बुधवार, १० सप्टेंबर, २०२५

भारत विकास परिषद आयोजित 'भारत को जानो' स्पर्धा

भारत विकास परिषद आयोजित 'भारत को जानो' स्पर्धा डोंबिवली, दि. १० सप्टेंबर भारत विकास परिषद- डोंबिवली शाखा आणि हुतात्मा कॅप्टन विनयकुमार सचान स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच 'भारत को जानो' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता ६ वी वी ते ८ वी या छोट्या गटात २८ तर मोठ्या गटात २५ संघ सहभागी झाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून अतिश कुलकर्णी तर कविता मिश्रा प्रांत निरीक्षक म्हणून उपस्थित होत्या. छोट्या गटात ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूलने पहिला तर मोठ्या गटात स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, विष्णुनगरने पहिला क्रमांक पटकावला. भारत विकास परिषद डोंबिवली शाखेच्या अध्यक्षा ॲड. वृंदा कुळकर्णी यांच्यासह दोन्ही संस्थानचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

'शालू झोका दे गो मैना' आता मोठ्या पडद्यावर

'हास्यजत्रा'प्रसिद्ध प्रभाकर मोरे यांचे 'शालू झोका दे गो मैना' आता मोठ्या पडद्यावर - आनंद शिंदे यांनी गायलेले गाणे समाज माध्यमांवर सादर मुंबई, दि. १० सप्टेंबर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' प्रसिद्ध अभिनेते प्रभाकर मोरे यांचे 'शालू झोका दे गो मैना' हे गाणे लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असून गायक आनंद शिंदे यांनी ते गायले आहे. समाज माध्यमांवर हे गाणे नुकतेच प्रकाशित झाले आहे. प्रभाकर मोरे,धनश्री काडगावकर यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे 'लास्ट स्टॉप खांदा' या आगामी मराठी चित्रपटात असून हा चित्रपट येत्या २१ नोव्हेंबररोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. श्रमेश बेटकर यांनी लिहिलेलं हे गाणं किशोर मोहिते यांनी संगीतबद्ध केले आहे. या गाण्याची युट्यूब लिंक https://youtu.be/Hbgz8RMOcPI?si=iUrLbZGyQ83ljp48

वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी ग्रंथालय मित्र मंडळ

वाचन संस्कृतीच्या जतन,संवर्धनासाठी ग्रंथालय मित्र मंडळ मराठी वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने डोंबिवली ग्रंथ संग्रहालयातर्फे ग्रंथालय मित्र मंडळ ही संकल्पना घेऊन काम करण्यात येत आहे. वाचक, लेखक आणि ग्रंथालये यांच्यात संवाद साधून, समाजातील विविध घटकांना बरोबर घेऊन ही चळवळ पुढे नेण्याचा मानस डोंबिवली ग्रंथ संग्रहालयाचे माजी मुख्य कार्यवाह सुधीर बडे यांनी व्यक्त केला. ग्रंथालय मित्र मंडळ संकल्पनेविषयी बडे यांच्याशी केलेली बातचीत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीकरता संपर्क सुधीर बडे- +91 93214 31548 गिरीश घाटे- +91 98201 46432 विलास चंदने- +91 98194 23626 प्रकाश ओक- +91 81082 36901 ग्रंथालय मित्र मंडळ संकल्पनेविषयी डोंबिवली ग्रंथ संग्रहालयाचे माजी मुख्य कार्यवाह सुधीर बडे यांच्याशी केलेली बातचीत शेजो उवाच या युट्यूब चॅनेलवर ऐकता/ पाहता येईल. खाली दिलेल्या लिंकवर अंगठा टेकवला की ही लिंक ओपन होईल. शेजो उवाच https://youtu.be/olPxM6iD31E?feature=shared

ग्रामीण भागातील मुलांच्या रखडणाऱ्या लग्नाच्या विषयावरील 'कुर्ला टू वेंगुर्ला'

ग्रामीण भागातील मुलांच्या रखडणाऱ्या लग्नाच्या विषयावरील 'कुर्ला टू वेंगुर्ला' - येत्या १९ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित मुंबई, दि. १० सप्टेंबर ग्रामीण भागातील तरुणांच्या रखडणाऱ्या लग्नाचा विषय 'कुर्ला टू वेंगुर्ला' या आगामी चित्रपटात मांडण्यात आला असून हा चित्रपट येत्या १९ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. विजय कलमकर दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ग्रामीण भागात मुलांची लग्न जमणे ही समस्या झाली आहे. गावातल्या मुलींना शहराचे आकर्षण असते, त्यांच्याही आयुष्याबद्दल काही इच्छा-आकांक्षा असतात. परिणामी शहर आणि ग्रामीण भाग अशी एक दरी निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या रखडणाऱ्या लग्नाचा संवेदनशील विषय, त्याच्याशी जोडलेले सामाजिक मुद्दे, परस्पर नातेसंबंध अशा विषयाची मांडणी कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटात करण्यात आली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लेखन अमरजीत आमले यांचे असून चित्रपटात वीणा जामकर, प्रल्हाद कुडतरकर, वैभव मांगले, सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर, साईंकित कामत, अमेय परब, शेखर बेटकर, अनघा राणे इत्यादी कलाकार आहेत.

मंगळवार, ९ सप्टेंबर, २०२५

राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला हाच का तुमचा सार्वजनिक गणेशोत्सव?

राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला हाच का तुमचा सार्वजनिक गणेशोत्सव? शेखर जोशी राज्य शासनाने म्हणे यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला होता.‌ हाच का तुमचा राज्य महोत्सव... पुण्यात विसर्जन मिरवणूक ३५ तास, छातीत धडकी भरविणा-या डीजेच्या भींती, अचकट विचकट गाणी व अश्लील नृत्य, ढोल ताशांचा दणदणाट ( दोन/चार ढोल ताशे वादक असतील तर एकवेळ समजू शकतो, ढोल ताशा वादकांची पथके च्या पथके. पारंपरिक असले तरी एका मर्यादेपलीकडे त्याचाही त्रासच होतो), लेझर दिवे आणि धांगडधिंगा.‌(काही अपवाद वगळता) पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात काही अपवाद वगळता सर्वत्र हेच चित्र होते. स्थानिक पातळीवरील सर्वपक्षीय निर्लज्ज,कोडग्या लोकप्रतिनिधींचाच वरदहस्त या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर असल्याने वेगळे काय होणार? तुम्ही काहीही करा, सर्वसामान्य सुजाण व सुसंस्कृत नागरिकांना कितीही बोंबलू द्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, या मानसिकतेमुळे ही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व त्याचे पदाधिकारी, कार्यकर्ते सोकावले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हा निर्णय घेतला खरा. पण उत्सवाचे विकृतीकरण आणि बाजारीकरण होणार नाही, हे ही राज्य शासन आणि सर्व प्रशासकीय यंत्रणांनी पाहायला हवे होते.‌ पण राज्यात काही सन्माननीय अपवाद वगळता कुठेही दिसले नाही. सोलापूरमध्ये शांततेत विसर्जन मिरवणूक पार पडते तर राज्यात इतर ठिकाणी ते का होत नाही? रस्ता अडवून, पादचारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे भव्य मंडप उभारून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झालाच पाहिजे हा हट्ट कशासाठी? शहरातील बंदिस्त सभागृह, मंगल कार्यालय याठिकाणी गणपती बसवणार असाल तर आणि तरच सार्वजनिक गणेशोत्सवाला परवानगी दिली जाईल, याची कठोरात कठोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी सत्ताधारी राज्यकर्ते आणि विरोधक यांनी धाडस दाखवले पाहिजे. डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेली अनेक वर्षे त्यांचा गणेशोत्सव सुयोग मंगल कार्यालयात साजरा करत आहेत. मंडळाची गणपती आगमन आणि विसर्जन मिरवणूकही पारंपरिक पद्धतीने निघते.फटाके, डीजेजा वापर नसतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे सदानकदा फडणवीस, शिंदे यांच्यावर तोंडसुख घेत असतात. टोमणेगिरी करतात. पण या प्रकरणी त्यांची अळी मिळी गूप चिळी आहे. अर्थात लोकानुनय न करता प्रसंगी कटू निर्णय घेऊन सत्ता राबवायची असते. शिवसेना एकसंघ असताना शिवसेनेच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी मुंबईतील गणेश मूर्तींच्या उंचीवर मर्यादा आणण्यासाठी महापौर असताना प्रयत्न सुरू केले होते. खरे तर पक्षप्रमुख आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा सांगणाऱ्या त्यांच्या या नातवाने महापौर डॉ. राऊळ यांना पाठिंबा देऊन हा विषय धसास लावायला हवा होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेत तर शिवसेनेचेच बहुमत होते, सत्ताही होती. पण उद्धव ठाकरे यांनी कच खाल्ली आणि धमक दाखवली नाही. मतपेढीवर डोळा ठेवून सद्गुण विकृती असलेले मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, चमकेश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी याची गंभीर दखल घेऊन कायदा धाब्यावर बसविणारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि पदाधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कायद्यानुसार कारवाई, शिक्षा केली पाहिजे. आम्ही अमूक करू, तमूक करु, कायद्याची अंमलबजावणी करू, यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याची काळजी घेऊ, अशी तोंडपाटीलकी न करता प्रत्यक्ष व ठोस कारवाई झाली असल्याचे लोकांना दिसू द्या. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा काळ सोकावत चालला आहे. शेखर जोशी

सोमवार, ८ सप्टेंबर, २०२५

'एक प्रभाग एक गणपती' काळाची गरज

'एक प्रभाग एक गणपती' काळाची गरज शेखर जोशी दहीहंडी, गणपती, नवरात्र या सर्व उत्सवातील पावित्र्य, मांगल्य लोप पावले आहे. हे उत्सव आता इव्हेंट झाले असून सर्वपक्षीय राजकारण्यांनी त्यावर कब्जा केला आहे. गल्ली ते राज्य पातळीवरील सर्वपक्षीय नेत्यांसाठी तो मनी, मसल पॉवरचा खेळ झाला आहे. या सर्व उत्सवांचे झालेले विकृतीकरण आणि बाजारीकरण थांबविण्यासाठी आता 'एक प्रभाग एक गणपती' ही काळाची गरज बनली आहे. कटू वाटला तरी लोकानूनय न करता कठोरात कठोर निर्णय घेऊन ते कागदावर न राहता, त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होईल, ते पाहिले पाहिजे.‌ फटाके, डीजे, लेझर बंदी फक्त कागदावरच राहिली असून नियम, कायदा धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने सर्व काही सुरू आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर कोणतेही मंडळ असो ती मिरवणूक रात्री दहा वाजता संपलीच पाहिजे. फटाके, डीजे, लेझर बंदी म्हणजे बंदीच हवी. जी मंडळे याचे उल्लंघन करतील त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात कायद्यानुसार गुन्हा दाखल करून मंडळाला जबरदस्त आर्थिक दंड ठोठावला पाहिजे. किमान एक तरी उदाहरण समोर आले तर कदाचित या बेबंद वागण्याला आळा बसेल.
उंचच उंच मूर्तींची स्पर्धा, रस्ते अडवून, पादचारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे मंडप उभारून, आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत अचकट विचकट गाणी, अश्लील नृत्य, छातीत धडकी भरेल आणि कानाचे पडदे फाटतील इतक्या मोठ्या आवाजातील डीजे, लेझर दिवे म्हणजेच गणपती उत्सव हे रूढ होत चालले आहे. आगमन आणि विसर्जन मिरवणुकींना वेळेचे बंधन, भान जराही राहिलेले नाही. निवासी परिसर, रुग्णालये परिसरातही छातीत धडकी भरेल आणि कानठळ्या बसतील अशा आवाजात मिरवणूक काढली जाते. आपल्यामुळे इतरांना त्रास होतो, ही गोष्ट मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनाही जाणवत असणारच. पण आमचे कोणी, काही वाकडे करू शकत नाही, अशा माजात वर्षानुवर्षे हे सुरू आहे. दहीहंडी, गणपती, नवरात्र उत्सवाचे विकृतीकरण, बाजारीकरण झाले आहे.‌ सण/ उत्सवातील हे बाजारीकरण, विकृतीकरण, मनी व मसल पॉवरची स्पर्धा म्हणजे हिंदुत्व, असे केले म्हणजेच सण/ उत्सव साजरे करणे नाही, सुजाण, सुसंस्कृत आणि सारासार विचार करण्यारे याच्याशी नक्कीच सहमत असतील.
खरे तर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक अशा महापालिका क्षेत्रात 'एक प्रभाग एक गणपती' ही संकल्पना राबविली पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. अर्थात हे स्वप्नच आहे. निगरगट्ट आणि कोडगे सर्वपक्षीय राजकीय नेते हे कधीच होऊ देणार नाही. 'पार्टी विथ डिफरन्स' असे स्वतःला म्हणवून घेणाऱ्या भाजपने, मुख्यमंत्री- गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या सर्व लोकप्रतिनिधींनी तरी किमान एक वर्ष तरी आपापल्या कार्यक्षेत्रात, मतदार संघात, शहरात 'एक प्रभाग एक गणपती' हा उपक्रम राबवून दाखवावा.‌
खरे तर घरगुती गणपती आणि सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणपती मूर्तीची उंची अनुक्रमे दोन फूट आणि पाच इतकीच असली पाहिजे. रस्ते अडवून, पादचारी व वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे मंडप उभारून सार्वजनिक दहीहंडी गणेशोत्सव, नवरात्रौत्सव बंदच झाले पाहिजेत. 'एक प्रभाग एक गणपती' ही संकल्पना राबविली पाहिजे. प्रभागातील शाळा, महाविद्यालय किंवा खासगी सभागृहात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाला पाहिजे. मूर्तीच्या उंचीवर मर्यादा आणली की हे करणे सहज शक्य आहे. अर्थात हे सर्व करण्यासाठी तळमळ, आच असायला हवी. लोकानुनय न करता कटू निर्णय घेऊन ते राबविण्याची धमक आणि त्याला पाठिंबा देण्याची तयारी अनुक्रमे सत्ताधारी आणि विरोधकांनी दाखवली पाहिजे. अर्थात निगरगट्ट आणि कोडग्या सर्वपक्षीय राजकारण्यांकडून ही अपेक्षा बाळगणे म्हणजे स्वप्नरंजनच आहे. शेखर जोशी ८ सप्टेंबर २०२५

रविवार, ७ सप्टेंबर, २०२५

सामूहिक अथर्वशीर्ष पठणाने बाप्पाला निरोप!

सामूहिक अथर्वशीर्ष पठणाने बाप्पाला निरोप! - डोंबिवलीच्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूक डोंबिवली, दि. ७ सप्टेंबर डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण करून विसर्जन करण्यात आले. मंडळाच्या ७६ व्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता शनिवारी झाली. यंदाच्या वर्षी उत्सवातील सर्व जबाबदाऱ्या मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आल्या होत्या. यंदाच्या वर्षी बाप्पांच्या विसर्जनापूर्वी सामूहिक श्री अथर्वशीर्षाचे पठण करण्याचे मंडळाने ठरविले होते. त्यानुसार ताई पिंगळे चौकात मिरवणूक पोहोचल्यावर मंडळाचे कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व भाविकांनी अथर्वशीर्षाचे पठण केले.
मंडळाची गणपती आगमन आणि विसर्जन मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण असते.‌ ढोल पथके, किंवा डी जे, गुलाल, फटाके यापैकी कोणत्याच गोष्टीचा समावेश हा टिळकनगरच्या विसर्जन मिरवणुकीत कधीच नसतो. पारंपरिक पद्धतीने निघणाऱ्या या विसर्जन मिरवणुकीत बाप्पाची पालखीत विराजमान झालेली मूर्ती, त्यापुढे असणारे लेझीम पथक, ढोल आणि हलगी वाजवणारे मंडळाचेच कार्यकर्ते आणि त्यापुढे लेझीम, झांज खेळणारे, झेंडे नाचवणारे नागरिक असे या मिरवणुकीचे स्वरूप असते. यंदाच्या वर्षी तब्बल ५२ लहान मुलामुलींचे पथक या मिरवणुकीत होते. त्यांनी साकारलेले मानवी मनोरे पाहून सर्वच नागरिक थक्क झाले.‌
मंडळातर्फे उत्सव काळात श्री गणपती अथर्वशीर्षाची सहस्त्रावर्तने, श्री विष्णु सहस्रनामाचे पठण, श्री सत्यनारायण पूजा, कोकणातल्या सुप्रसिद्ध आरत्या, भोवत्या आणि ७६ पदार्थांचा अन्नकोट इत्यादी उपक्रम आयोजित करण्यात आले होते. मूळचे डोंबिवलीकर असलेले प्रसिद्ध कलादिग्दर्शक संजय धबडे गेली २४ वर्षे गणेशोत्सवासाठी भव्य सजावट/ देखावे साकारत आहेत.‌ यूनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेल्या १२ किल्ल्यांच्या प्रतिकृतीचे दर्शन यंदा घडविले.