मंगळवार, २० मे, २०२५

हिंदूंचे राजनितीकीकरण आणि राजनीतीचे सैनिकीकरण आवश्यक

फोंडा,गोवा, दि. २० मे हिंदूंचे राजनितीकीकरण आणि राजनीतीचे सैनिकीकरण होणे आवश्यक असून हिंदू बलशाली व्हायलाच हवा, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी येथे केले. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात‘सनातन राष्ट्र आणि डॉ. जयंत आठवले यांचे विविधांगी कार्य'या सत्रात ते ‘सनातन राष्ट्राची सुरक्षा’ या विषयावर बोलत होते. ‘चाणक्य फोरम’चे मुख्य संपादक तथा सेवानिवृत्त मेजर गौरव आर्य,पंजाब गोरक्षक दलाचे संस्थापक अध्यक्ष सतीश प्रधान, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक नंदकुमार जाधव,हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याचे समन्वयक सुनील घनवट व्यासपीठावर उपस्थित होते. स्वातंत्र्यानंतर देशात सत्तेवर आलेल्या सरकारने याकडे लक्ष दिले नाही. हिंदू बलशाली होण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे देशाचे अवमूल्यन झाले, असेही सावरकर म्हणाले. राष्ट्राचे रक्षण शस्त्रानेच करावे लागते. साधूसंतांच्या रक्षणासाठी श्रीरामाचा जन्म झाला. मुघलांचे आक्रमण वाढल्यानंतर हिंदूंच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज, गुरुगोविंदसिंग यांचा जन्म झाला, असे गौरव आर्य यांनी सांगितले. हिंदूंना धर्मशिक्षण प्राप्त व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीने धर्मशिक्षणवर्ग सुरू केले सद्यस्थितीत देशात समितीच्या वतीने ५०० ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग चालू आहेत, अशी माहिती नंदकुमार जाधव यांनी दिली. पंजाब गोरक्षक दलाचे संस्थापक अध्यक्ष प्रधान म्हणाले, महाराष्ट्रात गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्यात आला, त्याप्रमाणे हिंदूंच्या आस्थेचा विचार करून सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या निमित्ताने गोवा सरकारनेही गोमातेला राज्यमातेचा दर्जा द्यावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: