गुरुवार, २ मार्च, २०१७

महापौर निवासस्थानी स्मारक नकोच


ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महापौर निवासस्थानी स्मारक नकोच

'हेरिटेज वास्तू'असलेल्या मुंबई महापौरांच्या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक कशासाठी? मुंबईत अन्यत्र भूखंड घेऊन किंवा शिवसेना भवन येथेही स्मारक उभारता येऊ शकते. बाळासाहेब ठाकरे हे कधीही महापौर निवास येथे राहायला नव्हते. त्यामुळे महापौर निवासातच त्यांचे स्मारक झाले पाहिजे असे नाही.

महापौर निवासस्थान ही हेरिटेज वास्तू (ऐतिहासिक वारसा लाभलेली) आहे. मुंबईचा प्रथम नागरिक अर्थात महापौर यांचे ते अधिकृत निवासस्थान आहे. उद्या अन्य राजकीय पक्षांनी मुंबईतील अशा हेरिटेज वास्तू असलेल्या ठिकाणी दुसऱया कोणाचे स्मारक करावे, अशी मागणी केली तर? त्यामुळे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वास्तूंमध्ये कोणाचेही स्मारक केले जाऊ नये.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या अन्य नेत्यांनी ठरविले तर ते मुंबईत अगदी दादर किंवा वांद्रे येथे स्वतंत्र भूखंड घेऊन त्यावर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारु शकतात. तेवढी आर्थिक ताकद या मंडळींची नक्कीच आहे. तसेच आवाहन केले तर सर्वसामान्य शिवसैनिकही बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी आर्थिक मदत नक्कीच करतील. त्यामुळे पैशांअभावी स्मारक रखडले किंवा उभारता येणे शक्य नाही, असे होणारच नाही. पण त्यासाठी प्रखर राजकीय इच्छाशक्ती मात्र हवी आणि महापौर निवासस्थानीच स्मारक उभारण्याचा हट्ट सोडून देण्याची गरज आहे. महापालिकेत आज अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. समजा पालिकेत कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीची सत्ता अगदी भाजपची सत्ता असती आणि त्यांनी त्यांच्या कोणा नेत्याचे स्मारक महापौर निवासात करावे, अशी मागणी केली असती तर तेव्हा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची काय भूमिका राहिली असती? त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता, राजकारण न करता पठिंबा दिला असता? की तेव्हा त्यांची भूमिका वेगळी राहिली असती?

'मातोश्री' या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे अनेक वर्षे वास्तव्य होते. खरे तर याच ठिकाणी त्यांचे स्मारक होणे अधिक उचित ठरेल असे वाटते. भावनेचाच विचार केला तर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठीचे सगळ्यात पहिले प्राधान्य 'मातोश्री' येथेच असायला पाहिजे. त्यानंतर शिवसेना भवनाचाही विचार व्हावा. नाहीतर स्वतंत्र भूखंड घेऊन तिथे स्मारक उभे केले जावे. पण कोणत्याही परिस्थीतीत केवळ मुंबईतच नव्हे तर कुठेही ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वास्तूत कोणाही राजकीय नेत्याचे स्मारक केले जाऊ नये असे वाटते.

-शेखर जोशी

'प्रतिभा'वंत दिलखुलास पवार

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्र व भारतीय राजकारणातील अनाकलनीय व्यक्तिमत्व म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते. धूर्त, पाताळयंत्री, विश्वासघातकी, मनाचा थांगपत्ता लागू न देणारे वगैरे वगैरे अशा अनेक शब्दांत त्यांच्यावर टिका केली जाते. राजकारणात पवार हे कधी कुणाला कात्रजचा घाट दाखवतील याची कल्पना नसते, तसेच पवार यांचे हो म्हणजे नाही आणि नाही म्हणजे हो असेही त्यांच्याबाबतीत म्हटले जाते. पण पुण्यातील एका कार्यक्रमात पवार यांचे एक वेगळेच रुप उपस्थिताना पाहायला मिळाले. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या राम कदम कलागौरव पुरस्कार सोहोळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी शरद पवार आणि त्यांच्या सौभ्यागवती प्रतिभा पवार यांची प्रकट मुलाखत घेतली आणि या मुलाखतीमधून 'प्रतिभा'वंत पवार आणि राजकारणाबाहेरील 'दिलखुलास'पवार उलगडले गेले. सोमवारी रात्री झी २४ तास वर 'प्रतिभा'वंत पवार या कार्यक्रमात त्याची झलक पाहायला मिळाली. राजकारणाबाहेरील पवार यांचा मिश्कीलपणा, हजरजबाबीपणा, त्यांचे वाचन, अभ्यास या पैलूंचे दर्शन घडले.

त्या मुलाखतीमधील काही किस्से

येड्याचा पाटील ठाण्याचा नगराध्यक्ष झाला रे ही १९६८-६९ मधली गोष्ट आहे. मी विधानसभेवर निवडून गेलो होतो. वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री होते. काही कामानिमित्त मी वसंतराव नाईक यांच्या घरी गेलो होतो. तिथे ग.दि.मा अर्थात ग.दि. माडगूळकर आलेले होते. त्यांनी वसंतराव नाईक यांना सांगितले आमचा मित्र सावळराम पाटील अर्थात कवी पी. सावळाराम हे ठाणे नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभे आहेत आणि कोणत्याही परिस्थीतीत आमचा हा दोस्त निवडून आला पाहिजे. वसंतराव नाईक यांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी तुझ्यावर सोपवली. त्यांना कसेही करुन निवडून आणायचेच. मी म्हटले हे कवी राजकारणाच्या भानगडीत कशाला पडताहेत. पण नाईक साहेबांनी सांगितले आणि मी कामाला लागलो. ठाण्यात दोन दिवस राहिलो. दोन/चार मते कमी पडत होती. माझ्या परीने काय करायचे ते 'उद्योग'केले आणि पी. सावळाराम नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर आम्ही त्यांना घेऊन वसंतराव नाईक यांच्याकडे गेलो. तिथे माडगूळकर यांंनी मला मिठी माररली आणि मला म्हणाले, दोस्ता येड्याचा पाटील ठाण्याचा नगराध्यक्ष केलास रे. (पी. सावळाराम यांचे मूळ गाव येडे निपाणी होते.)

माझ्या बायकोची प्रत्येक साडी मीच आणलेली

माझ्या बायकोने नेसलेली प्रत्येक साडी मी स्वतः खरेदी केलेली आहे. मी जिथे जिथे जाईन तिथून तिला साड्या घेऊन येतो. गेली पन्नास वर्षे मी हे करतोय. मग आठवड्याचे सात दिवस फिरायला मी मोकळा असतो. शरद पवार यांच्या चेहऱयाककडे पाहून त्यांच्या मनात काय चाललाय याचा थांगपत्ता तुम्हाला तरी कधी लागतो का, असा प्रश्न गाडगीळ यांनी प्रतिभाताई यांना विचारला तेव्हा त्या 'नाही' असे उत्तरल्या. त्यावर पवार यांनी आयुष्यात ‘गुगली बॉलरच्या मुलीशी लग्न केले की विकेट जातेच' तसेच आत्ता घडले. असे प्रत्युत्तर दिले.

आवडत्या गायिका किशोरी आणि गायक पं. भीमसेन जोशी

‘आवडते गायक-गायिका कोण?’या प्रश्नावर पवार म्हणाले, माझी आवडती गायिका किशोरी (आमोणकर) आहे. आणि गायक अर्थातच भीमसेन (जोशी), असे उत्तर दिले.

चरित्र व आत्मचरित्र वाचण्यात जास्त गंमत

चरित्र व आत्मचरित्रात्मक पुस्तके वाचायला जास्त मला आवडते.त्यातून ती माणसे कळायला व जाणून घ्यायला मदत होते.

विल्सन आणि यशवंतराव यांची मैत्री

लंडनच्या पार्लमेंटमधील मी गेलो होतो. एक वयस्कर गृहस्थ बसले होते. त्यांना कुठेतरी पाहिल्यासारखे वाटत होते. मी शेजारच्या माणसाला विचारले ते कोण आहेत, त्याने सांगितले की ते इंग्लंडचे माजी पंतप्रधान विल्सन होते. त्यांच्यापाशी मी गेलो. माझी ओळख करुन दिली. कठुन आलात ते त्यांनी विचारले तेव्हा मी महाराष्ट्रतून आलो असे सांगितल्यावर ते म्हणाले आमचे मित्र वाय.बी. चव्हाण कसे आहेत. तुम्ही एकमेकांना ओळखता असे दिसताय. ते म्हणाले आम्ही दोघेही परराष्ट्र मंत्री होतो. 'युनो'च्या अधिवेशनाला आम्ही न्यूयॉर्कला बरोबर असायचो. काम झाले की दुपारी मी ग्रंथालयात येऊन बसायचो. माझ्याबरोबर ग्रंथालयात आणखी एक व्यक्ती यायची आणि ती म्हणजे वाय. बी. चव्हाण. माझ्यासारखीच त्यांनाही पुस्तके वाचण्याची आवड होती. जगात प्रकाशित झालेल्या कोणत्याही चांगल्या इंग्रजी पुस्तकावर आमची चर्चा व्हायची तेव्हा चव्हाण मला त्या पुस्तकाचा थोडक्यात परिचय करुन द्यायचे.

http://zeenews.india.com/marathi/news/video/prabhavant-pawar-24th-february-2017/354381

पवार यांच्या मुलाखतीची लिंक

दफन नको दहनच हवे


दफन नको दहनच हवे

खासदार साक्षी महाराज हे त्यांच्या वक्तव्याबाबत नेहमीच प्रसारमाध्यमातून चर्चेत असतात. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद-विवाद व चर्चा घडत असते. भारतात कोणाचाही अंत्यसंस्कार दहन पद्धतीनेच केला जावा. हिंदू धर्मात ज्यांनी संन्यास घेतला आहे अशा साधूंचे दहन केले जात नाही तर त्यांची समाधी बांधली जाते. मात्र साक्षी महाराज यांनी मुसलमानांसह साधूंचेही दहन करावे, असे प्रतिपादन केले आहे. या देशात सुमारे वीस कोटी मुसलमान आहेत. सर्वांसाठी कबर/ दफनभूमी बनवायची म्हटली तर जागा कशी पुरणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. खरे तर साक्षी महाराज यांनी अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाला वाचा फोडली आहे.

हेच विधान साक्षी महाराज यांच्याऐवजी एखाद्या पुरोगामी किंवा समाजवादी, धर्मनिरपेक्ष व्यक्तीने केले असते तर कदाचित त्यावर वाद झालाही नसता. मृत व्यक्तीचे दफन न करता दहन करण्याची हिंदू धर्मात पद्धत आहे. (अर्थात हिंदू धर्मातील काही पंथांमध्ये दहनाऐवजी दफनाचीही पद्धत आहे) मृत व्यक्तीचे दहन करणे ही चांगली व योग्य पद्धत असल्याचे आता समोर येत आहे. पारशी समाजातील काही मृत व्यक्तींचेही दहन केले गेले असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमातूनच पुढे आल्या होत्या. त्यामुळे भारतातील हिंदूंसह इतर अन्य धर्मियांनीही दफनाऐवजी दहन करायला सुरुवात करावी, हे साक्षी महाराज यांनी केलेले विधान योग्यच आहे. काळानुरुप त्यात बदल करणे मात्र अत्यंत गरजेचे आहे. ते म्हणजे दहनासाठी लाकडांचा वापर अजिबात करु नये. ती मानसिकता आपण सर्वानीच बदलण्याची गरज आहे. लाकडाऐवजी मृत व्यक्तीचे दहन हे विद्युत दाहिनीत किंवा डिझेल, गॅस शव दाहिनीतच केले जावे. आज बहतेक स्मशानभूमीत विद्युत शवदाहिनी, डिझेल/गॅस शवदाहिनी बसविण्यात आल्या आहेत. काही जणांकडून त्याचा वापरही केला जात आहे. मात्र ज्या प्रमाणात लाकडांऐवजी याचा वापर झाला पाहिजे तेवढा तो होत नाही, असे दिसते.

हिंदू धर्मात जे सोळा संस्कार सांगितले आहे (यात जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या विविध विधिंचा समावेश आहे) त्यात शेवटचा संस्कार हा अंत्येष्टी संस्कार आहे. हिंदू धर्मातील काही पंथीयांमध्येही दहनाऐवजी दफन केले जाते. अंत्येष्टी संस्कारानुसार मृत व्यक्तीचे लाकडाच्या चितेवर दहन करावयास सांगितले आहे. हिंदू धर्मातील सती रुढी आणि अन्य अनिष्ट प्रथा/परंपरा आपण बंद केल्या. तसेच बदलत्या काळानुसार यातही बदल होणे खरोखरच गरजेचे आहे. विद्युत दाहिनी किंवा गॅस/डिझेल शवदाहिनीत दहन करताना जे काही धार्मिक/अंत्यविधिचे संस्कार करता येतात.त्यामुळे चितेवरच दहन केले पाहिजे हा अट्टहास आता सोडला पाहिजे. पर्यावरणाच्या दृष्टीनेही विचार केला तर चितेवर दहन करण्याएेवजी विद्युत दाहिनी किंवा डिझेल/गॅस शवदाहिनीतच अंत्यसंस्कार करणे ही काळाची गरज आहे. सुजाण व सुशिक्षित लोकांकडून त्याचा अधिक मोठ्या प्रमाणात वापर झाला पाहिजे.

पारसी समाजातील अनेकांना आता, आपल्या मृत्यूनंतर पारसी धर्मपद्धतीप्रमाणे आपला अंत्यविधी होऊ नये, असे वाटते. हे वाटणाऱ्यांची संख्या मुंबईत अधिक आहे, याला अर्थातच महत्त्व आहे कारण मुळात अगदीच अल्पसंख्य असले तरी पारसी लोकांची या महानगरातील संख्या केवळ राज्यातील अन्य शहरांच्या नव्हे तर देशातील पारसी लोकसंख्येच्या मानाने लक्षणीय आहे. धार्मिक रीतीनुसार ‘डूंगरवाडी’मध्ये, म्हणजे टेकडीवरील विहीरवजा बांधीव जागेत पारसी मृतदेह ठेवले जातात आणि इराणी संस्कृतीत मातास्वरूप असलेली गिधाडे तसेच सूर्य यांमुळे त्या कलेवरांची विल्हेवाट पुढील काही काळात लागत राहते. पण प्रश्न आहे गिधाडांच्या घटत्या संख्येचा आणि झपाटय़ाने वाढणाऱ्या शहरांत अशी विल्हेवाट लागणे शक्य होईल काय, याचाही. यातून व्यवहार्य आणि मनाला पटणारा मार्ग म्हणून ‘माझ्या मृत्यूनंतर माझे दहनच करा’ असे इच्छापत्र अनेक पारसी जाणत्यांनी करून ठेवले. हे एक प्रकारे, पारसी धर्मापुढले मोठे आव्हानच होते. माझे दहनच करा, अशी इच्छा ज्यांनी लिहून ठेवल्यामुळे पूर्ण करावी लागली, अशांमध्ये ३० वर्षांपूर्वी दिवंगत झालेले दाराब टाटा (जेआरडींचे बंधू) जसे होते, तसेच मुंबईच्या कलादालन विश्वाची पायाभरणी करणारे केकू गांधीदेखील होते. अशा दहन-इच्छापत्रांची संख्या वाढत असतानाच गिधाडे कमी होतच होती. मग काही पारसी धर्मगुरूंनीच मुंबई महापालिकेकडून विद्युतदाहिनी आणि तिला जोडून पारसी प्रार्थनालय अशा सुविधेची अनुमती मिळवली.भारतभरात अवघ्या ६९ हजारांच्या आसपास असलेल्या पारसी समाजातून एकटय़ा मुंबईतल्या विद्युतदाहिनीत २०१६ या वर्षात आठ महिन्यांत सुमारे ८० दहनविधी झाले. धर्मसंस्कार बुडाला तरी चालेल, सुधारणा हवीच अशी धमक पारसी समाजाने दाखविली तशी ती हिंदू धर्मियांसह अन्य धर्मियानीही दाखविण्याची आवश्यकता आहे.

मंगळवार, २१ जून, २०१६

शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग आवश्यक


योग ही प्राचीन भारतीय पद्धती असून प्रत्येक माणसाच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी योग आवश्यक आहे, असे कैवल्यधाम या संस्थेचे कार्यकारी विश्वस्त सुबोध तिवारी यांनी सांगितले.

आपल्या प्रत्येकाच्या जीवनात या तीन गोष्टींना महत्व असून योगाच्या माध्यमातून या तीनही गोष्टींचा समन्वय राखला जातो. सध्याच्या बदलत्या आणि धावपळीच्या जीवनशैलीत प्रत्येकालाच योगाची गरज आहे. योगातील योगासने, प्राणायाम, कपालभाती, भस्त्रिका, व अन्य कृतींमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगल्या प्रकारे टिकून राहाते. योगाच्या जोडीला आपल्याकडे सुयोग्य आहाराची जोड दिलेली आहे. आहार हा सात्विक व मर्यादित असावा. यासाठी काही नियम केले आहेत. धावपळीचे जीवन, जीवघेणी स्पर्धा, ताण व तणाव, जेवण आणि खाण्याच्या बदललेल्या वेळा व सवयी, पोट भरण्यासाठी खाल्ले जाणारे फास्ट फूड, मसालेदार, तळलेले पदार्थ याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावरही होत असतो. यातून शारीरिक व्याधी जडतात. या सगळ्यावर आपल्या ऋषीमुनींनी योगाच्या माध्यमातून उपाय दिला आहे. कितीही धावपळ असली तरी प्रत्येकाने किमान अर्धा तास योग करण्यासाठी द्यावा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करु नका. मर्यादा पाळा आणि योगाला आपली जीवनशैली बनवा, असेही तिवारी यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात कशी झाली याविषयी माहिती देताना तिवारी म्हणाले, नऊ वर्षांपूर्वी पोर्तुगाल येथे २१ जून या दिवशी योग दिन साजरा करणयात आला होता. योगाचे महत्व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व योगाच्या प्रसारासााठी एक दिवस निश्चित करुन तो दिवस आंतरराष्टीय पातळीवर साजरा केला जावा, यासाठी काही योग संस्थांनी एकत्र येऊन प्रयत्न सुरु केले होते. संंयुक्त राष्ट्रसंघाकडे एक निवेदनही देण्यात आले होते. २७ सप्टेंबर २०१४ या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्यांसमोर भाषण करताना योगाची प्राचीन भारतीय परंपरा, योगाचे महत्व सांगितले होते. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन साजरा करण्याची सूचना केली होती. ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रतिनिधी सभेत या विषयावर मतदान घेण्यात आले. नव्वद टक्क्यांहून अधिक मतांनी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाकडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.

भारतीय सस्कृतीत योगाला हजारो वर्षांची परंपरा आहे. पतंजली ऋषींनी १९५ योगसुत्रे लिहिली असून योगाची व्याख्याही केली आहे. त्यामुळे पतंजली ऋषींना योगाचे मुख्य प्रवर्तक किंवा संस्थापक म्हणता येईल. पुढे महर्षी घेरंंड, वासिष्ठ यांनीही त्यात आपले योगदान दिले. योगविषयक प्राचीन संस्कृत ग्रंथही आपल्याकडे आहेत. अर्थात योग म्हणजे केवळ आणि केवळ आसने नाहीत. पतंजली ऋषींनी सांगितलेल्या योग सुत्रात फक्त तीन सुत्रे आसनांबाबत आहेत. नाथ संप्रदायाने योगासनांना विशेष महत्व दिले. आजही सर्वसामान्य लोकांमध्ये योग म्हटले की फक्त योगासने असा एक गैरसमज आहे.स्वामी कैवल्यानंद यांनी १९१७ मध्ये अमळनेर येथे कैवल्यधामची स्थापना केली. त्यानंतर १९२४ मध्ये लोणावळा येथे कैवल्यधाम सुरु झाले. योग आणि विज्ञान यांची सांगड स्वामी कैवल्यानंद यांनी घातली. १९२६ मध्ये त्यानी योग मिमांसा हे माासिक सुरु केले. संस्थेतर्फे योगविषयक २०० संशोधन प्रबंध आत्तापर्यंत सादर झाले आहेत. योग हा वैद्यकशास्त्रालाही कसा पुरक आहे ते पटवून देण्याची सुरुवात स्वामी कैवल्यानंद यांनी केल्याचेही तिवारी यांनी सांगितले.

महाराष्ट्रात विविध संस्थांककडूनन योग प्रसाराचे, योग शिक्षक तयार करण्याचे काम सुरु आहे. या संस्थांमधून दरवर्षी २०० ते ३०० योग शिक्षक तयार होत आहेत. या सर्व योगशिक्षण संस्थांचा आत्तापर्यंत अभ्यासक्रम वेगवेगळा होता. आता केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार सर्वांचा समान अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. योग परीक्षांमध्येही समानता आणण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयातर्फे योग विषयात सकारात्मक पावले उचलली गेली आहेत. योग या विषयात भविष्यात खूप चांगली संधी आहे. देशभरातील सीबीएसईच्या २७ हजार शाळांमधून आता योगशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येत योग शिक्षकांची गरज लागणार आहे. योगतज्ज्ञ आणि योग शिक्षकांना परदेशातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शळा, महाविद्यालये, कॉपोरेट क्षेत्र, रिसार्ट, स्पा येथेही योग शिक्षक लागतात. करिअर म्हणून यात चांगली संधी असल्याचेही तिवारी म्हणाले.

शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग आवश्यक


योग ही प्राचीन भारतीय पद्धती असून प्रत्येक माणसाच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी योग आवश्यक आहे, असे कैवल्यधाम या संस्थेचे कार्यकारी विश्वस्त सुबोध तिवारी यांनी सांगितले.

आपल्या प्रत्येकाच्या जीवनात या तीन गोष्टींना महत्व असून योगाच्या माध्यमातून या तीनही गोष्टींचा समन्वय राखला जातो. सध्याच्या बदलत्या आणि धावपळीच्या जीवनशैलीत प्रत्येकालाच योगाची गरज आहे. योगातील योगासने, प्राणायाम, कपालभाती, भस्त्रिका, व अन्य कृतींमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगल्या प्रकारे टिकून राहाते. योगाच्या जोडीला आपल्याकडे सुयोग्य आहाराची जोड दिलेली आहे. आहार हा सात्विक व मर्यादित असावा. यासाठी काही नियम केले आहेत. धावपळीचे जीवन, जीवघेणी स्पर्धा, ताण व तणाव, जेवण आणि खाण्याच्या बदललेल्या वेळा व सवयी, पोट भरण्यासाठी खाल्ले जाणारे फास्ट फूड, मसालेदार, तळलेले पदार्थ याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावरही होत असतो. यातून शारीरिक व्याधी जडतात. या सगळ्यावर आपल्या ऋषीमुनींनी योगाच्या माध्यमातून उपाय दिला आहे. कितीही धावपळ असली तरी प्रत्येकाने किमान अर्धा तास योग करण्यासाठी द्यावा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करु नका. मर्यादा पाळा आणि योगाला आपली जीवनशैली बनवा, असेही तिवारी यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात कशी झाली याविषयी माहिती देताना तिवारी म्हणाले, नऊ वर्षांपूर्वी पोर्तुगाल येथे २१ जून या दिवशी योग दिन साजरा करणयात आला होता. योगाचे महत्व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व योगाच्या प्रसारासााठी एक दिवस निश्चित करुन तो दिवस आंतरराष्टीय पातळीवर साजरा केला जावा, यासाठी काही योग संस्थांनी एकत्र येऊन प्रयत्न सुरु केले होते. संंयुक्त राष्ट्रसंघाकडे एक निवेदनही देण्यात आले होते. २७ सप्टेंबर २०१४ या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्यांसमोर भाषण करताना योगाची प्राचीन भारतीय परंपरा, योगाचे महत्व सांगितले होते. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन साजरा करण्याची सूचना केली होती. ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रतिनिधी सभेत या विषयावर मतदान घेण्यात आले. नव्वद टक्क्यांहून अधिक मतांनी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाकडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.

भारतीय सस्कृतीत योगाला हजारो वर्षांची परंपरा आहे. पतंजली ऋषींनी १९५ योगसुत्रे लिहिली असून योगाची व्याख्याही केली आहे. त्यामुळे पतंजली ऋषींना योगाचे मुख्य प्रवर्तक किंवा संस्थापक म्हणता येईल. पुढे महर्षी घेरंंड, वासिष्ठ यांनीही त्यात आपले योगदान दिले. योगविषयक प्राचीन संस्कृत ग्रंथही आपल्याकडे आहेत. अर्थात योग म्हणजे केवळ आणि केवळ आसने नाहीत. पतंजली ऋषींनी सांगितलेल्या योग सुत्रात फक्त तीन सुत्रे आसनांबाबत आहेत. नाथ संप्रदायाने योगासनांना विशेष महत्व दिले. आजही सर्वसामान्य लोकांमध्ये योग म्हटले की फक्त योगासने असा एक गैरसमज आहे.स्वामी कैवल्यानंद यांनी १९१७ मध्ये अमळनेर येथे कैवल्यधामची स्थापना केली. त्यानंतर १९२४ मध्ये लोणावळा येथे कैवल्यधाम सुरु झाले. योग आणि विज्ञान यांची सांगड स्वामी कैवल्यानंद यांनी घातली. १९२६ मध्ये त्यानी योग मिमांसा हे माासिक सुरु केले. संस्थेतर्फे योगविषयक २०० संशोधन प्रबंध आत्तापर्यंत सादर झाले आहेत. योग हा वैद्यकशास्त्रालाही कसा पुरक आहे ते पटवून देण्याची सुरुवात स्वामी कैवल्यानंद यांनी केल्याचेही तिवारी यांनी सांगितले.

महाराष्ट्रात विविध संस्थांककडूनन योग प्रसाराचे, योग शिक्षक तयार करण्याचे काम सुरु आहे. या संस्थांमधून दरवर्षी २०० ते ३०० योग शिक्षक तयार होत आहेत. या सर्व योगशिक्षण संस्थांचा आत्तापर्यंत अभ्यासक्रम वेगवेगळा होता. आता केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार सर्वांचा समान अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. योग परीक्षांमध्येही समानता आणण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयातर्फे योग विषयात सकारात्मक पावले उचलली गेली आहेत. योग या विषयात भविष्यात खूप चांगली संधी आहे. देशभरातील सीबीएसईच्या २७ हजार शाळांमधून आता योगशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येत योग शिक्षकांची गरज लागणार आहे. योगतज्ज्ञ आणि योग शिक्षकांना परदेशातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शळा, महाविद्यालये, कॉपोरेट क्षेत्र, रिसार्ट, स्पा येथेही योग शिक्षक लागतात. करिअर म्हणून यात चांगली संधी असल्याचेही तिवारी म्हणाले.

शुक्रवार, २० मे, २०१६

नेत्रदान चळवळीचा 'सदिच्छादूत'


तुला पाहते रे तुला पाहते तुझी मूर्त माझ्या उरी राहते तुला पाहते रे तुला पाहते जरी आंधळी मी तुला पाहते.. गाण्यातील कविकल्पना ही भव्य आणि उदात्त असली तरी वास्तवात मात्र चित्र फार वेगळे आहे. भारतात आज सुमारे सव्वा कोटी लोक अंध आहेत. हे अंधत्व काहीना काही कारणाने आलेले असले तरी यातील सुमारे ३० लाख लोकांना पारपटल रोपणाने दृष्टी प्राप्त होऊ शकते. इतक्या लोकांना दृष्टी प्राप्त करून द्यायची असेल तर वर्षांला किमान एक ते दीड लाख लोकांचे मरणोत्तर नेत्रदान होणे गरजेचे आहे. मात्र दुर्दैवाने भारतात अवघ्या २५ ते ३० हजार व्यक्तींचे मरणोत्तर नेत्रदान होत आहे. गेली ३५ वर्षे तळमळीने आणि ध्येयाने मरणोत्तर नेत्रदान प्रसाराचे कार्य करणारे ठाण्याचे श्रीपाद आगाशे यांनी या वास्तवाकडेच दृष्टी ठेवून आपले कार्य सुरू केले.

नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर आगाशे यांच्या नेत्रदान चळवळीच्या प्रचार आणि प्रसाराला अधिक वेग आला. मरणोत्तर नेत्रदान चळवळीचे ते ‘सदिच्छादूत’ झाले आहेत. या सगळ्या कामाची सुरुवात १९८१ मध्ये झाली. अणुशक्ती खात्यातील नोकरीच्या निमित्ताने आगाशे हे १९७१ ते १९९१ या कालावधीत चेन्नईजवळील कल्पाकम येथे वास्तव्यास होते. १९८० च्या सुमारास ‘रीडर्स डायजेस्ट’मधील एक लेख त्यांच्या वाचनात आला आणि त्यांची ‘दृष्टी’ बदलून गेली. श्रीलंकासारखा छोटा देश फक्त भारताला नव्हे तर संपूर्ण जगाला डोळे पुरवतो, अशी माहिती त्या लेखात होती. ते वाचून आगाशे अस्वस्थ झाले. भारतापेक्षा कितीतरी पटीने लहान असणारा देश नेत्रदान चळवळीत इतके मोठे काम करू शकतो आणि आपण त्या तुलनेत कुठेच नाही, या लाजिरवाण्या वास्तवाने ते बैचैन झाले. नेत्रदानाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी चेन्नईजवळील एगमोर येथील नेत्ररुग्णालय व नेत्रपेढीला भेट दिली. तेथील डॉक्टर्स व तज्ज्ञांशी बोलून हा विषय समजून घेतला. पुस्तके वाचून अभ्यास केला आणि याच विषयावर काम करण्याचे नक्की केले. नोकरीत असताना शनिवार आणि रविवार या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी त्यांनी हा विषय जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. अर्थात नोकरीमुळे या कामावर काही मर्यादा होती. १ जानेवारी २०११ मध्ये आगाशे सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतर त्यांनी पूर्णपणे या कामाला वाहून घेतले.

‘नेत्रदान एक राष्ट्रीय गरज’ या विषयावर त्यांनी मुंबई, ठाणे परिसर तसेच राज्यभरातही विविध ठिकाणी सुमारे अडीचशे व्याख्याने दिली आहेत. विविध ठिकाणी भरणारी प्रदर्शने, ग्राहक पेठा यातही आगाशे सहभागी होतात. येथे भेट देणाऱ्या लोकांपर्यंत पत्रके वाटप करून आणि त्यांच्याशी संवाद साधून आगाशे हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवितात. त्यासाठी आगाशे यांनी मराठीसह हिंदी, इंग्रजी आणि गुजराथी भाषेत नेत्रदान चळवळीविषयीची माहिती देणारी पत्रके छापून घेतली आहेत. नेत्रदान प्रचाराचे काम करत असताना त्यांना बऱ्या-वाईट अनुभवांना नेहमीच सामोरे जावे लागते. काही मंडळी आगाशे यांच्या कामाचे तोंडदेखले कौतुक करतात आणि आपल्यावर प्रसंग आला की नातेवाईक काय म्हणतील, रूढी, परंपरा यांचा विचार करून नेत्रदानाचे पाऊल मागे घेतात. खरे तर मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांची नेत्रदानात महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे त्यांनी अशा प्रसंगी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे, असे आगाशे सांगतात. मरणोत्तर नेत्रदान चळवळीत सुशिक्षित मंडळींपेक्षा कमी शिकलेल्या आणि अशिक्षित लोकांचा अधिक सहभाग आहे. तसेच स्त्रियांची संख्याही खूप मोठी असल्याचे निरीक्षण ते नोंदवितात.

मरणोत्तर नेत्रदानाचा अर्ज भरला असेल तरच नेत्रदान करता येते आणि तसा अर्ज भरला नसेल तर नेत्रदान करता येत नाही, असा एक मोठा गैरसमज लोकांमध्ये पसरला असल्याकडेही ते लक्ष वेधतात. खरे तर तसे काहीही नाही. एखाद्या व्यक्तीने मरणोत्तर नेत्रदानाचा अर्ज भरला नसला तरीही त्याच्या मृत्यूनंतर जवळच्या नातेवाईकांनी ठरविले तर ते जवळच्या नेत्रपेढीला नुसता एक दूरध्वनी करून मृत व्यक्तीचे नेत्रदान करू शकतात. मृत्यूनंतर एक किंवा दोन तासांतच नेत्रदान केले पाहिजे असे सांगितले जाते, पण त्यात तथ्य नाही. सहा तासांपर्यंत नेत्रदान होऊ शकते. काही दिवसांच्या बालकांपासून ते ८० ते ९० वर्षांपर्यंतच्या वृद्ध व्यक्तींचे नेत्रदान केले जाऊ शकते. डोळे काढून घेतल्यानंतर पूर्ण डोळ्याचे रोपण केले जात नाही तर डोळ्यातील पारपटलाचे रोपण केले जाते. अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे डोळे दान करण्याची परवानगी स्थानिकपोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या अधिकारात देऊ शकतात. पण पोलिसांनाही या विषयी फारशी माहिती नाही. त्यामुळे पोलिसांचेही प्रबोधन करणे आवश्यक आहे.

सर्व खासगी किंवा शासकीय रुग्णालयांतून रुग्णाच्या शस्त्रक्रियेच्या वेळी त्याच्या जवळच्या नातेवाईकांकडून एक अर्ज भरून घेतला जातो. त्यात शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही, अशी एक अट असते. दुर्दैवाने रुग्णाचा मृत्यू झाला तर रुग्णाचे नेत्रदान करण्याविषयीची एक अटही त्या अर्जात टाकली तर नेत्रदानासाठी आणि अंधांना दृष्टी मिळवून देण्यासाठी त्याचा खूप फायदा होऊ शकेल, याकडेही आगाशे लक्ष वेधतात. अनेक सामाजिक संस्था, धार्मिक किंवा आध्यात्मिक गुरूंकडून लोकांचे मरणोत्तर नेत्रदानाचे अर्ज भरून घेतले जातात. पण केवळ अर्ज भरून घेणे उपयोगाचे नाही. संबंधित व्यक्तीला ‘डोनर कार्ड’ मिळेल व सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता केलेली आहे ना, याचीही खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे आगाशे आवर्जून सांगतात. मरणोत्तर नेत्रदानाच्या प्रचाराबरोबरच गेल्या काही वर्षांपासून आगाशे मरणोत्तर अवयवदान तसेच त्वचादान याचाही प्रचार करत आहेत. आय बँक असोसिएशन ऑफ इंडियाचे ते आजीव सदस्य आहेत. आगाशे यांच्या पत्नी पुष्पा तसेच अनिल आणि आशीष ही दोन्ही मुलेही त्यांच्या परीने या कामात आगाशे यांना मोलाची मदत करत असतात.

श्रीपाद आगाशे- ९९६९१६६६०७

(पूर्वप्रसिद्धी-लोकसत्ता ठाणे/ २० मे २०१६/ सेकंड इनिंग सदर/ पान क्रमांक ७

सोमवार, ९ मे, २०१६

'मंचविशी प'मध्ये रमलेल्यांसाठी... -चंद्रशेखर गोखले यांचा नवा काव्यसंग्रह


कविता किंवा गाणे कसे सुचते/स्फुरते, असा प्रश्न कवी किंवा गीतकाराला विचारला तर तो त्याच्यापरिने त्याचे उत्तर देतो.त्या कशा सुचतात याबाबतचे प्रत्येकाचे उत्तर वेगवेगळे असू शकते.आपल्यापैकीही अनेकांनी विशिष्ट वयात किंवा विशिष्ट वेळी/प्रसंगात कविता केल्याही असतील. कविता किंवा आपल्याला जे व्यक्त करायचे आहे ते शब्दात मांडणे महत्वाचे. साधे-सोपे शब्द वाचकांच्या मनाचा ठाव घेतात, त्यांना ती कविता भावते.त्यांच्या कविता दीर्घकाळ स्मरणात राहतात. त्या अमाप लोकप्रिय होतात, इतकेच नव्हे तर त्या कवीसारख्या कविता लिहिणारे अनेक नवीन कवी तयार होतात. तो काव्यप्रकार मराठी साहित्यात रुजतो. हे भाग्य २५/३० वर्षांपूर्वी चंद्रशेखर गोखले या कवीला लाभले. त्यांनी सादर केलेला 'चारोळी' हा काव्यप्रकार नवीन होता. गोखले यांनी फक्त चार ओळींमध्ये आपल्या मनातील भावना ताकदीने व्यक्त करण्याचे आव्हान आणि कसब 'मी माझा'च्या निमित्ताने पेलून दाखवले आणि संपूर्ण महाराष्टात 'मी माझा' हा काव्यसंग्रह आणि चारोळी हा काव्यपप्रकार लोकप्रिय झाला.

'मी माझा' नंतर गोखले यांचे 'पुन्हा मी माझा', 'मी नवा', 'माझे शब्द', 'माझ्या परीने मी' हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. आता गोखले यांचा 'मंचविशी प' हा नवा काव्य/चारोळी संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. 'मी माझा'हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित करण्याबाबत गोखले यांनी काही प्रकाशकांशी संपर्क साधला होता. पण त्यांनी 'मी माझा' नाकारला आणि शेवटी गोखले यांनी 'मी माझा' स्वत;च प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला, त्यांनी तो प्रकाशितही केला व 'मी माझा'ने इतिहास घडविला. हिंदी, गुजराथी व इंग्रजी भाषेतही त्याचा अनुवाद झाला असून 'ब्रेल लिपी'तही 'मी माझा' प्रकाशित झाले आहे. खरे तर 'मी माझा'च्या ही अगोदर रॉय किणीकर यांचा 'उत्तररात्र'हा चार ओळींची कविता असलेला काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता. पण दुर्देवाने तो लोकांपर्यंत पोहोचलाच नाही. पण आपल्याही अगोदर चारोळी हा काव्यप्रकार किणीकर यांनी सादर केला होता, असे गोखले आवर्जून सांगतात.

गोखले यांच्या नव्या काव्यसंग्रहाचे शीर्षकच ते कोणत्या वयोगटातील व्यक्तींसाठी आहे, हे सांगते. त्यांनी काव्यसंग्रहाच्या अर्पण पत्रिकेतही 'जे जे आपल्या मंचविशीपमध्ये मनापासून रमलेत त्यांच्यासाठी' असे लिहिले आहे. पण असे असले तरी जे मनाने तरुण आहेत त्या सगळ्यांसाठी हा नवा काव्यसंग्रह आहे.

'मंचविशी प'ची सुरुवात
कितीदा तो तिच्या आधी येऊन बसायचा आणि कितीदा ती गेल्यावर तो तिथेच बसलेला दिसायचा या चारोळी ने केली आहे.

चारोळ्या वाचतांना पुढे

त्या दोघांतला संवाद असाच असायचा जरा वेळाने वाळूत चार रेघोट्या दिसायच्या

मनात एक असतं आणि ओठावरती भलतंच नंतर कितीही म्हटलं जाऊ दे तरी मनातलं मनात सलतंच

असं पाहू नकोस सगळं माहित असल्यासारखं तुला हवं असलेले उत्तर माझ्या डोळ्यांत दिसत असल्यासाऱखं

तुला काय शब्द ओठांत धरता येतात आणि कधी काजळासारखे डोळयांत भरता येतात

या आणि इतर चारोळ्या वाचकांसमोर येतात.

काव्यसंग्रहाच्या शेवटी

रंगाचा इवलासा टिळा तू लावून गेलास बंद दारावर आणि त्याचा नाजुकसा ठसा उमटला माझ्या उरावर ही चारोळी आहे.

अवघ्या ३२ पानांच्या या छोटेखानी (पॉकेट साईज आकारातील) पुस्तकात २९ चारोळ्या आहेत. एक चारोळी पुस्तकाच्या मलपृष्ठावर दिली आहे. या सर्व चारोळ्या मनाचा ठाव घेणाऱया आहेत. चारोळ्या वाचतांना प्रत्येकालाच ती चारोळी म्हणजे आपला स्वतचा अनुभव वाटेल. मलपृष्ठावर दिलेल्या चारोळीत

डोळे भरुन आले की तुझं रुप कसं दिसायला लागतं छे, ते दिसण्यासाठी डोळ्यातलं पाणी हलक्या हातानी कुणी पुसावं लागतं

असे गोखले सहजपणे सांगून जातात आणि ते आपल्यालाही पटते.

@शेखर जोशी --------------------------------------

चंद्रशेखर गोखले यांचा ई-मेल आयडी

chandrashekhargokhale18@gmail.com