रविवार, १९ मार्च, २०१७

विनोदवीर- किशोर नांदलस्कर


विनोदवीर

‘नवरे सगळे गाढव’ चित्रपटात त्यांच्या वाटय़ाला अगदी छोटा प्रसंग आला होता. पण तो प्रसंगही त्यांनी आपल्या अभिनयाने व खास शैलीत असा काही रंगवला की विनोदसम्राट साक्षात शरद तळवलकरही त्यांच्याकडे एक क्षण पाहात राहिले आणि त्यांनी शाबासकीची थाप त्या अभिनेत्याच्या पाठीवर मारली. तळवलकर यांच्याकडून कौतुकाची थाप मिळविलेले ते ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर आजच्या ‘पुनर्भेट’चे मानकरी आहेत.

‘पुनर्भेट’च्या निमित्ताने गप्पांच्या ओघात नांदलस्कर यांनी वरील किस्सा सांगितला. त्या आठवणीत रमताना ते म्हणाले, ‘नवरे सगळे गाढव’ हा चित्रपट जवळपास पूर्ण झाला होता. शरद तळवलकर, पद्मा चव्हाण अशी मोठी कलाकार मंडळी त्यात होती. त्या चित्रपटात मला अगदी छोटीशी म्हटली तर नगण्य भूमिका मिळाली. त्यात एक प्रसंग असा होता. तळवलकर यांचे मयताच्या सामान विक्रीचे दुकान असते. मी त्या दुकानात जातो. तळवलकर ‘हं, मयताचे आडनाव काय?’ असा प्रश्न मला करतात. मी त्यांना ‘खरे’ असे उत्तर देतो. त्या वेळी मी ‘पण खऱ्याला तर मरण नसतं ना’ असं एक पदरचं वाक्य टाकलं आणि एक क्षणभर तळवलकर माझ्याकडे पाहात राहिले. त्यांनी त्यांच्या शैलीत मला उत्तर दिले आणि तो प्रसंग तिथेच संपला. माझ्या त्या पदरच्या वाक्याने शरद तळवलकर खूश झाले आणि त्यांनी मला शाबासकी दिली. माझ्या अभिनय प्रवासातील तो पहिला चित्रपट होता. तळवलकर यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याकडून माझे झालेले कौतुक मी अद्यापही विसरलेलो नाही, माझ्यासाठी तो आशीर्वाद आहे...

किशोर नांदलस्कर यांचे मूळ गाव खारेपाटण तालुक्यातील शेजवली. त्यांचा जन्म मुंबईचाच. मुंबईत लॅमिंग्टन रस्ता, नागपाडा, घाटकोपर आणि अन्य काही भागात त्यांचे लहानपण गेले. ‘न्यू इरा हायस्कूल’ आणि ‘युनियन हायस्कूल’ येथे त्यांचं शालेय शिक्षण झालं. किशोर नांदलस्कर यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून मिळाला होता. त्या काळात त्यांनी नाटकांमधून स्त्री भूमिका केल्या होत्या. केशवराव दाते यांच्या नाटक कंपनीत तसेच अन्य काही नाटकांमधून त्यांनी काम केले होते. पुढे अभिनयाला रामराम करून खंडेराव यांनी काही काळ ‘ज्युपीटर’ गिरणीत नोकरी केली. गिरणीत काम करत असतानाच ते आंतरगिरणी तसेच कामगार नाटय़स्पर्धेतही नाटकं बसवायचे. त्या वातावरणातच नांदलस्कर लहानाचे मोठे झाले. त्यामुळे अभिनयाचं वेड त्यांना लागलेलं होतंच.

एक दिवस त्यांनी वडिलांना मलाही नाटकात काम करायचे आहे, असं सांगितलं. वडिलांनीही होकार दिला आणि १९६०-६१ च्या सुमारास रंगभूमीवर सादर झालेल्या ‘आमराई’ नाटकात त्यांना काम करण्याची संधी मिळाली. ती आठवण सांगताना ते म्हणाले, माझी अगदीच नगण्य भूमिका होती. माझ्या वाटय़ाला जो प्रसंग आला होता त्यात मला फक्त ‘बाप्पा’ अशी हाक मारायची होती. घाटकोपर येथे एका वाडीत ते नाटक झाले. मी रंगमंचावर प्रवेश केला आणि मला दरदरून घाम फुटला. ‘बाप्पा’ हा एक शब्दही माझ्या तोंडून निघाला नाही. सहकलाकार अरे बोल, बोल असं सांगत होते. प्रेक्षकांमधूनही हुर्यो उडवली गेली. तो माझ्यासाठी एक ‘धडा’ ठरला. अभिनय हा वाटतो तितको सोपा नाही हे मला कळलं. मी त्या वेळी जरी नापास झालो असलो तरी पुढे काम करत करत, अनुभवातून शिकत गेलो. ‘मुंबई मराठी साहित्य संघा’त सादर होणारी अनेक नाटकं, त्यातील कलाकारांचा अभिनय पाहिला. त्यातून जे मिळत गेलं ते टिपलं आणि माझ्यातील अभिनेता घडवत गेलो. त्याच काळात ‘कलाकिरण’ ही संस्था काढली. वसंत जाधव यांनी लिहिलेली छोटी छोटी नाटकं केली. घाटकोपर येथील ‘सवरेदय रुग्णालया’च्या आवारात रुग्णांसाठी श्रीराम इंदूलकर यांच्या सहकार्याने काही नाटकंकेली. त्याच काळात एका कंपनीत काही वर्षे नोकरीही केली. नोकरी सांभाळून नाटक सुरूच ठेवलं होतं. लोकनाटय़ लेखक शरद निफाडकर यांच्या ‘विठ्ठल फरारी’, ‘नथीतून मारला तीर’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ आदी नाटकं केली. त्याच सुमारास म्हणजे १९८० मध्ये दूरदर्शनच्या ‘गजरा’, ‘नाटक’ आणि अन्य कार्यक्रमांतून सहभागी झालो होतो. यातून हळूहळू माझं नाव झालं, लोक ओळखायला लागले.

नांदलस्कर यांनी आत्तापर्यंत सुमारे ४० नाटके, २५ हून अधिक मराठी व हिंदूी चित्रपट आणि २० हून अधिक मालिकांमधून काम केले आहे. ‘नाना करते प्यार’ हे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर काम केलेले शेवटचे नाटक. ‘सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’ आणि इतर काही चित्रपट त्यांच्या नावावर जमा आहेत. ‘विच्छा माझी पुरी करा’ हे नाटक नव्याने पुन्हा रंगभूमीवर सादर झालं. त्याचं दिग्दर्शन पुरुषोत्तम बेर्डे यांचं होतं. या नाटकातील ‘राजा’ची भूमिका तसेच दिलीप प्रभावळकर यांनी लोकप्रिय केलेले ‘वासूची सासू’ हे नाटकही नव्याने रंगभूमीवर सादर झालं. यात प्रभावळकर यांची भूमिका नांदलस्कर यांना साकारायची संधी मिळाली. दोन्ही भूमिका नांदलस्कर यांनी खास त्यांच्या शैलीत सादर केल्या. व्यावसायिक रंगभूमीवर नांदलस्कर यांनी ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन’ आदी नाटकांमधून प्रेक्षकांना पोट धरून हसवलं.

महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून नांदलस्कर यांचा बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर प्रवेश झाला. ‘जिस देश में गंगा रहता है’ (गोविंदा), ‘तेरा मेरा साथ है’ (अजय देवगण), ‘खाकी’ (अमिताभ बच्चन) यांच्याबरोबर काम करायची संधी त्यांना मिळाली. ‘चाल जाए पर वचन न जाए’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटांतही त्यांची भूमिका होती. इतकी वर्षे काम करूनही छोटय़ा छोटय़ा भूमिकाच मिळत गेल्या. लक्षात राहील अशी मोठी आणि विशेष भूमिका साकारायची संधी मिळाली नाही, याची कधी खंत वाटते का?, या प्रश्नाला उत्तर देताना नांदलस्कर यांनी सांगितलं, माझ्या बरोबर काम कोण करतंय, माझी भूमिका किती आहे याचा विचार मी कधीही केला नाही. कोणतीही भूूमिका ही लहान नसते. ‘वन रूम किचन’मधील ‘पितळे मामा’, ‘पाहुणा’मधील ‘नेने’, ‘विच्छा माझी पुरी करा’मधील ‘राजा’असो किंवा आणखीही अन्य भूमिका असोत. माझ्या वाटय़ाला आलेली प्रत्येक भूमिका मी जीव ओतून केली. त्यामुळे लांबी-रुंदीच्या दृष्टीने त्या फार मोठय़ा नसल्या तरीही प्रत्येक भूमिकेवर मी माझी छाप पाडली, माझ्या अभिनय शैलीत ती साकारली आणि म्हणूनच आजही मी प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ‘हुंटाश’ (यात माझी एकदम वेगळी भूमिका आहे), ‘मिस यू मिस’, ‘कंदीलगाव’ हे माझे आगामी चित्रपट आहेत.

पत्नी लक्ष्मी आणि तीन विवाहित पुत्र, सुना, नातवंडे असा त्यांचा परिवार. गेल्या वर्षी अचानक दम लागणे, छातीत धडधडणे असा शारीरिक त्रास त्यांना सुरू झाला. नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये व्यग्र असलेल्या नांदलस्कर यांनी त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले. पण असह्य़ झाले तेव्हा डॉक्टरांकडे जाण्यावाचून पर्यायच नव्हता. वैद्यकीय तपासण्यातून हृदयविकार, मधुमेह असल्याचे समोर आले. यातून माझी ‘बायपास’ झाली. ‘पेसमेकर’ बसवला गेला. हिंडणे-फिरणे, काम करणे यावर बंधनं आली. त्यामुळे सध्या काही काळ विश्रांती घेतली आहे. या अल्पविरामानंतर पुन्हा एकदा अभिनयाची नवी खेळी खेळण्यास आपण उत्सुक असल्याचं नांदलस्कर म्हणाले. माझा स्वभाव काहीसा बुजरा आणि भिडस्त असल्याने अभिनय कारकीर्दीत त्याचा थोडासा तोटाही झाल्याचे नांदलस्कर यांनी मोकळेपणाने कबूल केले.

-शेखर जोशी

(हा लेख लोकसत्ता-रविवार वृत्तान्त- १९ मार्च २०१७ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे)

बुधवार, १५ मार्च, २०१७

'साडेतीन टक्के' वाल्यांनीही महाराष्ट्र घडविला...


'साडेतीन टक्के' वाल्यांनीही महाराष्ट्र घडविला...

महाराष्ट्रातील तमाम राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते विशेषत; कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची मंडळी नेहमी फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असा उल्लेख जमेल तिथे करत असतात. तसेच ब्राह्मणांचा उल्लेखही जाणीवपूर्वक 'साडेतीन टक्केवाले' असा कुचेष्टेने केला जातो. जाहीर सभा, संमेलने आणि कार्यक्रमातून तसेच खासगीतही ब्राह्मणांना शिव्या दिल्या जातात. जणू काही आजचा पुरोगामी महाराष्ट्र 'त्या' तीन जणांमुळेच घडला आहे, असेच भासविले आणि ठसविले जाते.महाराष्ट्र घडण्यात त्या तिघांचे योगदान आहेच ते कोणीही नाकारत नाही. पण महाराष्ट्र घडविण्यात बाकीच्यांचेही विशेषत 'साडेतीन टक्केवाल्यां'चे म्हणजेच ब्राह्मणांचेही महत्वाचे योगदान आहे, हे मात्र ही मंडळी सोयीस्कर विसरतात किंवा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. सर्वच बाबतीत अग्रेसर असलेल्या आणि महाराष्ट्र घडविण्यात ज्या ब्राह्मण मंडळींंचेही मोठे योगदान आहे, त्यांची नावे कधीही जाहीरपणे घेतली जात नाहीत. महाराष्ट्राच्या अलिकडच्या काही वर्षातील इतिहासावर सहज नजर टाकली तरी साडेतीन टक्केवाल्यांनी केलेले सामाजिक कार्य, सामाजिक सुधारणा या ठळकपणे जाणवतील अशा आहेत. पण या तथाकथित बेगडी, पुरोगामी आणि केवळ ब्राह्मण द्वेष हाच ज्यांचा एककलमी कार्यक्रम आहे त्यांनी या इतिहासाकडे डोळेझाक केली आहे. महाराष्ट्रात या साडेतीन टक्केवाल्यांनी जे काही काम करून ठेवले आहे, त्याची सर खरेतर कोणालाच नाही. हे ब्राह्मणेतरांना कितीही कटू वाटले तरी सत्य आहे.


‘सामाजिकपरिषद’, ‘डेक्कन सभा’ अशा संस्थांची स्थापना करून जातिभेद, वंशभेद, अंधश्रद्धेला विरोध करण्याचे महत्काचे काम केले. स्त्री-शिक्षण आणि विधवा विवाह,बुद्धीनिष्ठा यांचाही सातत्याने पुरस्कार केला ते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे या साडेतीन टक्क्यातीलच होते.‘सुधारक’ या नावाचे नियतकालिक काढून त्याद्वारे जातिभेद, बालविवाह, केशवपन, सतीची चाल, अस्पृष्यता या अनिष्ट रुढी व परंपरांना प्रखर विरोध करणारे गोपाळ गणेश आगरकर हे ही साडेतीन टक्केवालेच. विधवा विवाह आणि स्त्रीयांचे शिक्षण याविषयी समाजाचा विरोध पत्करून प्रसंगी अवहेलना सहन करुन ज्यांनी या क्षेत्रात खूप मोठे काम केले, स्त्री शिक्षणाचा पाया ज्यांनी घातला ते आणि आजच्या नाथीबाई दामोदार ठाकरसी महिला विद्यापीठाचे संस्थापक महर्षी धोंडो केशव कर्वे हे ही ब्राह्मणच होते. ज्या काळात संतती नियमन, त्यासाठी वापरायची साधने याविषयी बोलणेही अवघड होते, अशा काळात ज्यांनी संतती नियमन, लैंगिक शिक्षण याचा पुरस्कार केला, त्यासाठी समाजस्वास्थ्य हे मासिक चालविले ते महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे पुत्र रघुनाथ धोंडो कर्वे हे ही ब्राह्मणच होते.


हिंदू धर्मातील अनिष्ट रुढी व परंपरा यावर घणाघात करणारे, अस्पश्यता निवारणाचे काम करणारे आणि दलित, अस्पश्य व इतर जाती-धर्मीयांसाठी रत्नागिरी येथे पतीतपावन मंदिराची स्थापना करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, सामाजिक समरसता आणि विविध धर्माच्या ऐक्याचा पुरस्कार करणारे, पंढरपूर येथील विठ्ठलाच्या मंदिरात अस्पश्यांनाही प्रवेश मिळावा म्हणून आमरण उपोषण करणारे पांडुरंग सदाशिव साने हे ही ब्राह्मणच होते.कोळी व आगरी समाजातील अनिष्ट प्रथा, व्यसनाधिनता दूर करून त्यांच्यात आपल्याबद्दल विश्वास निर्माण करणारे स्वाध्याय परिवाराचे पांंडुरंगशास्त्री आठवले, १९३४ मध्ये आपल्या निर्भीड साप्ताहिस्कापश्च्याय माध्यमातून सामाजिक समरसतेचा पुरस्कार करणारे, स्पृश्य-अस्पृश्यता, केशवपन या अनिष्ट प्रथांच्या विरोधात जनजागृती करणारे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे दलित व सवर्ण यांच्यातील दरी मिटविण्यासाठी झुणका भाकर चळवळ व यातून समाजाच्या सर्व स्तरातील लोकांचे एकत्र भोजन सुरु करणारे समतानंद अनंत हरी गद्रे तसेच काही शतके मागे गेलो तर संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, समर्थ रामदास स्वामी हे ही या साडेतीन टक्क्यातीलच आहेत. या सगळ्यांचेच योगदान नाकारणार आहात का?

भारतीय असंतोषाचे जनक व स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, अशी गर्जना करणारे लोकमान्य टिळक हे तेल्या-तांबोळ्यांंचे पुढारी म्हणूनही ओळखले जात. लोकमान्य टिळकही साडेतीन टक्क्यातीलच होते.

अनेकदा ब्राह्मण मंडळींनी ब्राह्मणेतर लोकांवर अन्याय केला, असा डांगोराही पिटला जातो. काही अंशी ते सत्य असे मानले तर त्यांच्याच पुढच्या पिढ्यांनी ब्राह्मणेतरांना वर येण्यासाठी आणि प्रसंगी स्वजातीयांचा तीव्र विरोध पत्करुन मोलाची मदत केली हे ही सोयीस्कर विसरले जाते. ब्राह्मणांकडून त्यांच्या पूर्वजानी ब्राह्मणेतरांवर केलेल्या तथाकथीत अन्यायाचे ते एक प्रकारे परिमार्जनच आहे. याचे दाखलेही सर्वांना तोंडपाठ आहेत. अनेक ब्राह्मणेतरानी आपल्या कामात ब्राह्मणांनी वेळोवेळी केलेल्या या मदतीचा व सहकार्याचा उल्लेख लेखनातून केला आहे. पण आज इतिहास बदलण्याच्या हट्टामुळे किंवा ब्राह्मण द्वेषामुळे ते नाकारले जात आहे.

सामाजिक सुधारणा किंवा अन्य क्षेत्रात ब्राह्मण मंडळींनी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाची ही केवळ काही सहज आठवली अशी वानगीदाखल उदाहरणे. साडेतीन टक्क्यातील या सगळ्या मंडळींनी साहित्य,कला, नाट्य, गायन, राजकारणासह सामाजिक कार्य, समाजसुधारणा आणि समाजाच्या विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. महाराष्ट्र घडविण्यात या सर्व मंडळींचे महत्वाचे योगदान आहे. केवळ ब्राह्मण द्वेषातून ही मंंडळी हे नाकारत असतील किंवा त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून केवळ त्या तिघांचाच डंका वाजवित असतील तर महाराष्ट्र आणि या साडेतीन टक्के असलेल्या मंडळींच्या कार्याचा, कर्तृत्वाचा तो घोर अपमान ठरेल. पण त्यामुळे या ब्राह्मण मंडळींचे महत्व व कर्तृत्व कमी होत नाही तर यातून या मंडळींचे योगदान नाकारणारे मात्र अधिक खुजे ठरतात.


-शेखर जोशी

मंगळवार, १४ मार्च, २०१७

मराठी भाषेसाठी सर्वकाही...


मराठी भाषेसाठी सर्वकाही...

'डोक्यावर सोनेरी मुकुट आणि अंगावर फाटके कपडे अशा अवस्थेत मराठी भाषा मंत्रालयाच्या दाराशी उभी आहे' असे विधान जागतिक मराठी परिषदेच्या मुंबईत झालेल्या पहिल्या अधिवेशनाच्या उदघाटन प्रसंगी ज्येष्ठ नाटककार-कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांनी केले होते.

आज २५/३० वर्षांनंतरही त्यात बदल झालेला नाही. इंग्रजीचे वाढते प्रस्थ, मराठीची होणारी गळचेपी, बंद पडत चाललेल्या मराठी शाळा, इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याकडे वाढलेला कल, हळूहळू कमी होत चाललेली मराठी वाचन संस्कृती आणि अन्य काही कारणांमुळे मराठी भाषेवरील आक्रमणे वाढत चालली आहेत. मराठी भाषा व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन तसेच राज्य व्यवहारापासून ते वेगवेगळ्या स्तरावर मराठीचाच वापर करणे आणि मराठी भाषेला तिचे राजभाषेचे स्थान मिळवून देणे हे खरे तर राज्य शासनाचे काम. पण महाराष्ट्र राज्य शासनाच्या स्थापनेनंतर इतक्या वर्षानंतरही् ते पूर्णपणे साध्य झाले आहे आणि मराठीचा वापर होतो आहे असे दिसत नाही. कुसमाग्रज यांच्या जन्मदिनी किंवा १ मे या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनी आयोजित कार्यक्रमातून मराठीचे गोडवे गायले जातात. मराठी भाषेसाठी अमुक करु, तमूक करु म्हणून घोषणा होतात पण प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळेच पाहायला मिळते.

हे काम राज्य शासनाचे असले तरी ते कर्तव्य शासन जर योग्य प्रकारे पार पाडत नसेल तर मराठी भाषकांनी एकत्र येऊन जनमताचा रेटा लावणे आवश्यक ठरते. पण त्या पातळीवरही आनंदी-आनंद आहे. मराठी भाषा जतन आणि संवर्धनासाठी काही संस्था त्यांच्या पातळीवर काम करत आहेत. पण त्यांचे एकत्र येऊन सामुहिक प्रयत्न झाले आहेत, असेही दिसत नाही. राजभाषा मराठीला सर्व स्तरावर तिचे न्याय्य स्थान मिळवून देण्यासाठी या सर्व संस्था आणि मराठी भाषेवर प्रेम करणाऱया सर्वांनी एकत्र येण्याची आज गरज आहे.

राज्य शासनावर दबाव टाकून मराठी भाषेसंदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न न करता सर्वांनी एकत्र आले पाहिजे. मराठी अस्मितेची वज्रमुठ व दबावगट तयार करणे सगळ्यात महत्वाचे आहे. त्यादृष्टीने मराठी भाषा संरक्षण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि न्यायालयात मराठीचा वापर झालाच पाहिजे यासाठी लढा देणारे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. शांताराम दातार यांनी पुढाकार घेतला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्याशी दातार यांनी चर्चा केली आणि साहित्य महामंडळानेही या कामात सक्रीय पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर महामंडळाचे काम फक्त साहित्य संमेलन भरविण्यापुरतेच मर्यादित नाही. तर मराठी भाषा, साहित्य व संस्कृती जतन आणि संवर्धनासाठीही महामंडळाने काम केले पाहिजे, अशी भूमिका डॉ. जोशी यांनी घेतली होती.

त्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून या संदर्भात येत्या १९ मार्च रोजी डोंबिवलीत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मराठी भाषेला तिचे स्थान मिळवून देण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा होणारच आहे. हा लढा संपूर्ण राज्य स्तरावर उभारला जावा आणि मराठी भाषकांची एकजूट व्हावी हा उद्देश या मागे आहे. भारतीय राज्य घटनेतील कलम ३४८-२ नुसार उच्च न्यायालयाचीही प्राधिकृत भाषा मराठीच झाली पाहिजे, त्यासाठी काय करता येईल हा विषयही बैठकीत आहे. २१ जुलै १९९८ च्या राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार तालुका आणि जिल्हा पातळीवरील न्यायालयाची भाषा मराठी झाली पण ती पूर्णपणे स्थिरावली नाही. मराठीला ज्ञानभाषा करण्याचे बोलले जाते, पण प्रत्यक्षात त्यासाठी राज्य शासन काय पावले उचलते, मराठीसाठी काम करणाऱया संस्था काय करतात, त्यांनी नेमके काय करायला पाहिजे, अशा सर्व विषयांवर या बैठकीत उहापोह होणार आहे.

मराठी भाषेवर प्रेम करणाऱया, मराठी भाषेविषयी आस्था असणाऱया आणि मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी होणाऱया उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा असलेल्यांनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन अॅड. दातार यांनी केले आहे. ही बैठक १९ मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता डोंबिवली साहित्य संमेलनाचे कार्यालय असलेल्या आगरी युथ फोरमच्या कार्यालयात (जगन्नाथ प्लाझा, पहिला मजला, मानपाडा रस्ता, गोदरेज शो रुमच्या जवळ,, डोबिवली-पूर्व) होणार आहे.

अॅड. शांताराम दातार यांचा संपर्क क्रमांक-

९८२०९२६६९५

-शेखर जोशी

सोमवार, १३ मार्च, २०१७

विधायक आणि आक्रमक शक्तीचा नरसिंह प्रकटू दे


कला वक्तृत्वाची-१८

कला वक्तृत्वाची

अविनाश धर्माधिकारी

विधायक आणि नागरी शक्तीचा नरसिंह प्रकटू दे

निवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी हे आज, शुक्रवारी होणाऱ्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीस प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. धर्माधिकारी यांनी जून १९९६ ते डिसेंबर १९९७ कालावधीत ‘लोकसत्ता’मध्ये ‘नागरिक’या नावाचा स्तंभ चालविला होता. दर मंगळवारी हे सदर प्रसिद्ध होत होते. ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीच्या निमित्ताने त्या सदरातील समारोपाच्या लेखातील काहीभाग. या भागाबरोबरच ‘कला वक्तृत्वाची’ हे सदर येथे समाप्त होत आहे.

आज स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षांनंतर एक राष्ट्र, एक संस्कृती म्हणून आपण एका अत्यंत अर्थपूर्ण आणि निर्णायक वळणावर आहोत. भ्रष्टाचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, देशद्रोही आणि तत्त्वशून्य राजकारण, पर्यावरणाचा नाश, वाढती विषमता, निरक्षरता, बेरोजगारी, स्त्रियांवरचे वाढते अत्याचार, फुटीरतावाद हे घटक प्रबळ होत गेले तर एक राष्ट्र, एक संस्कृती म्हणून आपण नष्ट होऊ. पण याच पन्नास वर्षांत गाठता आलेली अन्नधान्याची स्वयंपूर्णता, शास्त्र-तंत्रज्ञानातील प्रगती, अणू-अवकाश-अंटाक्र्टिका-जैव तंत्रज्ञान-सुपर कंडक्टिव्हिटी-संगणक, इत्यादी घटक प्रबळ होत गेले तर भारताच्या इतिहासातलं एक नवीन, अभूतपूर्व सुवर्णयुग आपण निर्माण करू शकू. यातनं काय निवडायचं, हा ऐतिहासिक पर्याय आपल्यासमोर आहे. कुठले तरी ग्रह-तारे, कुठला तरी नॉस्टड्रॅमस

किंवा बहुउद्देशीय कंपन्या याविषयीचा निर्णय करणार नाहीत. तो इथल्या प्रत्येक नागरिकाच्या अंत:करणातून आणि कृतीतूनच आकाराला येणार आहे.नव्या सुवर्णयुगाच्या आशेचं हे स्वप्न मांडताना देश मध्यावधी निवडणुकांना सामोरा जातोय. सर्वच पक्ष, आघाडय़ांनी कंबरेचं सोडून डोक्याला बांधलंय आणि एकमेकांच्या नागडेपणाचा शंख करणं चाललंय. राजकारण पन्नास वर्षांतल्या सर्वात नीच पातळीला पोचलंय हे बरंच आहे. गटाराचे हे सर्व पूर वाहून, ओसरून गेले की स्वच्छ निर्मळ पाण्यासाठी वाटा तयार होतील. तोवर मात्र स्वच्छ, निर्मळ पाण्यानं आपलं स्वत्व जपून ठेवायला हवं. गटाराच्या संगतीत धीर सोडून, शॉर्ट टर्म फायद्यांसाठी स्वच्छ, निर्मळ, पारदर्शक पाण्यानं गटाराशी आघाडी केली, तडजोड केली, सीट अ‍ॅटजस्टमेंट केली, तर सत्तेच्या सिंहासनावर गटारच ओघळणार आहे. आपलं स्वत्व आपणच जपून ठेवायला हवं. त्यासाठी नागरिक म्हणून एकत्र यायला हवं. गेल्या पन्नास वर्षांत या सामान्य नागरिकांनीच पुन्हा पुन्हा आपली राजकीय प्रगल्भता सिद्ध करुन दाखवली आहे. ही प्रगल्भता ही आपली बहुधा शेवटची आणि सर्वात भरवशाची आशा आहे.

आपण नीट विचारपूर्वक दिलेलं एकेक मत आणि आनंदानं बजावलेलेलं एकेक कर्तव्य नव्या सुवर्णयुगाचं मंदिर घडवेल. ‘नागरिक’ हा त्या मंदिराचा एक स्तंभ. वेगवेगळ्या स्वरूपातल्या नागरिकांच्या समित्या, इथल्या राजकारण, अर्थकारण, समाजकारण सर्व मिळून तयार होणाऱ्या देशकारणाला दिशा देऊ शकतील. कारण जगातली सर्व तत्त्वज्ञानं, सर्व धर्म, सर्व विचारधारा, सर्व पोथ्या या सर्वाचा मानवी जीवनाच्या रोजच्या जगण्याच्या पातळीवर एका ओळीचा सारांश काढायचा, तर तो अगद सोपा आहे. तो म्हणजे स्वत:चं कर्तव्य आनंदानं करत जगणं. मला समजणाऱ्या भारतीय/वैश्विक संस्कृतीचा आत्मा हाच आहे. आणि आज तरी दुर्दैवानं संपूर्ण भारतवर्षांत हा आत्मा हरवलेला आहे. आपण कर्तव्य चुकवणारा समाज बनलोय. आणि चुकवत चुकवत कधी कर्तव्य बजावलंच तर ते खत्रूडपणे, रडत-भेकत, आदळआपट करत, घिसाडघाईनं, अकार्यक्षमतेनं, शोषणाचे साक्षीदार बनत आपण कर्तव्य बजावण्याची ‘पाटी’ टाकतो. शंभर कोटींच्या या मानवतेला उत्थानासाठी हवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांत कर्तव्य बजावणाऱ्या नागरिकांची सेना. संघटित सेना. आम्हाला शिवाजी जन्माला यायला हवा असतो, पण तो शेजाऱ्याच्या घरात. माझ्या घरात आपला पोटार्थी तडजोडवीरच जन्माला यावा. हे झुगारून देऊन आपणच अफजलखानाचा कोथळा काढणारा व आपल्यातच लपलेला शिवाजी बाहेर काढायला हवा. वाघनख्यांसकट. आता आपला उद्धार दुसरा कोणी तरी करणार नाहीये, आपला उद्धार आपणच करायचाय, या भूमिकेवर जेवढे जास्त नागरिक येतील, तेवढा हा देश, हे विश्व जगायला अधिक सुंदर जागा बनेल.

नाही तर सामान्य नागरिकाला लाथा बसतातच आहेत. आपला नुसता जगत राहण्याचा संघर्ष रोज जास्त जास्तच अवघड बनतोय. तो संघर्ष लढत, धडपडत, चाचपडत आपण जगतो. वर लाथा खात राहतो. लाथा देणारा बदलतो. त्याची विचारधारा, रंग, त्याची परिभाषा बदलते, पण नागरिकाला लाथा चालूच राहतात. याला खरा उपाय एकच. लाथा खाणारा हा स्तंभ कडाडू दे. त्यातून विधायक आणि आक्रमक नागरिक शक्तीचा नरसिंह प्रकटू दे. मानवी सन्मान आणि आत्मविश्वास असलेला, आपलं कर्तव्य आनंदानं करणारा नागरिक म्हणजे हा नरसिंह. विसाव्या शतकाच्या संध्यासमयी, एकविसाव्या शतकाच्या उंबरठय़ावर राक्षसही नाही आणि देवही नाही अशा माणसांच्या संघटित नख्यांनी दुष्ट, भ्रष्ट, लुटारू, चारित्र्यशून्य, अन्याय, अनीतिसंपन्न हिरण्यकश्यपूंची पोटं

फाडून काढू दे. हा स्तंभ कडाडू दे.

आता सामान्य नागरिकानं

नख्या रोवाव्यात जमिनीत खोल

अन् मान ठेवावी ताठ

क्रूरच असतील कर्मभोग, तर

बळकट व्हावेत हात

तर आता, कामाला सुरुवात करू या.

संकलन – शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता/मुख्य अंक/१७ फेब्रुवारी २०१७)

कवितेचे कवितापण हरवणार नाही याची काळजी कवींनी घ्यावी


कला वक्तृत्वाची-१७

शांता शेळके

कवितेचे कवितापण हरवणार नाही याची काळजी कवींनी घ्यावी

साहित्य सभा, बडोदे या संस्थेचे वार्षिक संमेलन ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या अध्यक्षतेखाली काही वर्षांपूर्वी आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी केलेल्या ‘आजची मराठी कविता- स्वरूप व समस्या’ या भाषणातील काही भाग...

कविता हा माझा सर्वाधिक आवडीचा, कुतूहलाचा व चिंतनाचा विषय आहे. गेली अनेक वर्षे मी कविता फार प्रेमाने आणि पूर्वग्रहरहित वृत्तीने वाचत आले आहे. माझ्यासारख्या काव्यप्रेमी व्यक्तीला आजची मराठी कविता वाचताना काही गोष्टी तीव्रतेने जाणवतात. काही उणिवा तिच्यात दिसून येतात. काही अपप्रवृत्ती तिच्यामध्ये वाढीला लागत आहेत असे वाटते. पूर्वीच्या काळी कविता लिहिताना वृत्त, जाती, छंद अशा अनेक रचनाप्रकारांवर किमान काही प्रभुत्व असावे लागे. आज मुक्तछंदात कविता लिहिली जात असल्यामुळे कवींना तेवढेही ज्ञान असण्याची गरज भासेनाशी झाली आहे. कविता नेमके कोणत्या रचनेला म्हणावे यासंबंधी अनेकांच्या मनात फार संदिग्ध व धूसर कल्पना असतात. त्यामुळे आज कालबाह्य़ ठरलेल्या वृत्तात व छंदात लिहिली जाणारी सांकेतिक कविता, मंगलाष्टके, बारशाची कविता, स्वागतगीते, मान्यवर मंत्र्यांच्या प्रशस्तीखातर लिहिली जाणारी पद्यात्मक रचना या साऱ्या ‘कविता’च असतात. यामुळे कवींची संख्या नको तितकी वाढत आहे.

जिला ‘कविता’ हे नाव प्रामाणिकपणे देता येईल अशी फार मोजकी रचना आपल्यासमोर येते. पण तीही पूर्णत: निर्दोष वा समाधानकारक नसते. अशा कवितेचा विचार कताना प्रथम नजरेसमोर येते ती दलित कविता. ही कविता प्रथम लिहिली गेली ती प्रामुख्याने पांढरपेशा प्रस्थापित कवितेच्या विरोधात. हिंदू धर्मातील चातुर्वण्र्यव्यवस्था, जातीपातींची उतरंड, विषमता समाजाने निर्माण केली आहे तिच्याशी असलेला कट्टर विरोध व्यक्त करावा, तिच्यावर हल्ले चढवावेत ही दलित कवितेची मूळ भूमिका होती. ‘विद्रोह’ हा तिचा परवलीचा शब्द होता. डॉ. आंबेडकर यांनी दलित समाजाची अस्मिता जागृत केली. दलित साहित्याचा प्रथम जो उत्तम अविष्कार झाला तो मुख्यत्वे आत्मचरित्र आणि कविता या साहित्यातून. दलित कवितेने एक अगदी वेगळे अनुभवविश्व प्रथमच मराठी कवितेत आणले. दलित कवितेने एकूणच मराठी कवितेच्या कक्षा विस्तारल्या, इतकेच नव्हे तर तिने या कवितेला एक वेगळे परिमाणही दिले, परंतु आता दलित कवितेतली वाफ गेली आहे, असे वाटू लागते. मराठी कवितेतील सांकेतिकतेच्या विरोधात उभ्या असलेल्या दलित कवितेने आपलेही काही संकेत निर्माण केले आहेत की काय अशी शंका येऊ लागते. केवळ विध्वंसक, आरडाओरड करणारी, अपशब्द वापरणारी कविता फार काळ टिकून राहणे शक्य नव्हते. दलितांना, पीडितांना अंतर्मुख करून त्यांना विद्रोहाला प्रवृत्त करण्याची तिची शक्तीही आता लुप्त होत आहे. जी गोष्ट दलित कवितेची तीच बाब ग्रामीण कवितेची. मराठीत प्रथम ग्रामीण किंवा तेव्हाचा शब्द वापरायचा झाला तर जानपद कविता लिहिली गेली ती रविकिरण मंडळांच्या कवींकडून. पण हे कवी पांढरपेशे होते आणि त्यांनी लिहिलेल्या या कवितांमध्ये अस्सल जीवनदर्शकापेक्षा भावुक स्वप्नरंजनाचा भाग अधिक होता. बहिणाबाई चौधरी यांनी शिक्षण, संस्कार, व्यासंग यातले काहीही लाभलेले नसता जन्मजात प्रतिभेच्या बळावर उत्तम ग्रामीण कविता त्या काळात लिहिली. इथे वास्तव चित्रणाला जीवनचिंतनाचीही जोड मिळाल्यामुळे या कवितांचा दर्जा खूपच उंचावला आहे. आज ‘मंचीय कविता’ नावाचा एक नवा प्रकार मराठीत आला आहे. काही कवी रंगमंचावरून आपल्या कविता सादर करतात व त्यासाठी व्यासपीठावर सजावट, वाद्यमेळ, गेयता, जमल्यास नृत्य व नाटय़ या साऱ्याची जोड त्यांना देतात. कुठल्या कवीने आपली कविता कशा प्रकारे रसिकांपर्यंत पोहोचवावी हा ज्याच्या त्याच्या पसंतीचा प्रश्न असला तरी कवितेभोवती इतकी सारी सजावट करताना कवितेचे कवितापणच त्यात हरवून जात नाही ना, याची काळजी कवीने घेतली पाहिजे असे मला वाटते.

आजच्या कवींमध्ये मला आणखी एक प्रवृत्ती दिसून येते व ती भयावह आहे असे मला वाटते. हे कवी इंग्रजी कविता वाचतात, इतर प्रांतभाषांतल्या कविता वाचतात, पण मराठी कवितेची पूर्वपंरपरा ते जाणून घेत नाहीत. ही परंपरा म्हणताना मला एकीकडे संतपंडितांचे प्राचीन काव्य अभिप्रेत आहे तर दुसरीकडे ओव्या, स्त्री-गीते, लोकगीते, ग्रामीण गीते वगैरे मौखिक काव्य प्रकारांशी परिचय या दोन्ही गोष्टी कवींना आवश्यक आहेत, ते त्यांना उमगत नाही.जी गोष्ट जुन्या काव्यपरंपरेची तीच गोष्ट भजन, कीर्तन, भारूड, कूटकाव्ये, विराण्या यांची. या पारंपरिक काव्यरूपांना आधुनिक वळण देऊन त्यातून नव्या कवींना आपली कविता अधिक सुंदर, समृद्ध करता येईल.

संकलन – शेखर जोशी

(ज्ञानदा पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी प्रकाशित केलेल्या शांता शेळके यांच्या ‘पत्रं पुष्पं’ या पुस्तकावरून साभार)

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता/मुख्य अंक/१६ फेब्रुवारी २०१७)

मरणाचे स्मरण ठेवणे हा पापातून मुक्त होण्याचा उपाय


कला वक्तृत्वाची-१६

विनोबा भावे

मरणाचे स्मरण ठेवणे हा पापातून मुक्त हो्ण्याचा उपाय

संकलन-शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता/मुख्य अंक/१५ फेब्रुवारी २०१७)

ग्रंथ प्रकाशन व्यवसाय मनाची मशागत करणारा


कला वक्तृत्वाची-१५

जयंतराव साळगावकर

ग्रंथ प्रकाशन व्यवसाय मनाची मशागत करणारा

संकलन-शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धीी- लोकसत्ता/मुख्य अंक/१४ फेब्रुवारी २०१७)

युवकांसाठी वक्तृत्व महोत्सव साजरे केले जावेत- प्रा. शिवाजीराव भोसले


कला वक्तृवाची-१४

प्रा. शिवाजीराव भोसले

युवकांसाठी वक्तृत्व महोत्सव साजरे केले जावेत

तर्कशास्त्र व तत्त्वज्ञान विषयांचे अध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, संपूर्ण महाराष्ट्रभर विविध विषयांवर अनेक व्याख्याने देणारे लोकप्रिय व फर्डे वक्ते प्रा. शिवाजीराव भोसले यांचे ‘वक्तृत्व स्पर्धा’ आणि ‘भाषणे’ याविषयीचे विचार.

वक्तृत्व ही एक साधना आहे. तिचा संबंध अभ्यास, अभिव्यक्ती, विचार, भाषा, व्यक्तिमत्त्व अशा अनेक घटकांशी असतो. या सर्वाचे वारंवार प्रत्यक्ष प्रकटीकरण होत गेले, तर त्यांचे सहज संवर्धन घडते. ते घडावे या हेतूने वक्तृत्व सोहळ्यांचे नियोजन व्हावयास हवे. प्रतिवर्षी काही संगीत महोत्सव साजरे होतात तसे युवकांसाठी वक्तृत्व महोत्सव साजरे करता आले तर किती बरे होईल. ज्यांना बोलणे आवडत असेल, बोलणे या प्रकारात रस असेल, आपल्या शब्दसामर्थ्यांचे व विचारशक्तीचे कोठेतरी मुक्त आविष्करण व प्रकटीकरण घडावे, असे वाटत असेल. अशा मुला-मुलींचा एखादा आनंदमेळावा अगदी आवर्जून भरवावा आणि त्यांना बोलते करावे.

जर आपले वक्तृत्वकलेवर प्रेम असेल व नव्या पिढीविषयी मनात कौतुकाची भावना असेल तर आपण असे वातावरण निर्माण करावे की मुलांनी मनोभावे बोलत राहावे. त्यांच्या मनावर कसलेही दडपण येऊ देऊ नये. ज्यांना प्रभावी वक्तृत्व नावाची शक्ती प्रसन्न करून घ्यावी, असे वाटत असेल तर त्यांनी आपल्या मनातले विचार आपल्या भाषेत मनापासून मांडण्याचा प्रयत्न करावा. बोलणे आनंदाने व उत्स्फूर्तपणे करावे. पारितोषिक हे वक्तृत्वचे फळ किंवा गमक मानू नये. मागच्या पिढीशी तुलना करता आजकालची अनेक मुले उत्तम भाषण करतात. मराठी, हिंदूी, इंग्लिश या भाषांतून प्रकट होणारे हे रसवंतीचे झरे आटू नयेत, याची सर्वानी काळजी घेतली पाहिजे. स्पर्धेपेक्षा वत्कृत्वाला आणि संयोजक व परीक्षक यापेक्षा वक्त्यांना महत्त्व मिळाले पाहिजे. मनापासून बोलणाऱ्याला मानसिक आनंद मिळतो.

भाषणे हा प्रकार केव्हा अस्तित्वात आला आणि कसा रूढ झाला हे सांगणे अवघड आहे. माणसांचे प्रारंभीचे बोलणे परस्परांशी व संवादरूप होते. या बोलण्यामुळे मने कळत होती, कामे होत होती. पुढे पुढे कळणे आणि बोलणे वाढतच गेले. सगळ्याच गोष्टी बदलत, सुधारत, संस्कारित, संवर्धित होत राहिल्या. जीवन हा एक परिवर्तनप्रवाह आहे. नित्यनूतनता हा त्याचा भाव आहे. बोलण्याच्या पद्धती यासुद्धा अशाच बदलल्या.

टिकून राहणारी भाषणे कशामुळे टिकली याचाही शोध घ्यावा लागेल. एका भाषणासाठी अरतीपरतीचा अनेक तासांचा प्रवास हा एक सायास असतो. भाषण हे उभ्यानेच करावे लागते. तोही एक ताण असतो. मनापासून बोलणाऱ्याला एक मानसिक आनंद मिळतो, हे खरे आहे. लोकांच्या सद्भावना व सदिच्छा ही एक अमूर्त आणि अनामिक शक्ती वक्त्याच्या कायेत प्रवेश करते. ही यंत्रशक्ती नसते, ती मन:शक्ती असते. उत्तम भाषणातही एक प्रकारची अपूर्णता राहू शकते. लिहिताना एखादी चूक घडली तर खाडाखोड करता येते. लिहिलेले वाक्य बदलून पुन्हा लिहिता येते. समर्पक शब्द सुचेपर्यंत थांबता येते. भाषणात ही संधी मिळत नाही. मागे वळून पाहता येत नाही. मध्येच थांबता येत नाही. फक्त एवढेच की नित्य उपाययोजनांमुळे मनाच्या काही शक्ती वाढीस लागतात. वक्ता हाच स्वत:चा श्रोता होतो. साक्षित्वाने स्वत:चे बोलणे ऐकत, त्यात रस घेत, जरूर तेथे थोडा बदल करीत तो बोलू शकतो. वाट पाहत पावले टाकणे, हा सराईत पांथस्थाचा गुण बोलणाऱ्याच्या अंगी उतरतो. त्याच सहजतेने तो सभासंचार करतो.

येथून पुढे भाषणांना बहर येईल काय? अर्थपूर्ण, रसपूर्ण, भावपूर्ण भाषणे केली जातील काय? लोकांना भाषणांचे आकर्षण राहील काय? सभा भरतील काय? एकूण परिस्थिती निराशाजनक नसली तरी फारशी आशादायकही नाही. लोकांच्या आवडी बदलत चालल्या आहेत. सिनेसंवाद आणि गीते यांनी अलंकृत झालेली वाणी रसवंतीच्या राज्यात रमणार नाही असे वाटते. या पिढीतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अतिशय प्रगल्भ आहेत. पण बिकट जीवनकलहामुळे आलेली व्यग्रता त्यांना शब्दांची आणि विचारांची हौसमौज करण्याची संधी देत नाही. जगण्याची दिशा आणि ओघ यात सतत आणि अकल्पित बदल होत आहेत.

साहित्य, संगीत, तत्त्वज्ञान यांचा मूलगामी विचार मागे पडत चालला आहे. व्यायामशाळा आणि ग्रंथालये कमी होत चालली आहेत. दवाखाने, औषधांची दुकाने यांची संख्या वाढते आहे. भेळपुरीची दुकाने आणि गाडे रात्रभर चालत आहेत. अशा स्थितीत संस्कृतीच्या आकाशात शब्दांची इंद्रधनुष्ये दिसतील काय? विचारांची नक्षत्रे आढळतील काय? तंत्रविद्येमुळे पंचमहाभूते शरणागती पत्करून आपल्या सेवेत सतत राहतील, पण तुकोबांची अभंगवाणी, ज्ञानदेवांची अमृतवाणी, मुक्तेश्वराची विवेकवाणी श्रवणी पडेल काय? विवेकानदांची भाषणे, सावरकरांची व्याख्याने ही वाग्देवतेची रूपे पुन्हा पाहावयास मिळतील काय?

(प्रा. शिवाजीराव भोसले लिखित आणि अक्षरब्रह्म प्रकाशन प्रकाशित ‘एक विचार मांडव जागर खंड १ व २’ या पुस्तकांवरून साभार)

संकलन-शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता/मुख्य अंक/१३ फेब्रुवारी २०१७)

कीर्ती आणि सामर्थ्य यात फरक आहे--डॉ. पु.ग. सहस्त्रबुद्धे


कला वक्तृत्वाची-१३

डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे

कीर्ती आणि सामर्थ्य यात फरक आहे

प्रखर बुद्धिवादी, राष्ट्रीय विचारवंत, समाजशिक्षक, ग्रंथकार, अभ्यासू वक्ते असलेले डॉ. पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे यांनी ‘लोकसत्तेला दंडसत्तेचे आव्हान’ या विषयावर आठ व्याख्याने दिली होती. यापैकी सहा व्याख्यानांमध्ये त्यांनी ‘भारतीय लोकसत्तेच्या सामर्थ्यां’चे मूल्यमापन केले होते. त्यातील ‘राष्ट्रीय स्वार्थाची उपासना’ या व्याख्यानातील काही भाग.

१९५४ सालीच चीनने भारताचा सीमाप्रांत बळकावला होता. आपल्या पंतप्रधानांनी काही राजकीय धोरणाने ते भारताच्या नागरिकांना कळू दिले नाही इतकेच. पण नव्याने उघडकीस आलेल्या सत्यामुळे या आक्रमणाचे स्वरूप जास्त भयानक आहे असे ठरते. चीनमध्ये कम्युनिस्टांची सत्ता १९४९ मध्ये प्रस्थापित झाली आणि त्यानंतर अवघ्या पाच वर्षांत भारतासारख्या एका मोठय़ा राष्ट्राला शह देण्याइतके सामथ्र्य, इतका आत्मविश्वास चीनला प्राप्त व्हावा हे जितके आश्चर्यकारक तितकेच भारताच्या दृष्टीने लज्जास्पद आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळून बारा वर्षे झाली, पण आपला एकही प्रश्न सोडविण्यात आपल्याला यश आलेले नाही. गोवा, काश्मीर हे प्रश्न बाजूलाच राहिले. पाकिस्तानकडून आपले कर्ज वसूल करण्याचे सुद्धा सामथ्र्य आपल्यात नाही. आणि चीनला मात्र चार-पाच वर्षांत भारताच्या सरहद्दीत घुसून केवळ भारताच्या नव्हे तर सर्व जगाच्या छातीवर पाय देण्याइतके सामथ्र्य प्राप्त करून घेण्यात यश आले आहे. आपले राष्ट्र नुकतेच स्वतंत्र झाले आहे तेव्हा इतक्यातच आक्रमणामुळे निर्माण होणारा संघर्ष आपण ओढवून घेतला तर आपला नाश होईल ही भीती चीनला नाही. आपण केलेला मनसुबा ‘युनो’ संघटनेला अमान्य झाला तर जगातली अनेक बलाढय़ राष्ट्रे आपल्याविरुद्ध उठतील याची चीनला पर्वा नाही आणि भारतावर स्वारी केली तर तो प्रतिकार करील आणि मग मोठे रणकंदन माजेल ही चिंता तर स्वप्नातसुद्धा चीनच्या मनाला स्पर्श करीत नाही. चीन व पाकिस्तानच्या दृष्टीने भारत हा इतका प्रतिकारशून्य, इतका दुबळा ठरला आहे. आम्ही आत्मरक्षणाला पूर्ण समर्थ आहोत असे भारताचे शास्ते सर्वाना कंठरवाने सांगत आहेत. पण आपल्या स्त्रियांची विटंबना, सरहद्दीचा भंग व तेथील नागरिकांची मानखंडना, विवस्त्र होत असलेल्या द्रौपदीकडे शांतपणे पाहणाऱ्या धर्मराजाच्या शांतपणाने भारत पाहात उभा असताना, या घोषणांना वल्गनांपेक्षा जास्त किंमत द्यावी असे कोणालाच वाटत नाही. अर्थात या संयमामुळे, या शांततावादामुळे जगात भारताची कीर्ती पसरत चालली आहे हे खरे आहे. पण कीर्ती आणि सामथ्र्य यात फरक आहे हे आपण जाणले पाहिजे.

स्वार्थ, सत्तालोभ, धनक्षोभ, जातीयता या दुर्धर रोगांनी काँग्रेसला ग्रासले आहे. त्यामुळे राष्ट्रसेवा करण्याचे सामथ्र्यच तिच्या ठायी राहिलेले नाही. आपल्या कार्यक्षमतेचा हिशेब केला तर ती शून्यावर येऊन ठेपली आहे असे दिसते. आपल्याला साधे हिशेबसुद्धा नीट करता येत नाहीत. मग ठरल्या वेळात, ठरलेल्या भांडवलात एखादी योजना यशस्वी करून दाखविणे लांबच राहिले. आपल्या रेल्वे, आपले कारखाने, आपली शेती, आपली रुग्णालये याविषयी सरकारने नेमलेल्या समित्यांचे अहवाल पाहिले तर उधळपट्टी, विध्वंस, कर्तव्यशून्यता हीच आपल्या अठरा कारखान्यांची लक्षणे होऊन बसलेली दिसतात.

आपण धर्महीन, चारित्र्यहीन तरी का झालो याचा आपण विचार केला पाहिजे. स्वातंत्र्याआधीच्या वीस-पंचवीस वर्षांत आपण अनेक सत्याग्रहसंग्राम केले होते. त्यावेळी राष्ट्राच्या हाकेला साद देऊन लक्षावधी लोक संग्रामात उतरले आणि ध्येयवादाने प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान केले. गेल्या शंभर वर्षांच्या काळात रानडे, टिळक, आगरकर, लाला लजपतराय, गांधी, पटेल, नेहरू, सुभाषचंद्र यासारखे अव्वल दर्जाचे श्रेष्ठ नेते भारताने निर्माण केले आणि त्यांच्या संदेशाने प्रेरित होऊन अखिल भारतभर हिंडून, सरकारी रोषाची पर्वा न करता लोकजागृती करणारे तरुण तर प्रत्येक प्रांतात सहस्रसंख्येने निर्माण झाले होते. हे सर्व लोक आता कोठे गेले? सत्ता-मोहिनीचे दर्शन होताच हे सर्व पतित आणि भ्रष्ट झालेत काय? स्वातंत्र्यसंग्रामात निर्माण झालेले ते शुभ्र चारित्र्य, तो ध्येयवाद, ते असामान्य कर्तृत्व एकाएकी अगदी निपटून नष्ट व्हावे याला केवळ सत्तालोभ, स्वार्थ ही कारणमीमांसा पुरेशी नाही असे वाटते. रशियात, चीनमध्ये राज्यक्रांती झाली, पण सत्ता हाती आल्यामुळे तेथल्या नेत्यांच्या कर्तृत्वाचा व चारित्र्याचा इतका लोप केव्हाही झाला नाही. मग भारतातच तसे का व्हावे? आपला ध्येयवाद इतका तकलुपी, इतका दिखाऊ होता काय? कीर्ती, सत्ता, धन यांचा मोह जिंकण्याचे सामथ्र्यच भारतीयांच्या ठायी नाही काय? असे म्हणवत नाही. याची काहीतरी निराळी कारणे असली पाहिजेत. तीच आता शोधायची आहेत..

(डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे विचारमंच व त्यांचे समग्र साहित्य असलेल्या https://sites.google.com/site/drpgsahasrabudhevicharmanch/home या संकेतस्थळावरून साभार)

संकलन – शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता/ मुख्य अंक/१२ फेब्रुवारी २०१७)

शुद्ध चित्ताचे बनणे आणि इतरांचे कल्याण करणे हाच उपासनांचा सारांश-स्वामी विवेकानंद


कला वक्तृत्वाची-१२

स्वामी विवेकानंद

शुद्ध चित्ताचे बनणे आणि इतरांचे कल्याण करणे हाच उपासनांचा सारांश

स्वामी विवेकानंद रामेश्वर मंदिरात गेले होते. तेथे जमलेल्या लोकांनी काहीतरी बोलावे अशी विनंती त्यांना केली. त्यावेळी स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या भाषणातील काही भाग. धर्म हा अनुरागांत असतो, अनुष्ठानात नव्हे. हृदयातील पवित्र आणि निष्कपट प्रेमातच धर्माचे अधिष्ठान असते. जर देह आणि मन शुद्ध नसेल तर मंदिरात जाऊन शिवपूजा करणे व्यर्थ होय. या कलियुगात लोक इतके अवनत होऊन गेले आहेत की त्यांना वाटते की आपण एरवी हवे तसे वागू, तीर्थस्थानी जाताच आपली सगळी पापे धुऊन निघतील. परंतु वस्तुत: कुणी जर अपवित्र भावाने एखाद्या तीर्थाला जाईल तर तिथे जमा झालेले इतर सगळ्या लोकांचे पाप त्याच्या मानगुटीला येऊन बसेल. पापाचा आधीपेक्षा आणखी मोठा बोजा खांद्यावर घेऊन त्याला घरी परतावे लागेल. सगळ्या उपासनांचा सारांश आहे, शुद्धचित्ताचे बनणे आणि इतरांचे कल्याण करणे. गरीब, दुबळे, रोगी वगैरेंमध्ये ज्यांना शिव दिसतो तेच खरेखुरे शिवाचे उपासक होत. तेच खरोखर शिवाची उपासना करीत असतात.

तुम्ही शुद्धचित्ताचे व्हावयास हवे आणि जो कुणी तुमच्याकडे येईल त्याची यथाशक्ती सेवा करावयास हवी. अशा भावाने दुसऱ्याची सेवा करणे हे शुभ कर्म होय. अशा सत्कर्माच्या शक्तीने चित्त शुद्ध होते आणि सगळ्यांच्या अंतर्यामी जो शिव वसत आहे तो त्या शुद्ध चित्तात प्रकट होतो. तो शिव सगळ्यांच्याच हृदयात विराजमान आहे. जर आरशावर धूळ, माती बसलेली असेल तर त्यात आपल्याला आपले रूप दिसत नाही. आमच्या हृदयरूपी आरशावरदेखील असला अज्ञानाचा आणि पापाचा मळ साचलेला आहे. सगळ्यात मोठे पाप म्हणजे स्वार्थीपणा हे होय. स्वार्थीपणा म्हणजे आधी स्वत:चीच फिकीर करणे. आधी आपलाच विचार करणे. मी आधी खाईन, मी सगळ्यांपेक्षा जास्त श्रीमंत होईन, मीच सगळ्या धनाचा मालक होईन असे ज्याला वाटते तो स्वार्थी होय.

कुणी धार्मिक आहे की अधार्मिक आहे याची पारख करावयाची असल्यास बघावे की ती व्यक्ती कितपत नि:स्वार्थ आहे. जो अधिक नि:स्वार्थ तोच अधिक धार्मिक होय. तोच शिवाच्या अधिक जवळ असतो. आणि जर कुणी स्वार्थी असेल तर तो जरी जगातील सारी मंदिरे पुजून आला, सगळ्या तीर्थामध्ये बुचकळून आला, रोज साऱ्या अंगभर वाघासारखे भस्माचे पट्टे ओढीत असला अन् चित्यासारखे टिळे-ठिपके काढीत असला तरी तो शिवापासून खूप खूप दूर आहे असे समजावे.

स्वामी विवेकानंद यांनी मद्रास येथे दिलेल्या एका व्याख्यानातील काही भाग..

सामथ्र्यसंपन्न व्हा!

आपली उपनिषदे कितीही थोर असली, आपण ऋषींचे वंशज आहोत असा आपल्याला कितीही गर्व वाटला तरीही मला हे सांगितलेच पाहिजे की अन्य जातींशी तुलना करता आपण फार दुर्बल आहोत. प्रथमत: आपण शरीराने दुर्बल आहोत. आपले हे शारीरिक दौर्बल्य निदान आपल्या एकतृतीयांश दु:खाचे कारण आहे. आपण आळशी आहोत. आपण काम करू शकत नाही. आपण एकत्र येऊन कार्य करू शकत नाही. परस्परांवर आपण प्रेम करू शकत नाही. आपण अत्यंत स्वार्थी आहोत. आपल्यापैकी तीन जण जरी एकत्र आले तरी ते परस्परांचा द्वेष करतील, मत्सर करतील. आपली सध्याची अवस्था ही अशी आहे. आपल्यात मुळीच एकोपा नाही. आपली स्वार्थबुद्धी शिगेला पोहोचली आहे. कपाळावर आडवे गंध लावावे की उभे या गोष्टीसाठी आपण गेली शेकडो वर्षे परस्परांशी भांडत आहोत. एखाद्याच्या नजरेने माझे अन्न दूषित होईल काय, यासारख्या गोष्टींवर आपण मोठमोठे ग्रंथ लिहीत आहोत. या गोष्टी आपण गेली काही शतके करीत आलो. असल्या सुंदर व महत्त्वाच्या विषयांचे संशोधन करण्यात ज्यांचे सर्व बौद्धिक सामथ्र्य खर्ची पडले आहे अशा जातींकडून आपण कोणतीही उच्च अपेक्षा करू शकत नाही. आपण पोपटाप्रमाणे पुष्कळ गोष्टी बोलतो पण त्या प्रत्यक्ष करत नाही. केवळ बोलणे आणि काहीही न करणे ही आपली सवयच होऊन बसली आहे. याचे कारण काय? मानसिक दौर्बल्य हेच याचे कारण होय. दुर्बल मेंदू काहीच करू शकत नाही. आपण तो बलवान केला पाहिजे. प्रथम आपली तरुण पिढी सशक्त बनली पाहिजे. धर्म नंतरची बाब आहे. माझ्या तरुण मित्रांनो, सामथ्र्यसंपन्न व्हा! हा माझा तुम्हाला उपदेश आहे.

(श्रीरामकृष्ण आश्रम-नागपूर यांनी प्रकाशित केलेल्या ‘स्वामी विवेकानंद ग्रंथावली’ खंड पाचवा या ग्रंथावरून साभार)

संकलन – शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता/मुख्य अंक/११ फेब्रुवारी २०१७)

मोडक्या घरात राहा पन मुलाले शिक्षन दिल्याविने सोडू नका-गाडगे बाबा


कला वक्तृत्वाची-११

समाजसुधारक गाडगे बाबा

मोडक्या घरात राहा पन मुलाले शिक्षन दिल्याविने सोडू नका

गाडगे बाबा यांनी कीर्तनातून समाजप्रबोधन केले. श्रोत्यांशी संवाद साधत, प्रश्न विचारत आणि त्यांच्याकडून उत्तर मिळवून घेत त्यांचे कीर्तन पुढे जात असे. समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा यावर त्यांनी कोरडे ओढले आणि समाजजागृती केली. त्यांनी वेळोवेळी केलेल्या काही कीर्तनांतील निवडक भाग..

हे लोक का गरिबीत राहिले?

एक तर पहिले नाही विद्या

काय नाही?

विद्या.

ज्याले विद्या नसेल त्याले खटाऱ्याचा बैल म्हनलं तरी चालल. आता तरी मुलाले शिक्षन द्या. पैसे नाही म्हनाल तर जेवनाचं ताट मोडा. हातावर भाकरी खा. बायाकोले लुगडं कमी भावाचं घ्या. इव्हायाला पाहुनचार करु नका. पन मुलाले साळतं घ्यातल्याविने सोडू नका. विद्या मोठं धन आहे. यातलेच मानसं दिल्लीच्या तक्तावर भाशेन करतात आणि यातलेच मानसं बोरिबंदरच्या ठेसनावर पोतं उचलतात.

ते मानसं अन् हे कोन?

हे काई बैल नाहीत ना?

कोन आहेत..

मानसं

विद्या केवढी मोठी गोष्ट हाये. डॉक्टर आंबेडकर साहेब यांच्या पिढय़ान पिढीनं झाडू मारायचं काम केलं. यांच्या वडिलाले सुबुद्धी सुचली आणि आंबेडकर साहेबाले साळतं घातलं. आंबेडकर साहेबानं काही लहानसहान कमाई नाही केली. हिंदुस्थानची घटना केली. घटना!

अन तेच साळतं जाते ना, अन शिकते ना तर झाडू मारनचं त्यांच्या कर्मात होतं. तवां विद्या मोठं धन आहे.

सोन्याची नाव वर काढा, आपल्या देशाचं लई भलं होऊन जाईल

काऊन रे

तुमी सत्यनारायण करता ना?

मग सत्यनारायण केल्यावर पोथिमदी लिवलय ना, बुडालेली नाव वर येते. मग आता सत्यनारायण कराव. इंग्लंडची नाव पान्यात बुडाली. तिच्यात लई मोठं सोनं है. अरे, सत्यनारायण करा, ते नाव वर काढा. आपल्या देशाचं लई भलं होऊन जाईल.

काऊन रे, एका सत्यनारायणानं होत नाही काय? मंग दहा दहा सत्यनारायण घाला. धा सत्यनारायणानं होत नसलं तर दहा हजार सत्यनारायण घाला. इथून सत्यनारायण पावत नसल तर मम्हैच्या समुद्राजवळ जा. पैसे मी देतो. तिथं सत्यनारायण करा, पण बुडालेली नाव वर काढा! दहा हजार सत्यनारायण घालून जर ते नाव वर येत नायी तर कायले ती खोट्टारडी पोथी वाचता? कायले तो खोट्टारडा सत्यनारायण करता? आणि वरून त्याले सत्यनारायण म्हणता?

तुझ्या पोराले काप आणि घे देवाला प्रसन्न करुन काय करुन राहायला रे?

न्हाय जी नवस फेडून राहिलो.

म्या म्हनलं माझ पोरगं ठीक झालं की कोंबडं कापीन.

अरे कोंबडं कुनाचं लेकरु हाय,

देवाचचं लेकरु हाय?

आन तुह लेकरु?

माह व्हय ना जी

आन तू कोनाचा रं

मी माझ्या बापाचा न जी

म्हन्जे शेवटी कोनाचा?

देवाचं लेकरु.

मंग तूह लेकरु बी देवाचचं ना

व्हय जी

अरे, तूच म्हनते कोंबडं बी देवाचं, लेकरु आणि तूह बी देवाचं आणि आत्ताच मले सांगत्व्हताय की कोंबडं कापलं की देव प्रसन्न होतो. तूह पोरगं बी देवाचं लेकरु हाय.. मग काप त्याले आणि देवाले प्रसन्न करुन!

तुमचा देव तुमचं गंडांतर काय हाकलनार रे!

काउन रे तुमी देव मानता का नाय? अरे मी बी देव मानतो. माहा देव माझ्या मनात असते. अरे, तुमच्या देवळातल्या देवाला धोतर असतं का न्हायी? मंग, तुमच्या देवळातले देवाला धोतर कोन नेसवते रे? लोकं म्हणायची आमीच नेसवतो जी. काउन देवाले धोतर नेसता येत नाय काय? त्यावर लोक म्हणायचे, नाय जी नाय नेसता येत. त्यावर गाडगेबाबा म्हणायचे, अरे व्वा रे व्वा तुमचा देव, ज्या तुमच्या देवाले सोताच धोतर नेसता येत नाही तो तुमाला काय नेसवणार रे.. काय रे देवाला निवद दाखवता का नाय? लोक म्हणायचे, हो जी दाखवतो. मंग काय करता? लोक म्हणायचे, हातात काठी घेऊन बसतो. कायले काठी घेऊन बसता? लोक म्हणायचे, नाय मंजे के कुत्रं येतं, मांजर येतं त्याले हाकलाय लागते नव्ह. अरे व्वा रे व्वा तुमचा देव, तुमच्या देवाले सोताच्या निवदावरचं कुत्रं न मांजर हाकलता येत नाय तो तुमचं गंडांतर काय हाकलनार रे? अरं देवळात देव नसते, देव मानसाच्या मनात होयते. देवळात देव राहात न्हाई. देवळात फक्त पुजाऱ्याचे पोट हायते!

संकलन – शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता/मुख्य अंक/१० फेब्रुवारी २०१७)

दुबळ्या शांतीपाठाच्या मृगजळामागे धावण्याची खोड सोडा-स्वातंत्र्यवीर सावरकर


कला वकृत्वाची-१०

स्वातंत्र्यवीर सावरकर

दुबळ्या शांतीपाठाच्या मृगजळामागे धावण्याची खोड सोडा-स्वातंत्र्यवीर सावरकर


(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता/ मुख्य अंक/ ९ फेब्रुवारी २०१७)

स्वत; सुधारल्याशिवाय तुम्ही इतरांना काय शिकविणार-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


कला वक्तृत्वाची-९

डॉ. बाबासाहेब आंबेडकरट

स्वत; सुधारल्याशिवाय तुम्ही इतरांना काय शिकविणार

(पूर्वप्रसिद्धी-लोकसत्ता/मुख्य अंक/८ फेब्रुवारी २०१७)

लोकशक्ती हिच राष्ट्रशक्ती- बॅ. नाथ पै


कला वक्तृत्वाची-८

बॅ. नाथ पै

लोकशक्ती हिच राष्ट्रशक्ती

आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून १६ फेब्रुवारी १९६६ रोजी ‘राष्ट्राची शक्ती’ या राष्ट्रीय भाषणमालेत बॅ. नाथ पै यांचे भाषण झाले होते. त्या भाषणातील काही भाग.

लोकशक्ती हाच लोकशाहीचा पाया असतो. सर्व सत्तेचे उगमस्थान लोक हे असते आणि सत्तेचा संचयही लोक या घटकातच होत असतो. खऱ्या लोकशाहीची ही एक मूलभूत कल्पना आहे. जुन्या काळात लोकशाहीच्या या जाणिवेने अभिमंत्रित झालेली मंडळी होती तशी ती आजच्या काळातही आपल्याला आढळतात. लोकांची शक्तीच अखेर यशस्वी होते हे आपल्याला काही नवे नाही. जुन्या काळात आणि आधुनिक काळात हे आपल्या देशातील अनेक विचारवंतांनी सांगून ठेवले आहे. लोकशक्ती ही राज्यशक्तीपेक्षा प्रभावी असते.

आपले संविधान, आपली घटना हाच विश्वास, हीच श्रद्धा व्यक्त करते. शक्ती आणि सत्ता यांचे उगमस्थान जनता, लोक हेच आहे आणि तेच सत्तेचेही अधिष्ठान आहे. संचयस्थान आहे. आपली घटना, आपले संविधान हीच आपल्या स्वराज्याची सनद आहे, ग्वाही आहे. आपल्या स्वातंत्र्याचे ते संरक्षक कवच आहे. कधी स्वार्थान्ध, मतान्ध मंडळी, जगाच्या इतिहासात उठणाऱ्या प्रचंड लाटांचे भान नसणारी मंडळी, अज्ञानी मंडळी, लोकशक्तीला थोपविण्याचा आटापिटा करताना दिसतात, तिला पराभूत करण्याचा उद्योग करतात. पण त्यांनी उभ्या केलेल्या सगळ्या तटबंद्या लोकशक्तीपुढे धडाधड कोसळून पडतात. सगळे अडथळे लोकशक्तीच्या पुरात कुठल्या कुठे वाहून जातात. त्यातूनच क्रांतीचा उदय होतो. प्रचंड परिवर्तन आकाराला येते.

जागृत लोकशक्तीच्या मतपरिवर्तनकारी दडपणामुळे स्वतंत्र भारतात राजकीय, आर्थिक व सामाजिक क्षेत्रातील किती तरी निर्णय हटवादी राज्यकर्त्यांना बदलावे लागले आहेत. लोकशक्तीचा अंतिम विजय निश्चित आहे, असे म्हणताना त्यात काहीच खाचखळगे नाहीत, अडथळे नाहीत, अडचणी नाहीत असे मला म्हणायचे नाही. लोकशक्ती आपोआप विजयी होते अशी समजूत कोणी करून घेऊ नये. पूर्वग्रह आणि भोळ्या समजुती, अज्ञान आणि अपसमज या गोष्टी अडचणी निर्माण करतात. काही वेळा लोककल्याण आणि जनतेची इच्छा यांच्या नावाखालीदेखील लोकशाहीला घातक अशी पावले टाकली जातात. अनेकदा लोकशक्तीचा वापर सामाजिक, राजकीय व आर्थिक परिवर्तन आणि न्याय धाब्यावर बसविण्यासाठी केल्याचेही दिसते. लोकांनी दडपशाहीला सिंहासनावर बसविले, एवढेच नव्हे तर ती दडपशाही चालू ठेवण्यासाठी साहय़ केले, असे दाखले दुर्मीळ नाहीत. ह्या अशा उदाहरणांमुळेच लोकशक्तीबद्दल लोकांची श्रद्धा भंग पावते आणि मग कडवटपणे ते लोकशक्तीबद्दल अद्वातद्वा बोलतात. लोकशाहीच्या कल्पनेबद्दल अशी मंडळी संशय व्यक्त करताना दिसतात. लोकांना सतत जागरूक ठेवणे, त्यांचे शिक्षण करणे, त्यांना सर्व अंगांनी विचार करायला शिकवणे हा लोकशाहीच्या अनुषंगाने पोसल्या जाणाऱ्या अनाचारांवर रामबाण इलाज आहे.

लोकशाही हे सामाजिक व आर्थिक न्यायप्रस्थापनेचे एक प्रभावी साधन आहे, असा दावा करणाऱ्यांचे हे कर्तव्य आहे की सत्तेचा दुरुपयोग रोखण्यासाठी लोकांनी सतत सबळ आणि तत्पर असले पाहिजे. ही जाणीव त्यांनी निर्माण करावी. असे सुजाण, संघटित लोकमत असेल तरच सत्तेला अंकुश लावता येतो आणि लाचलुचपतीने बरबटलेला कारभार नेस्तनाबूत करणे शक्य होते. लोकशाहीच्या यशाचे ते गमक आहे. नेत्याने लोकांची भाबडेपणाने भलावण करणे किंवा लोकमतापुढे लोटांगण घालणे म्हणजे लोकशाही नेतृत्व नव्हे. लोकशाही नेतृत्वाची कसोटी लोकांच्या व्यापक व उचित आकांक्षांशी ते किती एकरूप होते आणि त्यासाठी प्रसंगी तात्पुरती माघार व अपयश घेण्याची तयारी दाखवते यावर लागते. लोकांच्या पूर्वग्रह व अपसमजुतींविरुद्ध दंड थोपटण्याची त्याची तयारी असली पाहिजे. यासाठी आपले सर्वस्व समर्पण करण्यालाही त्याने कचरता कामा नये.

लोकेच्छेपुढे राज्यकर्त्यांची शरणागती

सत्ताधाऱ्यांना सत्तेचा पुष्कळदा मद चढतो, मस्ती येते. लोकशक्तीला ते क:पदार्थ समजतात. लोकशक्तीची अवहेलना करतात. तिला तुच्छ लेखतात. पण लोकशक्ती त्यांना नमवते. सरळ मार्गावर आणते. आपल्या उर्मटपणाचा त्यांना त्याग करावा लागतो. शिरजोरी, मुजोरी त्यांना सोडावी लागते. इतिहासात अशी कितीतरी उदाहरणे सापडतील की जेथे राज्यकर्त्यांना आपला हट्ट सोडून देऊन लोकेच्छेपुढे शरणागती पत्करावी लागली आहे.

संकलन – शेखर जोशी

(अनुबंध प्रकाशन प्रकाशित ‘वक्तृत्व कला दिग्गजांची’ -श्यामसुंदर उके या पुस्तकावरून साभार)

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता/मुख्य अंक/७ फेब्रुवारी २०१७)

प्रश्न मराठीच्या संरक्षणाचा आणि संवर्धनाचा-वि. वा. शिरवाडकर


कला वक्तृत्वाची-७

वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज

प्रश्न मराठीच्या संरक्षणाचा आणि संवर्धनाचा

महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या राजधानीत एक अपूर्व सोहळा संपन्न होत आहे. मायभाषेच्या हाकेला प्रतिसाद देऊन आपण अनेक राज्यांतून, अनेक देशांतून येथे आला आहात. मी आपणा सर्वाना मनापासून धन्यवाद देतो.आपण परप्रांतात, परदेशात राहता आहात. तेथील भाषांचा स्वीकार करणं, त्यात पारंगत होणं हे आपलं कर्तव्यच आहे. पण ते बजावत असताही आपण आपल्या मायभाषेवरील प्रेम देवघरातील समईसारखं जागृत ठेवलं आहे. खेद या गोष्टीचा की खुद्द महाराष्ट्रात मात्र या समया मंदावत विझत चालल्या आहेत. आम्हीच त्या मालवत आहोत आणि जुन्या बाजारात समयांची किंमत किती याचा शोध घेत आहोत. स्वातंत्र्याच्या चाळीस आणि राज्य स्थापनेच्या पंचवीस वर्षांनंतरही मराठीला आपलं हक्काचं सिंहासन अद्याप मिळालेलं नाही आणि ते मिळत नाही याचं कारण ते रिकामं नाही. या मातीशी कोणतंही नातं नसलेल्या एका परकीय भाषेनं इंग्रजीनं ते बळकावलेलं आहे.मी इंग्रजी भाषेचा द्वेष तर करत नाहीच उलट त्या भाषेवर माझं मनापासून प्रेम आहे. आपण सारेजण इंग्रजीचं ऋण कधी विसरू शकत नाही. केवळ जागतिक साहित्याचेच नव्हे तर जगातील ज्ञानविज्ञानाचे दरवाजे इंग्रजीनंच आमच्यासाठी उघडले आहेत.

कोणत्याही जिवंत समाजाची भाषा तळ्यासारखी सजीव नसते तर कालमानानं निर्माण होणाऱ्या नव्या ज्ञानाचे, विचारांचे, जाणिवांचे पाझर आत्मसात करीत पुढे जाणाऱ्या नदीसारखी प्रवाही असते. इतर प्रगत भाषांशी संपर्क ठेवूनच ती प्रगती करू शकते. शुद्धतेच्या कर्मकांडांत रुतलेल्या आणि त्यामुळेच प्रगतीला पराङ्मुख झालेल्या भाषा मृत या सदरात कशा जमा होतात हे इतिहासानं दाखवलेलं आहे. हे भान मराठीनं आपल्या पंधरा शतकांच्या प्रवासात राखलेलं आहे आणि म्हणूनच नव्या युगाची आव्हानं पेलण्याचं सामथ्र्य तिच्या ठिकाणी आलं आहे. भाषा समर्थ आहे, पण तिच्या सामर्थ्यांसंबंधी साशंक असलेली आम्ही तिची अपत्यं मात्र दुबळी आहोत. तेव्हा आमचं वैर कोणत्याही भाषेशी नाही आणि मावशीच्या मायनं आमचं पालन करणाऱ्या इंग्रजीशी तर नाहीच नाही. मावशीबाईनं आता आईच्या घराचा कब्जा पुन्हा आईकडं द्यावा एवढीच आमची मागणी आहे. म्हणून आपल्यासमोर प्रश्न आहे तो इंग्रजीच्या बहिष्काराचा नाही तर मराठीच्या संरक्षणाचा आणि संवर्धनाचा.

कागदोपत्री मराठी भाषा ही राजभाषा झालेली आहे. पण व्यवहारात तिचा हा अधिकार फारसा मान्य झाल्याचं दिसत नाही. डोक्यावर सोनेरी मुकुट आणि अंगावर फाटके कपडे अशा अवस्थेत ती मंत्रालयाच्या दाराशी उभी आहे. सरकारी आणि निमसरकारी संस्थांत मराठीला अद्याप खालच्या मानेनंच वावरावं लागतं. पण मराठीला राजभाषेचं रास्त स्थान आज ना उद्या लाभेल. अधिक धोका आहे तो लोकभाषा म्हणून तिच्यावर होणाऱ्या आक्रमणांचा.

मुंबईत म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानीत मराठीचं स्थान कोणतं हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. मुंबई हे सर्वाश्रयी शहर आहे. विविध प्रांतांतील लोक येथे येतात, राहतात याचा आम्हाला अभिमान, आनंद वाटतो. पण मुंबईतील मजलेदार इमारती, त्या बांधणारे वा त्यात राहणारे कोणीही असोत त्या मराठी मातीवर उभारलेल्या आहेत. मुंबई ही महाराष्ट्रातील मराठी भाषिकांची जीवनधात्री माता आहे. या माऊलीच्या वत्स सावलीत कोणीही यावं, राहावं, निर्वाहसाधना करावी. अवश्य. ‘हे विश्वचि माझे घर’ हा संतांचा संदेश या मातीत रुजलेला आहे. पण आठ कोटींच्या या आईला धनसत्तेच्या बळावर आपली बटीक करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये.

महाराष्ट्राच्या अस्मितेवर संकट

मराठीवरील संकट हे तिच्या शब्दकोशावरील वा साहित्यावरील संकट नाही. ते महाराष्ट्राच्या अस्मितेवरील, मराठीपणावरील आणि येथील लोकांच्या भवितव्यावरीलही संकट आहे. संस्कृतचं स्तोम माजवून तेव्हाचा पुरोहितवर्ग आपली सत्ता समाजावर गाजवत होता. आज त्या पुरोहितवर्गाची जागा इंग्रजीत पारंगत असलेल्या चार-पाच टक्के लोकांनी घेतली आहे. या पाच टक्केवाल्यांच्या प्रस्थापित हितसंबंधांसाठी आठ कोटी लोकांचं भवितव्य धोक्यात लोटायचं का याचा विचार गंभीरपणानं व्हायला हवा. लोकभाषेवर आक्रमण..

सरकारी-निमसरकारी संस्थांमध्ये मराठीला मानच नाही या भाषेला धनसत्तेच्या बळावर बटीक करण्याचा प्रयत्न करू नये चार-पाच टक्के लोकांकडून मराठी भाषेचे भवितव्य धोक्यात मराठी भाषा नव्या युगाची आव्हाने पेलण्यास समर्थ

संकलन – शेखर जोशी

(जागतिक मराठी परिषदेच्या मुंबईत झालेल्या पहिल्या अधिवेशनाच्या (१२ व १३ ऑगस्ट १९८९) उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ नाटककार, कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांनी केलेल्या भाषणातील काही भाग)

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता-मुख्य अंक/५ फेब्रुवारी २०१७)

हातवारे आणि हावभाव-डॉ. अशोक दा. रानडे


कला वक्तृत्वाची-६

अशोक दा. रानडे

हातवारे आणि हावभाव

भाषणक्रियेवर ज्यांचा प्रत्यक्ष परिणाम होतो, प्रभाव पडतो अशा ज्या काही बाबी आहेत त्यात हातवारे आणि हावभाव यांचा निर्विवादपणे अंतर्भाव होतो. हालचाल, हातवारे आणि हावभाव यांच्यामुळे भाषणाचे हेल निश्चित होतात. हाताच्या चलनवलनांचे मानवी जीवनात खास महत्त्व आहे. भाषणासमवेत हातवारे होतात. तसेच हावभावही होतात. खरे पाहता हावभाव हा जोडशब्द मानायला हवा. भाव प्रकट करण्याच्या हेतूने मान, उच्छवास, भुवया व डोळ्याचे विस्फारणे इत्यादींचा वापर करणे हे हाव. हालचाल आणि हातवाऱ्यांखेरीजची शरीरांगांची सूक्ष्म चलने म्हणजे हाव असा अर्थ मानणे सोयीचे राहील. आता राहिला भाव. मनावरचा कोणताही तरंग म्हणजे भाव. भाव म्हणजे स्थिर मनातली कोणतीही सूक्ष्म चलबिचल हा सोपा अर्थ ध्यानात घेऊ. विशिष्ट प्रसंगाच्या अनुषंगाने भाव जेव्हा एक खास परंग घेऊन येतो तेव्हा निर्माण होते ती भावना. आपल्या हातवाऱ्यांचे आणि हावभावांचे भाषणाबरोबरोबरचे नाते काय ते पाहावयाचे. भाषणाचा स्वत:चा म्हणून जो काही परिणाम असतो त्याच्याशी हातवारे-हावभावांचे नाते दोन प्रकारचे संभवते. एक तर भाषणाच्या अर्थाला त्यांच्यामुळे दुजोरा मिळावा किंवा भाषणार्थास त्यांच्यामुळे छेद जावा.

भाषण, हातवारे आणि हावभाव हे तिन्ही एक समान आविष्काराचे घटक म्हणून येत असल्याकारणाने त्यांचे एकमेकांशी काहीही नाते नसणे संभवत नाही. मूळ भाषणार्थ कोणता हे समजून घेण्यात चूक झाली तर भाग वेगळा. पण सर्वसाधारणत: कोणत्या भाषणाबरोबर कोणते हातवारे वगैरे असावेत याची सूचना भाषणांतूनच मिळत असते. हातवारे आणि हावभाव जर निश्चित संकेतांच्या साखळीत बसविले तर नृत्यातली मुद्रांची भाषा तयार होते हे सर्वाना माहिती आहे.शरीरापासून दूर/जवळ जाण्याची क्रिया हात किती झपाटय़ाने, वेगाने करतात यातूनही भावनांचा आवेग दर्शविला जातो. काहीशी विरोधाभासात्मक बाब अशी की भावनाक्षोभाची तीव्रतम मानसिक अवस्था दाखविण्याकरिता हात शरीराला लगटून ठेवणे ‘बोलके’ ठरते.भाषणकर्त्यांचे शिष्टपण, गावंढळपण किंवा त्याच्या मनाचा समतोल/तिरकसपणा दर्शविण्यासाठी अनुक्रमे सफाईदार/खडबडीत वा हिसक्यांनी युक्त हातवारे उपयोगी पडतात.

सरळ रेषेत होणारे हातवारे आक्रमक व मर्दानी तर वक्र रेषेत होणारे मनमिळाऊ व जनानी असेही गमक मानता येईल. सर्वसाधारणत: शब्द अधिक असल्यास हातवारे कमी असे समीकरण मांडण्यास हरकत नाही. हालचाल, हातवारे आणि हावभाव यांची आपापली खास ‘भाषा’ त्याच क्रमाने अधिकाधिक सूक्ष्म होत जाते. म्हणजे असे की कर्त्यांची शरीरशक्ती कमी कमी खर्च होत जाते आणि त्याचबरोबर संदेशग्राकाची (म्हणजे प्रेक्षक वगैरेची) संवेदनशीलताही अधिकाधिक आवश्यक ठरू लागते. प्रयोग सादर करणाऱ्या बाह्य़ सोयी (उदा. प्रकाशयोजना, ध्वनिवर्धन इत्यादी) किती उपलब्ध आहेत त्याचा अंदाज घेऊनच ‘भाषा’ कितपत सूक्ष्म ठेवावी याचा निर्णय करावयाचा असतो.

फेक आणि हातवारे

मनात उद्भवलेला विकार साजेशा जलदीने व कमीत कमी अक्षरांच्या/ शब्दांच्या मदतीने दाखविण्याकरिता मानवी उद्गाराच्या या खास स्वरूपामुळे हातवाऱ्यांबरोबर त्याची सांगड घातली जाणे स्वाभाविक म्हटले पाहिजे. या स्वाभाविक संगतीमुळे हातवारे आणि उद्गारांची फेक यांनी मिळून काही अभ्यास सिद्ध होतात.

‘हा:’सारख्या कमी ध्वनींनी तयार होणाऱ्या उद्गारांची एक यादी तयार करा, यादीपैकी एक कोणताही उद्गार घेऊन बोटांची पेरे क्रमाक्रमाने वाकविताना त्याची फेक करा.


हळूहळू उद्गाराच्या फेकीचा वेग वाढवा, हाताचा पंजा सावकाश उघडा व बोटे पसरा. उभे राहून दोन्ही हात जमिनीला समांतर पसरा-पक्ष्याच्या पंखासारखे. बोटांच्या टोकापासून खांद्यापर्यंत एक लाट हळूहळू येत असून त्यानुसार बाताचा तो तो भाग खालीवर होत आहे अशी कल्पना करून त्यानुसार हातांची हालचाल करा.

मार्गदर्शक सूत्रे. हातवारे, हावभाव वगैरेंचे प्रमाण व प्रकार अंतिमत: भाषणार्थाच्या अनुषंगाने निश्चित होतात हे मूलतत्त्व ध्यानात घेता त्यांच्या जबरदस्त विविधतेची कल्पना सहजपणे करता येईल. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत निरपवादपणे लागू पडतील असे नियम सांगणे अवघड नव्हे तर अयोग्यही ठरेल. पण तरीही हातवारे आणि हावभाव कोणते असावेत ते ठरविण्यासाठी बऱ्याच प्रमाणात साहाय्यक ठरणारी काही सूत्रे पुढीलप्रमाणे मांडता येतील. सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल की भावनांचा आवेग जितका तीव्र तितके हात शरीरापासून अधिक दूर नेणे स्वाभाविक वाटेल.

संकलन – शेखर जोशी

(अशोक दा. रानडे लिखित आणि पॉप्युलर प्रकाशन प्रकाशित ‘भाषणरंग-व्यासपीठ आणि रंगपीठ’या पुस्तकावरून साभार.)

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता-मुख्य अंक/४ फेब्रुवारी २०१७)

मराठी भाषेचे तेज आचार्य अत्रे यांनी शिकविले-पु. ल. देशपांडे


कला वक्तृत्वाची-५

पु. ल. देशपांडे

२८ मार्च १९८१ रोजी पुण्यातील आचार्य अत्रे सभागृहाचे उद्घाटन झाले. त्या वेळी श्रोत्यांच्या आग्रहास्तव पु. ल. देशपांडे यांनी आयत्या वेळी भाषण केले. आचार्य अत्रे यांच्यावरील पुलंचे ते भाषण म्हणजे श्रोत्यांना मेजवानीच होती. त्या भाषणातील काही भाग.

..आत्तापर्यंत आचार्य अत्रे यांच्यावर प्रत्येकाने बोलण्याचा प्रयत्न केला (हशा). मी असे विधान करतो याचे कारण असे की, आचार्य अत्रे ही अशी व्यक्ती होती तिच्यावर किती बोलले तरी शिल्लक राहते. काही धाडसी लोकांनी त्यांच्यावर ‘पीएच.डी.’ करण्याचाही प्रयत्न चालविला आहे (हशा). काही व्यक्ती महाराष्ट्रात अफाट झाल्या आहेत. बाळ गंगाधर टिळक, आचार्य अत्रे ही माणसेच अशी आहेत की त्यांच्याबद्दल कोणत्या अंगाने लिहावे आणि बोलावे?

आज आम्ही मोकळेपणाने लोकांना सांगू शकतो, न घाबरता सांगू शकतो की आम्ही अत्र्यांच्या काळात वाढलो. आम्ही मनात खांडेकर आणि जनात अत्रे धरूनच सगळं बोलत होतो (हशा). याचे कारणही तसंच आहे. अफाट लोकप्रियता बालगंधर्वाना आणि अत्र्यांना मिळाली. कारण हा आपला माणूस आहे असं लोकांना वाटत असे. तो बरोबर बोलतो असं वाटे. आपल्या विचारालाच प्रतिसाद मिळत आहे असं त्यांना वाटे. त्यांचा महाराष्ट्रावरचा सर्वात मोठा उपकार असा की अस्सल मराठी भाषेचं तेज म्हणजे काय ते त्यांनी आम्हाला शिकविलं. मराठीकडे थट्टेचा विषय म्हणून दुर्लक्ष होई. त्याच मराठीच्या माध्यमातून आचार्य अत्र्यांनी हसविलं आणि हसवता हसवता महाराष्ट्राला शहाणं केलं (टाळ्या). संयुक्त महाराष्ट्राचे दिवस आठवतात. अन्यायाविरुद्ध संतापून उठणं म्हणजे काय हे त्यांनी दाखवून दिलं. वन्ही चेतवित ठेवण्याचं, त्वेषानं लोकांना उठविण्याचं सामथ्र्य त्यांच्याकडं होतं. याचं कारण त्यांच्या जीवनाचे सर्वस्वच मुळी उत्कटतेत होतं. त्यांना लहान काही दिसत नाही. मी एकदा अत्रे यांना म्हटलं, आम्ही सारे जण बे एके बे, बे दुणे चार शिकलो. तुमच्या मास्तरांनी तुम्हाला दोन हजार एके दोन हजार, दोन हजार दुणे चार हजार असंच शिकवलेलं दिसतय (प्रचंड हशा).आमच्या म्युनिसिपल शाळेतील मास्तरांना आम्हाला दोन सांगतानाही आपण जास्त सांगतो असं वाटायचं. अत्र्यांना कोण ते सासवडचे गुरुजी मिळाले कोण जाणे (हशा).

एकदा माझं आणि अत्र्यांचं एका व्यासपीठावर भाषण होतं. अत्र्यांनी मला विचारलं, पीएल किती माणसं सभेला आहेत असं तुला वाटतं? मी आपला कारकुनी अंदाज करीत सांगितलं, असतील हजार बाराशे. अरे काय म्हणतोस, अत्रे म्हणाले. ७० ते ८० हजार लोक म्हण. नाही तर जिल्हा पत्राचाही तू संपादक होणार नाहीस (प्रचंड हशा). पुण्यात सभा असल्यामुळं एक माणूस दहा माणसांबरोबर होता ही गोष्ट निराळी (टाळ्या आणि हशा).

अत्रे ज्या क्षणी लिहित होते त्या क्षणाशी ते अत्यंत प्रामाणिक होते. मग ते त्या वेळी कोणतंही कृत्य करीत असो. कारण विनोदी लेखकाचे वैशिष्टय़च हे असते की त्याला जीवनातील सुसंगत म्हणजे काय ते कळावं लागतं. त्या वेळीच तो विसंगतीवर लिहू शकतो. अत्र्यांचं वाचन अफाट होतं. त्यांच्या शैलीवर संत वाङ्मयाचे संस्कार आहेत. अत्र्यांसारखं सरळ मराठी आज कुणी लिहीत नाही. आचार्य अत्रे व्यक्ती नसून जीवनाकडे पाहण्याची दृष्टी होती. चागलं असेल त्याला अति चांगलं करीत, वाईट असेल त्याला अतिवाईट ठरवून झोडपूनही काढीत. अशी त्यांची विचारसरणी होती. प्रत्येक क्षेत्रांत त्यांनी कर्तृत्व गाजवलं. अशा व्यक्तीला लवकर विसरून जाण्याइतका महाराष्ट्र कृतघ्न नाही.

संकलन- शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता/मुख्य अंक/३ फेब्रुवारी २०१७

भाषणाचे तंत्र आणि मंत्र-माधव गडकरी


कला वक्तृत्वाची-४

माधव गडकरी भाषणाचे तंत्र आणि मंत्र

आवाज कसा आहे त्याचा अभ्यास करा- प्रा. राम कुलकर्णी


कला वक्तृत्वाची-३

प्रा. राम कुलकर्णी

आवाजालाही व्यायाम हवा- प्रबोधनकार ठाकरे


कला वक्तृत्वाची-२

प्रबोधनकार ठाकरे

आवाजालाही व्यायाम हवा

आवाज हे वक्तृत्वाचे मुख्य अंग आहे. माणसाच्या नुसत्या बोलण्याच्या आवाजावरून त्याच्या अंतर्बाह्य़ संस्कृतीचा बोध होतो. वक्त्याच्या तोंडून नुसता पहिला स्वर निघताच तो विद्वान, व्यासंगी, निश्चयी, सत्यप्रेमी, कळकळीचा आहे की हळवा, कमजोर आहे याची श्रोत्यांना पारख करता येते. मनुष्याच्या अंत:करणातील गूढ विकाराचे आविष्करण त्याच्या स्वरांच्या रोखठोक अथवा कंपित लहरींवरून होत असल्यामुळे शीलाने तो कच्चा की पक्का, त्याच्या स्वभावातील बरे-वाईट गुणधर्म कोणते, त्याच्या भाषणात नि:स्पृहता आहे की दंभ आहे, तो ज्या विषयावर बोलणार आहे त्याबद्दल त्याचा आत्मविश्वास भरपूर आहे की कोता वगैरे अनेक गोष्टींचा साक्षात्कार श्रोत्यांना होतो.

भाषणाला काय किंवा व्याख्यान, प्रवचन, कीर्तनाला काय, निकोप आवाज हे मोठे आवश्यक भांडवल आहे. घोगरे, किरटे, चिरफाळलेले किंवा कोकीळकंठी बायकी आवाजाचे वक्ते पट्टीचे पंडित असले तरी श्रोत्यांवर त्यांना आपली छाप पाडता येत नाही. चारचौघांत बसून गप्पाष्टकी संभाषण करतानाही उत्तम, गहिरा, मोहक आवाजाचा चतुरस्र असामी बाकीच्या मंडळींवर तेव्हाच इतकी छाप पाडतो की थोडय़ाच वेळात तो एकटा वक्ता आणि बाकीचे सारे उत्सुक श्रोते असा बनाव बनतो. आवाजालाही व्यायाम हवाच. व्यायामाने आणि नियमित आहार-विहाराने शरीरप्रकृती व काव्यशास्त्र विनोदप्रचुर ग्रंथांच्या व्यासंगाने मानसिक प्रकृती उत्तम राखण्याची आपण काळजी घेतो. शरीर नि मनाइतकाच आपला आवाजही निकोप आणि निरोगी राखण्याची जरुरी आहे हे फार थोडय़ांच्या लक्षात येते. सकाळ, संध्याकाळ दोन-दोन तास तंबोऱ्यावर सुरावटीची मेहनत (रियाज) करणाऱ्यांचा आवाज आणि आरोग्य उत्तम राहते.

उत्तम आकर्षक गायनासाठी सकस, निकोप आणि झारदार गळ्याची जेवढी आवश्यकता तेवढीच ती भाषिक वक्त्यांनाही असावी लागते. वक्त्यांच्या पांडित्यापेक्षाही त्याच्या भरघोस मोहक आवाजाच्या मोहिनीचाच श्रोत्यांवर परिणाम होत असतो. पं. विष्णू दिगंबर पलुस्कर हे जसे उच्च श्रेणीचे गायनाचार्य होते तसे पट्टीचे वक्तेही होते. त्यांचे शास्त्रोक्त गायन ऐकताना श्रोते नादब्रह्माने जसे मंत्रमुग्ध होत तसेच त्यांचे व्याख्यान, प्रवचन चालले असतानाही श्रोते तल्लीनतेने माना डोलवीत असत. महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यांनी शंभरी ओलांडली. पण त्यांच्या आवाजातील गोंडसपणा आणि गोडवा जणू काय अगदी बाल आवाजाचाच वाटत असे. कशाचा हा परिणाम? शारीरिक आणि मानसिक आरोग्याप्रमाणे या थोर पुरुषांनी आवाजाच्या आरोग्यालाही तितक्याच काळजीने जोपासले. आवाज कमाविण्यासाठी वक्तृत्वाच्या हौशी व महत्त्वाकांक्षी उमेदवारांनी एखाद्या गवयाचे मार्गदर्शन पत्करल्यास फार चांगले. रोज तास-अर्धा तास तंबोऱ्यावर किंवा पेटीच्या स्वरावर खर्ज लावण्याच्या कसरतीने किरटा, घोगरा, कमताकद आवाज सुधारल्याची उदाहरणे आहेत.

आवाजाचा उपयोग करताना त्यावर कसल्याही प्रकारचा शारीरिक किंवा मानसिक दाब नसावा. तो अगदी मोकळा, दिलखुलास असावा. चोरटा नसावा. भाषणाची सुरुवात अगदी मंद, साहजिक आणि तोलदार आवाजात केली म्हणजे विचारशक्ती आपल्या ताब्यात राहते. उच्चार स्वच्छ, स्पष्ट आणि ठाशीव असले म्हणजे शब्दांचा नाद-निनाद श्रोत्यांच्या मनावर छान परिणाम घडवितो. माईकवर मोठय़ा आवाजात बोलणे ही आवाजाची वारेमाप उधळपट्टीच आहे. ती टाळावी. श्रोता आणि वक्ता परस्पर सन्मुख असले पाहिजेत. भाषणात खरे महत्त्व भावनेला असून स्वरांच्या खोचा, वाक आणि आरोह-अवरोह निरनिराळ्या गोष्टीतील, विचारांतील किंवा तत्त्वातील भेद दर्शवितात.

संकलन – शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता-मुख्य अंक/३० जानेवारी २०१७)

(‘प्रबोधनकारडॉटऑर्ग’ या संकेतस्थळाच्या सौजन्याने)

साहित्य क्रांती करु शकते-आचार्य अत्रे


साहित्य क्रांती करू शकते

वक्तृत्व कलेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रषु’ या उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वास सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत वक्त्यांच्या भाषणातील काही उतारे तसेच वक्तृत्वकलेसंदर्भातील त्यांचे विचार येथे क्रमश: सादर केले जाणार आहेत. पहिले भाषण लेखक, नाटककार, संपादक, झुंजार वक्ते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे. पुणे येथे उभारण्यात आलेल्या राम गणेश गडकरी यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण अत्रे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी केलेल्या भाषणातील काही भाग..

कला वक्तृत्वाची-१

आचार्य प्र. के. अत्रे

आजपर्यंत मी काही कमी मानसन्मान नाही मिळविले. परंतु त्या सर्व सन्मानापेक्षा आज माझ्या थोर गुरूंचा पुतळा माझ्या हातून उघडला जात आहे हा सन्मान अनन्यसाधारण आहे. (टाळ्या) मोक्ष प्राप्त करून देणारी आणि अमृताचा वर्षांव करणारी ज्ञानेश्वरी मराठी भाषेतच लिहिली गेली. ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी देऊ माथा’ असे खडे बोल तुकोबांनी मराठीतच सांगितले. तुकाराम हे महाराष्ट्रातील युगप्रवर्तक लोकगीतकार होते. ‘धटासी असावे धट उद्धटासी उद्धट’ ही मराठी शिकवण समर्थ रामदास स्वामी यांनी दिली. ‘एक पाय सदैव तुरुंगात ठेवून लोकशिक्षणासाठी आम्ही हातात लेखणी धरली’ असे सांगणाऱ्या विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी मराठी भाषेला सामथ्र्यवान केले तर राम गणेश गडकरी यांनी तिला सौंदर्यवान केले.

एखादा वीर योद्धा जसा लढता लढता रणांगणी पडतो तसे गडकरी वीराच्या मरणाने मेले. ‘भावबंधन’चा शेवटचा प्रयोग लिहून त्यांनी लेखणी खाली ठेवली आणि अवघ्या तीस मिनिटांतच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. ‘एकच प्याला’ हे त्यांचे लोकप्रिय नाटक मरणोत्तर प्रसिद्ध झाले. प्रत्येक कवितेत किंवा प्रत्येक लेखनात एक शब्द, एक कल्पना, एक भावना अगदी नवीन असलीच पाहिजे, अशी त्यांची प्रतिज्ञा असे व त्याप्रमाणेच ते लिहीत असत. कवितेखाली त्यांचे नाव नसले तरी त्या कवितेच्या ढंगावरून ती गडकऱ्यांचीच असली पाहिजे असे ओळखू येत असे. नाटकाचे यश हे भाषेवर अवलंबून नाही तर त्या नाटकातील संघर्षांवर ते अवलंबून असते. नुसती भाषा चांगली पण नाटकात कुठेही खटका नसेल, संघर्ष नसेल तर ते नाटक कोणीही पाहण्यास येणार नाही. प्रेक्षकांच्या हृदयाची पकड कशी घ्यावी हे गडकरी चांगलेच ओळखत आणि म्हणूनच त्यांची नाटके लोकप्रिय ठरली. कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे विनोद क्षेत्रातील गडकऱ्यांचे गुरू होते. कोल्हटकर यांच्या विनोदाचे सौंदर्य गडकऱ्यांनी अधिक खुलवून सांगितले. गडकऱ्यांचा विनोद सामाजिक होता. समाजसुधारणेसाठी त्यांनी विनोदाचा उपयोग केला.

साहित्य ही शक्ती आहे. त्याबाबत वाद करण्याची आवश्यकता नाही. राज्यकर्ते आणि साहित्यिक यांचे कार्य समान आणि परस्परावलंबी आहे. साहित्य क्रांती करू शकते. जगात समाजपरिवर्तनाचे अनेक प्रयोग सुरू आहेत. काही राज्यकर्ते हे कार्य कायद्याच्या जोरावर करू पाहतात, पण कायद्याने माणूस सुधारत नाही. त्यासाठी त्याचे हृदय पकडावे लागते. समाजाची नीती कायद्याने सुधारता येत नाही. महाराष्ट्राची परंपरा ज्ञानेश्वरांची आहे. समाजवादी महाराष्ट्र संपन्न करायचा म्हटल्यास अन्य गोष्टींबरोबरच सुवाङ्मयाची, चांगल्या साहित्याची आवश्यकता आहे. गडकऱ्यांसारखे साहित्यिक ते काम करू शकतील..

(संकलन-शेखर जोशी)

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता-मुख्य अंक/२९ जानेवारी २०१७)

रविवार, १२ मार्च, २०१७

दादर येथे सापडलेला स्कुटर बॉम्ब आणि...


दादर येथे सापडलेला स्कुटर बॅाम्ब आणि....

(सोमवार १५ मार्च १९९३ च्या मुंबई सकाळमध्ये प्रसिद्ध झालेली माझी बातमी आणि आठवण)

१२ मार्च १९९३, मुंबई आणि भारताच्या इॉतिहासातील एक दुर्देवी व काळा दिवस. याच दिवशी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले गेले. या भयानक व धक्कादायक घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांनी दादर (पश्चिम) येथे एका बेवारस स्कुटरमध्ये शक्तीशाली बॉम्ब सापडला. वेळीच लक्षात आल्याने बॉम्बशोधक पथकाने तो निकामी केला. रस्त्यावर उभ्या केलेल्या या स्कुटरला कोणी सहज खेळ महणून नुसती किक मारली असती तरी हा स्फोट घडेल, अशी व्यवस्था करण्यात आली होती.

दादर (पश्चिम) येथे डॉ. मांडोत यांच्या दवाखान्यासमोर एका बेवारस स्कुटरमध्ये बॉम्ब ठेवला असल्याची बातमी कळली. तेव्हा आजच्या सारखे वृत्तवाहिन्यांचे प्रस्थ नव्हते. त्यामुळे वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी व छायाचित्रकार घटनास्थळी होते.मी तेव्हा मुंबई सकाळमध्ये वार्ताहर म्हणून नोकरी करत होतो. आमचे मुख्य वार्ताहर रमाकांत पारकर ऊर्फ तात्या यांनी मला आणि आमचा छायाचित्रकार सचिन चिटणीस याला तिकडे जायला सांगितले. दोघेही तिकडे गेलो. बॉम्बशोध पथक घटनास्थळी आले आणि त्यांनी बॉम्ब निकामी केला. संध्याकाळी पाच/साडेपाच वाजल्यापासून जवळपास दोन-तीन तास हे सर्व सुरु होते. बॉम्ब निकामी केल्यानंतर वृत्तपत्रांचे पत्रकार व छायाचित्रकार तिथून निघाले.

मी आणि सचिन थोडा वेळ तिथेच थांबलो. बॉम्ब तर निकामी केला आता पुढे काय करणार, याची माहिती घेतली. मिळालेल्या माहितीुसार तो बॉम्ब, आतील आरडीएक्स हे सर्व विक्रोळी येथे नेले जाणार होते. कार्यालयात हे सगळे कळविले.सचिन आणि मी तेथे जायचे ठरविले. आम्ही तिथे गेलो. तेव्हा चंद्रकांत हंडोरे हे मुंबईचे महापौर होते. ते ही विक्रोळीला त्या ठिकाणी होते. तेथे रात्री त्या बॉम्बची पूर्ण विल्हेवाट लावण्यात आली. या सगळ्याचे मी आणि सचिन साक्षीदार होतो. रात्री तिथून निघालो. मोबाईल व अन्य संपर्काचे प्रभावी माध्यम तेव्हा नव्हते. कार्यालयात दूरध्वनी करुन अशी बातमी आहे हे सांगितले. नारायण पेडणेकर, प्रभाकर नेवगी हे वरिष्ठ तसेच उमेश करंदीकर रात्रपाळीत होते. कार्यालययात गेल्यानंतर मी बातमी लिहून काढली. आणि फक्त मुंबई सकाळमध्ये त्या बातमीची आठ कॉलम हेडलाईन झाली. तेव्हाच्या सर्व अन्य मराठी वृत्तपत्रात दादर य़ेथे बॉम्ब सापडला आणि तो निकामी केला एवढीच बातमी होती. आमच्याकडे त्यानंतरचा सगळा घटनाक्रम आणि बातमीचा पाठपुरावा केल्यामुळे सचिनच्या फोटोसह सविस्तर बातमी आली.

मुंबई सकाळची ही बातमी त्या दिवशी (१५ मार्च १९९३) वेगळी ठरली. त्याबाबत मुंबई सकाळचे संपादक राधाकृष्ण नार्वेकर यांनीही आमचे कौतुक केले. इतरांपेक्षा वेगळी बातमी फक्त आपल्याकडे दिल्याचे आणि बातमीलाही व्यवस्थित न्याय मिळाल्याचा आनंंद काही वेगळाच होता.

दादर (पश्चिम) येथे असलेला हा स्कुटर बॉम्ब अत्यंत शक्तीशाली होता. जर त्याचा स्फोट झाला असता तर सेंच्युरी बाजार येथील स्फोटापेक्षाही त्याची तीव्रता जास्त असती. दादर रेल्वे स्थानक परिसर उध्वस्त होईल इतका तो शक्तीशाली होता. सुदैवाने तो वेळीच निकामी केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पण आज इतक्या वर्षांनंतरही ते सगळे आठवले की अंगावर अजूनही काटा येतो....

-शेखर जोशी

सोमवार १५ मार्च १९९३ च्या मुंबई सकाळमधील मी दिलेल्या त्या बातमीचे कात्रण, सचिन चिटणीस याच्या छायाचित्रासह