मंगळवार, २४ जून, २०२५

आणि डोंबिवलीतील नाट्यगृहाला सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले गेले

आणि डोंबिवलीतील नाट्यगृहाला सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले गेले - महापालिकेतील तत्कालिन सत्ताधारी दोन्ही काँग्रेसने आपलाच हट्ट पूर्ण केला शेखर जोशी डोंबिवलीतील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नाट्यगृहाला डोंबिवलीकर असलेले ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार पु. भा. भावे यांचे किंवा नाट्यक्षेत्राशी संबंधित व्यक्तीचे नाव देण्यात यावे, अशी मागणी तत्कालिन एकसंघ शिवसेना व भाजप यांनी केली होती.‌ सर्वसामान्य रसिकांनाही तसे वाटत होते. पण तेव्हा कडोंमपात सत्तेवर असलेल्या कॉग्रेस व एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस यांनी ती मागणी डावलली आणि नाट्यगृहाला हट्टाने सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले. शिक्षण क्षेत्रात सावित्रीबाई फुले यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, महापालिकेच्या एखाद्या शाळेला, शैक्षणिक संस्थेला त्यांचे नाव दिले असते तर ते योग्य ठरले असते. नाट्यगृहाला त्यांचे नाव देणे अप्रस्तुतच होते. पण तेव्हा महापालिकेतील दोन्ही काँग्रेसनी आपला हट्ट कायम ठेवला आणि पु. भा. भावे किंवा नाट्यक्षेत्राशी संबंधित व्यक्तीचे नाव नाही म्हणजे नाही देऊ दिले. 'भावे' या नावाची दोन्ही काँग्रेसला जर ॲलर्जी होती तर बहुजन समाजातील पण नाट्य क्षेत्रातीलच लेखक, नाटककार, अभिनेता, अभिनेत्री यांचे नाव का नाही दिले? अभिनेते अरुण सरनाईक या नावाचा पर्यायही पुढे आला होता असे आठवते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवार यांनीही तेव्हा आपल्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांचे कान उपटले नाहीत किंवा सावित्रीबाई फुले हे नाव नको, असा आदेशही दिला नाही. पवार यांनी मनात आणले असते तर कॉग्रेसच्या राज्य पातळीवरील नेत्यांशी बोलून ते सावित्रीबाई फुले हे नाव देणे अगदी सहज टाळू शकले असते, पण त्यांनी सोयिस्कर मौन बाळगले.‌ आणि डोंबिवलीतील नाट्यगृहाला अखेर सावित्रीबाई फुले यांचेच नाव दिले गेले. आधी राष्ट्रवादी काँग्रेसमधून एकसंघ शिवसेनेत गेलेले आणि शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेले पुंडलिक म्हात्रे तेव्हा कल्याण डोंबिवली महापालिकेचे महापौर होते. शरद पवार यांचे हे असेच आहे. त्यांना एखादी गोष्ट घडून यावी असे वाटते तेव्हा ते सक्रिय होतात. आपल्या पाठिराख्यांना सर्व पातळ्यांवर कामाला लावतात आणि त्यांना जे हवे आहे ते घडवून आणतात. आणि त्यांच्या मनातच नसले, एखादी गोष्ट घडायला नको असे ते ठरवतात तेव्हा मी त्या गावचाच नाही, असे म्हणत निष्क्रिय राहतात. याचा अनुभव आजपर्यंत वेळोवेळी महाराष्ट्राने घेतला आहे.‌ शेखर जोशी २४ जून २०२५

खासगी रेडिओ जॉकींना मानाचे पान आकाशवाणी जॉकींचा मात्र अपमान

खासगी रेडिओ जॉकींना मानाचे पान आकाशवाणी जॉकींचा मात्र अपमान शेखर जोशी महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि आशा रेडिओ पुरस्कार वितरण सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत पार पडलेल्या या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली. यासाठी खासगी एफएम रेडिओच्या जॉकींना मानाचे पान आणि आकाशवाणीच्या रेडिओ जॉकींचा मात्र अपमान असे चित्र पाहायला मिळाले.‌ मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेण्यासाठी निवड करण्यात आलेले सर्व रेडिओ जॉकी खासगी एफएम रेडिओ चे होते, आकाशवाणी मुंबई, विविध भारती किंवा आकाशवाणी एफएम रेडिओच्या जॉकींना यात डावलून एका प्रकारे आकाशवाणी मुंबईचाच अपमान करण्यात आला. शेजो उवाच https://youtu.be/uRHE3jORgHw?si=yoQr34lPO8D4xuS3 महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रेडिओचे आपल्या सर्वांच्याच भावविश्वात मानवाचे स्थान आहे. 'बहुजन हिताय बहुजन सुखाय' हे आकाशवाणीचे घोषवाक्य आहे. आजवर हजारो, लाखो विविध कार्यक्रम, गाणी आकाशवाणी ने सादर केली. अनेक गायक, गायिका, गीतकार, संगीतकार, अन्य कलाकार आकाशवाणीने घडविले. आकाशवाणीच्या या महत्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि आशा रेडिओ पुरस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला.‌ आता दरवर्षी हा कार्यक्रम होणार आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम व पुरस्कार सुरू केल्याबद्दल ॲड. शेलार यांचे अभिनंदन. पण झाला प्रकार मात्र खटकणारा.
शेजो उवाच https://youtu.be/uRHE3jORgHw?si=yoQr34lPO8D4xuS3 खरेतर आकाशवाणी मुंबई केंद्र या सर्व खासगी एफएम रेडिओंचा जन्मदाता. रेडिओ प्रसारणातील 'भीष्म पितामह'. भारतातील पहिले रेडिओ प्रसारण मुंबईतून, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या माध्यमातून २३ जुलै १९२७ या दिवशी सुरू झाले. आकाशवाणी मुंबईसह विविध भारतीने अनेक उत्तमोत्तम निवेदक महाराष्ट्राला दिले. आता आकाशवाणी मुंबईची एफएम रेडिओ स्टेशनही आहेत. यापैकी निवृत्त झालेल्या किंवा विद्यमान असलेल्या निवेदकांपैकी एकाही निवेदकाला मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलाविण्यात आले नाही? हा खरा कळीचा मुद्दा आहे. शेजो उवाच https://youtu.be/uRHE3jORgHw?si=yoQr34lPO8D4xuS3 मुलाखतीच्या कार्यक्रमात एक/दोन रेडिओ जॉकींनी मुख्यमंत्री फडणवीस यांना मराठीतून प्रश्न विचारले, मुख्यमंत्री फडणवीस यांनीही मराठीतून उत्तरे दिली. कार्यक्रमाच्या नावात 'महाराष्ट्र' असे नाव असताना हिंदीचे लटांबर का होते? मुंबईत राहून या रेडिओ जॉकींना फक्त एक प्रश्न मराठीतच का विचारता आला नाही? त्यासाठी हिंदीचा वापर का केला? दाखविण्यासाठी तरी का होईना या रेडिओ जॉकींनी मराठीत प्रश्न विचारावा, असे वाटले नाही. मुलाखत कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी सूत्रसंचालकांनी सहा रेडिओ जॉकी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात पॅनेल डिस्कशन आहे असे सांगितले. त्यावर सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार तत्काळ आसनावरून उठून व्यासपीठावर गेले आणि हे पॅनेल डिस्कशन नाही तर रेडिओ जॉकी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेणार आहेत हे स्पष्ट केले. हा प्रकारही हास्यास्पद होता. शेजो उवाच https://youtu.be/uRHE3jORgHw?si=yoQr34lPO8D4xuS3 मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेण्यासाठी ज्या खासगी एफएम रेडिओ जॉकींची निवड करण्यात आली होती त्याच खासगी एफएम रेडिओंनी मराठी गाणी डाऊन मार्केट आहेत असे सांगून आपल्या खासगी एफएम रेडिओवरून ती प्रसारित करण्यास असमर्थता व्यक्त केली होती. त्यावेळी मनसेने आवाज उठविल्यानंतर खासगी एफएम रेडिओवर काही वेळ मराठी गाण्यांच्या प्रसारासाठी देण्यात आला. पण बहुदा अजूनही मुंबईतील काही खासगी एफएम रेडिओचा अपवाद वगळता अन्य खासगी एफएम रेडिओवर मराठी गाणी प्रसारित होत नाहीत आणि होत असतील तर तोंडी लावण्यापुरतीच. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्या मुलाखत कार्यक्रमात ही बाब ठळकपणे दाखवून द्यायला हवी होती. शेजो उवाच https://youtu.be/uRHE3jORgHw?si=yoQr34lPO8D4xuS3 आकाशवाणी मुंबई केंद्राचे पूर्वीचे मुंबई ब केंद्र आणि आत्ताची अस्मिता वाहिनी, विविध भारती यांच्या योगदाची दखल घेऊन या पहिल्या महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि आशा रेडिओ पुरस्कार सोहळ्यात 'आकाशवाणी मुंबई'चा विशेष पुरस्कार देऊन सन्मान सन्मान करण्यात आला असता तर ते अधिक औचित्यपूर्ण ठरले असते. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या ज्येष्ठ निवृत्त निवेदकांचाही विशेष सन्मान करायला हवा होता. पुढील वर्षी (२३ जुलै २०२६) आकाशवाणी मुंबई केंद्र ९९ व्या वर्षांत पदार्पण करेल. त्यामुळे पुढील वर्षीच्या महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि आशा रेडिओ पुरस्कार सोहळ्यात तरी आकाशवाणी मुंबईचा योग्य तो सन्मान होईल अशी अपेक्षा आहे. शेखर जोशी २४ जून २०२५ शेजो उवाच https://youtu.be/uRHE3jORgHw?si=yoQr34lPO8D4xuS3

शनिवार, २१ जून, २०२५

तीर्थक्षेत्र, देवता, संत, अभंग आणि वारीचा अवमान सहन करणार नाही

तीर्थक्षेत्र, देवता, संत, अभंग आणि वारीचा अवमान सहन करणार नाही - समस्त वारकरी संप्रदाय व संघटनांचा इशारा पुणे, दि. २१ जून महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनात पंढरपूरच्या वारीला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र सध्या काही अपप्रवृत्ती वारीच्या पवित्र परंपरेत घुसखोरी करून संत साहित्य, अभंग, धर्मग्रंथ व वारकरी श्रद्धास्थानांविषयी अपप्रचार करत आहेत. वारकरी संप्रदाय व संघटना हा अवमान सहन करणार नाही, असा इशारा वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्यासह वारकरी संत आणि मान्यवरांनी दिला. समस्त वारकरी संप्रदाय, संस्थान, संघटना व हिंदु जनजागृती समिती वतीने पुणे येथील श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरी नक्षलवादाच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. समरसतेच्या नावाखाली काम करणारे तथाकथित तसेच नक्षवादी कारवायांमध्ये ज्यांचे कार्यकर्ते पकडले आहेत, अशी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कबीर कला मंच यांसह ज्यांच्यावर शहरी नक्षलवादाच्या गुन्ह्यांची नोंद आहे, असे इतर पुरोगामी वारीत शिरले आहेत. ही बाब शासनाने गांभीर्याने घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही कराडकर यांनी केली. नक्षलवादाचा आरोप असणार्‍या संघटनांचे मुखवटे काढून त्यांचे खरे चेहरे उघड केले आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये नक्षलवादाच्या आरोपाखाली अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांवर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. हे वारीच्या माध्यमातून अंनिस, कबीर कला मंच, पुरोगामी छुपा अजेंडा राबवत आहेत. शहरी नक्षलवादाचा अजेंडा राबवणार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई करावी, असे हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी सांगितले. देहूप्रमाणे वारकर्‍यांची सर्व तीर्थक्षेत्रे कायमस्वरूपी मद्य-मांस मुक्त करावीत, असे ह.भ.प. नितीन महाराज मोरे यांनी सांगितले.‌ वारकरी संप्रदायाच्या विचारधारेविरोधी कार्य करणार्‍यांना जशास-तसे उत्तर देण्यास वारकरी सक्षम असल्याचे ह.भ.प. नरहरि महाराज चौधरी म्हणाले.‌ संत, महापुरुष यांवर टिका करणार्‍यांच्या विरोधी त्वरित कायदा करावा, अशी मागणी ह.भ.प. राम महाराज कदम यांनी केली. स्वामी भारतानंद सरस्वती महाराज, ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांनीही मनोगत व्यक्त केले.

जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या रेडिओचे महत्त्व अबाधित-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या रेडिओचे महत्त्व अबाधित-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. २१ जून रेडिओवर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांनी रेडिओवरील कार्यक्रमांना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनविले आहे. त्यामुळे रेडिओचे महत्व कधीही कमी होणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे व्यक्त केला. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व आशा रेडिओ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध एफएम रेडिओ वाहिन्यांच्या सिद्धू, अक्की, अर्चना, ब्रजेश, भूषण, सपना भट या रेडिओ जॉकींनी मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी फडणवीस बोलत होते. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, संचालक विभीषण चवरे यावेळी उपस्थित होते. लहानपणी दिवसाची सुरूवात रेडिओ ऐकण्यापासून व्हायची. 'विविध भारती' वरील सकाळची गाणी अगदी न चूकता ऐकली जायची. त्यामुळे रेडिओशी लहानपणापासूनच जुळला गेलो‌‌. रेडिओचे महत्व पूर्वीपासून असून आजही ते अबाधीत आहे. रेडिओ हे समाजातील शेवटच्या व्यक्तिपर्यंत पोहोचण्याचे सशक्त माध्यम असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस यांनी या मुलाखतीत रेडिओवरील संगीत ऐकणे, गाणी लिहिणे आदी छंदाविषयीही सांगितले. शीघ्र कविता करत फडणवीस यांनी गाणेही गायले. या कार्यक्रमात आशा रेडिओ जीवन गौरव पुरस्कार २०२५ विश्वनाथ ओक यांना प्रदान करण्यात आला. आशा सर्वोत्कृष्ट पुरूष निवेदक पुरस्कार रेडिओ मिर्ची वाहिनीचे रेडिओ जॉकी जितूराज, आशा सर्वोत्कृष्ट महिला निवेदक पुरस्कार रेड एफ एम वाहिनीच्या रेडिओ जॉकी मल्लिशा यांना प्रदान करण्यात आला. आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ केंद्र पुरस्कार रेडिओ सिटीला, आशा सर्वोत्कृष्ट कम्युनिटी रेडिओ केंद्राचा पुरस्कार विकास भारती रेडिओ केंद्र नंदूरबार यांना देण्यात आला. यासह अन्य १२ गटात रेडिओ पुरस्कार देण्यात आले. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.‌ आशिष शेलार यांनीही मनोगत व्यक्त केले.

शुक्रवार, २० जून, २०२५

बीबीए, बीसीए, बीबीएम आणि बीएमएस अभ्यासक्रमासाठीची अतिरिक्त सीइटी येत्या १९ व २० जुलै

बीबीए, बीसीए, बीबीएम आणि बीएमएस अभ्यासक्रमासाठीची अतिरिक्त सीइटी येत्या १९ व २० जुलै होणार मुंबई, दि. २० जून बीबीए, बीसीए, बीबीएम आणि बीएमएस या अभ्यासक्रमासाठी येत्या १९ व २० जुलै रोजी अतिरिक्त सीइटी घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) शुक्रवारी देण्यात आली. या परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल २५ हजार ५०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या अभ्यासक्रमाला अल्प प्रतिसाद मिळाल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या अभ्यासक्रमासाठी आणखी एक प्रवेश प्रक्रिया घेण्याचा निर्णय घेतला होता, त्यानुसार ही परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना लवकरच त्यांच्या लॉगिन आयडीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अधिक माहिती mahacet.org या संकेतस्थळावर मिळेल.

पुस्तकात वह्यांची पाने देण्याचा प्रयोग फसला- सुराज्य अभियान

पुस्तकात वह्यांची पाने देण्याच्या प्रयोगात शासनाचे १३५ कोटी रुपयांचे नुकसान - सुराज्य अभियानाकडून चौकशीची मागणी मुंबई, दि. १९ जून विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने पुस्तकातच वह्यांची पाने देण्याच्या प्रयोगात शासनाचे १३५ कोटी रुपये वाया गेले आहेत. आणि हा निर्णय बदलण्याची वेळ आली असून याची चौकशी केली जावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियान’ने केली आहे. मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री तसेच शालेय शिक्षण विभागाचे सचिव यांना निवेदन देण्यात आले असून या चुकीच्या निर्णयासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांकडून ही रक्कम वसूल करावी, अशी मागणी‘सुराज्य अभियान’चे महाराष्ट्र राज्य समन्वयक अभिषेक मुरुकटे यांनी या निवेदनात केली आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने २०२३–२४ पासून इयत्ता २ री ते ८ वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे लेखन साहित्य उपलब्ध नसल्याच्या कारणास्तव पाठ्यपुस्तकांमध्ये काही पाने लिहिण्यासाठी जोडण्यात आली. मात्र प्रत्यक्षात ही पाने अपुरी ठरली आणि विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणेच वह्याही घ्याव्या लागल्या. परिणामी दप्तराचे वजन कमी होण्याऐवजी वाढलेच. शिवाय वह्यांची पाने जोडल्यामुळे पाठ्यपुस्तकांची जाडी आणि किंमत वाढल्याचे निवेदनात निदर्शनास आणून देण्यात आले आहे. हा निर्णय प्रायोगिक स्वरूपात काही शाळांमध्ये अमलात आणून त्याचा आढावा घेतला गेला असता, तर शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान टाळता आले असते. शिक्षण क्षेत्रातील निर्णय अभ्यासपूर्वक आणि प्रात्यक्षिक तपासणीच्या आधारे घेणे आवश्यक आहे, हे या घटनेतून अधोरेखित होते, असे मुरकुटे यांनी सांगितले.
बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार या निर्णयामुळे शैक्षणिक वर्ष २०२३–२४ मध्ये ७२ कोटी रुपये आणि २०२४–२५ मध्ये ६३.६३ कोटी रुपये, असा एकूण १३५.६३ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च शासनाला करावा लागला. २८ जानेवारी २०२५ रोजी काढलेल्या शासन निर्णयात ‘सदर योजनेचा आढावा घेतला असता, पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या वह्यांच्या कोऱ्या पानांचा विद्यार्थ्यांकडून शिकवलेल्या घटकांच्या नोंदी घेण्यासाठी अपेक्षेप्रमाणे उपयोग झाल्याचे दिसून आले नाही’,असे स्पष्ट करण्यात आले आहे.

गुरुवार, १९ जून, २०२५

प्रयोगात्मक कलांच्या अभ्यासासाठी पु. ल. देशपांडे कला अकादमीत संशोधन केंद्र

प्रयोगात्मक कलांसाठी पु.ल. देशपांडे कला अकादमीत शाहीर साबळे यांच्या नावाने संशोधन केंद्र - सांस्कृतीक कार्यमंत्री ॲड आश‍िष शेलार यांची घोषणा मुंबई, दि. १९ जून महाराष्ट्रातील प्रयोगात्मक कलांचे सखोल संशोधन आणि अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतीक कार्य विभागातर्फे पु.ल. देशपांडे कला अकदामीत स्वतंत्र संशोधन केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतीक कार्यमंत्री ॲड. आश‍िष शेलार यांनी गुरुवारी येथे केली. या केंद्राला शाहीर साबळे यांचे नाव देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले सांस्कृतिक कार्य विभागाच्या मंत्रालयात झालेल्या बैठकीत ॲड. शेलार बोलत होते.‌सांस्कृतिक कला संचनालयाचे संचालक बिभीषण चवरे, संबंधित अध‍िकारी, लोककलांचे अभ्यासक प्रकाश खांडगे यावेळी उपस्थ‍ित होते. महाराष्ट्रातील प्रयोगात्मक कला हे महाराष्ट्राचे वैभव आहे. ज्या कलांमध्ये महाराष्ट्राच्या जढणघडणीचे ऐतहास‍िक संदर्भ दडलेले आहेत. त्यांचा उलगडा करुन संशोधन व अभ्यास होण्याची गरज आहे. त्यासाठी हे संशोधन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला, असे ॲड. शेलार म्हणाले.