शनिवार, २८ जानेवारी, २०२३

संस्कृत राजभाषा व्हावी' असे सांगणारे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे अभिनंदन

ी आपल्या देशासाठी संस्कृत अत्यंत उपयुक्त भाषा आहे आणि संस्कृत राजभाषा व्हावी, असे स्पष्ट शब्दात सांगणारे भारताचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे अभिनंदन. काही सन्माननीय अपवाद वगळता उच्च पदावर काम करणारी, काम केलेली माणसे भारतीय संस्कृती, धर्म, अध्यात्म, परंपरा याविषयी थेट समर्थन करणारी भाषा बोलत नाहीत. आपण असे काही बोललो, याचे समर्थन केले तर आपण प्रतिगामी ठरू, आपल्यावर मागासलेपणाचा, उजवी विचारसरणी असल्याचा शिक्का बसेल, अशी अनाठायी भीती या मंडळींना वाटत असते. किंवा काही मंडळींना मनातून हे पटलेले असले तरी हे सर्व नाकारून हे लोकं स्वतःला पुरोगामी म्हणवून घेण्यात धन्यता मानत असतात. त्या पार्श्वभूमीवर बोबडे यांनी संस्कृत भाषा, त्याचे महत्त्व आणि एकूणच संस्कृत भाषेच्या महत्वाविषयी जे भाष्य केले ते कौतुकास्पद आहे.
उच्च न्यायालयांसाठी संस्कृत अधिकृत भाषा म्हणून स्वीकारल्यास अपील हाताळणे सोपे होईल त्यासाठी शब्दसंग्रह विकसित करण्याची गरज आहे. 'संस्कृत भारती' ने नागपूर येथे आयोजित केलेल्या अखिल भारतीय युवा संमेलनात बोलताना बोबडे यांनी हे मत व्यक्त केले.आपल्या देशासाठी संस्कृत ही अत्यंत उपयुक्त भाषा आहे. त्यामुळे ती केवळ देवभाषा न राहता, धर्माशी न जोडता राजभाषा व्हावी, असेही त्यांनी सांगितले. डॉ.‌बाबासाहेब आंबेडकर यांनी नोव्हेंबर १९४९ मध्ये संविधान सभेत राष्ट्रीय आणि दुवा भाषा म्हणून स्वीकारलेल्या हिंदीचा विकास करण्यासाठी संस्कृतचा परिचय करून देण्याचा प्रस्ताव दिला होता मात्र चर्चेनंतर विधानसभेने डॉ. आंबेडकरांचा मूळ प्रस्ताव लांबवला आणि आठ अनुसूचित भाषांशी जोडला, असेही बोबडे म्हणाले.

शुक्रवार, २७ जानेवारी, २०२३

ओम सदगुरू प्रतिष्ठानतर्फे श्रीगुरुचरित्र पारायण सप्ताह

ओम सद्गुरू प्रतिष्ठानतर्फे बोरिवली येथे येत्या ३० जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत श्रीगुरुचरित्र पारायणाचा ४० वा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.‌ त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमही होणार आहेत. ओम सद्गुरू प्रतिष्ठानचे संस्थापक, सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर यांनी गाणगापूर यात्रेनिमित्त होणाऱ्या श्री गुरुचरित्र पारायणाची सुरवात १९८४ साली केली होती. ३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान दररोज सकाळी सहा वाजता सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर यांच्या ध्वनिमुद्रित आवाजातील श्रीगुरुचरित्राच्या अध्यायांचे पारायण होणार आहे. दररोज संध्याकाळी लक्षार्चना, व्याख्यान, कीर्तन, प्रवचन आणि संगीत सेवा असे विविध अध्यात्मिक कार्यक्रम होणार आहेत.
मंगळवार ३१ जानेवारी रोजी लक्षार्चना, बुधवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी प्राची गडकरी यांचे "देवाचिये द्वारी" या विषयावर व्याख्यान, गुरुवार २ फेब्रुवारी रोजी ह. भ. प. वीणा खाडिलकर यांचे 'संत परम हितकारी' या विषयावर कीर्तन होणार आहे. शुक्रवार ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २ या वेळेत दत्तयाग तर ४ फेब्रुवारी रोजी डॉ. पं. संदीप अवचट यांचे 'शास्त्रामागचे विज्ञान' या विषयावर व्याख्यान, रविवार ५ फेब्रुवारी रोजी प पु गुळवणी महाराज यांचे शिष्य कानडे गुरुजी यांचे 'भारतीय कालगणना' या विषयावर प्रवचन, सोमवार ६ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता 'मलन सप्तसुरांचे - भावगीत व भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ७ फेब्रुवारी महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे. उत्सवाचे कार्यक्रम ओम सद्गुरू प्रतिष्ठान, ए/८, दौलत नगर रस्ता क्र. ७, प प टेम्बेस्वामी महाराज चौक, नवनीत रुग्णालयाशेजारी, बोरिवली (पूर्व) येथे होणार आहेत. संपूर्ण उत्सव सर्वांसाठी खुला असून विनामूल्य आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - शशी करंदीकर ९७६९९३९०४५

सोमवार, २३ जानेवारी, २०२३

सुट्टीच्या फक्त आठवणी उरल्या- बाळासाहेब ठाकरे

'मुंबई सकाळ' असताना १९९३ मध्ये 'आमची सुट्टी' हे सदर मी चालवले होते. सकाळमध्ये दरवर्षी सुट्टीच्या कालावधीत लहान मुलांसाठी 'सुट्टीचे पान' असायचे. लहान मुलांसाठीचा मजकूर या पानावर असायचा. सकाळ-पुणे कडून या पानासाठी जो मजकूर यायचा तोच आम्ही मुंबई सकाळमध्ये लावत असू. मुंबई सकाळचे तेव्हाचे संपादक राधाकृष्ण नार्वेकर यांच्याकडे मी 'आमची सुट्टी' ही कल्पना मांडली. विविध क्षेत्रातील मान्यवर लहान असताना मे महिन्याची सुट्टी कशी घालवत होते? ते या सदरात असेल असे त्यांना सांगितले. नार्वेकर साहेबांना कल्पना आवडली आणि मला कामाला लाग म्हणून सांगितले. यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कसेही करुन घ्यायचेच असे मनाशी ठरविले आणि प्रयत्न सुरु केले. 'मातोश्री'वर दूरध्वनीकरुन संपर्क साधला. चार/सहा वेळा प्रयत्न केल्यानंतर एका प्रयत्नात मातोश्रीवरील ऑपरेटरने बाळासाहेब यांच्याशी फोन जोडून दिला. मी माझ्या सदराची कल्पना सांगितली आणि त्यासाठी भेटीची वेळ मागितली. बाळासाहेबांनी मला वीस मिनिटांचा वेळ दिला होता. ठरलेल्या दिवशी आणि वेळी 'मातोश्री' वर दाखल झालो. पत्रकारिता सुरु करुन चार वर्ष झाली होती. आणि मी थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांच्यासमोर बसलो होतो. त्यामुळे नाही म्हटले तरी थोडेसे दडपण मनावर होतेच. पण बाळासाहेबांनी सुरुवातीलाच मोकळेपणाने बोला असे सांगून आणि कुठे राहता? मुंबई सकाळमध्ये किती वर्षे आहात? तिथे काय पाहता? अशी आस्थेवाईकपणे चौकशी करुन मनावरचे दडपण कमी केले. खरे तर मी पहिला प्रश्न विचारुन गप्पांना सुरुवात केली आणि नंतर मला प्रश्नच विचारावे लागले नाहीत. बाळासाहेब भरभरुन बोलायला लागले. मध्येच त्यांनी, अगं मीना येऊन बस इकडे ऐकायला आणि मीनाताईही गप्पा ऐकायला येऊन बसल्या. या मुलाखतीच्या वेळी शिवसेना नेते सुभाष देसाई आणि सुधीर जोशी ही उपस्थित होते. म्हणजे मी 'मातोश्री'वर गेलो तेव्हा अन्य काही कामासाठी बाळासाहेब यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते दोघे जण आधीच तिथे आलेले होते. आमच्या गप्पा/मुलाखत सुरु झाली तेव्हा, हे दोघे इथेच बसले तर चालतील ना? असे मला बाळासाहेबांनी विचारले. खरे तर बाळासाहेबांनी हे मला विचारले नसते तरी चालले असते पण संकेत म्हणून त्यांनी विचारले आणि मी ही हो म्हटले. लहानपणच्या आठवणीत बाळासाहेब रंगून गेले होते. खरे तर मुलाखतीसाठी त्यांनी वीस मिनिटेच दिली होती पण या गप्पा जवळपास तास/सव्वातास चालल्या. राजकारण हा विषयच कुठे आला नाही आणि म्हणूनही ते लहानपणीच्या जुन्या आठवणीत रंगून गेले असतील. गप्पा झाल्यावर बाळासाहेब म्हणाले, मुलाखत प्रसिद्ध करण्यापूर्वी मला पाहायला मिळाली तर चांगले म्हणजे काही संदर्भ चुकायला नको. मी हो म्हटले आणि मुलाखत लिहून झाली की दूरध्वनीकरुन तुम्हाला वाचून दाखवेन असे सांगितले. बाळासाहेब यांनीही त्याला होकार दिला. एक/दोन दिवसात मजकूर लिहून झाल्यावर 'मातोश्री'वर दूरध्वनीकरुन बाळासाहेबांना मुलाखत वाचून दाखवली. एखाद, दुसरा शब्द/वाक्य बदलायला सांगून त्यांनी छान लिहिलाय असे सांगून सर्व मुलाखत ओके केली.
आणि ही मुलाखत २६ एप्रिल १९९३ या दिवशी मुंबई सकाळमध्ये प्रसिद्ध झाली. 'आमची सुट्टी' हे सदर सकाळच्या अन्य आवृत्यांमध्येही त्यांच्या सोयीनुसार आणि जागेनुसार लावले जात होते. 'आमची सुट्टी' या सदरात तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्यासह रामदास पाध्ये, दिलीप प्रभावळकर, महेश कोठारे, अजय वढावकर, दिलीप वेंगसरकर, डॉ. श्रीराम लागू, शिवाजी साटम, शाहीर साबळे, मोहन जोशी, सुरेश वाडकर या मान्यवरांच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या होत्या. हे सदर तेव्हा वाचकप्रिय ठरले होते.

रविवार, २२ जानेवारी, २०२३

'बाप पळविणा-या टोळीला' उघडे पाडण्याची संधी उद्धव ठाकरे यांनी गमावली

विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात उद्या (२३ जानेवारी) आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र अनावरण सोहळ्यास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.‌ हे जर खरे असेल तर तो उद्धव ठाकरे यांचा पळपुटेपणा आहे असेच म्हटले पाहिजे.‌ सहा- आठ महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झाल्यापासून उद्धव ठाकरे हे पहिल्या दिवसापासून आजतागायत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गद्दार, मिंधे, खोके अशा शब्दांत तोंडसुख घेत आहेत. मुख्यमंत्री असताना ते जितके मुंबईबाहेर फिरले नाहीत त्यापेक्षा अधिक वेळा ते मुख्यमंत्रीपद गेल्यावर बाहेर पडले. भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष फोडला म्हणूनही उद्धव ठाकरे सतत टिका करत असतात. खरे तर चाळीसहून अधिक आमदार, तेरा खासदार, काही महापालिका/नगरपालिकांमधील नगरसेवक इतकी माणसे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना सोडून गेली. खरेतर इतकी माणसे आपल्यला सोडून का गेली? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या मनाला विचारायला पाहिजे. पण तो सारासार विचार न करता उद्धव ठाकरे हे भोवती जे बदसल्लागार जमा केले आहेत त्यांच्याच सल्ल्याने वागत आहेत, भूमिका घेत आहेत. ही सर्व मंडळी/बदसल्लागार शिवसेना संपवायला निघाले आहेत, याचे भान उद्धव ठाकरे यांन कधी येणार? असो.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम उद्धव ठाकरे यांच्यासाठी खरेतर एक मोठी संधी होती. कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.‌ त्यामुळे थेट त्यांच्यासमोर शिंदे- फडणवीस यांचे वाभाडे काढण्याची, त्यांना उघडे पाडण्याची चांगली संधी उद्धव ठाकरे यांच्यासाठी चालून आली होती. पण त्यांनी ( की बदसल्लागार, किचन कॅबिनेट यांनी सांगितले म्हणून) सोहळ्यास उपस्थित न राहण्याचा निर्णय घेऊन संधी तर गमावलीच पण वैचारिक लढाईच्या रणांगणातूनही पळ काढला असेच म्हणावे लागेल. मागेही 'हनुमान चालीसा' प्रकरणी राणा दाम्पत्याचे आव्हान स्वीकारून त्यांच्या आंदोलनातील हवा उद्धव ठाकरे यांना काढून घेता आली असती. उपरोधिकपणे पण का होईना राणा दाम्पत्याला 'मातोश्री' बाहेर मांडव घालून या हनुमान चालिसा म्हणायला, असे सांगितले असते तर राणा दाम्पत्याला जेवढी प्रसिद्धी मिळाली ती मिळाली नसती आणि ते मोठेही झाले नसते. राजकारणात प्रसंगी माघार घेऊन शत्रुला चित करायचे असते, त्याचे दात त्याच्याच घशात घालायचे असतात हे उद्धव ठाकरे विसरले.‌ कंगना राणावत, अर्णव गोसावी प्रकरणीही नाहक अडेलतट्टू भूमिका घेऊन स्वतःचे करून घेतले होते. इतके होऊनही उद्धव ठाकरे भानावर येत नाहीत. विनाशकाले विपरित बुद्धी म्हणतात ती हीच.
कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर उद्धव ठाकरे यांचे नाव देण्यात आलेले नाही, त्याचा हा अपमान आहे, त्याच दिवशी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम मोदी भक्तांचा आहे, गद्दाराच्या कार्यक्रमाला कशाला जायचे? हा कार्यक्रम राजकीय आहे असली तकलादू कारणे उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या लोकांकडून सांगितली जात आहेत. त्यामुळे त्याला काहीही अर्थ नाही. मुळात उद्धव ठाकरे आता कोणत्याही संविधानिक पदावर नाहीत. शासकीय रिवाजाप्रमाणे निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, आमंत्रक म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांची नावे देण्यात आली आहेत. राज ठाकरे यांचेही नाव देण्यात आलेले नाही. बरे कार्यक्रमाचे रितसर निमंत्रण उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि इतर मान्यवरांना देण्यात आले आहे. मग हा मानापमान कशाला?
अशा कार्यक्रमाच्या वेळी राजकीय हेवेदावे काढणे योग्य दिसले नसते, तिथे उद्धव ठाकरे यांना भाषण करण्याची संधी मिळाली असती का? असे प्रश्न काहीजण विचारतील. समजा भाषण करता आले नसते तरी कार्यक्रमास उपस्थित राहून मोठेपणा घेता आला असता. भाषण करायला मिळाले असते तर शिंदे- फडणवीस यांना किमान पुन्हा एकदा टोमणे तरी मारता आले असते, 'बाप पळवून नेणा-या टोळीला' उघडे करता आले असते. आणि अशा कार्यक्रमात शिंदे- फडणवीस यांना उघडे पाडणे औचित्यभंग ठरला असता तर तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी करायचा. नाहीतरी या आधीही त्यांनी तो वेळोवेळी केलाच आहे, त्यात आणखी एका प्रसंगाची, भाषणाची भर पडली असती. शेखर जोशी

शनिवार, २१ जानेवारी, २०२३

समाजशास्त्रीय संशोधक ग्रंथकार- नारायण गोविंद चापेकर

महाराष्ट्र टाइम्स- ठाणे प्लसमधील लेखमालिका. यातील दुसरा लेख. आजच्या ( २१ जानेवारी २०२३) च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. विस्मरणातील बदलापूरकर

समाजशास्त्रीय संशोधक ग्रंथकार 

नारायण गोविंद चापेकर 


महाराष्ट्र टाइम्स ठाणे प्लस २१ जानेवारी २०२३

कोणत्याही शहराच्या जडणघडणीत आणि शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य अशा विविध क्षेत्रात स्थानिक सुजाण नागरिकांचे महत्त्वपूर्ण योगदान असते. विविध क्षेत्रात प्रसिद्धीस आलेल्या नामवंतांनी, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी तसेच आपली नोकरी, व्यवसाय आणि संसार सांभाळून सर्वसामान्य नागरिकांनीही शहराच्या विकासासाठी आपला अमूल्य सहभाग दिला. ही माणसे प्रसिद्धीपासून दूर राहिली आणि विस्मृतीतही गेली. कल्याण, बदलापूर, अंबरनाथ येथील अशा विस्मृतीत गेलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या कार्याचा परिचय करून देणारी ही लेखमालिका आहे. 




शुक्रवार, २० जानेवारी, २०२३

व्यंकटेश माडगूळकर साहित्य गौरव विशेषांक

 


कथाकार, कादंबरीकार, नाटककार, पटकथाकार व्यंकटेश माडगूळकर यांच्यावर ग्रंथसखा प्रकाशनाने 'व्यंकटेश माडगूळकर साहित्य गौरव विशेषांक' प्रकाशित केला आहे. व्यंकटेश माडगूळकर यांनी स्वतः लिहिलेले, व्यंकटेश माडगूळकर यांनी अन्य काहीजणांविषयी लिहिलेले आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्यावर लिहिलेले लेख असे या ग्रंथाचे स्वरूप आहे. 

माडगूळकर यांनी लिहिलेली पहिली कथा जुलै १९४६ मध्ये 'अभिरुची'त प्रसिद्ध झाली होती.‌ ती संपूर्ण कथा या ग्रंथात देण्यात आली आहे. या कथेचे नाव 'काळ्या तोंडाची' असे होते. माडगूळकर यांनी लिहिलेल्या 'बनगरवाडी'चा बहुतांश भारतीय भाषांमध्ये तसेच इंग्रजी, जर्मन आदि भाषांमध्ये अनुवाद झाला. 'माणदेशी माणसे' आणि 'बनगरवाडी'ने माडगूळकर यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. स्वतः माडगूळकर यांनी 'बनगरवाडी' विषयी लिहिलेले दोन लेख तर प्रा. त्र्यं. शं. शेजवलकर आणि दिगंबर पाध्ये यांनी लिहिलेले लेख ग्रंथात आहेत. 'कथा वाड्मयातील उच्चांक' अशा शब्दात शेजवलकर यांनी 'बनगरवाडी'विषयी लिहिले आहे.

माडगूळकर यांनी वडिलांविषयी लिहिलेला 'दादा', साहित्यिक पु.भा. भावे यांच्यावर लिहिलेला 'एक स्पार्टन योद्धा' तसेच माडगूळकर यांनी लिहिलेले सुरुवातीचे दिवस, माझ्या लिखाणामागील कळसूत्रे आणि अंबाजोगाई येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून केलेले संपूर्ण भाषणही वाचायला मिळते. यासह रवींद्र पिंगे, व.दि. कुलकर्णी, रविमुकुल, गंगाधर गाडगीळ यांनी माडगूळकर यांच्यावर लिहिलेले लेखही आहेत.

वेगवेगळ्या नियतकालिकात प्रसिद्ध झालेले हे लेख व्यंकटेश माडगूळकर साहित्य गौरव विशेषांकात घेण्यात आले आहेत. माडगूळकर यांनी स्वतः लिहिलेले आणि त्यांच्यावर लिहिण्यात आलेले हे सर्व लेख या पुस्तकात एकत्र वाचायला मिळतात. 

मराठी साहित्याचे विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक आणि माडगूळकर साहित्यप्रेमी यांच्यासाठी हा विशेषांक एक संदर्भ ग्रंथ ठरला आहे.‌ कॅ. आशिष दामले या विशेषांकाचे संपादक असून श्याम जोशी हे कार्यकारी संपादक आहेत. 

संपर्क

ग्रंथसखा प्रकाशन 

९३२००३४१५६



बुधवार, १८ जानेवारी, २०२३

फक्त निलंबन नको, अशा उमेदवारांना निवडणूक लढवायला बंदी करा नाहीतर पाडा

छायाचित्र गुगल फोटोच्या सौजन्याने
छायाचित्र गुगल फोटोच्या सौजन्याने 

महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील पाच जागांसाठी येत्या ३० जानेवारीला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत होणाऱ्या लढतीवरून महाराष्ट्रातील राजकारण तापले असून वाद प्रतिवाद सुरू आहेत. शह काटशहाचे राजकारण सुरू आहे.‌ 

यातही नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. नाशिक पदवीधर मतदार संघातून काँग्रेसचे नेते व आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर झाली होती मात्र आपले सुपुत्र सत्यजित तांबे यांच्यावरील प्रेमापोटी डॉक्टर सुधीर तांबे यांनी अनपेक्षितपणे माघार घेतली. इकडे सत्यजीत तांबे यांना काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी दिलेली नव्हती त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला.‌ तांबे पिता पुत्राच्या एकाच वेळी काँग्रेस आणि भाजप यांच्याबरोबर वाटाघाटी सुरू होत्या. झाल्या प्रकाराची दखल घेऊन नेहमीप्रमाणे सत्यजित यांचे वडील आणि काँग्रेसचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली तर सत्यजित तांबे यांच्यावर निरंभानाची कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

छायाचित्र गुगल फोटोच्या सौजन्याने 

विधान परिषदेवरील रिक्त जागा असो किंवा विधान परिषदेवर निवडून द्यायच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या जागा असोत. या सर्व जागांवर खरे तर पक्षासाठी आजवर घाम गाळलेल्या, प्रामाणिक कार्यकर्त्याची किंवा त्या त्या क्षेत्रातील मान्यवर अनुभवी व्यक्तींची निवड होणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून पक्षश्रेष्ठी किंवा पक्षातील बड्या नेत्यांशी जवळीक असलेल्या तसेच 'मनी' मसल पॉवर' असलेल्या लोकांना उमेदवारी मिळते. हे करण्यात सर्वच राजकीय पक्ष आघाडीवर आहेत. 'पार्टी विथ डिफरन्स' म्हवून घेणारा भाजपही याला अपवाद नाही. 

लोकसभा, विधानसभा किंवा अगदी महापालिका, नगरपालिका निवडणुकीसाठीही उमेदवारी देताना 'जिंकून येण्याची क्षमता' हा आणि त्या उमेदवाराची मनी, मसल पॉवर किती आहे? हेच पाहिले जाते. मग तो उमेदवार आपल्या पक्षातील असो किंवा दुसऱ्या पक्षातून आयात केलेला असो.‌ पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांनी आपल्याला या निवडणुकीत उमेदवारी मिळेल म्हणून काम सुरू केलेले असते मात्र ऐनवेळी त्यांना ठेंगा दाखवला जातो. पक्षाचे अधिकृत एबी फॉर्म दिले जात नाहीत आणि भलत्याच व्यक्तीची उमेदवार म्हणून निवड केली जाते किंवा त्याला अपक्ष म्हणून रिंगणात उतरवून पाठिंबा दिला जातो. आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांवर पुन्हा एकदा अन्याय होतो.

छायाचित्र गुगल फोटोच्या सौजन्याने 

या सगळ्यात अशा प्रकारे पक्ष बदलणाऱ्या, आपल्या फायद्यासाठी तत्वांना सोडचिठ्ठी देणाऱ्या उमेदवाराचे काहीच नुकसान होत नाही. कारण त्यांनी आधीच्या पक्षाकडून आमदार, खासदार किंवा अन्य महत्त्वाची राजकीय पदे उपभोगलेली असतातच. आणि आता त्यांनी ज्या नव्या राजकीय पक्षात उडी मारलेली असते तिथूनही ते निवडून येतात आणि या पक्षबदलुंचे पुन्हा एकदा सर्व काही सुरळीत चालू राहते.  

याला कुठेतरी आळा बसणे आवश्यक आहे.‌ अशा प्रकारे निवडणुकीच्या तोंडावर ऐनवेळी जे पक्ष बदलतील किंवा पक्षभंग करून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील अशा लोकांवर फक्त निलंबनाची कारवाई पुरेशी नाही. तर निवडणूक आयोगाने या लोकांना निवडणूक लढविण्यास बंदी घातली पाहिजे. पण, पण येथे सर्वपक्षीय राजकारणी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून अशा प्रकारची सुधारणा, नियम करण्यास किंवा पक्षाच्या घटनेत बदल करण्यास कधीही तयार होणार नाहीत. त्यामुळे अशा पक्षबदलू लोकांना निवडणूक लढविण्यास बंदी घालावी यासाठी निवडणूक आयोगाकडे दाद मागणे किंवा न्यायालयत जनहित याचिका दाखल करणे हा एक मार्ग जागरूक नागरिकांच्या हातात आहे. यात कितपत यश येईल किंवा नाही हा भाग वेगळा. 

छायाचित्र गुगल फोटोच्या सौजन्याने 

किंवा अशा उमेदवारांना पाडणे हा आणखी एक पर्याय जागरूक मतदार म्हणून आपण निवडू शकतो.‌ त्यामुळे मतदारांनी ठरवून असा पक्षबदलू उमेदवार पाडला तर कदाचित सर्वपक्षीय राजकारण्यांच्या वागण्याला चाप बसू शकेल, अशी किमान अपेक्षा करायला हरकत नाही.