सोमवार, १३ मार्च, २०१७

आवाज कसा आहे त्याचा अभ्यास करा- प्रा. राम कुलकर्णी


कला वक्तृत्वाची-३

प्रा. राम कुलकर्णी

आवाजालाही व्यायाम हवा- प्रबोधनकार ठाकरे


कला वक्तृत्वाची-२

प्रबोधनकार ठाकरे

आवाजालाही व्यायाम हवा

आवाज हे वक्तृत्वाचे मुख्य अंग आहे. माणसाच्या नुसत्या बोलण्याच्या आवाजावरून त्याच्या अंतर्बाह्य़ संस्कृतीचा बोध होतो. वक्त्याच्या तोंडून नुसता पहिला स्वर निघताच तो विद्वान, व्यासंगी, निश्चयी, सत्यप्रेमी, कळकळीचा आहे की हळवा, कमजोर आहे याची श्रोत्यांना पारख करता येते. मनुष्याच्या अंत:करणातील गूढ विकाराचे आविष्करण त्याच्या स्वरांच्या रोखठोक अथवा कंपित लहरींवरून होत असल्यामुळे शीलाने तो कच्चा की पक्का, त्याच्या स्वभावातील बरे-वाईट गुणधर्म कोणते, त्याच्या भाषणात नि:स्पृहता आहे की दंभ आहे, तो ज्या विषयावर बोलणार आहे त्याबद्दल त्याचा आत्मविश्वास भरपूर आहे की कोता वगैरे अनेक गोष्टींचा साक्षात्कार श्रोत्यांना होतो.

भाषणाला काय किंवा व्याख्यान, प्रवचन, कीर्तनाला काय, निकोप आवाज हे मोठे आवश्यक भांडवल आहे. घोगरे, किरटे, चिरफाळलेले किंवा कोकीळकंठी बायकी आवाजाचे वक्ते पट्टीचे पंडित असले तरी श्रोत्यांवर त्यांना आपली छाप पाडता येत नाही. चारचौघांत बसून गप्पाष्टकी संभाषण करतानाही उत्तम, गहिरा, मोहक आवाजाचा चतुरस्र असामी बाकीच्या मंडळींवर तेव्हाच इतकी छाप पाडतो की थोडय़ाच वेळात तो एकटा वक्ता आणि बाकीचे सारे उत्सुक श्रोते असा बनाव बनतो. आवाजालाही व्यायाम हवाच. व्यायामाने आणि नियमित आहार-विहाराने शरीरप्रकृती व काव्यशास्त्र विनोदप्रचुर ग्रंथांच्या व्यासंगाने मानसिक प्रकृती उत्तम राखण्याची आपण काळजी घेतो. शरीर नि मनाइतकाच आपला आवाजही निकोप आणि निरोगी राखण्याची जरुरी आहे हे फार थोडय़ांच्या लक्षात येते. सकाळ, संध्याकाळ दोन-दोन तास तंबोऱ्यावर सुरावटीची मेहनत (रियाज) करणाऱ्यांचा आवाज आणि आरोग्य उत्तम राहते.

उत्तम आकर्षक गायनासाठी सकस, निकोप आणि झारदार गळ्याची जेवढी आवश्यकता तेवढीच ती भाषिक वक्त्यांनाही असावी लागते. वक्त्यांच्या पांडित्यापेक्षाही त्याच्या भरघोस मोहक आवाजाच्या मोहिनीचाच श्रोत्यांवर परिणाम होत असतो. पं. विष्णू दिगंबर पलुस्कर हे जसे उच्च श्रेणीचे गायनाचार्य होते तसे पट्टीचे वक्तेही होते. त्यांचे शास्त्रोक्त गायन ऐकताना श्रोते नादब्रह्माने जसे मंत्रमुग्ध होत तसेच त्यांचे व्याख्यान, प्रवचन चालले असतानाही श्रोते तल्लीनतेने माना डोलवीत असत. महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यांनी शंभरी ओलांडली. पण त्यांच्या आवाजातील गोंडसपणा आणि गोडवा जणू काय अगदी बाल आवाजाचाच वाटत असे. कशाचा हा परिणाम? शारीरिक आणि मानसिक आरोग्याप्रमाणे या थोर पुरुषांनी आवाजाच्या आरोग्यालाही तितक्याच काळजीने जोपासले. आवाज कमाविण्यासाठी वक्तृत्वाच्या हौशी व महत्त्वाकांक्षी उमेदवारांनी एखाद्या गवयाचे मार्गदर्शन पत्करल्यास फार चांगले. रोज तास-अर्धा तास तंबोऱ्यावर किंवा पेटीच्या स्वरावर खर्ज लावण्याच्या कसरतीने किरटा, घोगरा, कमताकद आवाज सुधारल्याची उदाहरणे आहेत.

आवाजाचा उपयोग करताना त्यावर कसल्याही प्रकारचा शारीरिक किंवा मानसिक दाब नसावा. तो अगदी मोकळा, दिलखुलास असावा. चोरटा नसावा. भाषणाची सुरुवात अगदी मंद, साहजिक आणि तोलदार आवाजात केली म्हणजे विचारशक्ती आपल्या ताब्यात राहते. उच्चार स्वच्छ, स्पष्ट आणि ठाशीव असले म्हणजे शब्दांचा नाद-निनाद श्रोत्यांच्या मनावर छान परिणाम घडवितो. माईकवर मोठय़ा आवाजात बोलणे ही आवाजाची वारेमाप उधळपट्टीच आहे. ती टाळावी. श्रोता आणि वक्ता परस्पर सन्मुख असले पाहिजेत. भाषणात खरे महत्त्व भावनेला असून स्वरांच्या खोचा, वाक आणि आरोह-अवरोह निरनिराळ्या गोष्टीतील, विचारांतील किंवा तत्त्वातील भेद दर्शवितात.

संकलन – शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता-मुख्य अंक/३० जानेवारी २०१७)

(‘प्रबोधनकारडॉटऑर्ग’ या संकेतस्थळाच्या सौजन्याने)

साहित्य क्रांती करु शकते-आचार्य अत्रे


साहित्य क्रांती करू शकते

वक्तृत्व कलेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रषु’ या उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वास सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत वक्त्यांच्या भाषणातील काही उतारे तसेच वक्तृत्वकलेसंदर्भातील त्यांचे विचार येथे क्रमश: सादर केले जाणार आहेत. पहिले भाषण लेखक, नाटककार, संपादक, झुंजार वक्ते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे. पुणे येथे उभारण्यात आलेल्या राम गणेश गडकरी यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण अत्रे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी केलेल्या भाषणातील काही भाग..

कला वक्तृत्वाची-१

आचार्य प्र. के. अत्रे

आजपर्यंत मी काही कमी मानसन्मान नाही मिळविले. परंतु त्या सर्व सन्मानापेक्षा आज माझ्या थोर गुरूंचा पुतळा माझ्या हातून उघडला जात आहे हा सन्मान अनन्यसाधारण आहे. (टाळ्या) मोक्ष प्राप्त करून देणारी आणि अमृताचा वर्षांव करणारी ज्ञानेश्वरी मराठी भाषेतच लिहिली गेली. ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी देऊ माथा’ असे खडे बोल तुकोबांनी मराठीतच सांगितले. तुकाराम हे महाराष्ट्रातील युगप्रवर्तक लोकगीतकार होते. ‘धटासी असावे धट उद्धटासी उद्धट’ ही मराठी शिकवण समर्थ रामदास स्वामी यांनी दिली. ‘एक पाय सदैव तुरुंगात ठेवून लोकशिक्षणासाठी आम्ही हातात लेखणी धरली’ असे सांगणाऱ्या विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी मराठी भाषेला सामथ्र्यवान केले तर राम गणेश गडकरी यांनी तिला सौंदर्यवान केले.

एखादा वीर योद्धा जसा लढता लढता रणांगणी पडतो तसे गडकरी वीराच्या मरणाने मेले. ‘भावबंधन’चा शेवटचा प्रयोग लिहून त्यांनी लेखणी खाली ठेवली आणि अवघ्या तीस मिनिटांतच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. ‘एकच प्याला’ हे त्यांचे लोकप्रिय नाटक मरणोत्तर प्रसिद्ध झाले. प्रत्येक कवितेत किंवा प्रत्येक लेखनात एक शब्द, एक कल्पना, एक भावना अगदी नवीन असलीच पाहिजे, अशी त्यांची प्रतिज्ञा असे व त्याप्रमाणेच ते लिहीत असत. कवितेखाली त्यांचे नाव नसले तरी त्या कवितेच्या ढंगावरून ती गडकऱ्यांचीच असली पाहिजे असे ओळखू येत असे. नाटकाचे यश हे भाषेवर अवलंबून नाही तर त्या नाटकातील संघर्षांवर ते अवलंबून असते. नुसती भाषा चांगली पण नाटकात कुठेही खटका नसेल, संघर्ष नसेल तर ते नाटक कोणीही पाहण्यास येणार नाही. प्रेक्षकांच्या हृदयाची पकड कशी घ्यावी हे गडकरी चांगलेच ओळखत आणि म्हणूनच त्यांची नाटके लोकप्रिय ठरली. कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे विनोद क्षेत्रातील गडकऱ्यांचे गुरू होते. कोल्हटकर यांच्या विनोदाचे सौंदर्य गडकऱ्यांनी अधिक खुलवून सांगितले. गडकऱ्यांचा विनोद सामाजिक होता. समाजसुधारणेसाठी त्यांनी विनोदाचा उपयोग केला.

साहित्य ही शक्ती आहे. त्याबाबत वाद करण्याची आवश्यकता नाही. राज्यकर्ते आणि साहित्यिक यांचे कार्य समान आणि परस्परावलंबी आहे. साहित्य क्रांती करू शकते. जगात समाजपरिवर्तनाचे अनेक प्रयोग सुरू आहेत. काही राज्यकर्ते हे कार्य कायद्याच्या जोरावर करू पाहतात, पण कायद्याने माणूस सुधारत नाही. त्यासाठी त्याचे हृदय पकडावे लागते. समाजाची नीती कायद्याने सुधारता येत नाही. महाराष्ट्राची परंपरा ज्ञानेश्वरांची आहे. समाजवादी महाराष्ट्र संपन्न करायचा म्हटल्यास अन्य गोष्टींबरोबरच सुवाङ्मयाची, चांगल्या साहित्याची आवश्यकता आहे. गडकऱ्यांसारखे साहित्यिक ते काम करू शकतील..

(संकलन-शेखर जोशी)

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता-मुख्य अंक/२९ जानेवारी २०१७)

रविवार, १२ मार्च, २०१७

दादर येथे सापडलेला स्कुटर बॉम्ब आणि...


दादर येथे सापडलेला स्कुटर बॅाम्ब आणि....

(सोमवार १५ मार्च १९९३ च्या मुंबई सकाळमध्ये प्रसिद्ध झालेली माझी बातमी आणि आठवण)

१२ मार्च १९९३, मुंबई आणि भारताच्या इॉतिहासातील एक दुर्देवी व काळा दिवस. याच दिवशी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले गेले. या भयानक व धक्कादायक घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांनी दादर (पश्चिम) येथे एका बेवारस स्कुटरमध्ये शक्तीशाली बॉम्ब सापडला. वेळीच लक्षात आल्याने बॉम्बशोधक पथकाने तो निकामी केला. रस्त्यावर उभ्या केलेल्या या स्कुटरला कोणी सहज खेळ महणून नुसती किक मारली असती तरी हा स्फोट घडेल, अशी व्यवस्था करण्यात आली होती.

दादर (पश्चिम) येथे डॉ. मांडोत यांच्या दवाखान्यासमोर एका बेवारस स्कुटरमध्ये बॉम्ब ठेवला असल्याची बातमी कळली. तेव्हा आजच्या सारखे वृत्तवाहिन्यांचे प्रस्थ नव्हते. त्यामुळे वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी व छायाचित्रकार घटनास्थळी होते.मी तेव्हा मुंबई सकाळमध्ये वार्ताहर म्हणून नोकरी करत होतो. आमचे मुख्य वार्ताहर रमाकांत पारकर ऊर्फ तात्या यांनी मला आणि आमचा छायाचित्रकार सचिन चिटणीस याला तिकडे जायला सांगितले. दोघेही तिकडे गेलो. बॉम्बशोध पथक घटनास्थळी आले आणि त्यांनी बॉम्ब निकामी केला. संध्याकाळी पाच/साडेपाच वाजल्यापासून जवळपास दोन-तीन तास हे सर्व सुरु होते. बॉम्ब निकामी केल्यानंतर वृत्तपत्रांचे पत्रकार व छायाचित्रकार तिथून निघाले.

मी आणि सचिन थोडा वेळ तिथेच थांबलो. बॉम्ब तर निकामी केला आता पुढे काय करणार, याची माहिती घेतली. मिळालेल्या माहितीुसार तो बॉम्ब, आतील आरडीएक्स हे सर्व विक्रोळी येथे नेले जाणार होते. कार्यालयात हे सगळे कळविले.सचिन आणि मी तेथे जायचे ठरविले. आम्ही तिथे गेलो. तेव्हा चंद्रकांत हंडोरे हे मुंबईचे महापौर होते. ते ही विक्रोळीला त्या ठिकाणी होते. तेथे रात्री त्या बॉम्बची पूर्ण विल्हेवाट लावण्यात आली. या सगळ्याचे मी आणि सचिन साक्षीदार होतो. रात्री तिथून निघालो. मोबाईल व अन्य संपर्काचे प्रभावी माध्यम तेव्हा नव्हते. कार्यालयात दूरध्वनी करुन अशी बातमी आहे हे सांगितले. नारायण पेडणेकर, प्रभाकर नेवगी हे वरिष्ठ तसेच उमेश करंदीकर रात्रपाळीत होते. कार्यालययात गेल्यानंतर मी बातमी लिहून काढली. आणि फक्त मुंबई सकाळमध्ये त्या बातमीची आठ कॉलम हेडलाईन झाली. तेव्हाच्या सर्व अन्य मराठी वृत्तपत्रात दादर य़ेथे बॉम्ब सापडला आणि तो निकामी केला एवढीच बातमी होती. आमच्याकडे त्यानंतरचा सगळा घटनाक्रम आणि बातमीचा पाठपुरावा केल्यामुळे सचिनच्या फोटोसह सविस्तर बातमी आली.

मुंबई सकाळची ही बातमी त्या दिवशी (१५ मार्च १९९३) वेगळी ठरली. त्याबाबत मुंबई सकाळचे संपादक राधाकृष्ण नार्वेकर यांनीही आमचे कौतुक केले. इतरांपेक्षा वेगळी बातमी फक्त आपल्याकडे दिल्याचे आणि बातमीलाही व्यवस्थित न्याय मिळाल्याचा आनंंद काही वेगळाच होता.

दादर (पश्चिम) येथे असलेला हा स्कुटर बॉम्ब अत्यंत शक्तीशाली होता. जर त्याचा स्फोट झाला असता तर सेंच्युरी बाजार येथील स्फोटापेक्षाही त्याची तीव्रता जास्त असती. दादर रेल्वे स्थानक परिसर उध्वस्त होईल इतका तो शक्तीशाली होता. सुदैवाने तो वेळीच निकामी केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पण आज इतक्या वर्षांनंतरही ते सगळे आठवले की अंगावर अजूनही काटा येतो....

-शेखर जोशी

सोमवार १५ मार्च १९९३ च्या मुंबई सकाळमधील मी दिलेल्या त्या बातमीचे कात्रण, सचिन चिटणीस याच्या छायाचित्रासह

गुरुवार, ९ मार्च, २०१७

पुस्तक देवाण-घेवाण योजना


पुस्तक देवाण-घेवाण योजना

पै फ्रेंड्स लायब्ररीचा आगळा उपक्रम

दूरचित्रवाहिन्या, स्मार्ट भ्रमणध्वनी, संगणक आणि सध्याच्या माहितीच्या महाजालात वाचन संस्कृती हळूहळू लोप पावत असल्याची भीती व्यक्त करण्यात येते. काही प्रमाणात ती खरीही आहे. आत्ताच्या तरुण पिढीचे किंवा सध्या शाळेत व महाविद्यालयात असलेल्या विद्यार्थ्यांचे अवांतर मराठी वाचन हे कमी झाले आहे. शालेय किंवा महाविद्यालयीन अभ्यासक्रमासाठी असलेल्या पाठ्यपुस्तकांचे वाचन सोडले तर काही अपवाद वगळता हल्लीची पिढी मराठी पुस्तकांचे वाचन करत नाही, असे पाहायला मिळते. आत्ताचे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी हेच भावी वाचक असणार आहेत. त्यामुळे या नव्या पिढीत आणि एकूणच समाजातील लोप पावत चाललेल्या वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी डोंबिवलीतील पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे पुस्तक आदान-प्रदान योजना (डोंबिवली बुक इ चेंज एक्झिबिशन) या आगळ्या उपक्रमाचे आयोजन डोंबिवलीत करण्यात आले आहे. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ आणि डोंबिवलीकर मासिक यांचेही सहकार्य या उपक्रमास लाभले आहे.

आपल्यापैकी काही जण पुस्तके विकत घेतात तर काही जणांना वाढदिवस आणि अन्य काही निमित्ताने पुस्तके भेट म्हणून मिळतात.ही पुस्तके एकदा वाचून झाल्यानंतर काही पुस्तकांचा अपवाद वगळता तशीच पडून राहतात. ती पुन्हा काही वाचणे होत नाही. पडून राहिलेल्या या पुस्तकांच्या बदल्यात नवी पुस्तके मिळावीत, एकमेकांकडे असलेल्या अशा अनेक पुस्तकांचे आदान-प्रदान व्हावे आणि विविध विषयांवरील अशी हजारो पुस्तके पुन्हा वाचनात यावी, हा उद्देशही या योजनेमागे आहे. डोंबिवलीतील एक प्रमुख ग्रंथालय म्हणून पै फ्रेंड्स लायब्ररीची ओळख आहे. डोंबिवली पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही ठिकाणी ग्रंथालयाच्या शाखा आहेत. ग्रंथालयाचे संपूर्ण संगणकीकरण झाले असल्याने सभासदांना पुस्तक कोणत्याही शाखेत जमा करता येऊन नवीन पुस्तक घेता येऊ शकते. दोन वर्षांपूर्वी पै फ्रेंड्स लायब्ररीने एका दिवसात एक हजारांहून अधिक नवे सभासद करुन घेण्याचा आगळा विक्रमही केला होता. १ जानेवारी २०१५ रोजी सकाळी या नवीन सभासद योजनेस सुरुवात झाली आणि दिवस अखेरीस १ हजार २१ नव्या सभासदांची नोंदणी करण्यात आली. २२ मे १९८६ रोजी पुंडलिक पै यांनी टिळकनगर विभागात अवघ्या शंभर पुस्तकांसह ग्रंथालय सुरु केले. डोबिवलीत ग्रंथालयाच्या पाच शाखा आहेत. ग्रंथालयाचे चौदा हजारांहून अधिक सभासद असून विविध विषयांवरील एक लाखांहून अधिक पुस्तके ग्रंथालयात आहेत. मुंबई, पुणे, नाशिक येथील वाचकांसाठी ऑनलाईन ग्रंथालयही चालविण्यात येते. या ऑनलाईन ग्रंथालयाचेही सुमारे दोन हजार सभासद आहेत. ऑनलाईन ग्रंथालयाच्या सभासदांना त्यांना हवे असलेले पुस्तक घरपोहोच देण्यात येते. पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे डोंबिवलीत साहित्य, वाचनविषयक अन्यही विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.

पुस्तक आदान-प्रदान योजनेअंतर्गत आपल्याकडे असलेली आणि वाचून झालेली कोणत्याही विषयांवरील मराठी व इंग्रजी भाषेतील दहा पुस्तके अवघे शंभर रुपये भरुन पै फ्रेंड्स लायब्ररीकडे जमा करायची आहेत. ही पुस्तके जमा केल्यानंतर त्याची पावती देण्यात येणार आहे. आपण दिलेल्या दहा पुस्तकांच्या बदल्यात आपल्याला पाहिजे ती मराठी व इंग्रजी भाषेतील अन्य कोणतीही दहा पुस्तके घेता येणार आहेत. हे करताना आपण दिलेली पुस्तके जेवढ्या किंमतीची असतील तेवढ्याच किंमतीची पुस्तके घेतली पाहिजेत असे कोणतेही बंधन नाही. तुम्ही दिलेल्या दहा पुस्तकांच्या बदल्यात अन्य कोणतीही दहा पुस्तके तुम्हाला घेता येणार आहेत. पुस्तके ग्रंथालयाकडे जमा करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०१७ अशी असून पै फेंड्स लायब्ररीच्या कोणत्याही शाखेत ही पुस्तके जमा करता येणार आहेत.

जमा केलेली दहा पुस्तके आणि त्या बदल्यात आपण घेणार असलेल्या दहा पुस्तकांच्या आदान-प्रदान सोहोळ्यासाठी पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे येत्या ९ ते १६ एप्रिल २०१७ या कालावधीत टिळकनगर विद्या मंदिर, डोंबिवली (पूर्व) या शाळेच्या पटांगणावर भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आह. सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे. आपल्याकडे असलेली कोणतीही दहा पुस्तके येत्या ३१ मार्च पर्यंत १०० रुपये भरुन ग्रंथालयात जमा करायची आहेत. ही पुस्तके सुस्थितीत आणि वाचण्यायोग्य असली पाहिजेत. पुस्तकांच्या मूळ प्रतीच स्विकारल्या जाणार आहेत. मराठी आणि इंग्रजी भाषेतील कथासंग्रह, कादंबरी, ललितलेख संग्रह, चरित्र-आत्मचरित्र आदी पुस्तके घेण्यात येणार आहेत.

या संदर्भात अधिक माहिती ९८३३७३२७१३ या क्रमांकावर मिळू शकेल.

शेखर जोशी

बुधवार, ८ मार्च, २०१७

डोंबिवलीकर दिनदर्शिका-उद्योगशील नगरीचं प्रतिबिंब


डोंबिवलीकर दिनदर्शिका-उद्योगशील नगरीचं प्रतिबिंब

डोंबिवली नगरी सुशिक्षीतांचे शहर म्हणून ओळखले जाते. विविध साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल येथे असते. विविध क्षेत्रात उच्चपदावर काम करणारी अनेक मंडळी ही डोंबिवलीकरच आहेत. गुढीपाडव्याला अर्थात हिंदू नववर्षाच्या निमित्ताने आता मुंबईसह संपूर्ण राज्यभरात स्वागतयात्रा/ शोभायात्रा काढण्यात येतात. पण त्याची मुहूर्तमेढ डोंबिवलीने रोवली आहे. विविध क्षेत्रात काम करणाऱया कार्यकर्त्यांचे मोहोळ म्हणूनही डोंबिवलीकडे पाहिले जाते. अशा या डोंबिवलीत नेहमीच काहीतरी आगळे व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. आमदार आणि राज्यमंत्री रविंद्र चव्हाण संपादक आणि प्रकाशक असलेल्या 'डोंबिवलीकर'मासिकाने प्रकाशित केलेली 'डोंबिवलीकर' दिनदर्शिका हा त्याचाच एक भाग आहे.

दरवर्षी खासगी किंवा शासकीय आस्थापनांकडून दिनदर्शिका प्रकाशित केल्या जातात. डोंबिवलीकरच्या दिनदर्शिकेचे वेगळेपण म्हणजे दरवर्षी एक नवी संकल्पना घेऊन दिनदर्शिका प्रकाशित केली जाते. यंदाच्या दिनदर्शिकेची संकल्पना 'उद्योगशील' डोंबिवलीकर अशी आहे. डोंबिवली नगरीला विविध क्षेत्रात काम करणाऱया अनेक मान्यवरांनी सन्मािनत केले आहे. त्या त्या क्षेत्रात उच्च पदावर जाऊन अनेक डोंबिवलीकरांनी आपल्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. डोंबिवली नगरीतील ज्येष्ठ आणि तरुण उदयोगरत्नांचा सन्मान यंदाच्या दिनदर्शिकेत करण्यात आला आहे. 'डोंबिवलीकर' मासिकाचे कार्यकारी संपादक प्रभू कापसे यांच्या संकल्पनेतून ही दिनदर्शिका तयार झाली आहे. डोंबिवली नगरीतील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिंचा परिचय सगळ्यांना करुन देण्याचा प्रयत्न या दिनदर्शिकेतून करण्यात येतो.

दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती निवडल्या जातात. २०१७ या वर्षासाठी उद्योजक ही संकल्पना घेण्यात आली आहे. अशा प्रकारची संकल्पना घेऊन गेली पाच वर्षे ही दिनदर्शिका प्रकाशित होत आहे. २०१७ च्या दिनदर्शिकेत १४४ ज्येष्ठ आणि तरुण डोंबिवलीकर उद्योजकांचा त्याच्या छायाचित्रांसह थोडक्यात परिचय यात करुन देण्यात आला आहे. प्रत्येक महिन्याच्या पानावर तारीख, वार, पंचांग यासह त्या सर्वाचे एकत्र छायाचित्र आणि त्या महिन्याच्या मागील पानावर त्यांचा परिचय करुन देण्यात आला आहे.या बरोबरच दिनदर्शिकेत डोंबिवली शहरातील विविध सामाजिक संस्था, त्यांचा थोडक्याात परिचय, महत्वाचे नागरी संपर्क, दूरध्वनी क्रमांकही यात देण्यात आले आहेत. या सगळ्यामुळे ही दिनदर्शिका संग्राह्य झाली आहे.

डोंबिवलीकर मासिकाचे कार्यकारी संपादक प्रभू कापसे

prabhu.kapse@gmail.com

डोंबिवलीकर मासिक व दिनदर्शिकेसाठी संपर्क

०२५१-२४२०३७३

शेखर जोशी