सोमवार, १३ मार्च, २०१७

साहित्य क्रांती करु शकते-आचार्य अत्रे


साहित्य क्रांती करू शकते

वक्तृत्व कलेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रषु’ या उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वास सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत वक्त्यांच्या भाषणातील काही उतारे तसेच वक्तृत्वकलेसंदर्भातील त्यांचे विचार येथे क्रमश: सादर केले जाणार आहेत. पहिले भाषण लेखक, नाटककार, संपादक, झुंजार वक्ते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे. पुणे येथे उभारण्यात आलेल्या राम गणेश गडकरी यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण अत्रे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी केलेल्या भाषणातील काही भाग..

कला वक्तृत्वाची-१

आचार्य प्र. के. अत्रे

आजपर्यंत मी काही कमी मानसन्मान नाही मिळविले. परंतु त्या सर्व सन्मानापेक्षा आज माझ्या थोर गुरूंचा पुतळा माझ्या हातून उघडला जात आहे हा सन्मान अनन्यसाधारण आहे. (टाळ्या) मोक्ष प्राप्त करून देणारी आणि अमृताचा वर्षांव करणारी ज्ञानेश्वरी मराठी भाषेतच लिहिली गेली. ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी देऊ माथा’ असे खडे बोल तुकोबांनी मराठीतच सांगितले. तुकाराम हे महाराष्ट्रातील युगप्रवर्तक लोकगीतकार होते. ‘धटासी असावे धट उद्धटासी उद्धट’ ही मराठी शिकवण समर्थ रामदास स्वामी यांनी दिली. ‘एक पाय सदैव तुरुंगात ठेवून लोकशिक्षणासाठी आम्ही हातात लेखणी धरली’ असे सांगणाऱ्या विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी मराठी भाषेला सामथ्र्यवान केले तर राम गणेश गडकरी यांनी तिला सौंदर्यवान केले.

एखादा वीर योद्धा जसा लढता लढता रणांगणी पडतो तसे गडकरी वीराच्या मरणाने मेले. ‘भावबंधन’चा शेवटचा प्रयोग लिहून त्यांनी लेखणी खाली ठेवली आणि अवघ्या तीस मिनिटांतच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. ‘एकच प्याला’ हे त्यांचे लोकप्रिय नाटक मरणोत्तर प्रसिद्ध झाले. प्रत्येक कवितेत किंवा प्रत्येक लेखनात एक शब्द, एक कल्पना, एक भावना अगदी नवीन असलीच पाहिजे, अशी त्यांची प्रतिज्ञा असे व त्याप्रमाणेच ते लिहीत असत. कवितेखाली त्यांचे नाव नसले तरी त्या कवितेच्या ढंगावरून ती गडकऱ्यांचीच असली पाहिजे असे ओळखू येत असे. नाटकाचे यश हे भाषेवर अवलंबून नाही तर त्या नाटकातील संघर्षांवर ते अवलंबून असते. नुसती भाषा चांगली पण नाटकात कुठेही खटका नसेल, संघर्ष नसेल तर ते नाटक कोणीही पाहण्यास येणार नाही. प्रेक्षकांच्या हृदयाची पकड कशी घ्यावी हे गडकरी चांगलेच ओळखत आणि म्हणूनच त्यांची नाटके लोकप्रिय ठरली. कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे विनोद क्षेत्रातील गडकऱ्यांचे गुरू होते. कोल्हटकर यांच्या विनोदाचे सौंदर्य गडकऱ्यांनी अधिक खुलवून सांगितले. गडकऱ्यांचा विनोद सामाजिक होता. समाजसुधारणेसाठी त्यांनी विनोदाचा उपयोग केला.

साहित्य ही शक्ती आहे. त्याबाबत वाद करण्याची आवश्यकता नाही. राज्यकर्ते आणि साहित्यिक यांचे कार्य समान आणि परस्परावलंबी आहे. साहित्य क्रांती करू शकते. जगात समाजपरिवर्तनाचे अनेक प्रयोग सुरू आहेत. काही राज्यकर्ते हे कार्य कायद्याच्या जोरावर करू पाहतात, पण कायद्याने माणूस सुधारत नाही. त्यासाठी त्याचे हृदय पकडावे लागते. समाजाची नीती कायद्याने सुधारता येत नाही. महाराष्ट्राची परंपरा ज्ञानेश्वरांची आहे. समाजवादी महाराष्ट्र संपन्न करायचा म्हटल्यास अन्य गोष्टींबरोबरच सुवाङ्मयाची, चांगल्या साहित्याची आवश्यकता आहे. गडकऱ्यांसारखे साहित्यिक ते काम करू शकतील..

(संकलन-शेखर जोशी)

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता-मुख्य अंक/२९ जानेवारी २०१७)

रविवार, १२ मार्च, २०१७

दादर येथे सापडलेला स्कुटर बॉम्ब आणि...


दादर येथे सापडलेला स्कुटर बॅाम्ब आणि....

(सोमवार १५ मार्च १९९३ च्या मुंबई सकाळमध्ये प्रसिद्ध झालेली माझी बातमी आणि आठवण)

१२ मार्च १९९३, मुंबई आणि भारताच्या इॉतिहासातील एक दुर्देवी व काळा दिवस. याच दिवशी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले गेले. या भयानक व धक्कादायक घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांनी दादर (पश्चिम) येथे एका बेवारस स्कुटरमध्ये शक्तीशाली बॉम्ब सापडला. वेळीच लक्षात आल्याने बॉम्बशोधक पथकाने तो निकामी केला. रस्त्यावर उभ्या केलेल्या या स्कुटरला कोणी सहज खेळ महणून नुसती किक मारली असती तरी हा स्फोट घडेल, अशी व्यवस्था करण्यात आली होती.

दादर (पश्चिम) येथे डॉ. मांडोत यांच्या दवाखान्यासमोर एका बेवारस स्कुटरमध्ये बॉम्ब ठेवला असल्याची बातमी कळली. तेव्हा आजच्या सारखे वृत्तवाहिन्यांचे प्रस्थ नव्हते. त्यामुळे वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी व छायाचित्रकार घटनास्थळी होते.मी तेव्हा मुंबई सकाळमध्ये वार्ताहर म्हणून नोकरी करत होतो. आमचे मुख्य वार्ताहर रमाकांत पारकर ऊर्फ तात्या यांनी मला आणि आमचा छायाचित्रकार सचिन चिटणीस याला तिकडे जायला सांगितले. दोघेही तिकडे गेलो. बॉम्बशोध पथक घटनास्थळी आले आणि त्यांनी बॉम्ब निकामी केला. संध्याकाळी पाच/साडेपाच वाजल्यापासून जवळपास दोन-तीन तास हे सर्व सुरु होते. बॉम्ब निकामी केल्यानंतर वृत्तपत्रांचे पत्रकार व छायाचित्रकार तिथून निघाले.

मी आणि सचिन थोडा वेळ तिथेच थांबलो. बॉम्ब तर निकामी केला आता पुढे काय करणार, याची माहिती घेतली. मिळालेल्या माहितीुसार तो बॉम्ब, आतील आरडीएक्स हे सर्व विक्रोळी येथे नेले जाणार होते. कार्यालयात हे सगळे कळविले.सचिन आणि मी तेथे जायचे ठरविले. आम्ही तिथे गेलो. तेव्हा चंद्रकांत हंडोरे हे मुंबईचे महापौर होते. ते ही विक्रोळीला त्या ठिकाणी होते. तेथे रात्री त्या बॉम्बची पूर्ण विल्हेवाट लावण्यात आली. या सगळ्याचे मी आणि सचिन साक्षीदार होतो. रात्री तिथून निघालो. मोबाईल व अन्य संपर्काचे प्रभावी माध्यम तेव्हा नव्हते. कार्यालयात दूरध्वनी करुन अशी बातमी आहे हे सांगितले. नारायण पेडणेकर, प्रभाकर नेवगी हे वरिष्ठ तसेच उमेश करंदीकर रात्रपाळीत होते. कार्यालययात गेल्यानंतर मी बातमी लिहून काढली. आणि फक्त मुंबई सकाळमध्ये त्या बातमीची आठ कॉलम हेडलाईन झाली. तेव्हाच्या सर्व अन्य मराठी वृत्तपत्रात दादर य़ेथे बॉम्ब सापडला आणि तो निकामी केला एवढीच बातमी होती. आमच्याकडे त्यानंतरचा सगळा घटनाक्रम आणि बातमीचा पाठपुरावा केल्यामुळे सचिनच्या फोटोसह सविस्तर बातमी आली.

मुंबई सकाळची ही बातमी त्या दिवशी (१५ मार्च १९९३) वेगळी ठरली. त्याबाबत मुंबई सकाळचे संपादक राधाकृष्ण नार्वेकर यांनीही आमचे कौतुक केले. इतरांपेक्षा वेगळी बातमी फक्त आपल्याकडे दिल्याचे आणि बातमीलाही व्यवस्थित न्याय मिळाल्याचा आनंंद काही वेगळाच होता.

दादर (पश्चिम) येथे असलेला हा स्कुटर बॉम्ब अत्यंत शक्तीशाली होता. जर त्याचा स्फोट झाला असता तर सेंच्युरी बाजार येथील स्फोटापेक्षाही त्याची तीव्रता जास्त असती. दादर रेल्वे स्थानक परिसर उध्वस्त होईल इतका तो शक्तीशाली होता. सुदैवाने तो वेळीच निकामी केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पण आज इतक्या वर्षांनंतरही ते सगळे आठवले की अंगावर अजूनही काटा येतो....

-शेखर जोशी

सोमवार १५ मार्च १९९३ च्या मुंबई सकाळमधील मी दिलेल्या त्या बातमीचे कात्रण, सचिन चिटणीस याच्या छायाचित्रासह

गुरुवार, ९ मार्च, २०१७

पुस्तक देवाण-घेवाण योजना


पुस्तक देवाण-घेवाण योजना

पै फ्रेंड्स लायब्ररीचा आगळा उपक्रम

दूरचित्रवाहिन्या, स्मार्ट भ्रमणध्वनी, संगणक आणि सध्याच्या माहितीच्या महाजालात वाचन संस्कृती हळूहळू लोप पावत असल्याची भीती व्यक्त करण्यात येते. काही प्रमाणात ती खरीही आहे. आत्ताच्या तरुण पिढीचे किंवा सध्या शाळेत व महाविद्यालयात असलेल्या विद्यार्थ्यांचे अवांतर मराठी वाचन हे कमी झाले आहे. शालेय किंवा महाविद्यालयीन अभ्यासक्रमासाठी असलेल्या पाठ्यपुस्तकांचे वाचन सोडले तर काही अपवाद वगळता हल्लीची पिढी मराठी पुस्तकांचे वाचन करत नाही, असे पाहायला मिळते. आत्ताचे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी हेच भावी वाचक असणार आहेत. त्यामुळे या नव्या पिढीत आणि एकूणच समाजातील लोप पावत चाललेल्या वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी डोंबिवलीतील पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे पुस्तक आदान-प्रदान योजना (डोंबिवली बुक इ चेंज एक्झिबिशन) या आगळ्या उपक्रमाचे आयोजन डोंबिवलीत करण्यात आले आहे. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ आणि डोंबिवलीकर मासिक यांचेही सहकार्य या उपक्रमास लाभले आहे.

आपल्यापैकी काही जण पुस्तके विकत घेतात तर काही जणांना वाढदिवस आणि अन्य काही निमित्ताने पुस्तके भेट म्हणून मिळतात.ही पुस्तके एकदा वाचून झाल्यानंतर काही पुस्तकांचा अपवाद वगळता तशीच पडून राहतात. ती पुन्हा काही वाचणे होत नाही. पडून राहिलेल्या या पुस्तकांच्या बदल्यात नवी पुस्तके मिळावीत, एकमेकांकडे असलेल्या अशा अनेक पुस्तकांचे आदान-प्रदान व्हावे आणि विविध विषयांवरील अशी हजारो पुस्तके पुन्हा वाचनात यावी, हा उद्देशही या योजनेमागे आहे. डोंबिवलीतील एक प्रमुख ग्रंथालय म्हणून पै फ्रेंड्स लायब्ररीची ओळख आहे. डोंबिवली पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही ठिकाणी ग्रंथालयाच्या शाखा आहेत. ग्रंथालयाचे संपूर्ण संगणकीकरण झाले असल्याने सभासदांना पुस्तक कोणत्याही शाखेत जमा करता येऊन नवीन पुस्तक घेता येऊ शकते. दोन वर्षांपूर्वी पै फ्रेंड्स लायब्ररीने एका दिवसात एक हजारांहून अधिक नवे सभासद करुन घेण्याचा आगळा विक्रमही केला होता. १ जानेवारी २०१५ रोजी सकाळी या नवीन सभासद योजनेस सुरुवात झाली आणि दिवस अखेरीस १ हजार २१ नव्या सभासदांची नोंदणी करण्यात आली. २२ मे १९८६ रोजी पुंडलिक पै यांनी टिळकनगर विभागात अवघ्या शंभर पुस्तकांसह ग्रंथालय सुरु केले. डोबिवलीत ग्रंथालयाच्या पाच शाखा आहेत. ग्रंथालयाचे चौदा हजारांहून अधिक सभासद असून विविध विषयांवरील एक लाखांहून अधिक पुस्तके ग्रंथालयात आहेत. मुंबई, पुणे, नाशिक येथील वाचकांसाठी ऑनलाईन ग्रंथालयही चालविण्यात येते. या ऑनलाईन ग्रंथालयाचेही सुमारे दोन हजार सभासद आहेत. ऑनलाईन ग्रंथालयाच्या सभासदांना त्यांना हवे असलेले पुस्तक घरपोहोच देण्यात येते. पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे डोंबिवलीत साहित्य, वाचनविषयक अन्यही विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.

पुस्तक आदान-प्रदान योजनेअंतर्गत आपल्याकडे असलेली आणि वाचून झालेली कोणत्याही विषयांवरील मराठी व इंग्रजी भाषेतील दहा पुस्तके अवघे शंभर रुपये भरुन पै फ्रेंड्स लायब्ररीकडे जमा करायची आहेत. ही पुस्तके जमा केल्यानंतर त्याची पावती देण्यात येणार आहे. आपण दिलेल्या दहा पुस्तकांच्या बदल्यात आपल्याला पाहिजे ती मराठी व इंग्रजी भाषेतील अन्य कोणतीही दहा पुस्तके घेता येणार आहेत. हे करताना आपण दिलेली पुस्तके जेवढ्या किंमतीची असतील तेवढ्याच किंमतीची पुस्तके घेतली पाहिजेत असे कोणतेही बंधन नाही. तुम्ही दिलेल्या दहा पुस्तकांच्या बदल्यात अन्य कोणतीही दहा पुस्तके तुम्हाला घेता येणार आहेत. पुस्तके ग्रंथालयाकडे जमा करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०१७ अशी असून पै फेंड्स लायब्ररीच्या कोणत्याही शाखेत ही पुस्तके जमा करता येणार आहेत.

जमा केलेली दहा पुस्तके आणि त्या बदल्यात आपण घेणार असलेल्या दहा पुस्तकांच्या आदान-प्रदान सोहोळ्यासाठी पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे येत्या ९ ते १६ एप्रिल २०१७ या कालावधीत टिळकनगर विद्या मंदिर, डोंबिवली (पूर्व) या शाळेच्या पटांगणावर भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आह. सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे. आपल्याकडे असलेली कोणतीही दहा पुस्तके येत्या ३१ मार्च पर्यंत १०० रुपये भरुन ग्रंथालयात जमा करायची आहेत. ही पुस्तके सुस्थितीत आणि वाचण्यायोग्य असली पाहिजेत. पुस्तकांच्या मूळ प्रतीच स्विकारल्या जाणार आहेत. मराठी आणि इंग्रजी भाषेतील कथासंग्रह, कादंबरी, ललितलेख संग्रह, चरित्र-आत्मचरित्र आदी पुस्तके घेण्यात येणार आहेत.

या संदर्भात अधिक माहिती ९८३३७३२७१३ या क्रमांकावर मिळू शकेल.

शेखर जोशी

बुधवार, ८ मार्च, २०१७

डोंबिवलीकर दिनदर्शिका-उद्योगशील नगरीचं प्रतिबिंब


डोंबिवलीकर दिनदर्शिका-उद्योगशील नगरीचं प्रतिबिंब

डोंबिवली नगरी सुशिक्षीतांचे शहर म्हणून ओळखले जाते. विविध साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल येथे असते. विविध क्षेत्रात उच्चपदावर काम करणारी अनेक मंडळी ही डोंबिवलीकरच आहेत. गुढीपाडव्याला अर्थात हिंदू नववर्षाच्या निमित्ताने आता मुंबईसह संपूर्ण राज्यभरात स्वागतयात्रा/ शोभायात्रा काढण्यात येतात. पण त्याची मुहूर्तमेढ डोंबिवलीने रोवली आहे. विविध क्षेत्रात काम करणाऱया कार्यकर्त्यांचे मोहोळ म्हणूनही डोंबिवलीकडे पाहिले जाते. अशा या डोंबिवलीत नेहमीच काहीतरी आगळे व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. आमदार आणि राज्यमंत्री रविंद्र चव्हाण संपादक आणि प्रकाशक असलेल्या 'डोंबिवलीकर'मासिकाने प्रकाशित केलेली 'डोंबिवलीकर' दिनदर्शिका हा त्याचाच एक भाग आहे.

दरवर्षी खासगी किंवा शासकीय आस्थापनांकडून दिनदर्शिका प्रकाशित केल्या जातात. डोंबिवलीकरच्या दिनदर्शिकेचे वेगळेपण म्हणजे दरवर्षी एक नवी संकल्पना घेऊन दिनदर्शिका प्रकाशित केली जाते. यंदाच्या दिनदर्शिकेची संकल्पना 'उद्योगशील' डोंबिवलीकर अशी आहे. डोंबिवली नगरीला विविध क्षेत्रात काम करणाऱया अनेक मान्यवरांनी सन्मािनत केले आहे. त्या त्या क्षेत्रात उच्च पदावर जाऊन अनेक डोंबिवलीकरांनी आपल्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. डोंबिवली नगरीतील ज्येष्ठ आणि तरुण उदयोगरत्नांचा सन्मान यंदाच्या दिनदर्शिकेत करण्यात आला आहे. 'डोंबिवलीकर' मासिकाचे कार्यकारी संपादक प्रभू कापसे यांच्या संकल्पनेतून ही दिनदर्शिका तयार झाली आहे. डोंबिवली नगरीतील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिंचा परिचय सगळ्यांना करुन देण्याचा प्रयत्न या दिनदर्शिकेतून करण्यात येतो.

दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती निवडल्या जातात. २०१७ या वर्षासाठी उद्योजक ही संकल्पना घेण्यात आली आहे. अशा प्रकारची संकल्पना घेऊन गेली पाच वर्षे ही दिनदर्शिका प्रकाशित होत आहे. २०१७ च्या दिनदर्शिकेत १४४ ज्येष्ठ आणि तरुण डोंबिवलीकर उद्योजकांचा त्याच्या छायाचित्रांसह थोडक्यात परिचय यात करुन देण्यात आला आहे. प्रत्येक महिन्याच्या पानावर तारीख, वार, पंचांग यासह त्या सर्वाचे एकत्र छायाचित्र आणि त्या महिन्याच्या मागील पानावर त्यांचा परिचय करुन देण्यात आला आहे.या बरोबरच दिनदर्शिकेत डोंबिवली शहरातील विविध सामाजिक संस्था, त्यांचा थोडक्याात परिचय, महत्वाचे नागरी संपर्क, दूरध्वनी क्रमांकही यात देण्यात आले आहेत. या सगळ्यामुळे ही दिनदर्शिका संग्राह्य झाली आहे.

डोंबिवलीकर मासिकाचे कार्यकारी संपादक प्रभू कापसे

prabhu.kapse@gmail.com

डोंबिवलीकर मासिक व दिनदर्शिकेसाठी संपर्क

०२५१-२४२०३७३

शेखर जोशी

मंगळवार, ७ मार्च, २०१७

दिवाकर रावते यांचा 'बोलाचा भात आणि बोलाचीच कढी'


परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा 'बोलाचा भात आणि बोलाचीच कढी'!

या पूर्वीही रावते कल्याण-डोंबिवलीत अरे होते तेव्हाही त्यांनी मुजोर आणि बेशिस्त रिक्षाचालकांना धडा शिकविण्याच्या घोषणा केल्या होत्या. मात्र त्या हवेतच विरल्या. कल्याण-डोंबिवलीत मीटरसक्ती लागू केली जाईल, ज्या प्रवाशांना मीटरनुसार प्रवास करायचा असेल त्यांना तो करता येईल, जे रिक्षाचालक मीटरनुसार रिक्षा चालविणार नाहीत त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, कल्याण येथे मीटर प्रमाणे ज्यांना प्रवास करायचा असेल त्यांच्यासाठी स्वतंत्र रांग असेल वगैरे, वगैरे घोषणा, आश्वासने फक्त कागदावर राहिली आहेत.

मुजोर रिक्षाचालकाकडून एस.टी.च्या चालकाला मारहाण झाल्याच्या प्रकरणी रावते कल्याण येथे आले होते. अशा काही घटना घडल्या, बेशिस्त व मुजोर रिक्षाचालकांच्या बाबतीत वृत्तपत्रे व अन्य प्रसारमाध्यमातून बातम्या आल्या की रावते यांच्यासह परिवहन विभाग, आरटीओ, वाहतूक पोलीस या सगळ्यांना जाग येते. रिक्षा चालक-मालक संघटनांचे नेतेही आम्हाला प्रवाशांचा किती कळवळा आहे याचा देखावा करतात. पुन्हा ये रे माझ्या मागल्या.

खरे तर शेअर पद्धत बंद करा, अशी कोणाचीही मागणी नाही. ती सुरुच ठेवण्यात यावी. पण ज्या प्रवाशांना मीटरनुसार प्रवास करायचा असेल त्यांच्यासाठी रिक्षाचालकांनी कोणतेही कारण न देता मीटर टाकावे इतकीच सर्वसामान्य प्रवाशांची माफक अपेक्षा आहे. डोंबिवलीत पूर्वेहून पश्चिमेला किंवा पश्चिमेहून पुर्वेला जायचे असेल तर केवळ उड्डाणपूल पार करावा लागतो, परतीचे भाडे मिळत नाही अशी कारणे सांगून रिक्षाचालक मनमानी पद्धतीने अव्वाच्या सव्वा पैसे मागतात. प्रवाशांची ही लूट वर्षानुवर्षे सुरु आहे.

रावते साहेब कल्याण-डोंबिवलीतील मुजोर रिक्षाचालकांना तुम्हाला खरोखरच धडा शिकवायचा असेल तर पहिल्यांदा ते मनावर घ्या. प्रसारमाध्यमातून बातम्या आल्या की केवळ तात्तुरती मलमपट्टी करु नका. सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्वपक्षीय रिक्षा संघटनांच्या नेत्यांना व पदाधिकाऱयांना पहिल्यांदा वठणीवर आणा. त्यांनी प्रवासी हिताचीच भूमिका घ्यावी अशी तंबी त्यांना द्या. कल्याण-डोंबिवलीतील बहुतांश रिक्षातळ हे शेअर पदधतीचे आहेत. मध्यंतरी मीटरनुसार रिक्षांची वेगळी रांग करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्याला यश आले नाही. त्यामुळे मीटर पद्धतीची वेगळी रांग न करता रिक्षातळावर (मग प्रवासी एकटा रिक्षात बसला आणि त्याला मीटरनुसार जायचे असले) तरी किंवा रिक्षातळसोडून अन्यत्र कुठेही प्रवाशाने रिक्षा पकडली तरीही प्रवाशाने मीटर टाका सांगितले तर रिक्षाचालकाने कोणतीही खळखळ न करता मीटर डाऊन केले पाहिजे, अशा सूचना सर्व रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱयांना द्या.ा त्यांनी आपापल्या रिक्षासंघटनेत त्याची कशी अंमलबजावणी करायची ते त्यांच्यावर सोपवा. पण हे तातडीने झालेच पाहिजे, अशा सूचना सर्वपक्षीय रिक्षा संघटनेचेने नेते आणि पदाधिकाऱयांना द्या. शिवसेनाप्रणित रिक्षासंघटनेपासून याची सुरुवत करुन अन्य संघटनांसाठी एक नवा आदर्श घालून द्या.

कल्याण-डोंबिवलीतील सर्वच रिक्षा संघटनांचे नेते राजकीय पक्षांचे पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी आहेत. त्या सगळ्यांना हजारो प्रवाशांपेक्षा मुठभर रिक्षाचालकांचे हित जपण्यात जास्त धन्यता वाटते. डोंबिवलीत पश्चिमेला पं. दिनदयाळ चौकात, पश्चिमेलाच रेल्वेस्थानक फलाट क्रमांक एकच्या बाहेर (कल्याण दिशेकडे आणि विष्णू नगर पोलीस ठाण्यासमोर) बेशिस्त व मुजोर रिक्षाचालक रस्ता अडवून वाटेल तशा रिक्षा उभ्या करतात. ना रिक्षा संघटनांचे पदाधिकारी किंवा नेते, ना वाहतूक पोलीस ना आरटीओ कोणीही त्यांना वठणीवर आणू शकलेले नाही. इथे केवळ रिक्षाचालक दोषी नाहीत तर रिक्षात बसणारे प्रवासीही तेवढेच दोषी आहेत.

अन्य काही सूचना

-डोंबिवली पश्चिमेला रेल्वेस्थानकाबाहेर रस्ता अडविणाऱया रिक्षाचालकांच्या विरोधात सातत्याने काही दिवस मोहिम राबवा.

-डोंबिवली पश्चिमेला सारस्वत बॅंकेसमोरील फलाट क्रमांक एकच्या बाहेर कडोंमपा परिवहन सेवेचा केलेला बस थांबा कल्याणच्या दिशेकडे (फलाट क्रमांक एक) सरकवा. म्हणजे रस्ता अडविणाऱया बेशिस्त रिक्षाचालकांना लगाम बसेल.

-डोंबिवली पश्चिमेला रेल्वेस्थानक ते कोपर रस्ता, रेल्वेस्थानक ते पं. दिनदयाळ रस्तामार्गे रेतीबंदर, रेल्वेस्थानक ते गरिबाचा वाडा, नवापाडा, गणेशनगर आदी मार्गावर तातडीने कडोंमपाची परिवहन बससेवा सुरु करा.

-महिन्यातून किमान एकदा तरी कल्याण-डोंबिवलीत भेट द्या आणि प्रवासी सघटना, वाहतूक पोलीस, आरटओ यांची एकत्रित बैठक घ्या.

-सर्व रिक्षातळांवर शेअर पद्धतीचे भाडे कुठून किती त्याचे तसेच रिक्षातळावरील रांगेतील रिक्षात प्रवासी बसल्यानंतर प्रवाशाने मीटरनुसार जाण्यास सांगितले तर रिक्षाचालकाने गेले पाहिजे, असे फलक तातडीने लावण्याच्या सूचना वाहतूक पोलीस आणि आरटीओ अधिकाऱयांना द्या.

सोमवार, ६ मार्च, २०१७

व्होडाफनचा मराठी द्वेष


व्होडाफोनचा मराठी द्वेष डोंबिवली पश्चिमेच्या व्होडाफोन गॅलरीत मराठी आकड्यातील टोकननंबर घेत नाहीत. फक्त इंग्रजीतलेच घेतात. त्यावरुन ग्राहक आणि तेथील कर्मचारी यांच्यात वाद झाला. मराठीतील टोकन नंबर दिले आणि ते न स्वीकारल्यावरुन सोमवारी सकाळी एका ग्राहकाचा व तेथील कर्मचारयाचा वाद झाला. तो ग्राहक तेथील महिला कर्मचाऱयाला म्हणाला, हा टोकन नंबर तुमच्याच सुरक्षा रक्षकाने मला दिला आहे.मराठीत लिहिलेला (मराठी आकडे) टोकन नंबर तुम्ही घेत नसाल तर बाहेर तसा फलक लावा.

त्यावर तेथील महिला कर्मचारयाने त्या ग्राहकाला, आमच्याकडे मराठीतले नाही तर इंग्रजीतलेच टोकन नंबर स्विकारले जाते. तुम्ही पुन्हा नवीन इंग्रजीत लिहिलेले टोकन घ्या. तुम्ही म्हणता तसा बाहेर फलक लावणे आम्हाला करता येणार नाही. तुमची जी तक्रार असेल ती आमच्या मुख्य कार्यालयाकडे करा असे उत्तर दिले. हा वाद ऐकून तो सुरक्षा रक्षक त्या ग्राहकाकडे आला व मी तुम्हाला इंग्रजीत दुसरे टोकन देतो असे सांगितले. त्या ग्राहकाने विचारणा केली की आता हे नवीन टोकन नंबर घेऊन मी पुन्हा माझा नंबर येईपर्यंत वाट पाहायची का? त्यावर व्होडाफोनच्या त्या महिला कर्मचाऱयाने शांतपणे हो असे उत्तर दिले.

यातून काही प्रश्न समोर येतात.

मुळात टोकननंबरवरील मराठीतील आकडा त्या ग्राहकाने लिहिलेला नव्हता. तो व्होडाफोन गॅलरीतील सुरक्षा रक्षकानेच लिहून दिलेला होता. मग त्या सुरक्षा रक्षकाने तो आकडा इंग्रजीतच लिहायचा, म्हणजे मग काहीच प्रश्न आला नसता. किंवा व्होडाफोन गॅलरीतील कर्मचाऱयांनी त्यांच्याकडे नोंद करताना ती इंग्रजीत करायची, व्होडाफोन गॅलरीत असलेल्या संगणकावर मराठी आकडे स्वीकारले जात नसतील तर त्यांनी त्यांच्या संगणकावर तसा बदल तातडीने करुन घेण्याची आवश्यकता आहे. टोकननंबर देण्याचे जे यंत्र असेल त्यावरही मराठी आकडे नसतील तर ते टाकून घेण्याची व्यवस्था तातडीने झाली पाहिजे.

टोकन नंबरवरील आकडा इंग्रजीतूनच असला पाहिजे हा अट्टहास का? मुळात सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात, मुंबईत ते ही महाराष्ट्राच्या राजधानीत मराठीतील टोकन नंबर का स्वीकारले जात नाह? हे धोरण फक्त व्होडाफोनच्या डोंबिवलीतील गॅलरीत आहे? की व्होडाफोनच्या सगळ्या ठिकाणी असणाऱया गॅलरीत असेच चालते. केंद्र शासनाच्या त्रिभाषा सुत्रानुसार मराठी, हिंदी आणि इंग्रजी असाच कामकाजाचा/ व्यवहाराचा क्रम असला पाहिजे. व्होडाफोनने त्या सुत्रालाच हरताळ फासला आहे. मध्यंतरी एका बॅंकेच्या एटीएम केंद्रावरही गुजराथी भाषेतील पर्याय असल्याचे तसेच वीजदेयक की मोबाईलचे देयकही गुजराथी भाषेत पाठवले गेल्याचे समोर आले होते.

व्होडाफोनचा हा मराठी द्वेष संतापजनक आहे. मराठीच्या नावाने टाहो फोडणाऱया राजकीय पक्षानी, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी (आमदार व खासदार) या प्रश्नाकडे तातडीने लक्ष ध्यावे. मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मराठीतील टोकन नंबर नाकारले जाण्याच्या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी.

-शेखर जोशी