बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५

सरसंघचालकांचे ऐकून झाडांची कत्तल थांबणार का?

डॉ. मोहन भागवत सांगती वृक्षांची महती! - महाराष्ट्र भाजप सरसंघचालकांचे ऐकून झाडांची कत्तल थांबवणार की कत्तल करणार? शेखर जोशी भारतीय जनता पक्षासाठी आदरणीय, गुरुतुल्य असणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केलेल्या विचारांचा आदर राखून नाशिक येथील हजारो वृक्षांची संभाव्य कत्तल थांबवायची की सोयीस्कर दुर्लक्ष करून कत्तल करायची? असा पेच भाजपपुढे निर्माण झाला आहे‌. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपची मातृ/ पितृ संघटना आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते/ पदाधिकारी किंवा भाजपचे नेते जाहीरपणे मान्य करोत अथवा न करोत पण रा.स्व. संघाचे सरसंघचालक व संघ नेते, पदाधिकारी जे सांगतील ते भाजपसाठी शिरसावंद्य असते. कधीतरी नड्डा काहीतरी बरळतात आणि त्याचा प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष फटका कसा बसतो हे भाजपने लोकसभा निवडणुकीत पाहिले. आणि म्हणूनच पाठोपाठ झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत रा. स्व. संघ, संघप्रणित संस्था, संघटना भाजपच्या बाजूने अप्रत्यक्षपणे निवडणुकीत उतरल्यावर काय परिणाम झाला ते ही पाहायला मिळाले. नगरसेवक ते खासदार पदापर्यंतच्या निवडणुकीत संघ आणि संघप्रणित संस्था/ संघटना भाजप उमेदवारांसाठी किंवा संघ ज्याच्यामागे आपली संपूर्ण ताकद उभी करेल ते निवडून येतात. संघ व संघप्रणित संस्था संघटनांचे कार्यकर्ते निस्वार्थीपणे प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष काम करतात म्हणूनच भाजपचे उमेदवार निवडून येतात हे कटू सत्य आहे. असो. नाशिक येथे होणा-या आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधुग्रामसाठी सुमारे १ हजार ७०० झाडे तोडण्याच्या निर्णयामुळे स़ध्या वातावरण तापले आहे. पर्यावरण व निसर्गप्रेमी नाशिककर या संभाव्य वृक्षतोडीच्या विरोधात एकवटले आहेत. हा विषय ऐरणीवर आला आहे.‌ अयोध्येतील श्रीराम मंदिरावरील धर्मध्वजारोहणप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी जे भाषण केले, एक संस्कृत श्लोक सांगून वृक्षांची सांगितली, ते भाषण महाराष्ट्र भाजप पर्यायाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनावर घेऊन हजारो वृक्षांची होणारी संभाव्य कत्तल थांबविणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.‌ भागवत यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिरावरील धर्मध्वजारोहणप्रसंगी केलेल्या भाषणात छायां अन्य कुर्वन्ति:, तिष्ठन्ति स्वयं आतपे:, फलान्यपि परार्थाय: वृक्षाः सत्पुरुषा इव: असा संस्कृत श्लोक अर्थासहित सांगितला होता. ' या धर्मध्वजावर रघुकुलाचे प्रतिक असलेला कोवीदार वृक्ष आहे. मंदार आणि पारिजात या दोन्ही वृक्षांचे गुण या कोविदार वृक्षात आहेत. हे दोन्ही वृक्ष 'देव वृक्ष' म्हणून मानले जातात. वृक्ष स्वतः उन्हात उभे राहून दुसऱ्यांना सावली, फळे देतात. वृक्ष हे सत्पुरुष असतात', असा भावार्थ भागवतांनी सांगितला. आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधुग्रामसाठी नाशिकच्या तपोवनातील सतराशे झाडांची कत्तल केली जाणार आहे.‌ भाजपसाठी मातृ/पितृतुल्य असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्या संघाच्या सरसंघचालकांनी जे वृक्षमहात्म्य सांगितले, वृक्ष हे सत्पुरुष असतात, असा गुणगौरव केला त्या भागवतांचा व त्यांच्या भाषणाचा आदर करणार का? हा खरा प्रश्न आहे. या संभाव्य वृक्षतोड/ कत्तल प्रकरणी नाशिकमध्ये अलिकडेच जनसुनावणी झाली. या जनसुनावणीत उपस्थित सर्वच नाशिककरांनी ठाम विरोध केला.‌ झाडांची कत्तल केली जाऊ नये, अशी आग्रही भूमिका घेतली. आता महाराष्ट्र भाजपने विचार करून निर्णय घ्यायचा आहे. जनभावनेचा अनादर करून महाराष्ट्र भाजपने/ सरकारने वृक्षतोड करण्याचा निर्णय घेतलाच तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी महाराष्ट्र भाजप व सरकारला या निर्णयापासून परावृत्त केले पाहिजे. चार शब्द सुनावले पाहिजेत, अशी निसर्ग आणि पर्यावरणप्रेमींनी अपेक्षा आहे. नाहीतर भागवत यांचे भाषणही 'बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी' ठरेल. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला याची किंमत मोजावी लागेल, मतदारांनीही ती मोजून दाखवावी. शेखर जोशी २६ नोव्हेंबर २०२६ 👇सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या भाषणातील काही भाग

मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०२५

रामायण शिल्पांपैकी काही शिल्पे घडविण्यात शिल्पकार संदीप लोंढे यांचा सहभाग

श्रीराम मंदिराच्या पायातील रामायण शिल्पांपैकी काही शिल्पे घडविण्यात शिल्पकार संदीप लोंढे यांचा सहभाग - नाशिककर आणि लोंढे कुटुंबीयांसाठी गौरवाचा क्षण नाशिक, दि. २५ नोव्हेंबर अयोध्येतील श्रीराम मंदिरावर मंगळवारी धर्मध्वजारोहण झाले आणि नाशिक येथील शिल्पकार संदीप लोंढे व लोंढे घराण्यासाठी हा अभिमानाचा आणि भाग्याचा क्षण ठरला. अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या तळातील पायावर (lower plinth) जी रामायण शिल्पे आहेत, त्यातील काही शिल्पे घडविण्याचे भाग्य लोंढे यांना लाभले.‌
अयोध्येत श्रीराम मंदिरावर पवित्र भगवा ध्वज अभिमानाने, डौलाने उभारला गेला आणि माझे डोळे भरून आले. रामरायाने माझ्याहीकडून सेवा करून घेतली. यात माझ्या सहकाऱ्यांचाही मोठा वाटा आहे, अशी कृतज्ञतेची भावना यानिमित्ताने लोंढे यांनी व्यक्त केली.
आमच्या पुढील काही पिढ्यांना सांगायला आनंद होईल, की नाशिकच्या शिल्पकार लोंढे घराण्यातील एका कलाकाराला हा सन्मान मिळाला, मी धन्य झालो, अशी प्रतिक्रिया लोंढे यांनी दिली. शेखर जोशी २५ नोव्हेंबर २०२५ (सर्व छायाचित्रे संदीप लोंढे यांच्या फेसबुक पोस्टच्या सौजन्याने)

रविवार, २३ नोव्हेंबर, २०२५

अत्रे ग्रंथालयातर्फे तीन दिवसीय व्याख्यानमाला

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अत्रे ग्रंथालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तीन दिवसीय व्याख्यानमाला डोंबिवली, दि. २३ नोव्हेंबर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्र के अत्रे वाचनालयाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त येत्या २६ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.‌ प्र के अत्रे वाचनालय २०१७ मध्ये डोंबिवलीच्या श्री गणेश मंदिर संस्थानाला ३० वर्षांसाठी हस्तांतरित करण्यात आले. ही व्याख्यानमाला दररोज संध्याकाळी सात वाजता श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली-पूर्व येथे होणार आहे. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी 'संविधान सर्वांसाठी' या विषयावर संविधान अभ्यासक माधव जोशी आपले विचार मांडणार आहेत. २७ नोव्हेंबर रोज 'मला शिवराय व्हायचंय' या विषयावर अतिश अविनाश कुलकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे. तर २८ नोव्हेंबर रोजी 'डिजिटल जगात सुरक्षितता;कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर संरक्षण' या विषयावर अभिषेक सोनार बोलणार आहेत. व्याख्यानमाला सर्वांसाठी विनामूल्य असून डोंबिवलीकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गणेश मंदीर संस्थांनने केले आहे. प्र. के. अत्रे ग्रंथालयाचे सुमारे १ हजार ६०० सभासद असून ग्रंथालयात सुमारे ३९ हजार पुस्तके आहेत. येथे बारा तास मोफत वृत्तपत्र वाचनालय तसेच २५० विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची सोयही उपलब्ध आहे.

शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०२५

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रूरकर्मा टीपू सुलतान'ची जयंती साजरी

क्रूरकर्मा टीपू सुलतान'ची जयंती शाळेत साजरी करणे हा 'राष्ट्रद्रोह' - हिंदू जनजागृती समिती - माजलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रकार बीड, दि. २१ नोव्हेंबर बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 'क्रूरकर्मा टीपू सुलतान'ची जयंती साजरी करण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. शासकीय परिपत्रकात कोणताही उल्लेख नसताना, एका क्रूर शासकाचे उदात्तीकरण करणे हा केवळ नियमांचा भंग नाही, तर हिंदुच्या भावना दुखावून राज्यातील शांतता बिघडवण्याचा अक्षम्य प्रयत्न आहे. या राष्ट्रद्रोही कृत्यासाठी संबंधित शिक्षक, आयोजक आणि निष्काळजी शिक्षण अधिकाऱ्यांवर तातडीने 'गुन्हा दाखल' करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. टीपू सुलतान हा कोणताही आदर्श राजा नसून, त्याने सक्तीचे हिंदुचे धर्मपरिवर्तन, मंदिरांचा विध्वंस आणि हजारो निष्पाप हिंदुच्या हत्यांसारखी क्रूरकृत्ये केली आहेत. एका बाजूला संपूर्ण महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जपत असताना, शासकीय यंत्रणेचा भाग असलेल्या शाळेत अशा क्रूरकर्मा व्यक्तीचे उदात्तीकरण करणे म्हणजे पुढील पिढीला चुकीचा इतिहास शिकवून राष्ट्रविरोधी प्रवृत्तींना खतपाणी घालण्यासारखे असल्याचे हिंदू जनजागृती समितीचे म्हणणे आहे.‌ हा कार्यक्रम आयोजित करणारे शिक्षक, मुख्याध्यापक व निष्काळजी शिक्षण अधिकारी यांच्यावर भारतीय दंड संहिता अंतर्गत धार्मिक भावना दुखावणे आणि राज्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.‌ तसेच संबंधित शिक्षकांचे त्वरित निलंबन करावे. जर या प्रकरणातील सूत्रधारांवर तातडीने आणि कठोर कारवाई झाली नाही, तर हिंदु जनजागृती समिती तीव्र जनआंदोलन छेडण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही हिंदू जनजागृती समितीने दिला आहे.

गुरुवार, २० नोव्हेंबर, २०२५

कल्याणमध्ये मीटर पद्धतीने रिक्षा सुरू;ही तर धूळफेक.

ही तर निव्वळ धूळफेक... शेखर जोशी कल्याणमध्ये मीटर पद्धतीने रिक्षा सुरू झाली म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रिक्षा चालक मालक संघटनांचे नेते, पदाधिकारी, वाहतूक पोलीस डांगोरा पिटत आहेत, पण ही निव्वळ धूळफेक आहे. रिक्षा मीटर सक्ती एखाद्या ठराविक ठिकाणी नको तर संपूर्ण कल्याण डोंबिवली शहरात सर्वत्र होण्याची आवश्यकता आहे. या बातमीनुसार सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी कल्याण रेल्वे स्थानकातून मीटर रिक्षा चालविण्यात येत आहे. मंगळवारपासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. याआधीही कल्याण, डोंबिवलीत मीटर रिक्षासाठी वेगळी रांग ठेवण्याचा प्रयोग करण्यात आला होता. मात्र प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी तो बंद पडला. अर्थात तो फसणारच होता. आता कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर मीटर रिक्षा सुरू करण्याचा प्रयोगही फसण्याचीच शक्यता जास्त आहे. फक्त सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळेत कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरून मीटर पद्धतीने रिक्षा चालविण्याचा हा प्रकारच मुळात हास्यास्पद आहे. म्हणजे कल्याण शहराच्या अन्य वेगवेगळ्या भागातून एखाद्याला रेल्वे स्थानकावर मीटर पद्धतीने यायचे असेल तर तो येऊ शकत नाही. रिक्षाचालक मनमानी पद्धतीने जेवढे पैसे सांगतील तेवढे देऊनच यावे लागेल. त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरून सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी मीटर पद्धतीने रिक्षा सुरू करण्याचा प्रयोग अत्यंत अयोग्य व चुकीचा आहे. प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रिक्षा चालक मालक संघटना, पदाधिकारी यांना खरोखरच आणि मनापासून मीटर पद्धतीने रिक्षा सुरू करायच्या असतील तर त्या संपूर्ण कल्याण शहरात सुरू कराव्यात. संपूर्ण कल्याण शहरात मीटर पद्धतीने रिक्षा सुरू झाल्या म्हणजे शेअर पद्धत बंद करावी, असे अजिबात म्हणणे नाही. दोन्ही पद्धतीने रिक्षाप्रवास करता आला पाहिजे. रिक्षाचालक किंवा रिक्षा चालक मालक संघटना, पदाधिकारी यांना मीटर पद्धतीने रिक्षा नकोत आणि फक्त शेअर पद्धतीनेच रिक्षा चालवायचे एकमेव कारण म्हणजे जर रिक्षा मीटर सक्ती केली गेली तर रिक्षा चालकांना मनमानी पद्धतीने पैसे उकळता येणार नाहीत. कल्याण किंवा डोंबिवलीत रेल्वे स्थानकाच्या बाहेर जे रिक्षातळ आहेत, तिथे प्रवासी बसला की ठरवून दिलेले जे शेअर भाडे आहे त्यापेक्षा जास्त पैसे रिक्षाचालक घेऊ शकत नाहीत. याउलट मीटर सक्ती नसल्याने रिक्षातळ सोडून शहराच्या कोणत्याही भागात प्रवासी रिक्षात बसला की त्याला मनमानी पद्धतीने पैसे उकळता येतात. मीटर पद्धतीने १.०५ किलोमीटर अंतरासाठी फक्त २६ रुपये इतके भाडे ठरवून दिलेले आहे. मात्र इतक्या किंवा यापेक्षाही कमी अंतरासाठी रिक्षाचालक ५० ते ७० रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त पैसे सांगतात. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि अन्य हतबल प्रवाशांना ते देऊन प्रवास करावाच लागतो. अशा रिक्षाचालकांची तक्रार करा, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक पोलीस सांगत असतात. पण प्रत्येक वेळी प्रत्येक प्रवासी, ज्येष्ठ नागरिक रिक्षाचालकांशी वाद घालत बसत नाही. सर्वांना ते शक्य होते असे नाही. त्यामुळे संपूर्ण शहरात, कोणत्याही भागात प्रवासी रिक्षात बसला आणि त्याने मीटरने जायचे आहे सांगितले तर रिक्षाचालकाने मीटर टाकलेच पाहिजे. आणि त्यासाठीच अमूक एखाद्या ठिकाणी, अमूक रिक्षा तळावर, मीटर रिक्षांची वेगळी रांग असा तोंडाला पाने पुसण्याचा आणि मीटर पद्धतीने रिक्षा सुरू झाल्याची धुळफेक न करता तातडीने संपूर्ण कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत रिक्षा मीटर सक्ती केली जावी. सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी, रिक्षा चालक मालक संघटना, त्यांचे पदाधिकारी आणि निष्क्रिय लोकप्रतिनिधी- अर्थात निवडून आलेले आमदार व खासदार या सर्वांनी मुठभर आणि मुजोर, बेशिस्त रिक्षाचालकांच्यापुढे नांगी टाकली आहे. लवकरच कल्याण डोंबिवली महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत कल्याण डोंबिवलीत रिक्षा मीटर सक्ती हा मुद्दा ऐरणीवर आला पाहिजे.‌ सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी आणि उमेदवार मत मागायला येतील तेव्हा प्रत्येकाने 'आधी रिक्षा मीटर सक्ती नंतर मतदान' किंवा ' रिक्षा मीटर सक्ती नाही तर मतही नाही' अशी भूमिका घेतली पाहिजे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही संधी आहे. आत्ता झाले तरच काहीतरी हालचाल होईल. निवडणूक पार पडली की काहीही होणार नाही.‌ गुगल मॅपवर अंतर पाहून भाडे द्यावे आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतो. प्रत्येक प्रवाशाने रिक्षात बसल्यावर जिथे बसलो ते आणि जिथे उतरायचे असेल ते ठिकाण टाकावे. जितके किलोमीटर अंतर दाखवतील तितकेच पैसे द्यावे. एम. इंडिकेटर ॲपवर १.०५ किलोमीटर अंतरापासून ते पुढील किलोमीटरपर्यंत किती भाडे होते त्याचा तक्ता दिला आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रिक्षा चालक मालक संघटनांनी या भाडेतक्त्याचा फलक सर्व प्रमुख रिक्षातळांवर आणि शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी लावावेत. रिक्षा चालक मालक संघटना, पदाधिकारी आणि रिक्षा चालकांना मीटर सक्ती मान्य नसेल तर या पद्धतीने प्रवासी पैसे देतील आणि ते तुम्हाला मान्य करावेच लागेल, असे आदेश, सूचना द्याव्यात. आमदार व खासदारांचे दुर्लक्ष विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रिक्षा मीटर सक्ती या प्रश्नाकडे सोयीस्कर डोळेझाक केली आहे. या दोघांनी आणि त्यांच्या राज्यातील वरिष्ठांनी अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनावर घेतले तर कल्याण डोंबिवलीत रिक्षा मीटर सक्ती होऊ शकते. ते अशक्य नाही. भाजप स्वतःला 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणवून घेतो. आमदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी किमान भाजपप्रणीत रिक्षाचालक मालक संघटनेला व याचे सभासद असलेल्या रिक्षाचालकांनी तरी आपली रिक्षा मीटरप्रमाणे चालविण्यासाठी सक्ती करावी, आवाहन करावे. शेखर जोशी २० नोव्हेंबर २०२५

बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५

महाराष्ट्रात 'अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट' लागू करा

देवस्थानांच्या भूमींचे रक्षण करण्यासाठी 'अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट' राज्यात तात्काळ लागू करा - २२ जिल्ह्यांतील १ हजारांहून अधिक मंदिर विश्वस्तांची शासनाकडे मागणी मुंबई, दि. १९ नोव्हेंबर महाराष्ट्रातील देवस्थानांच्या हजारो एकर जमिनी भूमाफियांनी, महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने बेकायदेशीरपणे हडपल्या आहेत. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी, गुजरात व कर्नाटकच्या धर्तीवर ‘अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ लागू करावा, अशी मागणी महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांतील एक हजारांहून अधिक मंदिर विश्वस्तांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंदिर महासंघाने सादर केलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे.‌ तसेच महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह सुमारे २२ जिल्हाधिकारी, तहसिलदार,आमदार यांना ३०० हून अधिक निवेदने सादर करण्यात आली आहेत. देवस्थानांच्या इनाम जमिनी (वर्ग-३) कायद्याने अहस्तांतरणीय असतांनाही, महसूल विभागातील भ्रष्टाचारामुळे भूमाफियांना मुक्त संधी मिळाली असून हजारों एकर जमिनी हडपल्या आहेत. केवळ पश्चिम महाराष्ट्रातच ६७१ गटांवर थेट अतिक्रमण झाले आहे; विदर्भातील अमरावती, अकोला जिल्ह्यांत ५० कोटींची जमीन केवळ ९६० रुपयांना विकल्याचे समोर आले असल्याचे मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी सांगितले.
या राज्यव्यापी अभियानात रायगड येथील श्री हरिहरेश्वर, साताऱ्याचे श्री सज्जनगड, पालीतील श्री बल्लाळेश्वर, वसईचे श्री परशुराम तपोवन, नाशिकचे श्री मुक्तीधाम, आकोट-अकोल्याचे श्री कान्होबा, रत्नागिरीचे श्री काशी विश्वेश्वर, कोल्हापूरचे श्री उजळाई व अनेक क्षेत्रातील मंदिरांचे विश्वस्त तसेच विविध जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह अकोला येथील १६० अधिवक्ते उपक्रमात सहभागी झाले होते.

उदवाहनापर्यंत जाण्याची डोंबिवलीकरांची वाट बिकट

पक्ष फोडाफोडीच्या महत्त्वाच्या कामामुळे चव्हाण, शिंदे यांचे 'या'नागरी प्रश्नाकडे दुर्लक्ष - उदवाहनापर्यंत जाण्याची वाट बिकट शेखर जोशी डोंबिवली, दि. १८ नोव्हेंबर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सध्या पक्ष फोडाफोडीच्या महत्त्वाच्या कामात व्यग्र आहेत. त्यामुळे डोंबिवली पश्चिमेकडील उदवाहनाच्या नागरी समस्येकडे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कल्याण एण्डच्या दिशेकडील रस्ता पत्रे लावून बंद केल्याने प्रवाशांना पूर्ण हेलपाटा मारून उदवाहनापर्यंत जावे लागते आहे.
दहा ते बारा महिन्यांपूर्वी रेल्वे स्थानक सुशोभीकरण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेकडे बांधण्यात येणाऱ्या पादचारी पुलाच्या कामामुळे येथे असलेले लोकल ट्रेन तिकिट घर आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आरक्षण केंद्र डोंबिवली पश्चिमेला कल्याण‌‌‌ एण्ड दिशेकडे फलाट क्रमांक एकवर हलविण्यात आले. तसेच सुशोभीकरणाच्या कामामुळे कल्याण एण्ड दिशेकडून उदवाहनापर्यंत जाण्या- येण्याचा सहज, सुलभ मार्ग होता तो पत्रे लावून बंद करून टाकला. त्यामुळे आता रेल्वे स्थानकात शिरून उदवाहनापर्यंत पोहोचण्यासाठी काही मुठभर व मुजोर, बेशिस्त रिक्षाचालकांचा अडथळा पार करून, वळसा घालून उदवाहनापर्यंत जावे लागते आहे. खरे म्हणजे या उदवाहनापर्यंत जाण्या-येण्यासाठी रस्त्यावरून थेट सोय सहज करता येणे शक्य आहे. जेव्हा उदवाहन सुरू झाले तेव्हाच हे करता आले असते. ठिक आहे, तेव्हा केले नाही. पण आता कल्याण एण्ड दिशेकडील रस्ता पत्रे लावून बंद केल्याने प्रवासी, नागरिक यांची होणारी गैरसोय व त्रास ठरविले तर एका दिवसात दूर करता येऊ शकतो. पण ते करण्याचीही इच्छा हवी. रस्त्यावरून उदवाहनापर्यंत एका बाजूला पायऱ्या आणि एका बाजूला उतार केला तर नागरिक, प्रवासी यांची दररोजच्या त्रासातून सुटका होऊ शकते. अर्थात त्यासाठी रेल्वे स्थानक परिसर व उदवाहनाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर रस्ता अडवून उभ्या राहणाऱ्या बेशिस्त रिक्षाचालकांचा बंदोबस्त करावा लागेल, तसेच इथे कचरा व राडारोडा टाकला जातो त्यावरही बंदी घालावी लागेल. आमदार व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भाजप व शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, माजी नगरसेवक यांनी मनात आणले तर अक्षरशः एका रात्रीत हे काम ते करू शकतात. पण पक्ष फोडाफोडीतून वेळ मिळाला तर या नागरी समस्येकडे लक्ष द्यायला सवड मिळेल. शेखर जोशी १९ नोव्हेंबर २०२५

शनिवार, १५ नोव्हेंबर, २०२५

महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रे मद्य-मांसमुक्त व्हावीत;

महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रे मद्य-मांसमुक्त व्हावीत; - वारकरी महाअधिवेशनात ठराव मंजूर आळंदी, दि. १५ नोव्हेंबर महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रे मद्य आणि मांसमुक्त करावीत, तसेच मंदिर परिसरात अन्य धर्मियांच्या प्रचारावर बंदी घालण्यासाठी कठोर कायदा करावा, असे ठराव येथे झालेल्या १९ व्या वारकरी महाअधिवेशनात संमत करण्यात आले. ‘वारी आळंदीची, राष्ट्र आणि धर्मरक्षणाची’ हे ब्रीदवाक्य घेऊन पार पडलेल्या या अधिवेशनात राज्यभरातील एक हजाराहून अधिक वारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते सहभागी झाले होते. हिंदू जनजागृती समिती, राष्ट्रीय वारकरी परिषद आणि अन्य संघटनांच्या संयुक्त विद्यमाने येथील सद्गुरू श्री गंगागिरी महाराज मठात कार्तिक वद्य एकादशीच्या निमित्ताने हे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या वेळी बोलताना रामगिरी महाराज म्हणाले, रामायणातील उदाहरणे विकृत पद्धतीने मांडून आदिवासींचे धर्मांतरण करण्याचे ख्रिस्ती मिशनऱ्यांचे षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे. सद्गुरू गंगागिरी महाराजांनी २०० वर्षांपूर्वी चारी वर्णाच्या हिंदूंना एकत्र करण्याचे महान कार्य केले. आपणही आपापल्या प्रभावक्षेत्रात हे कार्य केले, तर धर्मांतरण रोखणे शक्य होईल. तर संत-महंतांनी संघटित होऊन संदेश देण्याची परंपरा ज्ञानेश्वर माऊलींच्या काळापासून चालत आली आहे; पण आज आळंदीत आरोग्य आणि शिक्षण याचे महत्त्व सांगत ख्रिश्चन मिशनरी आळंदीतील हिंदूंचे धर्मांतरण करत आहेत. याला आपण आळा घातला पाहिजे, असे ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे यांनी सांगितले. जादूटोणा कायद्याच्या प्रचारासाठी नेमलेली; परंतु देव-धर्माची टीका करणारी महाराष्ट्र शासनाची ‘जादूटोणा विरोधी कायद्याची जनजागृती, प्रचार व प्रसार समिती’ (PIMC) तात्काळ बरखास्त करण्यात यावी. तसेच नास्तिक आणि अर्बन नक्षलवादी विचारसरणीचे काही लोक पंढरीच्या वारीमध्ये वारकऱ्यांचा बुद्धीभेद घडवून आणत आहेत; हे त्वरित थांबवले पाहिजे. राज्यातील हिंदुत्ववादी सरकारने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व संत-महंतांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या वेळी सरकारशी चर्चेसाठी एकत्र येण्याचे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी केले.
रणरागिणी समितीच्या कु. क्रांती पेटकर, ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांचीही भाषणे यावेळी झाली. हिंदू युवतींच्या संरक्षणासाठी राज्यात 'लव्ह जिहाद विरोधी कायदा' तातडीने संमत करावा, हिंदूंची मंदिरे आणि भूमी बळकावणारा 'वक्फ कायदा' त्वरित रद्द करण्यात यावा, इंद्रायणी आणि चंद्रभागा नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, गोवंश हत्याबंदी कायद्याची राज्यात अत्यंत कठोर अंमलबजावणी करावी इत्यादी ठरावही अधिवेशनात मंजूर करण्यात आले.

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०२५

'मणिपूरचे महाभारत' पुस्तकाचे प्रकाशन आणि मणिपूर सद्यस्थिती' विषयावर व्याख्यान

पूर्व सीमा प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमात'मणिपूरचे महाभारत' पुस्तकाचे प्रकाशन, 'मणिपूर सद्यस्थिती' विषयावर व्याख्यान ठाणे, दि. ८ नोव्हेंबर 'ईशान्य वार्ता'चे माजी संपादक पुरुषोत्तम रानडे लिखित 'चुराचांदपर्व मणिपूरचे महाभारत' या पुस्तकाचे प्रकाशन येत्या १६ नोव्हेंबर रोजी ठाणे येथे एका कार्यक्रमात होणार आहे. पूर्व सीमा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास रुईया महाविद्यालयाच्या तत्वज्ञान विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. हिमानी चौकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी पूर्व सीमा प्रतिष्ठानचे कार्यवाह आणि १९९९ पासून मणिपूर सीमावर्ती भागात 'शिक्षणातून राष्ट्रीय एकात्मता' या विषयावर कार्य करणारे जयवंत कोंडविलकर यांचे 'मणिपूर सद्यस्थिती' या विषयावर व्याख्यानही होणार आहे. हा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता श्रीराम व्यायामशाळा, गडकरी रंगायतनसमोर, ठाणे (पश्चिम) येथे होणार असून शंकर दिनकर काणे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा पुस्तक प्रकाशन सोहळा आणि व्याख्यान होणार आहे.

शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०२५

पादचारी पुलाला अडथळा ठरणारा रेल्वेस्थानक सुशोभीकरणाचा पूर्वेकडील काही भाग जमीनदोस्त

पादचारी पुलाला अडथळा ठरणारा रेल्वेस्थानक सुशोभीकरणाचा पूर्वेकडील काही भाग जमीनदोस्त - तोडकाम केलेला भाग रेल्वे पुन्हा बांधून देणार असली तरी सुशोभीकरणावर झालेला खर्च वाया डोंबिवली, दि. ७ नोव्हेंबर डोंबिवली रेल्वे स्थानकात नव्याने उभारण्यात येत असलेल्या पादचारी पुलाला अडथळा ठरणारा रेल्वे स्थानक सुशोभीकरणाचा पूर्वेकडील काही भाग शुक्रवारी सकाळी जमीनदोस्त करण्यात आला. डोंबिवली पश्चिमेतील चार मीटर आणि पूर्व भागातील वीस मीटर असा सुमारे २४ मीटर इतका सौंदर्यीकरणाचा भाग काढण्यात येणार आहे.अवघ्या काही महिन्यांपूर्वी करण्यात आलेले हे सुशोभीकरण व पाट्यांचा काही भाग जमीनदोस्त केल्याने त्यावर झालेला खर्च वाया गेला आहे. पादचारी पुलाच्या कामात सुशोभिकरणातील एकूण २४ मीटरचा भाग अडथळा ठणारा एकूण २४ मीटरचा भाग तात्पुरता काढण्याचा प्रस्ताव कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागाने मंजूर केला होता. त्यानुसार पूर्वेकडील काही भाग शुक्रवारी तोडण्यात आला. रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक ते पाच दरम्यानचे पादचारी पूल उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूकडील तोडण्यात आलेले सुशोभीकरणाचे काम रेल्वेने पू्र्ववत करून देण्याची अट महापालिकेच्या प्रस्तावात समाविष्ट आहे. डोंबिवली पूर्व व पश्चिम जोडणारा नवा पादचारी पूल डोंबिवली रेल्वे स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज एण्ड दिशेने उभारण्यात येत आहे. त्यासाठी डोंबिवली पश्चिमेला छत्रपती शिवाजी महाराज एण्ड दिशेकडे असलेले लोकल ट्रेनचे तिकीट कार्यालय व लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आरक्षण केंद्रही काही महिन्यांपूर्वी हटविण्यात आले.‌ लोकसभा/ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानक सुशोभीकरणाचे उदघाटन करण्यात आले होते. पादचारी पुलाच्या उभारणीत डोंबिवली पूर्व व पश्चिम भागातील या सुशोभीकरणाचा काही भाग अडथळा ठरणार आहे, ही गोष्ट आधी का लक्षात आली नाही? की लक्षात येऊनही जाणूनबुजून सुशोभीकरणाचे काम करण्याची घाई करण्यात आली? तोडण्यात आलेल्या सुशोभीकरणाचा भाग रेल्वे पुन्हा बांधून देणार असली तरी सुशोभीकरणावरील वाया गेलेला खर्च कोणाकडून वसूल करणार? रेल्वे आणि कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय, संवाद नव्हता का? काही महिन्यांत नवीन पादचारी पुलाचे बांधकाम सुरू करायचेच होते तर या सुशोभीकरणाला सुरुवातच का केली? पादचारी पूल बांधून पूर्ण झाल्यानंतरच सुशोभीकरण केले असते तर आकाश कोसळले असते का? असे अनेक प्रश्न डोंबिवलीकरांना भेडसावत आहेत.
जाता जाता- सुशोभीकरण आणि उभारण्यात आलेल्या कमानी, पाट्यांना डोंबिवली पूर्वैतील रेल्वे स्थानक परिसरातील फेरिवाल्यांचा विळखा पडला आहे. फेरीवाले त्यांचे सामान, विकण्याच्या वस्तू या सुशोभीकरणाला बिनधास्त टांगून ठेवतात. तर पश्चिमेला अधिकृत रिक्षा थांबा आणि मुठभर मुजोर रिक्षाचालकांचा विळखा पडलेला असतो. हे असले सुशोभीकरण व सौंदर्यीकरण काय कामाचे? शेखर जोशी ७ ऑक्टोबर २०२५

छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा, विचारच देश आणि जगापुढील आजच्या सर्व समस्यांचे उत्तर - किशोरजी व्यास उर्फ गोविंददेवगिरी महाराज यांचे प्रतिपादन

छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा,विचारच देश आणि जगापुढील आजच्या सर्व समस्यांचे उत्तर - किशोरजी व्यास उर्फ गोविंददेवगिरी महाराज यांचे प्रतिपादन आळंदी, दि.‌६ नोव्हेंबर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा आणि विचार हेच देश, जगापुढील आजच्या सर्व समस्यांवरील उत्तर आहे, असे प्रतिपादन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त निधीचे कोषाध्यक्ष किशोरजी व्यास उर्फ गोविंददेवगिरी महाराज यांनी गुरुवारी येथे केले. गोविंददेवगिरी महाराज यांच्या हस्ते ' शिवप्रताप २०२६' या दैनंदिनीचे प्रकाशन झाले, त्यावेळी ते बोलत होते. दैनंदिनीचे मुख्य संकल्पनाकार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्राचे अभ्यासक रविंद्र पाटील, डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे आणि महाराष्ट्र फेडरेशनचे संचालक मिलिंद आरोलकर, दैनंदिनीचे प्रवर्तक संजय जोशी, दैनंदिनीचे मुद्रणकर्तेसुबोध पटवर्धन इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते.‌ शिवजयंती साजरी केली,एखादा उत्सव/ कार्यक्रम उरकला,अशी वृत्ती समाजात नसावी.छत्रपती शिवाजी महाराज या चैतन्याचा,विचारांचा संस्कार दररोज आपल्या मनावर झाला पाहिजे.या संस्कारांचे मूळ प्रभू श्री रामचंद्रांमध्ये आहे आणि प्रभू श्रीराम धर्माची पहिली आवृत्ती असतील तर छत्रपती शिवाजी महाराज धर्माची दुसरी आवृत्ती आहेत, असेही गोविंददेवगिरी महाराज यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने निघालेल्या काही दैनंदिनी या आधी पाहिल्या,पुस्तकेही चाळली आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभावी डोस देणारी'शिवप्रताप २०२६'सारखी अन्य कोणतीही दैनंदिनी मला दिसली नाही,अशा शब्दांत गोविंददेवगिरी महाराजांनी या दैनंदिनीचे कौतुक केले. दैनंदिनी निर्मितीत सहभागी असलेल्या सर्वांचे अभिनंदन करून गोविंददेवगिरी महाराज म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि प्रेरणा आपल्या अंगी बाणविण्यासाठी ही दैनंदिनी म्हणजे एक प्रभावी औषध असून सर्वांनी ते दररोज घ्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र, चैतन्य आणि प्रेरणेचा समाजात जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार व्हावा, असे आवाहनही त्यांनी केले. छायाचित्र ओळी. छायाचित्रात डावीकडून रवींद्र पाटील, मिलिंद आरोलकर, गोविंददेवगिरी महाराज, संजय जोशी, सुबोध पटवर्धन.

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे जीवन प्रमाणपत्र शिबीराचे आयोजन

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे जीवन प्रमाणपत्र शिबीराचे आयोजन डोंबिवली, दि. ७ नोव्हेंबर येथील टिळक नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे निवृत्ती वेतनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र शिबीराचे (हयातीचा दाखला) आयोजन करण्यात आले आहे. येत्या ९ नोव्हेंबरपर्यंत हे शिबीर भरविण्यात आले असून ते विनामूल्य आहे. टिळकनगर, डोंबिवली पूर्व येथील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे यंदा पाचवे वर्ष आहे. बँकांमध्ये जीवन प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या लांबलचक रांगापासून ज्येष्ठ निवृत्तीधारकांना दिलासा मिळावा, हा उद्देश यामागे आहे.
गुरुवारी शिबीराच्या पहिल्या दिवशी डोंबिवलीतील १३० निवृत्ती वेतनधारकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. निवृत्ती वेतनधारकांना आँनलाईन जीवन प्रमाणपत्र बनवून देण्याच्या कामात मंडळाचे हितचिंतक माधव मराठे, सुनील जोशी, सुहास वैद्य यांनी महत्त्वाचे योगदान दिले. आजारी,अंध ,वाँकर घेऊन चालणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना प्राधान्य देऊन लगेचच जीवन प्रमाणपत्र बनवून देण्यात आले. जास्तीत जास्त निवृत्ती वेतनधारकांनी मंडळाच्या या उपक्रमाचा फायदा घ्यावा असे आवाहन मंडळाने केले आहे.‌ शक्य झाल्यास डोंबिवलीतील आजारी तसेच घराबाहेर पडू न शकणाऱ्या वयोवृध्द निवृत्ती वेतनधारकांचे जीवन प्रमाणपत्र त्यांच्या घरी जाऊनही करुन देण्याचा मंडळाचा प्रयत्न असणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क संजय शेंबेकर- ९९२०१२९८०३

मंगळवार, ४ नोव्हेंबर, २०२५

श्री क्षेत्र परशुराम डोंगर माथ्यावरील पणतीचे त्रिपुरारी पौर्णिमेला प्रज्वलन

श्री क्षेत्र परशुराम डोंगर माथ्यावरील पणतीचे त्रिपुरारी पौर्णिमेला प्रज्वलन चिपळूण, दि. ४ नोव्हेंबर श्री क्षेत्र परशुराम येथे डोंगरमाथ्यावर , सवतसड्याच्या वरील टेकडीवर असणारी पुरातन भव्य पणती ५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने प्रज्वलित करण्यात येणार आहे.‌ भगवान श्री परशुराम मंदिरातून मशाल पेटवून नेऊन ही पणती प्रज्वलित केली जाणार असल्याची माहिती श्री भार्गवराम परशुराम संस्थानकडून देण्यात आली. श्री क्षेत्र परशुराम येथील ही पुरातन दीपमाळ शिवकालीन असून महेंद्रगिरी पर्वतावरील एका ऊंच शिखर माथ्यावर हीदीपमाळ आहे. या शिखर बिन्दुवरून चिपळूण शहर, श्री परशुराम मंदिर व गाव, सह्याद्री पर्वताच्या मुख्य आणि उपरांगा परिसराचे दर्शन होते. दीपमाळेकडे जाण्यासाठी परशुराम गावच्या पायरवाडीतून पाऊलवाट असून ही वाट जंगलमय, गवताळ कुरणे, डोंगराळ भाग यातून जाते, असे संस्थानच्या फेसबुक पेजवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.‌ ही भव्य दीपमाळ जांभा दगडात कोरलेली असून त्यावरील पुरातन भव्य पणती काळ्या दगडात कोरलेली आहे. दिपमाळ प्रज्वलनासाठी त्यामधे सुमारे १५ लिटर गोडेतेल आणि एक धोतर वात म्हणून वापरले जाते. त्रिपुरारी पौर्णिमेला संध्याकाळी साडेसहा वाजता या भव्य पणतीमध्ये दीपप्रज्वलन करण्यात येते. याच दिवशी सायंकाळी परंपरेने भगवान श्री परशुराम मंदिरात तुळशी विवाह सोहोळाही साजरा केला जातो.ज्ञ पूर्वी ग्रामदैवत जुना काळभैरव देवस्थानतर्फे श्री क्षेत्र परशुराम येथील भव्य पणतीमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेला दीप प्रज्वलनासाठी १ डबा तेल व वातीसाठी १ धोतराचे पान प्रतिवर्षी देण्याची ऐतिहासिक परंपरा होती. गेल्या २२ वर्षांपासून श्री ग्रामदैवत जुना काळभैरव देवस्थान ट्रस्ट, चिपळूणतर्फे ही परंपरा पुन्हा सुरू करण्यात आली आहे . पुर्वी या पणतीचा प्रकाश श्री देव परशुराम यांच्या मूर्तीवर पडत असे वयोवृद्ध, जाणकार मंडळींकडून सांगितले जाते. रात्री चिपळूण शहर परिसरातून या पणतीचा प्रकाश सर्वत्र दिसतो. पणती प्रज्वलन कार्यक्रमासाठी परशुरामचे स्थानिक ग्रामस्थ, चिपळूण शहर व परीसरातील भक्तगण, कार्यकर्ते परिश्रम घेत असतात. भक्तगण, नागरिकांनी या दीप दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री भार्गवराम परशुराम संस्थानने केले आहे. अधिक माहिती आणि उपक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क नितीन लोकरे - 8149444044 समीर शेट्ये - 9890159247 ( हे छायाचित्र श्री भार्गवराम परशुराम संस्थानच्या फेसबुक पेजवरून साभार)

सोमवार, ३ नोव्हेंबर, २०२५

ज्योतिषशास्त्र केवळ भविष्यच नव्हे, तर आध्यात्मिक उन्नतीचा मार्गही दाखवते !

ज्योतिषशास्त्र केवळ भविष्यच नव्हे, तर आध्यात्मिक उन्नतीचा मार्गही दाखवते ! - ज्योतिष अधिवेशनात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन सादर पणजी, दि. ३ ऑक्टोबर ज्योतिषशास्त्र केवळ शिक्षण, विवाह, व्यवसाय इत्यादी व्यावहारिक गोष्टींपुरते मर्यादित नसून, ते व्यक्तीच्या आध्यात्मिक उन्नतीचा मार्गही दाखविते,असा दावा ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे ज्योतिष विशारद राज कर्वे यांनी येथे केला. गोवा येथे आयोजित 'जयसिंगराव चव्हाण ११ व्या आंतरराष्ट्रीय ज्योतिष अधिवेशना'त कर्वे बोलत होते. अधिवेशनाचे उदघाटन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. ‘जन्मकुंडली - जिवात्म्याचा प्रवास दर्शवणारी मार्गदर्शिका !’ या शोधनिबंधाचे मार्गदर्शक डॉ. जयंत बाळाजी आठवले असून, कर्वे हे लेखक आहेत. व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती करण्याची क्षमता आणि मार्ग दर्शविण्यामध्ये ‘ग्रहांमध्ये होणारे योग’ सर्वाधिक महत्त्वाचे असतात. जन्मकुंडलीत चंद्र, बुध, शुक, मंगळ, राहू यांमध्ये परस्पर योग असल्यास व्यक्ती बाह्य विषयवस्तूंपासून सुख मिळवण्यासाठी अधिक उत्सुक असते; याउलट जन्मकुंडलीत या ग्रहांचे सूर्य, गुरु, शनि, केतू, हर्षल, नेपच्यून यांच्याशी योग असल्यास व्यक्ती आंतरिक आनंद, सत्याचे ज्ञान आणि शांती प्राप्त करण्यासाठी प्रेरित होते, तसेच ती समाजाच्या हिताचा विचार करते, असे कर्वे यांनी सांगितले. जन्मकुंडलीत असणार्‍या ग्रहयोगांप्रमाणे व्यक्तीचा आध्यात्मिक उन्नती करण्याचा मार्ग असतो; कुणी भक्तीद्वारे, कुणी ज्ञानाद्वारे, कुणी कर्माद्वारे तर कुणी सेवेद्वारे अध्यात्मात प्रगती करतात. आध्यात्मिक प्रगतीमुळे आपल्यात व्यापकता येते. ज्योतिषांनी लोकांच्या व्यावहारिक समस्यांवर दिशादर्शन देण्यासोबतच आध्यात्मिक उन्नतीसाठीही लोकांना दिशादर्शन करणे आवश्यक आहे, असे आवाहनही कर्वे यांनी यावेळी केले.

दहावी आणि बारावीच्या लेखी, प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक माहितीसाठी संकेतस्थळावर

दहावी आणि बारावीच्या लेखी, प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक माहितीसाठी संकेतस्थळावर - परीक्षेपूर्वी शाळांना देण्यात येणारे वेळापत्रकच अंतिम ठाणे, दि. ३ ऑक्टोबर पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणा-या इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक माहितीसाठी मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र परीक्षेपूर्वी शाळांना देण्यात येणारे वेळापत्रकच अंतिम असेल, असे मंडळाने जाहीर केले आहे.‌ पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत या परीक्षा घेण्यात येतात. इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत तर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा ( शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह ) २ ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. तर इयत्ता बारावीची लेखी परीक्षा (सर्वसाधारण, द्विलक्षी व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा) १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ तर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह) २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होणार आहे.‌ सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मात्र ते फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दासबोध अभ्यास शिबिर समारोप कार्यक्रमात 'मनाचे श्लोक' (अर्थासहित) पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन

दासबोध अभ्यास शिबिर समारोप कार्यक्रमात 'मनाचे श्लोक' (अर्थासहित) पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन डोंबिवली, दि. ३ नोव्हेंबर स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समिती, मंथन व्याख्यानमाला आणि समर्थायन, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीत तीन दिवसीय दासबोध अभ्यास शिबिर आयोजित करण्यात आले होते. श्री गणेश मंदिर संस्थानच्या वक्रतुंड सभागृहात झालेल्या या शिबिरात मनाचे श्लोक आणि दासबोध यांचा अभ्यास कसा करावा यासंबंधी समर्थभक्त समीर लिमये यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.‌ शिबिराच्या समारोपाला लिमये यांनी लिहिलेल्या श्री मनाचे श्लोक (अर्थासहित १ते ६८ श्लोक) पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन शेगावच्या श्री गजाननमहाराजांचे भक्त, वारकरी संप्रदायाचे बाळकृष्ण कुलसुंगे दादा यांच्या हस्ते झाले. यावेळी समीर लिमये,माधव जोशी ,सुधाताई म्हैसकर,प्रवीण दुधे, विनोद करंदीकर, संदीप वैद्य, संजय शेंबेकर, धनश्री नानिवडेकर, संदीप करंजेकर इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते.

शनिवार, १ नोव्हेंबर, २०२५

'मी अश्वत्थामा चिरंजीव' महाकादंबरीची नववी आवृत्ती प्रकाशनाच्या वाटेवर

अशोक समेळ लिखित 'मी अश्वत्थामा चिरंजीव' महाकादंबरीची नववी आवृत्ती प्रकाशनाच्या वाटेवर ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक अशोक समेळ यांनी लिहिलेल्या 'मी अश्वत्थामा चिरंजीव' या महाकादंबरीची नववी आवृत्ती प्रकाशनाच्या वाटेवर आहे. ६८८ पृष्ठांच्या या महाकादंबरीची पहिली आवृत्ती 'डिंपल पब्लिकेशनाने ३१ जानेवारी २०१५ रोजी प्रकाशित केली होती. महाभारत आणि संबंधित साहित्याचे अध्ययन करून, जिथे अश्वत्थाम्याचा वास असल्याची वदंता आहे, तो 'अस्तंबा' पर्वत आणि सभोवतालचा परिसर पालथा घालून, तिथल्या लोकांना अश्वत्थाम्याचे आलेले अनुभव ऐकून आणि स्वानुभव घेऊन समेळ यांनी ही महाकादंबरी लिहिली आहे. अश्वत्थाम्याच्या भळभळत्या जखमेचा नवा आयाम शोधण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत समेळ यांनी लिहिलेल्या भीष्म पितामह यांच्या जीवनावरील 'ते आभाळ भीष्माचं होतं' आणि याज्ञसेनी द्रौपदीच्या व्यक्तिमत्वावरील 'द्रौपदी : काल, आज, उद्या' या दोन महाकादंब-या प्रकाशित झाल्या आहेत.‌ 'डिंपल पब्लिकेशन'नेच त्या प्रकाशित केल्या आहेत.

बुधवार, २९ ऑक्टोबर, २०२५

सहा डझनांच्या हापूस आंब्याच्या पेटीला तब्बल २५ हजार रुपये भाव

नवी मुंबई फळ बाजारात हापूस आंबा आला - सहा डझनांच्या पेटीला तब्बल २५ हजार रुपयांचा भाव वाशीच्या नवीमुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात कोकणाततील देवगडवरून आलेल्या हापूस आंब्याच्या ६ डझनांच्या पेटीला तब्बल २५ हजार रुपयांचा भाव मिळाला आहे.देवगड तालुक्यातील पडवणे गावचे बागायतदार प्रकाश धोंडू शिर्सेकर यांनी ऑक्टोबर महिन्यात दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर हापूस आंब्याची ६ डझनाची पेटी पाठवली होती.‌ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नानाभाऊ जेजूरकर अँड कंपनी या व्यापाऱ्यांकडे ही पेटी दाखल झाली. पेटीची विधिवत पूजा करण्यात येऊन आंबे पूर्णपणे पिकल्यानंतरच विक्रीसाठी ठेवण्यात येतील अशी माहिती व्यापाऱ्यांकडून देण्यात आली होती.‌ त्यानंतर काही दिवसांनी बोली लावण्यात आली असता, या मुहूर्ताच्या आंब्याच्या पेटीला तब्बल २५ हजारांचा विक्रमी दर मिळाल्याचे व्यापारी हर्षल जेजुरकर यांनी सांगितले. मुंबईतील एका ग्राहकाने ही पेटी खरेदी केली असून, त्याचे नाव व्यापाऱ्यांनी गोपनीय ठेवले आहे. आतापर्यंत हापूस आंब्याच्या पेटीला २० ते २२ हजारांपर्यंत विक्रमी दर मिळाला होता. परंतु, यंदा लक्ष्मी पूजनाच्या शुभ मुहूर्तावर आलेल्या हापूसच्या पेटीला २५ हजारांचा दर मिळाला आहे. शिर्सेकर यांच्या बागेत जुलै महिन्यातच काही कलमांना आगाऊ मोहोर आला होता. त्या कलमांवर त्यांनी विशेष प्लास्टिक आवरण व फवारणी करून फळधारणा टिकवली. त्यातून तयार झालेल्या आंब्यांपैकी पहिली पेटी दिवाळीपूर्वीच बाजारात पोहोचली. (छायाचित्र गुगल फोटोवरून साभार)

जल आणि वन संवर्धनाच्या जनजागृतीसाठी ७३ वर्षीय विद्याधर भुस्कुटे यांची पदयात्रा

जल आणि वन संवर्धनाच्या जनजागृतीसाठी ७३ वर्षीय विद्याधर भुस्कुटे यांची पदयात्रा - महाराष्ट्रात ३ हजार १२५ किलोमीटरचा प्रवास डोंबिवली, दि. २९ ऑक्टोबर जल आणि वन संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी डोंबिवलीतील ७३ वर्षीय सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक विद्याधर भुस्कुटे येत्या ३१ ऑक्टोबरपासून पदयात्रा सुरू करणार आहेत.‌ महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांमधून ३ हजार १२५ किलोमीटरची ही पदयात्रा असणार आहे.‌ डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुल येथील कॅप्टन विनयकुमार सचान स्मारक येथून सकाळी साडेसात वाजता पदयात्रेला भुस्कुटे सुरुवात करणार आहेत.‌ आरोहण या संस्थेने या पदभ्रमंतीचे नियोजन केले आहे. जल आणि वनसंवर्धनासह देशात, राज्यात शांती, मानवता, भ्रृणहत्या प्रतिबंध, मूल्याधिष्ठीत शिक्षण व्यवस्था यावर पदयात्रेत ते जनजागृती करणार आहेत. २४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत भुस्कुटे डोंबिवलीत परतणार आहेत. यावेळी भुस्कुटे यांची चौथी पदयात्रा असून भुस्कुटे यांनी पहिली पदयात्रा काश्मीर ते कन्याकुमारी केली होती.‌ चार हजार किलोमीटरच्या या पदयात्रेची लिम्का बुक, अशिया आणि इंडिया बुक्स ऑफ रेकाॅर्डमध्ये नोंद झाली आहे. दुसरी पदयात्रा अरूणाचल प्रदेशातील किबिथू ते गुजरातमधील पोरबंदर अशी चार हजार किलोमीटरची होती. या पदयात्रेचीही लिम्का बुकमध्ये नोंद झाली. तिसरी पदयात्रा गुजरातमधील साबरमती आश्रम, अहमदाबाद, शांतिनिकेतन, कोलकोता, भारताच्या किनारपट्टी मार्गाने तामीळनाडू ते कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक अशी केली होती.

सोमवार, २७ ऑक्टोबर, २०२५

दिवंगत मोरेश्वर कुंटे यांनी काढलेल्या विविध मंदिरांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन

दिवंगत मोरेश्वर कुंटे यांनी काढलेल्या विविध मंदिरांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन - विश्व हिंदू परिषद,मंदिर कोश यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन डोंबिवली, दि. २७ ऑक्टोबर विश्व हिंदू परिषद आणि मंदिर कोश यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीत महाराष्ट्रातील विविध मंदिरांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवंगत मोरेश्वर कुंटे यांनी दुचाकी वाहनावरून महाराष्ट्रातील सुमारे १८ हजार मंदिरांना भेट दिली होती. यातील काही वेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांची छायाचित्रे प्रदर्शनात पाहता येणार आहेत. गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली पूर्व येथे येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत सर्वांसाठी खुले आहे. प्रदर्शनात तरंगणारे तसेच विविध ध्वनी निर्माण करणारे, गाणारे,पाषाणही मांडण्यात आले आहेत.

'आवाज'चा अमृत महोत्सव!

'आवाज'चा अमृत महोत्सव! शेखर जोशी 'विनोदी वार्षिक' असे बिरूद मिरविणाऱ्या 'आवाज' या वार्षिकाचा यंदाचा दिवाळी अंक 'अमृत महोत्सवी' अंक आहे. 'आवाज' चे संस्थापक- संपादक मधुकर पाटकर यांनी १९५१ च्या दिवाळीमध्ये आवाज वार्षिक प्रकाशनला सुरुवात केली. यंदा आवाज ७५ वर्षांचा झाला. 'हवालदिल मानवाला प्रफुल्लित करणाऱ्या फटाकड्यांच्या 'आवाजां'ची तरी आजच्या काळात खात्री कोण देईल? इतके मात्र खरे 'आवाज'चा हा दिवाळी अंक त्यांना पोटभर हासवील, रिझवील नि त्यांची करमणूकही करील' असे 'आवाज' वार्षिकाच्या पहिल्या दिवाळी अंकाच्या मनोगतात मधुकर पाटकर यांनी म्हटले होते. मधुकर पाटकर यांच्या पश्चात पाटकर यांचे सुपुत्र आणि 'आवाज'चे संपादक -प्रकाशक भारतभूषण पाटकर यांनी हा वारसा 'आवाज'च्या अमृत महोत्सवी वर्षीही पुढे चालविला आहे‌. त्या काळात दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठावर महिलांची चित्रे/ छायाचित्रे असणे हा अलिखित नियम होता. 'आवाज' त्याला अपवाद ठरला आणि 'आवाज' ने मुखपृष्ठावरती विनोदी चित्रे/हास्यचित्रेच प्रकाशित केली. १९६० च्या दिवाळी अंकापासून ' आवाज'च्या मुखपृष्ठाला 'खिडकी चित्रां'ची जोड मिळाली. खिडकी चित्र हे आवाजचे खास वैशिष्ठ्य आहे. पुढे इतर काही दिवाळी अंकात या खिडकी चित्रांचे अनुकरण केले गेले. 'आवाज'च्या सुरुवातीच्या काही अंकांचे स्वरूप निखळ विनोदी नव्हते. मात्र १९५३ पासून मुखपृष्ठापासून ते आतील मजकूरापर्यंत 'आवाज' मध्ये अधिकाधिक विनोदी साहित्य, व्यंगचित्रे, हास्यचित्रे, कथा, कादंबरी देण्यास सुरुवात झाली.‌ आणि 'आवाज' संपूर्ण विनोदी वार्षिक झाले. वाचनालयात वाचक 'आवाज' साठी नंबर लावू लागले. १९८९ मध्ये 'आवाज'च्या सुमारे पाऊण लाख अंकांची विक्री झाली आणि दिवाळी अंक विक्रीत 'आवाज'ने एक नवा इतिहास निर्माण केला. 'आवाज' दिवाळी अंकात सुरुवातीपासून ते आजपर्यंत प्रथितयश तसेच प्रयोगशील नवोदित लेखक आणि चित्रकारांना स्थान दिले. महिला लेखिकांचेही विनोदी साहित्य 'आवाज' विनोदी वार्षिकात सातत्याने प्रकाशित होत आहे. 'आवाज' वार्षिकाचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे 'आवाज'मध्ये प्रसिद्ध झालेल्या कथांवरून पुढे काही मराठी, हिंदी चित्रपट आणि नाटके सादर झाली. गेल्या ७५ वर्षात 'आवाज'ला उत्कृष्ट निर्मितीसह विविध गटांत विभागात शासन आणि सार्वजनिक संस्थांकडून अनेक पुरस्कार, 'आवाज' मधील विविध साहित्याला आणि चित्र साहित्यालाही स्वतंत्र पुरस्कार मिळाले आहेत. आवाजाच्या पुढील वाटचालीसाठी आणि शतक महोत्सवी दिवाळी अंकासाठी शुभेच्छा. शेखर जोशी

शनिवार, ११ ऑक्टोबर, २०२५

राज्यात येत्या बुधवारी 'वाचन प्रेरणा दिन'

राज्यात येत्या बुधवारी 'वाचन प्रेरणा दिन'साजरा होणार मुंबई, दि. ११ ऑक्टोबर वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्यात येत्या बुधवारी ( १५ ऑक्टोबर) वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येणार आहे. माजी राष्ट्रपती दिवंगत डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्यानिमित्ताने राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद मराठवाडा साहित्य परिषद विदर्भ साहित्य संघ कोकण मराठी साहित्य परिषद दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा आणि मुंबई मराठी साहित्य संघ या संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. राज्य शासनाचे मंत्रालयातील सर्व विभाग तसेच त्यांच्या अधिपत्याखातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये, शासकीय संस्था, मंडळे सार्वजनिक उपक्रम, सर्व आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम साजरा होणार असून त्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रंथालय, महाविद्यालये, तंत्र महाविद्यालये, पदविका संस्था या ठिकाणीही वाचन प्रेरणा दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

मुंबईतून मान्सून माघारी,ऑक्टोबर हीट जाणवायला सुरुवात

मुंबईतून मान्सून माघारी,ऑक्टोबर हीट जाणवायला सुरुवात मुंबई, दि. ११ ऑक्टोबर संपूर्ण राज्यभरातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला असून मुंबईतून शुक्रवारी मान्सूनने माघार घेतली. यंदाच्या वर्षी मे महिन्यापासून महाराष्ट्रात पाऊस सुरू झाला होता. मान्सूनच्या माघारीनंतर आता मुंबईत 'ऑक्टोबर हीट' जाणवायला सुरुवात झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून मान्सूनचा परतीचा प्रवास खोळंबला होता. येत्या तीन ते चार दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघार घेईल असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी मुंबई सह देशातून 15 ऑक्टोबर रोजी मान्सूनचा माघारीचा प्रवास संपल्याचे जाहीर करण्यात आले होते. दरम्यान मुंबईच्या कमाल तापमानात रविवारपासून वाढ होण्याची शक्यता आहे पुढच्या आठवड्यात सांताक्रुज येथे कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०२५

'डोंबिवली टॅलेंट हंट' स्पर्धेत ओंकार इंटरनॅशनल, पवार पब्लिक स्कूलची बाजी

लायन्स क्लब डोंबिवलीच्या'डोंबिवली टॅलेंट हंट'स्पर्धेत ओंकार इंटरनॅशनल, पवार पब्लिक स्कूलची बाजी डोंबिवली, दि. ७ ऑक्टोबर लायन्स क्लब डोंबिवली आयोजित 'डोंबिवली टॅलेंट हंट' स्पर्धेच्या अंतिम फेरीत ओंकार इंटरनॅशनल, पवार पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. इयत्ता ५ वी ते ७वी आणि ८ वी ते १०वी अशा दोन गटात झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. स्पर्धेचे यंदा १३ वे वर्ष होते. शिक्षणतज्ज्ञ दिवंगत सुरेंद्र बाजपेई सर यांच्या स्मरणार्थ घेण्यात येणा-या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत ४१ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. प्राथमिक फेरीतून दुसऱ्या फेरीसाठी एक हजार तर अंतिम फेरीसाठी ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. वक्तृव, वैयक्तिक मुलाखत, बुद्धिकौशल्य, समयसूचकता, सामान्य ज्ञान, निर्णय घेण्याची क्षमता, संयम, इत्यादी निकषांचा आधारावर दोन्ही गटातील पहिल्या पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ दंतचिकित्सक डॉ. नितीन जोशी, प्रख्यात मानसोपचारतज्ञ डॉ. अद्वैत पाध्ये, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. विंदा भुस्कुटे, सनदी लेखापाल मंथन मेहता यांनी काम पाहिले. विजेत्यांना लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन ट्रेवर मार्टीस यांच्या हस्ते पारितोषिक सन्मानपदक, सन्मानपत्र, पुस्तक आणि शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले. दोन्ही गटातील प्रथम आलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व सायकल, द्वितीय ते पाचवा क्रमांक आलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि स्मार्ट वॉच देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक लायन्स क्लब ऑफ डोंबिवलीच्या विद्यमान अध्यक्षा लायन सपना सिंग यांनी केले, तर सचिव लायन रुपाली डोके यांनी उपस्थितांचे आभार मानले. डोंबिवली टॅलेंट हंट २०२५ चे प्रकल्प प्रमुख लायन नित्यानंद पोवार यांनी यंदाच्या स्पर्धेचा आढावा घेतला तर लायन अमोल पोतदार यांनी अंतिम फेरीतील सर्व स्पर्धकांसाठी पुढील महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या 'युथ लीडरशिप अवेयरन्स कॅम्प' ची माहिती दिली. कौस्तूभ कुलकर्णी, लायन अनघा चक्रदेव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. स्पर्धेतील पारितोषिक विजेते गट इयत्ता ५ वी ते ७ वी प्रथम क्रमांक : कु. मयूख नायर - पवार पब्लिक स्कूल, द्वितीय क्रमांक : आयुष दुघाडे - पवार पब्लिक स्कूल, तृतीय क्रमांक : अर्णव वैद्य ओंकार इंटरनॅशनल स्कूल, चौथा क्रमांक : दीक्षा प्रभुखोत - चंद्रकांत पाटकर विद्यालय (सेमी), पाचवा क्रमांक : गौरी तेवारी - रॉयल इंटरनॅशनल स्कूल. गट इयत्ता ८ वी ते १० वी प्रथम क्रमांक : राजनील चौधरी - ओंकार इंटरनॅशनल स्कूल, द्वितीय क्रमांक : ओजस करंदीकर - ओंकार इंटरनॅशनल स्कूल, तृतीय क्रमांक : यथार्थ शिंदे - गार्डियन हायस्कूल, चौथा क्रमांक : आभा लेले - सिस्टर निवेदिता हायस्कूल, पाचवा क्रमांक : आर्यन सेठ - पवार पब्लिक स्कूल

'मनाचे श्लोक’ चित्रपटाचे नाव न बदलल्यास चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही

'मनाचे श्लोक’ चित्रपटाचे नाव न बदलल्यास चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही - हिंदू जनजागृती समितीचा इशारा मुंबई, दि. ७ ऑक्टोबर राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या ‘मनाचे श्लोक’ धार्मिक ग्रंथाच्या नावाचा वापर करून त्याच नावाने मराठी चित्रपटाची निर्मिती करणे, म्हणजे हिंदूंच्या श्रद्धेचा बाजार मांडणे आहे. शासन आणि सेन्सॉर बोर्डाने याची तातडीने गंभीर दखल घेऊन 'मनाचे श्लोक' हे नाव चित्रपटाच्या शीर्षकातून हटवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.‌ चित्रपटाचे नाव बदलले नाही तर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशाराही हिंदू जनजागृती समितीने दिला आहे. नैतिक मूल्ये शिकविणाऱ्या ग्रंथाचे नाव केवळ मनोरंजन, व्यावसायिक लाभ आणि सवंग प्रसिद्धीसाठी वापरणे, हा कोट्यवधी श्रीरामभक्त आणि समर्थभक्तांच्या धार्मिक भावना पायदळी तुडवण्याचा प्रकार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणी कुराण किंवा बायबल यांसारख्या धार्मिक ग्रंथांची नावे वापरून चित्रपट बनवण्याचे धाडस करेल का? आणि जरी केले, तरी सेन्सॉर बोर्ड त्याला परवानगी देईल का? मग केवळ हिंदूंच्याच धार्मिक भावना वारंवार का दुखावल्या जातात? असा प्रश्न हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी उपस्थित केला आहे. यापूर्वी ‘द डा विंची कोड’ आणि ‘विश्वरूपम’ यांसारख्या चित्रपटांमुळे अनुक्रमे ख्रिस्ती व मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावल्याने अनेक राज्यांत त्यांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने लाल बाबू प्रियदर्शी विरुद्ध अमृतपाल सिंग [(2015) 16 SCC 795] या खटल्यात स्पष्ट केले आहे की, 'रामायण'सारख्या पवित्र ग्रंथांच्या नावांचा वापर व्यावसायिक फायद्यासाठी मक्तेदारी म्हणून करता येत नाही. या तत्त्वानुसार ‘मनाचे श्लोक’ हे नावही चित्रपटासाठी वापरणे कायद्याच्या आणि नैतिकतेच्या विरोधात असल्याचे हिंदू जनजागृती समितीचे म्हणणे आहे.

सोमवार, ६ ऑक्टोबर, २०२५

विद्यादान सहाय्यक मंडळाच्या संस्थापक गीता शहा यांना यंदाचा केशवसृष्टी पुरस्कार जाहीर

विद्यादान सहाय्यक मंडळाच्या संस्थापक गीता शहा यांना यंदाचा केशवसृष्टी पुरस्कार जाहीर मुंबई, दि. ६ ऑक्टोबर ठाणे येथील विद्यादान सहाय्यक मंडळाच्या संस्थापक, विश्वस्त गीता शहा यांना यंदाचा केशवसृष्टी पुरस्कार जाहीर झाला आहे. केशवसृष्टी पुरस्काराचे यंदाचे १६ वे वर्ष असून पुरस्कार वितरण समारंभ येत्या ११ ऑक्टोबर रोजी ठाणे येथे होणार आहे. बृहन्मुबई महापालिकेच्या उपायुक्त ( शिक्षण ) डॉ. प्राची जांभेकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. श्रीराम व्यायामशाळा, डॉ. मूस रोड, तलावपाळी जवळ, ठाणे पश्चिम येथे दुपारी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. शहा यांनी ग्रामीण भागातील गरजू, होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा शिक्षणाद्वारे सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने काम सुरू केले. काही सहकारी आणि कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन १५ ऑगस्ट २००८ रोजी विद्यादान सहाय्यक मंडळ संस्था सुरू केली. शिक्षणासह या विद्यार्थ्यांच्या मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक इत्यादी प्रश्नांची जवाबदारीही संस्था घेते. त्यांना समाजात सक्षम पणे उभे करते. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक सुज्ञ पालक, मार्गदर्शक निवडला जातो. तो ह्या मुलांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याची सर्व जवाबदारी घेतो.आज असे पन्नास पालक मार्गदर्शक कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांंचा शैक्षणिक खर्च, निवास व्यवस्था, जेवणाचा खर्च , वैद्यकीय खर्च संस्थेतर्फे केला जातो. आजपर्यंत संस्थेने १२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवला आहे. त्यामध्ये डॉक्टर, अभियंते, परिचारक, तंत्रज्ञ, वकील, सनदी लेखापाल, कला दिग्दर्शक, वास्तु विशारद यांचा समावेश आहे. सहा शाखा , आठ वसतिगृहे, १७ मार्गदर्शक समित्या आणि एक हजारांहून अधिक कार्यरत माजी विद्यार्थी यांच्या मदतीने ३५ जिल्ह्यातील ८५० विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कार्यरत आहे. अमेया जाधव यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. अलका मांडके, डॉ. शुभा राऊळ, डॉ. कविता रेगे, हेमा भाटवडेकर, रश्मी भातखळकर, वैजयंती कुलकर्णी-आपटे, अर्चना वाडे, सुनयना नटे, ॲड. सुनीता तिवारी, राधा पेठे, शुभदा दांडेकर, सीमा उपाध्याय यांच्या निवड समितीने या वर्षीच्या केशवसृष्टी पुरस्काराची निवड केली.

शुक्रवार, ३ ऑक्टोबर, २०२५

'डोंबिवली टँलेन्ट हंट'ची रविवारी अंतिम फेरी

'डोंबिवली टँलेन्ट हंट'ची रविवारी अंतिम फेरी - लायन्स क्लब ऑफ डोंबिवलीतर्फे आयोजन डोंबिवली, दि. ३ ऑक्टोबर लायन्स क्लब ऑफ डोंबिवली आयोजित 'डोंबिवली टँलेन्ट हंट' स्पर्धेची अंतिम फेरी येत्या ५ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.‌ दिवंगत प्राचार्य डॉ. सुरेंद्र बाजपेयी यांच्या स्मरणार्थ घेण्यात येणा-या स्पर्धेचे यंदा १३ वे वर्ष आहे. यंदाच्या वर्षी २० ऑगस्ट रोजी पहिली फेरी तर दुसरी फेरी २८ सप्टेंबर रोजी पार पडली.‌ प्रथम फेरीत ४०,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते. त्यातून दुसऱ्या फेरीसाठी एक हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. अंतिम फेरीसाठी ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.‌ वक्तृत्व - कौशल्य, वैयक्तिक मुलाखत, स्किल-टेस्ट, माईंड गेम्स इत्यादी विविध आव्हाने अंतिम फेरीतील सहभागी विद्यार्थ्यांना पार करावी लागणार आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवर अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. अंतिम फेरीतील ५० स्पर्धकांमधून ५ वी ते ७ वी आणि ८वी ते १०वी या दोन गटातून पहिल्या पाच विजेत्यांची निवड केली जाणार आहे.

मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५

'शिवप्रताप'दैनंदिनीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक हजार घटनांची नोंद

'शिवप्रताप'दैनंदिनीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक हजार घटनांची नोंद मुंबई, दि. ३० सप्टेंबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्वाच्या एक हजार घटनांचा उल्लेख असलेली 'शिवप्रताप' दैनंदिनी लवकरच प्रकाशित होणार आहे.‌ डॉ. रवींद्र पाटील यांची संकल्पना असलेल्या २०२६ च्या दैनंदिनीत युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांची सचित्र माहिती देण्यात येणार आहे.
'शिवप्रताप' दैनंदिनीची पृठसंख्या २४० असून दैनंदिनीत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज्ञापत्रे, जीवनपट, सनावळी, दर महिन्याचे नियोजन पान याचा समावेश असेल.‌ दैनंदिनीचे प्रकाशक शब्दप्रभू पब्लिकेशन असून शिवप्रताप दैनंदिनीची नोंदणी सुरू झाली आहे. अधिक माहिती आणि संपर्क संजय जोशी- 9819371425 ( सकाळी साडेदहा ते रात्री साडेसात) किंवा शब्दप्रभू पब्लिकेशन- 7887337332

शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५

कोकणातील कातळशिल्पांचे जतन संवर्धन करणार

कोकणातील कातळशिल्प जतन संवर्धनसाठी पर्यटन विकास महामंडळ,निसर्गयात्री संस्थेत सामंजस्य करार - जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मार्फत राज्यात विविध कार्यक्रम मुंबई, दि. २७ सप्टेंबर कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्पांचे जतन संवर्धन तसेच प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.‌ पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे यांनी रत्नागिरीतील कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्राला भेट दिली. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत गणपतीपुळे येथे झालेल्या कार्यक्रमात निसर्गयात्री संस्था, रत्नागिरीचे संस्थापक अध्यक्ष तसेच कोकणातील कातळशिल्प शोधकर्ते व अभ्यासक सुधीर रिसबूड आणि प्रादेशिक व्यवस्थापक दीपक माने या दोघांच्या स्वाक्षरीने हा सामंजस्य करार करण्यात आला जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने पर्यटन विकास महामंडळाच्या मुख्य कार्यालय आणि संलग्नित सर्व प्रादेशिक कार्यालये, पर्यटक निवास येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक पर्यटन दिन उपक्रमात विविध स्पर्धेत यशस्वी स्पर्धकांना व्यवस्थापकीय संचालक नीलेश र . गटणे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर , नाशिक, रत्नागिरी येथील प्रादेशिक कार्यालयात पर्यटकांचे स्वागत, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. विविध पर्यटक निवासात पर्यटकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. राज्य पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, हॉटेल रिसॉर्ट चे प्रख्यात वास्तुविशारद खोझेमा चितलवाला व वन्यजीव पर्यटन तज्ज्ञ संजय देशपांडे यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.

सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५

महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे सर्व अंक आता माहितीच्या महाजालावर

महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे सर्व अंक आता माहितीच्या महाजालावर गेल्या ९७ वर्षांपासून त्रैमासिक स्वरूपात प्रकाशित होत असलेल्या 'महाराष्ट्र साहित्य पत्रिका' या मासिकाच्या आत्तापर्यंतच्या सर्व अंकांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे सर्व अंक आता साहित्यप्रेमी आणि वाचकांसाठी माहितीच्या महाजालात उपलब्ध झाले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची घटक संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे १९२८ पासून 'महाराष्ट्र साहित्य पत्रिका' हे त्रैमासिक प्रकाशित करण्यात येत आहे. राज्य मराठी विकास संस्थेतर्फे या मासिकाच्या डिजिटायझेशनचे काम हाती घेण्यात आले होते. या त्रैमासिकाचा पहिला अंक १९१३ मध्ये 'विविधज्ञानविस्तार'ची पुरवणी म्हणून प्रकाशित झाला होता. १९२८ पासून ते त्रैमासिक स्वरूपात स्वतंत्रपणे सुरू झाले. त्रैमासिकाचे सर्व अंक महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या sahityaparishad.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

शनिवार, २० सप्टेंबर, २०२५

'सागरी सीमा मंच‘ कोकण प्रांतातर्फे किनारपट्टी स्वच्छता अभियान

'सागरी सीमा मंच‘कोकण प्रांतातर्फे किनारपट्टी स्वच्छता अभियान मुंबई, दि. २० सप्टेंबर जागतिक किनारपट्टी अभियान दिन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षाच्या औचित्याने 'सागरी सीमा मंच'च्या कोकण प्रांतातर्फे किनारा स्वच्छता अभियान उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शनिवारी ( २० सप्टेंबर) या अभियानाची सुरुवात झाली. कोकण किनारपट्टीवरील तब्बल शंभरहून अधिक ठिकाणी हा उपक्रम एकाचवेळी राबविण्यात येणार आहे. समुद्र किनाऱ्यांवरील प्लास्टिक व घनकचरा हटविणे, किनाऱ्यांची प्रत्यक्ष स्वच्छता करणे आणि किनारपट्टी सुरक्षेबाबत जनजागृती करणे असे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. 'स्वच्छ सागर - सुरक्षित सागर, सुरक्षित किनारपट्टी - समर्थ भारत' संकल्पनेला या उपक्रमात मूर्त स्वरूप देण्यात येणार आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी भारतीय तटरक्षक दल, राष्ट्रीय सेवा योजना, मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास खाते, विविध अशासकीय संस्था, शासकीय विभाग, पर्यावरण स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये व शाळा या उपक्रमात सहभागी होणार आहेत. 'सागरी सीमा मंचा' तर्फे विद्यार्थी व स्थानिक नागरिकांमध्ये स्वच्छ व सुरक्षित समुद्रकिनाऱ्यांचे महत्त्व पटवून दिले जात आहे. भारतीय संस्कृतीत भूमातेबद्दल असलेला आदर लक्षात घेऊन आजच्या पिढीने समुद्र, किनारे आणि निसर्ग जतन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, हा संदेश रा. स्व. संघाच्या शताब्दीवर्षातील अभियानातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे 'सागरी सीमा मंच' कोंकण प्रांतच्यावतीने सांगण्यात आले.‌ अधिक माहितीसाठी संपर्क दुर्गेश बोराडे (अभियान प्रमुख) ८१०८०६६२३८

शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५

सीमेवरील दहा हजार जवानांना डोंबिवलीतून फराळ पोहोचणार!

सीमेवरील दहा हजार जवानांना डोंबिवलीतून फराळ पोहोचणार! -भारत विकास परिषदेच्या डोंबिवली शाखेचा उपक्रम डोंबिवली, दि. १९ सप्टेंबर 'ऑपरेशन सिंदूर' निमित्ताने सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारत विकास परिषद-हुतात्मा कॅप्टन विनयकुमार सचान डोंबिवली शाखेतर्फे यावर्षी देशाच्या सीमांवरील दहा हजार जवानांना डोंबिवलीतून दिवाळी फराळ आणि शालेय विद्यार्थ्यांनी बनविलेली शुभेच्छा पत्र पाठविण्यात येणार आहेत. उपक्रमाचे हे तिसरे वर्ष असून २०२४ या वर्षी सीमांवरील पाच हजार तर त्या आधीच्या वर्षी दोन हजारसैनिकांपर्यंत दिवाळी फराळ पोहोचविण्यात आला होता. फराळाचे डबे सीमावर्ती भागात पाठवण्यासाठी सुमारे पन्नास लाख रुपये इतका खर्च अपेक्षित असून लोकसहभागातून ही रक्कम उभी केली जाणार आहे. फराळाचे सर्व पॅकिंग परिषदेचे सदस्य, डोंबिवली शहरातील नागरीक, विद्यार्थी यांच्या श्रमदानातून होणार आहे. याची सुरवात शारदीय नवरात्र घटस्थापनेच्या दिवशी (२२ सप्टेंबर ) या दिवशी पद्मश्री गजानन माने आणि इतर मान्यवरांच्या हस्ते फराळाचे डबे भरून केली जाणार आहे. ‌या सेवायज्ञात कमीत कमी ५०० रुपये देऊन फराळाचा एक डबा किंवा अधिक कितीही देणगी देऊन सहभागी होता येईल. दिलेल्या देणगीला आयकर कायद्यानुसार ८० जी ची वजावट आहे. दानशूर आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन भाविप, डोंबिवली शाखा अध्यक्षा अँड वृंदा कुलकर्णी यांनी केलेआहे. अधिक माहितीसाठी ९८२१४२९६७७/९८९२२५८९२३ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. चाणक्य मंडळचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी, 'एसआयआरएफ' संस्थेच्या संचालिका सुमेधा चिथडे, निवेदिका आणि सूत्रसंचालिका अनघा मोडक आदी मान्यवरांनी ध्वनीचित्रफित तयार करून या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

सोमवार, १५ सप्टेंबर, २०२५

आचार्य अत्रे चौक, आरे मेट्रो स्थानकातून पहिली मेट्रो गाडी आता सकाळी ५.५५ ला सुटणार

आचार्य अत्रे चौक, आरे मेट्रो स्थानकातून पहिली मेट्रो गाडी आता सकाळी ५.५५ ला सुटणार - १५ सप्टेंबरपासून अंमलबजावणी सुरू मुंबई, दि. १५ सप्टेंबर कुलाबा-वांद्रे-आरे-सीप्झ भुयारी मेट्रो ३ मार्गिकेतील आचार्य अत्रे चौक आणि आरे मेट्रो स्थानकावर सकाळी ६.३० ऐवजी आता सकाळी ५.५५ वाजता पहिली मेट्रो गाडी सुटणार आहे. आरे ते बीकेसी मार्गिका ऑक्टोबर २०२४ मध्ये तर बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मार्गिका मे २०२५ मध्ये सुरू झाली. ही मार्गिका सेवेत दाखल झाल्यापासून सोमवार ते शनिवारदरम्यान सकाळी ६.३० ते रात्री १०.३० या वेळेत आरे ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकादरम्यान मेट्रो गाड्या चालवल्या जातात. तर रविवारी मात्र सकाळी ८.३० ते रात्री १०.३० अशी मेट्रो सेवेची वेळ होती.

दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचे बुधवारी उदघाटन; 'संत तुकाराम' चित्रपटाचे सादरीकरण

दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचे बुधवारी उदघाटन; 'संत तुकाराम' चित्रपटाचे सादरीकरण मुंबई, दि. १५ सप्टेंबर महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचे येत्या १७ सप्टेंबर रोजी उदघाटन करण्यात येणार आहे.‌ प्रभात फिल्म कंपनीनिर्मित 'संत तुकाराम' हा चित्रपट यावेळी दाखविण्यात येणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या लघू नाट्यगृहात दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगातील सर्वोत्तम दहा चित्रपटांमध्ये स्थान मिळवणारा 'संत तुकाराम' पहिला भारतीय चित्रपट ठरला होता. दर्जेदार चित्रपट बघणारा रसिकवर्ग घडविणे आणि जुन्या काळातील गाजलेले, ऐतिहासिक चित्रपट तसेच नव्या पिढीने निर्मित केलेले सकस, प्रगल्भ व विचारप्रवर्तक चित्रपट यांचा रसिकांना आस्वाद घेता यावा, याकरिता हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील सांगितले. कार्यक्रम विनामूल्य असून 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश' या तत्वावर आसन व्यवस्था करण्यात येणार आहे.

शनिवार, १३ सप्टेंबर, २०२५

यावर्षी नवरात्र दहा दिवसांचे

यावर्षी नवरात्र दहा दिवसांचे- ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ.सोमण ठाणे, दि. १३ सप्टेंबर आश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी होत असल्याने यंदाच्या वर्षी नवरात्र दहा दिवसांचे असून २२सप्टेंबर ते १ आक्टोबर २०२५ या कालावधीत नवरात्रोत्सव आहे, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.‌ आश्विन महिन्यात शेतात तयार झालेले धान्य घरात येत असते. म्हणून नवरात्र निर्मिती शक्तीचा,आदिशक्तीचा उत्सव असून तो महिलांच्या सबलीकरणाचाही उत्सव असतो, असे सोमण यांनी सांगितले.‌ नवरात्रात कुठल्या रंगाचे वस्त्र परिधान करावे हे कुठल्याही धर्मग्रंथात सांगितलेले नाही. परंतु नवरात्र उत्सव हा केवळ धार्मिक नाही तर तो सामाजिक, सांस्कृतिकही आहे. नवरात्रात महिलांनी एकाच रंगाची वस्त्रे परिधान केल्याने त्यांच्यात समानतेची, एकतेची आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत होते, असेही सोमण म्हणाले.‌ नवरात्री नवरंग २०२५ -------------------------- १)सोम.२२सप्टें. सफेद/पांढरा २) मंगळ.२३ सप्टें. लाल ३) बुध.२४ सप्टें. निळा ४) गुरू.२५ सप्टें.पिवळा ५) शुक्र.२६ सप्टें. हिरवा ६) शनि.२७ सप्टें.करडा/ग्रे ७) रवि. २८ सप्टें.केशरी/भगवा ८) सोम.२९सप्टें. मोरपिशी/पिकाक ग्रीन ९) मंगळ.३० सप्टें. गुलाबी. १०) बुध.१ आक्टो. जांभळा.

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करणार

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करणार- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार मुंबई, दि. १३ सप्टेंबर ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार यांनी शनिवारी येथे दिली. सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेल्या एका बैठकीत बारव संवर्धन, संरक्षण याबाबत आढावा घेण्यात आला.‌ राज्यात ऐतिहासिक वारसा असलेल्या आणि पुराणकाळापासून ज्यांच्या नोंदी सापडतात अशा तीन हजारांहून अधिक बारव आहेत. येथे ज्या पद्धतीचे स्थापत्यशास्त्र वापरले आहे, त्या स्थापत्यशास्त्राचा नमुना जगामध्ये दुर्मिळ असून या बारवमुळे जलसंवर्धन आणि जलसंधारणाचेही काम केले जात आहे. शासकीय यंत्रणेतील अधिकारी तसेच जलसंधारण, ऐतिहासिक वारसा विषयांमध्ये काम करणाऱ्या तज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहे, असे शेलार यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यामध्ये या सगळ्यांचं दस्तावेजीकरण करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व बारवांच्या प्राथमिक सर्वेक्षणाच्या अहवालाचे काम येत्या तीन महिन्यांमध्ये पूर्ण केले जाणार आहे.

बुधवार, १० सप्टेंबर, २०२५

भारत विकास परिषद आयोजित 'भारत को जानो' स्पर्धा

भारत विकास परिषद आयोजित 'भारत को जानो' स्पर्धा डोंबिवली, दि. १० सप्टेंबर भारत विकास परिषद- डोंबिवली शाखा आणि हुतात्मा कॅप्टन विनयकुमार सचान स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच 'भारत को जानो' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता ६ वी वी ते ८ वी या छोट्या गटात २८ तर मोठ्या गटात २५ संघ सहभागी झाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून अतिश कुलकर्णी तर कविता मिश्रा प्रांत निरीक्षक म्हणून उपस्थित होत्या. छोट्या गटात ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूलने पहिला तर मोठ्या गटात स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, विष्णुनगरने पहिला क्रमांक पटकावला. भारत विकास परिषद डोंबिवली शाखेच्या अध्यक्षा ॲड. वृंदा कुळकर्णी यांच्यासह दोन्ही संस्थानचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

'शालू झोका दे गो मैना' आता मोठ्या पडद्यावर

'हास्यजत्रा'प्रसिद्ध प्रभाकर मोरे यांचे 'शालू झोका दे गो मैना' आता मोठ्या पडद्यावर - आनंद शिंदे यांनी गायलेले गाणे समाज माध्यमांवर सादर मुंबई, दि. १० सप्टेंबर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' प्रसिद्ध अभिनेते प्रभाकर मोरे यांचे 'शालू झोका दे गो मैना' हे गाणे लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असून गायक आनंद शिंदे यांनी ते गायले आहे. समाज माध्यमांवर हे गाणे नुकतेच प्रकाशित झाले आहे. प्रभाकर मोरे,धनश्री काडगावकर यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे 'लास्ट स्टॉप खांदा' या आगामी मराठी चित्रपटात असून हा चित्रपट येत्या २१ नोव्हेंबररोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. श्रमेश बेटकर यांनी लिहिलेलं हे गाणं किशोर मोहिते यांनी संगीतबद्ध केले आहे. या गाण्याची युट्यूब लिंक https://youtu.be/Hbgz8RMOcPI?si=iUrLbZGyQ83ljp48

वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी ग्रंथालय मित्र मंडळ

वाचन संस्कृतीच्या जतन,संवर्धनासाठी ग्रंथालय मित्र मंडळ मराठी वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने डोंबिवली ग्रंथ संग्रहालयातर्फे ग्रंथालय मित्र मंडळ ही संकल्पना घेऊन काम करण्यात येत आहे. वाचक, लेखक आणि ग्रंथालये यांच्यात संवाद साधून, समाजातील विविध घटकांना बरोबर घेऊन ही चळवळ पुढे नेण्याचा मानस डोंबिवली ग्रंथ संग्रहालयाचे माजी मुख्य कार्यवाह सुधीर बडे यांनी व्यक्त केला. ग्रंथालय मित्र मंडळ संकल्पनेविषयी बडे यांच्याशी केलेली बातचीत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीकरता संपर्क सुधीर बडे- +91 93214 31548 गिरीश घाटे- +91 98201 46432 विलास चंदने- +91 98194 23626 प्रकाश ओक- +91 81082 36901 ग्रंथालय मित्र मंडळ संकल्पनेविषयी डोंबिवली ग्रंथ संग्रहालयाचे माजी मुख्य कार्यवाह सुधीर बडे यांच्याशी केलेली बातचीत शेजो उवाच या युट्यूब चॅनेलवर ऐकता/ पाहता येईल. खाली दिलेल्या लिंकवर अंगठा टेकवला की ही लिंक ओपन होईल. शेजो उवाच https://youtu.be/olPxM6iD31E?feature=shared

ग्रामीण भागातील मुलांच्या रखडणाऱ्या लग्नाच्या विषयावरील 'कुर्ला टू वेंगुर्ला'

ग्रामीण भागातील मुलांच्या रखडणाऱ्या लग्नाच्या विषयावरील 'कुर्ला टू वेंगुर्ला' - येत्या १९ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित मुंबई, दि. १० सप्टेंबर ग्रामीण भागातील तरुणांच्या रखडणाऱ्या लग्नाचा विषय 'कुर्ला टू वेंगुर्ला' या आगामी चित्रपटात मांडण्यात आला असून हा चित्रपट येत्या १९ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. विजय कलमकर दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ग्रामीण भागात मुलांची लग्न जमणे ही समस्या झाली आहे. गावातल्या मुलींना शहराचे आकर्षण असते, त्यांच्याही आयुष्याबद्दल काही इच्छा-आकांक्षा असतात. परिणामी शहर आणि ग्रामीण भाग अशी एक दरी निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या रखडणाऱ्या लग्नाचा संवेदनशील विषय, त्याच्याशी जोडलेले सामाजिक मुद्दे, परस्पर नातेसंबंध अशा विषयाची मांडणी कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटात करण्यात आली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लेखन अमरजीत आमले यांचे असून चित्रपटात वीणा जामकर, प्रल्हाद कुडतरकर, वैभव मांगले, सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर, साईंकित कामत, अमेय परब, शेखर बेटकर, अनघा राणे इत्यादी कलाकार आहेत.

मंगळवार, ९ सप्टेंबर, २०२५

राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला हाच का तुमचा सार्वजनिक गणेशोत्सव?

राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला हाच का तुमचा सार्वजनिक गणेशोत्सव? शेखर जोशी राज्य शासनाने म्हणे यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला होता.‌ हाच का तुमचा राज्य महोत्सव... पुण्यात विसर्जन मिरवणूक ३५ तास, छातीत धडकी भरविणा-या डीजेच्या भींती, अचकट विचकट गाणी व अश्लील नृत्य, ढोल ताशांचा दणदणाट ( दोन/चार ढोल ताशे वादक असतील तर एकवेळ समजू शकतो, ढोल ताशा वादकांची पथके च्या पथके. पारंपरिक असले तरी एका मर्यादेपलीकडे त्याचाही त्रासच होतो), लेझर दिवे आणि धांगडधिंगा.‌(काही अपवाद वगळता) पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात काही अपवाद वगळता सर्वत्र हेच चित्र होते. स्थानिक पातळीवरील सर्वपक्षीय निर्लज्ज,कोडग्या लोकप्रतिनिधींचाच वरदहस्त या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर असल्याने वेगळे काय होणार? तुम्ही काहीही करा, सर्वसामान्य सुजाण व सुसंस्कृत नागरिकांना कितीही बोंबलू द्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, या मानसिकतेमुळे ही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व त्याचे पदाधिकारी, कार्यकर्ते सोकावले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हा निर्णय घेतला खरा. पण उत्सवाचे विकृतीकरण आणि बाजारीकरण होणार नाही, हे ही राज्य शासन आणि सर्व प्रशासकीय यंत्रणांनी पाहायला हवे होते.‌ पण राज्यात काही सन्माननीय अपवाद वगळता कुठेही दिसले नाही. सोलापूरमध्ये शांततेत विसर्जन मिरवणूक पार पडते तर राज्यात इतर ठिकाणी ते का होत नाही? रस्ता अडवून, पादचारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे भव्य मंडप उभारून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झालाच पाहिजे हा हट्ट कशासाठी? शहरातील बंदिस्त सभागृह, मंगल कार्यालय याठिकाणी गणपती बसवणार असाल तर आणि तरच सार्वजनिक गणेशोत्सवाला परवानगी दिली जाईल, याची कठोरात कठोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी सत्ताधारी राज्यकर्ते आणि विरोधक यांनी धाडस दाखवले पाहिजे. डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेली अनेक वर्षे त्यांचा गणेशोत्सव सुयोग मंगल कार्यालयात साजरा करत आहेत. मंडळाची गणपती आगमन आणि विसर्जन मिरवणूकही पारंपरिक पद्धतीने निघते.फटाके, डीजेजा वापर नसतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे सदानकदा फडणवीस, शिंदे यांच्यावर तोंडसुख घेत असतात. टोमणेगिरी करतात. पण या प्रकरणी त्यांची अळी मिळी गूप चिळी आहे. अर्थात लोकानुनय न करता प्रसंगी कटू निर्णय घेऊन सत्ता राबवायची असते. शिवसेना एकसंघ असताना शिवसेनेच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी मुंबईतील गणेश मूर्तींच्या उंचीवर मर्यादा आणण्यासाठी महापौर असताना प्रयत्न सुरू केले होते. खरे तर पक्षप्रमुख आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा सांगणाऱ्या त्यांच्या या नातवाने महापौर डॉ. राऊळ यांना पाठिंबा देऊन हा विषय धसास लावायला हवा होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेत तर शिवसेनेचेच बहुमत होते, सत्ताही होती. पण उद्धव ठाकरे यांनी कच खाल्ली आणि धमक दाखवली नाही. मतपेढीवर डोळा ठेवून सद्गुण विकृती असलेले मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, चमकेश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी याची गंभीर दखल घेऊन कायदा धाब्यावर बसविणारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि पदाधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कायद्यानुसार कारवाई, शिक्षा केली पाहिजे. आम्ही अमूक करू, तमूक करु, कायद्याची अंमलबजावणी करू, यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याची काळजी घेऊ, अशी तोंडपाटीलकी न करता प्रत्यक्ष व ठोस कारवाई झाली असल्याचे लोकांना दिसू द्या. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा काळ सोकावत चालला आहे. शेखर जोशी