बुधवार, १० जानेवारी, २०२४

प्रेमा तुझा रंग कसा?



प्रेमा तुझा रंग कसा? 

शेखर जोशी 

हिंदी/ भारतीय चित्रपट सृष्टीच्या आजवरच्या इतिहासात नायक नायिका विरहित चित्रपट फार कमी प्रमाणात तयार झाले. नायक नायिका, त्यांचे एकमेकांवरील प्रेम, प्रेमात येणारे अडथळे, नायक नायिकेची प्रेमगीते हा आपल्या हिंदी किंवा प्रादेशिक भाषांमधील सर्व चित्रपटाचा मुख्य आधार राहिला आहे. ज्येष्ठ सिनेपत्रकार आणि लेखिका अनिता पाध्ये यांनी लिहिलेल्या 'प्यार जिंदगी है!' या पुस्तकात त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या काही निवडक हिंदी प्रेमचित्रपटांचा निर्मितीप्रवास आणि त्याच्या वैशिष्ठ्यांचे  अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. हे विवेचन करताना ते कुठेही कंटाळवाणे होणार नाही याचीही काळजी पाध्ये यांनी घेतली आहे बॉलीवूड चित्रपटाचे प्रेक्षक,  बॉलीवूड चित्रपटांच्या नायक नायिकांवर आणि चित्रपटावर  भरभरून प्रेम करणारे चाहते,  चित्रपट अभ्यासक यांच्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरले आहे.

हिंदी प्रेमपट या विषयावर पाध्ये यांनी पाच वर्ष काम केले. अभ्यास, संशोधन आणि संबंधित व्यक्तींना भेटून, त्यांच्याशी चर्चा करून पुस्तकाचे लेखन केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीच्या आजवरच्या इतिहासात हजारो प्रेमचित्रपटांची निर्मिती झाली‌, मात्र यापैकी निवडक १२ चित्रपटांचा समावेश पुस्तकात करण्यात आला आहे.  १९५० ते १९९० या वर्षांत प्रदर्शित झालेल्या आणि प्रेमाच्या विविध रंगांचे दर्शन घडविणाऱ्या बारा चित्रपटांची निवड लेखिकेने पुस्तकासाठी केली आहे.

पुस्तकात देवदास, तेरे घर के सामने, अनुपमा, आराधना, बॉबी, छोटी सी बात, कभी कभी, एक दुजे के लिए, कयामत से कयामत तक, आशिकी, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे आणि हम दिल दे चुके सनम या चित्रपटांचा समावेश आहे. प्रत्येक चित्रपटाच्या प्रकरणाला  पाध्ये यांनी दिलेली शीर्षके अत्यंत समर्पक आणि चपखल आहेत. या शीर्षकातून त्यांनी चित्रपटाचे संपूर्ण सार एका वाक्यात सांगितले आहे. प्रेमविव्हळ नायकाची अजरामर शोकांतिका- देवदास,  नि:शब्द प्रेमकथा-  अनुपमा, अव्यक्त प्रेमाची लोभस कथा- छोटी सी बात किंवा बंडखोर प्रेमाची शोकांतिका-  एक दुजे के लिये ही काही वानगीदाखल उदाहरणे.

चित्रकार रोहन पोरे यांनी काढलेली चित्रे 

प्रेमकथा असलेल्या चित्रपटात खलनायक असायलाच हवा, हा आपल्या हिंदी चित्रपटांचा एक अलिखित नियम आहे. मात्र या नियमाला छेद देऊन विजय आनंद उर्फ गोल्डी यांनी 'तेरे घर के सामने' हा चित्रपट तयार केला. हा चित्रपट केवळ खलनायक विरहित नव्हता तर विनोदी अंगाने फुलत जाणारी  प्रेमकथा होती. किंवा 'देवदास' चित्रपटातील दोन लोकप्रिय संवाद, आत्तापर्यंत तयार झालेले १८ 'देवदास' चित्रपट व त्याची माहिती,  चित्रपटविषयक काही रंजक घटना याचीही माहिती लेखिका अगदी सहजपणे देऊन जातात.

प्रत्येक चित्रपटाच्या प्रकरणात चित्रपटाची कथा, चित्रपटाची ठळक वैशिष्ठ्ये, चित्रपटाशी संबंधित काही किस्से, रंजक माहिती,  चित्रपट प्रदर्शित झाल्याची तारीख, वर्ष, कलाकार, दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक, गीतकार, संगीतकार, सिनेमॅटोग्राफर, चित्रपटातील गाणी, गायक गायिका, चित्रपटाला मिळालेले पुरस्कार याचीही माहिती देण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चित्रपटातील काही निवडक छायाचित्रेही पुस्तकात आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला चित्रकार रोहन पोरे यांनी काढलेले चित्र पुस्तकात अधिकच रंग भरतात. पुस्तकाची प्रस्तावना प्रसिद्ध चित्रपट कथा, पटकथा लेखक कमलेश पांडेय यांची आहे

हिंदी चित्रपट म्हणजे सर्वसामान्य माणसांसाठी स्वप्नांचे जग.  दैनंदिन जीवनातील कटकटी, दु:ख, काळजी विसरून दोन अडीच तास तो चित्रपटाशी, कथानकाशी, त्यातील संवाद, गाण्यांशी तो एकरुप होतो. प्रेक्षकांच्या मनावर वर्षानुवर्षे अधिराज्य गाजविणाऱ्या चित्रपटांवरील हे पुस्तक प्रेक्षक आणि वाचकांसाठी अनोखी भेट आहे. 

प्यार जिंदगी है! 

बारा लोकप्रिय हिंदी रोमॅंटिक चित्रपटांचा निर्मितीप्रवास

लेखिका- अनिता पाध्ये

प्रकाशक- देवप्रिया पब्लिकेशन्स

पृष्ठे- ३२७, मूल्य- सहाशे रुपये 

- शेखर जोशी 

रविवार, १७ डिसेंबर, २०२३

राम मंदिर अयोध्येचे केंद्र विश्वचैतन्याचे'

पुस्तक परिचय '

राम मंदिर अयोध्येचे केंद्र विश्वचैतन्याचे'

राम जन्मभूमी मुक्ती आंदोलन आणि कारसेवेचा थरार

शेखर जोशी 

मोरया प्रकाशनने प्रकाशित केलेल्या 'राम मंदिर अयोध्येचे केंद्र विश्वचैतन्याचे' या पुस्तकात राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाचा संक्षिप्त इतिहास, १९९० आणि १९९२ मध्ये झालेल्या कारसेवेचा थरार आणि आता अयोध्येत उभ्या राहणाऱ्या राम मंदिराच्या कामाची अनुभूती या पुस्तकात सादर करण्यात आली आहे.

डोंबिवलीतील प्रकाश बापट, प्रदीप पराडकर आणि अन्य काही कार्यकर्ते १९९० व १९९२ च्या कारसेवेत प्रत्यक्ष सहभागी झाले होते. कारसेवेचा थरार या सर्वांनी प्रत्यक्ष अनुभवला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य भय्याजी जोशी यांची प्रस्तावना पुस्तकास लाभली आहे. प्रकाश बापट आणि त्यांच्या काही मित्रांनी काही महिन्यांपूर्वी वाराणसी, अयोध्येला भेट दिली होती. बापट यांच्याबरोबर प्रदीप पराडकर, शैलेश दिवेकर, शिरीष गोगटे ही मंडळी होती. बापट यांनी हे अनुभव 'फेसबुक' या लोकप्रिय समाज माध्यमावर 'पर्यटन नव्हे तीर्थाटन' या लेखमालिकेत लिहिले होते. त्या लेखांवर आधारित हे पुस्तक आहे. 

पुस्तकांच्या पहिल्या प्रकरणात श्रीराम जन्मभूमी मुक्ती लढ्याचा पूर्वइतिहास लेखक प्रकाश बापट यांनी सांगितला आहे. सन पंधराशे १५२८ ते २९ या काळात मुघल आक्रमक बाबरचा सेनापती मीर बाकी याने श्रीराम मंदिराचा विध्वंस करून तिथे मशिदीची उभारणी केली आणि तेव्हापासूनच मंदिराच्या पुनर्नमानाचा धडा सुरू झाला वेळोवेळी असंख्य लढाया आंदोलने आणि चळवळ उभारून स्वाभिमानी आणि राष्ट्रप्रेमी हिंदूंनी प्राण्यांची आहुती तिथे आणि हा लढा धगधगत ठेवला त्यानंतर सुमारे ३३२ वर्षांनी सन १८५० मध्ये हिंदूंनी या जागेचा ताबा मिळवण्याची मागणी केली मात्र तत्कालीक शासकाने मागणी फेटाळली. तेव्हापासून ते ५ ऑगस्ट २०२० या दिवशी राममंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला, इथपर्यंतचा इतिहास थोडक्यात मांडला आहे.

१९९० आणि १९९२ च्या अयोध्येतील कारसेवेसाठी डोंबिवलीतून शंभरहून अधिक कारसेवक गेले होते. लेखकाने पुस्तकात जे अनुभव सांगितले आहेत ते चित्तथरारक आणि अंगावर काटा आणणारे आहेत. वेगवेगळ्या नोकरी, व्यवसायातील या कार्यकर्त्यांनी राममंदिर आणि कारसेवेसाठी प्राण पणाला लावले होते, या सर्वांना मनापासून नमस्कार. ३० ऑक्टोबर १९९० या दिवशी रामजन्मभूमीवरील उध्वस्त केलेल्या मंदिराच्या जागेवरील विवादास्पद वास्तूवर भगवा कसा फडकला, त्याचा दिनक्रम सांगितला आहे.

 राममंदिर प्रकल्प समन्वयक जगदीश आफळे यांचा परिचय तसेच राममंदिर कसे असेल? संपूर्ण परिसरात काय असणार आहे, याची माहितीही देण्यात आली आहे. अयोध्येतील या राममंदिरच्या प्रदक्षिणा मार्गावर रामायणातील निवडक शंभर प्रसंग शिल्पस्वरुपात साकारले जाणार आहेत. महाराष्ट्रातील शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा महत्त्वाचा सहभाग यात आहे. पुस्तकात कांबळे यांची मुलाखत आहे. 

अयोध्येतील इतर महत्त्वाची ठिकाणे, रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाचा ज्ञानकोश चंपतराय यांची तसेच रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात ज्यांचे महत्त्वाचे योगदान आहे त्या व्यक्तींची थोडक्यात ओळख पुस्तकात करून देण्यात आली आहे. रामजन्मभूमी मुक्ती आंदोलन, अयोध्येतील नियोजित राममंदिर, अयोध्येतील इतर महत्त्वाची ठिकाणे यांचीही छायाचित्रे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे, श्रीरामजन्मभूमी न्यासचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांचे शुभेच्छा संदेश पुस्तकात आहेत. 

राममंदिर अयोध्येचे केंद्र विश्वचैतन्याचे

मोरया प्रकाशन

पृष्ठे- १२६, मूल्य- १५० रुपये

संपर्क क्रमांक

७०२१९१३६४५/८६००१६६२९७

ई मेल

info@morayaprakashan.com

संकेतस्थळ

www.morayaprakashan.com

शनिवार, १६ डिसेंबर, २०२३

मंदिर आणि पुजारी यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक

मंदिर आणि पुजारी यांच्या समस्या 

सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक

महाराष्ट्र मंदिर महासंघाने मंदिरांसंदर्भात मांडलेल्या सर्व मागण्यांविषयी सरकार सकारात्मक आहे, तसेच मंदिर आणि पुजारी यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाकडून बैठकांचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी येथे दिली.

येथील विधान भवनात ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या पदाधिकार्‍यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देतांना
 ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे पदाधिकारी

महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि राज्यशासन यांच्यातील समन्वयाचे काम ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले पाहतील, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. 

राज्यातील प्राचीन आणि पुरातन मंदिरांचे संवर्धन अन् जीर्णाेद्धार करावा; मंदिरांच्या भूमीवर झालेली सर्व अतिक्रमणे हटवावीत; अनेक मंदिरे अन् तीर्थक्षेत्रांच्या परिसरात बिअर बार, दारूची दुकाने, मांस विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी मंदिरापासून ५०० मीटरपर्यंत मद्य-मांस यांवर बंदी घालण्यात यावी; तीर्थक्षेत्रे पूर्णपणे ‘मद्य-मांस मुक्त’ करावीत; मंदिरातील पुजार्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायद्यात’ सुधारणा करण्यात यावी, तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या अंतर्गत राज्यातील अनेक प्रमुख मंदिरे येऊन कार्य करत असल्यामुळे महासंघाला ‘अधिकृत संघटना’ म्हणून शासनाने घोषित करावे आदी मागण्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मांडण्यात आल्या, अशी माहिती ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे राज्य समन्वयक सुनील घनवट, ‘देवस्थान समन्वय समिती विदर्भ’चे अनुप जयस्वाल यांनी दिली.

तुळजापूर देवस्थानातील दागिन्यांच्या घोटाळ्यासंदर्भातील चौकशीसाठी पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याऐवजी वरिष्ठ अधिकार्‍यांकडून चौकशी करावी, तसेच पंढरपूर, शिर्डी, श्री महालक्ष्मी देवस्थान, श्री सिद्धिविनायक आदी सरकारीकरण झालेल्या मंदिरातील घोटाळे आणि आर्थिक गैरव्यवहार पाहाता सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करून ती भक्तांच्या स्वाधीन करण्यात यावीत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

१६ डिसेंबर २०२३


गुरुवार, १४ डिसेंबर, २०२३

डोंबिवलीत साकारणार ५० हजारांहून अधिक पुस्तकांपासून राममंदिर प्रतिकृती


पै फ्रेंड्स लायब्ररीच्या पुस्तक आदानप्रदान सोहळ्यात

५० हजारांहून अधिक पुस्तकांपासून राममंदिर प्रतिकृती

- १९ ते २८ जानेवारी २०२४ या  दरम्यान डोंबिवलीत आयोजन 

शेखर जोशी

येथील पै फ्रेंड्स लायब्ररी आयोजित पुस्तक आदानप्रदान सोहळ्यात पन्नास हजारांहून अधिक पुस्तकांपासून अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे.‌ येत्या १९ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत डोंबिवलीत बहुभाषिक पुस्तक आदानप्रदान सोहळा आयोजित करण्यात आला असून सोहळ्याचे हे सहावे वर्ष आहे.

राममंदिर प्रतिकृती उभारण्याचा शुभारंभ गुरुवारी (१४ डिसेंबर) संध्याकाळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील प्रा. सुरेंद्र बाजपेयी सभागृहात पार पडला. पै फ्रेंड्स लायब्ररीचे संस्थापक- संचालक पुंडलिक पै यांनी श्रीफळ वाढवून शुभारंभ केला. त्याआधी गणपती, भूमी वराह आणि विष्णुकर्मा पूजा करण्यात आली.‌

कल्याण डोंबिवली महापालिका, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, डोंबिवलीकर सांस्कृतिक परिवार यांचे विशेष सहकार्य या सोहळ्यासाठी लाभले आहे. 'विज्ञान आणि वैज्ञानिक' अशी यावेळच्या पुस्तक आदानप्रदान सोहळ्याची संकल्पना असून त्याअनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, असे पुंडलिक पै यांनी यावेळी सांगितले.

पुस्तकांची ही राममंदिर प्रतिकृती ८० फूट रुंद आणि ४० फूट उंच असून अशा प्रकारे तयार होणारी ही प्रतिकृती भारतातील नव्हे तर जगातील पहिली प्रतिकृती असणार आहे. येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत राममंदिराचे उदघाटन होणार आहे. या दिवशी पुस्तक आदानप्रदान सोहळ्यात सामुहिक रामरक्षा पठण होणार असून यात एक हजार शालेय विद्यार्थी आणि डोंबिवलीकर नागरिक सहभागी होणार आहेत, अशी माहितीही पै यांनी यावेळी दिली.

यावेळी सिद्धेश बागवे (डिझायनर), रवी घाडीगांवकर ( सुतार), नरेश ( वेल्डर), नवनाथ मोरे ( रंगारी) यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. ही मंडळी आणि त्यांचे सहकारी पुस्तकांची राममंदिर प्रतिकृती उभारणार आहेत. कडोंमपाच्या सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील प्रा. सुरेंद्र बाजपेयी सभागृहात हा पुस्तक आदानप्रदान सोहळा होणार आहे.

१४ डिसेंबर २०२३

-----

बुधवार, १३ डिसेंबर, २०२३

शतक महोत्सवी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यात २२ ठिकाणी 'नाट्यकलेचा जागर'- प्रशांत दामले

 

शतक महोत्सवी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने

राज्यात २२ ठिकाणी 'नाट्यकलेचा जागर'- प्रशांत दामले

- अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून पार पडला

रंगमंचामागील तंत्रज्ञ, कर्मचा-यांचा 'केळवण' सोहळा 

शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने नव्या वर्षात २२ ठिकाणी 'नाट्यकलेचा जागर' आयोजित करण्यात आला असून यादरम्यान विविध सहा स्पर्धा घेण्यात येणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी मंगळवारी (१२ डिसेंबर) दादर येथे दिली.

ज्येष्ठ निवृत्त नाट्य व्यवस्थापक, रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यावेळी उपस्थित होते.

शतक महोत्सवी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने नेपथ्य व कपडेपट कर्मचारी, बस, टेम्पोचे चालक, क्लिनर आणि नाटकाच्या पडद्यामागील कामगार, कर्मचारी यांच्यासाठी 'केळवण' सोहळा उत्साहात पार पडला‌.

अभिनेत्री प्राजक्ता माळी पंगतीत आग्रह करताना

येत्या ५ जानेवारी रोजी पुणे येथे शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा होणार असून त्यानंतर महाराष्ट्रात सहा ठिकाणी विभागीय संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. याची सांगता रत्नागिरी येथे शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाने होणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे काम महाराष्ट्रात सर्वदूर पोहचविण्यासाठी 'नाट्यकलेचा जागर' महत्त्वाची भूमिका पार पाडेल, असा विश्वासही दामले यांनी व्यक्त केला.
छायाचित्रात डावीकडून अभिनेत्री भार्गवी चिरमुले, मंजिरी मराठे, श्रद्धा जाधव, प्रशांत दामले, विजय केंकरे, अशोक मुळ्ये 

आजचा केळवण सोहळा म्हणजे शतकमहोत्सवी नाट्य संमेलनाची सुरुवात असून जे काम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने करायला हवे होते ते मुळ्ये काकांनी केले आहे. नाटकाच्या प्रयोगासाठी आपण सर्व मेहनत घेतो. नाटक म्हणजे एकत्रित, परस्पर सहकार्याचा खेळ असून उत्तम प्रयोग करत राहणे हे आपले काम आहे आणि आपण ते करतच राहू, असेही दामले यांनी सांगितले.

विजय केंकरे म्हणाले, मुळ्ये काकांच्या पहिल्या उपक्रमापासून त्यांच्या सोबत असून शतक महोत्सवी नाट्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आजचा हा कार्यक्रम महत्त्वाचा,कौतुकास्पद आणि आपल्या सर्वांच्या सन्मानाचा आहे. असा आगळा उपक्रम याआधी कोणी केला असेल असे आठवणीत नाही. मुळ्ये काका यापुढेही असेच वेगवेगळे उपक्रम करत राहतील आणि त्या सर्व उपक्रमात आमचाही सहभाग असेल.


स्वाती मिटकरीचा सत्कार करताना प्रशांत दामले, शेजारी विजय केंकरे, अशोक मुळ्ये 

डावीकडून संध्या खरात, प्रज्ञा खरात, प्रशांत दामले, विजय केंकरे, अशोक मुळ्ये 

कार्यक्रमात केशभुषाकार संध्या खरात यांच्या कन्या प्रज्ञा तसेच शिवाजी मंदिर नाट्य गृहातील रंगमंच कर्मचारी पांडुरंग मिटकरी यांच्या कन्या स्वाती यांचा दामले, केंकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रज्ञा यांनी पदवी परीक्षेत ८४. ५५ टक्के गुण मिळविले असून सध्या त्या जपानी भाषा तसेच 'व्हीएफएक्स' चा अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत तर स्वाती या मुंबईत मेट्रो रेल्वेच्या पायलट म्हणून काम करत आहेत.‌

रंगमंचाच्या पाठीमागे राहून नाट्य प्रयोगासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या नेपथ्य, रंगमंच, प्रकाश योजना, रंगारी, सुतार, कपडेपट इत्यादी तांत्रिक कामे करणारे कामगार, कर्मचारी, नाटकाच्या प्रयोगाच्या बसचे चालक, क्लिनर यांच्यासाठी आणि त्यांच्या मुला, मुलींच्या सत्कारासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे मुळ्ये काका यांनी प्रास्ताविकात सांगितले.

माजी महापौर श्रद्धा जाधव, अभिनेत्री भार्गवी चिरमुले, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या मंजिरी मराठे यांच्या हस्ते दामले व केंकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता सुग्रास भोजन पंक्तीने झाली. अभिनेत्री प्राजक्ता माळी, श्रद्धा हांडे पंगतीत बसलेल्यांना आग्रह करून वाढत होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 'एबीपी माझा' चे वृत्त निवेदक अश्विन बापट यांनी केले.

शेखर जोशी



शनिवार, १४ ऑक्टोबर, २०२३

कष्टकऱ्यांचे कैवारी- कृष्णराव धुळप

 

विस्मरणातील कल्याणकर या लेखमालिकेतील पुढील लेख

कष्टकऱ्यांचे कैवारी- कृष्णराव धुळप

महाराष्ट्र टाइम्स-  ठाणे प्लस, १४ ऑक्टोबर २०२३

शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०२३

मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे ‘वाचन जागर’!

 


माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरी करण्यात येते. यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे ‘वाचन जागर’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठी विश्वकोशाचे आद्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर या जन्मगावी होणारा कार्यक्रम हे यंदाच्या वाचन प्रेरणा दिनाचे वैशिष्ठ्य असल्याचे मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजा दीक्षित यांनी सांगितले.

१३ ऑक्टोबर रोजी कर्मवीर आ. मा. पाटील महाविद्यालय, पिंपळनेर व दीपरत्न माध्यमिक विद्यालय, पानखेडा, धुळे आणि भीमराव शिंदे महिला महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वाई; १४ ऑक्टोबर रोजी राजाराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कोल्हापूर आणि १५ ऑक्टोबर रोजी ट्विटर वाचन प्रेरणा साहित्य संमेलन; मराठी विश्वकोश कार्यालयात ग्रंथ प्रदर्शन, असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती डॉ. दीक्षित यांनी दिली.‌

भाषा आणि भाषांतर, विदेशी मराठी साहित्य, वाचन संस्कृती आणि आव्हाने, मराठी विश्वकोश परिचय, कुमार विश्वकोशातील जीवसृष्टी आणि पर्यावरण, वाचन संवाद आदी विविध विषयांवर चर्चा होणार आहे.

 वाई विश्वकोश कार्यालयातील संपादकीय विभाग व प्रशासकीय विभागाकडून या कार्यक्रमांचे संयोजन करण्यात आले आहे.