार पोहोचविण्यात येत आहेत.
शेखर जोशी
२७ मार्च २०२५
नेपाळ येथील जागतिक युवा महोत्सवात डोंबिवलीचे मिहिर देसाई विशेष निमंत्रित
नेपाळ येथील जागतिक युवा महोत्सवात
डोंबिवलीचे मिहिर देसाई विशेष निमंत्रित
- तीन वर्षांपासून भरडधान्य प्रक्रिया उद्योगात कार्यरत
- ७५ हून अधिक देशांतील युवा नवउद्योजकांचा सहभाग
नेपाळ येथे २७ ते ३१ मार्च या कालावधीत होणाऱ्या
जागतिक युवा महोत्सवासाठी सहभागी नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष अतिथी म्हणून डोंबिवलीतील नवउद्योजक (नवउद्यमी-स्टार्टअप) मिहिर मुकुंद देसाई यांना निमंत्रित करण्यात आले आहे. देसाई गेल्या तीन वर्षांपासून भरडधान्य प्रक्रिया उद्योग व्यवसायात काम करत आहेत.
नेपाळमधील कावरेपल्लानचोक येथे होणाऱ्या जागतिक युवा महोत्सवासाठी ७५ हून अधिक देशांतील प्रतिभाशाली युवा नवउद्योजक, नवउद्यमी (स्टार्टअप), युवा संशोधक, विद्यार्थी, कलाकार, युवा मार्गदर्शक सहभागी होणार आहेत.
या जागतिक युवा महोत्सवातील ‘कृषी आणि अन्न सुरक्षा’ विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी जागतिक युवा परिषदेचे अध्यक्ष आणि जिल्हा समन्वयक समितीचे प्रमुख दीपक कुमार गौतम यांनी मिहिर देसाई यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केले आहे
देसाई आठ वर्षापूर्वी रशियातील सोची येथे पार पडलेल्या जागतिक युवा आणि विद्यार्थी महोत्सवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भारताचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले होते.
मिहिर देसाई भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले देसाई भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद उर्फ भाई देसाई यांचे चिरंजीव आहेत.
बुधवार, २६ मार्च, २०२५
'आपले सरकार सेवा केंद्रां'ची संख्या वाढवणार
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार
- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा*
मुंबई, दि. २६ मार्च
राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ रितीने उपलब्ध करून देण्यासाठी 'आपले सरकार सेवा केंद्रे' यांचे जाळे विस्तारीत करण्यात येणार असून सेवा केंद्राची संख्या वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी बुधवारी विधानसभेत दिली.
माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सुधारित निर्णयानुसार, लोकसंख्या आणि प्रशासनाच्या गरजेनुसार सेवा केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. सुधारित निकषानुसार ग्रामपंचायत स्तरावर ५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी १ ऐवजी २ सेवा केंद्रे तर पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी २ ऐवजी ४ सेवा केंद्रे देण्यात देणार आहेत. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात १२ हजार ५०० लोकसंख्येसाठी २ केंद्रे तर इतर महापालिका व नगरपरिषद क्षेत्रांमध्ये दहा हजार लोकसंख्येसाठी एक ऐवजी दोन सेवा केंद्रे देण्यात येणार असल्याचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी जाहीर केले.
सध्या आपले सरकार सेवा केंद्रांवरील सेवा शुल्क २० रुपये असून २००८ पासून या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती. वाढती महागाई आणि सेवा केंद्र चालकांच्या मागणीच्या अनुषंगाने सेवा शुल्क आता ५० रुपये करण्यात येणार आहेत. नागरिकांना अधिक सुलभ सेवा मिळण्यासाठी घरपोच वितरण सेवाही सुरू करण्यात येणार आहे. घरपोच भेटीसाठी सेवा शुल्क १००रुपये प्रति नोंदणी (कर वगळून), महाआयटी सेवा दर २० टक्के, सेवा केंद्र चालक सेवा दर ८० टक्के, याशिवाय प्रति अर्ज अतिरिक्त शुल्क ५० रुपये असणार आहे.
श्री विठ्ठल रुख्माई संस्थान रेवसाची जमीन पुन्हा देवस्थानच्या नावावर होणार
श्री विठ्ठल रुख्माई संस्थान रेवसाची जमीन
पुन्हा देवस्थानच्या नावावर होणार
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पुढाकाराने मिळाला ऐतिहासिक विजय
श्री विठ्ठल रुख्माई संस्थान, रेवसा (ता. जि. अमरावती) यांच्या मालकीची तब्बल ३० कोटी रुपयांची शेतजमीन अखेर देवस्थानच्या नावावर पुन्हा नोंदवली जाणार आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे झालेल्या पत्रकार परिषदेत मंदिर महासंघाचे राज्य पदाधिकारी अनुप प्रमोद जयस्वाल यांनी ही माहिती दिली.
महासंघाचे जिल्हा संयोजक विनीत पाखोडे, हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक निलेश टवलारे, अधिवक्ता अभिजीत बजाज संस्थानचे विश्वस्त राजेंद्र वाकोडे, हरीभाऊ वाकोडे, हरिदास मानवटकर, समितीचे सचिन वैद्य उपस्थित होते.
मौजा रेवसा येथील गट क्र. १६५, क्षेत्रफळ ३ हेक्टर ६९ आर ही शेतजमीन श्री विठ्ठल रुख्माई संस्थानच्या मालकीची आहे. मात्र, ही जमीन हडप करण्याच्या उद्देशाने प्रदीप त्र्यंबकराव वाकोडे व प्रवीण त्र्यंबकराव वाकोडे यांनी तत्कालीन तहसीलदार संतोष काकडे यांच्यासमोर जमिनीच्या ७/१३ उताऱ्यावरील संस्थानचे नाव कमी करून स्वतःच्या नावावर नोंद करण्यासाठी अर्ज सादर केला.
९ मे २०२२ रोजी तहसीलदार काकडे यांनी महसूल कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करून ७/१२ उताऱ्यातून संस्थानचे नाव कमी केले आणि वाकोडे बंधूंच्या नावावर बेकायदेशीर नोंद केली. या निर्णयाविरोधात राजेंद्र पद्माकर वाकोडे यांनी उपविभागीय अधिकारी अमरावती यांच्यासमोर अपील दाखल केले. अपील प्रकरणात वाकोडे बंधू आणि महसूल कर्मचाऱ्यांचे संगनमत उघड झाले.
तहसिलदार काकडे यांनी पारीत केलेला आदेश हा आर्थिक लाभ घेण्याच्या दृष्टीनेच करुन घेतल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याचा निष्कर्ष भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी रिचर्ड यंथन यांनी नोंदविला आणि १ ऑगस्ट २०२३ रोजी तहसीलदार काकडे यांचा आदेश रद्द केला. उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशावरील अपिल प्रकरणात अतिरिक्त जिल्हाधिकारी अमरावती यांनी प्रकरणाचा अधिक सखोल तपास करून पुन्हा सुनावणीचे आदेश दिले असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
मंदिर महासंघाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देवस्थानच्या हितासाठी तहसीलदारांना निवेदन दिले. या पाठपुराव्याला यश मिळाले आणि तहसीलदार विजय लोखंडे यांनी २० मार्च २०१५ संस्थानच्या बाजूने अंतिम निर्णय दिला.
मंगळवार, २५ मार्च, २०२५
नवाजुद्दीन सिद्दीकी व ‘बिग कॅश’वर कारवाई होणार
नवाजुद्दीन सिद्दीकी व ‘बिग कॅश’वर कारवाई होणार
- पोलिसांच्या गणवेशाचा अवमान करणारी जाहिरात हटवली
मुंबई, दि. २५ मार्च
हिंदू जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांच्या गणवेशात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकींना दाखवणारी आणि जनतेला जुगार खेळण्यास प्रवृत्त करणारी वादग्रस्त ‘बिग कॅश पोकर’ जाहिरात सोशल मीडियावरून अखेर हटविण्यात आली आहे. मात्र दोषींवर कारवाई अद्याप झालेली नाही.
जाहिरात हटवण्यात आली असली, तरी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि ‘बिग कॅश’चे मालक अंकुर सिंग यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. सुराज्य अभियानाने या प्रकरणात वेळोवेळी फेसबुक, यू-ट्यूब आणि ट्विटर (X) यांच्या तक्रार निवारण अधिकार्यांकडे तक्रारी केल्या होत्या; परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. अखेरीस तक्रार अपील समिती (GAC) कडे तक्रार केली आणि त्यानंतरच ही जाहिरात हटवण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्ता अमिता सचदेवा यांच्या कायदेशीर हस्तक्षेपामुळे हे यश मिळाले आहे.
सुराज्य अभियानाच्या वतीने सतीश सोनार, रवी नलावडे यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेतली आणि ही जाहिरात पोलीस दलाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणारी असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. गृहराज्यमंत्री कदम यांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांना तपास करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
जे पोलीस खाते जुगार खेळणार्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करते, त्याच पोलिसांच्या वेशात अशी जाहिरात केली जाते, हे पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे आणि व्यावसायिक फायद्यासाठी समाजाची दिशाभूल करणारे आहे. यात ‘बडे काम का खेल’ असे म्हणून ‘जुगार’ हा गुन्हे उकलण्यासाठी आवश्यक कौशल्य असल्याचे पोलीस वेशातील नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यांकडून प्रचारित करण्यात आले होते, तसेच यात भगवद्गीतेचाही अवमान करण्यात आला होता. त्यामुळे सुराज्य अभियानाने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि ‘बिग कॅश पोकर’ आस्थापनावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची, तसेच भविष्यात पोलीस दलाच्या प्रतिमेचा गैरवापर थांबवण्यासाठी कठोर धोरण आखण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
डॉ. होमी भाभा विद्यापीठाचा पदवीदान समारंभ
राज्यपालांचा उपस्थितीत डॉ. होमी भाभा
विद्यापीठाचा पदवीदान समारंभ साजरा
राज्यपाल तथा कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा चौथा वार्षिक दीक्षांत समारंभ मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात पार पडला.
इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, नवी दिल्लीचे सदस्य सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सच्चिदानंद जोशी यांचे यावेळी दीक्षांत भाषण झाले.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते पीएचडी, पदव्युत्तर पदवी तसेच पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आली तर ६ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.
डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राजनीश कामत, कुलसचिव प्रा. विलास पाध्ये, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक नानासाहेब फटांगरे, तसेच विविध विभागांचे अधिष्ठाता. प्राध्यापक, स्नातक विद्यार्थी तसेच निमंत्रित यावेळी उपस्थित होते. प्रारंभी कुलगुरू प्रा. कामत यांनी विद्यापीठाचा मागील वर्षाचा अहवाल सादर केला.
दोन डझनहून अधिक छायाचित्रांचा चेहरे फलक
![]() |
| तब्बल दोन डझनहून अधिक नेत्यांची छायाचित्रे असलेला हाच तो चेहरे फलक |
दोन डझनहून अधिक छायाचित्रांचा 'चेहरे फलक' लावून
भारतीय जनता पक्ष डोंबिवलीतर्फे गुढीपाडवा शुभेच्छा
नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता, विष्णुनगर डोंबिवली पश्चिम, पंजाब नॅशनल बँक चौक येथे कमान उभारून त्यावर सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा (डोंबिवली) गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणारा फलक लागला आहे. सत्ताधारी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तब्बल दोन डझनहून अधिक नेत्यांच्या छायाचित्रांची हा फलक पूर्ण भरलेला आहे.
![]() |
| छायाचित्रात नेताजी सुभाषचंद्र बोस नामफलक दिसत आहे. तर चेहरे फलकाने महर्षी कर्वे रस्ता नामफलक झाकला गेला आहे |
![]() |
| कमानीवरील चेहरे फलक लावण्याआधी नेताजी सुभाषचंद्र बोस व महर्षी कर्वे रस्ता नामफलक असे स्पष्ट व ठळकपणे दिसत होते. |
कमानीवरील भरगच्च चेहरे फलकामुळे सुदैवाने चौकातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा नामफलक वाचला आहे. मात्र ते भाग्य महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या वाट्याला आले नाही. या चेहरे फलकाने महर्षी कर्वे नामफलक पुन्हा एकदा झाकला गेला आहे.
![]() |
| भाजपचे आमदार व प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण व अन्य दोन डझनहून अधिक नेत्यांची छायाचित्रे असलेला हाच तो चेहरे फलक |
फलकावर भाजपचे आमदार व भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मोठे छायाचित्र असून फलकावर डाव्या बाजूला चव्हाण यांच्यासह आठ जणांची (यात अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, मोदी, शहा, नड्डा आणि फडणवीस) छायाचित्रे आहेत. तर उजवीकडे वाजपेयी, ठाकरे, दिघे यांची छायाचित्रे कायम ठेवून त्याखाली एकनाथ शिंदे, अजित पवार, श्रीकांत शिंदे, राजेश मोरे यांची छायाचित्रे आहेत. इकडेही रवींद्र चव्हाण यांचे छायाचित्र आहेच. या फलकाच्या अगदी वरच्या बाजूला छोट्या छोट्या गोलात बसवलेली तब्बल दोन डझनहून अधिक नेत्यांची (एकूण ३१) छायाचित्रे आहेत.
शेखर जोशी
२५ मार्च २०२५
भारताचा 'गोटी सोडा' आता जागतिक बाजारपेठेत!
भारताचा 'गोटी सोडा' आता जागतिक बाजारपेठेत!
भारतातील 'गोटी सोडा' हे शितपेय आता लवकरच 'गोटी पॉप सोडा' या नावाने जागतिक बाजारपेठेत दाखल झाला आहे.
केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने पारंपरिक गोटी सोड्याला नवे नाव आणि रूप देत जागतिक पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला आहे.
https://youtu.be/WhioUg0tXcU
अमेरिका, ब्रिटन, युरोप आणि आखाती देशांत गोटी सोडा उत्पादन निर्यातीची चाचणीही यशस्वी झाली असून प्राधिकरणाने 'फेअर एक्सपोर्ट्स इंडिया' सोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. त्यामुळे आखाती प्रदेशातील सर्वात मोठ्या किरकोळ व्यापार साखळींपैकी एक असलेल्या 'लुलू हायपर मार्केट'मध्ये 'गोटी पॉप सोडा' नावाने याचे वितरण होणार आहे.
https://youtu.be/WhioUg0tXcU
लंडन येथे १७ ते १९ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 'आंतरराष्ट्रीय अन्न आणि पेय महोत्सवात' कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने 'गोटीसोडा' सादर केला होता.
https://youtu.be/WhioUg0tXcU
'गोटी सोडा' फोडल्यानंतर येणारा आवाज आणि बुडबुडे हे याचे खास वेगळेपण आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर 'गोटी सोडा' सादर करताना त्याचे हे वैशिष्ठ्य कायम ठेवण्यात आले आहे. बहुराष्ट्रीय शीतपेय कंपन्यांच्या वर्चस्वामुळे बाजारपेठेतून 'गोटी सोडा' हद्दपार झाला होता. देशी शीतपेय उत्पादनाला प्रोत्साहन आणि त्याची निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. आणि त्या प्रयत्नांमधून 'गोटी सोडा' आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दाखल झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 'गोटी सोडा' नव्या व आधुनिक वेष्टनासह सादर झाला आहे.
शेखर जोशी
सोमवार, २४ मार्च, २०२५
वाल्मिकी रामायणातील 'लोकाभिराम' कथा सादरीकरण
प्रकाशक व निरुपणकार दिलीप महाजन सांगणार
वाल्मिकी रामायणातील 'लोकाभिराम' कथा!
चैत्र महिन्यातील राम नवरात्राच्या निमित्ताने प्रकाशक व निरुपणकार दिलीप महाजन कल्याण आणि डोंबिवलीत वाल्मिकी रामायणातील 'लोकाभिराम' कथा उलगडणार आहेत.
येत्या ३१ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत पारनाका, कल्याण पश्चिम येथील त्रिविक्रम देवस्थान येथे संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत महाजन लोकाभिराम कथा सांगणार आहेत. श्री त्रिविक्रम देवस्थानने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
तर ३ ते ५ एप्रिल दरम्यान ज्ञानेश्वर मंगल कार्यालय, महात्मा फुले रस्ता, डोंबिवली पश्चिम येथे संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत महाजन यांच्या लोकाभिराम कथा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कल्याण आणि डोंबिवलीतील कार्यक्रम सर्वांसाठी खुले आहेत.
हलाल प्रमाणित उत्पादने-महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी
खाद्यपदार्थांच्या संदर्भातील कायद्यानुसार ‘भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI) या शासकीय संस्थेला खाद्यपदार्थांचे मानके ठरवण्याचा व प्रमाणपत्र देण्याचा अधिकार देण्यात आला आहे. असे असतानही ‘हलाल प्रमाणपत्र’ ही समांतर प्रणाली उभी करण्यात आली आहे. यातून मिळणारा पैसा पैसा लष्कर-ए-तोयबा, इंडियन मुजाहिदीन, इस्लामिक स्टेट आदी आतंकवादी संघटनांच्या सुमारे ७०० आरोपींना कायदेशीर साहाय्य करण्यासाठी वापरला जात असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
महाराष्ट्रासह देशभरात ‘हलाल इंडिया’, ‘हलाल सर्टिफिकेशन सर्व्हिसेस इंडिया’, ‘जमियत उलेमा-ए-हिंद’, ‘जमियत उलेमा-ए-महाराष्ट्र’ आदी अनेक संस्थांकडून बेकायदेशीपणे हलाल प्रमाणपत्रांचे वाटप करून कोट्यवधी रुपये गोळा करण्यात येत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशात त्यावर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही खाजगी संस्थांना प्रमाणपत्र वाटप करून पैसे गोळा करण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट केले आहे, अशी माहिती निवेदनात देण्यात आली आहे.
सुभाषचंद्र बोस, महर्षी कर्वे नामफलक पुन्हा एकदा झाकला जाणार
![]() |
| नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता, विष्णुनगर डोंबिवली पश्चिम पंजाब नॅशनल बँक चौक येथील नामफलक |
सुभाषचंद्र बोस, महर्षी कर्वे नामफलक
पुन्हा एकदा झाकला जाणार
शेखर जोशी
नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता, विष्णुनगर डोंबिवली पश्चिम पंजाब नॅशनल बँक चौक येथील नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता व महर्षी कर्वे रस्ता नामफलक पुन्हा एकदा झाकला जाणार आहे. दोन दिवसांपूर्वी येथे बांबूची कमान बांधण्यात आली असून बहुदा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणारा फलक तिथे लावण्यात येणार असावा. कमानी उभारण्यात आल्या असत्या तरी अद्याप फलक लावले गेले नसल्याने कोणत्या बड्या असामीचा चेहरे फलक या कमानीवर लावला जाणार आहे? हे गुलदस्त्यात आहे.
![]() |
| नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता विष्णुनगर डोंबिवली पश्चिम पंजाब नॅशनल बँक चौक येथे उभारण्यात आलेली कमान |
कमान मोठी असल्याने ज्यांचा फलक लावण्यात येईल ती मंडळीही 'मोठी' असामी असण्याची शक्यता आहे. या मोठ्या असामी म्हणजे सत्ताधारी पक्षाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे असतील की शआमदार रवींद्र चव्हाण असतील याची उत्सुकता आहे. असामी कोणीही असोत पण या चेहरे/शुभेच्छा फलकबाजीमुळे आता पुन्हा एकदा सुभाषचंद्र बोस व महर्षी कर्वे नामफलक झाकला जाणार हे नक्की.
डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागात रस्ते, चौक येथे अनेक ठिकाणी अशा कमानी उभारण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी या कमानी वाहतुकीसाठी अडथळा ठरतात. पण सर्वपक्षीय राजकारण्यांना त्याचे काहीच सोयरसुतक नाही. गणपती, नवरात्र, दहीहंडीच्या निमित्ताने कमानी उभारण्याचा अक्षरशः उत आलेला असतो. गणपतीसाठी उभारण्यात आलेल्या या कमानी पुढे नवरात्रापर्यंत कायम असतात.
![]() |
| या कमानीमुळे आता पुन्हा एकदा नेताजी सुभाषचंद्र बोस व महर्षी कर्वे रस्ता नामफलक झाकला जाणार आहे |
राजकीय फलकबाजी, चेहरे फलक लावून तुमचे नामफलक झाकणा-या या सर्वपक्षीय कोडग्या राजकारण्यांना नेताजी सुभाषचंद्र बोस, महर्षी धोंडो केशव कर्वे तुम्ही क्षमा करा. आपले चेहरे फलक लावल्याशिवाय गुढीपाडवा साजराच होणार नाही, असे या महान मंडळींना वाटत असावे आणि त्यासाठीच ही कमान उभारली असावी. असो.
शेखर जोशी
२४ मार्च २०२५
रविवार, २३ मार्च, २०२५
अशोक मुळ्ये काकांचा 'माझा पुरस्कार'
ज्येष्ठ निवृत्त नाट्य व्यवस्थापक अशोक मुळ्ये
यांचा 'माझा पुरस्कार' सोहळा साजरा
- संदेश कुलकर्ण, शुभांगी गोखले, अविनाश नारकर,
राजन ताम्हाणे, ऋषिकेश शेलार यांना पुरस्कार प्रदान
ज्येष्ठ निवृत्त नाट्य व्यवस्थापक व रंगकर्मी यांच्या संकल्पनेतून साकारलेला 'माझा पुरस्कार ' वितरण सोहळा शिवाजी नाट्य मंदिर येथे रसिकांच्या उपस्थितीत पार पडला. पुरस्कार सोहळ्याचे यंदा १९ वे वर्ष होते. माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या सोहळ्यात संदेश कुलकर्णी यांना 'असेन मी... नसेन मी...' या नाटकासाठी 'सर्वोत्कृष्ट नाटककार' तर याच नाटकासाठी 'सर्वोत्कृष्ट दुहेरी भूमिका' हा पुरस्कार शुभांगी गोखले यांना प्रदान करण्यात आला.
'सर्वोत्कृष्ट पुनरुज्जीवित नाटका'चा बहुमान जयवंत दळवी लिखित 'पुरुष' नाटकाला मिळाला. या नाटकातील भूमिकेसाठी
अभिनेते अविनाश नारकर यांना 'सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता' पुरस्काराने गौरविण्यात आले. राजन ताम्हणे यांना 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शका'चा पुरस्कार मिळाला. 'उर्मिलायन' या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र यांना 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, याच नाटकातील अभिनेत्री निहारिका राजदत्त हिला 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' म्हणून तर अभिनेते हृषिकेश शेलार यांना 'शिकायला गेलो एक' या नाटकासाठी 'सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता' पुरस्कार देण्यात आला. अशोक मुळ्ये, सत्यरंजन धर्माधिकारी तसेच पुरस्कार विजेत्यांची मनोगत व्यक्त केले.
याच कार्यक्रमात गेली २५ वर्षे सुरू असलेल्या 'मटा सन्मान' पुरस्कारासाठी महाराष्ट्र टाइम्सचा गौरव करण्यात आला. मटाचे प्रतिनिधी कल्पेशराज कुबल यांनी हा सत्कार स्वीकारला.
जयंत पिंगुलकर, केतकी भावे-जोशी, शिल्पा मालंडकर, नीलिमा गोखले आणि मंदार आपटे यांनी मराठी आणि हिंदी प्रेमगीते सादर केली. याचे संगीत संयोजन प्रशांत लळीत यांचे होते.
शनिवार, २२ मार्च, २०२५
राजकीय फलकबाजीविना गुढीपाडवा साजरा व्हावा
राजकीय फलकबाजीविना गुढीपाडवा साजरा व्हावा;
डॉ. श्रीकांत शिंदे, रवींद्र चव्हाण यांना आवाहन
- शहर विद्रूपीकरण न करण्याची गुढी उभारा
शेखर जोशी
यंदाच्या वर्षी गुढीपाडवा शुभेच्छा फलकबाजीने डोंबिवली शहराचे विद्रुपीकरण होणार नाही, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा आणि शुभेच्छांच्या राजकीय फलकबाजीविना गुढीपाडवा साजरा व्हावा.
नववर्ष स्वागत यात्रेची सुरुवात डोंबिवलीतून झाली आणि पुढे संपूर्ण महाराष्ट्राने त्याचे अनुकरण केले. त्याप्रमाणे यंदाच्या गुढीपाडव्यापासून शुभेच्छा फलकबाजी विरहित गुढीपाडवा साजरा करण्याचा नवा आदर्श या दोघांनी घालून द्यावा.
शुभेच्छा द्यायच्याच असतील तर या दोघांनी पुढाकार घेऊन डोंबिवली शहरातील सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करावी. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्यावतीने शुभेच्छा देणारा फक्त एक मोठा फलक डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागात रेल्वेस्थानक परिसरात लावावा.
या फलकावर डोंबिवलीतील सर्वपक्षीय नेत्यांची नावे ठेवावी. या मुख्य व प्रातिनिधिक फलकाखेरीज शहराच्या कोणत्याही भागात, रस्ते, चौकात शुभेच्छांची राजकीय फलकबाजी होणार नाही, यासाठी शिंदे व चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा. असे जर खरोखरच झाले तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी ती एक नवी सुरुवात ठरेल.
नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता व महर्षी कर्वे रस्ता
नामफलक पुन्हा एकदा झाकला जाणार
गेल्या दोन/चार दिवसांपासून मोकळा श्वास घेत असलेले नेताजी सुभाषचंद्र बोस व महर्षी कर्वे रस्ता नामफलक गुढीपाडवा शुभेच्छांनी पुन्हा एकदा झाकले जाणार आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता, विष्णुनगर, पंजाब नॅशनल बँक चौक, डोंबिवली पश्चिम येथील हे दोन्ही नामफलक राजकीय फलकबाजीने झाकले जात होते. मात्र समाज माध्यमातून आणि लोकसत्ता ऑनलाईनने यावर लिहिल्यावर ते फलक हटविण्यात आले होते. शुक्रवारी फलकासाठी बांबूची कमान बांधण्यात आली. कमान बांधतांना एक कामगारा तर चक्क या दोन्ही नामफलकाच्या पाटीवर पाय ठेवून काम करतांना दिसून आला.
किती सर्वपक्षीय राजकारणी, नेते, पदाधिकारी अशा कमानी उभारून फलक लावण्यासाठी महापालिकेची परवानगी घेतात? परवानगी न घेता किती राजकीय पक्ष, नेते, पदाधिकारी, संस्था, संघटना अशा अनधिकृत फलकबाजी करतात? आत्तापर्यंत अनधिकृत फलकबाजी करणा-यांच्या विरोधात किती गुन्हे महापालिकेने दाखल केले? किती दंड वसूल केला त्याचीही माहिती महापालिका प्रशासनाने जाहीर करावी.
शेखर जोशी
२२ मार्च २०२५
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...




















































