शनिवार, ३१ मे, २०२५

वक्फ बोर्ड; महाराष्ट्रातील अवैध जमिनींची छाननी होणार

वक्फ बोर्डसंबंधित जे पी सी समोर महाराष्ट्रातील अवैध जमिनींची यादी सादर होणार - जमिनीच्या कागदपत्रांसह ग्राहक पंचायतीशी संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई, दि. ३१ मे पुण्यामध्ये गंज पेठ, भवानी पेठ, गुरुवार पेठ, मंगळवार पेठ, नाना पेठ, कॅम्प ह्या सगळ्या भागातील एकूण चार हजार एकर जमीन वक्फ बोर्डाच्या नावावर आहे. महाराष्ट्रातील काही छोट्या मोठया शहरात देखील वक्फ बोर्डने लोकांच्या जमिनी घेतल्या आहेत. अशा सर्वांनी जमिनीची कागदपत्रे घेऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वक्फ बोर्ड महाराष्ट्रसाठी खासदार मेधा कुलकर्णी 'जे पी सी मेंबर म्हणून काम पाहणार आहेत. खासदार कुलकर्णी यांच्याकडे अखिल भारतीय ग्राहक पंचायत म्हणणे सादर करणार आहेत.‌ संपर्क अखिल भारतीय ग्राहक पंचायत ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०. मोफत मार्गदर्शन दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३० www.abgpindia.com इतर संपर्क क्रमांक विजय सागर 9422502315 श्री विलास लेले 9823132172 श्रीमती विजया वाघ 9075132920 श्री रवींद्र वाटवे 9422383785 श्रीमती राजश्री दीक्षित 9422318909 श्री सुनील नाईक 9890330246 श्री रवींद्र सिन्हा, बाणेर 7774001188 श्री अरुण नायर,विश्रांतवाडी 9890652675 ठाणे स्मिता जामदार 9819438286, दिपक सावंत 9833398012 डोंबिवली राजेंद्र बंडगर 9975712153 विदर्भ प्रांत यवतमाळ डॉ. नारायण मेहेरे 7038358466 भंडारा श्री नितिन काकडे 9423605672 नागपूर श्री विलास ठोसर 7757009977 कोकण प्रांत सौ वेदा प्रभूदेसाई 9075674971 देवगिरी परभणी श्री विलास मोरे 09881587087 मध्य महाराष्ट्र प्रांत श्री बाळासाहेब औटी 9890585384 कोल्हापूर श्री सुहास गुरव 09420493001 सांगली श्री.सर्जेराव सूर्यवंशी, मो.9763722243 सातारा श्री जयदीप ठुसे, 9767666346 श्री केदार नाईक 9665571855 सोलापूर श्री.शशिकांत हरिदास, मो.9423536395 जळगांव डॉ. अनिल देशमुख, मो.7588011327 नगर श्री. अतुल कुऱ्हाडे, मो.9420642021 *नाशिक* श्री हिरा जाधव 9823599957 *धुळे* श्री. हरीश जाधव, मो. 7798439555 *नंदुरबार* श्रीम.वदंना तोरवणे, मो .9156972786 ।।।। *सर्व महाराष्ट्रात हा मेसेज तत्काळ पसरवावा, हि विनंती.*

दोन दिवसीय स्टार्टअप प्रदर्शन

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे दोन दिवसीय स्टार्टअप प्रदर्शन डोंबिवली, दि.३१ मे टिळक नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आज आणि उद्या (३१ मे व १ जून) डोंबिवलीत नव उद्योजकांसाठीचे स्टार्टअप प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे यंदा पाचवे वर्ष आहे.हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ यावेळेत सर्वेश सभागृह, तळमजला, डोंबिवली पूर्व येथे भरविण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी २५ विविध प्रकारचे उद्योजक प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य आहे.

'आयटीआय'ऑनलाईन प्रवेश; आत्तापर्यंत ९९ हजार ४९४ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल

'आयटीआय'ऑनलाईन प्रवेश; आत्तापर्यंत ९९ हजार ४९४ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल मुंबई, दि. ३१ मे 'आयटीआय'ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या पंधरा दिवसांत सुमारे ९९ हजार ४९४ विद्यार्थांनी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी ८७ हजार ३१२ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून आपले अर्ज निश्चित केले असून ३५ हजार १२८ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले आहेत. आयटीआयच्या प्रवेशासाठी यंदाच्या वर्षी ४१९ शासकीय आयटीआयमध्ये ९३ हजार व ५८८ अशासकीय आयटीआयमध्ये ६१ हजार अशा एकूण १ लाख ५४ हजार जागा आहेत. एक वर्ष कालावधीचे ४४ अभ्यासक्रम व दोन वर्ष कालावधीचे ३६ अभ्यासक्रम असून या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १५ मेपासून https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

रवींद्र वर्माने युद्धनौका व पाणबुड्यांची माहिती पुरविली

रवींद्र वर्माने मुंबई गोदीतील युद्धनौका व पाणबुड्यांची माहिती पाकिस्तानी तरुणीला पुरविली मुंबई, दि ३१ मे भारतीय नौदलाची गोपनीय माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्याला पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला ठाण्यातील अभियंता रवींद्र वर्मा याने मुंबई गोदीतील युद्धनौका व पाणबुड्यांची संवेदनशील माहिती, रेखाचित्र व ध्वनिफीत नोट्स स्वरूपात दिल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे.दहशतवाद विरोधी पथक अधिक तपास करत आहे. पाकिस्तान ‘इंटेलिजन्स ऑपरेटीव्ह’ला मुंबई नौदलाच्या प्रतिबंधित क्षेत्राची माहिती दिल्याच्या आरोपाखाली कळवा येथे राहणाऱ्या अभियंता वर्मा याला राज्य दहशतवादविरोधी पथकाने अटक केली‌. तो नवी मुंबईतील बेलापूर येथील खासगी कंपनीत कनिष्ठ अभियंता म्हणून काम करीत होता. तंत्रज्ञानाशी संबंधित असलेली ही कंपनी मुंबई नौदल गोदीला सेवा पुरविते. त्यानिमित्ताने वर्मा नौदल गोदीत येत जात होता.त्याच्याकडे नौदल गोदीचे नकाशे व छायाचित्रे मिळाल.समाज माध्यमावरून वर्माच्या संपर्कात असलेल्या एका तरुणीला ही माहिती त्याने पुरविली. ही तरुणी पाकिस्तानी गुप्तचर असल्याचा संशय असून हा 'हनी ट्रॅप'चा प्रकार असल्याचेसांगण्यात येत आहे.

शेजो न्यूज ॲण्ड व्ह्यूज ब्लॉग लवकरच नव्या स्वरूपात

लवकरच नव्या स्वरूपात नमस्कार, मी शेखर जोशी माझा https://shejonewsandviews.blogspot.com शेजो न्यूज ॲण्ड व्ह्यूज ब्लॉग लवकरच नव्या स्वरूपात सादर करत आहे.

सोमवार, २६ मे, २०२५

डोंबिवलीकर रमले 'अक्षरांच्या बागेत'!

डोंबिवलीकर रमले 'अक्षरांच्या बागेत'! -निनाद आजगावकर आणि सहकारी यांची भावसंगीत मैफल -तीन पिढ्यांनी सादर केली 'टाळ मृदंगाची धून' डोंबिवली, दि. २६ मे स्वरनिनाद आणि संगीतज्ञानानंद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'अक्षरांच्या बागेत' या मराठी भाव संगीताच्या मैफलित डोंबिवलीकर मंत्रमुग्ध झाले. गायक निनाद आजगावकर आणि सहकारी गायकांनी अविट गोडीची सुरेल मराठी गाणी सादर केली. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ठ्य म्हणजे ज्येष्ठ गायक व संगीतकार वसंत आजगावकर, त्यांचे सुपुत्र निनाद, निनाद यांच्या कन्या नीरजा या तीन पिढ्यांनी 'आली कुठुनशी कानी साद टाळ मृदुंगाची धून' हे अजरामर गाणे सादर केले. सर्वेश सभागृहात शनिवारी झालेल्या कार्यक्रमात मराठी भावसंगीताच्या सुवर्ण काळातील एकाहून एक अविट गाणी निनाद आजगांवकर, डॉ. शिल्पा मालंडकर आणि नीरजा आजगांवकर यांनी सादर केली. मिलिंद परांजपे ( कीबोर्ड), तुषार आग्रे (तबला), मनीष भुवड (हँडसॉनिक) यांनी संगीत साथ केली तर रश्मी आमडेकर यांनी निवेदन केले. ज्येष्ठ गायक वसंत आजगावकर कार्यक्रमास उपस्थित होते. श्रोत्यांच्या आग्रहावरून त्यांना व्यासपीठावर बोलावण्यात आले. कवी सोपानदेव चौधरी यांनी लिहिलेले आणि स्वतः आजगावकर यांनी संगीतबद्ध केलेले व गायलेले 'आली कुठूनशी कानी, टाळ मृदुंगाची धून' हे अजरामर गाणे स्वतः आजगावकर, निनाद, नीरजा या तीन पिढ्यांनी सादर केले. उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आपली दाद दिली. मराठी भावसंगीतात अमूल्य योगदान देणारे गीतकार, संगीतकार यांची लोकप्रिय तसेच अपरिचित गाणी कार्यक्रमात सादर करण्यात आली.

कॅलिफोर्निया येथे तीन दिवसीय 'नाफा' मराठी चित्रपट महोत्सव

कॅलिफोर्निया येथे तीन दिवसीय 'नाफा' मराठी चित्रपट महोत्सव मुंबई, दि. २६ में सॅनहोजे, कॅलिफोर्निया येथे येत्या २५ ते २७ जुलै या कालावधीत नाफा' मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. देऊळ' आणि 'भारतीय' चित्रपटांचे निर्माते अभिजीत घोलप यांच्या संकल्पनेतून 'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोशिएशन'ची (नाफा) स्थापना करण्यात आली आहे. गेल्यावर्षी पहिला 'नाफा' मराठी चित्रपट महोत्सव पार पडला होता. उत्तर अमेरिकेत आणि कॅनडामध्ये वास्तव्यास असणाऱ्या सुमारे साडेपाच लाख मराठी माणसांपर्यंत मराठी चित्रपट पोहचविण्याचा प्रयत्न 'नाफा'च्या माध्यमातून घोलप करत आहेत. गेल्या वर्षीपासून दर महिन्याला एक मराठी चित्रपट 'उत्तर अमेरिका - कॅनडा'मध्ये प्रदर्शित होत आहेत. ‘गुलकंद’, ‘सुजित सुशीला’, ‘संगीत मानापमान’, ‘चिकीचीकी बुबुम्बुम’, ‘पाणी’, ‘गुलाबी’, ‘नवरा माझा नवसाचा २’, ‘अशी ही जमवा जमावी’, ‘स्थळ’, ‘सलतात रेशीम गाठी’ इत्यादी चित्रपट आतापर्यंत अमेरिका आणि कॅनडामधील चित्रपटगृहांमध्ये महाराष्ट्रातील प्रदर्शनाच्याच दिवशी प्रदर्शित करण्यात आले होते. महाराष्ट्रातील मातब्बर निर्मिती व वितरण संस्थांसोबत नाफाने करार केले आहेत. आमच्या 'देऊळ’ चित्रपटाला राष्ट्रीय सुवर्ण-कमळ पुरस्कार मिळाल्यानंतर उत्तर अमेरिकेत मराठी चित्रपटसृष्टी स्थापन करावी असा विचार मनात होता. या विचाराशी सहमत असलेले पाचशेहून अधिक सदस्य अल्पावधीतच या कामाशी जोडले गेले. दोन लघुपटाची निर्मिती करण्याचे ध्येय ठेवून ‘फिल्म क्लब’च्या तयारीला लागलो. अनेक कलावंत, दिग्दर्शक, नृत्यदिग्दर्शक, गायक, कवी, सिनेमॅटोग्राफर्स, संकलक यांनी फिल्म क्लबमध्ये नोंदणी केली. त्यासाठी दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांची कार्यशाळा आयोजित केली. याशिवाय टॉक शोज, डॉ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, डॉ. सलील कुलकर्णी, सचिन खेडेकर, समीर चौघुले, अभिजीत देशपांडे यांच्या कार्यशाळा, चर्चासत्रांच्या माध्यमातून आमचे काम सुरू असल्याचे घोलप यांनी सांगितले. यावर्षीच्या 'नाफा''मराठी चित्रपट महोत्सवात डॉ. मोहन आगाशे, अमोल पालेकर, सचिन खेडेकर, महेश कोठारे, अश्विनी भावे, सोनाली कुलकर्णी (ज्येष्ठ), अवधूत गुप्ते, आदिनाथ कोठारे, वैदेही परशुरामी आणि मधुर भांडारकर उपस्थित राहणार आहेत. महोत्सवासाठी अमेरिकेतील ‘बीएमएम’च्या ५७ महाराष्ट्र मंडळांचे सहकार्य लाभले आहे.

रविवार, २५ मे, २०२५

'काश्मीर सद्यस्थिती आणि भविष्यातील योजना'

हम चॅरिटेबल ट्रस्टतर्फे 'काश्मीर सद्यस्थिती आणि भविष्यातील योजना' विषयावर कार्यक्रम - 'हम' कार्यकर्त्यांचा सीमा भागात पाहणी दौरा डोंबिवली, दि. २५ मे हम चॅरिटेबल ट्रस्टतर्फे येत्या ४ जून रोजी 'जोडो जम्मू काश्मीर- सद्यस्थिती आणि भविष्यातील योजना' विषयावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात 'हम'चे कार्यकर्ते सीमाभागातील पाहणी दौऱ्यातील आपले अनुभव सांगणार आहेत. पहेलगाम हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' च्या माध्यमातून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले.‌ पाकिस्तानने जम्मू, अखनूर, नौशेरा, राजोरी, पूँछ, उरी, कुपवाडा, तंगधार या सीमावर्ती भागात ड्रोन, मिसाईल्स, मोरटार, इ. ने शेलिंग, फायरिंग केले. सीमेवरील आपल्या नागरिकांनी त्याला धैर्याने तोंड दिले. मात्र त्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागली. 'हम' चे कार्यकर्ते वरील भागात फिरून याचा आढावा घेत आहेत. सीमा भागातील हा दौरा, तेथील अनुभव 'हम'चे कार्यकर्ते कार्यक्रमात सविस्तर सांगणार असून एकूणच 'काश्मीर सद्यस्थिती आणि भविष्यातील योजना' या विषयावरही कार्यक्रमात दृकश्राव्य माध्यमातून चर्चा, संवाद होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार, व्याख्याते मकरंद मुळे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता सर्वेश सभागृह, तळमजला, डोंबिवली पूर्व येथे होणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन हम चॅरिटेबल ट्रस्ट डोंबिवलीचे अध्यक्ष सुनील देशपांडे यांनी केले आहे.

खगोल अभ्यासकांचे संमेलन डिसेंबरमध्ये ठाणे येथे होणार

खगोल अभ्यासकांचे संमेलन डिसेंबरमध्ये ठाणे येथे होणार - खगोलशास्त्र जीवन गौरव पुरस्कार भरत अडूर यांना जाहीर ठाणे, दि. २५ मे खगोल अभ्यासकांचे १४ वे राज्यस्तरीय संमेलन येत्या २० व २१ डिसेंबर रोजी ठाणे येथे आयोजित करण्यात येणार आहे.‌ संमेलनात यंदाचा खगोलशास्त्र जीवनगौरव पुरस्कार नेहरू तारांगणातील निवृत्त शास्त्रज्ञ भरत अडूर यांना देण्यात येणार आहे.‌ मराठी खगोल अभ्यासक मंडळ कार्यकारिणीची सभा शनिवारी ठाणे येथे झाली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने हे संमेलन घेण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. दिवंगत खगोलशास्रज्ञ आणि लेखक डाॅ. जयंत नारळीकर यांनी विश्वनिर्मिती सिद्धांतसंबंधित संशोधन केले होते. डिसेंबरमध्ये होणा-या खगोल अभ्यासकांच्या संमेलनात डॉ.‌ नारळीकर यांच्या विश्वनिर्मिती सिद्धांतसंबंधित एक व्याख्यान तसेच एस्ट्राॅइड, गगनयान, आधुनिक दुर्बिणी वगैरे विषयांवर तज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. संमेलनाच्या निमित्ताने रात्री आकाश दर्शन कार्यक्रमही होणार आहे. शनिवारी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेस संस्थेचे अध्यक्ष दा.कृ.सोमण यांच्यसह छत्रपती संभाजी नगर येथील तारांगणाचे श्रीनिवास औंधकर, मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह प्रा. नामदेव मांडगे, पिंपरी चिंचवड तारांगणाचे कासार, नारायणगाव येथील रेडिओ दुर्बिणीचे सुधीर फाकटकर, कल्याण आकाशमित्र संस्थेचे हेमंत मोने, नाशिकचे सचिन मालेगावकर, नेहरू तारांगणाचे निवृत्त शास्त्रज्ञ भरत अडूर उपस्थित होते.

शनिवार, २४ मे, २०२५

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचा समारोप

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचा समारोप; भारतासह २३ देशांतील ३० हजार हिंदूंचा सहभाग फोंडा, गोवा, २४ मे येथे आयोजित करण्यात आलेल्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाची सांगता झाली.‌आगामी काळात भारताला हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी आपण सर्वांनी आवश्यक ते प्रत्येक पाऊल उचलून संघटित राहिले पाहिजे,असे आवाहन तेलंगणा येथील हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजासिंह यांनी महोत्सवाच्या सांगताप्रसंगी केले. सनातन संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आणि संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.भारतासह जगभरातील २३ देशांतून आलेले सुमारे ३० हजार हिंदू धर्मप्रेमी आणि साधक या महोत्सवात सहभागी झाले होते.
महोत्सवात विविध आध्यात्मिक,राष्ट्रहितकारी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय सैन्य, सनातन धर्मप्रेमी आणि राष्ट्ररक्षणासाठी महोत्सवात शतचंडी याग तसेच समस्त सनातन हिंदु धर्मियांना चांगले आरोग्य लाभावे यासाठी महाधन्वंतरी यज्ञही आयोजित करण्यात आला होता.देशभरात राष्ट्र अन् धर्म कार्य करणार्‍या २५ जणांना ‘हिंदु राष्ट्ररत्न’ आणि ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हे पुरस्कार आता दरवर्षी दिले जाणार आहेत. महोत्सवात कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांचा जीवनपट कीर्तनाच्या माध्यमातून उलगडला.श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरिजी, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रविंद्र पुरीजी महाराज, अयोध्या हनुमानगढी येथील महंत राजू दास, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपादजी नाईक, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, माजी केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर, तसेच काशी-मथुरा येथील मंदिरांचा खटला लढवणारे सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्यासह अनेक मान्यवर महोत्सवात सहभागी झाले होते.

मान्सून केरळमध्ये दाखल!

मान्सून केरळमध्ये दाखल! नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाला असल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने शनिवारी केली. याआधी २००९ मध्ये मान्सून केरळात २३ मे रोजी दाखल झाला होता. त्यानंतर खूप वर्षांनी मान्सून इतक्या लवकर केरळात दाखल झाला आहे. दरवर्षी १ जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा मान्सून यंदाच्या वर्षी आठवडाभर आधीच केरळमध्ये दाखल झाला आहे. आता पुढील चार ते पाच दिवसांत मान्सून कोकणात आणि येत्या १ जूनपर्यंत मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.

ॲप आधारित टॅक्सी भाडेवाडीवर मर्यादा

ॲप आधारित टॅक्सी भाडेवाडीवर मर्यादा मुंबई,दि. २४ मे सोनू उत्सव तसेच गर्दीच्या वेळी होणारी प्रवाशांची लुटमार रोखण्यासाठी राज्य शासनाने मुंबईसह राज्यात आधारित टॅक्सीच्या अवास्तव भाडेवाढीवर मर्यादा घातली आहे.‌ मागणी वाढल्यानंतर मूळ भाडेदरात १.५ पट मर्यादेपर्यंतच भाडेबाड करता येणार आहे आणि तसे बल ॲप आधारित प्रवासी सेवांच्या नियमात करण्यात आले आहेत. मंगळवारपासून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. नैऋत्य मान्सून रविवारी केरळमध्ये पुणे, दि. २४ मे नैऋत्य मोसमी पाऊस रविवारी २५ मे रोजी केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.‌ गेल्या वर्षी नैऋत्य मान्सून ३० मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता.‌ येत्या १५ जूनपर्यंत देशातील अनेक भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.
मतदान केंद्राबाहेर भ्रमणध्वनी ठेवण्यासाठी सोय मुंबई, दि.२४ मे मतदारांच्या सोयीसाठी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर भ्रमणध्वनी ठेवण्याची सुविधा निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भ्रमणध्वनीचा वाढता वापर आणि मतदानाच्या दिवशी येणाऱ्या अडचणीचा विचार करून भ्रमणध्वनी ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मुरुड जंजिरा किल्ला बंद होणार अलिबाग, दि. २४ मे आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर येत्या २६ मे पासून मुरुड जंजिरा किल्ला बंद करण्यात येणार आहे अशी माहिती पुरातत्त्व विभागाने दिली आहे. दरवर्षी पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राजपुरी खाडीतील मुरुड जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी पुरातत्व विभाग व मेरिटाईम बोर्डाकडून बंद ठेवण्यात येतो. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची येत्या २९ जूनला निवडणूक कल्याण, दि. २४ मे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या २९ जून रोजी होणार आहे. बाजार समितीच्या १८ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. २६ मेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली अंतिम मतदार यादी १४ मे रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पनवेल शहरात बुधवार, गुरुवार पाणी पुरवठा बंद पनवेल, दि. २४ मे पनवेल शहराचा पाणीपुरवठा बुधवार २८ मे ते गुरुवार २९ मे रोजी सकाळी ९ ते गुरुवारी रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.‌ त्यामुळे या कालावधीत पनवेल शहरात कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होईल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कळविले आहे.

गुरुवार, २२ मे, २०२५

शंखनाद महोत्सवात शिवकालीन शस्त्र प्रदर्शन

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात शिवकालीन दुर्मिळ शस्त्र प्रदर्शन फोंडा, गोवा, दि. २३ मे येथे आयोजित करण्यात आलेल्या‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त भरविण्यात आलेले शिवकालीन ऐतिहासिक आणि दुर्मिळ शस्त्रांचे भव्य प्रदर्शन विशेष आकर्षण ठरले. सुमारे सहा हजार चौरसफूट क्षेत्रात हे प्रदर्शन मांडण्यात आले होते.‌ प्रदर्शनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज,धर्मवीर संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण झाले.
प्रदर्शनात कोल्हापूरच्या सव्यासाची गुरुकुलम आणि पुण्याच्या शिवाई संस्थान यांचे शस्त्रप्रदर्शन, गोव्यातील सौंदेकर घराण्याची प्राचीन शस्त्रे, तसेच सरदार येसाजी कंक यांची तलवार आणि सरदार कान्होजी जेधे यांच्या चिलखताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने बंदिस्त करताना वापरलेले मूळ साखळदंड शिवले कुटुंबाने पिढ्यान्‌पिढ्या जतन केले आहेत.ते साखळदंडही प्रदर्शनात पाहायला मिळाले.
शिवले कुटुंबातील वंशज सर्वश्री सागर शिवले, कुमार शिवले, सोमनाथ शिवले, दीपक टाकळकर, वेदांत शिवले यांचा हिंदु जनजागृती समितीचे पूर्वाेत्तर भारताचे धर्मप्रचारक नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
शिवकालीन युद्धकलेत वापरण्यात येाऱ्या विविध प्रकारच्या तलवारी, बंदुका, ढाली, जांबिया, तोफा, कट्यारी, चिलखत, शिरस्त्राण, भाले, कुर्‍हाडी, त्रिशूल, अंकुश, सिकल, पुरबा इत्यादीं प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या सैन्यातील विविध सरदारांच्या पराक्रमाची सचित्र माहितीही प्रदर्शनात सादर करण्यात आली.

मंगळवार, २० मे, २०२५

हिंदूंचे राजनितीकीकरण आणि राजनीतीचे सैनिकीकरण आवश्यक

फोंडा,गोवा, दि. २० मे हिंदूंचे राजनितीकीकरण आणि राजनीतीचे सैनिकीकरण होणे आवश्यक असून हिंदू बलशाली व्हायलाच हवा, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी येथे केले. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात‘सनातन राष्ट्र आणि डॉ. जयंत आठवले यांचे विविधांगी कार्य'या सत्रात ते ‘सनातन राष्ट्राची सुरक्षा’ या विषयावर बोलत होते. ‘चाणक्य फोरम’चे मुख्य संपादक तथा सेवानिवृत्त मेजर गौरव आर्य,पंजाब गोरक्षक दलाचे संस्थापक अध्यक्ष सतीश प्रधान, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक नंदकुमार जाधव,हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याचे समन्वयक सुनील घनवट व्यासपीठावर उपस्थित होते. स्वातंत्र्यानंतर देशात सत्तेवर आलेल्या सरकारने याकडे लक्ष दिले नाही. हिंदू बलशाली होण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे देशाचे अवमूल्यन झाले, असेही सावरकर म्हणाले. राष्ट्राचे रक्षण शस्त्रानेच करावे लागते. साधूसंतांच्या रक्षणासाठी श्रीरामाचा जन्म झाला. मुघलांचे आक्रमण वाढल्यानंतर हिंदूंच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज, गुरुगोविंदसिंग यांचा जन्म झाला, असे गौरव आर्य यांनी सांगितले. हिंदूंना धर्मशिक्षण प्राप्त व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीने धर्मशिक्षणवर्ग सुरू केले सद्यस्थितीत देशात समितीच्या वतीने ५०० ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग चालू आहेत, अशी माहिती नंदकुमार जाधव यांनी दिली. पंजाब गोरक्षक दलाचे संस्थापक अध्यक्ष प्रधान म्हणाले, महाराष्ट्रात गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्यात आला, त्याप्रमाणे हिंदूंच्या आस्थेचा विचार करून सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या निमित्ताने गोवा सरकारनेही गोमातेला राज्यमातेचा दर्जा द्यावा.

प्रत्येक मंदिर मुक्तीसाठी हिंदूंचा सहभाग अत्यावश्यक - अधिवक्ता विष्णु जैन

काशी, मथुराच नव्हे, तर प्रत्येक मंदिर मुक्तीसाठी हिंदूंचा सहभाग अत्यावश्यक - अधिवक्ता विष्णु जैन फोंडा, गोवा, दि. २० मे अहिंदूंचे एकही प्रार्थस्थळ, श्रद्धास्थान सरकारच्या नियंत्रणात नाही, पण प्रत्येक राज्यातील हिंदूंची मंदिरे विविध कायद्यांद्वारे सरकारच्या नियंत्रणात आहेत. काशी-मुथरा येथील मंदिरांच्या मुक्तीचा कायदेशीर लढा आम्ही देत आहोत. मात्र हे पुरेसे नसून देशातील प्रत्येक मंदिर मुक्त करण्याच्या लढ्यात हिंदूंचा सहभाग अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी केले. सनातन संस्थेने आयोजित केलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त ते बोलत होते. ‘सेव कल्चर सेव भारत फाऊंडेशन’चे उदय माहुरकर, लेखक आणि विचारवंत नीरज अत्री, तसेच हिंदु जनजागृती समितीचे रमेश शिंदे, सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक उपस्थित होते. ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ या ‘ई’ बुकचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. बहुसंख्य हिंदूंना धर्माच्या आधारावर कोणत्याच सुविधा मिळत नाही; याउलट अल्पसंख्यांक म्हणून अन्य धर्मियांना मात्र ‘अल्पसंख्यांक आयोगा’कडून ३ हजार २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांच्या सुविधा मिळतात. उत्तर प्रदेश येथील अल्पसंख्याकांच्या एक वैद्यकीय शिक्षण संस्थेत प्रवेश मिळण्यासाठी हिंदू धर्मांतर करून प्रवेश घेत आहेत, इतकी गंभीर स्थिती आहे. ‘वक्फ बोर्डा’त केवळ २ अहिंदू सदस्य घेतले, तर लगेच ‘सरकार असे करू शकत नाही’, असा न्यायालय निर्णय देते, याकडेही जैन यांनी लक्ष वेधले. सध्या सोशल मीडिया, ‘ओटीटी’, चित्रपट यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक आक्रमण होत आहे. सनातन संस्कृती, पुढील पिढी वाचण्यासाठी हे सांस्कृतिक आक्रमण रोखणे आवश्यक असल्याचे माहूरकर यांनी सांगितले. अत्री म्हणाले, सध्या समाजात पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करण्यात अनेक जण धन्यता मानत आहेत. सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी हिंदूंच्या डोक्यावर बसलेले पाश्चिमात्यांच्या अंधानुकरणाचे भूत उतरविणे आवश्यक आहे. बांगलादेशात सरकारविरोधी आंदोलनात हिंदूंनाच मारण्यात आले. काश्मीर, केरळ आणि बंगाल येथून हिंदूच संपत चालले आहेत. पहेलगाम येथेही धर्म विचारून हिंदूंची हत्या करण्यात आली. प्रत्येक ठिकाणी हिंदूंनाच लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे आता केवळ जागृती करत बसण्यापेक्षा त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे शिंदे म्हणाले.

सोमवार, १९ मे, २०२५

शंखनाद महोत्सवात सनातन धर्माचा ध्वज फडकला !

शंखनाद महोत्सवात सनातन धर्माचा ध्वज फडकला! फोंडा,गोवा, दि. १९ मे येथे सुरू असलेल्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या हस्ते सनातन धर्माच्या ध्वजाचे आरोहण करण्यात आले. यावेळी शंखनाद आणि वेदमंत्रांचा जयघोष करण्यात आला. हा ध्वज राजकीय किंवा संविधानिक नसून आध्यात्मिक स्वरूपाचा ‘धर्मध्वज’ आहे. ‘सनातन हिंदु राष्ट्राची स्थापना’या ध्येयाची जाणीव करून देईल.महाभारत युद्धात श्रीकृष्ण आणि अर्जुन ज्या रथावर आरुढ झाले होते, त्या रथावर बसून हनुमंताने जो ध्वज हातात धरला होता, तो सनातन धर्माचा ध्वज होता. हनुमंताचा रंग शेंदरी म्हणजे केशरी आहे, म्हणून सनातन राष्ट्राचा ध्वज केशरी रंगाचा आहे. या ध्वजावर ‘कल्पवृक्षाच्या खाली कामधेनु उभी आहे’, असे चित्र आहे. कल्पवृक्ष आणि कामधेनु ही दोन्ही ‘समृद्धी, पालन-पोषण, संरक्षण अन् श्रीविष्णूचा अभय वरदहस्त’ यांची प्रतिके आहेत. डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी बिंदा नीलेश सिंगबाळ आणि अंजली मुकुल गाडगीळ यांच्यासह सनातनचे संत, साधक, कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्राची बदललेली भाषा आणि वाणी क्लेशदायक- माजी न्यायमूर्ती धर्माधिकारी

महाराष्ट्राची बदललेली भाषा आणि वाणी क्लेशदायक - माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी मुंबई, दि. १९ मे महाराष्ट्राची बदललेली सामाजिक, राजकीय संस्कृती, भाषा आणि वाणी क्लेशदायक असून हे चित्र बदलण्यासाठी आपण सर्वांनी सामूहिक प्रयत्न करू या, असे आवाहन माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी रविवारी येथे केले. ज्येष्ठ निवृत्त नाट्य व्यवस्थापक, रंगकर्मी यांच्या संकल्पनेतून साकारलेले 'अध्यक्ष नसलेले 'माझे' असेही एक पत्रकार संमेलन' दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे साजरे झाले. त्या संमेलनात धर्माधिकारी बोलत होते. विविध मराठी वृत्तपत्रातील जुने, नवे आणि ज्येष्ठ पत्रकार संमेलनास उपस्थित होते. सामान्य माणसालाही सामान्य माणसासारखे वागता येत नाही, बोलता येत नाही. ही मुळ्ये काकांची फार मोठी खंत आहे. लोकं असे का वागतात, का बोलतात? फक्त युद्धजन्य परिस्थिती आली की आपण सर्व एकत्र येतो. बाकीच्या वेळी एकत्र का येऊ शकत नाही ? महाराष्ट्रात सध्या भाषा आणि वाणीचे हे जे काही झाले आहे ती मुळ्ये काकांची वेदना आहे, आपण सर्व पत्रकार आहात, आज ती वेदना मी आपल्यापर्यंत पोहोचवित आहे, असेही धर्माधिकारी म्हणाले. मुळ्ये काकांना सुचणा-या कल्पना भन्नाट असतात. आगळे वेगळे कार्यक्रम, संमेलने आयोजित करून ते आपल्याला जे काही देतात त्याचे मोल करता येणार नाही. ते अनमोल आहे. मुळ्ये काकांसारख्या व्यक्ती समाजासाठी आवश्यक असतात. आपण त्यांच्या कायम ऋणात राहिले पाहिजे, असे माझ्या वडिलांनी मला सांगितले होते, मी तोच प्रयत्न करतो, असेही धर्माधिकारी यांनी सांगितले. माध्यमांपासून खरेतर न्यायालयांनी दूर राहिले पाहिजे. नागरिकांचे जे काही म्हणणे असते ते कोणालाच समजत नसते. काही जागरूक पत्रकार/ प्रसार माध्यमांच्यामार्फत ते न्यायाधीश/ न्यायालयापर्यंत पोहोचत असते‌. पण तरीही तो संबंध चांगला नाही. आज बरेचदा काय होते की भावनेच्या भरात लोकं काहीही बोलतात. त्याने न्यायालयाचा अवमान होत नाही, पण ती संधी मिळू शकते‌. आणि ते झाले की जे अपरिमित नुकसान होते ते भरता येत नाही, अशी खंतही धर्माधिकारी यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा आचार्य अत्रे पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांना जाहीर झाला आहे.‌ त्यानिमित्ताने रविवारच्या पत्रकार संमेलनात धर्माधिकारी यांच्या हस्ते म्हात्रे यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना म्हात्रे म्हणाले, तीन दशकांच्या पत्रकारितेत खूप शिकायला मिळाले. समाजाबरोबरच स्वतःला बदलण्याचे सामर्थ्य पत्रकारितेत आहे. मुळ्ये काका हे एक वेगळेच रसायन असून त्यांच्या सारखी निस्पृह वृत्तीने काम करणारी माणसे विरळाच. उपेक्षितांच्या अंतरंगात डोकावून पाहण्याचे त्यांचे काम खूप मोठे आहे. एबीपी माझाचे प्रसन्न जोशी यांनी म्हात्रे यांचा परिचय करून दिला. 'माझ्या खिशात दमडा नाही पण ज्यांच्या खिशात दमडा आहे ते सारे माझ्या खिशात आहेत', अशा शब्दांत शाब्दिक फटकेबाजीने सुरुवात करत पत्रकार संमेलन घेण्यामागील संकल्पना आणि आजवर आयोजित केलेले अनेक आगळे वेगळे कार्यक्रम, संमेलने, उपक्रम याची सविस्तर माहिती मुळ्ये काकांनी दिली.
अनेक मंडळी, संस्था माझ्यावर भरभरून प्रेम करतातच आणि माझ्या सर्व कार्यक्रमांना सढळ हस्ते आर्थिक मदतही करतात.‌आजवर केलेल्या सर्व कार्यक्रमांना प्रसिद्धी देऊन ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सर्व वृत्तपत्रे, वृत्तपत्रांचे संपादक आणि पत्रकारांनी केले आहे. या सर्वांच्या सहकार्यानेच आपण हे कार्यक्रम करत असतो. आजवरच्या आयुष्यात या सर्व मंडळींच्या विश्वासाला मी तडा जाऊ दिला नाही, आणि यापुढेही जाऊ देणार नाही. या सर्वांचा मी ऋणी आहे, असेही मुळ्ये काकांनी सांगितले. संमेलनात विद्या करलगीकर, डॉ.शिल्पा मालंडकर आणि प्रसिद्ध गायक श्रीरंग भावे यांनी अविट गोडीची मराठी भावगीते व चित्रपट गीते सादर केली. त्यांना प्रसाद पंडित (तबला) व सागर साठे (संवादिनी) यांनी संगीतसाथ केली. ' या सुखानो या' गाण्याने सुरू झालेल्या मैफलीची सांगता श्रीरंग भावे यांनी गायलेल्या विविध अभंगांच्या मेडलीने झाली.
-शेखर जोशी १९ मे २०२५

हिंदू राष्ट्राची स्थापना ही समष्टी साधनाच-डॉ. जयंत आठवले

हिंदू राष्ट्राची स्थापना ही समष्टी साधनाच-डॉ. जयंत आठवले फोंडा, गोवा, दि. १८ मे स्वत: साधना करणे ही व्यष्टी साधना, तर समाजाला साधनेला लावणे, ही समष्टी साधना आहे. सनातन संस्था समष्टी साधना शिकवते, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी रविवारी येथे केले. गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त डॉ. आठवले बोलत होते. सर्वच समाज सात्त्विक झाला, तर हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर होईल. हिंदु राष्ट्राची स्थापना, ही समष्टी साधना आहे, त्यासाठी सर्वांनी साधना करावी, हे सांगण्यासाठी समाजात जायला हवे, असेही डॉ. आठवले यांनी सांगितले. समाजातील डॉ. केवळ शारीरिक आणि मानसिक आजारावर औषध देतात; मात्र अनिष्ट शक्तींच्या त्रासासह अनेक रोग हे स्वभावदोष, प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास यांमुळे होतात. हे त्यांना माहितच नसते. त्यामुळे या त्रासावर त्यांच्याकडे कोणतीच उपाययोजना नसते. परिणामी अनिष्ट शक्तींचा त्रास दूर करण्यासाठी नामजप अर्थात् साधनाच करावी लागते, असेही डॉ. आठवले म्हणाले. विविध संप्रदाय, संत व मान्यवरांकडून डॉ. आठवले यांचा सन्मान करण्यात आला.

अधर्माचा प्रतिकारासाठी समाज घडविण्याची आवश्यकता- स्वामी गोविंद देवगिरीजी

अधर्माचा प्रतिकार करण्यासाठी समाजाला तयार करण्याची आवश्यकता- स्वामी गोविंद देवगिरीजी फोंडा, गोवा, दि. १८ मे अधर्माचा प्रतिकार करण्यासाठी समाजाला तयार करण्याची आवश्यकता आहे. सनातन धर्माच्या आड येणार्‍या कायद्यांमध्ये बदल करण्याची आवश्यकता असून सनातन धर्माच्या प्रसाराचे कार्य ही साधना, ईश्वराची उपासना आहे, असे प्रतिपादन श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरीजी यांनी रविवारी येथे केले. सनातन संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आणि संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने फोंडा गोवा येथे तीन दिवसीय सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवातील ‘सनातन राष्ट्र संकल्प’ सभेत ते बोलत होते. सनातन संस्थेचे संपूर्ण कार्य आध्यात्मिकतेच्या पायावर उभे असून सनातन संस्था भारत राष्ट्राला एक समजून काम करत आहे. श्रीमद् भगवद्गीता युद्धाच्या भूमीवर सांगितलेला ग्रंथ असून सनातन संस्थेनेही या ग्रंथाप्रमाणेच अध्यात्मापासून युद्धापर्यंत जागृती केली असल्याचे स्वामी गोविंद देवगिरीजी म्हणाले. सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी शक्तीची उपासना करा, असे आवाहन उत्तरप्रदेश विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनी केले. अल्पसंख्यांकांमुळेच लव्ह जिहाद, लँड जिहाद, धर्मांतर यांसह अनेक समस्यांना हिंदू बळी पडत आहेत. प्रतिदिन १० हजार लोकांचे धर्मांतर होत आहे. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण कायदा हाच अनेक समस्यांवर उत्तर आहे, असे अधिवक्ता अश्विनी उपाध्याय यांनी सांगितले. ‘सनातन राष्ट्रा’साठी ‘धर्मदूत’ बनण्याचा संकल्प करू या, असे चारुदत्त पिंगळे म्हणाले. अयोध्या येथील महंत श्री राजूदासजी महाराज, स्वामी बालकानंद गिरीजी महाराज, सुदर्शन वाहिनीचे सुरेश चव्हाणके, स्वामी आनंद स्वरूप, धर्मयशजी महाराज यांनीही मनोगत व्यक्त केले.

शनिवार, १७ मे, २०२५

सनातन संस्थेचे कार्य समाजासाठी दीपस्तंभ - गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला सुरुवात; सनातन संस्थेचे कार्य समाजासाठी दीपस्तंभ - गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत फोंडा,गोवा- दि. १७ मे गेल्या २५ वर्षांपासून सनातन संस्था हिंदू धर्माचा प्रसार करण्याचे मोठे कार्य करत असून सनातन संस्थेचे कार्य समाजासाठी दीपस्तंभाप्रमाणे आहे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी येथे केले. सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष आणि संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने १७ ते १९ मे या कालावधीत फार्मागुडी,फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ.सावंत बोलत होते.
गोवा येथील कुंडई येथील दत्त पद्मनाभ पीठाचे पद्मश्री बह्मेशानंद स्वामीजी, ‘सनातन बोर्ड’चे प्रणेते देवकीनंदन ठाकूर,केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक,भाजपचे गोवा राज्याचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, कर्नाटक येथील म्हैसूर राजघराण्याचे युवराज तसेच म्हैसूरचे खासदार यदुवीर कृष्ण दत्त चामराज वाडीयार, ‘सुदर्शन न्यूज’चे प्रधान संपादक सुरेश चव्हाणके, सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस,अभय वर्तक उपस्थित यावेळी होते. पूर्वी गोव्यात लोक समुद्र तसेच अन्य गोष्टी पाहाण्यासाठी येत होते. गोव्यात सनातन संस्थेचे कार्य सुरू झाल्यानंतर आता नागरिक भारतीय संस्कृती आणि मंदिरे पहाण्यासाठी गोव्यात येतात. गोवा भोगभूमी नसून ही देवभूमी असल्याचे सांगून मुख्यमंत्री डॉ.सावंत म्हणाले, सनातन संस्कृती आणि शंखनाद महोत्सवामुळे येथील अर्थकारण आणि सांस्कृतिक पर्यटन वाढेल, असा विश्वासही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री डॉ.सावंत यांनी गोवा शासनाच्या वतीने डॉ. जयंत आठवले यांना शाल-श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन विशेष सन्मान केला, तर देशाच्या संरक्षण कार्यासाठी डॉ.आठवले यांच्या हस्ते मुख्ममंत्री डॉ. सावंत यांच्याकडे साहाय्यता निधी सुपूर्द करण्यात आला. सनातन राष्ट्राची मुहूर्तमेढ गोवा येथून होत असून हा ऐतिहासिक क्षण आहे, असे केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले.गोवा ही ‘बीच’वर बसण्याची नव्हे,तर परशुरामाची उपासना करण्याची भूमी असल्याचे देवकीनंदन ठाकूर यांनी सांगितले.राम-कृष्ण यांचा आदर्श ठेवून शक्तीची उपासना करा,असे आवाहन ब्रह्मेशानंद स्वामी यांनी केले. सनातन धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी ‘शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले असून हा महोत्सव धर्मभक्तांना आध्यात्मिक बळ,नवचैतन्य आणि ऊर्जा प्रदान करेल, असे चेतन राजहंस यांनी सांगितले.खासदार यदुवीर कृष्ण दत्त चामराज वाडीयार गोव्याचे वीजमंत्री श्री. सुदीन ढवळीकर, भाजपचे गोवा राज्याचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनीही मनोगत व्यक्त केले सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाची अधिक माहिती SanatanRashtraShankhnad.in या संकेतस्थळावर मिळू शकेल.

कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन इमारतीचे रविवारी उदघाटन

कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन इमारतीचे रविवारी उदघाटन कल्याण, दि. १७ मे कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटन रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.‌ राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. नूतन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याणमधील चक्की नाका, सेंट लॉरेन्स स्कूलजवळ, उंबर्डे येथे बांधण्यात आले आहे.‌

शुक्रवार, १६ मे, २०२५

अंदमानला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक उभारणार

अंदमान येथील सेल्युलर जेल परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक उभारणार - सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार पोर्ट ब्लेअर, दि. १६ मे अंदमान येथील सेल्युलर जेल परिसरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे उचित स्मारक व्हावे असा महाराष्ट्र शासनाचा मानस आहे.त्यादृष्टीने राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी शुक्रवारी अंदमान निकोबारचे मुख्य सचिव डॉ चंद्र भूषण कुमार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि सावरकर स्मारकाबाबतची महाराष्ट्र शासनाची भूमिका मांडली. ॲड शेलार अंदमान निकोबार दौऱ्यावर असून त्यांनी सेल्युलर जेल येथे जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ज्या काळ कोठडीत ठेवण्यात आले होते तिथे जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केले. सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी कारावास भोगला त्या सेल्युलर जेलचा परिसर, अंदमान निकोबार या बेटाशी महाराष्ट्रातील तमाम सावरकरप्रेमींच्या असंख्य आठवणी आणि भावना जोडल्या गेल्या आहेत.या परिसरात सावरकरांचे उचित स्मारक व्हावे अशी महाराष्ट्र शासनाची इच्छा आहे.याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही विनंतीपत्र लिहिले असल्याचे ॲड.‌शेलार यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाने सादर केलेल्या स्मारकाच्या प्रस्तावात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि इतर क्रांतिकारकांचे भव्य पुतळे,शिल्पफलक, डिजिटल संग्रहालय आणि माहिती केंद्र उभारण्याची संकल्पना असल्याचे ॲड. शेलार म्हणाले.

'शंखनाद महोत्सवा'च्या निमित्ताने गोव्यात वाहन फेरी

'शंखनाद महोत्सवा'च्या निमित्ताने गोव्यात भव्य वाहन फेरी फोंडा (गोवा), दि. १६ मे फोंडा, गोवा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारपासून सुरू होणा-या 'सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च् निमित्ताने शुक्रवारी येथे भव्य वाहनफेरी काढण्यात आली.दुचाकी, चारचाकी आणि बस गाड्यांचा यात समावेश होता. भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी अरुण देसाई यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन केल्यानंतर फोंडा येथील सनातन आश्रमापासून वाहनफेरीला सुरुवात झाली.पुढे कवळे -तिस्क फोंडा, शांतीनगर जंक्शन, गोवा बागायतदार, फोंडा पोस्ट ऑफीस कार्यलय-फोंडा येथील जुने बसस्थानक-श्री हनुमान मंदिर, कुर्टी-फर्मागुडी येथील किल्ल्याजवळ सांगता झाली. वाहनांवर फडकणारे भगवे ध्वज उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.‘हर हर महादेव’,‘सनातन धर्माचा विजय असो,‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’ अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक म्हणाले, ही वाहनफेरी म्हणजे भक्तीची दिव्य वारी आहे. महोत्सवाच्या अधिक माहितीसाठी तसेच थेट प्रक्षेपण पहाण्यासाठी SanatanRashtraShankhnad.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले.

गुरुवार, १५ मे, २०२५

ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन उडविण्यास मनाई

ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन उडविण्यास मनाई - पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी ठाणे,दि.१५ ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई वस्तू उडवण्यास मनाई करण्यात आली आहे.ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाने याबाबत आदेश जारी केले आहेत. येत्या ३ जूनपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. शहरात काही समाजकंटकांकडून या उपकरणांचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच सार्वजनिक शांतता भंग होऊ नये यासाठी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता २०१३च्या कलम २२३ आणि इतर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी हे आदेश जारी केले आहेत.

बुधवार, १४ मे, २०२५

दृष्टीदोषावर मात करून शार्दुल औटी शाळेत प्रथम

दृष्टीदोषावर मात करून शार्दुल औटी शाळेत ९७.८० टक्के गुण मिळवून प्रथम डोंबिवली, दि. १४ में दृष्टीदोषावर मात करून शार्दुल औटी या विद्यार्थ्यांने दहावीच्या परीक्षेत ९७.८० टक्के गुण मिळवून टिळकनगर शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला. कु.शार्दुल वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून दृष्टीदोषाने ग्रासलेला आहे. शार्दुलच्या डोळ्यांवर दोन शस्त्रक्रिया झाल्या असून आता त्याच्या एकाच डोळ्याला दृष्टी आहे. आपल्या दृष्टीदोषावर जिद्दीने, चिकाटीने मात करून अथक परिश्रमाने त्याने हे यश संपादन केले आहे. स्वबळावर व स्वकर्तृत्वावर परीक्षा देण्याची इच्छा असल्याने दिव्यांग असूनही त्याने परीक्षेसाठी त्यासंदर्भात कोणतीही सवलत घेतली नाही ही बाब विषेश उल्लेखनीय. शार्दुलला विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन आयआयटी संगणक अभियांत्रिकीशाखेत पुढील शिक्षण घ्यायचे आहे. पालक आणि शाळेचे शिक्षक यांच्याकडून शार्दुलला मोलाचे मार्गदर्शन लाभले. शार्दुलच्या यशाबद्दल टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, शाळेचे पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि इतर पालकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मेट्रो लाईन-९ प्रकल्पात रेल्वे आणि उड्डाणपूल एकाच संरचनेत- फडणवीस

मुंबईतील मेट्रो लाईन-९ प्रकल्पात रेल्वे आणि उड्डाणपूल एकाच संरचनेत- उपमुख्यमंत्री फडणवीस -ठाणे जिल्ह्यातील पहिल्या मेट्रो लाईनची तांत्रिक चाचणी यशस्वी - मिरा-भाईंदर ते पश्चिम- पूर्व उपनगरे आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाशी मेट्रो ९ जोडली जाणार ठाणे, दि. १४ मे ठाणे जिल्ह्यातील पहिल्या मेट्रो लाईन ९ प्रकल्पाच्या तांत्रिक चाचण्या सुरू झाल्या असून लवकरच हा टप्पा प्रवाशांसाठी सुरू केला जाईल.ही मेट्रो लाईन पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.मुंबईत पहिल्यांदाच अशा प्रकारचा डबल डेकर प्रकल्प उभारण्यात आला असून मेट्रो आणि उड्डाणपूल एकाच संरचनेत आहेत,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले.‌ ठाणे जिल्ह्यातील पहिल्या मेट्रो लाईनची चाचणी(ट्रायल रन) यशस्वीरित्या पार पडली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए)अध्यक्ष,एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही यावेळी उपस्थित होते.
या मेट्रोमुळे मिरा-भाईंदरकरांसाठी मुंबईच्या विविध कोपऱ्यांपर्यंत पोहोचणे आता अधिक सोयीचे आणि वेगवान होणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, यावर्षी ५० किमी, पुढील वर्षी ६२ किमी आणि तिसऱ्या वर्षी ६० किमी मेट्रो सुरू करण्याचा आमचा संकल्प आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या मेट्रोच्या विरारपर्यंतच्या विस्तारामुळे ठाणे,पालघर आणि रायगड जिल्ह्यांना मेट्रोशी थेट जोडणी मिळणार असून‌ मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ३३७ किलोमीटर लांबीचे मेट्रो रेल्वेचे जाळे उभारले जाणार आहे. तर मेट्रो लाईन-९ मुळे कमी वेळात जास्त अंतर पार करता येणार असून एकूणच आर्थिक गतिशीलता वाढवणारा महत्त्वाचा टप्पा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
मेट्रो लाईन-९ चा हा पहिला टप्पा दहिसर (पूर्व) ते काशिगावपर्यंत ४.४ किमी लांबीच असून या मार्गावर दहिसर (पूर्व),पांडुरंगवाडी, मिरा गाव,काशिगाव अशी चार स्थानके आहेत.अंधेरी पश्चिम (लाइन २ बी),घाटकोपर (लाइन १ व ७, लिंक रोड (दहिसर पूर्व – लाइन २ ए) इथे जाता येणार आहे. तर भविष्यात मिरा गाव मेट्रोस्टेशन मार्गे मेट्रो लाईन १०व्दारे ठाणे आणि वसई-विरार (लाइन १३–एनएससीबी स्थानक) जोडली जाणार आहे.‌ 'एमएमआरडीए'चे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद शर्मा, मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे,प्रांताधिकारी उर्मिला पाटील, तहसिलदार निलेश गौड, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, स्थानिक आजी व माजी लोकप्रतिनिधींनी, शासकीय अधिकारी उपस्थित होते.

सोमवार, १२ मे, २०२५

दहशतवादाच्या विरोधात'ऑपरेशन सिंदूर' हेच भारताचे धोरण- पंतप्रधान नरेंद्र मोदी

दहशतवादाच्या विरोधात'ऑपरेशन सिंदूर' हेच भारताचे धोरण- पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली, दि. १२ मे दहशतवाद आणि दहशतवाद्यांच्या विरोधात 'ऑपरेशन सिंदूर' हेच भारताचे यापुढे धोरण राहील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. ऑपरेशन 'सिंदूर' नंतर देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी बोलत होते. 'ऑपरेशन सिंदूर' संपलेले नाही तर स्थगित करण्यात आले आहे. निर्दोष, निष्पाप नागरिकांना धर्म विचारुन त्यांच्या कुटुंबीयांसमोर अतिशय निर्घृणपणे गोळ्या घालून मारणे हा दहशतवादाचा बिभत्स, क्रूर चेहरा असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. ऑपरेशन 'सिंदूर' हे फक्त नाव नाही, तर देशाच्या कोट्यवधी नागरिकांच्या भावनेचे प्रतिबिंब, न्यायाची अखंड प्रतिज्ञा असल्याने सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, ६ मे च्या रात्री उशिरा आणि ७ मे च्या सकाळी संपूर्ण जगाने आमच्या या प्रतिज्ञेला परिणामात बदलताना पाहिले. दहशतवाद आणि चर्चा, दहशतवाद आणि व्यापार एकत्र होऊ शकत नाही. रक्त व पाणी एकाच वेळी वाहू दिले जाणार नाही. दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीर या विषयावरच पाकिस्तानशी चर्चा होऊ शकते‌. आम्ही आमच्या अटी व शर्तींवरच उत्तर देऊ, असेही पंतप्रधान मोदी यांनी ठामपणे सांगितले.

रविवार, ११ मे, २०२५

ठाण्यात 'मॉक ड्रिल'

ठाण्यात 'मॉक ड्रील' ठाणे, दि. ११ मे केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठाणे येथे रविवारी आपत्कालीन तयारीची चाचणी घेण्यात आली. ठाण्यातील लोढा अमारा,कोलशेत मैदानावर 'ऑपरेशन अभ्यास' मॉक ड्रिल पार पडले. सायरन वाजवून या मॉक ड्रिलची सुरुवात करण्यात आली.‌
मॉक ड्रिलच्या दरम्यान काल्पनिक परिस्थितीत एअर स्ट्राईक/बॉम्ब हल्ल्याची सूचना देण्यात आली. यानंतर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी सूचनांचे प्रसारण करण्यात आले. नागरिकांनी कोणताही गोंधळ अथवा धावपळ न करता शांतपणे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन केले आणि सुरक्षितस्थळी आश्रय घेतला. त्यानंतर, संबंधित परिसरात शोध मोहीम राबवून जखमी तसेच अडकलेल्या चाळीस नागरिकांना तात्काळ बाहेर काढण्यात येऊन त्यांच्यवर प्रथमोपचार करण्यात आले.इमारतीत अडकलेल्या पाच जणांची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली. मॉक ड्रिलदरम्यान कुठल्याही प्रकारची अफवा पसरली नाही आणि नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला.
आजचे मॉक ड्रिल केवळ आपत्कालीन परिस्थितीत आपली तयारी किती आहे, हे तपासण्यासाठी आयोजित करण्यात आले होते. कोणतीही खरी आपत्ती ओढवलेली नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे प्रांताधिकारी उर्मिला पाटील आणि तहसिलदार उमेश पाटील यांनी सांगितले. मॉक ड्रिल मध्ये महसूल,आरोग्य, पोलीस, नागरी संरक्षण दल, होमगार्ड, ठाणे महानगरपालिका,आपत्ती व्यवस्थापन, टीडीआरएफ चे जवान, अग्निशमन दल,लोढा अमारा गृह संकुलातील अग्निशमन यंत्रणेचे जवान, सुरक्षा रक्षक आणि तेथील नागरिक सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे, नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक विजय जाधव,तहसिलदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले होते.

गुरुवार, ८ मे, २०२५

शंखनाद महोत्सव १ हजार वर्षांपूर्वीच्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दुर्मिळ दर्शन

शंखनाद महोत्सव १ हजार वर्षांपूर्वीच्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दुर्मिळ दर्शन पणजी (गोवा), दि. ८ मे सनातन संस्थेने येत्या १७ ते १९ मे या कालावधीत फोंडा, गोवा येथे आयोजित केलेल्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात एक हजार वर्षांपूर्वीच्या सोरटी सोमनाथ जोतिर्लिंगाचे दर्शन घेण्याची दुर्मिळ संधी उपस्थितांना मिळणार आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी गुरुवारी पणजी येथील पत्रकार परिषदेत दिली. फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर हा महोत्सव होणार आहे.हे शिवलिंग मूर्तीभंजक गझनी याने तोडले होते आणि नंतर पुढे अग्निहोत्र संप्रदायाच्या साधकांनी त्याचा सांभाळ केला. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्यामुळे हे शिवलिंग महोत्सवाच्या ठिकाणी दर्शनासाठी ठेवले जाणार आहे, असेही राजहंस यांनी सांगितले. काशी विश्वनाथ कॉरिडॉर आणि अयोध्येतील श्रीराम मंदिरामुळे उत्तर प्रदेशला दरवर्षी सुमारे २२ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रात ७ व्या क्रमांकावर असलेले उत्तर प्रदेश राज्य आता अग्रस्थानावर पोहोचले आहे. पूर्वी ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोव्यालाही असा लाभ निश्चितच मिळू शकतो. मंदिरे म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचा आत्मा आणि कणा आहेत. असेही राजहंस म्हणाले.‌ या तीन दिवसीय महोत्सवासाठी देशविदेशातून २५ हजारांहून अधिक भाविक, साधक, प्रतिष्ठित लोक गोव्यात दाखल होणार आहेत. हे सर्वजण येथे ३ ते ५ दिवस निवास, प्रवास करणार आहेत. यामुळे सर्व स्थानिक व्यवसाय आणि रोजगार यांना चालना मिळणार आहे.‌ महोत्सवाविषयी अधिक माहिती SanatanRashtraShankhnad.in या संकेतस्थळावर मिळू शकेल.
छायाचित्र ओळी छायाचित्रात डावीकडून युवराज गावकर, जयेश थळी, राज शर्मा, सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस, संजय घाडगे, नितीन फळदेसाई,अनिल नाईक

डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण

डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ९ ते ११ मे या कालावधीत संपूर्ण गीतरामायण सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष असून कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. धनंजय भोसेकर संपूर्ण गीतरामायण सादर करणार असून कार्यक्रमाचे निवेदन भोसेकर यांच्या पत्नी देवयानी भोसेकर यांचे आहे. धनंजय भोसेकर यांच्या भगिनी नीला सोहनी, त्यांचे पती प्रमोद सोहनी हे अनुक्रमे संवादिनी व तबल्याची तर व्यंकटेश कुलकर्णी तालवाद्य साथ करणार आहेत. सावित्रीबाई फुले नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार असून ९ व १० मे रोजी रात्री साडेआठ आणि ११ मे रोजी दुपारी साडेतीन वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे. धनंजय भोसेकर यांच्या वडीलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सामाजिक क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल दिला जाणारा 'सदगुरू चंद्रकांत अनंत भोसेकर सेवाव्रती पुरस्कार' यंदाच्या 'पै फ्रेण्ड्स लायब्ररी'चे संस्थापक पुंडलिक पै यांना प्रदान करण्यात येणार आहे. तीन दिवस अनुक्रमे प्रा.डॉ. विनय भोळे, प्रा. डॉ शुभदा जोशी आणि अजित करकरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या दैनंदिन विनामूल्य प्रवेशिका सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली पूर्व येथे तिकीट खिडकीवर कार्यक्रमाच्या आधी एक तास उपलब्ध होणार आहेत.